29 July Bitambatmi All pages

Open Book
Open Book

 १०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
कल्याण : वारी पंढरीची सेवा आरोग्याची या ब्रीदवाक्याने सलग चार वर्षे लोणंद (सातारा) येथील पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांची निःस्वार्थ आरोग्यसेवा केल्यानंतर, तीच सेवेची भावना जपण्यासाठी विटावा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्ताचे औचित्य साधून आयोजित या शिबिरात १०० हून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्य व डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली. विशेष म्हणजे, शिबिरात आलेल्या पहिल्या ५० रुग्णांना अधिक चार दिवसांचे मोफत उपचार देण्यात येणार आहे. २००४ पासून समाजहिताचे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने विविध ठिकाणी संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल बोलताना आसारा फाउंडेशन चे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे यांनी सांगितले की, “सेवेतच विठ्ठल आहे आणि प्रत्येक निरोगी हास्यातच पांडुरंगाचे दर्शन घडते, या श्रद्धेने आम्ही हे कार्य पुढे नेले आहे. नागरिकांचा मिळालेला हा भरभरून प्रतिसाद आम्हाला भविष्यातही असे उपक्रम राबवण्यासाठी ऊर्जा देणारा आहे.”

 आरपीआयचे कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन
अशोक गायकवाड
रायगड-कर्जत : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या बैठकीत मागासवर्गीय प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्यास निवेदन देण्याचे ठरले असता राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) प्रवर्गाचे प्रस्तावित केलेले उप-वर्गीकरण संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का लावणारे आणि समाजात फूट पाडणारे आहे, असा थेट आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज कर्जत तहसीलदार यांना विरोध असल्याचे निवेदन सादर करण्यात आले. आरक्षणाचा हा प्रस्तावित निर्णय तातडीने मागे न घेतल्यास संविधानिक पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी आदिवासी समाज, रायगड जिल्हा अध्यक्ष, मालु निरगुडा, कर्जत तालुका आरपीआय संपर्कप्रमुख, किशोर द्वारकानाथ गायकवाड, कर्जत तालुका सचिव,अशोक दत्तु गायकवाड, कर्जत तालुका प्रवक्ते, प्रेमनाथ जाधव, कर्जत शहर अध्यक्ष, उदय जाधव, कर्जत तालुका महिला अध्यक्षा, अलका सोनवणे, भारतीय बौद्ध सभा कर्जत तालुका अध्यक्ष, बबन हसू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते हरिचंद्र जाधव सर, भारतीय बौद्ध महासभा कार्यकर्ते संजय जाधव, ग्रुप ग्रामपंचायत कोंडीवडे, मा.सरपंच मारुती चव्हाण, मा. महिला नेरळ शहर अध्यक्षा कोमल चंदनशिवे, नेरळ उपशहर अध्यक्ष,रवींद्र जाधव, आरपीआय कार्यकर्ते प्रवीण गायकवाड, संदीप गायकवाड, उज्वला सोनवणे, मयूर गायकवाड, विशाल गायकवाड, अतुल सोनवणे, सुमित गायकवाड, मुकेश आढाव, कर्जत तालुका प्रसिद्धीप्रमुख आरपीआय विजय गायकवाड यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या धोरणावर गंभीर कायदेशीर आणि घटनात्मक आक्षेप नोंदवले आहेत. कलम ३४१ च्या मूळ गाभ्याला धक्का: संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार अनुसूचित जाती हा एक अखंड आणि एकसंध प्रवर्ग आहे. राज्य शासनाने याचे उप-वर्गीकरण करणे म्हणजेच संविधानाच्या एकात्मिक स्वरूपाला छेद देण्यासारखे असून ते पूर्णपणे घटनाबाह्य ठरेल. ‘इंद्र साहनी’ खटल्याच्या तत्त्वांचे उल्लंघन: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने ‘इंद्र साहनी विरुद्ध केंद्र सरकार (१९९२)’ खटल्यात स्पष्ट केले होते की, अनुसूचित जाती-जमाती हे अत्यंत वंचित घटक असल्याने त्यांच्यात ‘क्रिमी लेयर’ किंवा अंतर्गत उप-वर्गीकरण लागू करता येणार नाही. शासनाचा चालू असलेला घाट या ऐतिहासिक निकालाच्या विरोधात आहे. समानतेच्या अधिकाराचा संकोच (कलम १४): या निर्णयामुळे एकाच प्रवर्गातील काही जातींना कृत्रिमरीत्या लाभ मिळून इतर अनेक जाती हक्कांपासून वंचित राहतील. परिणामी, मागासवर्गीयांमध्येच एक नवा शोषित वर्ग तयार होईल. शास्त्रीय आकडेवारीचा (Quantifiable Data) अभाव: राज्य शासनाकडे सध्या कोणत्याही जातीच्या सामाजिक व शैक्षणिक प्रतिनिधित्वाची अधिकृत, अचूक व पारदर्शक आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सामाजिक सलोखा धोक्यात: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित समाजाला एकत्र आणून एक मजबूत सामाजिक शक्ती निर्माण केली. मात्र, या उप-वर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजामध्ये आपापसात अंतर्गत स्पर्धा आणि संघर्ष निर्माण होऊन सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. “आरक्षणाचा मूळ उद्देश संविधानात्मक ‘प्रतिनिधित्व’ देणे हा आहे, ‘गरीबी निर्मूलन’ नाही. उप-वर्गीकरणामुळे आरक्षणाची मूळ संकल्पनाच धोक्यात येईल. शासनाने हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रासह कर्जत तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आरपीआयचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी निवेदन देताना दिला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांचे वक्तव्य
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
कल्याण : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. असं काम केले पाहिजे, अशी भरारी घेतली पाहिजे की  आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात तुमच्याविषयी अभिमानाची आनंदाची चमक दिसली पाहिजे. आई-वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहण्यासाठी प्रयत्न करा, प्रेयसीच्या नाही असे स्पष्ट मत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणच्या शैक्षणिक उपक्रम शाखा आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी मुक्त संवाद साधून प्रेरणा देणाऱ्या काही सिनेमांची उदाहरणे देऊन त्यांना बोलते केले.  यावेळी त्यांनी सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या बाबत माहिती देऊन जनजागृतीही केली. कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, आदर्श करिअर पॉईंट, नाशिकचे संचालक गोरक्ष सांगळे, अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, सरचिटणीस अर्जुन डोमाडे आणि कोषाध्यक्ष प्रा. रामनाथ दौंड व्यासपीठावर उपस्थित होते.
मारुती आंधळे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यां समोर प्रेरणादायी विचार मांडले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात ‘दहावी बारावी नंतर काय?’ या विषयावर गोरक्ष सांगळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाचे तंत्र या विषयावर योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी  आणि पदवितर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रिक्षाचालक संतोष घुगे यांची मुलगी गौरी घुगे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण  होऊन वकील झाल्याबद्दल आणि वृत्तपत्र विक्रेत्या मंगल कांगणे आणि विलास कांगणे यांची मुलगी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाल्याबद्दल दोन्ही पालकांचा विशेष सन्मान यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे जयश्री दौंड आणि दिगंबर पालवे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन प्रा.अर्जुन उगलमुगले आणि निकिता उगलमुगले यांनी केले.

पोलिसाला लाकडी दांडक्याने मारले, चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद तरुण नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रारीनंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. मात्र, राहुल तायडे नावाच्या तरुणाने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. काठीने हल्ला करत मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र घटनेच्या सीसीटीव्ही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
००००००

मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा
 महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार ३० ऑगस्टला होणार असल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली. सात वर्षानी ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी, नागरिकांनी सहभागी आवाहन असे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (शरद पवार गट) अभ‍िजीत पवार, महापालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक योगेश जानकर, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता व क्रीडा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने पार पडणार असून आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग व संबंधित विभागांना सोपविण्यात आलेली जबाबदारी योग्य रितीने पार पडावी अशा सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिल्या.
ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करुन घ्यावीत. स्पर्धा मार्ग हा स्पर्धकांसाठी अडथळ्याचा ठरणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच स्पर्धेच्या दिवशी वाहतूकीचे योग्य पध्दतीने नियोजन करावे, शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील हे पहावे. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेस उपलब्ध करुन विद्यार्थ्यांची आवश्यक ती काळजी घ्यावी या दृष्टीने नियोजन करावे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्‌या सर्व परवानग्या घेण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट (महिला व पुरुष)- २१ किमी, १८ वर्षावरील (महिला व पुरुष)- १० किमी, १८ वर्षाखालील (मुले व मुली)- १० किमी असे विभाग आहेत. तर, जिल्हास्तरीय गटात १५ वर्षाखालील (मुले व मुली)- ५ किमी, १२ वर्षाखालील (मुले व मुली)- ३ किमी, ज्येष्ठ नागरिक (पुरुष आणि महिला) – ५०० मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी बैठकीत दिली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून https://racesregistrations.com/event/४९६ या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावी व मोठ्या संख्येने या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.
००००००००

 फिर्यादीच्या बाजूने नवा ट्विस्ट, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश
कल्याण :  मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज सुओ मोटू याचिका क्र. १/२०२६ मध्ये रमेश म्हात्रे प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. याचवेळी या प्रकरणात प्रथमच मूळ फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांच्या वतीने स्वतंत्रपणे न्यायालयात प्रतिनिधित्व करण्यात आले. फिर्यादीच्या वतीने ॲड. अभिनय रविंद्र अडसूळ, ॲड. अक्षय भालेराव, ॲड. विवेक निशाद, ॲड. श्रीराम चिंदारकर, ॲड. गणेश नागरगोजे तसेच ॲड. गणेश तिवारी यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अक्षय भालेराव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, फिर्यादीच्या जीवाला गंभीर धोका असून त्यांना वारंवार बीएनएसएस कलम १८३ अंतर्गत जबाब नोंदविण्यासाठी कल्याण येथे उपस्थित राहण्याचे पोलिसांकडून फोन येत आहेत. आरोपी हा प्रभावशाली राजकीय व्यक्ती असून त्याच्या समर्थकांकडून फिर्यादीला पूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला. त्यामुळे फिर्यादीचा जबाब कल्याण येथे नोंदविण्याऐवजी त्यांच्या मूळ गावाजवळील सक्षम न्यायिक दंडाधिकाऱ्यासमोर नोंदविण्यात यावा आणि त्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली. सध्या या प्रकरणाचा तपास विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुरू होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून हा तपास काढून घेऊन तो डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यापुढील तपास डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येणार आहे.
याशिवाय, न्यायालयाने फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांचा बीएनएसएस कलम १८३ अंतर्गत जबाब त्यांच्या मूळ जिल्ह्यातील सक्षम मॅजिस्ट्रेट न्यायालयामार्फत नोंदविण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले. तसेच जबाब नोंदविताना फिर्यादीला आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रसंगी न्यायालयाने फिर्यादीस स्वतःची बाजू मांडण्यासाठी आवश्यक अर्ज  दाखल करण्यासाठी मुदत दिली. तसेच रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील यापूर्वीची स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी ३१ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी निश्चित केली.
या सुनावणीनंतर प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम राहणे, तपास डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याचे निर्देश, फिर्यादीचा जबाब त्यांच्या मूळ जिल्ह्यात नोंदविण्याचा निर्णय, फिर्यादीला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश तसेच फिर्यादीस स्वतःची बाजू मांडण्यासाठी अर्ज दाखल करण्यास न्यायालयाने दिलेली परवानगी यामुळे या प्रकरणाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
००००

 लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट – टास्कफोर्स कर्जत विभागातर्फे
अशोक गायकवाड
रायगड-र्जत : रविवार, २६ जुलैला कर्जत तालुक्यातील बार्डी येथे लाईट ऑफ लाइफ ट्रस्टच्या टास्कफोर्स कर्जत विभागामार्फत टास्कफोर्स सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. टास्कफोर्स रिजनल बॉडीचे अध्यक्ष साहिल कदम यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर आनंदो प्लस प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख आणि टास्कफोर्स रिजनल बॉडीच्या उपाध्यक्षा दीक्षिता गोगटे यांनी “स्वतःची ओळख, स्वप्ने, ध्येय आणि सामाजिक जबाबदारी” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिली सेंटरच्या सहाय्यक सेंटर लीडर दीक्षा सोनावणे यांनी केले. प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने बार्डी गावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. टास्कफोर्स सदस्यांनी स्वच्छता, शिक्षण आणि व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृती रॅली काढून ग्रामस्थांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण केली. याचबरोबर ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि रुग्णांना गरजेनुसार गोळया आणि औषधे देण्यात आल्या तसेच नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, ज्याचा ५१ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच १०० ग्रामस्थांचे आयुष्यमान भारत व आभा कार्ड तयार करून देण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये कर्जत विभागातील टास्कफोर्सचे ४५ सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी डॉ. बन्सीलाल पाटील, पियुष ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स सेंटरचे महेश गुप्ता तसेच अर्जुन इंटरप्राईजेसचे अर्जुन लाड यांचे विशेष सहकार्य लाभले. लाईट ऑफ लाइफ ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख, सहाय्यक समन्वयक पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच पौर्णिमा कांबरी, वैभवी विरले, प्रांजल कांबरी, प्रथमेश ठाकरे आणि आदित्य ठोंबरे या बार्डी गावातील टास्कफ़ोर्स सदस्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर व सर्व सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पुर्ण झाले.

मुंबई :  चेंबूर जिमखान्याच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने अनुभवी माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडेला २५-७, २५-१० असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजय संपादन केला. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या पंकज पवारने मुंबईच्या राहुल सोलंकीला २५-१५, २५-२२ असे नमवले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत मुंबईच्या संजय मांडेने ठाण्याच्या पंकज पवारवर २३-१७, २४-१५ व मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या राहुल सोलंकीवर २५-१९, २५-१० अशी मात केली होती.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याची मधुरा देवळे सरस ठरली. तिने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर सरळ दोन सेटमध्ये २४-१८, २५-६ असा विजय मिळवला. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने मुंबईच्या मैत्रीयी गोगटेवर १६-१७, २०-१५ व २२-१५ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी आकांक्षा कदमने तीन सेटमध्ये  प्राजक्ता नारायणाचा ०-२५, २२-२० व २३-११ तर मधुरा देवळेने तीन सेट नंतर मैत्रेयी गोगटेचा ८-२३, २३-४ व २५-० असा विजय मिळवला होता.
विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे जिमखान्याचे अध्यक्ष श्री सुरिंदर शर्मा, उपाध्यक्ष श्री श्याम अगरवाल, स्पोर्ट्स सचिव श्री रणजित धामी, सह सचिव श्री पी. एम. बाला, कॅरम आणि बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब, स्पर्धेचे प्रायोजक एन. एल. गुप्ता, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सह सचिव केतन चिखले व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संतोष चव्हाण यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *