केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरणी रोहित पवार यांनी दिली शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट
कल्याण : डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, संध्याकाळ पर्यंत रमेश म्हात्रेला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. केडीएमसीच्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले असून या घटनेची महिती घेण्यासाठी आमदार रोहीत पवार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना रोहित पवार यांनी इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला का? श्रीकांत शिंदे आलेत का? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष इकडचे आमदार आहेत. चौथ्यांदा निवडून आले असे असतांना ते तरी आलेत का पाठबळ देण्यासाठी असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाहीत. असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा निवडून नाही दिले पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस यांना पाठबळ द्यायला पाहिजे होतं., असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण झालेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना रोहित पवार यांनी भेटून त्यांची विचारपूस केली आणि धीर दिला. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने या देवदूतांना केलेली मारहाण ही सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असून याविरोधात सरकारला कठोर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरुवातीची लक्षणे ओळखा, वेळेत उपचार घ्या – वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांचा इशारा
मिरा -भाईंदर :
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना लेप्टोस्पायरोसिससह विविध जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. गटारे तुंबणे, रस्त्यांवर साचलेले दूषित पाणी आणि उंदरांसह इतर प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स,, मीरा रोड येथील हेड कन्सल्टंट – क्रिटिकल केअर, डॉ. अकलेश तांडेकर म्हणाले, “मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा दूषित पाण्यातून चालताना त्वचेवरील जखम, खरचटलेली जागा किंवा डोळे, नाक आणि तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. अनेकजण हा साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करतात. मात्र वेळेत उपचार न झाल्यास हा आजार किडनी, यकृत आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांची गरज भासू शकते.”
ते पुढे म्हणाले, “पूराचे किंवा साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुढील दोन ते तीन आठवड्यांत ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचारांमुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते.”
ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जनजागृती, सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय उपचार घेणे हेच लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजारापासून बचावाचे सर्वात प्रभावी उपाय आहेत.
आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाला यश !
सिंधुदुर्ग: गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव या ठिकाणच्या जीर्ण व नादुरुस्त झालेल्या शेडसाठी प्रत्येकी २० लाख याप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे.
या कामाची प्रशासकीय मान्यता झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, लवकरच जुन्या शेड हटवून नवीन बांधकामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होईल असे एस.टी.प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या निर्णयाचे संबंधित गावच्या रहिवाशांनी, ग्रामस्थांनी स्वागत केले असून आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

नवी मुंबई : पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा फिल्डवर जाऊन घेताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
४ जुलैला से – १९ शहाबाज गाव, बेलापूर येथील अविघ्न सोसायटी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब पडण्याची घटना घडलेली आहे. या इमारतीमध्ये १७ कुटूंब वास्तव्यास होती. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून या कुटुंबांना महापालिकेच्या वारकरी भवन, बेलापूर येथील तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यापैकी काही कुटुंबे त्यांच्या नातेवाईकांकडे गेली असून एक कुटुंब निवारा केंद्रामध्ये आहे. सदर इमारतीच्या ठिकाणी भेट देत तेथे उपस्थित असलेल्या इमारतीतील रहिवाशांशी महापौरांनी संवाद साधला. यावेळी रहिवाशांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावर महापौरांनी इमारतीची महापालिकेमार्फत स्ट्रक्चरल तपासणी झाल्यानंतर घरामध्ये असलेले त्यांचे आवश्यक सामान काढण्यासाठी परवानगी देता येईल असे सांगितले. जेणेकरुन इमारतीत गेल्यानंतर आणखी काही दुर्घटना घडायला नको. याकरिता सर्व रहिवाशांनी सहकार्य करावे असेही आवाहन महापौरांनी केले. महापालिकेने तत्परतेने स्ट्रक्चरल तपासणी करुन घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या ठिकाणी उपायुक्त डॉ.अमोल पालवे व सहा.आयुक्त प्रशांत नेरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
00000000
डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रदूषणाचा गंभीर प्रकार उघड
कल्याण : एमआयडीसी परिसरात मुख्य गटारातून ओव्हरफ्लो होऊन निळ्या रंगाचं रासायनिक पाणी थेट रस्त्यावर वाहताना आढळलं. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा कल्याण जिल्हा सचिव आशुतोष सिंह यांनी दिला आहे. यावेळी भाजप जिल्हा सचिव दुर्गेश चव्हाण, भाजयुमो जिल्हा सचिव अभिषेक यादव उपस्थित होते.
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा आणि तुंबापुरी झालेल्या भागाचा दौरा करीत परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गटारे, नाले, तुंबल्याने सखल भागात पाणी शिरले. या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर आँन फिल्डवर उतरत त्यांनी शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मांडा पश्चिम, टिटवाळा पुर्व, इंदिरानगर, बल्याणी परिसराचा आधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत पाहणी केली. यावेळी सखल भागात पाणी शिरल्याचा तसेच नाले, गटारे यांचा पाण्याचा निचारा होण्यासाठी तातडीने मार्ग काढण्याच्या सुचना केल्या. तसेच जेसीबीच्या सहाय्याने प्रवाह मोकळा करून पाण्याचा निचारा होईल, याकडे भर दिला. तसेच नाल्यांच्या काठावर झालेली अनाधिकृत अतिक्रमणे, अनाधिकृत भराव तातडीने काढून टाकण्याच्या सुचना सहाय्यक आयुक्तांना केल्या.
तसेच सखल भागात पाणी शिरल्याने त्या परिसरात प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांच्या पथका मार्फत ५०० जेवणाचे पाकिटं तसेच पाणीबॉटल वाटण्यात आले. तसेच डोंबिवली लोधा हेवन गावदेवी चौक येथे झालेल्या अपघाताची पाहणी करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला रुग्णालयात जाऊन दुखापतीची चौकशी करून डॉक्टरांना आदेश करून तत्काळ निवारण करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या कॅन्सर रुग्णालयाच्या बेसमेंटसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे शेजारील दोन इमारतींजवळील संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने याठिकाणचा देखील पाहणी दौरा करण्यात आला.
कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील खंडित झालेल्या सुमारे ६ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा भर पावसात महावितरण कडून सुरळीत करण्यात आला आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काका धाबा परिसर, आरवली, ढोकळी, तिसवली, नांदीवली, हाजी मलंग परिसरात मुसळधार पावसामुळे खोल भागात पाणी जमा झाल्याने भूमीगत वीज वाहिन्यांना इजा होऊन अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता.
वरील परिसरात एकुण १८ वीज रोहित्रांना मुसळधार पावसाचा फटका बसला. परिणामी सहा हजार वीज ग्राहक अंधारात होते. पुराचे पाणी ओसरल्यावर पण पाऊस सुरू असताना टप्याटप्याने खंडीत झालेला वीज पुरवठा रविवारी सायंकाळी सुरू करण्यात आला.
सखोल भागात पाणी जमा झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण कडून तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्यात येतो. पुराचे पाणी ओसरल्यावर वीज यंत्रणेची तपासणी करून नंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येतो. यंदा उन्हाळ्यात अती तापमानामुळे वीज वाहिन्यावर ताण वाढला. अचानक अतीवृष्टीमुळे भूमीगत वीज वाहिनीत बिघाड झाला असे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांची मागणी
कल्याण : जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्यात १ मे ते १५ जून या अधिकृत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत जनगणना कार्य करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना तात्काळ मानधन अदा करावे तसेच नियमानुसार बदली रजा मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हजारो शिक्षकांनी स्वतःच्या वैधानिक उन्हाळी सुट्टीचा त्याग करून घरसूचीकरण, क्षेत्रीय पडताळणी, माहिती संकलन, पर्यवेक्षण तसेच जनगणना विभागाने सोपविलेली विविध कामे अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली. त्यांच्या योगदानामुळे जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण होण्यास मोठी मदत झाली. भारताचे महापंजीयक व जनगणना आयुक्त यांनी २५ जूनला सर्व राज्यांना जनगणना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मानधन कोणत्याही विलंबा शिवाय अदा करण्याचे निर्देश दिले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑक्टोबर २०१० च्या परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्टीत जनगणना कार्य करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा देण्याची स्पष्ट तरतूद असून, संबंधित शैक्षणिक वर्षात ती घेणे शक्य नसल्यास अर्जित रजा खात्यात जमा करण्याची व्यवस्था असल्याचे घागस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ मध्ये उन्हाळी सुट्टीत प्रत्यक्ष कार्य केलेल्या सर्व शिक्षकांना मंजूर मानधन तात्काळ अदा करावे, कोणताही पात्र शिक्षक लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी तसेच सर्व पात्र शिक्षकांना नियमानुसार बदली रजा मंजूर करण्याचे आदेश तातडीने निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“जनगणना हे राष्ट्रहिताचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून शिक्षकांनी नेहमीच शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखत शासनाने न्याय्य व सकारात्मक निर्णय घ्यावा,” असेही राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी निवेदनात म्हटले आहे. तर “शिक्षकांनी राष्ट्रहितासाठी स्वतःच्या उन्हाळी सुट्टीचा त्याग करून जनगणना-२०२७ चे कार्य निःस्वार्थपणे पूर्ण केले आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान म्हणून मानधन आणि बदली रजा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून नैतिक बांधिलकीही आहे. शासनाने याबाबत तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना कल्याण-डोंबिवली महानगर जिल्हा कार्यवाह थॉमस शिनगारे यांनी दिली.
