Category: रायगड

raigad news and updates

माथेरानच्या ई रिक्षा स्टँडने घेतला मोकळा श्वास

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींची अनधिकृत टपऱ्यांवर धडक कारवाई मुकुंद रांजाणे माथेरान : मागील दोन ते तीन वर्षांपासून दस्तुरी ते टपाल पेटी नाक्यापर्यंत जागोजागी अनधिकृतपणे टपऱ्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र विद्रुपीकरण पहावयास मिळत आहे. पावसाळ्यात याच टपऱ्यांवर प्लास्टिक टाकण्यात येते त्यामुळे आपण एखाद्या ग्रामीण भागात आलो आहोत की काय असा भास पर्यटकांना झाल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस अशाप्रकारे वाढत्या टपऱ्या आगामी काळासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. इथले पर्यावरण त्याचप्रमाणे झाडी नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकतात ही बाब ओळखून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी २८ मे  रोजी सायंकाळी स्वतः दस्तुरी येथील ई रिक्षा स्टँडवरील सर्व अनधिकृत टपऱ्या काढून टाकल्या आहेत. त्यामुळे रिक्षा स्टँड भोवती जो काही टपऱ्याचा गर्हाडा निदर्शनास येत होता तो काहीअंशी का होईना दूर करण्यात आला असूच ई रिक्षा स्टँडने मोकळा श्वास घेतला आहे. बहुतेक टपरी धारक हे परिसरातील असून काही वर्षांपूर्वी इथे स्थानापन्न झालेले आहेत. दस्तुरी पासून ते टपाल पेटीच्या नाक्यापर्यंत सर्वत्र ह्या टपऱ्या वाढत चाललेल्या आहेत. ई रिक्षा स्टँड ते अमन लॉज स्टेशन पर्यंत संपूर्ण रस्ता मोकळा झाल्यास पर्यटकांना, नागरिकांना चालणे सुलभ होऊ शकते. बाजारपेठ मधील मुख्य रस्त्यावरील सुध्दा जी काही हॉटेल धारकांनी विद्रुपीकरण केलेली आहेत ती सुद्धा वेळीच काढून टाकल्यास संपूर्ण भाग सुंदर आणि स्वच्छ राखण्यासाठी नगरपरिषदेला मदत होऊ शकते असे नागरिक बोलत आहेत. शासकीय अधिकारी वर्ग नियमितपणे दस्तुरी पासून आरामात ई रिक्षांची सुविधा उपभोगून येत असतात.परंतु डोळ्यासमोर दिसत असून सुद्धा ही अनधिकृत कामे हटविण्यास दिरंगाई करत होते. केवळ पगारापूरते कामे करणारी काही अधिकारी मंडळींची जबाबदारी असताना देखील बघ्याची भूमिका बजावत होते. अखेरीस स्वतः नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी ही अनधिकृत कामे दूर केली आहेत. 00000000

माथेरानचे स्वच्छतादूत राकेश कोकळे यांचा गोव्यात सत्कार

मुकुंद रांजणे (माथेरान) माथेरानच्या निसर्गावर निस्सीम प्रेम असणारे भूमिपुत्र राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरण प्रेमी अवलिया अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून प्लास्टिक बाटल्या, रपेर्स, तसेच अन्य प्लास्टिक जन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगार यांच्या मार्फत योग्य स्थळी हलविण्यात येत आहे. त्यांच्या या निस्सीम कार्याची दखल घेऊन गोवा येथील लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष  राकेश विलास कोकळे यांचा १९ रोजी गोवा राज्यात स्वच्छतेच्या कार्याबद्दल विशेष सत्कार पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच एक्स BARC शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शरद काळे तसेच लायन्स क्लबचे  मुर्तुजा ताहेर माथेरानवाला यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राकेश कोकळे हा एक ध्येयवेडा असून त्याचा स्वच्छता बाबतीत खूपच कटाक्ष आहे. प्रत्येक पॉईंट्स वर जाऊन तेथील जंगल भागातील परिसराची पाहणी करून जेवढ्या प्रमाणात प्लास्टिक जन्य कचरा असेल तो गोळा करण्यासाठी आपल्या मित्र परिवार सोबत नेहमीच तत्पर असतो त्याच्या या निस्वार्थ कृतीचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ००००००००००

 रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील युवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विक्रांत पाटील आक्रमक!

कामगार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन! राज भंडारी पनवेल: आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीनुसार रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसंदर्भात कामगार मंत्री ना. आकाशजी फुंडकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक ऑनलाइन स्वरूपात पार पडली. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेले मंडळ असून त्याच्या कार्यक्षेत्रात पनवेल व संपूर्ण रायगड जिल्हा परिसराचा समावेश होतो. मात्र, या कार्यक्षेत्रात बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने रायगड जिल्ह्यात नोंदणीकृत तरुणांवर अन्याय होत आहे व यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची बाब आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे ३००० हुन अधिक नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षा यादी असून ५ वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप त्यांना रोजगार उपलब्ध झालेला नाही व यासाठी अधिकाऱ्यांची उदासीन मानसिकता कारणीभूत असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. रायगड जिल्ह्यात हजारो कंपन्या व इतर आस्थापना असताना बोर्डाकडे केवळ  सुमारे  २५० आस्थापनाच नोंदीत आहेत व इतर आस्थापना खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी कडून सुरक्षा रक्षक घेत आहेत हे नियमबाह्य असून सर्व कंपन्या व आस्थापना बोर्डाकडे नोंदीत होणे अपेक्षित आहे व नोंदीत नसल्यास त्यांनी किमान अधिकृत सूट प्राप्त सुरक्षा रक्षक एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेणे बंधनकारक आहे. मात्र असे होताना दिसत नाही व अधिकारी या सर्वांना पाठीशी घालत असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले. याविषयात जास्तीत जास्त आस्थापना बोर्डाकडे नोंदीत व्हाव्यात यासाठी तात्काळ मेगाड्राईव्ह घेण्यात यावा व जास्तीत जास्त प्रतीक्षा यादीतील तरुण नोकरीला लागावेत यासाठी कार्यवाही करण्यात यावी ही मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमकपणे केली. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मेगाड्राईव्ह विषयात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन एक महिन्यात जास्तीत जास्त आस्थापना नोंदीत होणे व प्रतिक्षा यादीतील तरुणांना नोकऱ्या देणे याविषयात परिणामकारक काम करावे व अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या. बैठकीतील या सकारात्मक चर्चेमुळे रायगड सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादीतील युवांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीत कामगार मा.मंत्री आकाश फुंडकर व कामगार विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

माथेरानचे स्वच्छतादूत राकेश कोकळे यांचा गोव्यात सत्कार

मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानच्या निसर्गावर निस्सीम प्रेम असणारे भूमिपुत्र राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरण प्रेमी अवलिया अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून प्लास्टिक बाटल्या, रपेर्स, तसेच अन्य प्लास्टिक जन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगार यांच्या मार्फत योग्य स्थळी हलविण्यात येत आहे. त्यांच्या या निस्सीम कार्याची दखल घेऊन गोवा येथील लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष  राकेश विलास कोकळे यांचा १९ रोजी गोवा राज्यात स्वच्छतेच्या कार्याबद्दल विशेष सत्कार पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच एक्स BARC शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शरद काळे तसेच लायन्स क्लबचे  मुर्तुजा ताहेर माथेरानवाला यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राकेश कोकळे हा एक ध्येयवेडा असून त्याचा स्वच्छता बाबतीत खूपच कटाक्ष आहे. प्रत्येक पॉईंट्स वर जाऊन तेथील जंगल भागातील परिसराची पाहणी करून जेवढ्या प्रमाणात प्लास्टिक जन्य कचरा असेल तो गोळा करण्यासाठी आपल्या मित्र परिवार सोबत नेहमीच तत्पर असतो त्याच्या या निस्वार्थ कृतीचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ०००००००००

कडाव ग्रामपंचायतीचा कथित गैरकारभार उघड

माणकिवली ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी आक्रमक रायगड- कर्जत: (अशोक गायकवाड )–कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, डंपिंग ग्राउंड उभारण्याच्या प्रस्तावावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी यांची दिशाभूल करून ग्रामपंचायतीकडून मनमानी व बेकायदेशीर कारभार केला जात असल्याचे आरोप आता उघडपणे समोर येत आहेत. कडाव ग्रामपंचायतीने २७ जून २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठराव क्र. ४/९ चा आधार घेत माणकिवली गावाच्या रस्त्यालगत असलेल्या गुरचरण जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प सर्व्हे क्रमांक १३७/१७ या जागेवर प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर विसंगती आणि दिशाभूल झाल्याचे आता उघड होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर ठरावाबाबत ग्रामपंचायतीतील अनेक सदस्यांनाच माहिती नसून, त्यावेळचे सरपंच, उपसरपंच असलेल्या सदस्यांना देखील या निर्णयाची कल्पना नाही. विशेष म्हणजे ज्या वॉर्डामध्ये डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या वॉर्डातील प्रतिनिधींनाही या ठरावाची माहिती नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हा ठराव प्रत्यक्ष ग्रामसभेत मंजूर झाला होता का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, डंपिंग ग्राउंडसाठी सांगण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकाबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतीने ज्या सर्व्हे क्रमांक १३७/१७ चा उल्लेख केला आहे, ती जागा सुमारे ६६०.८० हे.आर. चौ.मी. क्षेत्रफळाची असून ती प्रत्यक्षात माणकिवली गावाच्या रस्त्यालगत नसून कडाव गावाच्या बाहेरील गुरचरण क्षेत्रात असल्याचे सांगितले जात आहे. तर माणकिवली गावालगत असलेल्या जागेचा वास्तविक सर्व्हे क्रमांक १३७/१३ असल्याचे समोर आले आहे. ही जागा सुमारे २०० हे.आर. चौ.मी. क्षेत्रफळाची असून ती “सकस आहार” योजनेसाठी राखीव असल्याची माहिती सातबाराच्या नोंदीत नमूद आहे. तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेश क्रमांक मशा/जमीन/घ-२/९८६६५/०८ दि. १९ डिसेंबर २००८ नुसार या जमिनीपैकी ०.२००० हे.आर. क्षेत्र कडाव मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी राखीव असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, एका जागेच्या सर्व्हे नंबरवर ठराव मंजूर करून प्रत्यक्षात दुसऱ्याच जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे केवळ ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी यांचीच नव्हे तर पोलीस प्रशासनाची देखील दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे माणकिवली गावात संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांनी घेतलेल्या बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांच्या विरोधाला डावलून डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली अशोक गायकवाड रायगड-कर्जत :महाराष्ट्र शासनाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत कृतज्ञता म्हणून १४ एप्रिल या त्यांच्या जन्मदिनी  शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. यावेळी जनमानसात वैचारिक प्रबोधन व्हावे,त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक इच्छा होती आणि ती त्यांनी दि.३ एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करून आदेशही निर्गमित केले होते. तरीही कृषी संशोधन केंद्रातील काही जातीयवादी अधिकारी व कर्मचारी  बाबासाहेबांप्रती घृणा, तिरस्कार, अनास्था व कमालीचा हलगर्जीपणा बाळगून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात  यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.डी. वाघमोडे आणि कार्यालय अधीक्षक न. ल.निरडे यांनी जयंती साजरी करण्याबाबत कसलेच पाऊल उचलले नव्हते, असे लक्षात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रस्तुत प्रतिनिधीने शासकीय आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणकोणत्या कार्यालयात झाली, याचा वृत्तांत घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दिल्या. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात भेट दिली असता, सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे बाहेरगावी गेल्याचे कळले. कार्यालयाचे अधीक्षक न. ल. निरडे यांची भेट घेऊन त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल विचारणा करून  कार्यक्रमाचे फोटो देण्यास सांगितले असता त्यांनी सुरुवातीला डॉ.वाघमोडे हे बाहेरगावी गेले होते, असे सांगितले.नंतर बोलता बोलता डॉ.वाघमोडे १४ एप्रिल रोजी रात्री बाहेरगावी गेल्याचे सांगितले. “जयंती झाली, फोटो पी. आर.ओ. डॉ. मर्दाने कडून घ्या “, असेही बिनधास्त सांगितले. निरडे यांच्या बोलताना आडखडण्यावरून आणि देहबोलीवरून ते प्रस्तुत पत्रकाराची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. वास्तविक संशोधन केंद्रात पी. आर .ओ. चे पद नाही.डॉ मर्दाने हे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ आहेत. वरिष्ठ पातळीवरून जेव्हा डॉ. मर्दाने यांना जयंती साजरी केल्याचे फोटो द्या, असे सांगण्यात आले, तेव्हा डॉ. मर्दाने हतबल झाल्याचे दिसून आले. डॉ. मर्दाने हे प्रस्तुत प्रतिनिधीला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या त्यांच्या कक्षात घेऊन गेले.त्यांच्या कक्षातील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार होता व पेढा ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या फोटोमध्ये ते स्वतः व खांडस येथील शेतकरी बळीराम ऐनकर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना दिसत आहेत.पण त्या दोघांव्यतिरिक्त तेथे कृषी संशोधन केंद्राचा एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता, हे स्पष्ट झाले. तरीही आम्ही जयंती साजरी केली, असे चक्क खोटे विधान मग्रूरीत अधीक्षक निरडे करीत होते. जगातील विविध देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार ,जिल्हा परिषदे,पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिरीरीने साजरी करत होते मात्र संशोधन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगण्यात व्यस्त होते. या संशोधन केंद्रात मागील वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जाणीवपूर्वक साजरी करण्यात आली नव्हती. वास्तविक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे.पण बऱ्याच कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही.ज्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी घोषित केली आहे, त्या दिवशी कृतज्ञता म्हणून प्रबोधनात्मक  किंवा त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, असे कार्यक्रम आयोजित करून जनजागरण करणे शासनाला अपेक्षित आहे.पण काही जात्यंध अधिकारी असे कार्यक्रम घेणे टाळतात व तो दिवशी पर्यटन, खरेदी, मनोरंजन करण्यात घालवतात. परिणामतः शासन बदनाम होते. असे कृतघ्न अधिकारी, कर्मचारी देशासाठी कलंक असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली मग त्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्रात सदर जयंती का साजरी झाली नाही? येथील अधिकारी राज्यपाल, मुख्यमंत्री ,कुलगुरू यांच्यापेक्षा मोठे आहेत का? शासकीय आदेशाला फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती येथील अधिकाऱ्यांमध्ये का बळावत आहे ? कुलगुरूंचा धाक उरला नाही का ? असे प्रश्न चर्चिले जात आहेत. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी काही डॉ. आंबेडकरप्रेमी संघटनांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमाणणाऱ्या, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कार्यालयातील संबंधित बेजबाबदार व जात्यंध अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मत विविध डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरप्रेमी संघटनांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन जयंत चाचरकर यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुंषगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बऱ्याचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी

दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण!

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे भक्तीचा आणि सुरक्षेचा संगम साधला : महेंद्रशेठ घरत पनवेल : मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत. गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबाल-वृद्धांना, माय-लेकींना त्या धोकादायक असल्याचे महेंद्रशेठ घरत यांच्या लक्षात आले होते. मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. महेंद्रशेठ घरत यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुरबा गणपतीचे दर्शन घेताना गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट द्यायची, असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताईंसोबत मुरबा गणपतीचे दर्शन घेताना बोलून दाखवले होते. त्यामुळे गेल्या वर्षी २९ मे २०२५ रोजी पॅसेंजर बोट आणि लाईफ जॅकेट गणेशभक्तांसाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताईंनी आपल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दान केले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी त्या पॅसेंजर बोटीने प्रवास केला. तेव्हा भक्तांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी (ता.५) वर्षपूर्ती होण्यापूर्वीच संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट दिली. तिचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरावे गावातील मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे. त्यामुळेच भक्तांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला. आज तिचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. मी भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.” महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. ते दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच. तसेच बऱ्याच वेळा ते थेट मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. पनवेल तालुक्यातील, उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव. येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे. राज्य सरकार शिवस्मारक समुद्रात कधी बांधेल माहिती नाही, पण मोरावे गावच्या तरुणांनी भर समुद्रात गणपतीचे मंदिर बांधून मोठेच धाडस केले आहे. महेंद्रशेठ घरत हे दूरदृष्टीचे नेते आहेत. मोरावे गावातील मासेमारी करणारे तरुण स्वयंपूर्ण व्हावेत, त्यांची रोजीरोटी कायम चालली पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हावेत, यासाठी त्यांनी आगामी काळात पर्यटनाद्वारे तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी दुसरी पॅसेंजर बोट दिली. गणेशाचे निस्सीम भक्त असलेले महेंद्रशेठ घरत दर संकष्टी चतुर्थीला मुरबा गणपतीच्या दर्शनाला जातात. तेव्हा ते गणपतीचे मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात. राज्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला हे जमेल असे नाही, मात्र महेंद्रशेठ घरत यांनाच ते जमते. कारण खरा आनंद कशात आहे, याची मोजमापे त्यांनाच माहिती आहेत. महेंद्रशेठ घरत हे नुसते बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यांनी दोन पॅसेंजर बोट मुरबा गणपती मंदिराला दान करून आम्हाला उपकृत केले आहे. आम्ही त्यांचे कायमच ऋणी राहू. त्यामुळे आम्ही मुरबा गणपतीचरणी प्रार्थना करतोय, की गणराया, महेंद्रशेठ घरत यांना समाजकारण आणि सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी अखंड ऊर्जा प्राप्त होऊ दे, अशी भावना मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावेळी कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत, तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य आणि हजारो गणेशभक्त उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी

रायगड जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अलिबाग : (अशोक गायकवाड )—समाजमाध्यमावर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची प्रसारीत झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीचा विचार करून पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदी विचारात घेता पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लॉस्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे, विकणे नियमांविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक,मालक यांनी पेट्रोल, डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल, डिझेल खुले (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांडयात) विक्री पुरवठा करू नये. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व विक्री नोंदी नियमित ठेवाव्यात. अनाधिकृतपणे पेट्रोल व डिझेलचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू राहील व पुढील आदेश होईपर्यंत प्रभावी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/संस्थेविरुद्ध पेट्रालियम नियम २००२ मधील नियम ११८ ते २०२ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील तरतुदिनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. हा आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात येत आहे.

अनुकंपा : उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द

अनुकंपा : उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची माहिती अलिबाग : (अशोक गायकवाड )—जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी (विवरणपत्र-अ) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट ड संवर्गाची अनुकंपा प्रतिक्षा सुचीतील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी (विवरणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ (www.raigad.gov.in) यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत/आक्षेप असल्यास, उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज १५ एप्रिल२०२६ पर्यत या कार्यालयाकडे सादर करावेत. १५ एप्रिल२०२६ नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.