आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई – सुनिल तटकरे
मुंबई : पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि अनिकेतचे वडील म्हणून बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांना समर्पित करतानाच आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केल्या.
दरम्यान अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच सुनिल तटकरे आणि पदाधिकाऱ्यांनी दादांना अभिवादन करून या विजयाचा आनंद पेढे भरवून साजरा केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एक अभूतपूर्व यश कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनिकेत तटकरेंच्या रुपाने मिळवले आहे त्यामुळे या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार सुनिल तटकरे यांनी मानले.
याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अंत:करणापासून आभार मानतानाच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडील शब्द भांडारात शब्द कमी पडले आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. या मतदारसंघात शिवसेनेची संख्या जास्त होती. गेले काही दिवस समज – गैरसमज जे काही होते. या सगळ्या पार्श्वभूमी एकनाथ शिंदे यांनी समन्वय घडवून आणण्यात महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.
दरम्यान खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, मंत्री योगेश कदम, आमदार भरत गोगावले, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार रवी पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह संबंध महायुतीतील नेत्यांचे याशिवाय सर्व मतदारांचेही आभार सुनिल तटकरे यांनी मानले.
राजकारणात वावरत असताना संयम, समन्वय, आणि परस्परांबद्दल असलेला आदर योग्य पध्दतीने राखला तर त्यातून पाठबळ मिळते. या निवडणुकीत कमालीचे यश मिळाले आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
०००००००
मुकुंद रांजाणे
माथेरान : नगरपरिषदेच्या बी. जे. हॉस्पिटल आवारातील रस्ता खराब झालेला असून रस्त्यात दगडगोटे असल्याने याठिकाणी एखाद्या रुग्णाला हातरीक्षा असो किंवा ई रिक्षातून आणताना रुग्णाचे हाल होत असतात. एखाद्या गर्भवती महिलेला या वाहनातून आणण्यासाठी तर हा रस्ता खूपच त्रासदायक बनला आहे.या छोट्याशा रस्त्यासाठी फार काही खर्च नसून जे या ठिकाणी जुने पेव्हर ब्लॉक पडून आहेत तेच या रस्त्यासाठी वापरले तरी हा रस्ता आणखीन दहा वर्षे सहज तग धरू शकेल. नुकताच या दवाखान्यात सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक किशोर मोरे हे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी हृदयविकाराचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. ई रिक्षाच्या साहाय्याने त्या रुग्णाला आणण्यात आले होते. परंतु दवाखान्याच्या आवारातील ओबडधोबड रस्त्यावर ई रिक्षा सुध्दा चालणे कठीण बनले होते. त्यावेळी डॉ. प्रशांत यादव, ई-रिक्षा चालक शैलेश भोसले, आणि बी. जे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्या रुग्णाला व्हीलचेअर मध्ये बसवून वेळेत दाखल करून डॉ. यादव यांनी ताबडतोब प्रथमोपचार केल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.
कोट
रुग्णालयाच्या रस्त्याबाबत यापूर्वी वारंवार प्रशासनाला कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा निष्काळजीपणामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो.हा रस्ता कोणत्याही वैयक्तिक वाहनांसाठी, घोडेवाले किंवा रिक्षावाल्यांसाठी बनवायचा नाही, तर तो केवळ नगरपालिकेच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सामान्य जनतेच्या रुग्णसेवेसाठी बनवणे गरजेचे आहे. रुग्णालयाचा रस्ता तयार करण्यासाठी कोणाच्याही नाहरकत (NOC) प्रमाणपत्राचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही थेट जनतेच्या आरोग्याशी जोडलेली सेवा आहे. रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे.नगरपालिकेच्या संबंधित विभागाला तात्काळ आदेश देऊन हा रस्ता २४ तासांत पूर्ण करून घ्यावा.जनतेच्या जिवाचा विचार करून या गंभीर विषयावर त्वरित लक्ष द्यावे.
किशोर मोरे—नगरसेवक माथेरान

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण/अ.बां.नि.वि.) संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने घणसोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील चंदन रानकर (विकासक) गावदेवी मंदिरासमोर, कोंबडी चाळ परिसर, नमुंमपा शौचालयाजवळ, घणसोलीगाव, नवी मुंबई. यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरच्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेकडुन तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम तोडक मोहिमेसाठी ६ ब्रेकर, ०१ गॅस कटर व १३ कामगार यांच्या सहाय्याने अंशत: निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अतिक्रमण विभागातील अधिकारी / कर्मचारी, तसेच नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे पोलिस पथक तैनात होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
०००००००
रमेश औताड
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांची सदिच्छा भेट घेऊन विभागातील विविध विकासकामे तसेच नागरिकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष युवक सचिनभाऊ लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष गोसोद्दीन शेख आणि तालुका सदस्य जिब्रान शेख यांच्या वतीने रूपाली कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या समस्या, विकासकामांची गती आणि महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी सकारात्मक चर्चा झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त रूपाली कदम यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत के-उत्तर विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी वॉर्ड क्र. ७९ युवक अध्यक्ष नितीन लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
०००००००००
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दहिसर येथील शुक्ला कंपाऊंड येथील रहिवाशांना न्याय मिळवून दिला आणि त्यांना बेघर होण्यापासून वाचवले. याबद्दल माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा दहिसर च्या आमदार मनीषा चौधरी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. विकासकाला हाताशी धरून दहिसर येथील शुक्ला कंपाऊंड मधील गाळेधारक व झोपडीधारकांना निष्कासित करून त्यांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या पाठीशी माजी खासदार गोपाळ शेट्टी हे या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रसंगी आंदोलने केली, विविध संबंधित आस्थापनांमध्ये बैठका घेतल्या, त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाई देत न्याय मागितला. जनसामान्यांसाठी लढणाऱ्या या लोकप्रतिनिधी गोपाळ शेट्टी यांना अखेर यश आले. शुक्ला कंपाउंड येथे राहणाऱ्या नागरिकांना व तेथील गाळेधारकांना हक्काचे घर व गाळेधारकांना गाळा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शुक्ला कंपाऊंड येथील नागरिकांना आता झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विकासकाच्या मार्फतच घर मिळणार असून
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी जो पाठपुरावा करून संघर्ष केला, हजारो कुटुंबांना न्याय मिळवून त्यांना बेघर होण्यापासून वाचवले, या ऐतिहासिक कामगिरी केल्या प्रित्यर्थ गोपाळ शेट्टी यांचा स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडांगण, दहिसर (प.), मुंबई येथे आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दहिसर येथील मुंबई महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांचा देखील उचित सन्मान व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत पांडे, स्थानिक नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हरिभाऊ लाखे
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज, भाविकांची हालचाल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद या सर्व बाबींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेता गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. यासाठी विविध विभागांना एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात येत असून, यासंदर्भात आंतरविभागीय समन्वय बैठक झाली.
विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शहर पोलिस, ग्रामीण पोलिस, नाशिक परिक्षेत्र पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिस, नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, आयआयएम नागपूर, ईवाय मोबिलिटी टीम, पीडब्ल्यूसी टीम तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पीडब्ल्यूसीकडून प्रस्तावित तंत्रज्ञान आराखडा आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे नव्हे तर एकात्मिक पध्दतीने काम करणे NASHIK SHANEY आवश्यक आहे. रिअल टाइम माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागांमधील समन्वय यामुळे गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि भाविकांना सुविधा पुरविणे अधिक प्रभावी होईल. त्यादृष्टीने सक्षम आणि भविष्यातील गरजा लक्षात घेणारी यंत्रणा उभारण्यावर भर आहे. बैठकीत साधुग्राम नियोजन, घाट व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, मंगल कार्यालये व इतर सुविधांचे नियोजन, पोलिस दलाची तयारी, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
ठाणे, प्रतिनिधी : सन २०२६-२७ च्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल एक हेक्टर क्षेत्रासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे Agristack Farmer ID असणे बंधनकारक असून त्यांनी विहित मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. बियाण्यांचे वितरण संबंधित पुरवठादार संस्थांच्या वितरकांमार्फत ७/१२ उताऱ्याच्या आधारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर करण्यात येणार आहे.
योजनेत अधिसूचित झाल्यानंतर तीन वर्षांनंतरच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीत असलेले वाण अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. तूर प्रमाणित बियाण्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या वाणांना प्रति क्विंटल ६,००० रुपये तर पाच ते दहा वर्षांदरम्यानच्या वाणांना प्रति क्विंटल ३,००० रुपये शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
वितरकांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावर कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत अनुदानित बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बियाण्यांचे वाणनिहाय दर, अनुदानाची रक्कम आणि अनुदान वजा केल्यानंतरची प्रत्यक्ष किंमत याची माहितीही फलकावर प्रदर्शित करावी लागणार आहे.
लाभार्थी निवडीत अनुसूचित जातींसाठी १२ टक्के, अनुसूचित जमातींसाठी ९ टक्के आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ टक्के प्राधान्य राखण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यास या अभियानांतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी २० क्विंटल बियाणे व ०.९० लाख रुपयांचा आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
अशोक गायकवाड
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू आणि आमदार प्रशांत ठाकूर व परेशशेठ ठाकूर यांचे काका, प्रसिद्ध उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे जन्माला आलेल्या कान्हाशेठ ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगधंद्यात जम बसविला. एकेकाळी मचव्यातून रेती व्यवसाय करीत असलेले कान्हाशेठ ठाकूर आज रेल्वेमधील प्रसिद्ध ठेकेदार म्हणून गणले गेले. न्हावा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या निर्भिड स्वभावाप्रमाणे त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. उद्योगधंद्यात नावारुपाला आल्यानंतर अनेक गरजूंना त्यांनी उदारहस्ते मदत केली. देवभोळे असल्यामुळे अनेक धार्मिक कार्यांना, मंदिरांनाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. उद्योगधंद्यात कार्यरत असताना आपल्या न्हावेखाडी गावाकडे त्यांचे नेहमीच लक्ष असायचे. उद्योगव्यवसायात त्यांची मुले, सागरशेठ ठाकूर, सम्राट ठाकूर, रोशन ठाकूर, जावई अल्केश बैकर त्यांचा वारसा चालवत आहेत. कान्हाशेठ यांच्या पश्चात धर्मपत्नी देवकाबाई (बाय) ठाकूर, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे आणि मोठा ठाकूर परिवार आहे. कान्हाशेठ ठाकूर यांच्या पार्थिवावर न्हावेखाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कृष्णाशेठ ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, प्रवीण पाटील, मधु पाटील, नरेंद्र ठाकूर, वासुदेव पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, उद्योगपती विजय जाधव कडू, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, सुनिल म्हसकर, चेतन उर्फ भायाशेठ म्हात्रे, संजय पाटील, हरिश्चंद्र पाटील यांच्यासह नातेवाईक आप्तेष्ट, मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Unit-६
कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी व ऑक्सिजन कमी झाल्याने मासे झाले मृत
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर तलाव म्हणजे पूर्वीचा गणेश विसर्जन तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मरून ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे मासे कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी खराब व ऑक्सिजन कमी झाल्याने मृत पडत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे. अजूनही या तलावात हजारोंनी अनेक जातींचे मासे आणि कासवे जिवंत असून त्यांना वाचविले गेले पाहिजे. त्यासाठी तातडीने उपाययोजना केडीएमसीच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने करणे आवश्यक आहे. या तलावातील हजारो मासे मरत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून केडीएमसी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे.
५ जून पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा करतांना असे तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळले होते. असे तलावातील मासे का मृतावस्थेत आढळत आहेत याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण याची तपासणी करून माहिती घ्यावी.
याच मिलापनगर गणेश विसर्जन तलावात काही वर्षापूर्वी असेच मासे मेले होते. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेलफेअर असोसिएशन यांनी केलेल्या याचिकानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाने गेल्या दहा वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे. या तलावाची नियमित साफसफाई होताना दिसत नाही. काही नागरिक यात निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ, खराब होत असते. बऱ्याच वर्षात या तलावातील गाळ काढला गेला नाही आहे.
हा तलाव जर जिवंत ठेवायचा असेल तर येथे एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, साफसफाई कर्मचारी ठेवावा, सीसी कॅमेरे बसवावेत, नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर या तलावाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केडीएमसीचे कार्यतत्पर उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) रामदास कोकरे यांनी या तलावाच्या साफसफाई आणि नागरिकांच्या मागणीवर जरूर विचार करावा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी या तलावातील पाण्याचे आणि मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या अहवाल प्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.
०००००००००
१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६
मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात केली. वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत सुंदरम सिंग आणि अनुप वाल्मिकीने प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. युनियन बँकेकडून कार्तिक एम. ने गोल केला. दुसऱ्या सामन्यात, मुंबई कस्टम्सने सीटीसी ‘ए’ संघाला २-१ अशा फरकाने हरवले. विजयी संघासाठी अनुभवी फॉरवर्ड जयेश जाधव आणि व्यंकटेश केंचेने गोल केले. पराभूत संघाकडून एकमेव गोल देवेंद्र वाल्मिकीने केला.
निकाल – एलिट पुरुष: मध्य रेल्वे २ (सुंदरम सिंग, अनुप वाल्मिकी) विजयी वि. युनियन बँक ऑफ इंडिया १ (कार्तिक एम.).मुंबई कस्टम्स २ (जयेश जाधव, व्यंकटेश केंचे) विजयी वि. सीटीसी ‘ए’ १ (देविंदर वाल्मिकी).
फोटो ओळ: अनुप वाल्मिकी (डावीकडे) आणि सुंदरम सिंगने प्रत्येकी एक गोल करत मध्य रेल्वेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
