कल्याण : राज्यातील जवळपास तीन लाख लघु कंत्राटदार आणि विकासकांना पूर्ण केलेल्या शासकीय प्रकल्पांची देयके न देता भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर आणत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
राज्य सरकारचे “व्यवसायपूरक” आणि “एमएसएमई समर्थक” असल्याचे दावे प्रत्यक्षात पूर्णपणे फोल ठरत असल्याचे सांगत तपासे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हजारो लघु कंत्राटदारांना पूर्ण झालेल्या कामांची देयके मिळण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील कंत्राटदार संघटनांनी थकीत शासकीय देयकांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक संकटाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली असून, या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रिझर्व्ह बँकेच्या राज्यपालांनाही पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“भाजप सरकार महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असल्याचे सांगते. प्रकल्पांच्या नावाखाली सरकार सातत्याने कर्ज उचलत आहे, मात्र त्याच प्रकल्पांची देयके देण्यात अपयशी ठरत आहे. जर लघु कंत्राटदारांची बिले वर्षानुवर्षे प्रलंबित असतील, तर मग हा पैसा नेमका जातो कुठे?” असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला. राज्याचे सार्वजनिक कर्ज आता १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून महाराष्ट्र आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
“लघु कंत्राटदारांना थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागत आहे, ही महाराष्ट्राच्या वित्त विभागाच्या पूर्ण अपयशाची कबुली आहे,” अशी टीकाही तपासे यांनी केली. राज्य सरकारवर आणखी हल्लाबोल करताना तपासे यांनी मागणी केली की, ३१ मार्च २०२६ अखेर राज्यातील सर्व विभागांमधील सर्व प्रकल्पांची एकूण थकीत देणी किती आहेत, याची अधिकृत माहिती मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जाहीर करावी.
ठाणे: ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरण पूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
यासाठी इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाकडे १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार १५ जुलै २०२६ पर्यंत जागा व शाडू माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून दिली जाणार असून शेड, वीज व पाणी यांसारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उपलब्ध करून घ्यायच्या आहेत. तसेच शाडू माती ठामपाच्या महिला बचत गट तसेच हवा प्रदूषण प्रयोगशाळा, वर्तकनगर येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी जागेसाठी अर्ज केल्यास ते स्वत: मूर्तीकार असणे बंधनकारक असून तसे हमीपत्र त्यांनी महानगरपालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक साहित्य/ शाडू मातीची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत असा आशयाचा ३ बाय ५ फूट आकाराचा फलक लावणेही आवश्यक राहणार आहे.
पर्यावरण पूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना या वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर महानगरपालिकेने नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेली जागा नवरात्रौत्सव संपेपर्यंत उपलब्ध राहणार असून त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावी असे धोरण महानगरपालिकेने निश्चित केले आहे.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून ते ७ जून या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हिरानंदानी इस्टेट परिसरातील जैवविविधता उद्यान येथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून नोंदणीकरिता http://forms.gle/AHfh9rASdCEa9NrQ7 या लिंकवर नोंदणी करावी असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले आहे.

दुर्गाडी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त, पोलिस प्रशासन सतर्क
कल्याण : बकरी ईदच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहरात पथसंचलन केले. विशेषतः दुर्गाडी किल्ला परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गामाता मंदिराशेजारील ईदगाहमध्ये दरवर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बकरी ईदची नमाज अदा करतात. नमाजसाठी मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावरही नमाज अदा केली जाते. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेश आणि पूजा-अर्चनेचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येत असतो. काही हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे की नमाजच्या वेळी हिंदू भाविकांना मंदिरात प्रवेश रोखला जातो. तसेच नमाज सुरू असताना घंटानाद होऊ नये म्हणून मंदिरातील घंटादेखील बांधण्यात येतात.
या मुद्द्यावरून दरवर्षी आंदोलन केले जाते. सुमारे ४० वर्षांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दरवर्षी ईदच्या काळात पोलिस प्रशासन विशेष सतर्कता बाळगत आहे. यंदा भाजपच्या वतीनेही नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाची मागणी केल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ वाढली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
०००००००

ऐनवेळी जुन्याच प्रश्नपत्रिका वाटल्याने खळबळ
हरिभाऊ लाखे
नाशिक : नीट परीक्षेचा विषय देशभर गाजत असताना आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील सावळागोंधळ समोर आला आहे. संगणकीय आज्ञावलीतून पाठवलेली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांत ‘डाऊनलोड’ झाली नाही. त्यामुळे घाईघाईत सर्व केंद्रांना इ मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यात अनेक ठिकाणी जुन्या म्हणजे २०२४ च्या प्रश्नपत्रिका गेल्यामुळे गोंधळात अधिक भर पडली. या घटनाक्रमाने हजारो परीक्षार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
बुधवारपासून मुक्त विद्यापीठाच्या मुख्य (उन्हाळी) परीक्षेला महाराष्ट्रातील एकूण ५५८ परीक्षा केंद्रांवर सुरुवात झाली. या परीक्षा पारदर्शक, सुरक्षित व गैरप्रकार मुक्त वातावरणात होण्यासाठी विद्यापीठाने एआय आधारीत सीसी टीव्ही देखरेख प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर अवलंब केला होता. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका ‘डाऊनलोडिंग’ कक्ष व ‘उत्तरपत्रिका सिलिंग’ कक्ष येथेही हे आधुनिक कॅमेरे बसविण्यात आले होते. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला. ५३ शिक्षणक्रम व ७७ अभ्यासक्रमांची ही परीक्षा आहे. मुक्त विद्यापीठ संगणकीय आज्ञावलीतून प्रश्नपत्रिका केंद्रांना पोहोचवली जाते.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजेता होणाऱ्या परीक्षांची प्रश्नपत्रिका तांत्रिक दोषामुळे केंद्रांवर डाऊनलोडच झाली नाही. त्यामुळे ऐनवेळी सर्व परीक्षा केंद्रांना इ मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. परीक्षा केंद्रांनी त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी घाईघाईत झेरॉक्स काढल्या. वितरित झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्या २०२४ च्या असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पुन्हा सुधारीत प्रश्नपत्रिका पाठवून तासाभराच्या विलंबाने काही ठिकाणी प्रत्यक्षात परीक्षेला सुरूवात होऊ शकली. विदर्भासह राज्यातील अनेक भागात पारा उंचावलेला आहे. प्रचंड उकाड्यात विद्यार्थ्यांना वर्गात ताटकळत बसावे लागले. त्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला.
कोट
राज्य शासनाने परीक्षेच्या कामात हयगय, हलगर्जीपणा किंवा बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा अशाने विद्यार्थ्यांचा परीक्षा घेणाऱ्या संस्था, विद्यापीठावर विश्वासच राहणार नाही.- प्रा. डॉ. संजय खडक्कार (माजी विद्वत परिषद सदस्य, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)
कोट
सर्व्हरचा प्रश्न होता. तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परंतु, हा प्रश्न १५ मिनिटांत सोडविला गेला. ज्या केंद्रांवर जुन्या प्रश्नपत्रिका गेल्या, त्या लगेच मागे घेण्यात आल्या. त्या ठिकाणी त्वरित दुसरी प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी वाढवून देण्यात आला. – प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरू, यशवंतराव
दरेकर अभ्यास गटाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीबाबत दरेकरांची मुंबई महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा
राजेंद्र साळसकर
मुंबई : दरेकर समितीच्या अहवालातील शिफारशी बाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची दरेकर समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी मुंबईत स्वयं पुनर्विकासाला मोठी मागणी असून मुंबई महापालिकेने दरेकर समितीच्या अहवालातील मुंबई महापालिकेशी संबंधित केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी विनंती दरेकर यांनी यावेळी केली.
स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना बांधकाम परवानगी आणि अन्य परवानग्या देण्यासाठी ब्लॉकचेन आधारित एक खिडकी योजना, १० टक्के अधिकचे. चटई क्षेत्र अनुज्ञेय करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रिमियम दरात १० टक्के सवलत, स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना प्रिमियमची रक्कम भरण्यासाठी ५ टप्पे पाडून देणे आणि त्यावरील व्याज माफ करणे, ९ मीटर पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ९ मीटरसाठी लागू असलेले हस्तांतरणीय विकास हक्क व शासकीय एफएसआय उपलब्ध करणे, खाजगी अभिन्यासातील रस्ते आणि राईट ऑफ वेचे रस्ते महापालिकेने स्वत:कडे हस्तांतरित करुन ते सार्वजनिक रस्ते म्हणून घोषित करणे, एलयुसी टॅक्समध्ये सवलत देण्यात देणे, अशा अनेक शिफारशींवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
00000000

प्लास्टिक मुक्तीसाठी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा पुढाकार
सिद्धेश शिगवण
ठाणे :जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “आशाये” हा पर्यावरणपूरक आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि शाश्वत पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमाची संकल्पना व रचना VesacIndia चे संस्थापक विजयकुमार कट्टी यांनी केली असून, त्याचे समन्वयन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रारंभी हा उपक्रम पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार असून, भविष्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी १० पुनर्वापरयोग्य नॉन-वुव्हन पॉलीप्रॉपिलीन पिशव्यांचे योगदान देणे अपेक्षित आहे. या पिशव्या घर, सोसायटी आणि परिसरातून संकलित करून ३ जून २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संकलनासाठी विजयकुमार कट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.या सामूहिक सहभागातून सुमारे २ लाख ५० हजार पुनर्वापरयोग्य पिशव्या संकलित होण्याचा अंदाज असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत होणार आहे. उपक्रमामुळे ५६ हजार किलोहून अधिक प्लास्टिक कचरा टळणार असून, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात लक्षणीय घट होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी शासकीय कार्यालयांतून राबविण्यात येणारा हा देशातील पहिला उपक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या माध्यमातून पुनर्वापर संस्कृतीला प्रोत्साहन मिळून पर्यावरण संरक्षणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांना बळकटी मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी कर्मचारी संख्या, कार्यालयांचे पत्ते आणि नोडल अधिकाऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा १ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. परेल येथील आरएमएमएस सभागृहात होणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय खेळाडूंना डीएसओ कॅरम स्पर्धेच्या तयारीसाठी सरावात्मक विनाशुल्क उपक्रम राबविण्यासाठी संयोजक यंदाही प्रयत्नशील आहेत.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन लाभणार आहे. चँम्पियन बोर्डावर सरावात्मक खेळ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत लवकरच कॅरमप्रेमी दशरथ चव्हाण स्मृती शालेय मुलांसाठी आयडियल कॅरम केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी मोफत प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २९ मेपर्यंत संपर्क साधावा.
००००००००

मुंबई : निवृत्ती धुमाळ यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त कामोठे येथील दत्तूशेठ पाटील आंतरराष्ट्रीय शाळेत अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. सामाजिक, राजकीय, कामगार, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या निवृत्ती धुमाळ यांनी माथाडी कामगार चळवळीत मोठे योगदान दिले आहे. भाई मनोहर कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कामगारांच्या न्यायासाठी संघर्ष केला.
या सोहळ्यात विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. तसेच निवृत्ती धुमाळ आणि त्यांना किडनी दान करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ. अनिता धुमाळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती विश्वासराव यांनी केले, तर आयोजन विजय, वेदांगी, श्रावणी आणि सौ. अनिता धुमाळ यांनी केले होते.

५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल
कल्याण : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
००००००००

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरु’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सुरक्षा अधिकारी घनश्याम फर्डे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
