18 April Bitambatmi All pages

Open Book

बोस्टनमध्ये शेफ विष्णू मनोहर यांचा डंका

राजेंद्र हुंजे

बोस्टन: भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आयुर्वेद आणि सात्विक आहार होय. आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि आरोग्यावर होतो. म्हणूनच, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानून त्याचा औषधाप्रमाणे वापर केल्यास आपण व्याधीमुक्त जीवन जगू शकतो,’ असे प्रतिपादन विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केले. अमेरिकेच्या बोस्टन शहरातील ‘अपर्णा जोशी यांच्या संकल्पनेवर आधारित केलेल्या टेस्ट ऑफ आयुर्वेद’ महोत्सवात ते बोलत होते. ओमग्राम आयुर्वेद आयोजित या सोहळ्यात विष्णू मनोहर यांनी पाश्चात्य जगाला भारतीय मसाल्यांमधील विज्ञान आणि सात्विक जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत खऱ्या अर्थाने ‘आहार क्रांती’चा शंखनाद केला.

विष्णू मनोहर यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक काळात वाढणारा मानसिक तणाव आणि शारीरिक व्याधींवर आयुर्वेद हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. त्यांनी तयार केलेल्या सात्विक पदार्थांच्या सुगंधाने आणि चवीने केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी नागरिकही भारावून गेले होते. विष्णू मनोहर यांच्या पाककलेचा तडका आणि आरोग्याचा मंत्र यांचा हा अनोखा संगम बोस्टनच्या भूमीवर सुवर्णयोग ठरला आहे.

बोस्टनमध्ये आयोजित या महोत्सवात केवळ माहिती न देता सहभागींना प्रत्यक्ष पंचकर्म आणि योगसाधनेचा अनुभव देण्यात आला. आधुनिक धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक शांतता कशी मिळवावी, याचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक येथे दाखवण्यात आले. आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्धीसाठी कशी उपयुक्त ठरते, हे तज्ज्ञांनी पटवून दिले. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, सहभागी नागरिकांच्या आरोग्याची पुढील ३ महिने अनुभवी वैद्यांच्या देखरेखीखाली काळजी घेतली जाणार आहे. या सातत्यपूर्ण फॉलोअप कार्यक्रमामुळे पाश्चात्य नागरिकांना आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीवर नवा विश्वास निर्माण झाला असून, खऱ्या अर्थाने आरोग्याचा जागर येथे पाहायला मिळत आहे.

अमेरिकेच्या बोस्टन शहरात आज केवळ भारतीय चवींचाच नाही, तर मराठी संस्कृतीचाही मोठा दिमाख पाहायला मिळाला. पारंपरिक नऊवारी साड्या, नथ आणि सुवर्णालंकारांनी सजलेल्या महिलांनी बोस्टनच्या रस्त्यांवर भारतीय वेशभूषेचा रुबाब सातासमुद्रापार नेला. विशेष आयोजित फॅशन शोमधून भारतीय संस्कृतीचे जे दर्शन घडले, त्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आहार क्रांती’ संकल्पनेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमाने चोख बजावले आहे. परदेशात राहूनही आपला सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मराठी बांधवांच्या उत्साहामुळे अमेरिकन भूमीवर भारतीय अस्मितेचा डंका वाजला असून, या सोहळ्याने पाश्चात्य नागरिकांनाही भारतीय परंपरेच्या प्रेमात पाडले आहे.

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन प्रभारी डीन चे अनेक घोटाळे उघड…!

राजन चव्हाण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्रभारी डीन डॉ. मनोज जोशी यांच्या कार्यकाळातील अनेक घोटाळे  समोर आले असून राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आता याप्रकारणी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.

                या तत्कालीन प्रभारी डीन च्या मनमानी व बेताल कारभाराबाबत सर्व अधिकारी कर्मचारी आणि डॉक्टरांसोबत असभ्य, अपमानास्पद व दहशतीची वर्तणूक करण्याबाबतचे चार पानी  सविस्तर निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले होते.

                  या निवेदनावर कॉलेजचे अधिकारी,कर्मचारी,डॉक्टर्स अशा तब्बल ४५ जणांच्या

 सह्या आहेत. या निवेदनात डॉ. जोशी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून शासन  स्तरावर याची दखल घेण्यात आली आहे.

        दरम्यान विद्यमान प्रभारी डीन डॉ. अनंत दवंगे यांनी कांही महिन्यांपूर्वी प्रभारी डीन म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर या निवेदनाच्या अनुषंगाने दवंगे यांनी या सर्व घोटाळ्यांची चौकशी करून  सविस्तर अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांना शासन स्तरावरून देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी सखोल चौकशी करून उपलब्ध कागदपत्रे व अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांचे जाबजबाब नोंदवून  संपूर्ण अहवालच शासनाला सादर केला आहे.त्यावरूनच आता वरील आदेश जारी करण्यात आले आहेत.

              शासनाला पाठवण्यात आलेल्या या तपशीलवार  निवेदनात जोशींच्या  कारकिर्दीत झालेल्या खरेदीत फार मोठे घोटाळे असल्याचे समोर आले आहे आणि या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

           मृतदेह घोटाळा..?

              सन २०२३  मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव यांनी प्रा. जोशी यांना मिरज येथून मेडिकल कॉलेजसाठी  5 मृतदेह आणण्यास सांगितले होते  जोशी यांनी ते आणले मात्र प्रत्यक्षात दोनच  मृतदेह कॉलेज कडे हसतांतरित केले. डीन डॉ. गुरव यांनी या प्रकरणी सत्यता जाणून घेतल्यानंतर डॉ. जोशी यांनी तीन मृतदेह त्यांच्या मित्राच्या खाजगी मेडिकल कॉलेजला परस्पर दिल्याचे उघडकीस आले. संतप्त झालेल्या डीन गुरव यांनी याची गंभीर दखल घेत जोशी यांना जाब विचारताच त्यांनी उर्वरित तिन्ही मृतदेह सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये आणून दिले.

                 विशेष म्हणजे जोशी यांचा प्रोबेशन कालावधी सुरु असताना ही घटना व अशा अनेक गंभीर घटना घडल्याचे निवेदनात म्हटले आहे.

                     जोशी हे प्रभारी डीन म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक घोटाळे केल्याचे, त्यांच्या मनमानी कारभाराचे उल्लेख निवेदनात आहेत.

              काही कोटी रुपयांचा पुस्तकं खरेदी घोटाळा हा त्यांच्याच कारकिर्दीत झाला असल्याचा आरोप असून या प्रकारणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आल्याचे समजते.

              त्यांच्याच काळात झालेला स्टेशनरी घोटाळा हा कांही लाखांच्या घरात असून यासंबंधी चौकशी केली असता ही खरेदी नियमबाह्य झाल्याचे चौकशीत आढळून आले असून हे बिल मिळावे यासाठी विद्यमान अधिष्ठाता यांचेवर राजकीय दबाव आणून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.

लोकसभेत घटना दुरुस्ती नामंजूर

५४ मतांमुळे नारीवंदनला नकार

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्वकांक्षी १३१ वी दुरुस्ती नारीवंदन विधेयककेंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, आणि सीमांकन विधेयक, लोकसभेत सादर केली होती. या घटनादुरुस्तीला ५४ मते कमी पडल्यामुळे एतिहासिक नारीवंदन विधेयक फेटाळले गेले. त्यामुळे पुढील दोन्ही विधेयक सरकारने मांडली नाहीत.

हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं मंजूर करण्यासाठी लोकसभेतील उपस्थित सदस्यांच्या दोन तृतियांश मते आवश्यक असतात. लोकसभेत या घटनादुरुस्ती  विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आलं. घटनादुरुस्तीच्या बाजूनं पहिल्या फेरीत एकूण ५२८ खासदारांनी मतदानं केलं. घटना दुरुस्तासाठी दोन तृतीयांश म्हणजे ३५२ मते आवश्यक होती पण सरकारच्या या विधेयकाच्या बाजूने २९८ मतदान झालं, तर घटनादुरुस्ती विधेयकाच्या विरोधात २३० मतं नोंदवली गेली आहेत. आता राज्यसभेत उद्या मतदान होणार आहे.

२०२९ च्या निवडणुकीत लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागांमध्ये वाढ करुन राज्यातील लोकसभेच्या जागा ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ३५ जागा मिळून ८५० जागा करण्याचा प्रस्ताव विधेयकात होता. सरकारचा महिला आरक्षणातील दुरुस्ती  विधेयकासोबत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मांडलं होतं. विरोधी पक्षांकडून नेमका याच मुद्याला आक्षेप होता.

अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटलं की 2023 मध्ये विरोधी पक्ष महिलांना आरक्षण देण्याचा शब्द दिलं होतं आता द्यायचा विषय आलेला असताना मागं हटत आहेत. महिला आरक्षण लटकवत  आहात, तुम्ही निवडणुकीत जिथं जिथं जात असाल तिथं तुम्हाला या देशातील महिलांचा आक्रोश सहन करावा लागेल, असं  अमित शाह म्हणाले.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारनं आणलेल्या विधेयकावर बोलताना केंद्र सरकारला महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत लागू करायचं असेल तर ५४३ जागांमध्येच अंमलबजावणी करावी, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी मांडली.  केंद्र सरकारचा लोकसभेची सदस्यसंख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न वरवर पाहता यात आपत्ती वाटत नाही मात्र सखोलपणे विचार केल्यास यातील राजकीय हेतू लक्षात येतो, असं प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

“मोदी जादूगार” – राहुल गांधी

राहुल गांधींनी महिला विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महिला विधेयकाला लक्ष्य करण्यासाठी लहानपणी घडलेली जादूगाराची एक गोष्ट सांगितली. “मी आणि माझी बहीण लहानपणी एका जादूगाराचा खेळ बघायला गेलो होतो. त्यानं सुरुवातीला काही खेळ दाखवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग त्यानं स्वत:ला साखळ्यांनी बांधलं आणि कुलूप लावलं. वरून काळा कपडा टाकून घेतला. नंतर आत बरीच हालचाल झाली. पण जादूगाराला बाहेर येता आलं नाही. त्याच्या सहाय्यकांना नंतर त्यानं बोलावून काळा कपडा काढायला लावला. कुलूप उघडण्यात त्याला अपयश आलं. त्यानं जादू करण्यात एक चूक केली आणि त्याची जादू फसली”, असा किस्सा राहुल गांधींनी सांगितला.

“त्यानंतर जादूगारानं इतरही खेळ करून दाखवायचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यावर टाळ्या न पडता उपस्थित सगळे हसू लागले. त्याच्या जादूचा प्रभाव संपला होता”, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कथेतील जादूगाराची उपमा देताच सत्ताधारी बाकांवरून गदारोळ झाला. “सत्य हे आहे की जादूगार पकडला गेला आहे. बालाकोट, नोटबंदी, ऑपरेशन सिंदूर या जादू फसल्या. जादूगार पकडला गेला”, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावर किरण रिजिजू यांनी तीव्र नाराजी नोंदवली. इतरही सत्ताधारी खासदारांनी गदारोळ केला.

यावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. खुद्द अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील राहुल गांधींनी अशा शब्दांचा वापर न करण्याबाबत निर्देश दिले. सत्ताधारी बाकांवरून किरेण रिजिजू, राजनाथ सिंह या मंत्र्यांनीदेखील राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली.

ईडी चौकशीच्या तिसऱ्यादिवशी

भोंदुबाबा खरातचा निकटवर्तीय

जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू

हरिभाऊ लाखे

नाशिक : नाशिकमधील भोंदू आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अशोक खरातचे (Ashok kharat) निकटवर्तीय जितेंद्र शेळकें यांची तीन दिवसापुर्वीच ईडीकडून चौकशी करण्यात आली होती आणि आज त्यांचे अपघाती मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा घात होता की अपघात असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला.

शेळकेंच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात  झाला. या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकीकडे अशोक खरात प्रकरणावरुन एसआयटीकडून सखोल तपास केला जात असून दुसरीकडे ईडीनेही खरातच्या संपत्तीवर टाच आणली आहे. त्यातच, खरातच्या शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय निर्माण होत आहे.

चौकशी लागलेली असतानाच दोन दिवसात शेळके यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? शेळके यांचा अपघात की घातपात? हा मोठा संशय आहे असा सवाल राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

जितेंद्र शेळके यांची दोन दिवसापूर्वी चौकशी होते, आज चौकशीच्या भोवऱ्यात असलेल्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू दाखवल्या गेलं? याचं खरं सत्य कधी समोर येणार, याबाबत आता मनात मोठी शंका असल्यासं मिटकरी यांनी म्हटलं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी देखील हेच प्रश्न उपस्थित केले आहेत.

ही तर भाजपची राक्षसी

महत्त्वाकांक्षा– राज ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्ष हा गेली १० वर्षे पक्ष फोडत होता, आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता यांची मजल देशात दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्यांनी हा देश कायमचा दुभंगेल आणि राज्याराज्यांत स्वायत्ततेची मागणी सुरु होईल. एव्हढच नव्हे तर याचे परिणाम आपल्या संरक्षण आणि गृह विभागात देखील दिसून येतील ही तर भाजपाची राक्षसी महत्वकांक्षा आहे अशी टिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली.

मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटण्यासाठी राज ठाकरे पालिका मुख्यालयात आले होते तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

अवघ्या काही दशकांपूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीने काय रक्तरंजित संघर्ष उभा केला होता हे विसरू नका… जो असंतोष पंजाबमध्ये निर्माण झाला होता तसा असंतोष उद्या ईशान्य भारतातील राज्यांपासून ते दक्षिणेतील राज्यांमध्ये निर्माण झाला तर? आणि अशी परिस्थिती  उद्भवली तर त्याला भारतीय जनता पक्षाची सत्तेची राक्षसी महत्वाकांक्षा जबाबदार असेल हे नक्की, अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर थेट प्रहार केलाय.

ज्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाने राजकारण करता आणि मतं मागता, त्या वल्लभभाईंना हा देश एकत्र आणताना काय संघर्ष करावा लागला होता हा इतिहास भाजपच्या लक्षात असेल असं मी गृहीत धरतो. त्या संघर्षाला तुमच्या स्वार्थासाठी मातीमोल करू नका. लोकसभेच्या जागा वाढवायच्या असतील तर त्या वाढवा जरूर पण सध्याचा राज्यांचा जो कोटा आहे त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे. गुजरात , पश्चिम बंगाल, पंजाब ,महाराष्ट्र, गोवा , आंध्रप्रदेश , तेलंगणा , तामिळनाडू , कर्नाटक , केरळा , आसाम तसेच पूर्वेकडील राज्यांच्यासाठी किमान हमी जागा द्या आणि उरलेल्या लोकसंख्येनुसार जागांचे वाटप करा. सध्या केंद्र सरकार जे करत आहे तो एक प्रकारे आगीशी खेळ खेळत आहेत. लोकसभा हा आकड्यांचा आखाडा बनवून त्यांना सत्तेत रहायचं आहे पण त्यांना हे समजत नाहीये की आज ना उद्या याने भारताच्या संघरचनेच्या पायालाच धक्का लागेल आणि त्यातून या देशात अराजकता माजायला वेळ सुद्धा लागणार नाही. असेही ते म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना भेटायला मनसे प्रमुख राज ठाकरे आज पालिका मुख्यालयात आले होते. ( छाया – पी. सुशील)

“थँक यू म्हणत

ट्रम्पने मानले

इराणचे आभार

नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यांपासून बंद असणारी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय इराणने घेताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनेही थँक्यू इराण असे म्हणत त्याला प्रसिसाद दिला आहे. या घटनेमुळे जगाने निश्वास टाकला आहे.

 “युद्धविरामाच्या उर्वरीत काळात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असेल”, अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी केली आहे. सर्व व्यावसायिक जहाजांसाठी सामुद्रधुनी खुली असेल, असे मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई / रमेश औताडे
१७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गेल्या १५ महिन्यांच्या सांप्रत शासनाच्या कारभाराला कंटाळले आहेत. गत युती शासनाच्या कालखंडात अनेक प्रलंबित मागण्यांबाबत जी आश्वासने दिली होती त्याचा विसर त्यांना पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र च्या वतीने सरकारी कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समन्वय समिती, महाराष्ट्र  चे निमंत्रक व मध्यवती संघटना, महाराष्ट्र चे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.  सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०:२०:३० वर्षानंतरच्या लाभापासून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहेत.
निवृत्तीचे वय ६० करा ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. देशातील २६ राज्यात निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात आले आहे. मग पुरोगामी महाराष्ट्र भागे का ? रिक्त पदे भरण्याचा वेग अती मंद आहे. सध्या मंजूर पदाच्या ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचान्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडतो व पदोन्नतीबाबत अनेक विभागात अवरोध निर्माण केले जात आहेत. यावेळी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
चतुर्थश्रेणी व वाहनचालकांच्या पद भरतीस १०० टक्के बंदी लादण्यात आली आहे. या अव्यवहार्य निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक आहे. कर्मचारी-शिक्षकांना एक व्यापक कॅशलेस विमा योजना लागू करणे आवश्यक आहे. केरळ राज्यात ५ लाख रुपयांचा कॅशलेस लाभ देणारी योजना अस्तित्वात आहे. कर्मचाऱ्याच्या आरोग्य संपदेसाठी अशा आरोग्य विमा योजनेची आवश्यकता आहे.

मुंबई / रमेश औताडे
सायकलपट्टू केंद्रस्थानी ठेवला तरच सायकल खेळ जागतिक पातळीवर भारताला जास्तीत जास्त मेडल मिळतील असे मत भारतीय सायकल महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी महासंघाचे महासचिव महेंद्र पाल सिंग उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, सायकल महासंघाच्या नवीन जबाबदारीच्या अनुषंगाने मी भारताला जास्तीत जास्त मेडल सायकल खेळात कशी मिळतील याचा आराखडा आखला आहे. १ एप्रिल २०२६ पासून महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. यावेळी बोलताना महेंद्र पाल सिंग म्हणाले, पाटील हे एक अत्यंत यशस्वी धोरणात्मक नेते असून, त्यांना कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार, शिक्षण, सल्लागार आणि उद्योजकता या क्षेत्रांतील उच्च नेतृत्व पदांवर तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. ते पुणे येथील ‘एलिव्हेट एज कन्सल्टिंग ग्रुप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
पुणे येथील स्टार्कन बाईक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (२०१३-२०१९); नवी दिल्ली येथील हिरो सायकल्सचे अध्यक्ष (बिझनेस हेड) (२०१२-२०१३) म्हणून काम केले आहे; तसेच भारत सरकारमध्ये युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासह विविध विभागांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी आणि प्रभारी खाजगी सचिव म्हणून वरिष्ठ पदांवर काम केले आहे. याशिवाय, टाटा, रिलायन्स, आदित्य बिर्ला ग्रुप आणि सिटीबँक यांसारख्या मोठ्या उद्योगसमूहांमध्येही त्यांनी उच्च नेतृत्व पदे भूषवली आहेत.
पाटील हे भारतातील सायकलिंगच्या विकासातील एक अग्रणी शक्ती राहिले आहेत. त्यांनी अनेक वर्षे भारतीय सायकलिंग महासंघासोबत (CFI) जवळून काम केले असून, CFI व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन (CAM) यांच्या सहकार्याने पुण्यात सलग पाच वर्षे एमटीबी राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. त्यांनी पनवेल येथे रोड सायकलिंग चॅम्पियनशिप, अनेक राज्यस्तरीय चॅम्पियनशिप आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या सायकलिंग स्पर्धांचेही आयोजन केले आहे, ज्यात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्था (PCRA) आणि इतर संस्थांच्या भागीदारीत, सायकलिंगला एक शाश्वत आणि आरोग्यदायी वाहतुकीचे साधन म्हणून प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे देशातील व्यावसायिक आणि मनोरंजक सायकलिंग संस्कृतीच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यांना भारतातील प्रीमियम सायकल सेगमेंटचे जनक मानले जाते, कारण त्यांनी स्टार्कन बाईक्सला (जायंटच्या भागीदारीत) अपवादात्मक वाढीच्या दरासह प्रीमियम बाईकिंग सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचवले.
00000000
Unti-१0
आरोग्य विभागात वादग्रस्त नियुक्तीवरून मनसे संतप्त
रमेश औताडे
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी  पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेश म्हात्रे यांना देण्याच्या निर्णयावरून शहरात तीव्र वाद निर्माण झाला असून, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मनसेच्या वतीने नवी मुंबई शहर अध्यक्ष  गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. मनसे विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना हे पत्र सादर करत प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवेदना यामध्ये एका कंत्राटदार संस्थेला ब्लॅकलिस्ट करून काही महिन्यांतच ती कारवाई मागे घेण्याचा संशयास्पद निर्णय, प्रशासनिक पारदर्शकतेचा अभाव, तसेच सत्तेचा मनमानी वापर केल्याचे आरोप समाविष्ट आहेत. या प्रकारातून संभाव्य फसवणूक, विश्वासघात आणि संगनमताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, एका महिला रुग्णाने माध्यमांवर केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. संबंधित रुग्णाने उपचारादरम्यान निष्काळजीपणा, चूक लपवण्याचा प्रयत्न, मानसिक छळ आणि अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप केला आहे.  प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून, व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उल्हासनगर  दि.१७ ( सुनिल इंगळे ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
पोलीस सूत्राने दिले माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅजेस्टेका सोसायटी, कासाबेला, डोंबिवली पुर्व येथील खाडीच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तानाजी राठोड यांना मिळाली होती. खाडीच्या पाण्यातून तो मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो मृतदेह एका बेवारस अनोळखी हिंदू जातीच्या इसमाचा आहे. साधारण तो मयत इसम ३५ ते ४० वयोगटातील असून याचा चेहरा सडलेल्या व त्यावर किडे पडलेले, उघडा, डाव्या हातावर टॅटू व लाल रंगाचा धागा, ऊजव्या हाताच्या मनगटाला काळया रंगाचा कडदोरा (धागा) तसेच R.D. Deepak असे इंग्रजी भाषेत व त्रिशुळ गोंधलेले, Dollar कंपनीची काळया रंगाची अंडरवेअर, पाठीमागील बाजूस मानेच्या मागे खुप किडे लागलेले, पाठीमागील बाजुस गुप्त भागामध्ये किडे पडलेले, संपुर्ण शरीर हे लाल व काळे पडलेले अंगाने मध्यम, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच अशा वर्णनाचा आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तानाजी राठोड यांनी दिलेल्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अद्याप त्या अनोळखी इस्माच्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस त्या मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. कोणाला त्या अनोळखी इसमा बाबत माहिती असल्यास मानपाडा पोलीस ठाणे संपर्क क्रमांक ०२५१-२९५१९७४ वर संपर्क साधावा असे आवाहन तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *