5 March Bitambatmi All pages

Open Book

रुस्तमजी अझियानोमध्ये रंगली शिस्तबद्ध आणि इको-फ्रेंडली रंगपंचमी

ठाण्यातील रुस्तमजी अझियानो संकुलात यंदाची २०२६ सालची धुळवड मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. अझियानो उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रंगपंचमी सोहळ्याने रहिवाश्यांचे मन जिंकले.

यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलांची रंगपंचमी आणि इको-फ्रेंडली हर्बल रंगांचा वापर. ढोल-ताशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डीजेच्या तालावर जवळपास १९०० रहिवाशांनी एकत्रित थिरकत रंगोत्सवाचा आनंद लुटला. मानवनिर्मित शॉवर फवाऱ्यांच्या पावसात रंगलेला आनंद आणि लहानग्यांसाठी खास पाण्याच्या डबक्याची व्यवस्था यामुळे वातावरण आणखी रंगतदार झाले.

संपूर्ण कार्यक्रम सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी आयोजकांनी विशेष खबरदारी घेतली होती. ठिकाणी अँम्ब्युलन्स, व्हीलचेअर, फर्स्ट-एड बॉक्स, मदतनीस तरुण, आवश्यक संपर्क क्रमांक तसेच सिक्युरिटी गार्ड तैनात ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रहिवाश्यांनी निर्धास्तपणे उत्सवाचा आनंद घेतला.

कार्यक्रमानंतर रहिवाश्यांसाठी आकर्षक खाऊगल्लीची व्यवस्था करण्यात आली होती. विविध चटपटीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत उत्सवाची सांगता करण्यात आली.

अझियानो उत्सव मंडळाच्या तरुणाईने एकत्रितपणे केलेले नियोजन, रहिवाश्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि एकात्मतेची भावना यामुळे हा रंगोत्सव अविस्मरणीय ठरला. या सुंदर आणि सुरक्षित आयोजनाबद्दल मंडळाच्या संपूर्ण टीमचे तसेच रुस्तमजी अझियानो संकुलातील (E ते K) सर्व रहिवाश्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनंदिन वापरातील शालेय गणित’ पुस्तक प्रकाशित

कल्याण : रा.फ.नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोपरखरणे येथे ‘स्कूल मॅथेमॅटिक इन डेली लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन श्रमिक शिक्षण मंडळ, संस्था अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मराठी आणि इंग्रजी  भाषेत करण्यात आले.

या प्रसंगी या ग्रंथाचे लेखक प्रा. राजेंद्र रोकडे यांचा सत्कार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे, गुरुवर्य इ.ए. पाटील, मुंबई विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख भाऊसाहेब देसले, डॉ.नरेंद्रकुमार दसरे आणि सर्व विभागीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होता. संदीप नाईक यांनी या पुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उपयोगी येईल याबद्दल सांगितले व शिक्षण क्षेत्रातील प्रवासाबरोबर त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आलेले प्रश्न आणि गणिताचा आजच्या शिक्षण प्रवाहात वापर या पुस्तकातून सुरेखपणे मांडल्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख भाऊसाहेब देसले यांनी शिक्षण क्षेत्रातील राजेंद्र रोकडे सरांच्या सेवेतील ३३ वर्षातील आलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यासाठी त्यांनी केलेले वाचन लेखन आणि या विषयावर तयार केलेले पुस्तक याबद्दल मौलिक माहिती दिली.  डॉ.नरेंद्रकुमार दसरे यांनी या पुस्तकाचा दैनंदिन जीवनात विद्यार्थी कसे उपयोग करून घेतील याबद्दल सांगितले. ज्येष्ठ मार्गदर्शक इ.ए. पाटील यांनीही विविध, आध्यात्मिक आणि प्रासंगिक दाखले देऊन माहिती सांगितली. मुख्याध्यापक रवींद्र पाटील आभार प्रदर्शन यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व संस्था शिक्षक आणि प्राचार्य प्रताप महाडिक, मुख्याध्यापिका राजश्री यादव, मुख्याध्यापिका सुमती सुबैया, मुख्याध्यापिका सीमा म्हात्रे, मुख्याध्यापिका इलेन फर्नाडीझ, उपमुख्याध्यापिका चारुशीला चौधरी, पर्यवेक्षिका नसीम कुरणे हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालनपल्लवी जाधव तर रांगोळी रेखाटन सुजाता म्हात्रे यांनी केले.

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी

विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांची मागणी

मुकुंद रांजणे

माथेरान : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळ यांच्या माथेरान पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा अभय योजना लागू करण्याबाबत नगराध्यक्ष यांनी  पुढाकार घेऊन संबंधित अधिकारी वर्गाकडे शिफारस करावी या आशयाचे निवेदन विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांनी दि. ४ रोजी सादर केले आहे.

माथेरानचे नागरिक,लॉज धारक, हॉटेल्स व्यावसायिक,व्यापारी यांची मोठया प्रमाणावर पाणी बिलांची थकबाकी असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी वारंवार पाणी कनेक्शन कट करण्यासाठी तगादा लावत असतात.सध्या पर्यटन हंगाम खूपच मंदीचा असून पाणी बिलांवर मोठया प्रमाणात डीपीसी ( delayed pement charges ) आकारण्यात आले असून सदरचे डीपीसी शुल्क माफ होण्यासाठी नगराध्यक्षांनी स्थानिक आमदारांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे पाणीपट्टी वरील डीपीसी रद्द होणेकामी अभय योजना लागू करण्याची शिफारस करावी जेणेकरून स्थानिकांची आर्थिक बचत होऊन समाधानाचे वातावरण निर्माण होईल असे विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावर नगराध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिकांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन सादर करताना नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, गिरीश पवार आदी उपस्थित होते.

कल्याणमध्ये “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन

कल्याण : रविवार दि.8 मार्च रोजी महिला दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम यांच्या संयुक्त विद्यमाने “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे.

हि मॅरेथॉन स्पर्धा तीन गटात संपन्न होणार आहे. यामध्ये (अ) सकाळी 6 वा. 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा,  (ब) सकाळी 7 वा. 5 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा आणि (क) सकाळी 7.45 वा. 3 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होईल. या तिन्ही स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषासाठी एक पारितोषिक, सर्वोत्तम थीम्ससाठी एक पारितोषिक, सर्वोत्तम ग्रुप थीमसाठी एक पारितोषिक आणि विजेत्यांसाठी एक, दोन, तीन अशी पारितोषिके राहतील. या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग कल्याण पश्चिमेतील गांधारे ब्रीज मार्गे रिंग रोड हा राहील.

महानगरपालिकेतर्फे विद्युत, यांत्रिकी अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत व मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव या स्पर्धे करीता नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून, कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील आणि महापालिकेत कार्यरत असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी “रण रागिणी मॅरेथॉन स्पर्धेत” सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा

कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळात राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला. परिमंडळ कार्यालयात उपस्थित लाईनमन (जनमित्र) यांना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी संबोधित केले. जनमित्र हा महावितरण कंपनीचा ग्राहक आणि अधिकारी यांच्यातील संपर्क साधणारा दुवा आहे. एका अर्थाने आपण महावितरणच्या व्यवस्थेतील मुख्य कणा आहे. असे उदगार संबोधित करताना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी जनमित्रांचे कौतुक केले.

या वेळी उपस्थित सर्व जनमित्रांना सुरक्षा उपकरणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली संतोषी माता रोड, प्रेम ऑटो चौक, खडकपाडा सर्कल, साई चौक, वाणी विद्यालय, संदीप हाॅटेल, बिर्ला कॉलेज, पौर्णिमा चौक मार्गे परिमंडळ कार्यालयात परत आली. तसेच कल्याण मंडळ १ व कल्याण मंडळ २ चा लाईनमन दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी सुरक्षित कामाबाबत चित्रफीत दाखविण्यात आली व सुरक्षा शपथ घेण्यात आली.

जनमित्रांसाठी पी. अशोक यांनी हसरी मैफिल हा हास्य विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित जनमित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिक्षक अभियंता अनिल थोरात, महेश अनचिनमाने, सुशील पावसकर सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, उपस्थित होते.

या शिवाय कल्याण परिमंडळात अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली, कल्याण पूर्व, बदलापूर, उल्हासनगर, नालासोपारा, वसई, विरार येथील कार्यालयात देखील राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला.

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. ४ : यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह कबड्डी, कुस्ती, हॉलीबॉल व खो-खो या खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. राज्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राष्ट्रीयस्तरावर चमक दाखविण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्राची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राज्याला भविष्यात अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

चतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान;

मी भारतीय चा २५० वा प्रयोग

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : परदेशात जाऊन पैसे कमवायचे आणि विदेशात स्थायिक होऊन कुटुंबियांना भारतातच खितपत पडू द्यायचे, कुणी वृद्धाश्रमात तर कुणी कुठे,  अशा विदारक परिस्थितीवर कोरडे ओढणाऱ्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे यशस्वी निर्माते, अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी साहिर लुधियानवी फौंडेशनतर्फे मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘बलराज साहनी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी ऑस्कर इतका महत्वाचा आहे, अशी भावना रविंद्र देवधर यांनी व्यक्त केली. पुरस्कार सोहळ्यानंतर रविंद्र देवधर आणि ऋषिकेश रानडे यांनी ‘मी भारतीय’ चा २५०वा प्रयोग सादर केला. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर  बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश टिळेकर, सचिव शिवानी चिलका, विश्वस्त सुचेत्रा देशपांडे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांना मरणोत्तर महर्षि दधिची सन्मान.

मुंबई :  अंबरनाथ येथील अध्यात्ममार्गी कृष्णाजी विश्वनाथ केतकर उपाख्य प्रसाद महाराज यांची सख्खी भाची आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कट्टर अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांनी केलेल्या देहदानाबद्दल केंद्रीय मंत्रालयातर्फे इंदुर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात स्व. श्रीमती चंद्रकला पाठक यांना   ‘महर्षि दधिची सन्मान’ हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. स्व. श्रीमती चंद्रकला पाठक यांचे चिरंजीव अभय पाठक आणि स्नुषा सौ. विद्या अभय पाठक यांना केंदीय  वाहतुक मंत्री हर्षवर्धन मल्होत्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.  देहदान केलेल्यांचा मध्य प्रदेश सरकारतर्फे सन्मान करण्यात येतो. पुरस्कार सन्मानित व्यक्तींना ‘गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो. देहदान हेच मोठे सामाजिक कार्य आहे हा कार्यक्रम गेल्या २१ वर्षांपासून सुरू आहे पण ह्यावर्षी केंद्र सरकारने दखल घेतली व केंद्रीय मंत्री हर्षवर्धन मल्होत्रा आले होते.  ते खरे तर परिवहन मंत्री आहेत पण ह्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला.  केंद्राचा हातभारही असतो.  विरार येथील आगाशी येथे श्री कृष्णाजी विश्वनाथ केतकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी चाळपेठ रोड, आगाशी येथील केतकर वाड्यास भेटही दिली होती. कृष्णाजी विश्वनाथ केतकर यांच्या भगिनी असलेल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्या यमुनाबाई  ओक यांच्या चंद्रकला ओक या कन्या. विवाहानंतर त्या चंद्रकला चंद्रकांत पाठक झाल्या. आजोळी आगाशी येथे शालेय शिक्षण  झाल्यावर  आईवडिलांकडे रहावयास गेल्या. वडील  व  पती रेल्वेत  नोकरी   करीत असल्याने  नंतर कायम मध्य प्रदेश  व उत्तर  प्रदेशात  वास्तव्य  होते.

महापौर चषक’  बास्केटबॉल स्पर्धेत दहिसर येथील पूर्णप्रज्ञा उपविजेते

मुंबई  : मोतीलाल नगर मनपा शाळा, गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे आयोजित ‘महापौर चषक’ बास्केटबॉल स्पर्धेत दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक विद्यालयाच्या (१४ वर्षांखालील गट) संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या जिद्दीमुळे, उत्तम संघकार्यामुळे आणि खिलाडूवृत्तीमुळे आपल्या शाळेची मान अभिमानाने उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्यक्त केली असून उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *