महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक
महात्मा फुले हे महान समाजसुधारक होते.त्याच्याच प्रयत्नातून आपल्याला आज समाजात एकता व बंधुता दिसून येते. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.जन्मताच समाज सुधारणेची तळमळ त्यांच्यामध्ये होती.त्यामुळे आज संपूर्ण भारतात महात्मा फुले यांना समाजसुधारक म्हणून मोठ्या आदरतीत्थाने ओळखले जाते.महात्मा फुले कर्तृत्ववान महापुरुष होते.त्यामुळेच त्यांच्यात आपल्याला समाज सुधारणेचे संपूर्ण गुण पहायला मिळतात. महात्मा फुले सामाजिक प्रबोधनकार, भारतीय सामाजिक कार्यकर्ते,महान विचारवंत, समाजसुधारक, उत्कृष्ट लेखन, स्त्रियांना व समाजातील लोकांना शिक्षीत करने,जातीय व्यवस्थेचे निर्मुलन इत्यादी अनेक महान कार्याने आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या सन्मानाने महात्मा फुलेंना ओळखले जाते. त्यामुळेच आज संपूर्ण भारत त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होतो.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना फुले त्यांच्या सोबत रहात असत.त्यामुळे सामाजिक कार्यात त्यांचा सुध्दा तेवढाच महत्त्वाचा वाटा दिसून येतो.सावात्रीबाई फुले भारतातील पहील्या महीला शिक्षणाच्या जनक होत्या.आज महाराष्ट्रात शिक्षणामध्ये जी काही सुधारणा, क्रांती,आमुलाग्र बदल व विविधता दिसून येते त्यांचे संपूर्ण श्रेय महात्मा ज्योतिबा फुलेंना व सावित्रीबाई फुलेंना जाते.महात्मा जोतिबा फुले यांचे एवढे महाग कार्य आहे की महाराष्ट्रासह संपूर्ण भारत कधीच विसरणार नाही.कारण सन १८६९ साली महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम पोवाडा लिहिला.शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी फुलेंनी सन १८७० साली शिवजयंतीची सुरूवात केली. ती पहीली शिवजयंती होती. त्यानंतर शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. २० व्या शतकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली व दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटात शिवजयंतीला सुरूवात झाली. म्हणजेच महात्मा जोतिबा फुले समाजसुधारक तर होतेच परंतु शिवरायांच्या समाधीचा शोध लावुन इतिहास जागृत केला.
त्यामुळे त्यांच्यात आपल्याला दैवी शक्तीचे रूपही पहायला मिळते.अशा क्रांतिकारक महान समाजसुधारक ज्योतिबा फुलेंना कोटी कोटी प्रणाम. महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाज सुधारण्यासाठी दिशा दिली व समाजामध्ये सुधारणा झाल्याचे आपण पहातो. त्याचप्रमाणे आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज निसर्गाला वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.कारण महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सुरुवात वृक्षांच्या छायेत केली.त्यामुळेच वृक्षांचा व शिक्षणाचा मोकळा स्वाद घेऊ शकलो. महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे.कारण आज बदलते हवामान, युद्धजन्य परिस्थिती, औद्योगिकरण आणि समाजाची अत्याधुनिक युगाकडे वाटचाल यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा ह्यास होवून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्याला वाचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.त्यामुळे जयंती निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे अत्यंत गरजेचे आहे.यातच आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचे आचार-विचार अवश्य दिसून येईल व प्रत्येक झाडाच्या पानात, फळात, फुलात महात्मा फुलेंचे दर्शन अवश्य होईल.जय हिंद.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार)
मो.नं.९९२१६९०७७९,नागपूर.

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले
भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई असे होते. सातारा जिल्ह्यातील कटगुण हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आडनाव गोऱ्हे असे होते पण त्यांच्या वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता त्यामुळे ते फुले म्हणूनच ते ओळखले जाऊ लागले पुढे फुले हेच आडनाव रूढ झाले. काही दिवसांनी कटगुणहुन त्यांचे कुटुंबीय पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. खानवडी येथे त्यांचे घर असून त्यांच्या नावे सात बाराचा उतारा देखील आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. जोतीराव फुले यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. १८४२ साली त्यांनी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीच्या जोतिरावांनी पाच सहा वर्षातच तो अभ्यासक्रम पूर्ण केला. २३ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित सनातनी उच्चवर्णीय लोकांकडून सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करणे तसेच गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
‘सर्वसाक्षी जगतप्ती।
त्याला नकोच मध्यस्ती।। ‘
हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि समाज न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशीवाय लग्न लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे महत्वाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी एका कवितेत शिक्षणाचे महत्व पटवून देताना म्हटले आहे की
विद्येविना मती गेली ।
मतिविना नीती गेली।
नितीविना गती गेली ।
गतिविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. समाज शिक्षित करायचा असेल आणि बहुजन समाजात शिक्षण मुहूर्तमेढ रोवयची असेल तर महिलांना शिक्षित व्हायलाच हवे असे त्यांचे मत होणे म्हणूनच त्यांनी त्याची सुरवात स्वतःच्या घरापासून केली. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. महात्मा फुले यांनी १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. पुढे सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिकापदी आरूढ झाल्या.शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे मुलींसाठी पहिली शाळा काढणारे पहिले भारतीय म्हणजे महात्मा जोतीराव फुले. महात्मा जोतीराव फुलेंनी देशात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपला झेंडा रोवला नाही. कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रदान, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत त्या केवळ आणि केवळ फुले दाम्पत्यांमुळे. महिलांसाठी फुले दाम्पत्यांनी जे कार्य केले ते ३३ कोटी देवांनीही केले नाही. महात्मा फुले यांनी पुण्यातील वेताळ पेठेत १८५२ साली अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली. त्यांच्या या शैक्षणिक कार्याला सनातन्यांनी खूप विरोध केला. मुलींनी शिक्षणासाठी घराबाहेर पडणे म्हणजे धर्म बुडणे अशी आरोळी ठोकत सनातनी लोकांनी महात्मा फुले यांच्या या महान कार्यास विरोध केला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले पण महात्मा फुले डगमगले नाहीत. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. महात्मा जोतीराव फुले यांना वाचनाची खूप आवड होती. विवीध महापुरुषांचे जीवनचरित्र वाचणे व त्यातून प्रेरणा घेणे हा त्यांचा आवडीचा छंद. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंतांच्या राईट ऑफ थॉट्स या ग्रंथाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. बहुजन समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्य्र पाहून ते खूप अस्वस्थ होत. जातपात, अस्पृश्य- स्पृश्य भेदभाव पाहून त्यांना खूप राग येत. समाजातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करून समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा त्यांनी निश्चय केला. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे त्यांचे रोखठोक मत होते. सर्व मानव एकच आहेत म्हणून सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचे क्रांतिकारक म्हणून महात्मा फुलेंचे दर्शन होते. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. तुकारामांच्या अभांगाचा त्यांना गाढा अभ्यास होता. अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते म्हणूनच आपला गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. महात्मा फुलेंना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

निमित्त जागतिक होमिओपॅथी दिनाचे…
१० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. १० एप्रिल १७५५ रोजी जन्माला आलेल्या डॉ. सॅम्युअल हॅनिमन या शास्त्रज्ञाने या आगळ्यावेगळ्या उपचार पद्धतीचा शोध लावला. त्यामुळे हा दिवस होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो.
आज जगात विविध उपचार पद्धती कार्यरत आहेत. त्यात सर्वसामान्यांना चालणारी ऍलोपॅथी, त्याचबरोबर भारतीय शास्त्रानुसार प्राचीन काळापासून चालत असलेले आयुर्वेद शास्त्र आणि होमिओपॅथी या प्रमुख उपचार पद्धती मानल्या जातात.
होमिओपॅथी या उपचार पद्धती बद्दल बरेच गैरसमज आहेत. त्यातील अनेक गैरसमज पसरवले देखील गेलेले आहेत. तसेच गैरसमज आयुर्वेदशास्त्राबाबत देखील पसरवले गेले आहेत. त्याला जबाबदार ऍलोपॅथी उपचार पद्धतीचे पुरस्कर्ते असल्याचेच बोलले जाते. कारण ऍलोपॅथी ही उपचार पद्धती आज जगमान्य पद्धती म्हणून ओळखली जाते. या ऍलोपॅथीला लागणारी औषधे उपकरणे याचे उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर सक्रिय आहेत. त्यामुळे आपले हितसंबंध दुखावले जाऊ नयेत यासाठी देखील या कंपन्यांकडून असा अपप्रचार केला जात असतो.
होमिओपॅथीबद्दल जे अनेक गैरसमज आहेत त्यातला एक प्रमुख गैरसमज म्हणजे हे साबुदाण्याच्या गोळ्यांचे शास्त्र आहे. साबुदाण्यापेक्षाही बारीक आकाराच्या या पाच-सात गोळ्या तुमचा आजार काय बरा करणार आहेत असे होमिओपॅथीचे विरोधक वारंवार सांगत असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणूस होमिओपॅथी पासून थोडा दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र अनेकदा या साबुदाण्याच्या आकाराच्या पाच-सात गोळ्याच खूप काही करून जातात हे अनुभव घेतल्यावर लक्षात येते.
ऍलोपॅथीच्या उपचार पद्धतीत वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळी औषधे दिली जातात. साधारणपणे वयापर्यंत माणसाला वेगवेगळ्या व्याधी त्रास देत असतात. मग अशावेळी प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळी औषधे आणि वेगवेगळे उपचार असे करून अनेक रुग्ण मग दिवसभर फक्त गोळ्याच खातात, आणि सायरप पितात. बाकी इतर अन्नधान्य अभावानेच त्यांच्या पोटात जात असते. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त व्याधींसाठी एकच औषध देऊन त्या सर्व व्याधी आटोक्यात कशा आणता येतील हा प्रयत्न केला जात असतो, आणि अनेकदा तो यशस्वी झाल्याचेही दिसून येते. त्यामुळेच ज्यावेळी आपण एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टर कडे औषधोपचारासाठी जातो त्यावेळी तो तुमची संपूर्ण माहिती घेत असतो. मग त्यात तुमच्या आजच्या सवयी काय आहेत? जुन्या सवयी काय होत्या? जुने काही आजार झाले होते का?त्यावर काय उपाय केले गेले? अशी सर्व माहिती घेऊन मग त्यावर अभ्यास करून तो होमिओपॅथ तुम्हाला एकच औषध देतो, आणि त्याने तो तुमचे बरेचसे आजार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो.
एक गोष्ट मान्य करायला हवी की ऍलोपॅथीने जसा झटपट फायदा होतो तसा होमिओपॅथीने झटपट फायदा होत नाही. तिथे तुम्हाला काही वेळा दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. मात्र ऍलोपॅथीने झटपट झालेला फायदा हा क्षणिक असतो. त्या औषधाचा असर उतरला की त्रास पुन्हा सुरू होतो. होमिओपॅथी मध्ये तसे होत नाही. तिथे औषध जास्त वेळ घ्यावे लागते. मात्र जो काही फायदा होतो तो दीर्घकालीन असतो. असे असले तरी सामान्य माणूस फक्त झटपट फायदा बघतो आणि आपले नुकसान करून घेतो.
ऍलोपॅथीच्या औषधाने बरेचदा साईड इफेक्ट्स सुद्धा बरेच होतात. होमिओपॅथीने असे साईड इफेक्ट्स होत नाहीत असेही अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. खूप वर्षांपूर्वी मी एक दम्याचा रुग्ण बघितला होता. त्या रुग्णाला दम्याचा इतका जोरदार अटॅक आला होता की त्यांच्या ऍलोपॅथीच्या डॉक्टरने हात टेकले आणि रुग्णाला सरळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असा सल्ला दिला. मात्र एका होमिओपॅथने काही तात्पुरती औषधे प्रायोगिक स्तरावर दिली आणि त्या रुग्णाला आराम पडू लागला. मग त्याच होमिओपॅथीचे औषध घेऊन तो रुग्ण नंतर जवळजवळ ३८ वर्ष जगलेला मी बघितला आहे.
होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीची ही किमया नाकारता येणार नाही. साधारणपणे ऍलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये आजार थोडा जरी आटोक्याबाहेर जातो आहे असे दिसले की डॉक्टर लगेच पेशंटला हॉस्पिटलाइज करायला सांगतात. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दुनिया भराच्या तपासण्या मग ऑपरेशन असे सर्व प्रकार सुरू होतात. आणि पेशंटला बऱ्यापैकी आर्थिक भुर्दंड बसलेला असतो. होमिओपॅथी मध्ये ते होत नाही. ऍलोपॅथीच्या तुलनेत होमिओपॅथीची औषधे खूप स्वस्त आहेत. ती औषधे तुम्ही जर दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला अनेक त्रासापासून मुक्ती मिळू शकते.
जो प्रकार होमिओपॅथी बाबत आहे तोच प्रकार आयुर्वेदाबाबतही आहे. आयुर्वेदामध्ये देखील साईड इफेक्ट्स कमी असतात. तिथे औषधे होमिओपॅथीसारखी स्वस्त नसतात, मात्र त्याचा परिणाम देखील दीर्घकालीन असतो, आणि साईड इफेक्ट्स देखील नसतात. अनेक दुर्धर आजारांमध्ये ऍलोपॅथीने हात टेकल्यावर आयुर्वेदाने त्या रुग्णांना बरे केलेले दिसून आले आहे.
असे असले तरी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांमध्ये काही मर्यादा येतात. ऍलोपॅथी मध्ये तपासण्या करण्यासाठी पॅथॉलॉजी ही सोय आहे. तसेच एक्स-रे सोनोग्राफी अशी आधुनिक तंत्र देखील उपलब्ध आहेत. ही तंत्रे आयुर्वेद शास्त्रात किंवा होमिओपॅथी मध्ये सुरुवातीला नव्हती. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर्स किंवा आयुर्वेदिक वैद्यांना निदान करताना मर्यादा येत होत्या.
मात्र आता आयुर्वेद आणि होमिओपॅथी मधील अनेक डॉक्टर्स या आधुनिक निधान पद्धतीचा आधार घेऊन औषधोपचार करीत आहेत. त्याचा फायदा देखील होताना दिसतो आहे. निदान जास्त अचूक होते आणि रुग्णांना लवकरात लवकर फायदा देखील मिळतो असे दिसून आले आहे.
असे असले तरी ही तीनही शास्त्रे एकमेकांशी वैर असल्यासारखीच वागतात. विशेषतः ऍलोपॅथीचे डॉक्टर्स होमिओपॅथी आणि आयुर्वेदाला कायम विरोध करतानाच दिसून येतात. रुग्णाला शेवटी आराम पडणे महत्त्वाचे असते. पण ऍलोपॅथीचे डॉक्टर्स ते मानायला तयार नसतात. त्यामुळे अनेकदा अनेक समस्या निर्माण होतात.
मागे सुमारे २५ वर्षांपूर्वी भारतातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांनी भारतात या सर्वच उपचार पद्धतींचा एकत्रित अभ्यासक्रम तयार केला जावा आणि वैद्यकशास्त्राकडे वळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या सर्व उपचार पद्धतींचे ज्ञान पहिले दिले जावे. मगच त्याला ज्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करायचे असेल त्या क्षेत्रात करण्याची मुभा दिली जावी. सूचना खरोखरी चांगली होती. मात्र शासकीय यंत्रणेवरील बहुराष्ट्रीय औषध निर्मिती कंपन्यांच्या प्रभावामुळे असा निर्णय आजवर घेतला गेलेला नाही. नाही म्हणायला आता देशात नरेंद्र मोदी सरकारने या सर्व उपचार पद्धतींचा एकत्रित अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय गठीत केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून या सर्व पॅथींना एकत्र आणून संशोधन देखील केले जात आहे. तसे झाले तर त्याचा निश्चितच फायदा होईल. आज एका काळात भारतीय आयुर्वेद शास्त्र हे जगात श्रेष्ठ मानले जात होते. त्यावर जर संशोधन झाले आणि त्यात या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला तर भारतीय शास्त्राला जागतिक मान्यता मिळेल. या तीनही उपचार पद्धती एकत्रित करून जर एक रुग्णोपयोगी अशी उपचार पद्धती तयार केली गेली तर ती फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक वरदानच ठरेल यात शंका नाही.
मात्र परदेशातील औषध निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतातील त्यांचे समर्थक हे होऊ देणार नाहीत. कारण त्यांचे हितसंबंध तिथे गुंतलेले आहेत. इथे वेळ आहे ती सामान्यांनी जागे होण्याची. आता जनसामान्यांनीच जागे व्हायला हवे. आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा आपल्याला हक्क आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी आपण संघर्ष करायलाच हवा, इतकेच जागतिक होमिओपॅथी दिनाच्या निमित्ताने आपल्याला सहज सुचले म्हणून सुचवावेसे वाटते.
सहज सुचलं म्हणून
अविनाश पाठक
सोशियल मीडियावरील बंदीनिमित्ताने…
‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्स केवळ संवादाचे माध्यम राहिलेली नाहीत, तर किशोरांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि वर्तनावर खोलवर परिणाम करणारी प्रभावी साधने बनली आहेत. अशा परिस्थितीत, सरकार किंवा न्यायव्यवस्थेकडून या मंचांवर नियंत्रण आणण्यासाठी घेतलेले ठोस पाऊल केवळ निर्बंध म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. अलिकडे ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‘सोशल मीडिया’ वापरावर बंदी घालण्यासाठी किंवा मर्यादा आणण्यासाठी निर्बंध लागू केले. त्याच वेळी ब्रिटन सध्या एक पायलट कार्यक्रम राबवत आहे. त्यात 16 वर्षांखालील मुलांसाठी ‘सोशल मीडिया’वर बंदी कशी प्रभावी ठरू शकते, याचा अभ्यास केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात ज्युरीसमोर हजर होताना मेटा प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या कंपनीच्या दीर्घकाळ चालत आलेल्या धोरणाचा आधार घेतला. त्यात 13 वर्षांखालील वापरकर्त्यांना त्यांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र काही अंतर्गत संशोधन आणि कागदपत्रे सादर करण्यात आली, तेव्हा त्यातून लहान मुले या प्लॅटफॉर्मचा वापर करत होती, हे स्पष्ट झाले. मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही नेहमीच 13 वर्षांखालील वापरकर्त्यांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची इच्छा ठेवली आहे. कालांतराने कंपनी या ओळख प्रक्रियेत ‘योग्य स्थिती’पर्यंत पोहोचली आहे. ‘यूट्युब’ या व्हिडीओ-शेअरिंग वेबसाइटचे मालक म्हणून ‘गूगल’देखील या प्रकरणात प्रतिवादी होते, तरीही खटल्यातील बहुतेक सुनावणी इंस्टाग्राम आणि मेटावर केंद्रित राहिली. या प्रकरणात सुरुवातीला स्नॅप इंक आणि टिकटॉकचाही समावेश होता; मात्र दोन्ही कंपन्यांनी खटल्यापूर्वीच काही अटींवर समझोता केला.
मुलांवर या प्लॅटफॉर्म्समुळे होणाऱ्या कथित दुष्परिणामांबाबत मेटा आणि इतर ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सविरोधात आणखी एक खटला जून महिन्यात कॅलिफोर्नियामधील संघीय न्यायालयात सुरू होणार आहे. या निमित्ताने हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे स्पष्ट झाले आहे, की अनियंत्रित ‘सोशल मीडिया’ वापरामुळे किशोरांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नैराश्य, चिंता, आत्मसन्मानात घट आणि आत्महत्येच्या प्रवृत्तींमध्ये वाढ यासारखे गंभीर प्रश्न याच्याशी संबंधित आहेत. आभासी जगात ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ मिळवण्याच्या स्पर्धेमुळे वास्तविक जीवनातील मूल्ये मागे पडली आहेत. किशोरवयीन मुले स्वतःच्या मूल्यांचे मोजमाप डिजिटल निकषांवर करू लागले आहेत, ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. याशिवाय, सायबर छळ (सायबर बुलिंग), बनावट बातम्या (फेक न्यूज) आणि अश्लील किंवा हिंसक आशय सहज उपलब्ध असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अशा प्रकारच्या आशयाचे योग्य मूल्यांकन करण्याइतकी परिपक्वता किशोरांमध्ये नसते. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचे प्रभावी नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी येते; मात्र आतापर्यंत या कंपन्यांनी नफ्याला प्राधान्य देत ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडलेली दिसत नाही. ‘सोशल मीडिया’च्या व्यसनाशी संबंधित एका प्रकरणात मेटा, यूट्युब यांसारख्या प्लॅर्टफॉर्मवर 56 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अलिकडेच अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ज्यूरीने ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मच्या घातक परिणामांमुळे त्रस्त झालेल्या केली नावाच्या एका तरुणीच्या बाजूने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे जगभरातील पालकांना दिलासा मिळाला. केलीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला, की इंस्टाग्राममधील अखंड स्क्रोलिंग जाणीवपूर्वक व्यसनाधीन बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते. ‘मेटा’ने हे प्लॅटफॉर्म अशा प्रकारे तयार केले, की तरुण वापरकर्ते त्यांचा जास्तीत जास्त वापर करतील. या निर्णयानुसार दंडाच्या रकमेपैकी 70 टक्के रक्कम ‘मेटा’ने आणि 30 टक्के रक्कम ‘गूगलने भरायची आहे. जगभरात या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मविरोधात हजारो खटले सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यात अशा अनेक कुटुंबांचाही समावेश आहे, ज्यांच्या मुलांनी ‘सोशल मीडियाच्या व्यसनामुळे टोकाचे पाऊल उचलले आहे. ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पालक आपल्या मुलांना या व्यसनापासून वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. एवढेच नव्हे, तर अमेरिकेमध्येही विविध न्यायालयांमध्ये मुलांना ‘सोशल मीडिया’च्या दुष्परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी शेकडो खटले प्रलंबित आहेत. या निकालाचा परिणाम जगभरात सुरू असलेल्या इतर खटल्यांवरही होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे; मात्र दोषी ठरवलेल्या ‘सोशल मीडिया’ कंपन्यांचे प्रतिनिधी या निर्णयाशी असहमती दर्शवत असून त्याविरोधात अपील करण्याची तयारी दर्शवत आहेत.
यूट्यूबच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचा प्लॅटफॉर्म हा सोशल मीडिया साइट नसून फक्त व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, तर पीडित तरुणीच्या वकिलांच्या मते मेटा आणि इतर कंपन्यांनी प्लॅटफॉर्मची रचना अशी केली आहे, की किशोरांना त्याचे व्यसन लागावे. प्रत्यक्षात भारतासह जगभरातील कोट्यवधी किशोर या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळेच काही आठवडे चाललेल्या या खटल्यादरम्यान मोठ्या संख्येने पालक न्यायालयात पीडितेच्या बाजूने उभे राहिले. या निर्णयापूर्वी न्यू मेक्सिको येथेही एका ज्यूरीने ‘मेटा’ला जबाबदार धरले होते. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रौढांसाठी असलेली सामग्री मुलांपर्यंत पोहोचत होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात लैंगिक गुन्हेगारांचा धोका वाढला. भारतासह अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ‘सोशल मीडिया’मुळे मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त होत आहे; मात्र भारतात यासंदर्भात ठोस नियामक कायदा नसल्याने प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला पोहोचणारे धोके पाहता पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळेच जगातील अनेक विकसित देशांमध्ये मुलांना ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सपासून दूर ठेवण्यासाठी कायदे केले जात आहेत. ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स आणि इतर युरोपीय देशही या दिशेने पुढाकार घेत आहेत, जेणेकरून ठरावीक वयानंतरच मुलांना ‘सोशल मीडिया’ वापरण्याची परवानगी मिळेल.
(अद्वैत फीचर्स)

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न
हरिभाऊ लाखे
नाशिक :स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय पूर्व प्राथमिक, इंदिरानगर येथे ९ एप्रिल रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंदात पार पडला. वसंताच्या आगमनासोबत नवचैतन्याने भरलेला हा सोहळा विशेष ठरला.
प्रमुख अतिथी म्हणून शिल्पा सुशांत पटवा (लिटल मिलेनियम प्री-स्कूल, द्वारका) उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन, ईशस्तवन व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक रत्नाकर वेळीस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांना कॅप व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांतील बक्षिसांचे वितरणही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन पारखे मॅडम यांनी केले, तर वनिस मॅडम यांनी आभार मानले.

