
दिवा: दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ असे सांगत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. मात्र, अनधिकृत व बोगस शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर तसेच त्यांच्या भविष्यातील संधींवर विपरीत परिणाम होत असल्याची खंत अश्विनी केंद्रे यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी दिवा शहरातील मॉडर्न डिस्कवरी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेत भरले गेले नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित शाळांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याशिवाय, दिवा शहरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने अधिक शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला गोरखधंदा तात्काळ बंद करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवावा, असे केंद्रे यांनी नमूद केले. या प्रकरणी तातडीने कारवाई करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सचिव अश्विनी अमोल केंद्रे व उपखजिनदार अनिल रामपाल मौर्य यांच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
ठाणे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी संस्था) आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, थोर देशभक्त आणि प्रेमधर्माचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
याप्रसंगी ‘पूज्य साने गुरुजी – कर्मयोगी संत’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिद्ध व्याख्यात्या औसा लातूर येथील आझाद महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. कमलताई ठकार यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान दिले त्यावेळी त्यांनी हे विचार मांडले. या कार्यक्रमात ‘कथाकथन-तंत्रमंत्र व माझ्या बालसाहित्याचा प्रवास’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ बालसाहित्यिक व सुप्रसिद्ध कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. विद्या प्रभू यांनी त्यांची मुलाखत घेताना बालसाहित्याची निर्मिती, कथाकथनाची कला आणि मुलांच्या संस्कारक्षम जडणघडणीत साहित्याचे महत्त्व या विविध विषयांवर प्रश्न विचारले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी आणि साने गुरुजी बालविकास मंदिराचे अध्यक्ष यशवंतराव क्षीरसागर होते. यावेळी साने गुरुजी बालविकास मंदिर मासिकाच्या स्मृतिदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख कार्यवाह रविंद्र शं. गावडे (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय) आणि प्रमुख कार्यवाह नरेश सावंत (साने गुरुजी बालविकास मंदिर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. साने गुरुजींच्या विचारांचा, प्रेम, सेवा आणि संस्कारांचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला. जीवन यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रसाद महाडीक यांनी केली.
०००००००००
‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांचे महापौर, आयुक्तांना पत्र
कल्याण : आगरी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने ४००-५०० चौरस फूट जागेत १० हजार पुस्तके, डिजिटल ऑडिओ स्टेशन, ई-लायब्ररी आणि स्मार्ट क्लासरूमसह ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी याबाबत केडीएमसी महापौर, आयुक्तांना पत्र दिले आहे.
कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर आणि रायगड हा संपूर्ण भौगोलिक पट्टा ऐतिहासिकदृष्ट्या आगरी आणि कोळी समाजाचे मूळ वसतिस्थान आहे. या भूमीच्या विकासात आणि शहरीकरणात इथल्या मूळ भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिले आहे. परंतु, झपाट्याने होणाऱ्या या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आमची मातृभाषा असलेली ‘आगरी बोली’, आमची लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि आमचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत चालला आहे.
कोणत्याही समाजाची भाषा जिवंत ठेवायची असेल, तर केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून न राहता तिचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दस्तावेजीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याच उदात्त हेतूने, ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने आम्ही आपणास एक नावीन्यपूर्ण ‘अत्याधुनिक डिजिटल आणि ऑडिओ आगरी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी अथवा समाजमंदिरात अंदाजे ४०० ते ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मर्यादित जागेत ‘मोबाईल कॉम्पॅक्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून १० हजार पुस्तकांचे संकलन, आगरी साहित्यासाठी एक ई-लायब्ररी, लुप्त पावत चाललेल्या ‘धवला’ गीतांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल ऑडिओ स्टेशन’ आणि भावी पिढीला या भाषेची ओळख करून देण्यासाठी एक ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचे अत्यंत सूक्ष्म तांत्रिक नियोजन सविस्तर प्रकल्प अहवालात मांडले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा धोरण २०२४’ आणि ‘सांस्कृतिक थोरण २०२४’ मध्ये नमूद केलेल्या बोलीभाषा संवर्धनाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे केडीएमसीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एका ‘संस्कृती-रक्षक’ महानगरपालिकेच्या रूपात प्रस्थापित होईल.
महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘सिटीझन सेंट्रिक’ कारभार राबवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला हा डिजिटल प्रकल्प अत्यंत पूरक ठरणारा आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून या ग्रंथालयासाठी जागा आणि आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था आणि ब-बोली च्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००
ठाणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन आणि विकासाला समर्पित १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलच्या वतीने विद्यासागर विद्यालय, ठाणे येथे विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सीएसएल ठाणे शहरचे विनोद टीकमानी यांची विशेष उपस्थिती होती.
यासाठी कृष्णाया भुजबळ, रोहित कवे, सचिन कुटे, अमोल गायके, गणेश लोकरे, अवधूत कदम, पूजाताई गंद्रे, स्वाती राणे, अर्चना बाळसराफ, आद्याक्षरा म्हात्रे, प्रणाली गांगुर्डे विशेष परिश्रम घेतले.विकास प्रदर्शनीच्या माध्यमातून केंद्र सरकारने गेल्या बारा वर्षांत पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या दिशेने केलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रदर्शनीला नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलताना भाजप कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या विकासात्मक कार्याची माहिती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
००००००
शिवसेना शिंदे व ठाकरे गट आक्रमक
कल्याण : कल्याणमध्ये कचरा वेचून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. महेश गायकवाड म्हणाले, “ही घटना कल्याण-डोंबिवलीसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आम्ही सर्वतोपरी मदत करू.”
दरम्यान, ठाकरे गटाने या घटनेवरून सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे अॅडव्होकेट नीरज कुमार यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. “कल्याण पूर्व भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर नेते आणि लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात येतात, मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “लाडक्या बहिणींच्या नावाने राजकारण केले जाते, पण महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते,” अशी टीकाही त्यांनी केली. या घटनेनंतर कल्याणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डोंबिवली, २१ जून : फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने उल्हासनगर येथे नवीन फोर्टिस मेडिकल सेंटर सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सुलभ केली आहे. या केंद्रामुळे उल्हासनगर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा आता त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत. या केंद्राचे उद्घाटन बाबा साई कालिराम साहेबजी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. एस. नारायणी, बिझनेस हेड – फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्र, डॉ. विशाल बेरी, फॅसिलिटी डायरेक्टर – फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड तसेच फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि कल्याण येथील वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.
उल्हासनगरमधील हे मेडिकल सेंटर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले असून ते बहुविशेषज्ञ बाह्यरुग्ण केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच सहा खाटांचे स्वतंत्र डायलिसिस युनिट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित मूत्रपिंड उपचार घेणाऱ्या आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे केंद्र फोर्टिस हेल्थकेअरच्या एकात्मिक वैद्यकीय नेटवर्कशी जोडलेले असल्याने रुग्णांना विविध तज्ज्ञ शाखांमधील समन्वित उपचारांचा लाभ मिळणार आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णांना फोर्टिस हॉस्पिटल कल्याण आणि मुलुंड येथे प्रगत उपचारांसाठी सहजपणे हलविण्याची सुविधाही उपलब्ध असेल. भविष्यात येथे ऑन्कोलॉजी डे-केअर अर्थात केमोथेरपी सेवा सुरू करण्याची योजना असून त्यामुळे कर्करोग रुग्णांनाही स्थानिक पातळीवर उपचार मिळणे शक्य होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बाबा साई कालिराम साहेबजी यांनी उत्तम आरोग्य हा आनंदी आणि प्रगत समाजाचा पाया असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि नियमित उपचारांची गरज असलेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत उल्हासनगरमध्ये सुरू झालेले हे मेडिकल सेंटर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांचा प्रवासाचा ताण कमी करण्यास मदत करेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. एस. नारायणी यांनी सांगितले की, शहरभर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या फोर्टिसच्या वचनबद्धतेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बदलत्या आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि सर्वसमावेशक उपचार नागरिकांच्या जवळ पोहोचविणे आवश्यक आहे. आगामी काळात ऑन्कोलॉजी डे-केअर सेवा सुरू करून या प्रदेशातील वाढत्या आरोग्य गरजांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगरमधील नवीन मेडिकल सेंटरची स्थापना ही फोर्टिस हेल्थकेअरच्या महानगरांपलीकडे जाऊन आरोग्यसेवा विस्तार करण्याच्या धोरणाचा भाग असून, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन आणि बहुविशेषज्ञ उपचार नागरिकांच्या घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
आरती परब
दिवा : एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात २० जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच मन एकाग्र व शांत राहते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने आणि प्राणायाम करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
अशा प्रकारे एस. एम. जी. विद्यामंदिर प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन आनंददायी, उत्साहपूर्ण आणि आरोग्यदायी संदेश देणाऱ्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
अशोक गायकवाड
रत्नागिरी : “योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असून संपूर्ण जगाने याचा स्वीकार केला आहे. योगामुळे आरोग्याला भरपूर फायदे होत असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथे केले.जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ‘मेरा युवा भारत’, आयुष विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, ‘आज जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जपानपासून युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेपर्यंतच्या सर्वच देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करावा’. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे म्हणाल्या, ‘भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये शतकानुशतके योगाभ्यास केला जात असून, याचे मूळ स्थान भारतीय उपखंडातच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली. एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करतो. मात्र, आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून ज्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली आहे, त्यांनी शरीराची लवचिकता आणि उत्तम स्वास्थ्यासाठी हा अभ्यास नियमित व कायमस्वरूपी सुरू ठेवावा.’ या कार्यक्रमात योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक, योग शिक्षक, पालक यांच्यासह पटवर्धन कॉलेज, मिस्त्री हायस्कूल, एम. एस. नाईक हायस्कूल व फाटक हायस्कूलचे विद्यार्थी, तसेच एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट गाईडचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००
दिव्यातील धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांचा पाठपुरावा
दिवा, दि. २१ जून (आरती परब): महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला पोलीस गृहअग्रीम कर्ज (DG Loan) प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. शासनाने सुमारे १,७६८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याने राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या सोमवारी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, DG Loan संदर्भातील समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिव्यातील धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे, पोलीस बॉईजचे प्रदीप वाघमारे तसेच राज्यभरातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध निवेदने, पाठपुरावा आणि संघटित प्रयत्नांमुळे हा विषय चर्चेत राहिला आणि शासनाचे लक्ष वेधण्यात यश आले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या गृहस्वप्नांशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या विषयासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शासनाकडे हा विषय सातत्याने मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर न्याय मिळाला आहे.
या निर्णयामुळे घरकुलासाठी आर्थिक मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्याने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो एक मोठे पाऊल असल्याची भावना पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
नाल्यातील कचरा जैसेथे असल्याने पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
कल्याण : कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५० – ५० हाँटेलच्या मागून वाहणाऱ्या नाल्यामध्यील कचरा जैसे थे असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसत आहे. या नाल्यामध्यील कचरा न काढल्याने तुंबापुरीचा फटका सखल भागातील घरांना बसु शकतो यांस जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५०- ५० धाबा मागील बाजु एकवीरा अपार्टमेंट शेजारील नाला अद्यापही देखील कचरा आणि प्लास्टिक पिशव्या यांच्या गर्तेत सापडला असून यंदा १९ जून ओलांडलेले असले तरी पावसाचा तपास नाही. अशी परिस्थिती असताना लाखो रूपये नालेसफाईसाठी प्रशासन खर्च करते पंरतु ठेकेदाराने या नाल्यासंर्दभात दुर्लक्ष का केले आहे. की,पावसाची वाट पाहत पहिल्या पावसात नाल्यातील कचरा वाहून जाण्याची वाट पाहत आहे, असा आरोप यानिमित्ताने होत आहे.
नाल्यातील कचरा सफाई तसेच तळापर्यंत गाळ न काढल्यास या नाल्याच्या तुंबापुरीमुळे परिसरातील सखल भागातील घरामध्ये पहिल्या पावसात घरामध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता तरी डोळसपणे या नाल्याची सफाई कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यांच्याशी संपर्क साधला असता, या नाल्याची यापूर्वी सफाई केली होती, नाल्यात अद्यापही देखील कचरा आणि स्वच्छता नीट झाली नसेल तर, नाल्याची स्वच्छता संदर्भीत एजन्सी मार्फत करून घेणार असल्याचे सांगितले.
००००००००००
