Category: महाराष्ट्र

Maharashtra News

अखेर साक्षीचा शोध लागला; १००० सीसीटीव्ही तपासून मुंब्रा- दिवा पोलिसांना यश

आरती परब दिवा : दिवा परिसरातून हरवलेल्या ८ वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे हिचा अखेर सुखरूप शोध लागल्याने कुटुंबीयांसह संपूर्ण दिवा शहराने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंब्रा- दिवा पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग दोन ते तीन दिवस अहोरात्र मेहनत घेत तब्बल १००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून ही यशस्वी शोधमोहीम पूर्ण केली. मुलगी हरवल्याची माहिती समोर येताच दिवा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तातडीने विशेष पथके तयार करून दिवा ते बदलापूर परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली. विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी कसून प्रयत्न केले. या मोहिमेत दिवा शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करून मुलीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस- रात्र तपास सुरू ठेवत प्रत्येक धागा तपासला. अखेर अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि साक्षी पांडे हिचा सुखरूप शोध लागला. मुलगी सुरक्षितपणे सापडल्यानंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. या यशस्वी शोधमोहीमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, अमोल कोळेकर, रोहित केदार, तेजस सावंत, गणेश जाधव, विनायक माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा तसेच दिवा आणि मुंब्रा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्परतेमुळे, नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण तपासामुळे एका चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यश आल्याने पोलिस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ जूनला ‘स्वर संध्या’

सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड व ज्ञानेश्वरी गाडगे यांचे सुमधुर गायन पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”,…

माहिती फलक न लावल्यास होणार कारवाई

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा बाजार समित्यांना इशारा हरिभाऊ लाखे नाशिक : कांद्यासाठी १,५८० रुपये क्विंटलचा दर निश्चित झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रांबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात नसल्याची बाब समोर येत असून, त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक नाफेडच्या खरेदी केंद्रासह बाजार समितीने कांदा खरेदी केंद्राची योग्य माहिती देणारा फलक, त्यावरच कांद्याचा दर आणि खरेदी केंद्राकडे जाणारे फलक दर्शनी भागात लावावेत, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. कांद्याच्या मागील महिन्यात गडगडलेल्या भावामुळे बळीराजाला मोठा फटका बसला. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. त्याचे सर्वाधिक पडसाद नाशिक, लासलगाव, निफाडमध्ये उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात येऊन आंदोलन केले. त्यानंतर शासनाने दखल घेत, कांद्याला १,५८० रुपयांचा दर निश्चित करीत नाफेडद्वारे त्याची खरेदीही सुरू केली. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही त्यातील बारीकसारीक बाबी शोधून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्राधान्याने नाफेडचे केंद्र तसेच बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र कुठे आहे, याची माहितीच शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर आता जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रत्येक खरेदी केंद्राकडे जाणारा मार्ग दर्शविण्याचे, स्पष्ट फलक अन् त्यावर कांद्याच्या दरांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पथके कांद्याच्या लागवडीपासून, साठवणूक व माहिती, विक्रीतील घोळ, घोटाळा अन् फसवणूक यावर नियंत्रणासाठी आता कृषी, पणन आणि महसूल विभागाचे एकत्रित पथक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर कार्यरत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली कुठलीही अडचण, समस्या या पथकांकडे मांडावी. त्यावर त्यांना योग्य तो सल्ला अन् मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. 0000000000

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका सचिव किशोर शेळके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या…

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कृपाआशीर्वादाने विनापरवाना कामे पूर्णत्वाकडे !

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानला सध्याच्या घडीला नगरपालिकेत ताळमेळ दिसत नसल्याने गावात कोणकोणती कामे सुरू केली आहेत त्याबाबत ठावठिकाणा दिसून येत नाही. तर दुसरीकडे विनापरवाना कामांना ऊत आल्याचे देखील पहावयास मिळत आहे. आणि या विनापरवाना कामांना अप्रत्यक्षपणे काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभत असल्याने या कामांवर आक्षेप घेतला तरीसुद्धा अशाप्रकारची कामे युद्धपातळीवर सुरूच आहेत.यामागे मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे. माथेरान मध्ये जानेवारी महिन्यापासून बेबी डिसोझा मार्गावर विनापरवाना जांभ्या दगडातील रस्त्याचे काम सुरू होत असल्याने नगरपालिका विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तूर्तास हे काम बंद करण्यात आले होते.सर्व साहित्य नगरपरिषदेने जप्त सुध्दा केले होते. परंतु सद्यस्थितीत आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे की अशा विनापरवाना कामांना आर्थिक लोभापायी  अप्रत्यक्षपणे पाठींबा देत आहेत असा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे. नियमबाह्य कामांना सध्याच्या काळात प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधी हातभार लावत असून एकीकडे अतिक्रमणवर कारवाईचा दिखावा तर दुसरीकडे विनापरवाना रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.काही सर्वसामान्य स्थानिक  लोकांना घराच्या दुरुस्ती साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बंदी घालण्यात येते आणि दुसरीकडे धनाढ्य लोकांना बंगल्याच्या कामासाठी लागणारे साहित्य आणण्यास मुभा दिली जात आहे.यामुळे नागरिक द्विधामनःस्थितीत सापडले आहेत.आणि विशेष म्हणजे ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी याच बेबी डिसोझा मार्गासाठी आकांडतांडव केले होते तीच मंडळी आता मूग गिळून गप्प का बसले आहेत ?की त्यांनीही आपला आर्थिक कार्यभाग अपेक्षेप्रमाणे साधला आहे की काय ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.या कामांशी निगडीत काही अधिकारी वर्गाने तर स्वतःचे आर्थिक दृष्ट्या चांगभलं करून नुकताच अन्य ठिकाणी बदल्या सुध्दा करून घेतल्या आहेत अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे. 000000

‘विषारी दारू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्या’

मृत कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे पुणे : फुगेवाडी व हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींना कठोरातील कठोर…

प्रताप सरनाईक यांनी जिंकली प्रवाशांची मने

एसटीच्या उपहारगृहात मंत्र्यांची साधी-सरळ भेट अशोक गायकवाड संगमेश्वर : एसटी बसस्थानक म्हटले की अनेकांच्या मनात अस्वच्छता, गर्दी, कळमळट वातावरण आणि उपहारगृहांबाबतच्या तक्रारींचे चित्र उभे राहते. मात्र संगमेश्वर बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडलेले दृश्य या सर्व समजुतींना छेद देणारे ठरले. कारण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चक्क प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला. कोकण दौऱ्यावर असलेल्या मंत्री सरनाईक यांनी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली. नव्याने उभारलेल्या या आधुनिक बसस्थानकात संध्याकाळीही प्रवाशांची मोठी वर्दळ होती. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपलब्ध सुविधांबाबत आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. स्वच्छ, टापटीप आणि प्रसन्न वातावरणाने नटलेल्या या बसस्थानकाची पाहणी करत असताना त्यांची पावले नकळत एसटीच्या उपहारगृहाकडे वळली. उपहारगृहात अनेक प्रवासी गरमागरम भजी, वडापाव, चहा आणि कॉफीचा आनंद घेत होते. त्या सुगंधाने आणि प्रसन्न वातावरणाने मंत्रिमहोदयांनाही मोह आवरला नाही. त्यांनी थेट प्रवाशांमध्ये जाऊन बसत गरमागरम वडापाव आणि कॉफीची चव चाखली. एका मंत्र्याने कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्य प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील पदार्थांचा आस्वाद घेणे, हा अनुभव उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. क्षणभर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राज्याचे परिवहन मंत्री आपल्या शेजारी बसून गप्पा मारत वडापाव खात आहेत, हे दृश्य पाहून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकत होता. संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ एका पाहणी दौऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर एसटीच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी जपल्या जाणाऱ्या आत्मीय नात्याचे प्रतीक ठरले. स्वच्छता, सुविधा आणि गुणवत्तेचा संदेश देणाऱ्या या भेटीने लालपरीच्या सेवेत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाची जिवंत साक्षच प्रवाशांना अनुभवायला मिळाली.

पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील विजेतेपदासाठी आज निर्णायक लढती

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये…

नगरसेविका लता ढेबे यांच्याकडून फुलांच्या रोपांची लागवड

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या पेमास्टर उद्यानात विद्यमान नगरसेविका लता ढेबे यांच्या माध्यमातून  स्वखर्चाने विविध प्रकारच्या फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.माथेरान मधील सर्वात उंच ठिकाणी हे उद्यान असून काही वर्षांपासून इथे फुलांची झाडे नाहीत. अनेकदा नगरपरिषदेच्या कार्यालयात रोपे पुरविण्याबाबतीत कळविण्यात आलेले असताना अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. अखेरीस नगरसेविका लता ढेबे यांनी गुलाब, जास्वंद, पिंपळ, बेल अशाप्रकारे विविध रोपे आणून स्वतः रोपण केले आहे. या उद्यानात पर्यटक विश्रांतीसाठी येत असतात. त्यासाठी हे उद्यान कायमस्वरूपी विविध फुलांच्या सुगंधांनी बहरलेले असावे जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करू शकेल.यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्गातील अनैतिक धंद्यांना पोलीस अधिक्षक दहीकर यांचाच आशीर्वाद…!

आमदार निलेश राणे यांचा थेट आरोप..! दोडामार्ग-गांजाचे ग्रीन कॉरिडोर…! सिंधुदुर्ग : (राजन चव्हाण )– जिल्ह्यातील अनैतिक धंदे वाढण्यास जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच जबाबदार असून अशा भ्रष्ट,निष्क्रिय अधिकाऱ्याची जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी जाहीर मागणी शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी आज येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली. अगदी अलिकडेच राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत जिल्ह्यातील मटका,जुगार, बेकायदा दारू धंदे, बनावट दारू वाहतूक, अमंली पदार्थांची वाहतूक आदी सर्व प्रकारचे अनैतिक धंदे फोफावण्यास सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक मोहन दहीकर हेच  जबाबदार असून त्यांच्याच आशीर्वादाने  हे सर्व सुरू आहे असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील पोलीस दलात आणि अनैतिक धंदेवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आमदार निलेश राणे हे आज सकाळी ११ वा.जिल्हा मुख्यालयातील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेणार असे काल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र एकच चर्चेचा विषय होता आणि तो म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेत  जिल्हा पोलीस यंत्रणेवर विशेष करून पोलीस अधिकक्षकांवर राणे  कोणता ‘बॉम्ब’ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक दहीकर यांच्या गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाच आहे  शिवाय जिल्ह्यातील अनैतिक धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले आणि पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटले असा थेट आरोप राणे यांनी केला. जिल्ह्यातील अनैतिक धंदेवाल्यांकडून दरमहा किमान सव्वा दोन ते अडीच कोटी रुपये इतका किमान ‘हप्ता’ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला जातो असा खळबळजनक आरोपही राणे यांनी यावेळी केला. हा आकडा जास्तही असू शकतो असे सांगून राणे  म्हणाले, बीट हवलदार, संबंधित पोलीस ठाणे, ‘एलसीबी’ आणि पोलीस अधिक्षक अशी ही थेट साखळी असून याच माध्यमातून हा हप्ता दरमहा गोळा केला जातो. लवकरच आपण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, गृह खाते सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या नजरेस आणणार असल्याचे सांगून असा भ्रष्ट, निष्क्रिय, बेजबाबदार अधिकारी पोलीस सेवेतही असता नये असे आपले मत असल्याचे राणे म्हणाले. राणे यांनी दहीकर यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळातील पोलीस यंत्रणेच्या गैरकारभराचे अनेक दाखले देत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अनैतिक धंदेवाले, गुन्हेगार, यांना आता पोलिसांचा धाकच उरला नाही असा आरोप केला. याच कालावधीत जिल्ह्यात सुमारे ११०० ते १२०० गुन्ह्यांची नोंद झाली मात्र त्यापैकी २० टक्केच गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी ठरले. ‘दोषसिद्धी’चा हा दर लक्षात घेतला तर ८० टक्के गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून भ्रष्ट मार्गाने तडजोडी केल्या जात असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. गोव्यातून मुंबईकडे व राज्याच्या अन्य भागात होणाऱ्या अनधिकृत दारू वाहतुकी विरुद्ध सिंधुदुर्ग पोलिसांनी किती कारवाई केली याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती देण्यात टाळाटाळ करण्यात आली मात्र गेल्या दीड वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात किती दारू पकडली आणि त्याची किंमत काय याची आकडेवारीच राणे यांनी जाहीर करून पोलिसांच्या आशीर्वादानेच ही दारू सिंधुदुर्गातून पुढे गेली असा आरोप राणे यांनी केला. गोव्यात जवळपास दररोज गांजा नेमका कुठून येतो हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता मात्र या प्रश्नाचे धक्कादायक उत्तर आज राणे यांनीच दिले त्यांच्या म्हणण्यानुसार दोडामार तालुक्यात रबर लागवडीच्या नावाखाल शेकडो हेक्टर जमिनीवर गांजाची बेकायदा शेती केली जात आहे. हे पोलिसांना दिसत नाही का..? त्यांनी काय कारवाई केली याचे उत्तर मिळाले पाहिजे अशी मागणी राणे यांनी केली  दरम्यान दहीकर हे गेले आठ दिवस प्रशिक्षणासाठी बाहेर असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.