Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 एसआयआरसाठी 20 लाख मतदारांना अर्जांचे वितरण

– विशेष शिबिराचा लाभ पावणेदोन लाख मतदारांना हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत १ लाख ६१ हजार ६१२ अर्जांचे वितरण करण्यात आले. गेल्या १० दिवसांत २० लाख अर्ज घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले. जिल्ह्यातील ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४० टक्के मतदारांपर्यंत अर्ज पोहोचल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत एसआयआरचा अर्ज पोहोचविण्याचे काम बीएलओंकडून सुरू असून, शुक्रवारपासून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शनिवार व रविवार या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज वितरण व संकलन होऊन जिल्ह्यातील कामकाज ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. ३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. एसआयआरसाठी विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत १४ हजार ४९८ बीएलए उपलब्ध करून दिले आहेत. यात सर्वाधिक ४,५३४ बीएलए शिवसेना (ठाकरे गट), त्यानंतर भाजपने ३,४५१, शिवसेना (शिंदे गट) ३,४३०, काँग्रेसने १,०८९, राष्ट्रवादीने १,७१५, राष्ट्रवादी शरद पवार गटाने २७८, बसपा ९ यांचा समावेश आहे. मनसेने अद्याप एकही बीएलए उपलब्ध करून दिलेला नाही. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक वितरण करण्यात आले. पश्चिम- १८,२६१, येवला- १४,६०१, चांदवड-१४,१५४ निफाड- १३,१०४, दिंडोरी- १२,५००, सिन्नर- १०,५३१, मालेगाव बाह्य- १०,०४२, इगतपुरी- ९,२३९, नांदगाव- ८,८६८, नाशिक पूर्व- ८,८२३, बागलाण- ८,६५६, नाशिक मध्य- ६,९७७, देवळाली- ६,९४१, मालेगाव मध्य- ४,२२१, एकूण- १,६१,६१२

 नाशिकहून ३०० सायकल वारकरी पंढरपूरकडे रवाना

‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश हरिभाऊ लाखे नाशिक: येथील नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात १४ व्या नाशिक ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात झाली. अनंत कान्हेरे मैदान येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आरतीने भक्तिमय वातावरणात सायकलस्वार वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयघोष केला आणि सायकल वारीच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक संजय येणेकर, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, महापौर हिमगौरी आहेर-आडके, नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश बैजल, फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा देत वारीचा शुभारंभ केला. यंदाच्या वारीमध्ये सुमारे ३०० सायकल वारकरी सहभागी झाले असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतील सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विशेष आकर्षण म्हणजे मुंबईतील ब्लाइंड संस्थेचे ९ दृष्टिहीन सायकलपटू आणि त्यांच्यासोबत ९ रायडर्स टँडेम सायकलवरून पंढरपूरपर्यंतचा प्रवास करत आहेत. त्यांचा सहभाग जिद्द, आत्मविश्वास, समावेशकता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा आहे. याशिवाय, एका पायाने दिव्यांग असलेले तीन सायकल वारकरीही या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम करत नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनने त्यांना पंढरपूरपर्यंतच्या या पवित्र सायकल वारीत सहभागी करून घेतले आहे. त्यांचा सहभाग इच्छाशक्ती, चिकाटी आणि प्रेरणेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. यंदाच्या वारीची मुख्य संकल्पना “अवयवदान हेच श्रेष्ठ दान” ही असून, समाजामध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश ही सायकल वारी पंढरपूरपर्यंत पोहोचविणार आहे. विठ्ठलभक्ती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही वारी पुढे मार्गक्रमण करत आहे. अशी आहे सायकल वारी… पहिल्या दिवशी नाशिक- सिन्नर-नांदुर-लोणी-राहुरी-अहिल्यानगर असा प्रवास राहील. अहिल्यानगर येथे मुक्काम होणार आहे. दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर- करमाळा- टेंभुर्णी- पंढरपूर असा प्रवास करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या पुढाकारातून पंढरपूर येथे सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. १२ जुलै रोजी सकाळी सहा वाजता राज्यातील विविध भागांतून आलेले सायकलस्वार पंढरपूर शहरात एकत्र येऊन नगर प्रदक्षिणा करतील. त्यानंतर सर्व सायकलस्वारांच्या उपस्थितीत सायकल रिंगण सोहळा होईल.  रिंगण सोहळ्यानंतर सायकलिस्ट संमेलन आयोजित करण्यात येईल. या संमेलनात वर्षभर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सायकलस्वारांचा गौरव व सत्कार करण्यात येणार आहे.

-सिंधुदुर्गात एकात्मिक घनकचरा  व्यवस्थापन प्रकल्प राबविणार!

 जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी घेतला आढावा सिंधुदुर्ग : इंडियन सॅनिटेशन कोएलिशन (आय.एस.सी.)  या संस्थेच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वसमावेशक घन व द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्वच्छ, हरित व शाश्वत महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आय. एस.सी.संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये सर्वसमावेशक घन व द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण  बैठक संपन्न झाली. या बैठकीला आय. एस. सी.  संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  श्रीमती नताशा पटेल तसेच संस्थेचे प्रतिनिधी  हुसेन रंगवाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा सादर करताना घनकचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण, शास्त्रोक्त संकलन, वैज्ञानिक प्रक्रिया, पुनर्वापर, प्लास्टिकवर प्रक्रिया   तसेच ‘कचऱ्यापासून संपत्ती ‘या  संकल्पनेवर आधारित उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या  की, सिंधुदुर्ग हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन ही जिल्ह्याच्या विकासाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत उपाययोजना आणि लोकसहभाग यांचा प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, संबंधित विभाग आणि तांत्रिक यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यानंतर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेकडील विद्यमान घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था, प्रक्रिया केंद्रे, उपलब्ध यंत्रसामग्री, मनुष्यबळ, आर्थिक व तांत्रिक अडचणी तसेच भविष्यातील गरजांचा आढावा घेऊन प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक माहिती संकलित करण्यात आली. या बैठकीला  जिल्हा सहआयुक्त विनायक औंधकर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा   नगरपंचायतींचे मुख्याधिकारी,तसेच  संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक, तंत्रज्ञानाधारित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, प्रदूषणात घट, स्वच्छ पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांना चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार ‘रघुपति राघव राजाराम सत्याग्रहा’ला दोडामार्गातून सुरुवात

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्देशांनुसार ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ कार्यक्रमाला आज दोडामार्गातून सुरुवात झाली. या कार्यक्रमात सहभागी होत  दोडामार्गवासियांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मंदिरातील दान…

दिव्यात लहान मुलांसाठीच्या ‘विटामिन ए’ औषधाचा तुटवडा

 ७ दिवसांत पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांचा इशारा आरती परब दिवा : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि आशा वर्कर्स (ASHA Workers) कडे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘विटामिन ए’ (Vitamin A) या औषधाचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र तुटवडा जाणवत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन  पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र लिहून औषधांचा पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील कुपोषण, अंधत्व रोखण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठराविक अंतराने ‘विटामिन ए’ चे डोस देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यातील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांतील लहान मुले या आवश्यक डोसपासून वंचित आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या नियमांनुसार बालकांमधील अंधत्व निवारणासाठी ‘विटामिन ए’ चा डोस वेळेवर मिळणे हा त्यांचा आरोग्यविषयक हक्क आहे, तसेच माता व बाल संगोपन औषधांचा साठा अखंडित ठेवणे स्थानिक प्रशासनाचे (महानगरपालिका) कर्तव्य आहे. दिव्यातील गरीब जनता पूर्णपणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असताना औषधांचा हा तुटवडा म्हणजे बालकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा आहे, असे सचिन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेना दिवा शहरातर्फे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या: १. दिवा प्रभाग समिती अंतर्गत सर्व आरोग्य केंद्र आणि आशा वर्कर्सना ‘विटामिन ए’ चा पुरेसा साठा पुढील ७ दिवसांच्या आत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. २. गेल्या तीन- चार महिन्यांपासून हा औषध पुरवठा का खंडित झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषी विभागावर त्वरित कारवाई करण्यात यावी. या गंभीर विषयावर प्रशासनाने सात दिवसांच्या आत सकारात्मक पावले उचलून पुरवठा सुरळीत केला नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या हक्कासाठी प्रशासनाविरोधात पुढील प्रशासकीय व कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे. 000000000

जोरदार पावसाने दुथडी वाहिली गोदावरी

 रामसेतू पुलाला पाण्याचा स्पर्श हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, मंगळवारी (दि. ७) रात्री नाशिकला पावसाने चांगलेच झोडपून काढले. अवघ्या काही तासांत तब्बल…

विकासाच्या दाव्यांची पोल-खोल करण्यासाठी ‘’Reel For Roads” स्पर्धेची घोषणा

मिरा -भाईंदर शहरातील खड्डेमय रस्ते, निकृष्ट कामे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या परिस्थितीविरोधात नगरसेवक तथा गटनेते जय ठाकूर यांनी “Reel For Roads – मिरा-भाईंदर रील स्पर्धा २०२६” या अनोख्या जनआंदोलनाची घोषणा…

Heading – २० लाखाचे ऑफिस पण रस्ता नाही! सासणे ग्रामस्थ करणार ‘भीक मागो आंदोलन

– मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार तरी कारवाई शून्य राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील सासणे ग्रामपंचायतीने २० लाख रुपये खर्चून आलिशान कार्यालय उभारले. पण त्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी सुरक्षित रस्ताच नाही. या बेजबाबदार…

हिंद मजदूर सभा-कृती समितीच्या पाठपुराव्याला यश

 संजय वढावकर यांची माहिती अनिल ठाणेकर ठाणे, केंद्र सरकारच्या चार नवीन श्रमसंहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलींना हिंद मजदूर सभा आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने केलेल्या तीव्र विरोधानंतर…

 नाशिकमध्ये २४ तासांत १२० मिमी पाऊस

 कुंभमेळ्याच्या खोदकामांचा फटका हरिभाऊ लाखे नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने एकाचवेळी हाती घेतलेल्या २८ प्रमुख रस्त्यांच्या कामांसह जलवाहिन्या, गॅस वाहिन्या, पावसाळी गटारे आदींसाठी करण्यात आलेल्या चौफेर खोदकामांचा फटका बुधवारी शहराला बसला. २४ तासांत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर नाशिक जलमय झाले. अनेक प्रमुख रस्ते आणि चौक पाण्याखाली गेले, तर सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी खड्ड्यांत वाहने अडकून अपघातांची मालिका घडली. यामध्ये शालेय वाहने, महापालिकेच्या सिटीलिंक बस आणि घंटागाडीचाही समावेश होता. दुचाकीस्वारांसाठी तर या खोदकामांमधून सुरक्षितपणे मार्ग काढणे मोठे आव्हान ठरले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांकडून सडकून टीका होत आहे. मंगळवारी ढगफुटीचा धोका टळल्याचा दिलासा मिळत नाही तोच बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने शहराला झोडपले. मागील २४ तासांत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते आणि निवासी भाग जलमय झाले. नंदिनी नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले, तर अनेक दुकाने आणि इमारतींच्या वाहनतळांत पाणी शिरले. नाशिकला यापूर्वीही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी होती. रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असतानाच सर्वत्र सुरू असलेल्या खोदकामांमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते अर्धवट बुजविण्यात आले असून, काही ठिकाणी एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने धोका अधिक वाढला. कुंभमेळ्यासाठी शासनाने सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. वेळ कमी असल्याचे कारण देत महापालिकेने रस्ते, पूल, जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू केली. परिणामी शहरातील अनेक रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे बनल्याचे चित्र दिसून आले. खोदकाम झालेल्या ठिकाणी दगड आणि मुरूम टाकून तात्पुरते समतलीकरण करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे ही मलमपट्टी वाहून गेली आणि अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले. रस्त्यांवर खडी, चिखल आणि माती पसरल्याने वाहतूक धोकादायक बनली. गंगापूर रस्त्यावर शालेय वाहने आणि सिटीलिंक बस खड्ड्यात अडकल्या. मुसळधार पावसात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. उपमहापौर विलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. ज्ञानेश्वरनगर येथील आव्हाड पेट्रोल पंपासमोर रस्ता खचल्याने अवजड मालवाहू ट्रक अडकला, तर रामवाडी परिसरात महापालिकेची घंटागाडी खड्ड्यात रुतली. वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण रस्ते जलमय आणि खड्डेमय झाल्यामुळे शहरभर वाहतूक कोंडी झाली. ज्या भागांत कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. खोदकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळला. तात्पुरते बुजवलेले भाग पाण्याखाली गेल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडले, तर चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात बंद पडली. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहराच्या कानाकोपऱ्यात बसल्याने पावसाळ्यात निर्माण झालेल्या या संकटासाठी महापालिकाच जबाबदार असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.