बदलापुरात रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
स्लग –रिक्षा चालकाच्या डोळ्यात मैत्रिणीने माती फेकल्यामुळे मुलगी बचावली
आरोपीला अटक
ठाणे: बाल लैंगिक शोषणासाठी कुप्रसिद्ध झालेल्या बदलापुरात पुन्हा एकदा अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. बदलापूरमध्ये ट्युशनला जाणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीचा एका रिक्षा चालकाने हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटकही केली.
एका दहा वर्षीय चिमुकलीने विरोध करुनही रिक्षाचालक तिचा हात सोडत नव्हता. अखेर प्रसंगावधान राखत तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने या रिक्षा चालकापासून सुटका करण्यासाठी रिक्षा चालकाच्या डोळ्यात माती फेकली आणि तिथून पळ काढला. बदलापूर पूर्व परिसरातील ही घटना असून आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर, अवघ्या काही तासातच अंबरनाथ येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांनी दिली आहे.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ६ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल झाली होती, त्यामध्ये मुलीचा हात धरुन विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यानुसार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात संवेदनशीलपणे लहान मुलांसंदर्भातील गुन्हे हाताळत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली.

अजित पवारांचा घातच झालाय
एअर हॉस्टेस पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप
वैमानिकाला उशीर व्हायला मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?”
शेवटच्या क्षणी वैमानिकच नव्हेतर विमानही बदलले
मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघात हा घातच होता असा आरोप आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहीत पवार यांनी करून २४ तास उलटत नाही तोच आता या अपघातात मृत्यू पावलेल्या एअर हॉस्टेस पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळीनीही हा घातच असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
“पिंकीने चार वेळा अजित पवारांसोबत काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचे विमान का दिले गेले?”, असा सवाल शिवकुमार माळी यांनी केला आहे.
अजित पवार ज्या विमानातून बारामतीला निघाले होते आणि ते अपघातग्रस्त झाले. त्या विमानाचा पायलट ट्रॅफीक जॅममध्ये अडकल्यामुळे ऐनवेळी बदलण्यात आला, असेही समोर आले आहे. त्यावर पिंकी माळी हिचे वडील म्हणाले की, “सकाळी ६ वाजता मुंबईतील कोणत्या भागामध्ये ट्राफिक असते. विमान अपघाताच्या दिवशी फक्त पायलट नाही, तर विमानही बदलले गेले होते होते”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याजवळ असलेले पुरावे सगळ्यांसमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही हा घातपात असल्याचा संशय आहे“, असेही शिवकुमार माळी यांनी म्हटले आहे.
‘जन गण मन‘च्या आधी ‘वंदे मातरम’ सक्तीचे !
नवी दिल्ली : केंद्र सरकारने “वंदे मातरम्” बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, “वंदे मातरम्” आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळेतील कार्यक्रम आणि इतर औपचारिक मेळाव्यांमध्ये वाजवणे सक्तीचे झाले आहे. या काळात सर्वांनी आदराने उभे राहणे बंधनकारक असेल. राष्ट्रीय भावनेचा स्पष्ट संदेश देण्यासाठी यावेळी लक्षपूर्वक उभे राहणे आवश्यक असेल. दरम्यान नवीन नियम चित्रपटगृहांना लागू होणार नाहीत
नवीन नियमांनुसार, सहा परिच्छेद असलेले वंदे मातरमचे पूर्ण रूप आता ३ मिनिटे आणि १० मिनिटांसाठी वाजवले जाईल. त्यात दुर्गासह तीन हिंदू देवींचा उल्लेख आहे. आतापर्यंत, मूळ वंदे मातरम् गाण्याच्या सहा परिच्छेदांपैकी फक्त पहिले दोनच गायले जात होते. राष्ट्रध्वज फडकवणे, राष्ट्रपतींचे कार्यक्रमांमध्ये आगमन, राष्ट्राला उद्देशून भाषणे देण्यापूर्वी आणि नंतर, राज्यपालांचे आगमन आणि भाषणे देण्यापूर्वी आणि नंतर अशा अनेक अधिकृत प्रसंगी वंदे मातरम वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पद्म पुरस्कार सोहळ्यासारख्या नागरी पुरस्कार समारंभात किंवा राष्ट्रपती उपस्थित असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात वंदे मातरम वाजवले जाईल. तथापि, सिनेमागृहांना नवीन नियमांमधून सूट देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की चित्रपटगृहांमध्ये ‘वंदे मातरम’ वाजवणे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी उभे राहणे अनिवार्य राहणार नाही. ‘वंदे मातरम’बद्दल स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी नवीन सूचना देण्यात आल्या आहेत.

खुशखबर ! जमिनीसाठी ‘एन.ए.’ गरज नाही
मुंबई : शेतजमिनीवरील बांधकामासाठी ती बिगरकृषी म्हणजेच एन.ए ( नॉन अग्रीकल्चर) करून घेण्याची आता गरज नाही. राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठं बदल करण्यात आलाय. आता बिगर कृषी वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता संपली असून, एन.ए. (नॉन-अग्रीकल्चरल) परवानगी घेण्याची सुद्धा गरज राहणार नाही. बांधकाम आराखडा मंजुरी मिळाल्यास त्यालाच एन.ए. मानले जाईल. यामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. आता यापुढे एन.ए कर आकारला जाणार नाहीय. जमीन मालकांना फक्त एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ भरावे लागेल. या रकमेच्या भरपाईनंतर जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित केली जाऊ शकते.याशिवाय, सनद घेण्याची गरज देखील संपली आहे. बांधकाम आराखडा मंजुरी मिळाल्यास त्यालाच एन.ए. मानले जाईल. यामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया जलद, सोपी आणि पारदर्शक होईल.
यापूर्वी अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. तसेच एन.ए. मंजुरीसाठीही अनेक कागदपत्रांचा भार सहन करावा लागत असे. मात्र, महसूल विभागाने तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार आता बांधकाम आराखडा मंजुरी म्हणजेच एन.ए. मानली जाईल. यामुळे जमीन रूपांतर प्रक्रियेत महत्त्वाची सोपी सुधारणा झाली आहे. महसूल विभागासाठी ही कार्यपद्धती लागू झाली असून, राजपत्रात देखील ती प्रकाशित करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे जमीन रूपांतर प्रक्रियेत महत्त्वाची सुलभता येईल, त्याचबरोबर अकृषक कराचा त्रासही संपेल. शासनाच्या या निर्णयामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल, तसेच जमीन मालकांना वेळ वाचवून त्यांचा प्रशासनाचा त्रास कमी होईल. या बदलामुळे आता जमीन मालकांना एन.ए. मिळवण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षे वेटिंग करत बसण्याची गरज राहणार नाही, तर फक्त ‘रुपांतरण अधिमूल्य’ भरून ते आपली जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित करू शकतील.
मुंबई, ठाण्यात महिला राज
स्लग- मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे भाजपाच्या पहिल्या महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर
० ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर महापौर तर भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर
० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापौर-उपमहापौरांना दिल्या शुभेच्छा
० ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्याच दिवशी वॉकआऊट
स्वाती घोसाळकर
मुंबई : मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत आजपासून महिला राज सुरू झाले. मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे तर ठाणे महापालिकेत शर्मिला पिंपळोकर यांनी महापौरपदाची सुत्रे हाती घेतली. मुंबईतील महापौरपद हे भाजपासाठी विशेष होते. पहिल्यांदा मुंबई भाजपाचा महापौर झाला असून तो मान रितू तावडे यांना मिळाला.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शंकर घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली.
मुंबईत २२७ सदस्यीय सभागृहात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने ठाकरे गटाने महापौरपदासाठी उमेदवारच दिला नाही. विरोधी पक्षांनी उमेदवार न दिल्याने विशेष सभेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रितू तावडे यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला.
५३ वर्षीय रितू तावडे या घाटकोपर पूर्व मतदारसंघातून तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून त्यांनी २०१२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शिक्षण समिती अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले असून पाणीटंचाई, करवाढ, फेरीवाले, स्वच्छता या मुद्द्यांवर त्या आक्रमक राहिल्या आहेत. भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांनी नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे. उपमहापौर संजय घाडी हे दहिसर–मागाठाणे वॉर्ड क्रमांक ५ येथून निवडूण आले आहे. २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले. महायुती करारानुसार उपमहापौरपदसव्वा वर्षासाठी त्यांच्या ताब्यात राहणार आहे.
मुंबई महापालिकेत पहिल्याच
दिवशी ठाकरेंच्या सेनेचा राडा
मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपच्या रितू तावडेंनी महापौरपदाची शपथ घेत पदभार स्वीकारला तर दुसरीकडे काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. तर, ठाकरेंच्या नगरसेवकांनीही कागदे भिरकावत वॉकआऊट केला.
महापौर आणि उपमहापौर यांनी सभागृहात भाषण केले, यावेळी शिवसेना नेते उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहातून वॉकआऊट केला. किशोरी पेडणेकर यांनी शिंदेच्या नगरसेवकांची देहबोली विक्षिप्त होती, असा आरोप केला आहे.
कॉग्रेसच्या महिला नगरसेवकांना आज जमिनीवर बसावे लागले, आज आम्ही प्रदुषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलो होतो. मात्र आम्हाला बसायलाही जागा दिली नाही. भाजपच्या पहिल्या महापौर बसल्यानंतर आम्ही मात्र जमिनीवर होतो. देवाभाऊंची बहिण महापौराच्या खुर्चीवर आणि आमच्या बहिणी जमिनीवर होत्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नगरसेवक अश्रफ आजमी यांनी दिली.

लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार:
एपस्टीन फाईलवरून सभागृहात गोंधळ
नवी दिल्ली : एपस्टिन फाईलच्या दबावाखाली पंतप्रधान मोदी असून त्यामुळेच भाजपाने देश अमेरिकेला विकला असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आणि संसदेत एकच गदारोळ झाला. एपस्टिन फाईलचे पुरावे सभागृहाला द्या असे आव्हान भाजपाचे संसदीय मंत्री किरण रिजूजीने राहुल गांधीना दिले आणि तेच अडचणीत आले. रिजूजीने केलेल्या या चुकीचा पुरेपुर फायदा उठवत राहुल गांधी एफस्टिनचे पुरावे पटलावर ठेवण्याच प्रयत्न करताच सभापती असणाऱ्या जगदंबिका पाल यांनी आपण पुरावे मागितलेच नसल्याचे सांगून पुराव स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल. जेफ्ररी एपस्टिन याने लहान मुलींचे लैंगिक शोषण करीत जगभरातील अनेक दिग्गजांना त्यात सामिल करून घेतल्याचा आरोप आहे.
एपस्टिनसोबतच्या पत्रव्यव्हारात भाजपाचे मंत्री हरदिप पुरी आणि उद्योजक अनिल अंबानींचेही नाव आहे. राहुल गांधी यांनी आज या सगळ्यांवर हल्लाबोल केला.
भाजपाने भारत विकला आहे. तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची आई, भारतमाता विकली आहे, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, मला माहित आहे की पंतप्रधान सामान्य परिस्थितीत भारत विकणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी भारत का विकला? कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. त्यांनी त्यांचा गळा दाबला आहे. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती आपल्याला दिसते.असा आरोपही त्यांनी केला.
राहुल म्हणाले, केंद्र सरकारने व्यापार करारात गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे; यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही. इतिहासात पहिल्यांदाच, आमचे शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अमेरिकेची आयात ४६अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. आमचे शुल्क ३ वरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि त्यांचे शुल्क १६ टक्क्यांवरून शून्य झाले आहे.” महासत्ता राहण्यासाठी अमेरिकेला भारतीय डेटाची आवश्यकता आहे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचे हे अमेरिका ठरवेल का? राहुल म्हणाले, जर अमेरिकन लोकांना महासत्ता राहून त्यांच्या डॉलरचे रक्षण करायचे असेल, तर भारतीय डेटा महत्त्वाचा आहे. आपली लोकसंख्या ही एक ताकद आहे, त्या ताकदीचा वापर करण्यात मोदी अपयशी ठऱले असा आरोपही गांधी यांनी केला.

भाजपाप्रवेशानंतरही पनवेलच्या जे.एम.म्हात्रेना ईडीचा दणका
स्लग- एकुण ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
वनविभागाची जमीन चढ्याभावाने शासनाला विकून रग्गड पैसा जमवला
नवी मुंबई : पनवेलमधील प्रसिद्ध ठेकेदार जे एम म्हात्रे यांनी भाजपामध्ये प्रवेश करूनही त्यांना ईडीपासून सुटका मिळाली नाही. आजच्या १८ कोटींसह आतापर्यंत ईडीने जे.एम.म्हात्रेयांची एकुण ७० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
वनजमिनीचा अवैधरीत्या ताबा घेऊन ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करत मोबदला उकळल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने आज १८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, यामध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे.
जे एम म्हात्रे हे पनवेल मधील भाजपचे नेते असून त्यांचा मुलगा प्रितम म्हात्रे यांनी उरण विधानसभेतून शेतकरी कामगार पक्षाकडून आमदारकी लढवली होती. सध्या त्यांची सून पनवेल महानगरपालिकेत भाजपची नगरसेविका आहे.
सातबाऱ्यावर तसेच अधिकृत नोंदींमध्येही वनविभागाचे नाव असताना आरोपी जे एम म्हात्रे यांनी या नोंदींमध्ये फेरफार करून स्वतःचे नाव चढवले. शासनाचीच जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून या व्यवहारातून कोट्यावधी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.
ईडीच्या तपासात, या रकमेचा वापर करून म्हात्रे यांनी इतर मालमत्ता खरेदी केल्याचे तसेच काही कर्जांची परतफेड केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
हा मोबदला वनविभागाला देण्याबाबत वारंवार तगादा लावूनही आरोपींनी दुर्लक्ष केल्याने वनविभागाने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२४ गुन्हा दाखल केला होता.

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजय
मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत (२०२५-२६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सवर १४ धावांनी विजय मिळवला.
क्रॉस मैदान येथील युनायटेड क्रिकेटर्स ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या. त्यात विश्वास कृष्णाने (५८ चेंडूंमध्ये ८९ धावा) सर्वाधिक योगदान दिले. त्याला राजू मोरे (३४ धावा) आणि केतन पायनने (२५ धावा) चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल, इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स संघाला २० षटकांत २ बाद १३९ धावा करता आल्या. त्यांच्याकडून रितेश पुजारीसह (४४), अंकित शास्त्री (३९ धावा) आणि प्रेम मेहताने (३४ धावा) चांगली चुरस दिली. मात्र, केतन डांगेसह (२/१३) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अन्य गोलंदाज सरस ठरले.दुसऱ्या सामन्यात, युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाचा ९ विकेट राखून पराभव केला.
तत्पूर्वी, प्रमुख पाहुणे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उन्मेष खानविलकर, ओरिएंटल इन्शुरन्सचे डीजीएम मिलिंद तेंडुलकर आणि सुनीता इंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, प्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण, नितीन पाटील आणि तरुण बोस आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया – २० षटकांत ५ बाद १५३(विश्वास कृष्णा ८९ (५८ चेंडू), राजू मोरे ३४, केतन पायन २५; प्रभात टी. २/२६) वि. इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स – २० षटकांत २ बाद १३९(रितेश पुजारी ४४, अंकित शास्त्री ३९, प्रेम मेहता ३४; केतन डांगे २/१३). निकाल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजयी.
मुंबई पोर्ट ट्रस्ट – १७.१ षटकांत सर्वबाद ७८(काशिफ अन्सारी ३/१६, पार्थ दर्गी २/२, शुभम गिरी २/१३) वि. युनायटेड पटणी इंडस्ट्रीज – ६.५ षटकांत १ बाद ७९(यश धुरी ३२*, अरहान एम. २५). निकाल: युनायटेड पटणी इंडस्ट्रीज ९ विकेट राखून विजयी.
म्हाडा फ्लॅट प्रकरणी आरोपीस कल्याण सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
कल्याण : म्हाडा अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याच्या प्रकरणात डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक विष्णू चव्हाण यास कल्याण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. मुळे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. फिर्यादींच्या तक्रारीनुसार, सहआरोपीने म्हाडा अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन देत २०२० ते २०२४ या कालावधीत तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारली होती. मात्र आश्वासन पूर्ण न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने नमूद केले की, संबंधित गुन्हा सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेस पात्र असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा प्रकरणात अटक स्वयंचलितपणे करता येत नाही. आरोपीस बीएनएसएस २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती आणि त्याने तपासात सहकार्य केल्याचे सरकारी पक्षानेही नाकारले नाही. तसेच आरोपीचा कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसून त्याचा स्थिर निवास असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
तपास अटकेशिवाय होऊ शकतो, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीतर्फे अॅड. सागर संजय तांबे, अॅड. जीवन म्हात्रे व अॅड. शिवराम गावडे यांनी काम पाहिले.
