२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, ५ जूनला राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
0000000000

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा
मुंबई : मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धेचे आयोजन मुंबई खो-खो संघटनेने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे २७ ते ३० मे कालावधीत आयोजन केले आहे. आज खेळवण्यात आलेल्या पुरुष आणि महिला गटातील सामन्यांनी प्रेक्षकांना रोमांचित केले. पुरुष गटात सरस्वती स्पोर्ट्स क्लब, प्रबोधन क्रीडा भवन, वैभव स्पोर्ट्स क्लब, श्री सह्याद्री, श्री समर्थ व्यायाम मंदिर, ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर आणि विद्यार्थी क्रीडा केंद्र यांनी विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला. तर महिला गटात ॐ साईश्वर सेवा मंडळ आणि अमरहिंद मंडळ यांनी प्रभावी विजय नोंदवले. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब तोरसकर, सुरेंद्र विश्वकर्मा, प्रशांत पाटणकर, नरेंद्र कुंदर, पराग आंबेकर, नितीन पाष्टे, यांची उपस्थिती होती.
पुरुषांच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने समता क्रीडा भवनचा १६-८ (मध्यंतर १६-४) असा १ डाव व ८ गुणांनी धुव्वा उडवला. सरस्वतीकडून कुशांग वैश्य (३ मि. संरक्षण व ३ गुण), शुभम कांबळे (२.५० मि. संरक्षण व १ गुण), रहीस शेख (२.३० मि. संरक्षण व २ गुण) आणि विनय परीट (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी शानदार खेळ करत संघाचा विजय निश्चित केला. पराभूत समता संघाकडून प्रणय भाये (१.५० मि. संरक्षण), अनिकेत लोंढे (१ मि. संरक्षण व २ गुण) आणि प्रथमेश चौगुले (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी पराभवातही झुंजार खेळ केला.
दुसऱ्या पुरुष सामन्यात प्रबोधन क्रीडा भवन संघाने अमरहिंद मंडळाचा १९-१६ (मध्यंतर १०-७) असा ३ मि. राखून ३ गुणांनी पराभव केला. प्रबोधनकडून सुमेध तांडेल (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), मानव साळवी (२ मि. संरक्षण व १ गुण), हरेश मोरे (१.२०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) आणि शुभम शिंदे (३ गुण) यांनी संघाला विजय मिळवून दिला. तर अमरहिंदकडून गणेश साहू (२.१०, १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणय प्रधान (१.३० मि. संरक्षण व १ गुण) आणि सिद्धेश चोरगे (५ गुण) यांनी जोरदार लढत दिली, मात्र ती अपुरी ठरली.
महिलांच्या सामन्यात ॐ साईश्वर सेवा मंडळने समता क्रीडा भवनचा १०-४ (मध्यंतर १०-०) असा १ डाव व ६ गुणांनी दणदणीत पराभव केला. विजयी संघाकडून वैष्णवी परबने नाबाद ९ मिनिटांचे संरक्षण करत ४ गुण मिळवले. तसेच प्रांजल पाठक (३ मि. संरक्षण), रिया कदम (२.४० मि. संरक्षण व १ गुण) आणि विद्या मटकर (३ गुण) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. पराभूत समता संघाकडून सृष्टी कारेवडे (३ मि. संरक्षण), हर्षदा गुरव (१.१० मि. संरक्षण) आणि प्राप्ती (१ मि. संरक्षण) यांनी संघर्षपूर्ण खेळ केला.
महिलांच्या दुसऱ्या सामन्यात अमरहिंद मंडळने गोयंका स्पोर्ट्स क्लबचा १४-७ (मध्यंतर ५-३) असा ७ गुणांनी दणदणीत पराभव केला. अमरहिंदकडून रुद्रा नाटेकर (४.३०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), संजना कुडव (३ मि. संरक्षण व २ गुण), नताशा नतापे (१.२०, २.५० मि. संरक्षण व ४ गुण) आणि देविशा म्हात्रे (२ मि. संरक्षण व ५ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गोयंका स्पोर्ट्सकडून ज्ञानदा सावंत (२.३०, नाबाद १.३० मि. संरक्षण व २ गुण), वैदेही मोहिते (३, १ मि. संरक्षण व ४ गुण) आणि अर्शीन शेख (२.३० मि. संरक्षण) यांनी पराभवातही उल्लेखनीय खेळ केला.
पुरुष गटातील इतर सामन्यांचे निकाल
वैभव स्पोर्ट्स क्लबने ओम युवा स्पोर्ट्स क्लबचा १५-१३ (मध्यंतर ९-६) असा १ डाव व २ गुणांनी पराभव केला.
श्री सह्याद्री संघाने ॐ साईश्वर सेवा मंडळाचा २०-११ (मध्यंतर २०-५) असा १ डाव व ९ गुणांनी धुव्वा उडवला.
श्री समर्थ व्यायाम मंदिराने अमर कौर स्पोर्ट्स क्लबवर १३-७ (मध्यंतर १३-४) असा १ डाव व ७ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला.
ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराने यु बी स्पोर्ट्स क्लबचा १६-११ (मध्यंतर १६-४) असा १ डाव व ५ गुणांनी दणक्यात पराभव केला.
तर विद्यार्थी क्रीडा केंद्राने नंदादीप स्पोर्ट्स क्लबवर १४-९ (मध्यंतर १४-५) असा १ डाव व ५ गुणांनी मोठा विजय नोंदवला.
0000000
१५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा
मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) पुरुष एलिट गटात मध्य रेल्वेने मुंबई पोर्ट अथॉरिटीवर ३-२ असा निसटता विजय मिळवला. वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत मध्य रेल्वेकडून युवराज वाल्मिकी, जोगिन्दर एस., श्रेयस डी. यांनी प्रत्येकी एक गोल केला. प्रतिस्पर्धी मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून तल्ला राजू आणि रामा आरने गोल केला. त्यापूर्वी, १६ वर्षांखालील मुलांच्या गटात डॉन बॉस्को एससीने इंडिपेंडेंट एससी २-० असे हरवले. विजयी संघाकडून ऋग्वेद कोटकर, अर्णव खोटने गोल केले.
निकाल – फ्युचर चॅम्प्स: डुरुएलो एससी १ (आर्या जाधव) विजयी वि. गुरुनानक देव अकादमी ०.
१६ वर्षांखालील मुले: डॉन बॉस्को एससी २ (ऋग्वेद कोटकर, अर्णव खोट) विजयी इंडिपेंडेंट एससी 0.
एलिट पुरुष: सेंट्रल रेल्वे ३ (युवराज वाल्मिकी, जोगिंग्डर एस., श्रेयस डी.) विजयी वि. मुंबई पोर्ट अथॉरिटी २ (तल्ला राजू, रामा आर.). सीटीसी ‘अ’ 5 (गोविंद नाग २, देविंदर वाल्मिकी, मनप्रीत सिंग, आकाश राय) विजयी वि. रिपब्लिकन एससी 0. व्हेटरन्स पुरुष: मुंबई कस्टम्स २ (लक्ष्मण राव, लिंकन टेट्स) विजयी वि. मुंबई पोर्ट ट्रस्ट 0.
0000000
हरियाणाचा हर्षल उपांत्य फेरीत
मुंबई : अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाच्या हर्षल राणाने दमदार झुंजार खेळ करत कर्नाटकच्या आर्यमन सिंगला चार गेममध्ये पराभूत केले. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टमध्ये गुरुवारी दोन १५ वर्षीय प्रतिभावान खेळाडूंमध्ये वर्चस्वासाठी तीव्र चुरस पाहायला मिळाली. गेल्या वर्षीचा ज्युनियर राष्ट्रीय विजेता हर्षल पहिला गेम हरला. पण डावपेचात्मक खेळ करत त्याने पुढील तीन गेम जिंकताना ६-११, ११-६, १२-१०, ११-९ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंपैकी, श्रेयांश झा याने प्रदीपसिंग राठोडचा ११-६, १२-१०, ११-३ असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित अगस्त्य राजपूतने अगस्त्य बन्सलवर ११-८, ३-११, ११-९, ११-३ अशी चार गेममध्ये मात केली.
निकाल (१३ वर्षांखालील मुली – उपांत्यपूर्व फेरी): १-ईशा शेळके विजयी वि. सीरत घुमन ११-२, ११-5, ११-4; श्रिया माहेश्वरी विजयी वि. रुही लोढा ११-२, ११-२, ११-5; अक्षरा माखिजा विजयी वि. अरणा राव ११-७, ११-३, ११-८; २-आध्या ग्रोव्हर विजयी वि. सानवी तिडके ११-9, १0-१२, ११-9, ११-६.
१३ वर्षांखालील मुले: झेन अली विजयी वि. निर्वाण उप्पल १0-१२, ११-८, 9-११, ११-4, ११-३; निर्मान चमरिया विजयी वि. निर्वाण पारिख ११-4, 5-११, ११-9, ११-5; रिदान गुप्ता विजयी वि. कृशिव मित्तल ११-७, ११-5, ११-१; आर्यन एस के. विजयी वि. अरित्रा देबनाथ ११-9, ११-८, ११-७.
१५ वर्षांखालील मुली : शनाया रॉय विजयी वि. समीरा गोरसिया ११-६, ११-4, ११-9; नंदिकाश्री कलैवनन विजयी वि. रायशा नाईक ११-१३, ११-८, ११-5, १0-१२, ११-9; २-त्रिशा शहा विजयी वि. एकम घुमन ११-२, ११-5, 5-११, ६-११, ११-२. मुले: रुआन राम तडंकी विजयी वि. आर्यन प्रभू ११-5, ११-६, 4-११, १२-१0; विनय शिंदे विजयी वि. ऋषभ श्याम ११-६, 5-११, ११-9, ८-११, ११-६; फरीद अंद्राबी विजयी वि. प्रभू बाजोरिया ११-9, ११-5, ११-६; अयान धनुका विजयी वि. २-वेदांत अग्रवाल ११-4, ११-६, ३-११, ११-६.
१७ वर्षांखालील मुली : वसुंधरा नांगरे विजयी वि. आरवी रैना ११-१, ११-5,११-5; फबिहा नफीस विजयी वि. अहाना सिंग 9-११, ११-६, 9-११, ११-३, ११-८; देवश्री अरोरा विजयी वि. अनुष्का जोहरी ११-८, ११-5, १4-१२; २-आरिका मिश्रा बीटी अमायरा मेहता ११-4, ११-६, ७-११, ११-२;
मुले : १-श्रेयांश झा विजयी वि. ११-६, १२-१०, ११-३ प्रदीपसिंग राठोड; हर्षल राणा विजयी वि. आर्यमन सिंग ६-११, ११-६, १२-१0, ११-9; सहर्ष शहारा विजयी वि. इंद्रांशसिंग राकेश बडगुजर ११-5, ११-4, १२-१0; २-अगस्त्य राजपूत विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-८, ३-११, ११-9, ११-३.
000000000

मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात कॅरमप्रेमी स्व. दशरथ चव्हाण स्मृती बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरचा शुभारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, क्रीडाप्रेमी सुनिल नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर उपक्रमाला परिसरातील शालेय मुलामुलींचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
आयडियल शालेय क्रीडा चळवळीमधील कॅरम खेळासाठी नवोदित कॅरमपटूचा सहभाग वाढविण्यासाठी गेली दशकभर विविध मोफत कॅरम उपक्रमाद्वारे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयडियल ग्रुप कार्यरत आहे. शालेय डीएसओ कॅरम स्पर्धेत चँम्पियन कॅरम बोर्डवर खेळण्याचा सराव नसल्यामुळे बहुतांश शालेय खेळाडूंना यथोचित कामगिरी करतांना अडचणी निर्माण होतात. म्हणून विख्यात राष्ट्रीय कॅरमपटू सुहास कांबळी यांनी पुण्यात स्थायिक होण्यापूर्वी केलेल्या मार्गदर्शनाची मोफत कॅरम सेंटर माध्यमातून पूर्तता करण्याचा आयडियल ग्रुपचा मानस आहे. कॅरम सेंटरप्रसंगी शालेय मुलामुलींना मार्गदर्शक सचिन शिंदे यांनी प्राथमिक सराव कसा करावा, स्ट्रायकरवर नियंत्रण, बोटांची पकड, कॅरम खेळताना बसण्याची पद्धत आदीबाबत माहिती दिली तर आयडियल ग्रुपचे प्रमुख लीलाधर प्रमुख नियमांची माहिती दिली.
00000000
कल्याण : महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ दिनांक २८ मे ते ३१ मे २0२६ रोजी मडगाव गोवा येथे होणाऱ्या १६व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धेकरता दिनांक २६ मे व २७ मे रोजी उल्हासनगर महानगरपालिका चॉकबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशनच्या अंतर्गत राज्यस्तरीय सराव शिबिराचे आयोजन एसएचएम महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या गणवेश वाटपाच्या निमित्ताने समाजसेवक हसन शेख, महाराष्ट्र राज्य प्रभारी सचिव जयवंत बोभाटे, खजिनदार राहुल अकुल व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच हे सराव शिबिर घेण्याकरिता एसएचएम महाविद्यालयाच्या किरण चिमनानी, ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशन सचिव संदीप नरवाडे, उल्हासनगर महानगरपालिका चॉकबॉल असोसिएशन सचिव निलेश आरेकर, ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशन सहसचिव विक्रम काळे यांनी अथक मेहनत घेतली.
000000
– रंगमंचावर आजही हाताने तयार होतात पेंटिंग बोर्ड
कल्याण : आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक काम संगणक आणि ग्राफिक डिझाइनद्वारे काही क्षणांत पूर्ण होते, तिथेच रंगमंचावर ब्रश आणि रंगांच्या माध्यमातून हाताने पेंटिंग करण्याची जुनी परंपरा आजही टिकून आहे. ही परंपरा चार दशकांहून अधिक काळ जपून ठेवली आहे पेंटर हेमंत यादगिरे यांनी. हेमंत यादगिरे यांच्या मते, ही कला हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी रंगमंच, गणेशोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडप सजावट व बोर्ड पेंटिंगचे काम आजही हातानेच केले जाते. एकेकाळी त्यांच्या हाताखाली १५ ते २० जण काम करत होते. ते सांगतात की, पूर्वी राजकीय पक्षही पूर्णपणे हाताने केलेल्या पेंटिंगवर अवलंबून होते. नेत्यांची मोठमोठी चित्रे देखील ब्रश (तूलिका) आणि रंगांच्या माध्यमातून तयार केली जात होती. सण-उत्सवांच्या काळात कामाची प्रचंड मागणी असायची. मात्र संगणक युग सुरू झाल्यानंतर आणि फ्लेक्स प्रिंटिंगचा प्रसार झाल्यामुळे या पारंपरिक कलेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हाताने पेंटिंगचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
तरीही कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या नाट्यप्रयोगांचे बोर्ड आजही ब्रश आणि रंगांच्या साहाय्याने हातानेच तयार केले जातात. त्यामुळे ही लुप्त होत चाललेली कला काही प्रमाणात तरी जिवंत राहिली आहे. हेमंत यादगिरे यांचे म्हणणे आहे की, ही कला आपली सांस्कृतिक ओळख आहे आणि ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ते आजही या रंगमंचावर तूलिका आणि रंगांच्या कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहेत.

मुंबई : मुंबई-मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त माता रमाई स्मारक वरळी मुंबई येथे बुध्द वंदनासह अभिवादन सभेमधून मानवंदना त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना हजारोंच्या संख्येत उपस्थितीत आंबेडकरी आनुयाकडून देण्यात आली. सदर प्रसंगी माता रमाई आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर दर्शनाताई भिमराव आंबेडकर व रिपब्लिकन सेना सरसेनापती सन्माननीय आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब, माजी समाज कल्याण राज्यमंत्री, आमदार विजय गिरकर, माता रमाई स्मृती प्रतिष्ठान रजि.वरळी मुंबई अध्यक्ष अमोल सांळुखे महासचिव महेंद्र सोनावणे, उपाध्यक्ष सिध्दार्थ खंडागळे, सचिव प्रकाश डोळस, कोषाध्यक्ष विशाल गायकवाड, वैभव मोहिते, आदिच्या परिश्रमातून अभिवादन कार्यक्रम भरगच्च संपन्न झाला.सदर वेळेस आंबेडकरी चळवळीतील भिमसैनिक समाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सर्वश्री प्रतिक कांबळे यांच्यासह समाजभूषण बौध्दाचार्य सो.ना.कांबळे,नागसेन कांबळे,रवि गरुड, संजय भालेराव, समाजभूषण योजना ठोकळे,शांतु डोळस, बौद्धाचार्य संजय ओव्हाळ, तुषांत रुके, श्रीकांत भिसे,किरण निकम, रमाकांत जाधव, अॅड अजय कुमार भोसले,मनोज मर्चंडे, दिपक थोरात, विनोद माने, अमोल निकाळजे, आदि आंबेडकर चळवळीतील मान्यवरांकडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केल्याचे मुक्त पत्रकार समाजभूषण बौध्दाचार्य सो.ना.कांबळे गुरुजी यांनी कळविले आहे.
पनवेलचे महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन
पनवेल :“ज्यांनी आपल्याला प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान शिकवला, तसेच जगण्याची शाश्वत अशी जीवनमूल्ये दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरच आज संपूर्ण देश प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ही घोडदौड सुरू आहे, असे प्रतिपादन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शहरातील सावरकर चौक येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना महापौर नितीन पाटील म्हणाले की, सावरकरांचे जीवन आणि त्यांचे विचार प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेली जीवनमूल्ये आजही तितकीच प्रासंगिक असून, देशहितासाठी ती अंगीकारणे गरजेचे आहे. कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महापौरांनी उपस्थितांचे आभार मानले. “आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये या कार्यक्रमाला एकत्र जमलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्वांना सावरकर जयंतीच्या पुनश्च शुभेच्छा देऊन ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, गणेश कडू, नगरसेवक अजय बहिरा,सुमित झुंजारराव, प्रिती जाॅर्ज, स्नेहल ढमाले, केशवस्मृती पतपेढीचे चेअरमन अमित ओझे, अभिषेक पटवर्धन, भाजपचे शहर मंडळ उपाध्यक्ष केदार भगत, सरचिटणीस रूपेश नागवेकर, चिन्मय समेळ, अनिमेष ओझे, ॲड.प्रफुल्ल म्हात्रे, पतपेढीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र गोडबोले, सुषमा भिडे, विनीता जोशी, स्वाती कोळी, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विशाल सावंत, केशवस्मृती पतपेढीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
