
इस्रायलच्या संसदेतही मोदी…मोदीच्या घोषणा
तेलअविव : इस्त्रालयच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या संसदेतील (क्नेस्सेट) सभागृहाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारत–इस्रायल संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला. “भारत आता आणि भविष्यातही इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान मोदींच्या भाषणानंतर इस्त्रालयचे संसदेतही मोदी…मोदीच्या घोषणा निनादल्या.
दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “भारत बराच काळापासून दहशतवाद सहन करत आहे,” आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य वाढवावे, असे आवाहन केले.
इस्रायलच्या संसदेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “या सन्माननीय सभागृहासमोर उभे राहणे माझ्यासाठी भाग्य आणि सन्मानाची बाब आहे. मी भारताचा पंतप्रधान आणि प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या संस्कृतीला संबोधित करत आहे. मी १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन इस्रायलमध्ये आलो आहे.”
या दौऱ्यात संरक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि दहशतवादविरोधी सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
फोटो ओळ
इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांनी स्वागत केले. यावेळी सारा यांनी परिधान केलेला भगव्या रंगाचा वेष सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
मुंबईतील फेरीवाल्यांना
क्युआर कोड प्रमाणपत्र
मुंबई : मुंबईतील रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने आघाडी उघडली आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात फेरीवाल्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता रस्त्यावर फक्त क्युआर कोड आधारीत प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत फेरीवाल्यांनाच आपले दुकान थाटता येणार आहे.
महायुती सरकारच्या नव्या फेरीवाला धोरणानुसार, अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी क्युआर कोड आधारित प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच अनधिकृत आणि बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार आहे.
यामुळे बेयकादेशीर रित्या फुटपाथ व्यापणाऱ्या फेरिवाल्यांना आळा बसणार आहे.

३६ हजार कोटींच्या ठेवी
मुंबई महापालिका मोडणार!
मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता भाजपा शासित महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेच्या एकूण ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये ठेवींपैकी ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपयांच्या ठेवी मोडणार आहेत. उर्वरीत ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला त्या तोडता येणार नाहीत.
पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. तसंच चित्र आता पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०९५२.५६ कोटी इतका असणार आहे. २०२५-२६ च्या तुलनेत यंदा ८.७७% नं वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. २०२५-२६ चा अर्थसंकल्प
७४४२७.४१ इतका अंदाजे अर्थसंकल्प होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ६५२५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर करण्यात आलं. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई महानगर पालिकेनं पूल बांधणीचं काम घेतलं हाती
मुंबईत जवळपास एकूण १०१ पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी २४ कामं पूर्ण झाली असून मार्च २०२६ पर्यत २३ कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये ३१ कामे पूर्ण करण्यात येतील. २०२८-२९ मध्ये २३ पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे.

ऑपरेशन सिंधुरमध्ये पाकचे पंतप्रधान ठार झाले असते ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा दावा
न्यूयॉर्क : मी नसतो, तर पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध झाले असते, जर मी हस्तक्षेप केला नसता तर ऑपरेशन सिंदुरदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते, असा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच करून सुरू झालेला 4 दिवसांचा संघर्ष मी थांबवला. ट्रम्प यांनी हे दावे त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्षातील ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणादरम्यान केले. तथापि, जेव्हा त्यांनी हे दावे केले, तेव्हा एका काँग्रेस महिला सदस्याने त्यांना “हे खोटं आहे” असे ओरडून सांगितले. भारताने नेहमीच या प्रकरणात कोणत्याही देशाने मध्यस्थी केलेली नाही, असे वारंवार सांगितलं आहे. या भाषणार ट्रम्प यांनी अनेक दावे केले.
ट्रम्प म्हणाले की इराण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. ते म्हणाले की इराणने आधीच युरोप आणि आमच्या परदेशातील तळांना धोका निर्माण करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत आणि लवकरच अमेरिकेपर्यंत पोहोचतील अशा क्षेपणास्त्रांवर काम करत आहे. ट्रम्प म्हणतात की इराणने 32 हजार निदर्शकांना मारले आणि अमेरिकेला युद्धात ढकलू इच्छित आहे.
ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने गेल्या वर्षी इराणच्या अण्वस्त्र सुविधांवर हल्ला करून इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट केला. प्रथम राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवू इच्छितात, परंतु इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आश्वासन दिले नाही. ते म्हणाले की आम्ही कधीही अण्वस्त्रे विकसित करणार नाही असे शब्द ऐकले नाहीत.

विमान कंपनीविरोधात एफआयआरसाठी रोहीत पवारांची पोलिसस्टेशनला धडक
हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याचीही मागणी
तपास जाणीवपुर्वक संथ गतीने होत असल्यीचा टिका
मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांसारक्या दिग्गज नेत्याचे विमान अपघातात मृत्यू होतो. अपघातातील प्राथमिक चौकशीत विमान कंपनीचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसत असूनही या विमान कंपनीविरोधात एफआयआर का दाखल करीत नाही असा सवाल करीत रोहीत पवार यांनी आज मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली.
दरम्या डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सच्या ४ विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आलीय. या कंपनीला वाचवणाऱ्या केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे.
डीजीसीए ने (नागरी उड्डाण प्राधिकरण) व्हीएसआर व्हेंचर्सला दिलेले सुरुवातीचे क्लीन चिट आणि त्यानंतरच्या विशेष सुरक्षा ऑडिटमधील निष्कर्षांमध्ये मोठी विसंगती असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विधानभवनात माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, २८ जानेवारी २०२६ रोजी, अपघातानंतर लगेचच डीजीसीएने एक अहवाल जारी केला होता. या अहवालात व्हीएसआर व्हेंचर्सच्या लियरजेट विमानामध्ये कोणतीही लेव्हल एक त्रुटी आढळली नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याच दिवशी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनीही व्हीएसआर व्हेंचर्समध्ये सुरक्षाविषयक कोणतीही चिंता नसल्याचे म्हटले होते.
मात्र, अलीकडेच झालेल्या व्हीएसआर व्हेंचर्सच्या विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये विमान उडण्यायोग्य आहे की नाही, हवाई सुरक्षा आणि उड्डाण कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींचा समावेश आहे. जनतेच्या दबावामुळेच हा तपास योग्य दिशेने जात असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. या गंभीर विसंगतीमुळे, त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान आज आमदार रोहित पवार आमदार रोहित पवार मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस स्थानकात दाखल झाले. डीजीसीए आणि व्हीएसआर या विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते पोलिस स्थानकात गेले. रोहित पवारांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात ते आक्रमक भूमिका घेताना दिसले. पोलिसांशी संवाद साधताना रोहित पवारांनी केवळ अर्ज स्वीकारण्याऐवजी थेट एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. हे केवळ एक निवेदन नाही तर एक तक्रार आहे, ज्यावर त्वरित एफआयआर दाखल व्हायला हवा. असे रोहीत पवार म्हणाले.
फोटो कॅप्शन
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन आमदार रोहीत पवार यांनी अमोल मिटकरी, इद्रिस नाईकवडी आणि संदिप क्षीरसागर यां आमदारांसह जाऊन व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी विरोधात बीएनएस कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

बाप बापच असतो….
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेळ काढत आपला मुलगा अर्जुनला वांद्रे येथील एमआयजी क्लबच्या ग्राऊंडवर क्रिकेटचे धडे दिले. जगासाठी मास्टर ब्लास्टर असला तरी अर्जुनसाठी बापाच्या भुमिकेत शिरून सचिनने आज अर्जुनला क्रिकेटच्या टिप्स दिल्या. (छाया प्रकाश पार्सेकर)

धक्कादायक : कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी
मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश
सहा सावकारांची संपत्ती गोठवणार
मुंबई : माणूसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, सावकाराचा जाच टाळण्यासाठी ९ जणांनी चक्क किडण्या विकल्याची माहिती बुधवारी विधानसभेत देण्यात आली. यापैकी ७ जण परराज्यातील असून, दोघे पीडित महाराष्ट्रातील आहेत. यातील एक शेतकरी असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सहा सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिथुर येथील रोशन कुडे याने खासगी सावकाराकडून ९.१५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापोटी सहा आरोपींना ४८.५३ लाख रुपयांची रक्कम आणि एक एकर जमीन ही परतफेड म्हणून दिली. त्यानंतरही तगादा लावल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने कंबोडिया येथे जाऊन आठ लाख रुपयांना किडनी विकून कर्ज फेडले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास केला असता सोलापूर येथील एका मध्यस्था करवी कंबोडिया येथे किडनी विकल्याचे समोर आले आहे. यामध्ये मध्यस्थाने स्वतःसह आणि नऊ व्यक्तींच्या किडन्या कंबोडिया तसेच तामिळनाडूतील स्टार किंम्स हॉस्पिटल येथे विकल्या. या प्रकरणात सावकारी करणाऱ्या सहा आरोपींबरोबरच किडनी खरेदी विक्रीत सहभागी असणाऱ्या अन्य पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली असून एका आरोपीला फरार घोषित केले असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
त्यावर आमदार भातखळकर यांनी आरोपींना मकोका लावणार का, असा सवाल केला. ही गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी विशेष न्यायालय शिक्षा करणार का? सावकारांचे परवाने रद्दचे काय झाले?, असे प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरल्याची माहिती दिली. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असून, या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. उत्तरादाखल मंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सहाजणांची संपत्ती गोठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आरोपी पद्मश्री असेल की अन्य कोणी, कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिल अंबानींचे
३,७१६ कोटींचे घर
ईडीकडून जप्त…
मुंबई : एप्स्टिन फाईलमधिल उघड झालेला सहभाग आणि बँक कर्जातील घोटाळ्याचा टपका असणाऱ्या उद्योगपती अनिल अंबांनींचे मुंबईतील ३,७१५.८३ कोटी रुपयांचे १७ मजली अलिशान घर ईडीने आज जप्त केलेय. अनिल अंबानी यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात असून त्यांच्या अटकेची ही सुरुवात असल्याचे उद्योग जगतात कुजबूज आहे.
ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित कथित बँक फसवणूक प्रकरणाशी जोडलेली असून, तपास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत सुरू आहे.
अनिल अंबानी यांची मुंबईच्या पाली हिल परिसरात ‘अबोध’ नावाची १७ मजली आलिशान इमारत आहे. ही मालमत्ता देशातील सर्वात महागड्या खासगी निवासस्थानांपैकी एक मानली जाते.
अनिल अंबानी आणि त्यांच्या समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत १५,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिलेल्या आश्वासनाची दखल घेतली आहे. या आश्वासनात अंबानी देश सोडणार नाहीत आणि तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ देणार नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास संस्थांच्या संथ कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने निष्पक्ष तपासाची अपेक्षा व्यक्त करत, वेळोवेळी तपास प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ईडीने गेल्या वर्षी सीबीआय कडून दाखल एफआयआरनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. एफआयआरमध्ये अनिल अंबानी, आरकॉम आणि इतरांविरोधात फसवणूक, कटकारस्थान आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आरकॉम आणि तिच्या सहयोगी कंपन्या असून, त्यांनी २०१० ते २०१२ दरम्यान भारतीय आणि परदेशी बँकांकडून ४०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतल्याचा आरोप आहे. यापैकी पाच कर्ज खात्यांना नंतर बँकांनी ‘फ्रॉड’ घोषित केले आहे.

केडीएमसी क्षेत्रातील उद्यानांच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण पश्चिम येथील बहुतांश उद्यानात अस्वच्छता पसरली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिला होता मात्र संबंधित ठेकेदारांकडून उद्यानांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे. बहुतांशी उद्यानांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी योग्य जागा नाही आहे, दुर्गंधी पसरली आहे. उद्यानाचा वापर कॅन्टीन चालवण्यासाठी केला जात आहे त्यामुळे संबंधित विभाग करतो काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, धर्मवीर आनंद दिघे नाना-नानी पार्क व आंबेडकर उदयान याचा ठेका देखभाल दुरूस्तीसाठी दिलेला असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांचे हास्य क्लब, महिला वर्गाचा हास्य क्लब तसेच दोन्ही ठिकाणी नागरीक मोठया प्रमाणात फिरायला येत असतात. दोन्ही ठिकाणचे असलेले शौचालय पूर्णपणे दुर्गंधीने भरलेले असतात. तसेच त्या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा, इतर खादय पदार्थ, दारूच्या बाटल्या वारंवार पडलेल्या दिसत असून त्यामुळे नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी पहायला मिळत आहे. उदयाने ठेका पध्दतीने दिलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी या ठेकेदाराची असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नसल्याकारणाने अनेक अनुचित प्रकार या ठिकाणी घडत असतात.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती माजी नगरसेवक मोहन उगले यांनी उदयान अधिक्षक संजय जाधव यांना वारंवार दिलेली आहे. परंतू या विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने उगले यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन देत लक्ष वेधले आहे.
