20 April Bitambatmi All pages

Open Book

– जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुकुंद रांजाणे (माथेरान)जेष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात एसटी महामंडळ बसेसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान मध्ये एम.एस.आर.टी.सी.( कर्जत ) आणि माथेरान जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन श्रीराम चौकातील गेम झोन याठिकाणी करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
माथेरान शहरातील १८ वर्षावरील सर्व महिला,६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक, ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीक या सर्वांकरिता महाराष्ट्र राज्यात सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करताना स्मार्ट कार्डाचा वापर करता येणार आहे.हे कार्ड बनविण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कर्जत आगारात जाणे शक्य नसल्याने कर्जत आगार प्रमुख महादेव पालवे यांच्या सहकार्याने आणि माथेरान जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन दि.१९ रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले. जवळपास नव्वद जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवला.या शिबिराला विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितच केले जाईल असे सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी कर्जतचे अक्षय म्हसे, गीता शहा यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. हा महत्वपूर्ण शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अब्दुल रहिमान शेख,उपाध्यक्ष अरविंद रांजाणे, सचिव अनंत शेलार, खजिनदार रजनी (बीना) कदम, सल्लागार चंद्रकांत जाधव, प्रकाश (अण्णा) सुतार,दत्ता सनगरे, वासंती जांभळे, कांचन केतकर, जयश्री रामाणे, सुहासिनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000000

 आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

 महिलांच्या गटात श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिक संघांचे विजय

मुंबई, दि. १९ (क्री.प्र.)-कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना लाखमोलाचा पुरस्कार देणार्‍या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु झालेल्या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएल, सीजीएसटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट संघांनी खणखणीत विजयाची नोंद केली तर महिलांच्या राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेत श्रीराम (पालघर), धर्मवीर (नंदुरबार) आणि स्वस्तिक कबड्डी संघांनी दणदणीत विजयासह जबरदस्त सलामी दिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन कबड्डीच्या मॅटसंग्रामाचे विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन पार पडले. यावेळी क्रीडाप्रेमी आमदार व संयोजक सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर, बाबा कदम, दीपक सावंत, विश्वास शिंदे, महिला विभाग प्रमुख रश्मी पहुडकर तसेच मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने श्रीमान योगी प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बहुतांश लढती एकतर्फीच झाल्या. इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि.(आयएसपीएल) संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत रूपाली ज्वेलर्सचा ६०-२१ असा धुव्वा उडवला. शिवम गोरडे, आदेश वरखडे आणि गिरीराज सिंह यांच्या तुफानी चढाया व अचूक पकडींमुळे मध्यंतरालाच ३२-१० अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केला.दुसर्‍या सामन्यात सीजीएसटीने हिंदुजा रुग्णालयावर ५६-१७ असा एकतर्फी विजय मिळवत आपला आक्रमक अंदाज दाखवला. मुंबई पोर्ट ट्रस्टनेही मुंबई महानगरपालिकेवर ३८-२१ अशी सहज मात करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली.
महिलांच्या राज्यस्तरीय लढतीतही संघांनी जोरदार खेळ सादर केला. होतकरू मित्र मंडळ आणि कर्नाळा स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना मात्र खर्‍या अर्थाने रंगला. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या होतकरू संघाने मध्यंतरानंतर जबरदस्त पुनरागमन करत २७-२५ असा थरारक विजय मिळवला. पालघरच्या श्रीराम संघाने स्नेहविकास संघावर ४४-१३ असा दणदणीत विजय मिळवला, तर नंदुरबारच्या धर्मवीर संघाने जय भारतचा ४४-१६ असा पराभव करत प्रभावी सलामी दिली. स्वस्तिक महिला संघाने पुण्याच्या पतंगराव कदम संघावर २०-११ अशी मात करत आपला ठसा उमटवला.

 ५वी मायकेलाइट मॅरेथॉन

कुर्ला पश्चिम येथील सिईएस माइकल हाय स्कूल द्वारा आयोजित ५वी मायकेलाइट मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने कुर्ला परिसरातील नागरिकांना एकत्र आणत एकता आणि उत्साहाची भावना दृढ केली. या स्पर्धेत ७५० हून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
“Run for Unity and Michaelites smile while running miles” या संकल्पनेवर आधारित ही मॅरेथॉन कुर्ला परिसरातील सर्वात मोठ्या सामुदायिक उपक्रमांपैकी एक ठरली. सहभागींचा उत्साह, शिस्त आणि क्रीडाभाव यामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
हा कार्यक्रम मुख्याध्यापिका डॉ. सॅव्ही मेंडोंका यांच्या नेतृत्वाखाली, संचालक जीन मोझेस गोम्स आणि संस्थापक मोझेस मायकेल गोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्यामुळे वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमास आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, पोलीस अधिकारी संतोष माने, मुंबई उत्कल स्कूलचे अध्यक्ष सूर्य गौडा तसेच समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सहभागींचा उत्साह अधिक वाढला.
५वी मायकेलाइट मॅरेथॉनने केवळ शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन दिले नाही, तर सामुदायिक ऐक्य अधिक बळकट करत कुर्ला परिसरासाठी एक स्मरणीय उपक्रम ठरला.

ठाणे – टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरु करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि आयपीएलमध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा हे एक मोठे व्यासपिठ असून येणाऱ्या काळात ही स्पर्धा चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ठाण्यात व्यक्त केला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन-१ ( मुंबई-ठाणे-कोकण ) अध्यक्ष अभिजीत दरेकर, एमसीए सदस्य नगरसेवक विकास रेपाळे, आयोजक ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते.   उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते टीडब्ल्यूपीएल  चषकाचे अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व कॅप्टन हे ठाणे शहरातील असल्यामुळे क्रिकेटला चांगले भविष्य असल्याचे अजिंक्य नाईक यांनी मिश्किल वक्तव्य करत आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू हे पुढे येत असून येणाऱ्या काळात मुंबई आणि भारतासाठी ठाणे जिल्ह्यातून खेळाडू   मिळतील, असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. नविन नविन अॅक्टिव्हिटी आज क्रिकेटमध्ये ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आम्हाला वेळोवेळी मागदर्शन लाभत असून विकास रेपाळे हे देखिल क्रिकेटच्या भविष्यासाठी सक्रिय झाले असल्याने क्रिकेटला ठाणे जिल्ह्यात चांगली वाढ मिळेल, असा विश्वासही अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लेदर बॉल क्रिकेटवर जास्त लक्ष असते. पण टेनिस क्रिकेट हा गल्लीबोळातील खेळ आहे. सर्वसामान्यांची मुले टेनिस क्रिकेटमध्ये जास्त असून तो लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळावरही जास्त लक्ष देण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ठाण्यात मध्यंतरी प्रेसिडेंट क्लब एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. भारतभरातून टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू ठाण्यात आले होते. आज अनेक खेळाडू टेनिसकडून लेदर क्रिकेटकडे वळत आहेत. लेदर हे भविष्य असल्यामुळे टेनिस कडून लेदर क्रिकेटकडे येण्यासाठी काय करता येईल ते करावे लागेल असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी करत टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा एक चांगला उपक्रम असल्याचे कौतुकही आव्हाड यांनी केले.
आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, अमित सरैय्या, दिलीप बारटक्के, अनेक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचे कौतुक केले.

आरएसए टी-२० कप

मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आरएसए टी-२० कप २०२५-२६ स्पर्धेत एमटीएनएल, ऍडव्हान्स सी.सी., पटेल सी.सी. आणि अशोक कामत सी.सी. या संघांनी दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिसऱ्या साखळी फेरीतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी व भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
एमटीएनएलचा एकतर्फी विजय
एमटीएनएल विरुद्ध गे कॅव्हिलिअर सामन्यात गे कॅव्हिलिअरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. एमटीएनएलने १८ षटकांत १४७/५ धावा केल्या. जय तलवरकर (२६), हर्ष घरसून (२८), शुभम जाधव (२३) व राहुल यादव (३०) यांनी योगदान दिले. प्रत्युत्तरात गे कॅव्हिलिअर संघ १४.५ षटकांत ८७ धावांत गारद झाला. शुभम जाधव (३ बळी) व धनंजय किणी (३ बळी) यांच्या गोलंदाजीमुळे एमटीएनएलने सहज विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरीसाठी शुभम जाधव सामनावीर ठरला.
ऍडव्हान्स सी.सी.चा दणदणीत विजय
स्पीड सी.सी. विरुद्ध ऍडव्हान्स सी.सी. सामन्यात ऍडव्हान्सने प्रथम गोलंदाजी करत स्पीड सी.सी.ला २० षटकांत ९८/८ धावांवर रोखले. जय डोळसने ४७ धावांची झुंजार खेळी केली. प्रतीक गोसावी (३ बळी) व आराध्ये माने (२ बळी) यांनी भेदक मारा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना हेत पटेलच्या ६५ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऍडव्हान्सने १३.१ षटकांत १०१/२ धावा करत विजय मिळवला. हेत पटेल सामनावीर ठरला.
पटेल सी.सी.ची सहज सरशी
पटेल सी.सी. विरुद्ध एसव्हीए चेंबूर सामन्यात पटेलने प्रथम गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना ९.५ षटकांत ४५ धावांत गुंडाळले. युवान शर्मा (३ बळी), साहिल (२ बळी) व सोहईल शेख (२ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. पटेल सी.सी.ने केवळ ४.३ षटकांत ५१ धावा पूर्ण करत सामना जिंकला. युवान शर्मा सामनावीर ठरला.
अशोक कामत सी.सी.ची सर्वांगीण कामगिरी
अशोक कामत सी.सी.ने क्रिकेट मंत्रा विरुद्ध १८ षटकांत १७३/७ धावा उभारल्या. ह्रिषीकेश चव्हाण (३६), निसार शेख (२९), प्रेम कदम (२०) व रणवीर (२५) यांनी योगदान दिले. प्रत्युत्तरात क्रिकेट मंत्रा संघ १८ षटकांत ९५/८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ओम कांबळेने ३ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
स्पर्धेचे सेमीफायनल सामने २३ एप्रिल रोजी एलआयसी ग्राउंडवर खेळवले जाणार असून, अंतिम सामना २४ एप्रिल रोजी रंगणार आहे.

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक २, दहिसर  वतीने  कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व व्याख्यानकार राजू देसाई उपस्थित होते. शाखा प्रमुख उत्तम परब , युवासेना कार्यकारिणी सदस्या धनश्री कोलगे, शिवसेना ग्राहक संघ राजन गावडे, उप शाखा प्रमुख जयवंत जाधव, ललित वेलोंडे, विनायक तलघे, सुनील कुडतरकर, गट प्रमुख प्रफुल राज, दर्शन घाडीगांवकर उपस्थित होते. शेखर  जांबावलीकर व महेश शेडगे यांनी स्पर्धेच्या नियोजनाची धुरा संभाळली. या प्रसंगी निष्ठावंत शिवसैनिक व स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते.

ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील‌ मुला -मुलींच्या राज्य स्तरीय   कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल रोजी  आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल,दत्तनगर,डोंबिवली,पूर्व  येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये १०० असुन २० एप्रिल पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.प्रवेशासाठी दिलीप कर्वे, मो.९१६७७४४०४९.  संजय ठाकुरदेसाई मो.   ९८६७५८५२७१. अथवा पर्णाद जोशी मो.  ८४५०९५४५८४ यांच्याशी संपर्क साधावा.

 श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा
  याशिका पुजारी, तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

ठाणे :-महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्टस् ची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. पाच हजार (₹५०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य मैदानात संपन्न झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या अंतिम सामन्यात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टस् ने पूर्वार्धातील १३-१७ अशा पिछाडीवरून पालघर(विरार)च्या विवेक स्पोर्टस् चा प्रतिकार ३७-३३ असा मोडून काढत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार(₹५१०००/-) आपल्याकडे खेचून आणले. हरजीत, स्वीटी, सौंदर्या यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विवेक स्पोर्टस् ने पूर्वार्धात लोण देत ४गुणांची आघाडी मिळविली होती.  उत्तरार्धात याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांनी आपला खेळ गतीमान करीत चढाईत भराभर गुण घेत लोण ची परतफेड केली. त्यांना प्रतिक्षा तांडेलने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात स्वराज्यला सरशी साधता आली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने ठाण्याच्या ग्रीफिन्स जिम. चा ३६-३० असा पराभव करीत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार(₹५१०००/-) आपल्या खात्यात जमा केले.  आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत श्रीराम संघाने पहिल्या डावात २०-१२ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात मात्र ग्रीफिन्सने आपल्या खेळाची गती वाढवीत लोण ची परतफेड करीत गुणा मधील फरक कमी केला. पण संघाला विजयी करण्यात त्यांचा खेळ कमी पडला. तुषार शिंदे, अंकुश पारले यांच्या संयमी व धूर्त चढाया त्यांना अमित सिंग, आदित्य पारले यांची मिळालेली बचावाची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. सुरज धुंदले, मनीष धनावडे, वेदान्त धामले, आदित्य पिलाणे यांनी दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात स्वराज्य स्पोर्टस् ने मिडलाईन अकॅडमी-नांदेडला  तर विवेक स्पोर्टस् ने ओम् वर्तकनगरला नमवीत अंतिम फेरी गाठली . पुरुषांत श्रीराम क्रीडाने डॉन बॉस्कोला  तर ग्रीफिन्स जिम. ने ५-५ चढायात मिडलाईनला ३२-२९(७-४) अशी चूरशीची मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. महिलांत विवेकची स्वीटी आणि स्वराज्यची समृद्धी मोहिते यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. पुरुषांत ग्रीफिन्सचा मनीष धनावडे आणि श्रीरामचा अमित सिंग यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले. या चारही खेळाडूना प्रत्येकी रोख रु. तीन हजार(₹३०००/-) देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ठाणे जिल्हा कबड्डी असो. चे अध्यक्ष व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, मंडळाचे विश्वस्त जुगलकिशोर मुंदरा, प्रभाकर सुर्वे, कृष्णा डोंगरे, पॅट्रिक फर्नांडिस, रवींद्र आंग्रे, सुधाकर मोरे, केशव मुकणे आदी मान्यवारांच्या उपस्थित पार पडला.

– राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन

पालघर : (अशोक गायकवाड )—भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी डहाणू येथे केले. मार्च २०२६ मध्ये राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यपालांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असल्याने पालघरवासियांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वे भवन्तु निरामय:’ या मंत्राचा उल्लेख करीत त्यांनी केली व आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता त्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या भूमिकेचा संदर्भ देत, राज्यपाल म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत ‘अंत्योदय’ म्हणजेच रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. वन बंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात फिरता दवाखाना, रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. चांगले इंजिनिअर, तंत्रज्ञ किंवा सनदी लेखापाल होणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापेक्षा समाजात चांगला नागरिक म्हणून कार्य करणे ही त्याहून मोठी गोष्ट असल्याचे सांगून पीडितांची सेवा करणे हाच खरा स्वर्ग असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि पालघरच्या विकासासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. वन बंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडू लाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ट्रस्टच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आरोग्य प्रकल्पांची माहिती देऊन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे सांगितले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचे चित्र कसे बदलता येईल, यावर प्रकाश टाकला. पालघरच्या जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील आरोग्य सद्यस्थिती आणि राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांविषयी माहिती दिली. तसेच, राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिक वेगाने कार्य करेल, अशी ग्वाही दिली.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *