27 Aug Bitambatmi All pages

Open Book

राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत मार्गदर्शन
कल्याण : लाइफ वॉचर्सतर्फे युवकांमध्ये सामाजिक आणि शालेय आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून एस.डी.टी. कलानी स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापरापासून बचाव या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम लाइफ वॉचर्सच्या स्कूल हेल्थ एज्युकेशन प्रोग्रामअंतर्गत, मनॊदय न्यूरोसायकट्रीक हॉस्पिटल, कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमित धर्माधिकारी यांनी राग समजून घेणे, भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे तसेच समवयस्कांचा दबाव आणि शैक्षणिक ताण यांचा आरोग्यदायी पद्धतीने सामना करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या आणि व्यसनांच्या समस्येबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि योग्य व जबाबदार निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिसंवादातील एक महत्त्वपूर्ण संदेश होता — “अमली पदार्थांना ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका.” मित्र किंवा इतर व्यक्तींकडून अमली पदार्थ घेण्यासाठी दबाव आणला जात असल्यास आत्मविश्वासाने नकार कसा द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा कठीण किंवा धोकादायक परिस्थितीत विश्वासू व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना आपल्या भावनांना समजून घेणे, समवयस्कांचा दबाव ओळखणे आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आरोग्यदायी सामोरे जाण्याच्या पद्धती तसेच समस्या निवारणाची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
हा कार्यक्रम लाइफ वॉचर्सच्या संस्थापक डॉ. रुपिंदर कौर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. त्या लाइफ वॉचर्सच्या शालेय आरोग्य शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. शालेय जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण रुजवणे आणि बालक व किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा सर्वांगीण विचार करणारे जनजागृती कार्यक्रम विकसित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाला लाइफ वॉचर्सचे सहसंस्थापक रत्नेश महाडिक यांचीही उपस्थिती होती. एस.डी.टी. कलानी स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना मनुजा तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला सहकार्य करून उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रुपिंदर कौर यांनी सांगितले की, योग्य वयात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांना जबाबदार निर्णय घेण्यास मदत होते आणि त्यांना अधिक निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भविष्य घडवता येते.

कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, मराठी शाळा आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना संगम – ईद-ए-मिलाद व रक्षाबंधन सोहळा’  साजरा करण्यात आला.
गफूर शेठ डोन उर्दू या शाळेत आयोजित कार्यक्रमात दोन्ही शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उर्दू शाळेच्या शिक्षिका डिबा दफेदार  यांनी ईद-ए-मिलादचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले, तर सम्राट अशोक विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी काळे यांनी रक्षाबंधनचे महत्त्व व त्यामागील भावनिक नाते याबाबत माहिती दिली. उर्दू शाळेचा विद्यार्थी सूर्यफातिया चे पठण केले.
यानंतर दोन्ही शाळांतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून ‘एकतेचा धागा, सद्भावनेचा संदेश’ दिला. विद्यार्थ्यांनीही मुलींना भेटवस्तू देत या बंधुभावाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. दोन्ही शाळांतील महिला व पुरुष शिक्षकांनीही एकमेकांना राख्या बांदत कार्यक्रमात सहभाग घेतला.  कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाला गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रुबीना शेख  तसेच सम्राट अशोक विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्यासह  दोन्ही शाळांतील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले, “भारत देश हा सुसंस्कृत देश आहे. जाती-धर्माचे राजकारण करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या रूढी-परंपरा आणि सणांचा आदर करत आपण सर्व भारतीय एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनाचा सोहळा एकत्र साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव आणि सद्भावनेच्या भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे.”असे ही म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश धनविजय  यांनी केले, तर आभार फिरदोस मणियार यांनी मानले.
0000

– विधेयक २०२३ मध्येच मंजूर –वर्षा गायकवाड
मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३% आरक्षण देणारे ‘संविधान (१०६ वी घटनादुरुस्ती) विधेयक’ २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले आहे, या विधेयकाला काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांनीही एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अद्याप केलेली नाही. महिलांना आरक्षण देण्याची मानसिकता भाजपाची नाही. त्यांच्या मुळ विचारसरणीत आरक्षणाला विरोध आहे आणि महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन सर्वांना माहित आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले आहे पण आता भाजपा सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक मांडण्याचा प्रयत्न करत आहे. डिलिमिटेशन विधेयक हे देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकड्यात विभाजन करणारे विधेयक आहे म्हणून त्याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धीभेद करू नये असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमात महिलांची सुरक्षा, अधिकार व त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ही चर्चा सर्व जाती धर्माच्या मुली व महिलांसाठी होती पण प्रत्येक गोष्टीकडे जात व धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची विकृत मानसिकता भाजपाची असल्याने ते या मुद्द्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. छात्रों की गुंज कार्यक्रमात मुलींनी भाजपाला योग्य तो संदेश दिल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून बिथरलेला भाजपा राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
००००००

 खडकपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
कल्याण : आधारवाडी कारागृहात ई-मुलाखतीच्या कारणावरून दोन न्यायाधीन बंदींनी कारागृह शिपायासोबत धक्काबुक्की आणि झटापट केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शिपाई राजू पोरे यांच्या खांद्याला दुखापत झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बंदींविरोधात बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कारागृह शिपाई राजू पोरे हे सोमवारी बंदींच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या ई-मुलाखतीच्या कक्षात ड्युटीवर होते. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ विकी राजेंद्र कवठणकर आणि हितेश ऊर्फ मोगली कवठणकर हे दोघे आधारवाडी कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहेत.
दोन्ही बंदींच्या नातेवाईकांनी ई-मुलाखतीसाठी केलेल्या विनंतीला शिपाई पोरे यांनी मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ई-मुलाखत कनेक्ट होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही बंदींना मुलाखत कक्षाबाहेर उभे राहण्यास सांगण्यात आले. मात्र, दोन्ही बंदी पुन्हा ई-मुलाखत कक्षात आले आणि तेथील लॅपटॉप उचलला. शिपाई पोरे यांनी त्यांना लॅपटॉप घेण्यास मनाई केली. यावरून दोन्ही बंदींनी पोरे यांच्या वर्दीला हात घालत त्यांच्यासोबत धक्काबुक्की व झटापट केली. यावेळी बंदींनी पोरे यांना कमरेला पकडून उचलण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार शिपाई राजू पोरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही न्यायाधीन बंदींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
००००

आरक्षण हा संविधानिक अधिकार, वंचित घटकांना अधिक संधी देण्याची गरज
अनिल ठाणेकर
ठाणे : देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आरक्षणविरोधकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली असून, आरक्षणाला विरोध करणे म्हणजे संविधानाने दिलेल्या अधिकाराला विरोध करणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी ही भूमिका मांडली. आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आरक्षण ही कोणत्याही सरकारची किंवा राजकीय पक्षाची सवलत नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास तसेच ऐतिहासिकदृष्ट्या वंचित घटकांना प्रतिनिधित्व आणि समान संधी मिळावी यासाठी संविधानिक चौकटीत निर्माण झालेली व्यवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षण संपविण्याऐवजी वंचित समाजघटकांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या अधिकाधिक संधी कशा उपलब्ध होतील, यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयरची अट लागू करण्यास आपला विरोध असल्याची भूमिकाही आठवले यांनी यापूर्वी स्पष्ट केली आहे. एससी-एसटी आरक्षणाचा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विचार झाला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मात्र त्यासाठी ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात देशात विविध प्रवाह निर्माण होत असताना आठवले यांच्या भूमिकेमुळे या विषयावरील राजकीय चर्चेला पुन्हा धार येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करता येईल, हा स्वतंत्र कायदेशीर विषय असून, आठवले यांची भूमिका ही राजकीय मागणी म्हणून पाहावी लागणार आहे.

– स्नेहा सखी गटाला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
अनिल ठाणेकर
ठाणे : पारंपरिक खेळांना आधुनिकतेची जोड देत शेकडो महिलांनी ठाण्यात मंगळागौरीचा उत्सव उत्साहात साजरा केला. युवतींसह मध्यमवयीन महिलांनी सादर केलेल्या मंगळागौरीच्या खेळांतून समृद्ध मराठी परंपरेचे दर्शन घडले. भाजप आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने गडकरी रंगायतन येथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश युवा पिढीला मराठमोळ्या सण-परंपरांची ओळख करून देणे हा आहे. राज्याच्या विविध भागांतून महिला स्पर्धक सहभागी झाल्या. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी सातपर्यंत रंगला. पारंपरिक खेळांसोबत सामाजिक संदेश आणि जनजागृतीवरही भर देण्यात आला. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या स्नेहासखी गटाने ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. नवी मुंबईच्या रुचिरा गटाने २१ हजार रुपयांसह द्वितीय, डोंबिवलीच्या ‘साझ ह्यो तुझा’ गटाने ११ हजार रुपयांसह तृतीय, करीरोडच्या शिवाई गटाने पाच हजार रुपयांसह चतुर्थ, तर डोंबिवलीच्या मराठमोळ्या गटाने २,५०० रुपयांचे पारितोषिक मिळवले.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या आयोजनातून हा उपक्रम झाला. यावेळी भाजपच्या नगरसेविका, पदाधिकारी तसेच महिला व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
डिजिटल स्कोअरिंगपासून ऑडिओ-व्हिज्युअल प्रशिक्षणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
कराड, ता. २६ : खो-खो आता केवळ मैदानावर वेगाने धावणारा खेळ राहिलेला नाही; पंचगिरीपासून स्कोअरिंगपर्यंत संपूर्ण व्यवस्थेलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राच्या खो-खोला अधिक अचूक पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि आधुनिक तांत्रिक व्यवस्थेचा नवा अध्याय मिळाला आहे. नियमांच्या बारकाव्यांपासून निर्णयक्षमतेपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामुळे राज्यातील पंचगिरीला नवी धार मिळणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, द ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन (सांगली) आणि सद्गुरू गाडगे महाराज (एसजीएम) कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. एसजीएम कॉलेजच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील सभागृहात झालेल्या समारोप सोहळ्याने शिबिराची सांगता झाली. राज्यभरातून सहभागी झालेल्या पंचांना आधुनिक नियम, तांत्रिक बाबी आणि सामन्यातील निर्णयप्रक्रियेचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीटी आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर. सामन्यातील गुंतागुंतीचे प्रसंग प्रत्यक्ष दृश्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्याने पंचांना अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीपणे मिळाले. त्यामुळे पंचगिरीत अचूकता, सातत्य आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
समारोपावेळी एसजीएम कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी खो-खोच्या इतिहासाचा आढावा घेत अशा प्रशिक्षणामुळे पंचांची निर्णयक्षमता अधिक अचूक व दर्जेदार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रविंद्र (भाऊ) पवार यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पोहोचत असल्याचे सांगितले. संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी खो-खोच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी संघटनेच्या आधुनिक उपक्रमांची माहिती दिली. गुणलेखन अर्थात स्कोअरिंग डिजिटल व ऑनलाइन पद्धतीकडे नेण्याची प्रक्रिया सुरू असून, सामन्यांची नोंद, गुणपत्रिका आणि निकाल अधिक वेगवान व अचूक करण्यावर भर दिला जात आहे.
एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे यांनी सहभागी पंचांच्या उत्साहाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाचा आवाका प्रत्यक्ष सहभागी पंचांपलीकडे खो-खोच्या व्यापक क्षेत्रापर्यंत पोहोचला.
यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा, सांगली असोसिएशनचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपाध्यक्ष अर्जुन माने आणि कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख उपस्थित होते. सहभागी पंचांसाठी एसजीएम कॉलेजतर्फे उत्कृष्ट भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले, तर डॉ. प्रशांत इनामदार यांनी आभार मानले.
कराडचे हे शिबिर केवळ पंचांचे प्रशिक्षण ठरले नाही, तर महाराष्ट्राच्या खो-खोला आधुनिक, अचूक आणि तंत्रस्नेही बनविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात ठरले. खेळाडूंच्या गुणवत्तेसोबत पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि तांत्रिक व्यवस्थाही सक्षम झाली, तर महाराष्ट्राचा खो-खो देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक भक्कमपणे झेप घेईल.
0000

भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने आभार
ठाणे : शिवाईनगर, देवदयानगर येथील मुख्य चौकाला भारतमाता चौक असे नाव देण्यासाठी सुमारे १५ वर्षांपासून सुरू असलेल्या हिंदू संघटनांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भाजपचे नगरसेवक सिताराम राणे यांच्या प्रयत्नाने अखेर या चौकाच्या नामकरणाचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल भाजपचे  शिवाईनगर-वसंत विहार मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने सिताराम राणे यांचा, तर भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल नताशा सोनकर यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाईनगर, देवदयानगर परिसरातील चौकात अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. या चौकाचे भारतमाता चौक असे नामकरण करावे, अशी मागणी सातत्याने भाजप, हिंदूत्ववादी संघटना आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून केली जात होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती.
महापालिकेच्या निवडणुकीत या भागातून नगरसेवकपदी भाजपचे सिताराम राणे यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात महापालिकेत प्रस्ताव सादर केल्यानंतर नुकत्याच झालेल्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे या चौकाला लवकरच भारतमाता चौक असे नाव देण्यात येणार आहे.
या कार्याबद्दल भाजप शिवाईनगर-वसंत विहार मंडलाचे अध्यक्ष राकेश चौगुले यांनी नगरसेवक सिताराम राणे यांचा सत्कार केला. तसेच नागरिकांच्या वतीने आभार मानले.
येऊर, उपवन भागात अनेक वर्षांपासून भाजपचे संघटनात्मक आणि आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या नताशा सोनकर यांची नुकतीच भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली. त्याबद्दल त्यांचाही राकेश चौगुले यांनी सन्मान केला. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी भारतमातेच्या विजयाचा जयजयकार करण्यात आला.

बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग
मुंबई, २६ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील अटीतटीच्या सामन्यात साउथ मुंबई मॅनियाक्सने संयम राखत मुंबई स्नायपर्सवर ६०-५९ असा निसटता विजय मिळवला.
सामन्याच्या मध्यांतरापर्यंत ‘साउथ मुंबई’कडे २९-२८ अशी अत्यंत कमी गुणांची आघाडी होती. ‘साउथ मुंबई’कडून मोईन के. याने सर्वाधिक २५ गुण नोंदवले, तर तनाय बदानीने नऊ गुणांचे योगदान दिले. गुणसंख्या ५९-५९ अशी बरोबरीत असताना, मोईनने ‘फ्री थ्रो’द्वारे गुण मिळवून ‘साउथ मुंबई’चा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, एका एकतर्फी सामन्यात ‘जेबी नवी मुंबई’ने ‘पुणे ग्लोबल स्पोर्ट्स’चा ७१-३५ (मध्यांतर: ३६-२४) असा पराभव केला. ‘नवी मुंबई’कडून अर्नेश गांगुली (२५ गुण), अभिर शेट्टी (१२ गुण) आणि जान पारेख (१० गुण) यांनी चांगली कामगिरी केली. ‘पुणे ग्लोबल स्पोर्ट्स’कडून वेदांत कदमने २० गुण नोंदवले.
निकाल – मुले: साउथ मुंबई मॅनियाक्स (मोईन के. २५, तनाय बदानी ९) विजयी विरुद्ध मुंबई स्नायपर्स (जोहान जोशुआ ३०, झायद एस. ११) – ६०-५९ (मध्यंतर: २९-२८).
जेबी नवी मुंबई (अर्नेश गांगुली २५, अभिर शेट्टी १२, जान पारेख १०) विजयी विरुद्ध पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (वेदांत कदम २०) – ७१-३५ (मध्यंतर ३६-२४).
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *