हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज
नवी मुंबई : खारघर येथील ओवे मैदानावर शनिवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा मुख्य कार्यक्रम या शनिवार-रविवारी (२८ फेब्रुवारी-१मार्च) पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. देश-विदेशातून सुमारे २० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील ओवे मैदान सेक्टर २९ येथे मुख्य कार्यक्रम होणार असला तरी, मोठ्या प्रमाणावरील गर्दी लक्षात घेऊन नवी मुंबई शहरातही विविध तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी ओवे मैदान परिसरात तात्पुरती पायाभूत सुविधा उभारण्यात आली आहे. भाविकांसाठी १००० शौचालये उभारण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून जेटिंग मशीन व सक्शन युनिट सतत कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्ते आणि कार्यक्रमस्थळ परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी बाह्यरुग्ण सेवा कक्ष उभारण्यात आला असून २५ डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी १०६ एनएमएमटी बस भाविकांच्या सेवेत ठेवण्यात आल्या असून प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांवर मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.
याशिवाय, दोन हजारांहून अधिक भाविकांच्या निवासाची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क असून कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी सर्व विभागांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवार-रविवारी होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असून, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा समागम यशस्वी करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
शिखर बँक घोटाळ्यात साऱ्यांनाच क्लीनचीट
दिवंगत अजित पवारांसह ७० जण निर्दोष
मुंबई: महाराष्ट्रातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाकडून करण्यात आला होता आणि राज्यात आता भाजपचंच सरकार असताना शिखर बँक प्रकरणी दिवंगत अजित पवारांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि ७० जनांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिखर बँक घोटाळाप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा तपास करायचा आहे असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितल होतं. पण, अजित पवार उपमुख्यमंत्री बनून शिंदे-फडणवीस महायुती सरकारसोबत येताच पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी कोर्टात नव्याने अर्ज दाखल केला. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील विरोध याचिका रद्द करण्याकरता मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे नव्यानं अर्ज केला होता.

अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे
मुंबई : अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं ? असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पवारांच्या अपघाताच्या प्रकरणी ते उभा करीत असलेल्या लढ्याला पाठींबा दिला. अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी व्यापक बळ मिळावे, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोहीत पवार यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी तपशील सादर केल्यानंतर राज यांनीही एफआयआरवरून सरकारला धारेवर धरले. हा विषय कोणत्याही राजकारणाच्या पलीकडचा असून महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रोहित पवारांनी हा प्रश्न सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा, असं मी त्यांना सांगितलं असल्याचे ते म्हणाले.
राज यांनी सांगितले की, सुनेत्रा वहिनी सध्या तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत, त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अजित पवार त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दल हा एफआयआर आहे, त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी या विषयावर बोललं पाहिजे, अशी भावना राज यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा टिकवण्याची शपथ घ्या- नायगावकर
मुंबई : मराठी भाषेचा अभिमान आणि भाषिक अस्मितेला नवी उभारी देणार्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला शुक्रवारी उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी, ‘मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीतच बोलले पाहिजे, मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे.’ या कविवर्य अशोक नायगावकर यांच्या कळकळीच्या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दुजोरा दिला.
या कविसंमेलनात नायगावकर यांच्यासह अरुण म्हात्रे, महेश केळुसकर आणि प्रथमेश पाठक,संदीप राऊत, संकेत म्हात्रे असे अनेक युवा नामवंत कवी सहभागी झाले होते. त्यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कवितांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. मराठी भाषेची गोडी, तिची परंपरा आणि समकालीन वास्तव यांचे विविध पैलू या कवींनी कवितांमधून उलगडले.
या कविसंमेलनात संघाचे माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, सदस्य सदानंद खोपकर, सदस्य मंगेश मोरे, सदस्य सतीश केंगार आणि सदस्य डॉ. उषाराणी गुजराथी यांनी आपल्या कविता सादर करत मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेला कविता, विचार आणि भाषाप्रेमाचा संगम असलेला हा कवितोत्सव संस्मरणीय ठरला. मराठीची समृद्ध परंपरा जपण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत ती अभिमानाने पोहोचवण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

दिल्ली मद्य घोटाळा केजरीवाल निर्दोष
निकालानंतर धाय मोकलून रडले
दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांची न्यायालयाने दिल्ली मद्य घोटाळ्यातील सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर केजरीवाल मिडीयाला प्रतिक्रीया देताना धाय मोकलून रडले. मुख्यमंत्री पदावर असताना या मध्य घोटाळा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक करून सहा महिने तुरुंगात डांबले होते.
निकाल देताना न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की केवळ दावे पुरेसे नाहीत. न्यायालय केवळ ठोस आणि ठोस पुराव्यांद्वारेच निकाल देऊ शकते. न्ययालयाने म्हटले की तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे कमकुवत आणि अपुरे होते. प्रथम, न्यायालयाने उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंग यांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर, मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळाला आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले.
न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना म्हणाले, आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद… सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे. मोदीजी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठं राजकीय षडयंत्र रचलं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पक्षाच्या सर्वात मोठ्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकलं. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं, सहा महिने आत ठेवलं गेलं.जे भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही. केजरीवाल भ्रष्ट नाही.. केजरीवाल भ्रष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात इमानदारी कमावली. यांनी खोटी केस लावली, ते आज सिद्ध झालं. कोर्टानं म्हटलं केजरीवाल कट्टर इमानदार,मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. आम आदमी पार्टी कट्टर इमानदार आहे.
भाजप १० पेक्षा जास्त जागा जिंकल्यास राजकारण सोडेन- अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज दिलं आहे. दिल्लीत तुम्ही निवडणूक घ्या, भाजपच्या १० पेक्षा अधिक जागा निवडून आल्यास राजीनामा देईन, असं केजरीवाल म्हणाले. मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, असं देखील केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल म्हणाले कोर्टाचा निकाल ऐतिहासिक आहे. हे पूर्ण षडयंत्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी रचलं. त्यांनी पूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. दोघांनी मिळून षडयंत्र रचलं आणि आम आदमी पार्टीला संपवण्याचा प्रयत्न केला. असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

संपूर्ण देशात आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था तसेच शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. भारतासाठी पहिले नोबेल पुरस्कार मिळवून देणारे थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ सी व्ही रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिक शास्त्रातील अत्यंत्य महत्वपूर्ण अशा प्रकाशाच्या विकिरणासंबंधी संशोधन करून त्याविषयीचा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जागतिक पातळीवर सादर केला. त्यांच्या या शोधनिबंधाला १९३० साली मान्यता मिळाली आणि त्याच वर्षी या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. सी व्ही रामन हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ सी व्ही रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी चेन्नई ( पूर्वीचे नाव – मद्रास ) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. शालेय वयातच रामन हे अत्यंत्य तल्लख बुद्धीचे होते. रामन यांनी वयाच्या ११ व्या वर्षीच शालेय शिक्षण पूर्ण केले. १५ व्या वर्षी ते गणित आणि विज्ञान या विषयाचे पदवीधर झाले. वयाच्या १७ व्या वर्षी सी व्ही रामन यांनी भौतिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण मद्रास येथे उच्च श्रेणीत पूर्ण केले. त्यानंतर ते कोलकाता येथे डेप्युटी अकाउंटट जनरल या पदावर रुजू झाले पण या नोकरीत त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी कोलकाता येथे कमी पगारात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत असताना त्यांनी आपले संशोधन सुरूच ठेवले.
१९२१ मध्ये कोलकाता विद्यापीठाने त्यांना उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवले. तिथे त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये तंतुवाद्ये हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५ मध्ये भारतीय तंतुवाद्ये विशेष करून तबल्याची नादनिर्मिती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले. युरोपातून समुद्रामार्गे भारतात येत असताना आकाशातील निळा रंग पाहून त्यांना या रंगाविषयी कुतुहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचेच का असते? असा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे होणारे विकिरण यावर संशोधन केले. या संशोधनातून त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाचे उत्तर मिळाले. रामन इफेक्ट म्हणजे प्रकाशाचे विकिरणच.
प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे. अशा प्रकारांचे किरण जेव्हा आपल्या डोळ्यात शिरतात, तेंव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. रामन हे सुरवातीला स्फटिकांच्या अणू रचनेसंबंधी आढळणाऱ्या रचना साधर्माशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते. या दरम्यान १९२८ साली त्यांना असे आढळून आले की विकिरत प्रकाशामध्ये मूळ प्रकाशाइतक्या तरंग लांबीच्या किरणांबरोबर इतरही प्रकाश किरणांचे अस्तित्व असते. ज्यांचा मागमूसही मूळ प्रकाश किराणांमध्ये नव्हता. या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पाऱ्याच्या विद्युतदीपघटापासून मिळणारी तरंग लांबी अभ्यासली आणि त्यातून त्यांच्या नवीन निष्कर्षाला, संशोधनाला बळकटी मिळाली. प्रकाशामध्ये कण स्वरूपाशी साधर्म्य सांगणारे काही गुणधर्म असतात. त्यांच्या प्रकाश कानीकांमधील ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या कंपन संख्येच्या समप्रमाणात असते.
त्यांचा हाच शोधनिबंध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांच्या या अत्यंत्य मौलिक आणि अनमोल अशा संशोधनामुळे पुढे अनेक शोध लागले. भौतिक शास्त्रात सध्या जे शोध लागत आहे त्याचे मूळ याच रामन इफेक्ट मध्ये सामावलेले असते. रामन इफेक्टमुळे माहितीचे भंडार खुले झाले. त्यामुळेच देशातील १७ विद्यापीठांनी तसेच जगातील ८ विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट फेलोशिप बहाल केली. १९४३ मध्ये रामन यांनी बंगलोर येथे रामन संशोधन संस्थेची स्थापना केली. या संस्थेत भौतिक शास्त्रातील संशोधनाला अग्रक्रम देण्यात आला. १९५४ साली भारत सरकारने त्यांचा भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला. १९५७ साली आंतरराष्ट्रीय लेनिन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. आपण लावलेल्या शोधाचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी व्हायला हवा. विध्वसंक कार्यासाठी त्याचा उपयोग व्हायला नको असे त्यांचे मत होते. १२ नोव्हेंबर १९७० रोजी त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
श्याम ठाणेदार

भाषा ही केवळ मानवाला मिळालेली निसर्गाची जादुई देणगी आहे. आपण आपले अतिशय गुंतागुतीचे विचारही अशा भाषेमधून प्रक्षेपित करू शकतो. श्वास घेताना नव्हे तर तो सोडताना आपण आपण त्याचे आवाजात रुपांतर करू शकतो. या आवाजात कंपने कमी जास्त करू शकतो आणि त्यासोबतच त्यात आपली भावना दिसेल असे रूपही देऊ शकतो. खरे तर हे सगळे म्हणजे केवळ हवेतील कंपने आहेत. हीच कंपने माझ्याकडून तुमच्याकडे पोचतात. तुमच्या कानांना स्पर्श करतात. केवळ अशी कंपने तयार करून मी तुम्हाला भाषेचे एक अक्षरही न उच्चारता हसवू किंवा रडवू शकतो. याचे कारण असे की कानांवर पडल्यानंतर ही कंपने तुमच्या मेंदूत शिरतात आणि तेथे त्यांचे रुपांतर विचार आणि शब्दात होते.
जगातील बोल-भाषांचा पसारा अंदाजे सात हजार भाषांचा आहे. या प्रत्येक भाषेमधील कंपनांचे कानावर पडणारे आवाज, त्यांचे शब्द आणि वाक्यरचना करण्याची पद्धत जरी भाषेनुसार बदलत असली तरी त्यांचा प्रभाव मात्र आपल्या विचारांची जडणघडण ठरवीत असतो. जगातील काही भाषा डावीकडून उजवीकडे तर इतर काही भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. आणखीही अनेक प्रकार आहेत. “मानवी मन किती निर्मितीक्षम आणि लवचिक असते हे समजून घ्याचे असेल तर जगातीले भाषांची विविधता आणि त्यांचे सौंदर्य बघावे” असे मानवी आकलन शक्तीचे तज्ञ लेरा बोरोडित्स्की यांचे मत आहे. त्यांच्या मते यामुळेच मानवी मनांनी एक नव्हे तर किमान सात हजार भाषांचे आकलन विश्व तयार करून ठेवले आहे.
निसर्गानी मानवाला दिलेल्या याच क्षमतेच्या आधारावर आज आपण आपल्या कल्पना आता तर क्षणभरात जगभर कुठेही पोचवू शकतो. याचा अर्थ आता ज्ञान हे मनामनातून आणि परिणामकारक पद्धतीने प्रक्षेपित होऊ शकते. “कल्पना करा की एक व्हेल मासा सागरामध्ये ‘एआय’ बद्दल विचार करतो आहे” असे जर मी तुम्हाला सांगितले तर प्रत्यक्षात तुम्ही व्हेल मासा आणि एआय हे दोन्ही बघितले नसतील तरी मासा, पाणी तसेच एआय हे नवे जादुई विज्ञान इतका विचार तुमच्या मनात आलाच असणार.
आपली बोलण्याची भाषा आपल्या विचारांन आकार देऊ शकते का? हा प्राचीन काळापासून चर्चेत असलेला प्रश्न आहे. असे मानले जायचे की दुसरी भाषा येणे हे दुसरा आत्मा असल्यासारखे आहे परंतु काळ बदलत गेला तशी दोन नव्हे तर संवादासाठी अनेक भाषांची गरज पडू लागली. त्याचा बोलबाला वाढला. गुलाबाला कोणतेही नाव दिले तरी त्याच्या सुगंध हीच त्याची ओळख असणार तसेच भाषा कोणतीही असली तरी तिचा कानांवर पडणारा आवाज वास्तवात आनद देऊ शकतो.
एका भाषेत उजवा आणि दावा हे शब्दच नाहीत असे सांगितले तर?
‘तुझ्या शर्टच्या दक्षिण-पश्चिमेला एक मुंगळा दिसतो आहे’ अशी भाषा जेव्हा आपण शिकू आणि आपल्या मायमराठीत डाव्या बाजूला असा त्याचा अर्थ होतो हे आपल्याला माहिती असेल तर काही काळाने ही भाषाही आपल्या ओळखीची होईल. मातृभाषा तर मायेची ऊब आणि आपलेपण जपते…मराठी भाषेचा काल गौरव-दिन होता म्हणून आज हे काहीतरी नवीन टिपण,,,
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
काल २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मसमर्पण दिवस साजरा झाला, तर आज २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठविजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो, तर आजपासून १० मार्च पर्यंत म्हणजेच कुसुमाग्रजांच्या पुण्यतिथीपर्यंत महाराष्ट्रात मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. शासकीय आणि सार्वजनिक स्तरावर त्याची जोरदार तयारी सुरू आहे.
मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, हा पंधरवाडाभर आपण मराठीचे कौतुक केले की वर्षभर आपण मराठीला विसरलेलेच असतो, त्याचे काय? आपण मराठी माणसं मराठी कडे कितपत लक्ष देतो आणि किती दुर्लक्ष करतो याचाही कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे. मराठी माणसाने जर मनापासून ठरवले तरच मराठीला योग्य तो सन्मान मिळू शकेल.
आज आम्ही मराठीला अभिजात दर्जा मिळाला, पण केंद्र सरकार निधी देत नाही याबद्दल कुरकुर करतो. मात्र आम्ही मराठीसाठी काय करतो याचा कोणी तरी विचार करतो काय? अगदी आपल्या घरचेच उदाहरण घ्या, लहान मुल बोलायला लागले की पूर्वी आम्ही त्याला आई-बाबा म्हणायला शिकवायचे. आज अगदी तळागाळातल्या कुटुंबांमध्ये सुद्धा मम्मी पप्पा किंवा मग मम्मा डॅडा म्हणायला शिकवले जाते. आमच्या शेजारीच एका दोन वर्षाच्या बालिकेला मायबापांनी कौतुकाने मम्मा म्हणायला शिकवले. मात्र ती बालिका कदाचित भारतीय संस्कृतीवर मनापासून प्रेम करणारी असावी. त्यामुळे ती आईला मम्मा न म्हणता अम्माच म्हणू लागलेली आहे. तिथे त्या मायबापांचा नाईलाज झालेला आहे.
पूर्वी मुलांना शाळेत घातले की पाटीवर मराठी मुळाक्षरे गिरवायला शिकवले जायचे. आज-काल प्रत्येक कुटुंबात मुलांना एबीसीडी शिकवले जाते. पूर्वी चिऊ काऊ ची गाणी शिकवली जायची. आता ट्विंकल स्टार शिकवले जाते. आई वडील त्या मुलांशी इंग्रजीतच बोलतात. इतकेच काय पण घरी पाळलेल्या कुत्र्याशी माफ करा डॉगीशी देखील इंग्रजीतच बोलले जाते. त्यालाही इंग्रजीच शिकवली जाते.
आज मराठी शाळा बंद पडत आहेत म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात ओरड करतो आहोत. मात्र आम्हीच आमच्या मुलांना जागतिक स्पर्धेत टिकायला हवे म्हणून बालवाडीत न पाठवता के जी वन के जी टू मध्ये पाठवतो आणि तेव्हापासूनच त्यांच्यावर आंग्ल संस्कार करत असतो. आमच्या लहानपणी आम्ही मराठी गोष्टीचे पुस्तके वाचूनच आमची वाचन संस्कृती जपली. त्या काळात मराठी चांदोबा, फुलबाग, कुमार, मुलांचे मासिक अशी सकस मराठी शिकवणारी आणि मुलांचे सामान्य ज्ञान वाढवत मनोरंजन करणारी अनेक नियतकालिके उपलब्ध होती. त्याशिवाय इंद्रजाल कॉमिक्स सारखी कॉमिक्स देखील मुलांसाठी मराठीत उपलब्ध होती. श्यामची आई, फास्टर फेणे यांच्यासारखी मराठी पुस्तके देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. मात्र आज मुलांना वाचायला हॅरी पॉटर दिला जातो. माझ्यासारखा एखादा बाप मुलीसाठी कौतुकाने श्यामची आई सारखे पुस्तक घेऊन येतो. मात्र ते कधीच वाचले जात नाही. ही बहुतेक सर्व मराठी कुटुंबांमधील शोकांतिका आहे. माझी आतापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मध्यंतरी माझ्या मुलीला तिच्या एका मैत्रिणीने विचारले की तू तुझ्या बाबांची किती पुस्तके वाचली आहेत? तेव्हा तिने एकही नाही असे उत्तर दिले होते. बहुतेक सर्व मान्यवर मराठी लेखकांच्या घरी असेच ऐकायला मिळते.
मुलांचे जाऊ द्या, पण आज आम्ही तरी सामाजिक जीवनात शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो का? याचे उत्तर नकारार्थीच मिळते. आज मराठीत सर्वांना समजतील असे शब्द वाक्प्रचार म्हणी या सगळ्याच उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना चपखल असे मराठी शब्द रूढ केलेले आहेत. मात्र त्याचा उपयोग आम्ही फार कमी करतो. सकाळी उठल्यावर कोणालाही गुड मॉर्निंग म्हणण्यात आम्हाला भूषण वाटते. त्याऐवजी आम्ही सुप्रभात का म्हणत नाही हा देखील मला कायम प्रश्न पडत असतो.
मराठी पुस्तके तरी किती वाचतो याचा शोध घेतल्यास आपल्या पदरी निराशाच पडेल. पूर्वी मराठी ललित पुस्तके हातोहात विकली जात असत. मला आठवते, माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा प्रकाशकाने पहिली आवृत्ती हजार प्रतींची काढली होती. ती संपली आणि दुसरी आवृत्ती देखील काढावी लागली होती. नंतर पुस्तके विकली जात नाहीत म्हणून प्रकाशकांनी हजार वरून पाचशेवर आकडा आणला. आता तर ३००-४०० च्या वर आवृत्ती निघत नाही, अशी मराठी साहित्याची शोकांतिका आहे. पूर्वी ढिगाने मराठी नियतकालिके प्रकाशित व्हायची. माझ्या लहानपणी आमच्या घरी सर्क्युलेटिंग लायब्ररी, माफ करा फिरते वाचनालय लावले होते. तो दर चार दिवसांनी वेगवेगळी मराठी मासिके घरी आणून देत असे. त्यात स्त्री किर्लोस्कर प्रपंच ललना वाङ्मय शोभा मनोहर अशी कितीतरी नियतकालिके घरी यायची. ती वाचूनच आमची मराठी समृद्ध झाली होती. आज अशी किती नियतकालिके निघतात हे शोधावे लागेल. निघत असतीलही, पण ती वाचली जातात का? कारण आता ऑनलाईनचा जमाना आला आहे.
मराठीसाठी आज राजकीय नेते भांडतात. मुंबईत म्हणे परप्रांतीयांना मराठीत बोला म्हणून आग्रह धरला जातो. त्यासाठी हाणामारी केली जाते. मात्र हाणामारी करणाऱ्यांचीच मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकतात आणि मग मुंबईतल्या मराठी शाळा बंद पडतात म्हणून आम्हीच ओरड करतो. मराठीच्या संवर्धनासाठी सरकारने काहीतरी केले पाहिजे, केंद्राने निधी दिला पाहिजे, म्हणून आम्ही कंठशोष करतो, मात्र आम्ही चांगले काय मराठी वाचले हे विचारले तर आजची चार चांगली पुस्तके देखील सांगू शकत नाहीत. मराठी साहित्यिकांना सन्मान मिळावा यासाठी आम्ही काहीही करत नाही. त्यामुळेच मराठीची अवस्था दयनीय आहे. कुसुमाग्रजांनी मराठी मंत्रालयाच्या दारासमोर लक्तरे पांघरून उभी आहे अशा आशयाची एक कविता केली होती. आज मराठीची तीच अवस्था आहे, आणि त्यासाठी सर्वात पहिले मराठी माणूस जबाबदार आहे.
म्हणूनच आता प्रत्येक मराठी माणसाने “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे लक्षात ठेवून कटाक्षाने मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करावा. मराठीत वाचण्याचा मराठी लिहिण्याचा चांगले मराठी चित्रपट चांगली मराठी नाटके बघून त्यांना उत्तेजन देण्याचा चांगल्या मराठी दूरदर्शन मालिका बघून त्यांचा टीआरपी माफ करा प्रेक्षक संख्या वाढवण्याचा संकल्प करायला हवा, आणि हो फक्त संकल्प करू नका तर तो अमलात देखील आणायचा अगदी पूर्ण ताकदीने प्रयत्न करायला हवा. एकूणच मराठीचा सन्मान वाढवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानेच पुढे यायला हवे. प्रत्येक मराठी माणसाने जर मराठीचा अभिमान बाळगला आणि मराठीचा प्रचार प्रसार केला, तर मराठी फक्त भारतातीलच अभिजात भाषा म्हणून ओळखली जाणार नाही, तर जागतिक स्तरावर देखील मराठीला सन्मान मिळू शकेल, इतकंच सहज सुचलं म्हणून सांगावसं वाटतं.
अविनाश पाठक
