16 July Bitambatmi All pages

Open Book

 महोत्सवातून झालेले निधीसंकलन ‘सीपीएए’ आणि ‘पीएटीयुटी’च्या समाज कार्यासाठी
मुंबई : दिवंगत पद्मभूषण पंकज उधास यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. २४ आणि २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलच्या रीगल रूममध्ये हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवातून उभारला जाणारा निधी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) आणि पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयुटी) यांच्या समाजोपयोगी कार्यासाठी देण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या महोत्सवात अनूप जलोटा, हरिहरन, विशाल भारद्वाज व रेखा भारद्वाज, सोनू निगम, जावेद अली, सुदीप बॅनर्जी, मधुबंती बागची, सुनील मुंगी, अलेना भारती आणि तेजस गंभीर हे कलाकार सहभागी होणार आहेत. निहिरा जोशी विशेष अतिथी कलाकार म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनूप सोनी आणि रक्षंदा खान करणार आहेत. यंदाच्या महोत्सवात आशा भोसले तसेच गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ समृद्ध करणाऱ्या दिग्गज गायकांना विशेष आदरांजली वाहण्यात येणार आहे.
गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ हा केवळ संगीत महोत्सव न राहता कर्करोग आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी निधी उभारणारा महत्त्वाचा सामाजिक उपक्रम ठरला आहे. यंदाच्या कार्यक्रमात ‘खजाना गझल टॅलेंट हंट २०२६’च्या विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार असून, महोत्सवातून मिळणारा संपूर्ण निधी गरजू रुग्णांच्या उपचार, देखभाल आणि पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे.
००००००००

 शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जतच्या विद्यार्थ्यांना दफ्तर-छत्रीचे वाटप
उलवे : ‘दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची वानवा असते. त्यामुळे अशा शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे दफ्तर, छत्री यांसारख्या प्राथमिक सुविधा देण्याचा गेली १५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कर्जत तालुक्याशी आपले वेगळे नाते आहे’, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्जत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
पनवेल तालुक्यातील शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दफ्तर आणि छत्रीचे मंगळवारी वाटप करण्यात आले. कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या खांडस, तुंगी, आंबेरपाडा, काठेवाडी, तेथील अंगणवाडी आदी सहा शाळांतील ३५० विद्यार्थ्यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शुभांगीताई घरत यांच्या वतीने हे शैक्षणिक दान करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचे कुटुंबीय हिरीरीने सहभागी झाले होते. यावेळी कर्जतच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनीही भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दानशूर समाजात आहेत, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत.”
यावेळी राम म्हात्रे, वासंती म्हात्रे, गुलाबशेठ घरत, ललिताताई घरत, श्रीकांत घरत, मिनाक्षी घरत, शकुंतलाताई ठाकूर, बानुबाई भगत, यशवंत ढोंगे आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.
000000000
00000000
000000000

नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालकांच्या दालनात एका छोटेखानी आणि उत्साही कार्यक्रमात हा पदभार सोहळा संपन्न झाला. आतापर्यंत या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे होता. त्यांनी अत्यंत यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळत आज नवनियुक्त उपसंचालक चव्हाण यांच्याकडे या पदाची अधिकृत सूत्रे सुपूर्द केली आणि त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या सोहळ्याप्रसंगी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह विभागीय माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल माध्यमातून म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

 शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश
मुंबई : राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि आज तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलैला या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलैला राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वर्गीय अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाणार आहे.

विरार : महावितरणच्या विरार विभागामार्फत नालासोपारा (पूर्व) व आचोळे शहर परिसरातील वीज ग्राहकांसाठी १६ जुलैपासून सलग ३ दिवस स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. हा मेळावा महावितरणच्या नालासोपारा पूर्व उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वाजता सुरू होईल.
या मेळाव्यात वीज बिल, स्मार्ट मीटर, मीटर रीडिंग, जास्त वीज बिल, स्मार्ट मीटरवरील वीज वापराची माहिती, विविध ऑनलाइन सेवा, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी तसेच इतर शंकांचे प्रत्यक्ष निराकरण करण्यात येणार आहे. या मेळाव्यात महावितरणचे अधिकारी, बिलिंग विभागाचे कर्मचारी तसेच स्मार्ट मीटर विषयक तज्ज्ञ उपस्थित राहून ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करतील. तसेच स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज दूर करून त्याची कार्यपद्धती, वीज वापराची माहिती, बिल तयार होण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध डिजिटल सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ग्राहकांनी मेळाव्यास उपस्थित राहताना अद्ययावत वीज बिल, ग्राहक क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. नालासोपारा पूर्व, आचोळे शहर व परिसरातील सर्व वीज ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन आपल्या वीज बिल, स्मार्ट मीटर व वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणच्या विरार विभागातर्फे करण्यात आले आहे.
0000000
000000000
0000

 सीटूची राज्य सरकारकडे मागणी
अनिल ठाणेकर
ठाणे-राज्यातील खाजगी उद्योग, सरकारी व निमसरकारी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेली कंत्राटी पद्धत तातडीने रद्द करून त्या जागी कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे, अशी ठाम मागणी सीटू (CITU) ने केली आहे. यासंदर्भात संघटनेने राज्य सरकारवर आणि कामगार खात्यावर गंभीर आरोप केले आहेत.कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री यांनी तातडीने नाशिकला भेट देऊन संबंधित कंपन्या व प्रशासनाशी चर्चा करावी, अशी मागणी सीटूच्या नाशिक जिल्हा समितीने केली आहे.ही माहिती सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे आणि जिल्हा सरचिटणीस देविसाद आडोळे यांनी दिली.
सीटूच्या म्हणण्यानुसार, कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० अस्तित्वात असतानाही नियमित, बारमाही व अत्यावश्यक स्वरूपाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीचा वापर सुरू आहे. कामगार खात्याकडून पुरेशी तपासणी न करता कंत्राटदारांना परवाने दिले जात असल्याने राज्यभर कंत्राटी पद्धत फोफावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
संघटनेने म्हटले आहे की, अनेक कंत्राटी कामगार आठ-दहा वर्षांपासून सातत्याने काम करत असूनही त्यांना वेतनवाढ किंवा कायम नोकरीचा लाभ मिळत नाही. परिणामी कंपन्यांचा नफा वाढत असताना कामगारांचे आर्थिक व सामाजिक शोषण वाढत आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये आरोग्य, स्वच्छता, घंटागाडी आदी अत्यावश्यक सेवा कंत्राटी पद्धतीने चालविल्या जात असून, पूर्वी कायम असलेल्या अनेक सफाई कामगारांनाही कंत्राटी व्यवस्थेत ढकलण्यात आल्याचा आरोप सीटूने केला आहे. शासनाच्या विविध विभागांमध्येही आउटसोर्सिंगद्वारे मोठ्या प्रमाणावर भरती सुरू असून, काही मोठ्या ठेकेदारांकडे हजारो कामगार कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसमधील १०८ रुग्णवाहिका सेवा चालक, पायलट आणि डॉक्टरदेखील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असल्याचे नमूद करत, सरकार स्वतःच संबंधित कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्याची ग्वाही दिली असली, तरी प्रत्यक्षात कंत्राटी कामगारांवरील अन्याय कायम असल्याचा दावा सीटूने केला आहे. न्यायासाठी संघटनात्मक प्रयत्न करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले जात असल्याचे सांगत, हाय मीडिया, हेक्सागोन, लुसी इलेक्ट्रिकल, रोथे एरडे इंडिया, अंबुजा सिमेंट (डर्क इंडिया), हिंदुस्थान पेट्रोलियम सिन्नर आणि मालेगाव महानगरपालिका यांसह विविध ठिकाणांवरील कामगार कपातीची उदाहरणे संघटनेने दिली आहेत.
उत्तर भारतातील काही राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, असा इशाराही सीटूने दिला आहे.
00000000

ठाणे : मुसळधार पावसादरम्यान आरटीओ परिसरात झाड कोसळून धर्मवीर नगर येथील रहिवासी स्व. पांडुरंग भुवड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने स्व. भुवड यांच्या कुटुंबीयांना ₹५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर झालेली ₹४ लाखांची तातडीची आर्थिक मदतही त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
याशिवाय, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्व. भुवड यांच्या कुटुंबाला ₹१० लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्याचा तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला महापालिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला येत्या महासभेत तातडीने मान्यता मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रसंगी स्व. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना भविष्यातही आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देण्यात आली. उपायुक्त मधुकर बोडके यांनी देखील एक महिन्याचा पगार या कुटुंबाला दिला आहे.

 आठवडाभरात दुसऱ्यांदा हाइट बॅरिकेट्स तुटले,
 वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप
कल्याण : कल्याणमधील वालधुनी उड्डाणपुलावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा पुलावरील हाइट बॅरिकेट्स भरधाव वाहनाच्या धडकेत तुटून पडल्याची घटना बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या वेळी वाहतूक कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव टेम्पोने पुलावरील हाइट बॅरिकेट्सना जोरदार धडक दिली. धडकेमुळे बॅरिकेट्स तुटून थेट रस्त्यावर कोसळले. यापूर्वीही १० जुलै रोजी याच ठिकाणी अशीच घटना घडली होती. मात्र, त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पुन्हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वालधुनी उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही मोठी वाहने सर्रास येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक जागरूक नागरिक रोहित डोळस यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “अवजड वाहनांना बंदी असतानाही ती पुलावर येतातच कशी? वाहतूक पोलिसांचा वचक का नाही? एकाच आठवड्यात दोनदा बॅरिकेट्स तुटणे हा प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस आहे. प्रशासन नेमके कोणाच्या बळीची वाट पाहत आहे?” यावेळी त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. पुलावर केवळ नावापुरते बॅरिकेट्स न बसवता मजबूत हाइट-रिस्ट्रिक्शन स्ट्रक्चर उभारण्यात यावे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी आणि अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वालधुनी उड्डाणपुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (सी अँड डी) कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या C&D Waste Management Portalचे उद्घाटन गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.
मा. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषणासंदर्भात सुओ मोटू जनहित याचिकेतील निर्देशांनुसार ठाणे महापालिकेने कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) यांच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केले आहे. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक (नगररचना) कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच सीईईडब्ल्युचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिमशी संलग्न असून, बांधकाम परवानगी घेताना विकासकांना बांधकाम कचरा शुल्क भरणे, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणे तसेच निर्माण झालेल्या व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची ऑनलाइन नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यास, धूळ व हवा प्रदूषण कमी करण्यास तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचून पाणी तुंबणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यास मदत होणार आहे.
या पोर्टलमुळे बांधकाम कचऱ्याचा संपूर्ण मागोवा घेणे, त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व पुनर्वापर शक्य होणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाला चालना मिळणार आहे. ठाणे महापालिका आणि सीईईडब्ल्यु यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेले हे दुसरे डिजिटल व्यासपीठ असून, यापूर्वी एअर क्वालिटी डिसीजन सपोर्ट सिस्टम (AQDSS) यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रणालींच्या माध्यमातून शहरातील बांधकाम क्षेत्रातून होणारे हवा प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरण संरक्षणाला बळ मिळेल, असा विश्वास प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *