मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने हाणून पाडला- याप्रकरणी ९ महिलांना अटक
(राजेंद्र साळसकर)
मुंबई- मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने २२ एप्रिलला गाडी क्रमांक १२११५ या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि या गुन्ह्याप्रकरणी ९ महिला गुन्हेगारांना अटक केली. २२ एप्रिलला कुर्डुवाडी स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे (CPDS) हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना ३ महिला संशयास्पद रीतीने फिरताना दिसल्या. या महिलांना त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल विचारपूस करण्यात आली आणि स्थानक सोडून जाण्याचा इशारा देऊन त्यांना सोडून देण्यात आले. परंतु या महिला गाडी क्रमांक २२१०८ लातूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसल्या आणि त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट जारी करण्याची माहिती देण्यात आली. आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या, जिथून त्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गाडी क्रमांक १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या.
आरपीएफचे पथक आधीच मागावर होते आणि सिध्देश्वर एक्सप्रेसच्या एस्कॉर्टिंग टीमला, म्हणजेच हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते. तसेच, छायाचित्रे व प्रवासी इत्यादींच्या मदतीने संशयितांवर सतत पाळत ठेवत होते.लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होते, जिथे सर्व ९ आरोपी महिला गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. १८ ते ४० वर्षे वयोगटातील या संशयित महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
या आरोपींना जीआरपी/कुर्डूवाडीच्या ताब्यात देण्यात आले आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी) अंतर्गत गुन्हा क्र. २६/२०२६ द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यामध्ये संशयितांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेतला जात आहे. या टोळीबाबतची संबंधित माहिती पुणे विभागाला कळवण्यात आली आहे, कारण ते सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागांमध्ये कार्यरत आहेत. या प्रदेशात प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) समन्वित प्रयत्नांचे मध्य रेल्वेने कौतुक केले आहे. प्रवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना कळवण्याचा किंवा मदतीसाठी १३९ डायल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन वित्तहानी झाली आहे सुदैवाने जीवितहानी हानी झाली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. शहरात तसेच आसपासच्या गावांमध्ये मध्यरात्रीची वेळ असल्याने लोक गाढ झोपेत होते. रस्त्यावर रहदारी नसल्याने आणि सर्वत्र शुकशुकाट असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही नसल्याची माहिती प्रशानाकडून प्राप्त झाली आहे.
या वादळाचा सर्वाधिक फटका श्री पंचम खेमराज (एसपीके) महाविद्यालयाला बसला आहे.यावेळी वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की महाविद्यालयाच्या जुन्या इमारतींचे कौलारू छत पूर्णपणे कोसळले तर नवीन इमारतीवरील लोखंडी पत्रे कागदासारखे हवेत उडून दूरवर फेकले गेले काही पत्रे तर उडून आजूबाजूच्या तीन मजली इमारती ओलांडून कॉलेजच्या मागील बाजूस जाऊन पडले इतका वाऱ्याचा वेग होता. त्याशिवाय शहरातील मुख्य शॉपिंग कॉम्प्लेक्स असलेल्या ‘रामेश्वर प्लाझा’ इमारतीचे पत्रे उडून थेट एस.पी.के कॉलेजच्या परिसरात जाऊन पडले. या इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
या वादळामुळे शहराच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजवाडा परिसरातील नारळाची झाडे उन्मळून पडली आहेत तसेच राजवाड्याच्या संरक्षक कठड्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिव उद्यानातील अनेक झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. उभा बाजार परिसर आणि आरपीडी हायस्कुल परिसरात कांही घरांवरील पत्रे उडाले आहेत तसेच जाहिरातीच्या कमानीही कोसळल्या आहेत.
खबरदारीचे उपाय म्हणून तसेच तांत्रिक बिघाडामुळे शहराचा विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित करण्यात आला होता.त्यामुळे शहरात व आसपासच्या गावांमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले होते. काल सकाळपासून आपत्कालीन व्यवस्थापन महसूल यंत्रणा तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्यावरील झाडे हटवण्याचे आणि जनजीवन पूर्ण पदावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. काल संध्याकाळी तसेच मध्यरात्री सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस, कलंबिस्त व सातूळी, रोणापाल, तिरोडा, मडुरा, इन्सुली, आजगाव आदी गावात वादळी वाऱ्यासहा पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील नारूर, चाफेली व गोठोस या गावांमध्येही पाऊस झालेला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे, मातोंड, शिरोडा व म्हापण या गावांमध्ये पाऊस पडल्याचे वृत्त आहे.
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांची एकमुखी निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा वैभव नाईक यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.दरम्यान उद्धवजी ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन वैभव नाईक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने आणि एकदिलाने शिवसेना संघटनेचे काम करण्याचे आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी केले.
वैभव नाईक बोलताना म्हणाले, उद्धवजी ठाकरे यांनी जी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून, सर्वांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या जान्हवी सावंत,बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, रुपेश राऊळ, संग्राम प्रभुगावकर,हरी खोबरेकर, कृष्णा धुरी, सचिन कदम,प्रथमेश सावंत, जयेश नर,नंदू शिंदे, चंद्रकांत कासार, गणेश गावकर,उत्तम लोके,रवींद्र जोगल, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, संकेत नाईक, जयेश धुमाळे,योगेश धुरी,बाबी जागी,संजय गवस, नितीन वाळके,राजू राठोड,तपस्वी मयेकर,महेंद्र म्हाडगुत,बाळा गावडे,अवधूत मालणकर, दिनेश चमणकर,वैदेही गुडेकर,सुशील चिंदरकर,समीर लब्दे, रुपेश आमडोसकर, अमर घाडी,अमोल वस्त,स्वप्नील आचरेकर,सुहास गावडे व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
0000000000

वनविभागाचा भोंगळ कारभार
शहापूरात धक्कादायक वास्तव उजेडात
अविनाश उबाळे
ठाणे – शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील कळभोंडे लाद्याचीवाडी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा भागा आगीवले या १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी घटना घडली.या घटनेमुळे शहापूर तालुक्यात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहापूर वनक्षेत्रा लगत ज्या गाव पाड्यांवर बिबट्याचा वावर दिसतो आहे. अशा लोकांच्या तक्रारी नंतरही जंगलात वनविभागाकडून वेळीच पिंजरे लावण्यात येत नाहीत परिणामी वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या अक्षम्य निष्काळजीपणा मुळे बिबट्याच्या हल्ल्यात एका निष्पाप बालकाचा जीव गेला आहे. जर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे वेळेवर पिंजरे लावले असते तर बालकावर हल्ला करणारा हा नरभक्षक बिबट्या वनविभागाला वेळीच जेरबंद करता आला असता पण लोकांच्या तक्रारी नंतरही याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.हे पिंजरे जंगलात वेळेवर लावण्यात येत नाहीत किंवा या लोखंडी पिंजऱ्यांचा पुरवठा देखील संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना न केल्याने हे लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले शेकडो सरकारी लोखंडी पिंजरे चक्क आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक असे चित्र येथे दिसत आहे.हे पिंजरे संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना वेळेवर पुरविण्यात आलेले नाहीत अशी माहिती आता समोर येत आहे.संबधित जबाबदार सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अक्षम्य निष्काळजीपणा मुळे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लाखो रुपयांचा सरकारी निधी खर्च करुन आणलेले हे लोखंडी पिंजरे येथे अक्षरशः अस्ताव्यस्त अवस्थेत टाकून देण्यात आले आहेत.काही पिंजरे वाफे नर्सरी येथे देखील पडून आहेत.यामध्ये वनविभागाने यापूर्वी खरेदी केलेले पिंजरे देखील आहेत तर काही नव्याने खरेदी केलेले शेकडो पिंजरे येथे दिसून येत आहेत जुन्या लोखंडी पिंजऱ्यांची देखभाल न ठेवण्यात आल्याने या पिंजऱ्यांना गंज चढून त्यांची दुरावस्था झाल्याचे दिसत आहेत.जुने पिंजरे येथे असताना देखील मोठ्या प्रमाणावर नवीन पिंजऱ्यांची खरेदी करण्यात आलेली दिसत आहे.नवीन खरेदी केलेले पिंजरे काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक चित्र पाहावयास मिळत आहे.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.वनविभागाच्या प्रादेशीक विभागाच्या शहापूर उपवनसंरक्षक,कार्यालयाच्या,शहापूर,धसई,डोळखांब,वाशाळा,विहीगाव,खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात जर बिबट्याचा कुठे वावर जंगला शेजारील गाव वस्त्यांमध्ये आढळून आल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना म्हणून जंगलात सुरक्षितपणे बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी हे लोखंडी पिंजरे जंगलात बसविण्यात येतात यासाठी हे पिंजरे खरेदीसाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च करण्यात येतो परंतु हे पिंजरे फक्त शोभेसाठी खरेदी करून कंत्राटदार व व स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या पैशांची ही उधळपट्टी केली जात आहे.असा आरोप नागरिकांकडून आता केला जातो आहे.खरेदी केलेल्या पिंजऱ्यांची योग्य अशी देखभाल ठेवली जात नाही पिंजऱ्यांची योग्य देखभाल न ठेवल्याने यातील अनेक लोखंडी पिंजऱ्यांना आता गंज चढून ते भंगार जमा झाले आहेत.नवीन खरेदी केलेले पिंजरे देखील आसनगाव काष्ट विक्री आगारात पडून आहेत.शहापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशःबेफिकिर व निष्काळजीपणामुळे हे शेकडो लोखंडी पिंजरे येथे भंगारात पडून असल्याचे धक्कादायक असे वास्तव दिसत आहे.याकडे प्रादेशिक वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
प्रतिक्रिया –
आसनगाव काष्ट विक्री आगारात आणलेले नवीन पिंजरे हे संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना पाठवण्यात आले आहेत.तसेच पिंजऱ्यां संदर्भात अधिक सविस्तर माहिती प्लॅन सेक्शन मधून घेऊन तुम्हाला या संदर्भात माहिती देतो.
अभिजीत पिंगळे सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग,शहापूर
मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन
दिवा- मनसे दिवा तर्फे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी करत मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे साबे विभाग अध्यक्ष प्रकाश दत्ता पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २० एप्रिल रोजी शेतकऱ्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कलम १५ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याच्या एफआईआरमध्ये काही शेतकऱ्यांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित शेतकरी हे प्रत्यक्षात निर्दोष असून काही भूमाफियांनी त्यांच्या जमिनींवर कब्जा करण्याच्या उद्देशाने त्यांना या प्रकरणात अडकवले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित कार्यालये व तहसील कार्यालयात तक्रारी देखील दिल्याचे सांगण्यात आले आहे. मनसेने पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्पाप शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा व चुकीने दाखल झालेल्या गुन्ह्यातून त्यांची नावे वगळावीत. याप्रकरणी योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील काळात मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

मुंबई हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर चढताना फलाट क्रमांक दोनच्या बाहेर वर चढताना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.या परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने रेल्वे प्रवाशी हैराण झाले असून हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन हे हार्बर मार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशन असून या स्टेशन वरून रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. तसेच शालेय विद्यार्थी देखील याच रेल्वे स्थानकावरून शाळेमध्ये जाण्यासाठी ये जा करत असतात. परंतु सध्या या ठिकाणावरून कचऱ्यामुळे पुलावर चढणे फार त्रास दायक झाले आहे शिवाय कचऱ्यामुळे दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली असून स्थानिक रहिवासी आणि दुकानदार आजारी पडले आहेत. तरी हा कचरा त्वरित उचलावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहे.
कॉटन रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनशे दिसेना मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हा कचरा उचलण्यासाठी मी इलेक्ट्रिशनला पत्र दिले असून इथे दोन दिवसात हा सगळा कॅन्सर उचलला जाईल अशी माहिती स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर चढताना मोठ्या प्रमाणात कचरा साचल्या असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाले असून त्यानुसार आम्ही रेल्वे कर्मचाऱ्यांना हा कचरा उचलण्याबाबत आदेश दिले असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.
– रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन टी-२० क्रिकेट स्पर्धा
हर्ष घरसून ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’
मुंबई :रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टी-२० टूर्नामेंट २०२५-२६ चा अंतिम सामना एमटीएनएल आणि ऍडव्हान्स क्रिकेट क्लब या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या या लढतीत एमटीएनएल संघाने ४ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या एमटीएनएल संघाने सुरुवातीला संयमी खेळ करत नंतर आक्रमक फलंदाजीचा अवलंब केला. संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावत १६४ धावांचा स्पर्धात्मक स्कोअर उभारला. या डावात हर्ष घरसून याने उत्कृष्ट फलंदाजी करत ५१ चेंडूत ७४ धावांची शानदार खेळी केली. त्याला यश परब याची भक्कम साथ लाभली. यशने ४६ चेंडूत ५४ धावा करत दोघांनी मिळून १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या भागीदारीमुळे एमटीएनएलला मजबूत पाया मिळाला. ऍडव्हान्स क्रिकेट क्लबकडून रोहन ठाकूर याने अचूक मारा करत ४ षटकांत २७ धावा देत २ बळी घेतले.
१६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऍडव्हान्स क्रिकेट क्लबनेही दमदार सुरुवात केली. त्यांच्या फलंदाजांनी वेळोवेळी आक्रमक फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार ठेवला. मात्र, एमटीएनएलच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला. ऍडव्हान्स संघ २० षटकांत ६ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि एमटीएनएलने ४ धावांनी थरारक विजय मिळवला.
या विजयात धनंजय केणी याने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकांत ३६ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेत सामन्याचे पारडे एमटीएनएलच्या बाजूने झुकवले. अंतिम षटकांमध्ये त्याच्या गोलंदाजीने सामना निर्णायक वळणावर आणला.
या संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अंतिम सामना विशेषतः रंगतदार ठरला असून क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. एमटीएनएल संघाच्या या विजयामुळे त्यांच्या संघभावना, सातत्यपूर्ण कामगिरी आणि निर्णायक क्षणी दाखवलेल्या संयमाचे पुन्हा एकदा कौतुक झाले.
सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीबद्दल हर्ष घरसून याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. तसेच संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केल्याबद्दल त्यालाच ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बेस्ट बॅटर म्हणून हेत पटेल, तर बेस्ट बॉलर म्हणून मानस चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप चव्हाण (अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ), स्वाती घोसाळकर (उपाध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ) आणि दीपेन पारीख(अपेक्स बॉडी सदस्य, मुंबई क्रिकेट असोसिएशन) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

ठाणे: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ठाणे ते आदमापूर (गारगोटी आगार) या मार्गावर थेट एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. वंदना एस.टी. डेपो, ठाणे येथून सकाळी ८.०० वाजता या बस सेवेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. सदर बसचे पूजन नगरसेविका शितल संतोष ढमाले व विभाग प्रमुख संतोष ढमाले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी “श्री बाळूमामा की जय” च्या जयघोषात बस मार्गस्थ करण्यात आली. चालक व वाहक यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमास धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व पत्रकार दीपक कुरकुंडे, शिवस्वरूपाय बाळूमामा देवस्थानाचे पुजारी नरेश शिरगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ठाणे जिल्हा सरचिटणीस व महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट सहसचिव संजय पांडुरंग कांबळे,अजय कांबळे, शिवसेना विभाग समन्वयक राजेंद्र तानाजी कांबळे व शाखाप्रमुख किरण भगवान भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
गारगोटी आगार (कोल्हापूर विभाग) तर्फे सुरू करण्यात आलेली ही बस सेवा गारगोटी–मुरगुड–आदमापूर–बिद्री–शेळेवाडी–कोल्हापूर–कराड–सातारा–मेगा हायवे–खारघर–पनवेल–वाशी–एरोली मार्गे ठाण्यापर्यंत धावणार आहे.वेळापत्रकानुसार, गारगोटीहून सकाळी ८.०० वाजता, मुरगुडहून सकाळी ८.४० वाजता तर ठाणे (वंदना एस.टी. स्थानक) येथून सकाळी ८.०० वाजता बस सुटते. ही बस ‘लालपरी’ साध्या दरात २*२ पुशबॅक सुविधेसह उपलब्ध असून, ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास (अटी लागू) तसेच महिला प्रवासी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५०% सवलत देण्यात येत आहे.
यापूर्वी ठाणेहून आदमापूरला जाण्यासाठी प्रवाशांना कोल्हापूर येथे उतरून दुसरी बस पकडावी लागत होती. मात्र आता थेट सेवा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित व किफायतशीर झाला आहे. ठाणे व मुलुंड परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, या सेवेचा विशेष लाभ श्री बाळूमामा भक्तांना होणार आहे.
000000000000

कल्याण: नडगाव गावाचे सुपुत्र तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ बौद्धाचार्य रघुनाथ भोईर यांच्या दिशा दर्शक या कविता संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्धाचार्य उघडे गुरुजी व बौद्धाचार्य रामचंद्र पवार यांनी बौद्ध संस्कार विधीचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी विचार मंचावर जेष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, कवी जयवंत सोनवणे, बीए जाधव, दिशादर्शक कविता संग्रहाचे लेखक रघुनाथ भोईर, जेष्ठ पॅथर नेते प्रा एकनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भोईर, रिपाइंचे ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, रिपाइंचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव, नगरसेवक बंदेश जाधव, रिपाइंचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, अभिमन्यू भालेराव, प्राध्यापक डॉ संदीप भालेराव, भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष शीला तायडे, भाजप तालुका अध्यक्ष शेखर लोणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक भाषण सुर्यकांत भोईर यांनी केले तर सुत्रसंचलन तुषार वैध यांनी केले. दिशा दर्शक या कविता संग्रहात तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर,माता रमाबाई तसेच मानवी जीवन संबंधित कविता अगदी सुंदर प्रकारे आहेत. सामाजिक चळवळ कवितेतून दिसून येत आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी एकता मित्र मंडळ नडगाव, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाळा, सिध्दार्थ बुद्ध विहार समिती व उत्थान समिती या सर्वांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार विलास भोईर यांनी केले.
