विरोधकांनी संधी गमावली
सध्या देशात आणि राज्यात नेहमीपेक्षा वेगळ्या विषयांवरुन वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. देशात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात गॅस सिलेंडरची प्रतीक्षा यादी रोज वाढत आहे. दुसरा सिलेंडर पंचवीस दिवसांनी नोंदवता येईल अशा सुचना असल्या तरी ग्रामीण भागात ही अट 45 दिवसांची आहे. रिकामे सिलेंडर घेऊन लांबलचक रांगेत उभे असलेल्या स्त्री पुरूषांचे फोटो वृत्तपत्रांमधून रोज प्रसिध्द होत आहे. गॅस पुरवठ्याची हमी केंद्र सरकार देत आहे, मग सर्वत्र सिलेंडरसाठी रांगा का लागत आहेत? 40- 42 डिग्री उन्हाचे चटके नि झळा सहन करत लोक रांगेत उभे आहेत, हे सरकारला दिसत नाही का? सिलेंडरचे ऑनलाइन बुकींग करण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीचा नंबर मिळणे जिकीरीचे झाले आहे. नवा सिलेंडर मिळेल याची कोणी शाश्वती देत नाही. घरात चुलीवर स्वयंपाक करा, असे म्हणणे सोपे आहे, प्रत्यक्षात घरोघरी ते शक्य आहे का? उज्ज्वला योजनेतून सरकारने लक्ष लक्ष सिलेंडर दिले, गृहिणींना दिलासा दिला, मोठी जाहिरातबाजी झाली. पुढे सवलतीच्या दरातील सिलेंडर देणे बंद झाले; शिवाय सिलेंडरच्या किमती सतत फुगत गेल्या. त्यानंतर मात्र उज्ज्वला योजनेचे नाव कोणी घेतले नाही. जनतेचा आवाज विधिमंडळाच्या अधिवेशनात उठवण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे. महागाई आणि गॅस सिलेंडरच्या टंचाईवरून सरकारला गदागदा हलवण्याचे काम विरोधी पक्षाने केले पाहिजे.
आज सारी जनता महागाई आणि गॅस सिलिंडरसाठी टाहो फोडत असताना विरोधी पक्षाला जनतेचा आक्रोश विधिमंडळात प्रभावीपणे का मांडता येत नाही? रोज वेगवेगळे घोषणा फलक हातात घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर वीस पंचवीस विरोधी आमदार घोषणा देतात आणि फोटो सेशन आणि चित्रिकरण पूर्ण झाले की निघून जातात. अशा पायऱ्यांवरील आंदोलनातून जनतेला न्याय मिळतो का? विधानसभेत आज विरोधी बाकांवर पन्नास आमदारही नाहीत. पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना विरोधी बाकांवर अशीच स्थिती होती, पण विरोधी बाकांवरील मूठभर आमदार जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या सरकारला घाम फोडत असत. काँग्रेसचे सरकार असताना विरोधी पक्षातील महिलांनी महागाई प्रतिकार संयुक्त समिती स्थापन करून मोठा दबदबा निर्माण केला होता. महाराष्ट्रामध्ये मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, कमल देसाई, प्रेमा पुरव, मंगला पारीख, सुधा वर्दे अशा समाजवादी विचाराच्या डझनभर महिला नेत्या शेकडो महिलांसह घोषणा देत, हातात लाटणी, थाळ्या किंवा घंटा घेऊन रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत असत. मृणालताईं तर देशभर लाटणीवाली किंवा पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जात असत. याच महागाई विरोधी समितीने मंत्रालयात धडक मारून तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री हरिभाऊ वर्तक यांना घेराव घातला होता.
महाराष्ट्रात विरोधी बाकांवर असलेल्या उबाठा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या प्रमुख राजकीय पक्षांकडे महिला आघाडी आहे. पण महागाई आणि गॅस सिलेंडरच्या टंचाईवर विधिमंडळात किंवा रस्त्यावर उतरून कोणी आवाज उठवताना दिसले नाही. मुंबईमध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त उपहारगृहे आणि खाणावळी आहेत. पैकी गॅसटंचाईमुळे तीस टक्के उपहारगृहे बंद पडली आहेत. देशात करोडो लोक रोज उपहारगृहात आपले पोट भरतात. रस्त्यावर सामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळणारा वडा पाव, बुर्जी पाव, आम्लेट पाव, सामोसे मिळणे बंद झाले. अनेक हॉटेल्समधून पुरी बनवणे बंद झाले.पुढील काही दिवसांमध्ये हजारो बेकरी उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भाजप नेते विरोधी पक्षनेते असते तर त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले असते. अधिवेशनात सरकारला श्वास घेऊ दिला नसता. विरोधी पक्षाने अधिवेशनात कसे आक्रमकपणे प्रश्न मांडले पाहिजेत, हे आता भाजपाने शिकवायचे काय? केंद्रात संसदेचे अर्थंसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊन तीन आठवडे झाले. विरोधी पक्षाने सरकारवर हल्ले चढवले खरे, पण या महत्वाच्या विषयावर सरकारची कोंडी केली असे कुठे दिसले नाही. जनतेच्या प्रश्नावर सभागृह दणाणून गेल्याची एकही घटना घडली नाही.
देशाची आर्थिक राजधानी वेठीस धरणाऱ्या सिलेंडरटंचाईबाबत महाराष्ट्रामध्ये अधिवेशनकाळात विरोधी बाकांवरून जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभु, भास्कर जाधव, अनिल परब, सतेज पाटील असे मोजकेच आमदार सरकारवर नेम धरून बोलताना दिसतात. विधिमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन असे आहे की विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही. विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूक नियमानुसार होईल, असे अध्यक्षांनी सांगूनही बराच काळ लोटला. विरोधी नेता नसल्याने दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर जोश नाही. अजितदादांच्या विमान अपघातातील मृत्युवरही चर्चा घडवली जात नाही. सरकार आणि विरोधी पक्ष त्यासंबंधी बोलत नाहीत हे दुर्दैव आहे. आमदार रोहित पवार मुंबई, दिल्लीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन चौकशी पारदर्शक व्हावी अशी मागणी करत आहेत. पण सत्ताधारी पक्षाच्या काही जणांना त्यात राजकारण दिसते आहे.
सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या आणि अर्थमंत्री म्हणून 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजितदादांच्या विमान अपघातातील मृत्युवर सभागृहात चर्चा घडवावी म्हणून विरोधी पक्ष सरकारवर दबाव का आणत नाही? ते कोणाच्या दबावाखाली वावरत आहेत का? देवाभाऊ हे राज्याचे टॉप बॉस आहेत. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा वास्तवात उतरली आहे. भाजपमध्येच नव्हे, तर महायुतीमध्येही देवाभाऊंचा शब्द अंतिम आहे. देवाभाऊंना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे भक्कम पाठबळ आहे. त्यांनी राज्यात भाजपा भक्कम केलीच, पण विरोधी पक्ष कमकुवत केला. सरकारला धडक प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष विधिमंडळात नसेल तर जनतेच्या प्रश्नावर आवाज कोण उठवणार? एकंदरीत, कळीच्या दोन प्रश्नांवरुन सध्या वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. सिलेंडरच्या तुटवड्याने अवघ्या देशात खळबळ माजवली आहे. तशी ती मुंबई आणि इतर शहरांमध्येही तरंग उमटवत आहे आणि त्याच सुमारास राजकारणी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना दिसत नाहीत. त्याला एखाद्या हाय प्रोफाईल राजकारण्याचाही मृत्यु अपवाद नाही.
भोंदूबाबा ; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड
कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात या वासनांधांचे विविध लीलांचे तपशील बाहेर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणाशी संबंधित 58 व्हिडिओ बाहेर पडल्याने आणि जवळपास 100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणातील संवेदनशीलता आणि व्याप्ती खूप वाढलेली बघायला मिळत आहे. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा उच्चभ्रू क्षेत्रातील लोक या भोंदूबाबाचे भक्त असून या भोंदूबाबामुळे त्याच्या भोंदू भक्तांचेही धाबे दणाणले आहेत. या भोंदूबाबच्या चौकशीतून आखणी धक्कादायक गोष्टी समोर येतील ज्याने महाराष्ट्रात आणखी खळबळ माजेल अनेकांचे बुरखे फाटले जातील. या भोंदूबाबावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी पण केवळ त्याच्यावरच नव्हे तर त्याच्या भक्तांवर देखील कारवाई व्हायला हवी कारण यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय अवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या भोंदूबाबा आणि त्याच्या अंध भक्तांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे भोंदूबाबांचे पेव फुटणे ही एकप्रकारे पुरोगामी महाराष्ट्राची अधोगतीच आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने समाजातील विवेक, विज्ञाननिष्ठा आणि कायद्याचा वचक पार धुळीस मिसळलेला बघायला मिळत आहे. अर्थात याला आपले राजकीय नेतेही तितकेच जबाबदार आहेत. संविधानाची शपथ घेऊन आमदार, खासदार, मंत्री बनणारे आमचे नेते अशा भोंदूबाबांच्या कच्छपी लागत असेल तर या भोंदूबाबांवर कायद्याचा वचक कसा राहील? ज्या नेत्यांनी समाजासमोर आपल्या वर्तणुकीतून आदर्श निर्माण करायचा असतो तेच नेते तर जर अशा भोंदूबाबांचे पाय धुवत असतील तर भोंदूबाबांना कायद्याचा धाक कसा राहील ? जादूटोणाविरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या कायद्यासाठी डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी हौतात्म्य पत्करले. आजची परिस्थिती पाहिली तर डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे हौतात्म्य वाया गेले की काय ? असा प्रश्न पडतो कारण ज्या कायद्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले त्या कायद्याचे अस्तित्वच आज कोठे दिसत नाही. आज 21 व्या शतकातही लोक अंधश्रद्धेच्या किती आहारी गेले आहेत ते या प्रकरणाने दाखवून दिले आहे. अजूनही लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजत नाही. अध्यात्माच्या नावाखाली लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागतात आणि स्वतःसह समाजाचेही नुकसान करून घेतात. लोकांच्या श्रद्धेचा ( अंध ) बाजार मांडून अशोक खरात सारखे भोंदू बाबा कॅप्टन फाईल बनवतात. अर्थात अशी फाईल असलेला अशोक खरात हा एकमेव भोंदूबाबा नाही. गावागावात, शहरशहरात असे अनेक भोंदूबाबा आहेत जे भक्तांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आपल्या तुंबड्या तर भरतच आहेत पण महिला भगिनींच्या अब्रूही लुटत आहेत. अशोक खरात प्रमाणेच श्रद्धेचा बाजार मांडून भक्तांना लुबाडणाऱ्या गावागावातील या भोंदूबाबांची देखील छाटणी करायला हवी. आज हा खरात आहे, उद्या दुसराच कोणी…उभा राहील ? तेंव्हा थोतांड प्रवृत्तीच्या या भोंदूबाबांचा बीमोड होणे आवश्यक आहे त्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवीच त्याशिवाय लोकांनीही आपला विवेक जागृत ठेवून अशा भोंदूबाबांच्या नादी लागणे सोडून द्यावे. भोंदूबाबा म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही कीड मुळापासून उपटून टाकायलाच हवी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

धावण्याच्या वेगाचे गणित…
धावणे हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे आणि त्यामुळे प्रकृती चांगली राहते असे सांगितले जात असले तरी आज प्रत्येकालाच वेगाने धावणे शक्य होत नाही याची करणे खूप आहेत. कमी वेगाने धावण्यातही व्यायाम होतोच फक्त या दोन्हींचे खास फायदे मात्र वेगवेगळे असतात. सामान्य फायदे हृदयाचे चांगले कार्य, आपला चांगला मूड आणि काही आजारांची कमी होणारी जोखीम असे असतात.
मग धावण्याचाच व्यायाम करायचा असेल आणि चांगले फायदे मिळवायचे असतील तर वेगाने धावावे की हळू? एका बाजूला वेगाने धावण्यात आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवता येते आणि त्यातच अधिक ऊर्जा खर्च करून कमी वेळात अधिक किलोमीटर्स पार करण्याचा आनंद मिळवू शकता. याउलट कमी वेगाने धावण्यातून आपण हृदयाच्या एका व्यवस्थेशी जोडले जातो आणि त्यातून हृदयासंबंधीचे भापूर फायदे आणि इजा होण्याची कमी जोखीम असू शकते.
पण वेगाने धावणे आणि हळू धावणे या व्यक्तीशी अनुरूप अशा बाबी असतात. नुकतीच धावायला सुरुवात केलेल्या व्यक्तीसाठी प्रत्येक किलोमीटरसाठी ६ मिनिटे लागणे हे धावपटू असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत खूपच हळू असेल आणि ४ ते ५ मिनिटे लागणे हे बरेच जलद असू शकते. यामुळे धावताना धाप न लागणे हा एक आणि धावताना बोलता येणे शक्य असावे असा दुसरा निकष या विषयातील तज्ञ लावतात. धावण्याच्या व्यायामाला नुकतीच सुरुवात करीत असाल तर अधूनमधून चालणे सुरु ठेवल्यामुळे तुम्हाला या व्यायामाची सवय होईल असे अमेरिकेतील एका शक्तिमान धावपटू संस्थेच्या संस्थापक जॅनेट हॅमिल्टन म्हणतात. तुही आपल्या धावण्याच्या वेळी हृदयाचे ठोके मोजण्याची यंत्रे वापरीत असाल तर तुम्हाला हळू धावण्याने फायदा होऊ शकेल. यावेळी तुमचे हृदय कमाल क्षमतेच्या ५० टक्के वग दाखवील असे आणखी एक तज्ञ मॅट कँपबेल यांनी म्हटले आहे. वेगाने धावण्याचा विचार करणारांसाठी संभाषण हा पर्यायच असू शकत नाही कारण यावेळी त्यांचे हृदय अक्षरश: ७५ ते ९० टक्के वेगाने काम करीत असेल. त्यामुळे या प्रकारच्या धावण्याचा व्यायाम करू बघणारांसाठी जोखीम बरीच अधिक असू शकते.
शारीरिक फिटनेसच्या जगात वावरताना कमी वेगाने धावण्याचा व्यायाम करणारांना योग्य न्याय मिळत नाही. जमेल त्या वेगाने धावण्याचा व्यायाम करण्यात चुकीचे काहीच नसून उलट ते आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते हे लोकांना कळतच नाही की काय अशी शंका येते. हळू धावण्यामुळे आपले शरीर आपल्या पेशींमधील ऊर्जा निर्मिती करून आपल्या हालचालींना इंधन पुरवठा करणाऱ्या ‘मायटोकॉन्द्रिया (mitochondria) या अतिसूक्ष्म घटकांचा आकार वाढवीत असतात. आरोग्याच्या दृष्टीने स्नायू, रक्ताचा साठा वाढवणे इत्यादीच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. धावायचे तर नक्कीच पण वेगाने की हळू हे आपण स्वत:च ठरवायचे आहे. तुम्हाला केवळ आरोग्याच्या दृष्टीने आणि आजारांची जोखीम कमी करण्यासाठी धावायचे असेल तर हळू धावण्याचा पर्याय निवडावा असे जॅनेट हॅमिल्टन म्हणतात. वेगाने धावण्याचा व्यायाम रोज करून आपल्यापैकी प्रत्येकाला धावपटू व्हायचे नाहीय. निरोगी राहणे हेच ध्येय असेल तर हळू धावलाट तरी चालेल पण सातत्याने…खंड पडू देऊ नका…
काहीतरी नवीन…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स

अलिकडच्या काळात नगर आणि नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे तसेच देशभरात विविध संतांवर झालेले गंभीर आरोप ही चिंतेची बाब आहे. हे प्रकार केवळ व्यक्तींच्या पतनाचे निदर्शक नसून समाजातील अंधश्रद्धा आणि विवेकहानीचे द्योतक आहेत. संत तुकारामांनी आपल्या अभंगांमध्ये संताचे वर्णन केले आहे. त्यात न बसणाऱ्या आणि संतांचा मुखवटा घालून समाजाला फसवणाऱ्यांचे काय केले पाहिजे, हे ही सांगितले आहे.
अध्यात्म म्हणजे दिखावा, संपत्ती, प्रसिद्धी नव्हे; तर आत्मशुद्धी, नैतिकता आणि इतरांप्रती करुणा. या मूल्यांपासून दूर जाणारा ‘संत’ असूच शकत नाही. आजची वेळ ही केवळ निषेधाची नाही, तर परिवर्तनाची आहे. समाजाने ठामपणे ठरवले पाहिजे, की अशा प्रवृत्तीला स्थान नाही. कायदा, प्रशासन, माध्यमे आणि सर्वसामान्य नागरिक हे सर्व मिळून या समस्येला सामोरे गेले, तरच खऱ्या अर्थाने न्याय आणि नैतिकता प्रस्थापित होईल. अन्यथा, ‘संत’ या पवित्र शब्दाची किंमत उरणार नाही आणि समाजाचा विश्वास कायमचा ढासळेल. आधुनिक माध्यमांच्या प्रसारामुळे ‘महाराज’ किंवा ‘बाबा’ यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर उभी केली जाते. सोशल मीडिया, टीव्ही चॅनेल्स आणि मोठ्या प्रमाणावर होणारे धार्मिक कार्यक्रम यामुळे या व्यक्तींना प्रचंड लोकप्रियता मिळते; पण या लोकप्रियतेच्या आड अनेकदा अनैतिक कृत्ये लपलेली असतात. महिलांवर अत्याचार, आर्थिक फसवणूक, मानसिक शोषण यासारखे गंभीर आरोप समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयांनी दोष सिद्धही केले आहेत, जे अत्यंत धक्कादायक आहे. महिलांच्या संदर्भात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. मनःशांती, समाधान, आध्यात्मिक आधार शोधण्याच्या प्रयत्नात अनेक महिला अशा कथित गुरूंच्या संपर्कात येतात. भावनिक, मानसिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे त्या अशा गुरुंवर सहज विश्वास ठेवतात; पण या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. ‘आशीर्वाद’, ‘उपचार’, ‘साधना’ अशा नावाखाली त्यांचे शोषण केले जाते. ही बाब केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून समाजाच्या नैतिक अधःपतनाची लक्षणे आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये दिसणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय आश्रय. अनेक कथित महाराजांना स्थानिक तसेच राज्यस्तरीय नेत्यांचा पाठिंबा मिळतो. त्यांच्या कार्यक्रमांना राजकीय उपस्थिती असते, निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्यांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे अशा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे गैरप्रकार अधिक बिनधोक सुरू राहतात. धर्म आणि राजकारण यांचे हे अयोग्य मिश्रण समाजासाठी घातक ठरते. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असल्याचेही दिसून येते. यामागे अनेक कारणे आहेत. पीडितेवर येणारा सामाजिक दबाव, पुराव्यांचा अभाव, दीर्घकालीन न्यायप्रक्रिया आणि प्रभावशाली आरोपींचा दबाव यामुळे अनेक महिला तक्रार दाखल करण्यासही घाबरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक आणि संवेदनशील असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाचा खरा वारसा म्हणजे विवेक, समता आणि नैतिकता. कीर्तन ही परंपरेने प्रबोधनाची साधना होती. कीर्तनकार हा केवळ धार्मिक कथाकार नसून समाजाचा मार्गदर्शक मानला जात असे; परंतु आज काही ठिकाणी कीर्तन ही साधना न राहता एक ‘व्यवसाय’ बनली आहे. प्रसिद्धी, पैसा आणि राजकीय आश्रय यासाठी काहीजण या माध्यमाचा गैरवापर करताना दिसतात. अशा परिस्थितीत कीर्तनाचा मूळ उद्देश हरवून बसतो आणि श्रोत्यांची दिशाभूल होते.
संतांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले नाही; उलट त्यांनी प्रश्न विचारण्याची, सत्य शोधण्याची शिकवण दिली. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला ‘देव’ मानणे, त्याच्यावर अंधविश्वास ठेवणे हे वारकरी परंपरेच्या विरोधात आहे. शिक्षण आणि जागृती हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः महिलांनी, स्वतःच्या अधिकारांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी जाताना विवेकबुद्धी वापरणे, प्रश्न विचारणे आणि शंका उपस्थित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच माध्यमांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. केवळ प्रसिद्धीच्या मोहापायी अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे. सरकार आणि प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. अशा प्रकरणांमध्ये तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी होणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि पीडितांना संरक्षण आणि न्याय मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच धार्मिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे, पारदर्शकता वाढवणे आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाची खरी ओळख पुन्हा प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. संतांच्या शिकवणीचा अर्थ केवळ भजन-कीर्तनात नाही, तर दैनंदिन जीवनात नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सहिष्णुता यांचा अवलंब करण्यात आहे. समाजाने या मूळ मूल्यांकडे परत जाणे आवश्यक आहे. अन्यथा, आध्यात्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेली ही अधोगती पुढील पिढ्यांसाठी घातक ठरेल.
आजची वेळ ही जागृतीची आहे. अंधश्रद्धा आणि व्यक्तिपूजेपासून दूर राहून विवेक आणि सत्याचा मार्ग स्वीकारण्याची. वारकरी परंपरेचा खरा वारसा जपायचा असेल, तर ‘मद, मोह, मत्सर’ यांच्यापासून दूर राहण्याबरोबरच ‘अज्ञान, भीती आणि अंधविश्वास’ यांच्याशीही लढा देणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा कणा मानली जाते. ‘मद, मोह, मत्सर यांपासून दूर राहणे’ हा वारकरी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. साधेपणा, समता, नामस्मरण आणि सामूहिकतेतून व्यक्त होणारे अध्यात्म हे या परंपरेचे वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यासारख्या संतांनी या परंपरेला प्रबोधनाची धार दिली. त्यांच्या अभंगांमधून आणि कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय यावर प्रखर प्रहार झाला. म्हणूनच वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक चळवळ नसून सामाजिक परिवर्तनाची एक मोठी लाट होती; परंतु आजच्या काळात या परंपरेच्या नावाखाली काही विकृत प्रवृत्ती डोके वर काढताना दिसतात. वारकरी संप्रदायाचा मूळ संदेश जिथे आत्मसंयम, विवेक आणि नैतिकता यांवर आधारलेला आहे, तिथे काही कथित कीर्तनकार आणि तथाकथित ‘महाराज’ भोगवृत्ती, सत्तेची लालसा आणि व्यक्तिपूजेला खतपाणी घालताना दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात घडलेली प्रकरणे पाहिली, की स्वतःला संत, महंत म्हणाऱ्यांचे पाय मातीचे असल्याचे दिसते. आसाराम बापूसह अनेकांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. कुंटणखाने चालवल्याच्या थाटात आश्रम चालवण्याचे प्रकार दिसले. त्याग वृत्तीऐवजी भोगवृत्ती आणि विलासी वृत्ती फोफावली.
अनेकदा मधुर वाणीखाली काय दडलेले असते, हे लवकर कळत नाही. त्यातही भक्त परिवार धूर्त बाबांच्या प्रेमात इतका आंधळा झालेला असतो, की बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही भक्त आरत्या ओवाळण्याचे कमी करत नव्हते. आसाराबापूला शिक्षा सुनावल्यानंतरही त्याचे समर्थक शाळांमधून त्यांच्या छायाचित्राच्या आणि काही कथित शिकवणुकीच्या वह्या वाटत होते. अलिकडच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात उघडकीस येणाऱ्या काही घटनांनी समाजमन हादरवून सोडले आहे. अध्यात्म, साधना, कीर्तन, प्रवचन या पवित्र संकल्पनांच्या आड लपून काही कथित ‘महाराज’ आणि ‘बाबा’ यांनी उभारलेले साम्राज्य आर्थिकच नाही, तर नैतिक अधःपतनाचेही प्रतीक बनले आहे. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याच्याविरोधात महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप, नगर जिल्ह्यातील यशवंत एकनाथ थोरात उर्फ गुंजाळ महाराजावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे दाखल झालेला गुन्हा आणि या सर्वांमध्ये कथित राजकीय-सामाजिक आश्रयाची चर्चा या सगळ्यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे आपण नेमके कुठे चाललो आहोत? खरात याने आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या ट्रस्टमधील काही विश्वस्त आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या त्याच्या कथित संबंधांमुळे या प्रकरणाने अधिकच वादळी स्वरूप धारण केले. या संदर्भात काही राजकीय नावेही समोर आली. खरातचे सर्वपक्षीय राजकारण्यांशी संबंध होते. त्याच्याकडे सापडलेल्या 58 व्हिडीओंमधून आता कोणत्या आणि किती महिलांवर अत्याचार झाले, यावर आता प्रकाश पडेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक आता त्याचा तपास करणार आहे, मात्र एकूणच अशा प्रकरणांमागे दडलेल्या वृत्तींचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे.
पैलू
भागा वरखडे
(अद्वैत फीचर्स)
दादर-रत्नागिरी पॅसेंजर
ट्रेनसाठी मनसे आक्रमक
मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी कोकणात जाणारी ही पॅसेंजर ट्रेन दादर ते रत्नागिरी अशी चालवली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे खात्याने कोणतेही कारण न देता ही एक्सप्रेस ट्रेन फक्त दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. यामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते.
त्यामुळे आता मनसेने ही पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकात न थांबता पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबतची आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन रोखून धरु, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ?
मुंबई : अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ २० टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हापूसची लागवड केली जाते. काही जाणकारांच्या मते, हापूस आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायातून सुमारे २५०० कोटी रुपयांची उलाढाल होते. रत्नागिरीत सुमारे १.२० लाख हेक्टर, सिंधुदुर्गात ३४ ते ३५ हजार हेक्टर आणि रायगडमध्ये ११ ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.
मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे ट्रान्सपोर्ट, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, गवत, पेट्यांसाठी लाकूड, मजूर, गाड्या अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. निरूळ गावातील स्वरूप गांगण यांसारखे हापूस वाहतूकदारही या संकटामुळे अडचणीत आले आहेत.
भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी
राजन चव्हाण
सावंतवाडी: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक बनली असून सेनेच्या वतीने शहरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. अशोक खरात प्रकरणी आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची ‘एसयटी’ मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी ही मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी मोर्चा काढत प्रांत कार्यालयावर धडक दिली.
सेनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मागणीचे हे निवेदन पाठवण्यात यावे अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे नेमके संबंध काय आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे.
ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी एका पत्रकार परिषद ही मागणी केली. यावेळी रमेश गावकर राजू रमेश सावंत विनोद काजरेकर विनोद ठाकूर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
खरात प्रकरणात केसरकर यांची बाजू विसंगत वाटत आहे या प्रकारामुळे सावंतवाडी चे नाव बदनाम झाले आहे अशी टीका कासार यांनी केली आहे.
महिला काँग्रेसची मागणी
दरम्यान खरात यांच्याशी नाव जोडल्याने आणि खरात सोबत आमदार दीपक केसरकर यांचे फोटो प्रसिद्ध झाल्याने सावंतवाडी शहराची आणि पर्यायाने मतदार संघाची प्रतिमा मलीन झाली आहे या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केली आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या गंभीर प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना केसरकरांचे नाव वारंवार समोर येणे ही सावंतवाडी करांसाठी लज्जास्पद बाब आहे. तेव्हा त्यांचीही ‘ एसआयटी ‘ मार्फत चौकशी व्हावी आणि तोपर्यंत त्यांनी पदावरून दूर व्हावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मतदार संघाचा आमदार निधी नाशिक,सिन्नर भागात वळवल्याची चर्चा असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
केसरकर यांनी स्वतःहून आमदारकीचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही वंजारी यांनी दिला आहे.
आरोप चुकीचे- केसरकर
विरोधकांकडून माझ्यावर जे राजकीय आरोप केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत असे स्पष्टीकरण शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे.
कॅप्टन खरात यांचे जे कृत्य समोर आले आहे ते अत्यंत निंदनीय आहे. त्या संदर्भात सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच असेही केसरकर यांनी म्हटले आहे
ईशानेश्वर मंदिराच्या रस्त्याच्या कामासाठी खरात हे मुंबईला आले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमची भेट झाली होती. ‘तो ‘फोटो त्यावेळेचा आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देवभक्त असल्याने आणि नेहमी शिर्डीला जात असल्याने वाटेत सिन्नर हे गाव लागते त्यामुळे माझे ईशानेश्वर मंदिरात जाणे होत असे.माझा जो फोटो व्हायरल होत आहे तो त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहे.
संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप धादांत खोठे आहेत असा खुलासाही केसरकर यांनी केला आहे.
केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांचे खाते अशोक खरात चालवत होते असा आरोप राऊत यांनी केला होता.
धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा
मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही”, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. तसेच, ‘धर्मांतर केलेली व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही. केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जाती दर्जाचा दावा करण्याचा अधिकार आहे’, असेही न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला आहे. भारतीय राज्यघटनेच्या (अनुसूचित जाती) आदेश, १९५० नुसार, केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचे सदस्य मानले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘लाइव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार, चिंथडा आनंद नावाच्या एका पाद्रीने याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. आनंद यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मे २०२५ च्या निकालाला आव्हान दिले होते. जातीय भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप आनंद यांनी याचिकेत केला होता.
“धर्मांतरित ख्रिश्चन व्यक्ती आता ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९’ अंतर्गत तक्रार दाखल करू शकत नाही. एकद्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला की, ती तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीची राहत नाही, त्यामुळे या विशेष कायद्याचे संरक्षण तिला मिळत नाही”, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. धर्मांतर केल्यामुळे त्या व्यक्तीची मूळ सामाजिक ओळख (जातीचा दर्जा) कायदेशीररित्या संपुष्टात येते, कारण संबंधित धर्मांमध्ये (उदा. ख्रिश्चन धर्म) अधिकृतपणे जातिव्यवस्था मान्य नाही, असे कोर्टाने नमूद केले.
आनंद यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांना जातीच्या नावाखाली मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्या अंतर्गत दाद मागितल्याचे स्पष्टीकरण दिले. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने आनंद यांच्या ख्रिश्चन धर्मात धर्मांतराचे कारण देत त्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अंतर्गत संरक्षण मागण्याचा अधिकार गमावला असल्याचे एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय
खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार ०
हरिभाऊ लाखे
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातच्या रोज नवनवीन भानगडी उघडकीस येत आहेत. सिद्धी प्राप्त करण्यासाठी या भोंदूबाबा अशोक खरातने तब्बल ५ नरबळी दिल्याचाही त्याच्यावर संशय़ असून पोलिस त्यादिशेनही तपास करीत आहेत. दरम्यान अशोक खरातला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आज खरातच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.
खरातला कोर्टात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. सुनावणी पाहण्यासाठी वकिलांचीही मोठी गर्दी झाली होती.
सुनावणीदरम्यान SIT अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासाची माहिती मांडताना अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. आरोपी महिलांना खडे, पेढे देऊन आणि पाण्यात काही पदार्थ मिसळून देत असे, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असे आणि त्यानंतर त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
तर सरकारी वकिलांनी ६ लाख ५३ हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळा रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे. ३१ काडतुसे त्यात ५ फायर झाले ते कुठे फायर झाले याचाही पोलिस तपास करीत आहेत.
अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत होता, असा आरोपही करण्यात आला. साप, वाघ यांचा वापर करून भीती निर्माण केली जात होती. तसेच कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करून वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.
बचाव पक्षाने मात्र सात दिवसांत पुरेसा तपास झाल्याचा दावा करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.
सरकारी वकिलांनी प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार आणि इतर गंभीर बाबींचा तपास अजून बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, गंभीर आरोप आणि तपासातील नव्या बाबी लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
खरात म्हणाला तो मी नव्हेच…
दरम्यान, पोलीस कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खरातला काही बोलायचं आहे का? असे विचारले. यावर अशोक खरात म्हणाला की, मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरामध्ये कधीतरी जायचो, त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र, श्रावणी सोमवारी अशा वेळी मी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तरे दिली आहेत. मला साप, वाघ याबद्दल काही माहिती नाही, असे त्याने म्हटले.
अजित पवारांना संपवण्यासाठी पक्षातील अनेकांनी करंगळी कापली – रोहीत पवार
अजित पवार जिवंत होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर ब्लॅकमॅजिक झालेले पाहिलं, मुंबईच्या घराबाहेरही झालं. दादांची ताकद जावी आणि आपल्याला मिळावी या हेतूने पक्षातील अनेकांनी करंगळी कापून तंत्रमंत्र केल्याचा गंभीर आरोप यावेळी रोहीत पवार यांनी केला. याबाबत लवकरच आपण गौप्यस्फोट करणार असल्याच रोहीत पवार म्हणाले.
दरम्यान, आम्ही राहुल गांधींना भेटलो, ते म्हणाले ज्या राज्यात न्याय मिळू शकतो अशा राज्यांत जा. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर गुन्हा दाखल झाला, मी त्या राज्याचे आभार मानतो. मी फक्त कर्नाटकात गेलो, तिथे एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कर्नाटक ने तो राज्याकडे पाठवला असल्याची माहीती रोहीत पवारांनी यावेळी दिली.
