ठाणे : भारतीय जनता पक्षाने भारतीय राजकारणाला विदेशी प्रभाव, विचार आणि मानसिकता यातून मुक्त केले. मार्क्सवाद, समाजवाद आणि भांडलवलशाही या चौकटीतून भारतीय राजकारण बाहेर काढले. देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. परकीय तत्वज्ञाना ऐवजी स्वदेशी चिंतनाची जोड दिली, असे प्रतिपादन पत्रकार, राजकीय-सामाजिक विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नौपाडा मंडल आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मकरंद मुळे बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रभाग क्रमांक एकवीसचे नगरसेवक सुनेश जोशी, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घाग्रेकर व्यासपीठावर होते. सदर कार्यक्रम नौपाडा, विष्णू नगर येथील नगरसेवक सुनेश जोशी यांच्या संपर्क कार्यालयात झाला. मकरंद मुळे यांनी आपल्या भाषणात 1980 ते 2024 भाजपाच्या वाटचालीचा आढावा घेतला. नीती, मूल्य, आदर्श, तत्व आणि व्यवहारिक राजकारण याचे संतुलन भाजप करत आहे असे मकरंद मुळे यांनी सांगितले. मतपेटीचे राजकारण आणि अस्मिततेच्या नावाखाली संकुचित भूमिका यापार्श्वभूमीवर भाजपाने स्थापनेपासून व्यापक राष्ट्रीय भूमिका घेतली असे मकरंद मुळे म्हणाले. भाषा, प्रांत, पंथ आणि जात यापलीकडे जाऊन अंत्योदय, विकास, आणि हिंदुत्व याआधारे भाजपाने आपला विस्तार केला असे मकरंद मुळे म्हणाले. लोकसभा निवडणूकीत चारशे पार ही नुसती घोषणा नसून तो दहा वर्षातील सरकारच्या कामातून आलेला आत्मविश्वास आहे. 1984 साली केवळ दोन खासदार म्हणून हिणवला गेलेल्या पक्षाने क्रमश: आपला जनाधार देशभर वाढवला आहे. पारंपरिक मतदार टिकवून नवीन मतदार जोडला आहे. लोकशाहीत संख्याबळाला महत्व असते. संख्येच्या आधारे सरकार तयार होते. सत्ता प्राप्त होते. मिळणारी सत्ता जनहितासाठी राबवणे महत्वाचे असते. त्यामुळे राजकारणात आपद धर्म म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. भाजपा त्या दृष्टीकोनातून निर्णय घेत आहे. राजकीय तडजोडी करत आहे. बेरजेचे राजकारण करत आहे. भाजपाच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक यांनी हे राजकारण समजून घेणे आवश्यक आहे, असे मकरंद मुळे म्हणाले. भाजपाच्या स्थानिक सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देशाची सद्यस्थिती लक्षात घेऊन आपल्या पक्षाला विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे भाषणाच्या शेवटी मकरंद मुळे यांनी सांगितले. सुनेश जोशी आणि विकास घाग्रेकर यांचीही भाषणं झाली. कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
