Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 नाशिक कॉर्पोरेट शोषण, नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्ट टार्गेटचा शोध

धर्मांतराचे धक्कादायक वास्तव नाशिक : शहरातील नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचार, विनयभंग, धर्मांतर प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे समोर येत आहे. कंपनीत संशयित आपले सावज कसे शोधायचे, त्यांचे मत परिवर्तन कसे करायचे, याची आपबिती तक्रारदारांनी तपास यंत्रणेसमोर मांडली आहे. यावरून संशयित कंपनीतील ‘सॉफ्ट टारगेट’वर लक्ष देऊन त्यांना जाळ्यात ओढायचे, असा प्राथमिक निष्कर्ष पोलीस यंत्रणेकडून काढला जात आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत मागील काही वर्षांपासून कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, शारिरीक जवळीक साधण्यासाठी लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मातराचा प्रयत्न असे गंभीर प्रकार घडत असल्याचे उघड झाले. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि कंपनीतील अनेक गैरप्रकार समोर आले. या संदर्भात आतापर्यंत आठ महिला व एका पुरूषाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. महिलांबरोबर पुरूष कर्मचारीही यामध्ये लक्ष्य ठरले. बहुराष्ट्रीय कंपनीत बैठका, अन्य कार्यक्रम, कामे या धावपळीत संशयितांकडून कामावर नव्याने रुजू झालेले, साधेभोळे, कामापुरता बोलणारे अशा काहींना लक्ष्य केले जात होते. त्यांना धर्मांतर किंवा शोषणाच्या सापळ्यात अडकवताना त्यांची वैयक्तिक माहिती मिळवली जात होती. त्यांची बलस्थाने आणि ते भावनिकदृष्टया कुठे कमकुवत ठरतात, याचा अंदाज संशयितांकडून घेतला जात होता, असे समोर आले आहे. ज्या युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न झाला, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून कंपनीत गैरप्रकार कसे सुरू होते ते समोर आले. तक्रारदार युवक हा सातारा जिल्ह्यातील एका लहान गावातून आलेला होता. धार्मिक वृत्तीचा. घरापासुन दूर आणि बोलण्याची शैली कॉर्पोरेट विश्वात शोभणारी नसल्याने त्याने स्वत:ला कामांत गुंतवून घेतले होते. भाबड्या युवकाला संशयितांनी लक्ष्य केले. सर्वांशी बोलणे टाळणाऱ्या त्या युवकाला बोलते करण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत सोबत जेवण्यासाठी आग्रह धरला जात होता. युवक शाकाहारी होता. मात्र संशयित त्याला बळजबरीने सोबत जेवणासाठी बसवायचे. अनेकदा त्यांच्या जेवणात मांसाहाराचे पदार्थ असल्याने तक्रारदार त्यांच्या सोबत जेवण टाळत होता. त्यामुळे त्याचा डब्बा लपवला जायचा. आपला डब्बा शोधणाऱ्या त्या युवकाला संशयितांनी जेवणात केवळ चव बदल म्हणून मांसाहार पदार्थ खाण्यासाठी दिला. त्याने नकार दिला असता काही धार्मिक संदर्भ देऊन मांसाहार पदार्थ खाण्यासाठी भाग पाडले. हे प्रकार सातत्याने होत राहिले. जेवनानंतर मद्यपानाच्या पार्ट्यांमध्ये त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या श्रध्देला चिथावणी देणारे काही संदर्भ देत एखादा धर्म किती श्रेष्ठ हे त्याला सातत्याने समजावून देण्याचा प्रयत्न झाला. एकाक्षणी त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र हा दबाव झुगारत या युवकाने पोलिसांकडे दाद मागितली.

 शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात यापुढे वाळू उपसा नाही!

निलेश राणे यांच्या आश्वासनानंतर तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित…! मालवण :  कालावल खाडीपात्रात शेलटी  जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात वाळू उपसा होणार नाही असा शब्द शिंदे सेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी दिल्यानंतर तळाशील  येथील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. तळाशील येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आणि त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राणे यांचे सोबत यावेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हरणे,तळशील ग्राम विकास समितीचे अध्यक्ष संजय केळुसकर पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर पतन विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पट्ट्यात यापुढे वाळू उपसा करण्यास परवानगी मिळणार नाही तसेच आंदोलकांच्या अन्य मागण्यांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ही राणे यांनी यावेळी दिले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार हे तळाशील ग्रामस्थांच्या सोबतच असून ग्रामस्थांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तळाशील गावासमोरील कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपशावर कारवाई होऊन तो बंद व्हावा यासह अन्य मागण्यासाठी तळाशील ग्रामस्थांनी गेले आठ दिवस कालावल खडीपात्रात  होड्यांमध्ये बसून,तसेच पाण्यात उतरून आंदोलन छेडले होते. गावातील महिला तर चक्क चार तास पाण्यात उतरल्या होत्या. या दरम्यान दोन महिलांची  प्रकृतीही  बिघडली.तेव्हा कुठे असंवेदनशील प्रशासनाला खडबडून जाग आली.अखेर आमदार निलेश राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक  आणि आमदार निलेश राणे यांना बैठकीसाठी पाचारण केले. अखेर सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांशी  तासभर चर्चा केल्यानंतर त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. बैठकीनंतर  ठरल्याप्रमाणे आमदार राणे यांनी सायंकाळी तळाशील गावाला  भेट देत संपूर्ण परिसराची पहाणी केली. स्थानिक ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आणि वरील आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले. गेले आठवडा भर हे आंदोलन सुरु आहे मात्र निद्रिस्त महसूल प्रशासन काही हलेना. मालवणच्या नायब तहसिलदार सोडल्या तर महसूल विभागाचा एकही बडा अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नाही.तरीही आंदोलन शांतपणे सुरु होते मात्र प्रशासन दाद फिर्याद घेत नाही असे लक्षात येताच संतप्त ग्रामस्थ आणि खास करून महिला, चक्क खाडी पात्रात उतरल्या आणि आम्ही स्वतःला संपवू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर यांना काल घाईघाईने पत्र पाठवले आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांना व आंदोलनकर्त्यांना  चर्चेला बोलावले.स्थानिक आमदार या नात्याने निलेश राणे यांनाही आमंत्रित करण्यात आले. बैठकीला केळुसकर यांच्यासह अजित केणी, संजय जुवाटकर, सीताराम तोडणेकर, गोपाळ मालवणकर, स्नेहा तोंडवळकर आदी आंदोलनकर्त्यांचे  प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार राणी म्हणाले, या प्रश्नावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि आणि त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचे ठरले लवकरच या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येतील. तळाशील आणि आसपासच्या परिसरातील गावांचे अनेक प्रश्न आहेत मग ते ‘सीआरझेड ‘संबंधी असोत, अनधिकृत बांधकामे, वाळू उपसा, किनाऱ्याची धूप होणे. या सर्व प्रश्नांवर सर्व संबंधित विभागांशी  चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असेही  राणे यांनी सांगितले.

तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युटवर युवासेनेची धडक

मुंबई प्रतिनिधी पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे नुकताच घडलेल्या दुर्दैवी अपघातात २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युट च्या आवारात बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून ही घटना घडली. ह्या घटनेची त्वरित दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने माझ्या नेतृत्वाखाली युवासेनेने संबंधित इंस्टिट्युटवर धडक देऊन त्यांस धारेवर धरले.व इंस्टिट्युटच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या झालेल्या जीवितहानी संदर्भात जाब विचारला.  त्यात  इंस्टिट्युटने शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. व त्या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने बास्केटबॉल स्टॅन्डची सुव्यवस्था तपासणी (मेंटेनन्स) का करण्यात आली नव्हती. खेळाडू संदर्भात आपत्कालीन परिस्थितीतील वैद्यकीय सेवेचा अभाव होता. तसेच कॉलेज कॅम्पसच्या मैदानात नियमानुसार सी. सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. सदरच्या घटनेचे फुटेज उपलब्ध नाही . अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर कॉलेज प्रशासनास धारेवर घरले. कॉलेज प्रशासनाने देखील घडलेल्या प्रसंगावर दुःख व दिलगीर व्यत्त करत अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ देणार नाही. तसेच मृत विध्यार्थीच्या परिवारास सर्वोत्परी सहकार्य करून पोलिसांमार्फत होणाऱ्या तपासात पारदर्शकपणे सहकार्य करण्याचे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासन्याच्या चुका निदर्शनास आणल्या त्यांना कॉलेज प्रशासना कढून  कोणत्याही पद्धतीने दबाव अथवा त्रास देण्यात येणार नाही आश्वासित केले. सदरची घटना कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे  घडली असून त्यास दुघृटनेच्या दिशेने तपास न करता कालेज   प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन वरीष्ठ पोलीस आधिकारी यास युवासेनेतर्फे देण्यात आले. पोलीसांनी देखील सखोल चौकशी करून मृत विद्यार्थ्यांच्या पालकांस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी युवासेना महाराष्ट्र वितरक नीलेश बडदे, शिवसेना जिल्हा प्रमुख – गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख – राजेंद्र मोरे, तालुका प्रमुख – आशिष ठोमरे, महिला संघटिका – शैला ताई खंडागळे,युवासेना उपशहर प्रमुख – निखिल दळवी, प्रसाद जठार, तालुका प्रमुख – उमेश गावडे, रवींद्र बावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक :स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय पूर्व प्राथमिक, इंदिरानगर येथे ९ एप्रिल रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंदात पार पडला.…

बौद्धांच्या जात प्रमाणपत्राची फाईल मंत्रालयातून गायब !

बौद्धांच्या जात प्रमाणपत्राची फाईल मंत्रालयातून गायब ! राज्य जन माहिती अधिकाऱ्याची कबुली दिवकर शेजवळ मुंबई : एका उप सचिवाने फक्त बौद्धांसाठी लागू केलेले नमुना क्रमांक : ७ चे नुकसानकारक जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या…

बारामतीचे ‘बारामती’ राजकारण सुनेत्रा पवारांनी ‘अर्ज’ भरला शरद पवारांनी ‘शपथ’ घेतली

बारामतीचे ‘बारामती’ राजकारण सुनेत्रा पवारांनी ‘अर्ज’ भरला शरद पवारांनी ‘शपथ’ घेतली स्वाती घोसाळकर बारामती : राज्याच्या राजकारणात बारामतीचे दोन फोटो दिवसभर चर्चेत होते. दिल्लीच्या राज्यसभेत शरद पवारांनी खासदारकीची आज शपथ घेतली तर पवारांच्या बाले किल्ल्यात अजित पवारांच्या निधनाने…

पर्यावरणप्रेमींकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू- आयुक्त मनिषा खत्री

पर्यावरणप्रेमींकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू- आयुक्त मनिषा खत्री हरिभाऊ लाखे नाशिक : पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात वृक्षतोडीस स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने वृक्षतोडीस स्थगिती देण्यास नकार दिला. मौखिक सुनावणीतही महापालिका त्यांचे नियमित काम करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच पर्यावरणप्रेमी महापालिका पाच हजार झाडांची तोड करणार असल्याची अफवा पसरवित आहेत, असा आरोप महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी केला आहे. कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक झाडे तोडण्यात येणार असल्याचा मुद्दा तापलेला असतांना महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी रस्ते विस्तारीकरणात आड येणारी झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने पर्यावरणप्रेमींकडून यास विरोध होत आहे. काही ठिकाणी झाडांना श्रध्दांजली वाहत, चौका-चौकात सभा घेत वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यात येत आहे. सोमवारी गंगापूर रोड परिसरातील काही जुन्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू करण्यात आल्यावर याठिकाणी पर्यावरणप्रेमी दाखल झाले. त्याचवेळी वृक्षतोडीचे समर्थकही आले. वृक्षतोडीसंदर्भात महापालिका आयुक्त खत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तपोवन असो किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पाच हजार झाडे तोडण्यासंदर्भात कुठलेही आदेश महापालिकेने दिलेले नाहीत. महापालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या आड येणारी काही ठिकाणी १५, काही ठिकाणी १८ किंवा त्यापेक्षा जास्त झाडे तोडली गेल्याचे खत्री यांनी सांगितले. कामाच्या व्याप्तीनुसार रस्तानिहाय ही झाडे तोडण्याची कामे सुरू आहेत. पाच हजार झाडे तोडण्याचा कोणताही आदेश, निविदा महापालिकेने काढलेली नाही. वास्तविक वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमी नाशिककर न्यायालयात गेले होते. त्यांनी स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने स्थगिती आणता येणार नाही, असे सांगितले. महापालिका प्रशासन त्यांची नियमित कामे करीत आहे. न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती मिळणार नाही, असे मौखिक सांगितल्याचेही खत्री यांनी नमूद केले. हरित लवाद प्राधिकरणच्या वतीने स्थगिती मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींकडून महापालिका पाच हजार झाडे तोडणार, अशी अफवा पसरवली जात आहे. असे असेल तर त्यांनी तसे लेखी आदेश दाखवावेत, असे आवाहन आयुक्त खत्री यांनी केले. दरम्यान, महापालिकेच्या वतीने वृक्षतोडीसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने वृक्षतोड होत असली तरी एक लाख नवीन झाडे लावण्यात येत आहेत. यंदा पाऊस झाला की पुढच्या वर्षासाठी झाडे लावण्याचे नियोजन सुरू आहे. कुंभमेळ्यात विकासही झाला पाहिजे आणि हरित कुंभही व्हावा, असा समतोल राखण्याच्या अनुषंगाने महापालिका काम करीत असल्याचा दावा आयुक्त खत्री यांनी केला. वृक्षतोड केवळ कुंभमेळ्याच्या कामासाठी होत नाही. काही वृक्ष रस्त्यात असल्याने अडचणी येत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असल्याचे खत्री यांनी नमूद केले.

डोंगरी महोत्सवात उजळला ‘महाराष्ट्र तेजोत्सव’!

डोंगरी महोत्सवात उजळला ‘महाराष्ट्र तेजोत्सव’! दौलतनगरात प्रकाश, परंपरा आणि पर्यटनाचा जल्लोष पाटण (प्रतिनिधी) – तालुक्यातील दौलतनगर येथे रंगलेल्या डोंगरी महोत्सवात ‘महाराष्ट्र तेजोत्सव’ने अक्षरशः उजेडाची आणि उत्साहाची व संगीताची  बरसात झाली. डोंगररांगांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने स्थानिकांसह पर्यटकांनाही मंत्रमुग्ध केले. या महाराष्ट्र तेजस्वी उत्सवाचे उद्घाटन पर्यटनमंत्री मा ना शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. आय रियालिटीज आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक रोषणाईची झळाळी दिली. पर्यटनावर आधारित गाण्याचा जल्लोष उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या पर्यटनावर आधारित खास गाण्याचे लोकार्पण यावेळी माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या गाण्याचे लेखन  सुप्रसिद्ध गीतकार  सौ वर्षा राजेंद्र हुंजे मुंबई यांनी केले आहे, तर त्याचे संगीत निनाद सोलापूरकर यांनी दिले आहे. याच गाण्यावर सादर झालेल्या लाईट आणि साऊंड शोने प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. रंग, प्रकाश आणि सुरांच्या संगमाने दौलतनगरची रात्र अविस्मरणीय बनली. परंपरेचा भव्य आविष्कार या तेजोत्सवात ४० फुटांचे मावळे, वारली कलेच्या विविध छटा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेली वारकरी परंपरा हे प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राच्या मातीतली ओळख जिवंत झाली. राज्यभर तेजोत्सवाची घोषणा यावेळी बोलताना मंत्री श्री शंभुराजे  देसाई यांनी ‘महाराष्ट्र तेजोत्सव’ राज्यातील विविध भागांत आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे पर्यटनाला चालना मिळून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अधिक व्यापक प्रचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दौलतनगर बनले संस्कृतीचे केंद्रबिंदू या भव्य सोहळ्यामुळे दौलतनगर हे केवळ एक गाव न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यटन नकाशावर उजळून निघाले आहे. डोंगरी महोत्सवातील हा तेजोत्सव आगामी काळात राज्यातील सांस्कृतिक उत्सवांसाठी एक नवा मापदंड ठरणार, यात शंका नाही. कोट महाराष्ट्र तेजोत्सव सादर करताना महाराष्ट्राचे पर्यटन नजरेसमोर ठेवून त्याची आखणी करण्यात आली. याला नागरिकांसमोर मांडण्याची संधी पर्यटन विभागाने दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे हे वैभव अधिक उजळपणे मांडण्याची संधी मिळेल. – प्रसाद आजगावकर, सीईओ, आय रियालिटी

 सिंधुदुर्गातल्या ५२ मंदिरांचा होणार कायापालट…!

सिंधुदुर्गातल्या ५२ मंदिरांचा होणार कायापालट…! ४ कोटी २१ लाखांचा निधी मंजूर…! सिंधुदुर्ग: जिल्हा वार्षिक योजनेतील क वर्ग यात्रा स्थळ विकास योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील ५२ मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या कायापालट होणार आहे आणि या मंदिरांचे रूपडे बदलणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील   मंदिरांचा विकास आणि कायापालट करण्यासाठी दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंत उभारणे, पेव्हर ब्लॉक बसवणे भक्तनिवास बांधणे, पिण्याच्या पाण्याची  योजना यासारखी कामे केली जातात.त्यानुसार २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ५२ मंदिरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामांसाठी हा निधी मंजूर केला असून या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात येत आहेत तालुका निहाय  कामांचा तपशील..! कणकवली : गांगो मंदिर फोंडाघाट,  (१५ लाख ),  गांगो – लिंग मंदिर, घोणसरी, (१५ लाख ), गांगेश्वर मंदिर लोरे (१० लाख ) देवगड : आरेश्वर मंदिर, आरे (२० लाख ),  हेदुलाई मंदिर,खुडी(२५ लाख), पावणाई मंदिर, किंजवडे (१० लाख). कुडाळ : भराडी मंदिर, वाडीवरवडे,  (५ लाख ),श्री स्वामी समर्थ मठ (६ लाख), सिद्ध महादेव मंदिर, केरवडे- नारुर(७ लाख ), गिरोबा मंदिर, बिबवणे (३ लाख ), सिमरा देवी मंदिर, रानबांबुळी (१५ लाख ), श्रीकृष्ण मंदिर, सोनवडे (५ लाख ),  पावणाई मंदिर, मोरे, (५ लाख ), देव कलेश्वर मंदिर, नेरूर (१० लाख), गिरोबा मंदिर, बिबवणे(५ लाख ), सातेरी मंदिर, अंजीवडे (५ लाख ),  लक्ष्मीनारायण मंदिर, आवळेगाव(५ लाख ), स्वयंभू मंदिर,पांग्रड(५ लाख), जटाशंकर मंदिर, केरवडे- नारूर(५ लाख ),  कलेश्वर मंदिर,नेरूर,  (१५ लाख ), गिरोबा  मंदिर, भडगाव बुद्रुक(१ लाख ), रामेश्वर मंदिर, आकेरी, (५ लाख ), लिंगेश्वर मंदिर, सोनवडे (५ लाख ). मालवण : मिर्लेश्वर -भगवती मंदिर, बुधवळे, (१४ लाख),लिंगेश्वर मंदिर, गुरामनगरी (६ लाख),भगवती मंदिर, देवली, (५ लाख ), गिरोबा मंदिर, नांदरुख (५ लाख ),गांगेश्वर मंदिर आडवली (५ लाख ), रामेश्वर -पावणाई मंदिर,असगणी, (४ लाख ), लिंगेश्वर मंदिर, श्रावण(४ लाख ), गांगेश्वर मंदिर, राठीवडे, (१५ लाख ) सावंतवाडी : सातेरी -माऊली मंदिर, नेतर्डे (१५ लाख ), पावणाई -रवळनाथ मंदीर पारपोली, (१० लाख)माऊली मंदिर, कवठणी,…

३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार

नाशिकमध्ये ‘अंनिस’ची राज्यस्तरीय बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार हरिभाऊ लाखे नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संघर्ष परिषदेत भोंदूगिरी आणि फलज्योतिषाच्या दुष्परिणामांवर मंथन होणार आहे(छायाचित्र – AI Generated) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिल, सकाळी १० वाजता येथील खुटवड नगरातील सीटु भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे यांनी दिली आहे. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके, डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचे काळे कृत्य उघडकीस आणले आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे भोंदू आहेत. भोंदूगिरी कशी चालते, राज्यात कोणत्या भागात भोंदू सक्रिय आहेत, यासह वेगवेगळ्या पैलुंवर राज्यस्तरीय परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनार्थ शहरातून फेरी काढण्यात येणार आहे. वाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनानंतर परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल. परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे ,विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, अरुण घोडेराव,सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे आदी करीत आहेत. परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.