11 Aug Bitambatmi All pages

Open Book

कल्याण : अचीवर कॉलेज, कल्याण येथे ९ ऑगस्टला ठाणे जिल्हा गतका असोसिएशन व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका गतका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गतका निवड चाचणी उत्साहात पार पडली. या चाचणीत विविध स्पोर्ट्स अकॅडमीमधून ७० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची २८ ते ३० ऑगस्ट  दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गतका अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना पुढील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
निवड चाचणीसाठी असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्रच्या सचिव प्रा. आरती चौधरी, अचीवर कॉलेजचे संचालक डॉ. सीए महेश भिवंडीकर, ठाणे जिल्हा गतका असोसिएशनचे सचिव मंथन पवार, एजीएमचे आयटी हेड स्मित चौधरी, कल्याण-डोंबिवली गतका असोसिएशनचे सचिव धीरज कोट तसेच टेक्निकल ऑफिशियल धनुष, बाबू, शरणकुमार, संजय, मानसी पवार, प्रेम पोटे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंचा उत्साह वाढवत त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्याने निवड चाचणी सुरळीतपणे पार पडली.
०००००००००

मुख्यमंत्र्यांकडे सीटूची मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे : कोविड-१९ महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी व मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागाने १३ मार्च २०२० व २४ मार्च २०२० रोजी काढलेल्या सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांनी जनजागृती, महाआयुष सर्वेक्षण, आरोग्यविषयक उपाययोजना तसेच कोविडसंदर्भातील विविध कामे अहोरात्र आणि जीव धोक्यात घालून केली. या कर्मचाऱ्यांना नियमित मानधनाव्यतिरिक्त दरमहा ₹१,००० प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
मात्र, शासनाच्या सूचनांनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांना आजतागायत हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदांनी ही जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याचे सांगितले असून, ग्रामपंचायती निधीअभावी भत्ता देण्यास असमर्थ असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना परिपत्रकानुसार प्रत्येकी सुमारे ₹२४,००० इतका प्रोत्साहन भत्ता तातडीने मंजूर करून वितरित करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
०००००

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राजकारणाचा महत्त्वाचा भाग असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा हिटलरवादी विचारसरणीवर आधारित असल्याचा आरोप लोकशाहीर संभाजी भगत यांनी केला. संघाला देशात विरोधी पक्ष नकोत, संघाचा संविधानाला मनापासून विरोध आहे. संविधान जाळणारे आणि ते जाळल्यानंतर आनंद व्यक्त करणारे लोक आहेत, असा दावा करत संघाच्या हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संभाजी भगत यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त महा अंनिस ठाणे शहर शाखेच्या वतीने १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन, सातारा या संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत सुबोध मोरे, महा अंनिस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, महा अंनिस प्रकाशन विभागाचे कार्यवाह तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, महा अंनिस केंद्रीय सदस्य व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सुशीला मुंडे, महा अंनिस ठाणे शहर कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर हे समाजवादी, गोविंद पानसरे साम्यवादी, तर एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे सेक्युलरवादी विचारांचे होते. तरीही कोणताही भेदाभेद न करता त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे आपणही समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी किंवा सेक्युलरवादी असा भेदभाव न करता संघाच्या हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात एकत्र उभे राहून पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारला पाहिजे, असे आवाहन संभाजी भगत यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही आपले विचार मांडले. हिटलरने आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचा दावा करत सुमारे ६० लाख ज्यूंची हत्या केली. हिटलर हा संघाच्या विचारविश्वातील आदर्श असल्याने संघ आणि हिटलर यांच्यात वैचारिक संवाद सुरू असल्याचे केतकर यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महा अंनिसच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने चळवळीची गीते सादर करण्यात आली. संविधानाच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल महा अंनिस ठाणे शहर शाखेतील अशोक मोहिते, किशोर भोईर, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, विजय गडलिंग, छाया ठाणेकर, दर्शना ढोले आणि प्रमोद तामसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
००००
००००००००

 मनोज प्रधान यांचा ठाण्यातील आमदारांवर घणाघात
अनिल ठाणेकर
ठाणे – ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला आहे. सोशल मिडीयावर १०० टक्के लोक विरोध करीत आहेत. असे असताना, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे तीन आमदार,  “हा प्रकल्प फेस्टिव्हल होणार नाही म्हणून पुढे सरकवा; सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून २०० मीटर पुढे न्या; कळवा- मुंब्रा येथे प्रकल्प न्या”, असे सल्ले देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिले, तर सर्कसचीच अपेक्षा करा!, असा टोलाही प्रधान यांनी लगावला आहे.
मनोज प्रधान यांनी रिंग मेट्रो रेल्वेला सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प ठाणे शहराच्या मूळावर उठणार आहे, असे प्रधान यांनी सप्रमाण पटवून दिले आहे. त्यावर ठाणे शहरातील तीन आमदारांनी तीन अव्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्यावर प्रधान यांनी टीकेचा सूर आळवला आहे.
प्रधान यांनी सांगितले की,  रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आला आहे.  १२,२०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, आपला पहिला प्रश्न आहे की,  हा प्रकल्प मागितला कुणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे?  सोशल मीडियावर बघितलं, तर १०० पैकी १०० कमेंट्स ह्या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचे कारण आहे की, मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच गेले १० वर्ष चालू करू शकलेले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय.
आपण सुरूवातीलाच १,००० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा, पण आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच  बोलायचे नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करीत असले तरी एका सोसायटीचे लोक,  आमच्या समोर स्टेशन नको, २०० मीटर पुढे स्टेशन घेऊन जा. दुसरे सोसायटी वाले सांगतात, या रस्त्यावर नका घेऊ, मागच्या रस्त्यावर नेऊन घ्या, असे म्हणत आहेत.
हा अतिशय चुकीचा पायंडा पडतोय. १२,२०० कोटीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एक तर लोकांच्या सूचना – हरकती घेतल्याच नाहीत. लोकांना हा प्रकल्पच नको आणि भातुकलीसारखा खेळ सुरू केलाय. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, नियोजनशून्य विकास आम्हाला मान्य नाही.हा प्रकल्प राबविताना जे नियोजन करायचे होते ते करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प राबवित असताना प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी २०३५ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत. कारण, त्यांनी नागरिकांच्या सुचना – हरकती – सल्ले घेऊ, असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच आहे. परंतु, सुचना , हरकती येण्याआधीच जर कामे सुरू असतील तर फायदा कसा काय होणार?  त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सुचना स्वीकारून त्यावर साधक – बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचे कामच सुरू करू येऊ नये,  तसेच मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच पूर्ण कार्यन्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचार  करू नये, अशी आमची मागणी असल्याचेही प्रधान यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केल्या तिरंगा राख्या
 विविध शाळांमध्ये स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी ‘तिरंगा राखी बनविणे’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाणे महानगरपालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक तिरंगा राख्या तयार केल्या.
राखी निर्मितीच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात ठामपाच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्त्व समजावून सांगत राखी तयार करण्याच्या विविध टप्प्यांमध्ये मार्गदर्शन केले. केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंग्याच्या रंगांचा कल्पक वापर करून विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. १८, २५ आणि ५४ येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत तिरंगा राखी तयार करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगती आणि कलात्मक कल्पनांचा वापर करून आकर्षक तिरंगा राख्या तयार केल्या.
बाळकूम येथील शाळा क्र. ६० येथेही विद्यार्थ्यांसाठी तिरंगा राखी तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी स्थानिक नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर तसेच गटअधिकारी संगीता बामणे उपस्थित होत्या.
शाळा क्र. १२७ येथेही ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत राखी बनविण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून स्थानिक नगरसेविका कमल चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत घराघरांत पोहोचावा, या उद्देशाने ठामपाच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तिरंगा राखी निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तिरंगा राख्यांमधून देशभक्तीची भावना व्यक्त केली.
ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राखी निर्मितीसह विविध देशभक्तीपर आणि सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कळवा प्रभाग समिती येथेही शालेय विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्त्व आणि स्वातंत्र्यदिनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी कळवा प्रभाग समिती अध्यक्षा विजया लासे, माजी उपमहापौर मनोज लासे, सहायक आयुक्त ललिता जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००

 मराठीचे ज्ञान अनिवार्य
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार-  प्रताप सरनाईक
अनिल.ठाणेकर
ठाणे-१ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्टला ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री  उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यभर राबविण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो.”
ते पुढे म्हणाले, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा. आम्ही कोणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही. महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येकजण आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मराठी शिकवणी अभियानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून पुढाकार घेत अमराठी चालकांना मराठी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. या अभियानाच्या माध्यमातून हजारो चालकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असून त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र केवळ प्रमाणपत्र दाखविल्यामुळे कारवाई टळणार नाही. आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. त्या संवादामध्ये चालकाला मराठीत उत्तर देता आले, तरच त्याने नियमांचे पालन केल्याचे मानले जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कायद्यामध्ये जे नमूद आहे त्यानुसारच कारवाई होईल. आरटीओ अधिकारी तपासणी करतील आणि आवश्यक ती कार्यवाही करतील. कायद्याच्या कक्षेत राहूनच पुढील निर्णय घेतले जातील.
यावेळी त्यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले. समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहीत धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांचीच नाही, तर प्रत्येक मराठी नागरिकाची आहे, असे ते म्हणाले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या अभियानाने राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. उर्वरित अमराठी चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण करून मराठी आत्मसात करावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘बाल चित्रकला स्पर्धा’ या राज्यस्तरीय उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील कल्पनांना रंगाच्या माध्यमातून चित्ररूप दिले. नमुंमपा शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनास अनुसरून या स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील ३७०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांमधील कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव देत त्यांचा विकास करण्याकरिता तसेच महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये १४ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार या बाल चित्रकला स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
इयत्ता दहावीपर्यंत ४ गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बाल चित्रकला स्पर्धेचे विषय शासन निर्देशानुसार स्पर्धेच्या वेळीच जाहीर करण्यात आले. इयत्ता दहावी पर्यंत ४ गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली असून विजेत्या  विद्यार्थी स्पर्धकांना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी म्हणजेच बाल दिनाच्या दिवशी गौरविण्यात येणार आहे. बाल चित्रकला स्पर्धेच्या दिवशी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी तसेच केंद्र समन्वयक यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले.

मुंबई. …नुकत्याच दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ५३ वर्षीय तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांनी शानदार कामगिरी करताना ३ रौप्य आणि १ कास्य पदकाची कमाई केली. कोरिया स्पर्धेत त्यांनी पुमसेमध्ये  आणि क्युरोगी प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर नंतर थायलंड स्पर्धेत गुलदेकर यांनी क्युरोगी प्रकारात रौप्य आणि पुमसेमध्ये कास्य पदक मिळवले. या दोन्ही स्पर्धात अंदाजे ३० देशांचे ३ हजार पेक्ष्या जास्त खेळाडू सहभागी झाले होते.
मोहन स्पोर्टस् अकादमीचे संतोष सर मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच ते ब्लॅक बेल्ट ५ डन असुन त्यांच्या या यशात गुरु स्व.मोहन सर,अदिती,आर्या,श्रेया यांचा मोठा वाटा आहे. संतोष गुलदेकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व थरातुन‌ खास अभिनंदन करण्यात येत आहे.

आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष प्रयत्न
अशोक गायकवाड
रायगड-लिबाग : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत दत्तक प्रक्रियेला गती दिली आहे. दत्तक ग्रहण नियमावली, २०२२ अंतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा बाल संरक्षण समिती, रायगड किशन जावळे यांच्या परवानगीने जिल्ह्यातील तीन दत्तक प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दोन संस्थात्मक दत्तक प्रकरणे असून संस्थेतील बालकांना कायदेशीररित्या कायमस्वरूपी कुटुंब उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच एक नात्यांतर्गत दत्तक प्रकरण मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तीन बालकांना सुरक्षित, प्रेमळ व कायमस्वरूपी कुटुंबाचा आधार मिळाला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संबंधित विशेष दत्तक संस्था तसेच केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण यांच्या समन्वयातून या ऑनलाइन प्रणालीद्वारे पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, महिला व बालविकास मंत्री यांच्या निर्देशानुसार प्रलंबित दत्तक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक निराधार बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून दत्तक प्रक्रियेला अधिक गती दिली जाईल.दत्तक प्रक्रिया ही निराधार बालकांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाची असून समाजातील पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत प्रक्रियेद्वारे दत्तक घेण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणी करावी • पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेचा अवलंब करून निराधार बालकांना प्रेमळ व सुरक्षित कुटुंबाचा आधार द्यावा असे आवाहन महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. • दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणी : https://cara.wcd.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *