2 March Bitambatmi All pages

Open Book

कोलकाता – संजू सॅमसनच्या झंझावती हातोडा खेळीपुढे वेस्टइंडिजची टी२० वर्ल्डकपच्या सुपर ८ मध्ये अक्षरशा धुळधाण उडाली. संजू सॅमसनच्या आक्रमक ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून महत्त्वपूर्ण विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ‘करो या मरो’ अशा स्थितीत झालेल्या सुपर ८ या सामन्यात सॅमसन नावच्या या झंझावातने विंडीजच्या विजयाच्या आशेवर जणू हातोडाच मारला. आणि चार चेंडू शिल्लक ठेवत भारताला १९६ धावांचे आव्हान पार करून दिले. भारताचा सामना आता बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होईल.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने चार गडी गमावून १९५ धावांची मजल मारली. सुरुवातीला शाय होपने ३२ धावांची खेळी करत डावाला स्थैर्य दिले, तर रोस्टन चेसने ४० धावा करत मधल्या फळीत धावफलक हलता ठेवला. भारताच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत धावांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या टप्प्यात जेसन होल्डर आणि रोव्हमन पॉवेल यांनी आक्रमक फलंदाजीचा आवेश चढवला. होल्डरने नाबाद ३७, तर पॉवेलने नाबाद ३४ धावा ठोकत धावफलक १९५ पर्यंत नेला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे अचूक आणि धारदार मारा करत ३६ धावांत दोन महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या अचूक यॉर्कर्स आणि बदलत्या गतीच्या चेंडूंमुळे वेस्ट इंडिजची धावगती काही काळ रोखली गेली. अन्य गोलंदाजांनीही साथ दिली, मात्र शेवटच्या षटकांतील फटकेबाजीमुळे लक्ष्य आव्हानात्मक बनले.

१९६ धावांच्या पाठलागात भारताची सुरुवात सावध झाली. अभिषेक शर्मा आणि इशान किशन फास्ट खेळण्याच्या नादात लवकर बाद झाले. मात्र एकदा संजू सॅमसनला लय सापडताच सामन्याचे चित्र पालटले. त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी करत १२ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. कव्हर ड्राइव्ह, पुल आणि सरळ षटकार अशा विविध फटक्यांनी त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, दडपणाच्या क्षणी त्याने संयम राखत शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय रेषा पार करून दिली.

तिलक वर्माने २७ धावा करत सॅमसनला भक्कम साथ दिली. सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्या (१७) यांनीही छोटेखानी पण उपयुक्त खेळी करत धावांचा प्रवाह कायम ठेवला. शेवटच्या टप्प्यात आवश्यक धावगती वाढली असली तरी सॅमसनच्या आत्मविश्वासपूर्ण फटक्यांमुळे भारताने चार चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला.

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर (२/३८) आणि शमार जोसेफ (२/४२) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.  मात्र सॅमसनच्या निर्धारासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

मुंबई : कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा मार्ग आता पुढील ३ महिन्यात पुर्ण करणार असल्याचे चॅलेंज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारले आहे.

 माणगाव व इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. समृद्धी महामार्ग झाला पण मुंबई-गोवा महामार्ग रखडला. यामुळे होळी, गणेशोत्सव काळात कोकणवासीयांना प्रंचड यातना सहन कराव्या लागतात. याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. तर, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकल्प रखडल्याचा मुद्दा मांडत काम पूर्ण होण्याबाबत वेळापत्रक देण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

पुणे : ‘स्वभावाला औषध असते’च्या लेखिका आणि

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि बालकारणी डॉ. श्यामला वनारसे यांचे पुण्यात अल्प आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने साहित्य, सांस्कृतिक आणि मानसशास्त्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. श्यामला वनारसे यांनी साहित्य, संगीत, नृत्य, सिनेमा, बालकारण आणि मानसशास्त्र अशा विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले असून अनेक पुस्तके आणि लेख त्यांच्या नावावर आहेत.

पती दिवंगत डॉ. सुधीर वनारसे यांच्या समवेत डॉ. श्यामला वनारसे यांनी औद्योगिक मानसशास्त्र या विषयावर व्यापक काम केले. अनेक उद्योगसंस्थांबरोबर त्यांनी मानवी संसाधन विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने काम केले. कार्यक्षमता वाढ, संघटनात्मक वर्तन आणि नेतृत्व विकास या क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

डॉ. श्यामला वनारसे आणि डॉ. सुधीर वनारसे यांनी एकत्र लिहिलेल्या ‘स्वभावाला औषध असते’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ‘सत्यजित राय’ आणि ‘भारतीय मन्वंतर’ या पुस्तकांनाही राज्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

नागपूर: नागपरूमधील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश आहे. १८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींपैकी १८ जणांना ऑरेंजसिटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकजण ५० टक्क्यांच्या वर भाजले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे.


रविवारी सकाळी ७ ते ८:३० च्या सुमारास कंपनीच्या ‘१६-बी’ आणि ‘२०-बी’ नॉनल क्रिम्पलिंग युनिटमध्ये एकामागून एक शक्तिशाली स्फोट झाले. घटना घडली त्यावेळी युनिटमध्ये ३६ कामगार उपस्थित होते. स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. कारखाना परिसरात धुराचे लोट पसरले आणि सर्वत्र रक्तामांसाचा सडा पडला होता. सकाळी दुपारी १२ पर्यंत ढिगाऱ्याखालून १७ कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सावंतवाडी: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा आज थाटात शुभारंभ झाला आणि चाकरमनी अवघ्या ६ तासात मुंबईतून कोकणात इलो.

मुंबईतील भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनातून साकार झालेली ही सेवा कोकण आणि मुंबईतील दुवा अधिक मजबूत करणारी ठरणार आहे.

ही रो-पॅक्स सेवा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सुमारे ६२५ प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीतून एकाच वेळी ४० चारचाकी आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेली जाऊ शकतात. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर आता अवघ्या ६ तासांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत आणि श्रमात मोठी बचत होणार आहे. बोटीमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

स्लग- इन्स्टावर रीळ टाकल्यानंतर बदलापूरमध्ये उद्रेक ० भाजपाकडून प्रतिभा जाधवांचा राजीनामा ० मुलगी मृणालवर गुन्हा दाखल

बदलापूर : भाजपाच्या बदलापूर पूर्वमधील महिला आघाडी प्रमुख असलेल्या प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधवने मर्यादा पुरुषोत्तम रामाला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करीत तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली. मृणालच्या या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनीं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला असून तीच्या आईला प्रतिभा जाधवला भाजपाने तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला सांगितला आहे.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे रील व्हायरल झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून बदलापूरमधील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच या वक्तव्याविरोधात बदलापूर पूर्वमधील खरवई परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मुलीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला.


या घटनेनंतर भाजपाने मृणाल जाधव हिची आई आणि पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या प्रतिभा जाधव यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला आहे. तसेच त्यांना पक्षामधून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपाने प्रसिद्धी पत्रकामधून दिली आहे.  दरम्यान, प्रतिभा जाधव आणि त्यांचे पती महेश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत भावनिक प्रतिक्रिया देत खेद व्यक्त केला.

दरम्यान, भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्षांच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे, असे चित्रा वाघ यंनी म्हटले आहे.

फोटो कॅप्शन

रामाला शिवीगाळ करणारी

हीच ती मृणाल जाधव

युद्ध चिघळले ० अयातुल्ला अराफी इराणचे नवे सर्वोच्च नेते० इराण बदला घेणार ० अमेरिकेच्या २७ लष्करी तळांवर हल्ले ० इराणमध्ये ४०दिवसांचा राष्टीय दुखावटा ० इस्त्रलायलमध्ये हायअर्लट

तेहरान : अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आणि अवघं जग हादरले. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या २७ हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच इराणने अयातुल्ला अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. धर्मगुरू खामेनी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचा इराणला अधिकार असून बदला घेतला जाणारच असे नवे सर्वोच्च नेते अराफी यांनी जाहीर केले. यामुळे अमेरिका आणि इस्त्रालायमध्ये हायअर्लट जारी करण्यात आला आहे.

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राजकीय अधिकार्‍याची आणि जगभरातील शिया धर्माच्या एका प्रमुख नेत्याची हत्या, ही मुस्लिमांविरुद्ध आणि विशेषतः जगभरातील शिया मुस्लिमांविरुद्ध उघडपणे युद्धाची घोषणा मानली जाते”, असं मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.

अमेरीका आणि इस्रायलने खामेनी यांच्या कार्यालयावर सुमारे ३० क्षेपणास्त्रे डागली, ज्यामध्ये खामेनी आणि ४० कमांडर ठार झाले. या हल्ल्यात खामेनी यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झाला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह १० प्रमुख शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि ७४० हून अधिक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्र हल्ला झाला, ज्यामध्ये १४८ विद्यार्थिनी मृत्युमुखी पडल्या आणि ४५ जण जखमी झाले. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत आणि इराण प्रत्येक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

चौकट १

अमेरिकेच्या पाकमधील

दुतावासावर हल्ला ;

१४ आंदोलनकर्ते ठार

कराची : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमधील कराचीमध्ये अमेरिकेच्या दुतावासवर शिया मुसलमान आंदोलनकर्त्यीं हल्ला केला. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही आंदोलनकर्त्यांनी यूएस कॉन्सुलेटच्या परिसरात घुसून तेथे तोडफोड केली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

चौकट २

पुण्यातील ८० विद्यार्थी

दुबईमध्ये अडकले

पुणे : पुण्यातील नामांकित विद्यालयाचे ८४ जणं दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. शैक्षणिक सहलीसाठी हे सारे जण दुबईत गेले होते. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार, यांनी ही माहिती दिली.

कल्याण : कल्याणातील बी.के. बिर्ला कॉलेज आणि दिल्लीतील केंद्रीय हिंदी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या हिंदी हिंदीतर भाषिकांसाठी नवीन लेखकांच्या शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील अधिष्ठाता प्राध्यापक अवधेश शुक्ला प्रमुख पाहुणे होते.
मध्ययुगीन कवींच्या सर्जनशील प्रक्रियेवर चर्चा करताना त्यांनी नवीन लेखकांना त्या काळातील साहित्यातून निरोगी लेखनासाठी पोषक तत्वे मिळवण्याचा सल्ला दिला. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुंबई विद्यापीठातील डी.एल.एल.ई.चे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांनी तरुणांना लेखनाच्या नवीन आयामांची ओळख करून दिली. अशा राष्ट्रीय आणि राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व्यवस्थेचे कौतुक केले. महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी साहित्य हे समाजाचे मार्गदर्शक असल्याचे वर्णन केले आणि लेखकांना जागरूकतेने लिहिण्याचा सल्ला दिला.
प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी केंद्रीय हिंदी निदेशालयचे आभार मानले आणि सांगितले की महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच तयार आहे. केंद्रीय हिंदी निदेशालयचे सहाय्यक संचालक रत्नेश कुमार मिश्रा यांनी निदेशालयांच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला आणि नवीन लेखकांना चांगले वाचक होण्याचा सल्ला दिला. समीचीनचे संपादक डॉ. सतीश पांडे यांनी कथेतर गद्य लिहिण्याच्या प्रक्रियेवर सविस्तार चर्चा केली. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक राजेंद्र गौतम यांनी नवीन लेखकांना कविता कलेच्या साराची ओळख करून दिली. शिबिराचे समन्वयक प्राध्यापक श्यामसुंदर पांडे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
आठवडाभर चाललेल्या या शिबिरात आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या नऊ राज्यांमधून आणि अनेक विद्यापीठांमधून ७० नवीन लेखकांचा सहभाग होता. डॉ. दामोदर खडसे, डॉ. मधु कांकरिया, डॉ. हुबनाथ पांडे, डॉ. सत्यदेव त्रिपाठी, डॉ. नेहा कल्याणी, डॉ. सचिन गपाट आणि ज्येष्ठ पत्रकार नवीन पांडे यांसारख्या विद्वानांनी सहभागींना लेखनाच्या विविध आयामांची तसेच साहित्य निर्मिती आणि लेखकाच्या जबाबदाऱ्यांची ओळख करून दिली.

मुंबई : (अशोक गायकवाड )—राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, शेलेश नवाल यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली. ‘महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात ७ आणि १४ मार्च, १० आणि १७ एप्रिल तसेच ८ आणि १५ मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *