
कल्याण : संत निरंकारी मिशनच्या विद्यमाने २३ व २४ मे रोजी विलेपार्ले स्थित धनजीभाई मेहता ग्राउंडमध्ये निरंकारी राजमाताजी मेमोरियल महिला क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्रातील एकंदर २२ पैकी १८ सेक्टरमधील महिला क्रिकेट संघांनी उत्साहाने भाग घेतला.
सेमीफाइनलमध्ये सेक्टर-३ व सेक्टर-२१ तसेच सेक्टर-९ व सेक्टर-१८ यांच्यामध्ये सामने झाले ज्यातून फाइनलसाठी सेक्टर-१८ (नेरुळ) व सेक्टर-२१ पवार नगर (ठाणे) यांची अंतिम फेरीत निवड झाली. अंतिम सामन्यात नेरुळची टीम विजेता ठरली तर ठाणे येथील टीमला उपविजेता घोषित करण्यात आले.
निरंकारी मिशन अशा आयोजनांच्या माध्यमातून युवावर्गाच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्याबरोबरच महिलांच्या सशक्तीकरणालाही चालना देत आले आहे. निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी यांचे प्रेरणादायी जीवन धैर्य, साहस, सहनशीलता, आध्यात्मिकता व विनम्रता यांचा आदर्श राहिले आहे. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले. टूर्नामेंटमध्ये खेळाडूंनी जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन खिलाडू वृत्ती, प्रेम व सौहार्द यांचा सुंदर परिचय दिला. सामन्यांच्या दरम्यान उत्तम प्रदर्शनाच्या वेळी दोन्ही बाजुच्या टीम खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसत होत्या. प्रत्येक मॅचच्या शेवटी खेळाडूंनी एकमेकांचा आदर सन्मानही केला.
समापन सत्रामध्ये स्थानिक सेक्टर संयोजक जयप्रकाश उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारोह आयोजित करण्यात आला. त्यामध्ये विजेता-उपविजेता टीमना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. भगिनी सुदीक्षा गायकरला “वुमन ऑफ द सीरीज़”, “बेस्ट बैटर” व “बेस्ट बॉलर” आदि पुरस्कार मिळाले. या टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये स्पोर्टस् कमिटीचे प्रभारी बलिराम कासारे, मनोज सिंह कोटाल व अन्य सेवादार महात्मांनी विशेष योगदान दिले.
००००००००००

पिरवाडी बीच ते ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान २३ किमी खुला समुद्र पार करत केला विक्रम
कल्याण : डोंबिवलीतील पवार पब्लिक स्कुल येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मास्टर आरव आहुजा याने खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत रायगड येथील पिरवाडी बीच ते मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान एकल समुद्र पोहण्याचा पराक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारा पहिला जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे.
आरवने अपूर्व जिद्द, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद दाखवत सुमारे २३ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ तास १४ मिनिटांत पूर्ण केले. अरबी समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात त्याने संपूर्ण पोहण्यादरम्यान उल्लेखनीय चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले.आरव हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा येथे कार्यरत असलेल्या रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तो दररोज सुमारे ३ ते ४ तास कठोर सराव करतो. विशेष म्हणजे, वयाच्या ९व्या वर्षी जेव्हा त्याने पोहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला पाण्याची भीती वाटत होती. मात्र सातत्यपूर्ण प्रशिक्षण, पालकांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने त्या भीतीवर मात करत खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले.
आरवने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच कोची येथे पार पडलेल्या ओपन नॅशनल स्विमॅथॉन स्पर्धेत त्याने १० कि.मी. शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच पोरबंदर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत १० कि.मी. गटात कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके आणि गौरव संपादन केले आहेत.
ही ऐतिहासिक समुद्र पोहण्याची मोहीम आरवची पहिलीच एकल लांब पल्ल्याची समुद्रातील पोहण्याची मोहीम होती, त्यामुळे या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पोहण्यादरम्यान त्याला जोरदार वारे, उंच भरती आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागला. मात्र सर्व अडचणींवर मात करत त्याने यशस्वीरित्या हे आव्हान पूर्ण केले. या कामगिरीदरम्यान शेवटच्या टप्प्यात डॉल्फिन माशांनी आरवच्या सोबत पोहत त्याच्या या यशात एक विस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण निर्माण केला. ही संपूर्ण मोहीम महाराष्ट्र स्टेट अमेचुअर अॅकव्याटीक असोसिएशन यांच्या निरीक्षणाखाली पार पडली असून सर्व अधिकृत नियम, सुरक्षा निकष आणि प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्यात आले.
आपल्या यशाबद्दल बोलताना आरवने आपल्या आई-वडिलांचे त्यांच्या सततच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. तसेच त्याने आपले प्रशिक्षक रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांचे मार्गदर्शन आणि मेहनतीबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कराबी थायलंड ओपन वॉटर स्वमिंग २ किलोमीटर स्पर्धा सिल्वर व ५०० मीटर स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवले.

(राजेंद्र साळसकर)
मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११४ मधील नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकारातने नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय दाखले उपलब्ध करून देणारे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व कामगार वर्गाला एकाच ठिकाणी विविध सेवा मिळाव्यात या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), स्थानिक वास्तव्याचा दाखला तसेच आधार कार्डाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक वेळा नागरिकांना विविध दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते, आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळ व पैशाचा अतिरिक्त खर्च होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सेवा देण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, मागील तीन वर्षांचे आर्थिक प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र, तसेच वीज बिल किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख दर्शविणारे कागदपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असतील. अधिवास दाखल्यासाठी मतदार ओळखपत्र, शैक्षणिक पुरावे, बँक पासबुक तसेच मागील दहा वर्षांच्या वास्तव्याचे पुरावे मागविण्यात येणार आहेत. स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी देखील विविध ओळखपत्रे व दीर्घकालीन वास्तव्याचे पुरावे आवश्यक राहणार आहेत. याशिवाय आधार कार्डाशी संबंधित नोंदणी व दुरुस्तीची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर २५ ते २९ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण ज्येष्ठ नागरिक कार्यालय, ९० फूट रोड, लालबहादूर कंपाऊंड, अशोक केदार चौक, भांडुप (प.) असे असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका राजोल पाटील यांनी केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून विविध सरकारी प्रक्रियांबाबत जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना या शिबिराचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रमेश औताडे
मुंबई: आम्ही संगतीत आणि पंगतीत सोबत बसत नाही हा दूरूभाव अनुसूचित जातीच्या विविध घटकांना खटकत असतो, मग आम्ही यांच्या जवळ गेलो तर रोटी बेटीची सोयरिक साधतील का? तसेच रिपब्लिकन ऐक्याचे ग्रहण अजुन सुटले नसताना आमच्या फाटाफुटी मुळे उपवर्गिकरणाच्या चर्चेला बळ मिळत आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती समन्वय अभियानाच्या प्रारंभ करताना बोलत होते.
बागडे यांच्या निवासस्थानी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष रवी भाऊ शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, गर्जना संघटनेचे अध्यक्ष भाई महेश ठाकूर, आंरिमोचे नेते धर्माजी बागडे, ओबीसी नेते राजू पांजरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, रिपाइं आठवले शहर अध्यक्ष विनोद थुल, सेवानिवृत्त वित्त लेखा अधिकारी म्हाडा चे जयदेव चिंवडे, मातंग मोर्चा चे नेते मनोहर इंगोले, चर्मकार समाजाचे नेते व सुप्रसिद्ध शायर तन्हा नागपुरी, आंरिमो नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण आवळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे, संजय मोटघरे,सुधिर मोटघरे, हंसराज उरकुडे,माजी नगरसेवक अमर बागडे, युवा नेते सुरज ढोणे, पंकज पाटील, गौतम बागडे, सुदर्शन, वाल्मिकी मोर्चा चे नेते सुभाष बढेल, चरणदास गायकवाड,नरेश खन्ना, वैशाली तभाने, संगिता चंद्रिकापुरे, डॉ सुधा जनंबधू,जुलैखा बेगम रुबिना खान,सरिता थुल, अनिता थुल,भागनबाई मेश्राम, सुशिला जनंबादे, जयश्री मसराम यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतुल गंगापूरकर,भोजराज नंदागवळी अमोल बागडे यांनी केले.
०००००००

उरण-पनवेल प्रीमियर लिगच्या आयोजकांचे मत
उलवे, ता. २५ : राधेय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ चिर्ले आयोजित उरण-पनवेल प्रीमिअर स्पर्धेच्या फायनलला रविवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत आणि गौतमी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणारा माणूस आहे. कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे माझे कर्तव्य मानतो. त्यामुळे चिर्ले येथील तरुण ‘सुखकर्ता’ बंगल्यावर आले होते. त्यांनी माझ्याकडे आमच्या प्रीमियर लिगला आम्ही गौतमी पाटील यांना आणत आहोत. येथील रसिकांना आणि क्रीडाप्रेमींना सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारावे, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी उरण-पनवेल प्रीमियर लिगचे प्रायोजकत्व स्वीकारले. कलाकारांना प्रोत्साहन आणि स्थानिक तरुणांच्या उदात्त भावना लक्षात घेतल्या. क्रिकेटचा मी नुसता चाहता नाही, स्वतः भरपूर खेळतो.”
“महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला. असा शब्दाचा पक्का राजकीय पटलावर एकच नेता आहे तो म्हणजे महेंद्रशेठ घरत,” अशा भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केल्या. उरण-पनवेल प्रीमियर लिगचे आयोजक दीपक पाटील, संतोष पाटील आणि त्यांच्या टीमने शाल, सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमींनी महेंद्रशेठ जिंदाबाद, अशा घोषणांनी क्रिकेट मैदान दणाणून सोडले. यावेळी परिसरातील इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
०००००००

मुंबई: मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ), येथे संपन्न झालेल्या ११ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याकडून खेळणाऱ्या माजी विश्व् विजेता खेळाडू योगेश परदेशी याने आपल्या वयाच्या ५१ व्या वर्षी प्रदीर्घ काळाने मुंबईच्या फार्मात असलेल्या आंतर राष्ट्रीय विजेत्या महम्मद घुफ्रानवर १९-१४ व २५-१५ अशी सहज मात करत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत त्याने सध्या फार्मात असलेल्या मुंबईच्या प्रशांत मोरेवर २५-२०, २५-० असा सरळ एकतर्फी विजय मिळवल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तोच आत्मविश्वास अंतिम सामन्यात त्याने दाखवला व इंडियन ऑईलमध्ये काम करत असलेल्या आपल्या सहकार्यावरही आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी घुफ्रानने माजी विश्व् विजेत्या जळगावच्या संदीप दिवेवर २३-९, २५-२१ असा सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला होता. या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत संदीप दिवे सरस ठरला. त्याने प्रशांतचा १७-९, २५-४ असा धुव्वा उडवला. या गटात मुंबईच्या निलांश चिपळूणकर व ओंकार टिळक या दोन उदयोन्मुख खेळाडूंनी उपउपांत्य फेरीत प्रवेश करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी कडून खेळणाऱ्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमला विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर विरुद्ध पहिला सेट ती २-२४ असा एकतर्फी हरली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेट तिने आपले सर्वस्व पणाला लावत २१-१५ व २१-१५ असा जिंकला. आकांक्षाने उपांत्य फेरीत मिताली पाठकवर १४-१२, ४-१९ व २१-१८ असा निसटता विजय संपादन केला होता. तर समृद्धीलाही अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी मुंबईच्या सोनाली कुमारी विरुद्ध १८-२०, २१-६ व २४-८ असे झगडावे लागले होते. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मितालीने सोनालीवर २५-११, १६-१६ असा सरळ विजय मिळवला.
विजेत्या खेळाडूंना रोटरी टी आर एफ चे विश्वस्थ डॉ भरत पंड्या, रोटरी क्लब ऑफ बोरिवली डिस्ट्रिक्ट ३१४१ च्या अध्यक्षा केरळ तापीवाला व सेक्रेटरी जैनीशा संपत, मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनचे सह खजिनदार सी ए नितीन मजिठीया, क्रीडा विभागाचे सह सचिव राकेश मोदी, कार्यकारिणी सदस्य हेमल शाह व हेमंत आशर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कॅरम व बुद्धिबळ विभागाचे समन्वयक महर्षी देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा
महिलांमध्ये रणरागिणी क्लबचा दणदणीत विजय
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट्स टर्फवर रंगलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्याने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर बसवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचकारी लढतीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबवर अवघ्या १ धावेने (३३-३२) मात करत विजेतेपद पटकावले. विजयाचा क्षण येताच मैदानावर प्रेक्षकांनी जल्लोष करत उत्सव साजरा केला. याआधी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी (९८-३७) दणदणीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेत प्रथमच नाणेफेक गमावल्याने वियोम फाऊंडेशनला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्याचा संघाला मोठा फटका बसल्याचे कर्णधार ओमकार पाटोळे यांनी सामन्यानंतर सांगितले. वियोमच्या पहिल्या जोडीतील सिद्धेश घोगरे (५) आणि श्रेयस वैद्य (६) यांनी ११ धावा केल्या. मात्र दिपेनने श्रेयसला बाद करत ५ धावांचा फटका दिला. दुसऱ्या जोडीतील ओमकार पाटोळे (-४) आणि रोहन गावडे (२) यांना मोठी कामगिरी करता आली नाही. ओमकारला आदिलने दोनदा बाद करत वियोमच्या धावसंख्येला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनिकेत माडीये (७) आणि प्रसाद आंब्रे (३) यांनी १० धावांची भर घातली. शेवटच्या जोडीतील शुभम गुरव (५) आणि अजित सेठी (८) यांनी महत्त्वपूर्ण १३ धावा जोडत वियोमला ३२ धावांपर्यंत पोहोचवले.
३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीची सुरुवात खराब झाली. मुसा सय्यद (०) आणि मोनू यादव (-४) यांना रोहन गावडेच्या अचूक गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. त्यानंतर संतोष जाधव (०) आणि अहमद (६) यांनी संघर्ष केला, मात्र सतत विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. तिसऱ्या जोडीतील दिपेन दांडेकर (१८) यांनी दमदार खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटच्या जोडीला विजयासाठी १६ धावांची गरज असताना रोहित खरात (१७) आणि आदिल सय्यद (-१) यांनी जबरदस्त धैर्य दाखवत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत रोहितने ऑसम अंधेरीला थरारक विजय मिळवून दिला.
महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने एकतर्फी वर्चस्व राखत शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबवर ६१ धावांनी विजय मिळवला. रणरागिणीकडून नाजूका (२७), प्राजक्ता (२४), प्रिया (११) आणि दृष्टी व पूजा (प्रत्येकी ११) यांनी शानदार फलंदाजी केली. तर शक्तीकडून लावण्या (१३) आणि आचल (११) यांनी झुंजार लढत दिली.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) म्हणून श्रेयस वैद्य (वियोम फाऊंडेशन) याची निवड करण्यात आली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : दिपेन दांडेकर (ऑसम अंधेरी) व सर्वोत्कृष्ट गोलंदाज : रोहन गावडे (वियोम फाऊंडेशन) ठरले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक यशवंत किल्लेदार व नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बाळ वाडवलीकर (माजी क्रीडा अधिकारी, आरसीएफ), विलास पाटील (माजी जनरल व्यवस्थापक, आरसीएफ), संजय चुरी (पीडीजी, लायन्स क्लब ऑफ मुंबई), जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, वरदा चुरी (कार्याध्यक्षा – पार्क क्लब), दतात्रय वेदक (माजी अध्यक्ष – मुंबई महिला क्रिकेट), विनया तोरसकर (अध्यक्षा – वियोम फाऊंडेशन), संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर व इनडोअर क्रिकेटचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजिंक्य नाईक यांनी, “मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देणे हेच आमचे ध्येय आहे. क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन कायम पुढाकार घेईल,” असे सांगितले. तर यशवंत किल्लेदार यांनी, “आजची मुले मोबाईल आणि मनोरंजन विश्वात अधिक रमली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले. विजेत्या ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबला रु. २५,०००, चषक आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या वियोम फाऊंडेशनला रु. १५,०००, चषक आणि रौप्यपदक प्रदान करण्यात आले.
०००००००

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा
मुंबई: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १३ वर्षांखालील मुली एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ३२ फेरीमध्ये मंगळवारी चंदिगडच्या सीरत घुमनने कर्नाटकच्या वेदा पोनप्पाचे आव्हान ११-६, १२-१०, ११-५ असे मोडीत काढले. आणखी एका अटीतटीच्या सामन्यात समायरा गांधीने स्पृहा वैरागडेला १२-१०, ११-४, ११-५ असे पराभूत करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
निकाल (११ वर्षांखालील मुले एकेरी – राऊंड ऑफ ३२ फेरी): १-अगस्त्य उप्पल विजयी वि. क्रिश जोशी ११-३, ११-३, ११-१; मायरव प्रदीप विजयी वि. कृष्णा दोशी ११-6, ११-८, ११-४; शौनिक मल्होत्रा विजयी वि. दिव्यांश ११-८, ११-४, 7-११, ११-३; आयांश कोलते विजयी वि. अभिक नायक ११-४, ११-८, ११-7; तेजवीर कपूर विजयी वि. अथर्व शाह ९-११, १३-११, ११-6. ११-०; मांटिक अय्यर विजयी वि. वैखेश आरव्ही ११-7, ११-८, 7-११, ११-३.
१३ वर्षांखालील मुले एकेरी): समायरा गांधी विजयी वि. स्पृहा वैरागडे १२-१०, ११-४, ११-५; सीरत घुमन विजयी वि. वेद पोनप्पा ११-6, १२-१०, ११-५; रुही लोढा विजयी वि.समायरा जैन ११-7, १२-१४, ११-८, ११-१;
१७ वर्षांखालील मुले (राऊंड ऑफ ६४): शौर्य सहाय विजयी वि. अरहास कपूर ११-7, ११-५, ११-१; तन्मय समैया विजयी वि. रोहन मंडल ९-११, ८-११, ११-९, ११-४, ११-7.
००००००००
भारताच्या ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च 23 हजार 21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्राने एकूण विक्रीत 15.31 टक्के वाट्यासह अव्वल स्थान मिळवले आहे. ‘इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन’ (आयडीएसए) च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
‘डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री 2025 आउटलुक’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात या उद्योगाचा व्यवसाय 22 हजार 142 कोटी रुपये होता. बाजार संशोधन कंपनी ‘आयपॉस’ने हा अभ्यास केला आहे. हा अहवाल खासदार आणि ‘कॅट’चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या हस्ते एका कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आला. खंडेलवाल यांनी सांगितले, की देश ‘विकसित भारता’ च्या दिशेने वाटचाल करत असून उद्योजकता, स्वयंरोजगार आणि सर्वसमावेशक आर्थिक सहभाग वाढवणाऱ्या क्षेत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाला सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असे संबोधले. अहवालानुसार, मागील सहा वर्षांत या उद्योगाने 6.5 टक्के संयोजित वार्षिक वाढ दर म्हणजेच ‘सीएजीआर’ नोंदवला आहे. 2019-20 मध्ये सुमारे 16 हजार आठशे कोटी रुपयांचा असलेला उद्योग 2024-25 मध्ये वाढून 23 हजार 21 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रदेशानुसार पाहिले असता, उत्तर भारताचा एकूण विक्रीत सर्वाधिक 27.58 टक्के वाटा राहिला. त्यानंतर पश्चिम विभागाचा 25.47 टक्के, पूर्व विभागाचा 22.47 टक्के, दक्षिण विभागाचा 17.81 टक्के आणि ईशान्य विभागाचा 6.67 टक्के वाटा राहिला. राज्यांमध्ये महाराष्ट्र 15.31 टक्के वाट्यासह पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर पश्चिम बंगालचा 10.88 टक्के, उत्तर प्रदेशचा 8.82 टक्के, कर्नाटकचा 6.37 टक्के आणि बिहारचा 5.61 टक्के वाटा राहिला. उद्योगातील उत्पादनांच्या प्रकारांमध्ये आरोग्य आणि पोषणाशी संबंधित उत्पादनांचा सर्वाधिक म्हणजे जवळपास 60 टक्के हिस्सा राहिला. सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक देखभाल उत्पादनांचा हिस्सा 26 टक्के, तर घरगुती वापराच्या उत्पादनांचा हिस्सा पाच टक्के राहिला. या तीन प्रकारच्या उत्पादनांचा मिळून उद्योगाच्या एकूण विक्रीत 91 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
अहवालानुसार, ‘डायरेक्ट सेलिंग’शी संबंधित सक्रिय विक्रेत्यांची संख्या वाढून 93.2 लाखांवर पोहोचली आहे. मागील वर्षी ही संख्या 88 लाख होती. विशेष म्हणजे, एकूण विक्रेत्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढून 48 टक्के झाला आहे, जो मागील वर्षी 44 टक्के होता. ‘आयडीएसए’चे अध्यक्ष रत्नेश लाल यांनी सांगितले, की या अहवालातील निष्कर्ष भारतातील ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाची वाढती ताकद दर्शवतात. सातत्याने होत असलेली वाढ, महिलांचा वाढता सहभाग, नवउद्योजकांची वाढती रुची आणि किरकोळ उद्योजकतेच्या वाढत्या संधी या क्षेत्रात सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच मागील सहा वर्षांतील 6.5 टक्क्यांच्या सातत्यपूर्ण ‘सीएजीआर’मुळे अनुकूल धोरणात्मक वातावरण आणि ग्राहकांचा वाढता विश्वासही स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे ( वलंगकर ) तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. दाभोळजवळील वनंदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये त्या राहत होत्या. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. त्यांचे वडील दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या पोहचवत असत. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. काही दिवसांनी वडिलांचेही निधन झाले. लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपल्याने कोवळ्या रमाईच्या मनावर मोठा आघात झाला. आई वडिलांविना पोरक्या झालेल्या या भावंडांना वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांनी मुंबईला आणले. मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत ते राहू लागले. त्याच सुमारास सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमरावसाठी मुलगी पाहत होते. वलंगकारांकडे लग्नाची मुलगी असल्याचे त्यांना समजले. सुभेदार रामजी आंबेडकर यांनी रमाईला पाहिले. रमाईला पाहता क्षणिच सुभेदाराने तिला आपल्या भीमरावासाठी पसंत केली. रमाई आणि भीमराव यांचा भायखळ्याच्या मार्केटमध्ये विवाह झाला. विवाहाप्रसंगी बाबासाहेबांचे वय चौदा तर रमाईचे वय नऊ वर्ष होत. त्यावेळी बाल विवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात पंच पक्वान्ने नव्हती. झगमग रोषणाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला. माता रमाईला जीवनात अनेक दुःखे सहन करावी लागली. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले. त्यावेळी रमाईची खुप वाताहत झाली. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे हाल पहावले नाही त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला मात्र पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या. माता रमाई या आयुष्यभर दुःखाशी, गरीबीशी जिद्दीने झगडत होत्या मात्र हार मानत नव्हत्या. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा , कारुण्य, उदंड मानवता आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई. रमाईने अनेक दुःखे झेलली. त्यांच्या इतके मरण कोणीही पाहिले नसेल. लहान वयातच आई वडिलांचा मृत्यू, १९१३ साली सासरे शुभेदार रामजी आंबेडकर यांचा मृत्यू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव, त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, १९२१ साली बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, १९२६ मध्ये राजरत्न असे अनेक मृत्यू त्यांनी पाहिले पण त्या डगमगल्या नाहीत. पती बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर त्या एकट्या घर चालवत होत्या. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या वेचल्या. बॅरिस्टर पतीची पत्नी शेण गोवऱ्या गोळा करते असे लोक नावे ठेवतील म्हणून त्या पहाटे लवकर उठून शेण गोवऱ्या गोळा करत. आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांचे शरीर पोखरून गेले होते. त्यामुळे त्या आजारी पडल्या. जानेवारी १९३५ पासून आजार वाढत गेला. मे १९३५ ला त्यांचा आजार विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. मात्र त्यांचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते. बाबासाहेब त्यांना फळांचा ज्यूस, चहा, कॉफी पाजत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर २७ मे १९३५ रोजी रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाले. बाबासाहेबांना हे दुःख पचवणे अवघड गेले. ते रमाईच्या पार्थिवाशेजारी बसून ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षे हिमालयासारख्या महामानवाला धैर्याने व प्रेमाने साथ देणारी हिमालयाची सावली सोडून गेल्याने बाबासाहेब एकाकी पडले. हिमालयाची सावली बनलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
