भिवंडी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी येत्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम ५०० प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे.त्या साठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी पासून होईल. शेवटचा पेपर बुधवार १८ मार्च २०२०६ रोजी आहे.
दहावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे तर ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून नोंदणी पूर्ण झाली आहे आणि राज्यभरातील ५११९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.

मुंबई : तब्बल २३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट करून दिली.
अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केले आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू झाल्यानंतर त्यांनी शाखा कामकाज, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी तसेच ग्राहक संबंध व्यवस्थापन अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. अखेर वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर असताना त्यांनी स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.
राजीनाम्याबाबतच्या पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की, “२३ वर्षांपूर्वी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत प्रवेश केला. आज वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून माझ्या पदाचा राजीनामा देताना मन कृतज्ञतेने भरून आले आहे. या प्रवासात मिळालेला अनुभव, सहकारी, वरिष्ठ अधिकारी—विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे मार्गदर्शन—हे माझ्यासाठी मोलाचे ठरले. अॅक्सिस बँक माझ्यासाठी केवळ संस्था नव्हे, तर एक कुटुंब आणि दुसरे घर राहिले आहे.”
या पोस्टमध्ये त्यांनी पुढील आयुष्यातील प्रवासाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत, “हा एक सुंदर अध्याय इथे संपतो आहे. आता आयुष्यभराचे धडे आणि आठवणी घेऊन पुढील वाटचाल करणार आहे,” असे नमूद केले.

भारतरत्न मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी आज पत्नी अंजली यांच्यासह नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन मुलगा अर्जुन याच्या विवाहाचे आमंत्रण दिले.

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधिचं साहित्य जप्त केलं आहे. हिरे, सोनेसह कोट्यावधींचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी, ८ जणांना अटकही करण्यात आलीय.
मुंबई कस्टम झोन – ३ (एअरपोर्ट) यांनी मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास १६.७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३८ लाख रुपयांचे हिरे, १५ लाख रुपयांचं सोनं आणि विविध प्रकरणात १.१३ कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १६.७५६ कोटी इतकी आहे. तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ३८.२८ लाख आहे.
याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १५.२४ लाख आहे.
विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.
पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, वर्ल्डक्लास असे त्याचे आयोजन असेल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आज शिवजयंती निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडवलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जेफ्री एपस्टीन प्रकरणात केली अटक ० लहान मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक
इंग्लंड : बाल लैंगिक शोषणाच्या विकृतीचा मास्टरमाईंड जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य राजपुत्र अँड्र्यू यांना लंडनमध्ये ब्रिटिश पोलिस यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अँड्र्यू हे राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे बंधू असून या कारवाईमुळे ब्रिटिश राजघराण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एपस्टिन प्रकरणात नाव आल्याने नुकतेच त्यांचा राजपुत्र हा किताब काढून घेण्यात आला होता.
भारतातही केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि उद्योजक अनिल अंबानी यांची नावे या एपस्टिन फाईलमध्ये आली आहेत. केंद्र सरकाराने त्यांच्यावर कारवाई करावी अशी विरोधकांची जोरदार मागणी आहे.
एपस्टीन प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय नेते आणि धनाढ्य व्यक्तींची नावे चर्चेत असतानाही, राजघराण्यातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची अटक होण्याची ही पहिलीच ठळक घटना मानली जात आहे. याआधी अँड्र्यू यांच्यावर सार्वजनिक पातळीवर राहून एपस्टीनसारख्या गुन्हेगाराशी संबंध ठेवल्याचे आरोप झाले होते. लंडनच्या थेम्स व्हॅली पोलिसांनी दिलेल्या निवेदनात अँड्र्यू यांचे नाव थेट न घेता, नॉरफोक येथील ६५ वर्षीय व्यक्तीस अटक झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या काही निवासस्थानी छापे टाकल्याची माहितीही समोर आली आहे.
एपस्टीनकडून सरकारी गोपनीय कागदपत्रे व माहिती मिळाल्याचा आणि त्या बदल्यात कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप अँड्र्यू यांच्यावर आहे. अमेरिकेत एपस्टीनच्या गैरवर्तनांबाबत हजारो फाइल्स सार्वजनिक झाल्यानंतर त्यात अँड्र्यू यांचे नाव वारंवार आल्याने ब्रिटिश सरकारवरही दबाव वाढला होता.
दरम्यान, नुकतीच ‘राजपुत्र’ ही उपाधी आणि अधिकृत निवासस्थान अँड्र्यू यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी बकिंगहॅम पॅलेसकडून “सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींविषयी असे आरोप होणे योग्य नाही” अशी भूमिका मांडण्यात आली होती.
या अटकेवर प्रतिक्रिया देताना राजे चार्ल्स तिसरे यांनी निवेदनात सांगितले की, “कायद्याप्रमाणे चौकशी होईल. कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही.” ही बाब त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत स्पष्ट केली.
शिक्षा काय होऊ शकते?
कायदेतज्ज्ञांच्या मते, आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत. सध्या आरोपांचे स्वरूप आणि उपलब्ध कागदपत्रांवरून नेमकी शिक्षा काय होईल, हे सांगणे कठीण आहे. अँड्र्यू यांनी यापूर्वी सर्व आरोप फेटाळले असले तरी, चौकशीची दिशा आणि आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेता पुढील काळात प्रकरण अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एपस्टीन प्रकरणामुळे केवळ राजघराणेच नव्हे, तर ब्रिटिश सरकारवरही दबाव वाढला असून येत्या दिवसांत या प्रकरणातील घडामोडींवर जगाचे लक्ष राहणार आहे.

हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय ज्यांच्यामुळे पहाता आला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर पार पडलेल्या शिवजन्म सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, फुलांची सजावट आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारही उपस्थित होते.
पालकमंत्री गणेश नाईक यांचा व्यावसायिकांना सल्ला ० ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
योगेश चांदेकर
पालघरः मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर तो काहीही करू शकतो. ‘बुलेट ट्रेन’मुळे जशी गुजरातच्या लोकांना महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करण्याची संधी आहे, तशीच संधी महाराष्ट्रीयन लोकांनाही गुजरातमध्ये जाऊन व्यापार, उदीम करण्याची आहे. महाराष्ट्रीयन मराठी माणसाने या संधीचा फायदा घ्यावा. त्यासाठी राज्य मदतीचा हात देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर आयोजित ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘कोकण सरस’ आणि ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवात चारशेहून अधिक स्थानिक उद्योजकांचे स्टॉल्स लागले आहेत. त्यात महिला बचत गटांच्या शंभरहून अधिक स्वतंत्र प्रदर्शनाचा समावेश आहे. कोकणातील खाद्य संस्कृती, फूड फेस्टिवल, मराठी चित्रपट महोत्सव, ‘राजा रयते’चा हे शंभर कलावताचे भव्य महानाट्य अशी या महोत्सवाची विविध आकर्षणे आहेत.
मुंबईहून प्रवाशी बोटी पालघर-गुजरातपर्यंत
या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करून नाईक म्हणाले, की गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण ‘बुलेट ट्रेन’ मुळे वाढणार आहे. ते अधिक गतिमान होईल. ‘बुलेट ट्रेन’ चा फायदा जसा गुजराती लोकांना होणारा आहे, तसाच तो महाराष्ट्रातील लोकांना होणार आहे. महाराष्ट्रातील लोकांनी आता मानसिकतेत थोडा बदल करून गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
सागरी पर्यटन आणि सागरी प्रवासाला महत्त्व
कोकणातील पर्यटन निसर्ग संपदा लोककला आणि ग्रामीण उद्योगांना जागतिक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे कौतुक करून नाईक म्हणाले, की सागरी पर्यटन आणि सागरी प्रवासाला आता महत्त्व दिले जात आहेत. आता मुंबईपासून निघणाऱ्या प्रवासी बोटी थेट पालघर जिल्ह्यातील विविध बंदरांवर पोहोचतील. या बंदरांचा विकास होईल. त्याचबरोबर मुंबईपासूनच्या बोटी केवळ पालघर जिल्ह्यातील बंदरावर थांबणार नाहीत, तर त्या गुजरातपर्यंत ही जाऊ शकतील.
हवा तेवढा निधी देऊ
‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ आणि जिल्हा प्रशासनाला वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी राज्य सरकार हवा तेवढा निधी देईल आणि निधी कमी पडलाच, तर सामाजिक दायित्व निधीतून त्यासाठी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या महोत्सव दररोज दोनशे स्थानिक कलाकार विविध लोककला सादर करत आहेत. त्यात तारपा नृत्य, दशावतार झाकडी नृत्य, कोळी नृत्य यासारख्या पारंपारिक कलांचा समावेश आहे. या महोत्सवामुळे कोकणच्या सांस्कृतिक वार्षाला चालना मिळाली आहे.
शिरगाव समुद्र किनाऱ्याला आदर्श समुद्रकिनारा करणार
दरम्यान, शिरगाव समुद्रकिनाऱ्याला आदर्श समुद्रकिनारा म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी ही पालकमंत्र्यांनी निधी देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पर्यटन वृद्धीमुळे या भागातील स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. २२ तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.
