कोकणातील आंबा-काजू
शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
0 विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये
० विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मिळणार
० हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान
० सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न या सर्वांनाच यश आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.ते म्हणाले,१७ मार्च २०२६ रोजी कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सूचनांच्या आधारे शासनाने कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्राथमिक अहवाल मागवला असून त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३०२ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. यामध्ये ३५,५८० हेक्टर क्षेत्रावरील ८०,४१८ शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा घेतला आहे. कमी व जास्त तापमानामुळे सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे.
आंबा पिकासाठी कमी तापमानामुळे प्रति हेक्टर ६,०७१ ते ३४,००० रुपये, तर जास्त तापमानामुळे १७,१७१ ते ६८,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मेपर्यंत विमा संरक्षण लागू आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.
दरम्यान, काजू पिकाखाली कोकणात १,७५,१४० हेक्टर क्षेत्र असून १९८ महसूल मंडळांपैकी सुमारे १५० मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे. काजूसाठी प्रति हेक्टर १६,८०० ते ४२,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये आहे.

सेक्स, सौंदर्य,सत्ता आणि संपत्ती भोंदूगिरीचे चार खांब !
सेक्स, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती हे मनुष्य जातीचे कायम आकर्षण केंद्र राहिले आहे आणि संपूर्ण आयुष्य त्याचे याच्या भोवती फिरत असते.
यापैकी कुठले तरी एक किंवा दोन किंवा सर्व मिळवण्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असते. त्यासाठी तो कायम प्रयत्न करीत असतो. जर सहज मार्गाने प्राप्त झाले तो उपभोग घेत असतोच. मात्र खुपदा त्याच्या या सुप्त इच्छा जर संधी मिळाली आणि गुपित रहात असेल तर तो सहज आपली ही छुपी प्रवृती बाहेर काढतो.
कुठलाही बदमाश भोंदूबाबा, मग तो भविष्य, कुंडली बघणारा असो, पूजा पाठ करणारा, आश्रम चालवणारा मठपती किंवा अन्य कुणीही बदमाश भोंदू हे अतिशय योग्य रीतीने जाणतो
आता खरात प्रकरणाचे बघाल तर हे प्रकरण कधीच बाहेर आले नसते जर त्याच्या पीए याने त्याचे पेन ड्राईव्ह चोरले नसते आणि महिलांना ब्लॅक मेल करण्याचा प्रयत्न केला नसता.
सर्वजण तो लोकांना लघवी प्यायला द्यायचा किंवा वीस फूट नाग काढायचा हे सर्व किंवा असेच प्रकार यापूर्वी अनेक भोंदू, तांत्रिक करीत आले आहेत. विष्टा खायला लावणे, मुत्र प्राशन, विकृत समागम हे करायला लावण्या मागे बदमाश भोंदूचे एक शास्त्र असते की, सदरची महिला किंवा पुरुष आपल्या किती वश आहे. तीन वर्ष एखाद्या महिलेवर बलात्कार कसा होऊ शकतो ?
यामागे महिलांची देखील मानसिकता समजून घेतली पाहिजे. इतक्या सर्व महिला समाजात वावरत असतात. सर्वच महिला काही बदमाश भोंदू बाबाच्या नादी लागत नाही. शिवाय प्रत्येक महिलेला एक सिक्स सेन्स असतो, समोरचा पुरुष कुठल्या हेतूने बघतो आहे, स्पर्श करतो आहे , बोलतो आहे हे पटकन समजते. मात्र महिलाना दाखवलेले स्वप्न हे इतके भव्य असते, शिवाय भोंदूच्या एजंट लोकांनी त्याची अशी काय स्तुती केलेली असते त्यात बड्या बड्या लोकांचा राबता पाहिल्यावर महिला तिला मिळणाऱ्या सिग्नल्स कडे सपशेल दुर्लक्ष करते आणि मग भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकत जाते. त्यासोबत खुपदा महिलाना छोटे मोठे लाभ होत असतात त्याचा मोह देखील त्यांना आवरला जात नाही आणि त्या मग कुटुंबाशी प्रतारणा करीत सरळ भोंदू बाबाच्या लीन होतात. बाहेरख्याली पणात देखील हेच घडत असते.महिला पुरुषांच्या आधीन जाते आणि नवरा सोबत प्रतारणा करीत असते.
एकदा एखादी महिला जर एखाद्या पुरुषाच्या आधीन झाली तर तो तिचा संबंध तिचा फायदा दाखवून इतर पुरुषासोबत सहज करून देऊ शकतो, त्यात गुपित रहाण्याची खात्री आणि विश्वास असल्याने महिला सहज तयार होते
पुरुषांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास या ट्रॅप मध्ये उद्योगपती, बडे अधिकारी, राजकारणी सहज येतात याची कारणे शोधली तर ती देखील नवी नाहीत. ज्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अस्थिरता असते मग ती सत्ता असो, पद असो की सेक्स पॉवर असो. एका वयानंतर कुठल्याही पुरुषांची समागम करण्याची शक्ती क्षीण होत जाणार हा निसर्ग नियम आहे. मग ती कायम ठेवण्यासाठी काही पुरुष व्यायाम करतील, काही आयुर्वेदिक औषध घेतात काही आलोपथी औषध घेत असतात. जस जसे वय होते तसे सेक्स पॉवर कमी होते मात्र पैसा, पद, सत्ता बघून अनेक ललना आपल्या सौंदर्याची जादू चालवत असतात, मात्र या तरुण महिलेला पूर्ण पडू का याबद्दल ५०/५५/६० वयाच्या मनात संशय असतो. त्यामुळे एखाद्या अशा भोंदू बाबाने असे काही चमत्कारिक औषध दिले त्यात ज्यादा प्रमाणात व्हायग्रा सारख्या औषधी टाकून दिल्या आणि मानसिक शक्ती दिली की औषध आपले काम करते आणि मानसिक आधार श्रद्धा सेक्स करण्याची मानसिक तयारी करते त्यात एकदा व्यक्ती यशस्वी झाला की मग तो सहज त्या भोंदू बाबाच्या चरणी लीन होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी मंदिराचा पुजारी हा खास व्यक्ती पाठवून लाखो रुपयांचे ओशोनिक जल आणि मध मागवून घेत असे .
वास्तविक सेक्स हे निसर्गाने प्रजोत्पादन करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे, त्यात आनंद यासाठी भरला की, स्त्री पुरुषाने ते करावे आणि प्रकृती पुढे चालावी. घडीभर विचार करा त्यात जर निसर्गाने आनंद भरला नसता तर स्वतः हून कुठल्या स्त्री पुरुषाने असले कृत्य केले असते? आणि एवढी जगाची लोकसंख्या तरी वाढली असती का ?
राजकीय व्यक्तिना केवळ बाहेरचेच नाही तर पक्षाच्या अंतर्गत देखील स्पर्धा आणि शत्रू असतात त्यामुळे लोकांच्या समोर आपण देखील धार्मिक आहोत ही प्रतिमा प्रमाणित करण्यासाठी आणि बाबाच्या भक्तांची आयती मते मिळवण्यासाठी मोठे मोठे राजकीय नेते बाबा बुवांचा भजनी लागलेले, त्यांच्या धर्मपीठावर गेलेले आपण पाहिले, यातून लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी ते अलिकडचे नरेंद्र मोदी अमित शहा देखील सुटलेले नाही. या प्रत्येक बाबाची वेगवेगळी खासियत असते कुणी गुरू मंत्र देतो, कुणी काही तावीज करून देतो, कुणी काही पाणी देतो जे एक हजार दिवस जप करून त्यात मंत्र शक्ती उतरली असल्याचा दावा करतो. काही प्राण्याचे दुर्मीळ अवयव, किंवा अघोरी पूजा करण्यास सांगतो असे नवे नवे प्रकार भोंदू बदमाश करीत असतात. त्यात राजकीय लोकांच्याकडे गडगंज पैसा असल्याने त्यांना काही लाख किंवा कोटींची मदत आपल्या धार्मिक गुरुला करणे मुळीच अवघड असत नाही.
पण यासर्वात स्वार्थ, सत्ता, सौंदर्य यांनी बुद्धी बधीर झालेले नेते मंडळी एक गोष्ट विसरतात की धर्माची निर्मिती ही मनुष्याला सत्य, अहिंसा, करुणा, मैत्री, प्रेम आणि बंधुत्व शिकवण्यासाठी झाली आहे. ईश्वर जर दुष्प्रवृतीच्या विरोधात लढून ईश्वर झाला असेल तर तो आपल्याला किंवा हा तथाकथित बाबा बुवा जी भोंदूगिरी करतो आहे त्याला सत्यवादी ईश्वर कसा मदत करेल ? इतर सर्व लोकांना सोडून तो माझ्यात जर लायकी नसेल तर मला तो का निवडेल ? आणि माझ्यात जर लायकी असेल मला तो का डावलेल असा साधा प्रश्न जरी व्यक्तीने स्वतःला विचारला तरी तो अशा ट्रॅप मध्ये फसणार नाही.
प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात प्रचंड मोठी अशी विवेकवादी, सुधारणावादी संत आणि समाज सुधारकांची परंपरा आहे. ज्यांनी आपल्या अभंग, ग्रंथ आणि प्रबोधनातून अशा गोष्टीवर वेळोवेळी आसूड ओढले आहे. मात्र देशातील प्रचंड लोकसंख्या, नोकऱ्या कमी, अपुरी साधने आणि बड्या भांडवलदार, राजनेते आणि धार्मिक प्रचारक यांची युती झाल्याने विविध माध्यमातून दैववादाचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो मग वेगवेगळ्या उत्सवातून , सण, टीव्ही सिरीयल, सिनेमे , साहित्य , धार्मिक मेळे आणि बैठका यातून कायम रतीब घातला जात आहे. असे करण्या मागे सर्व सामान्य लोकांना त्यांच्या दुःख, समस्याचे खरे कारण समजू नये हे आहे. त्यांना योग्य शिक्षण का मिळत नाही? आरोग्याच्या सुविधा का उपलब्ध नाही ? त्याचा मुलगा इतका शिकून त्याला रोजगार का नाही ? याचे खरे कारण देशातील सत्ताधारी आहेत. मात्र लोकांनी सत्तेला लक्ष करण्या ऐवजी आपल्या नशिबाला दोष देत रहावा, माझ्या मागे साडेसाती आहे, माझे ग्रह ठीक नाही असा दैववादी विचार करावा. त्यामुळे आपण क्रोनी कॅपिटलिसम चे बळी आहोत हे त्यांना उमजू नये
कुठलाही धर्म किंवा धर्म संस्थापक हा मानवी कल्याणाची मूल्ये रुजवत असतो. प्रेम, करुणा, अहिंसा , शील , सदाचार हा त्याच्या शिकवणुकीचा गाभा असतो मात्र त्याच्या मागे त्याचे बदमाश भक्त आपल्या फुकट उत्पन्नाची आणि ऐशोआरामाची सोय म्हणून त्याच्या नावाने नाही नाही ते देव्हारे माजवत असतात आणि अज्ञानी, हतबल, लालची, सत्ता लोलुप लोकांना आरामात लुटत असतात.
हे सर्व प्रकार बंद व्हावे असे वाटत असेल तर आपण जे आपल्या धर्माचे अधिकार कुठल्या पुजारी, बाबा, मंदिर किंवा तीर्थस्थानात न ठेवता आपल्या स्वतः जवळ ठेवावे. आपल्या धर्माची मूळ पुस्तकं आपण स्वतः आणून अभ्यास करावी. केवळ एक पुस्तक न वाचता वेगवेगळी पुस्तक वाचावी. कुणी विचारवंत विवेकी आणि साक्षेपी भावनेने काही सांगत असेल तर ते ऐकावे, बरे वाटते किंवा तर्क शुद्ध वाटते म्हणून लगेच विश्वास न ठेवता त्याचा स्वतः अभ्यास करावा, पडताळून पहावे , चिंतन करावे त्यानंतर जर ते अनुकरणीय असेल तर नक्की कृतीत आणावे.
धर्मात जर चुकीचे मानवता विरोधी सांगितले असेल तर ते नाकारण्याची हिंमत आपण आपल्या संत आणि महापुरुषांच्या प्रमाणे ठेवावी. तरच महाराष्ट्र या भोंदूगिरातून बाहेर येईल अन्यथा खरात प्रकार हे भोंदूगिरीच्या पर्वताचे छोटे टोक आहे, अजून असे लाखो भोंदू ठीक ठिकाणी धर्मक्षेत्रात, मंदिरात, आश्रमात, सर्वत्र व्याप्त आहेत.
मी अतिशय प्रामाणिक कळकळीने हे लिहिले, यामागे कुठल्या धर्म अथवा देवाचा अपमान करण्याचा हेतू नसून देव आणि धर्माचे चेहरे लाऊन चालणाऱ्या विकृतीवर प्रहार करण्याचा हेतू आहे. तुम्ही हे सर्व वाचले त्याबद्दल आपले आभार. यावर विचार करा आणि मी जे बोलतो त्यात तथ्य असेल तर इतराना सांगा. किंवा हा लेख आपण सहज पुढे पाठवू शकता. धन्यवाद
-किरण सोनावणे
पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल प्रकरणी चौकशीची मागणी
कल्याण: डोंबिवलीतील के. व्ही. पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल तसेच संबंधित ट्रस्टच्या कार्यपद्धतीबाबत विविध गंभीर प्रश्न समोर येत असून, या संदर्भात निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी ‘Save Education Society’ अंतर्गत साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेतील अनियमितता, विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भातील प्रश्न, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकतेचा अभाव, तसेच शैक्षणिक संस्थांच्या वापराबाबत निर्माण झालेल्या शंका या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात येणार आहे. या सर्व बाबींवर संबंधित प्राधिकरणांकडून सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
हे साखळी उपोषण गुरुवार, २६ मार्च रोजी के.व्ही. पेंढारकर कॉलेज समोर आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रोहिदास सुरवसे करत असून, हा लढा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
00000000

ठाणे : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी २३ मार्च बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये प्रलंबित महानगर गॅसची कनेक्शन त्वरित सुरू करण्याबाबतची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले.
या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजीत पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मीना मकवाना, उपआयुक्त मधुकर बोडके, शिधावाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण सुभाष डुंबरे, रोहित माळकर, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी चित्रा नायर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मयांक तलरेजा, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे सारंश शाहू, तसेच महानगरगॅसचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळत आहे. तसेच वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे एचपी गॅसचे जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर यांनी नमूद केले. विशेषतः लहान व्यावसायिकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असून शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील मागण्या संकलित करून त्या संबंधित कंपन्यांकडे पाठवाव्यात. त्यानुसार महानगर गॅस व इतर गॅस कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही. अशा ठिकाणी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नसल्याचे निदर्शनास आले. काही भागांमध्ये ४ ते ५ वर्षांपासून गॅस पुरवठा प्रलंबित असल्याची बाबही समोर आली. या प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
गॅस पाइपलाइन सप्लायवर अधिक लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक प्रभागात रेशनिंग ऑफिस व गॅस एजन्सींमध्ये समन्वय वाढवणे, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांची यादी तयार करून ठराविक वेळेत निपटारा करणे, गॅस कनेक्शनसंदर्भातील कामासाठी निश्चित टाइमलाइन ठरवणे तसेच स्थानिक नगरसेवकांकडून प्राप्त तक्रारी संकलित करून त्या गॅस कंपन्यांकडे पाठवाव्यात आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी. एकूणच, गॅस कनेक्शनचा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून देशव्यापी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांनुसार स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १०० दिवसांची विशेष मोहीम- निक्षय मित्रांचा होणार सत्कार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाद्वारे शहरातील क्षयरोगाचे उच्चाटन करून “टीबी मुक्त कल्याण-डोंबिवली” हे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जागतिक क्षयरोग दिना निमित्त रुक्मिणीबाई रुग्णालय येथे विशेष जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी रुग्णासाठी पोषण आहार वाटप तसेच MDR रुग्णाकरिता विशेष PFT आणि XRAY तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ कल्याण, रोटरी क्लब ठाणे जिल्हा ३१४२ आणि आय एम ए कल्याण यांच्यावतीने एकूण २१० क्षय रुग्णांना पोषण आहार किट यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी आणि उपचार पूर्ण करावा शिवाय भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या या पुढील शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयएमए प्रेसिडेंट डॉ सुरेखा इटकर यांनी केले.
या कार्यक्रमावेळी बाई रुक्मिणी बाई रुग्णालय यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुलक्षणा त्रिभुवन,डॉ गणेश डोईफोडे , शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके, चेस्ट फिजिशियन डॉ श्रेयस गोडबोले, डॉ रुतिका भोसले, डॉ धाकतोडे इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या दीप्ती दिवाडकर, डॉ चिटणीस, एड नीता कदम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विविध जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे, तसेच तपासणी व उपचार सुविधा राबविण्यात येणार आहेत. २४ मार्च पासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुढील १०० दिवस निरनिराळे कार्यक्रम राबवून क्षयारोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
या मोहिमेत घराघरांत जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणे. मोफत कफ तपासणी व एक्स-रे सुविधा, निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करणे, उपचार पूर्णत्व दर वाढवण्यासाठी विशेष पाठपुरावा, उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहेत.
क्षयरोग निर्मूलनासाठी “निक्षय मित्र” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह तसेच नागरिकांनी टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार, मानसिक आधार व आवश्यक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निक्षय मित्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शासनाच्या “निक्षय पोषण योजना” अंतर्गत टीबी रुग्णांना उपचार कालावधीत दरमहा ₹१०००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे रुग्णांच्या पोषण स्थितीत सुधारणा होऊन उपचार परिणामकारक होण्यास मदत होते.
“क्षयरोग हा संसर्गजन्य पण पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी व उपचार पूर्ण करावेत. तसेच ‘निक्षय मित्र’ बनून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा.” असे आवाहन या वेळी महापालिकेतर्फे करण्यात आले.
0000000

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा
ठाणे : पियुष कनोजियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने गोदरेज स्टाफ क्लबचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील विजयी आगेकूच कायम राखली. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पियुष कनोजियाने पाच षटकांत अवघ्या दोन धावांत सहा बळी मिळवून छाप पाडली. गोदरेजच्या १३१ धावांचे आव्हान अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने १४ षटकात १३७ धावा करत पार केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोदरेज स्टाफ संघाच्या आघाडीचे फलंदाज धावा करण्यात सपशेल अपयशी ठरले असताना पूर्वार्य गुंडुर आणि प्रशांत खावरेने दहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पूर्वार्याने नाबाद ६० आणि प्रशांतने ४o धावा बनवल्या. या डावात पीयुषसह ओमकार करंदीकरने तीन फलंदाज बाद केले. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश जांगिडने ६० धावांची खेळी केली.अश्विन माळीने नाबाद २३ आणि शंतनु नायकने नाबाद २७ धावा बनवल्या.
संक्षिप्त धावफलक : गोदरेज स्टाफ क्लब : ३३.४ षटकात सर्वबाद १३१( पूर्वार्य गुंडुर नाबाद ६०, प्रशांत खावरे ४०, पियुष कनोजिया ७-५-२-६, ओमकार करंदीकर ७-३९-३) पराभूत विरुद्ध अरुप्रीत टायगर्स एलएलपी : १४ षटकात ३ बाद १३७ ( आकाश जांगिड ६०, अश्विन माळी नाबाद २३, शंतनु नायक नाबाद २७).
000000

केतन खेडेकर
मुंबई : अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विधानाने मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई अग्निशमन केंद्र मुख्यालय, भायखळा, येथे नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील २२ संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मालेगावच्या इस्तियाक संघाने प्रतिस्पर्धी मालेगावच्याच आय एस सी संघाचा सरळ दोन सेट मध्ये १५-०७, १६-१४ असा पराभव केला. विजयी इस्तियाक मालेगाव संघातून इस्तियाक, यासीन, मुबासिर यांनी सुंदर खेळ केला; पराभूत आयएससी मालेगाव संघातून वकार याने दुसऱ्या सेट मध्ये आघाडी घेतली होती, तरीही इस्तियाक याने त्याचे आव्हान परतवून विजय संपादन केला.
उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आय एससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान या सोलापूर संघाचा १५-०६, १५-०६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघाचा तीन सेट मध्ये ०६१५, १५-११, १५-०८ असा पराभव केला. या सामन्यात महेश माने व संदेश घारे यांनी अप्रतिम खेळ केला पण इष्टियाकच्या आक्रमणापुढे त्यांना हर पत्करावी लागली. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून उत्कृष्ट शूटिंग केलेल्या इस्तियाक (मालेगाव संघ) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून संदेश घारे (सांगली) याची निवड करण्यात आली.
उपउपांत्य फेरीचे निकाल :
अमीर काझी सोलापूर विजयी विरुद्ध टेंभुर्णी संघ २१-१४
इस्तियाक मालेगाव विजयी विरुद्ध कल्याण संघ २१-१०
आयएससी मालेगाव विजयी वि. मुंबई महानगरपालिका २१-६
सांगली संघ विजयी विरुद्ध रायगड अलिबाग संघ २१-१६
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, सर्व अधिकारी, अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच चे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, स्पर्धा निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे तसे अग्निशन संघाचे राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी खूप परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर यांनी काम पाहिले., तंत्री सल्लागार म्हणून मिलिंद बिर्जे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीने पाहिले, सचिव दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी भोर एस.डी सावंत, सेवानिवृत्त विभाग अधिकारी पाटील साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत; केंद्र अधिकारी बोरुले, के किशोर घाडीगावकर कुटुंबिय, यांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी मुंबई काँग्रेस, दत्तप्रसाद पेडणेकर, अध्यक्ष, मालवण तालुका पत्रकार संघ; गजानन आंगणे, श्री भराडी देवस्थान आंगणेवाडी, मालवण यांनीही स्पर्धेला उपस्थिती दर्शवली.
बक्षीस समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी घोष साहेब व भोर सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे साहेब व भगत साहेब वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल चंद्रकांत विश्वासराव केंद्र अधिकारी जितेश गोरुले आणि प्रमुख अतिथी सुरज चव्हाण सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार शाम सावंत यांनी उपस्थित राहून खेळाडूना मार्गदर्शन केले.
००००००००
ठाणे – ज.ए.ई.चे मो. ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्चला सायं. ६ वा. मो. ह. विद्यालय शाळेचे मैदान येथे सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी उपस्थित असणार आहे.

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा
लीलावती हॉस्पिटल उपांत्य फेरीत
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-अंधेरी संघाचा ७ विकेटने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. लीलावती हॉस्पिटलचा राहुल जांभळे व केडीए हॉस्पिटलचा अॅलन गावद्या यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रीडाप्रेमी अरुण माने, रुग्णालयीन क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, श्रीकांत दुधवडकर, भरत पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, रुपेश कोंडाळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
शिवाजी पार्कमधील बीएमसी खेळपट्टीवर लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. अॅलन गावद्या (३६ चेंडूत ६२ धावा), अलकेत तांडेल (३२ चेंडूत ३३ धावा), सुरज जयस्वाल (२२ चेंडूत ३४ धावा) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५८ धावांचा टप्पा गाठला. स्वकीत पांचाळने २५ धावांत ३ बळी व जगदीश कोठारेने ३६ धावांत २ बळी घेतले. विजयी लक्ष्य गाठताना धावगती जलद करण्याच्या नादात दुसऱ्या षटकामध्ये भरवंशाचा सलामीवीर मनोहर पाटेकरला (१३ चेंडूत १३ धावा) केडीएच्या दक्ष क्षेत्ररक्षकांनी धावचीतद्वारे टिपले. परंतु त्यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल जांभळे (३९ चेंडूत ६४ धावा), संदीप कणसे (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा), संदेश पंधेरे (१३ चेंडूत नाबाद २२ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून लीलावती हॉस्पिटलचा विजय १८.१ षटकात ३ बाद १५९ धावा फटकावून साकारला. दुसऱ्या सामन्यात सोमैया हॉस्पिटलने सायन हॉस्पिटलला ३५ धावांनी पराभूत करतांना प्रकाश पुजारी (२९ चेंडूत ५७ धावा) व दर्शन गुरव (३९ चेंडूत ४९ धावा) यांची फलंदाजी विजयासाठी उपयुक्त ठरली. संभाजी थोरात (४० चेंडूत ४२ धावा) व निलेश चव्हाण (१२ चेंडूत नाबाद २० धावा) यांनी छान फलंदाजी करूनही सायन हॉस्पिटलला १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती
काका पवार यांच्या तालमीला ५० लाखांचे आर्थिक सहाय्य
पुणेः खासदार व कुस्ती श्रेत्राचे आश्रयदाते शरद पवार साहेब यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती तर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल,पुणे या संकुलसाठी ५० लाख रुपयेंचे बक्षिस दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक श्री मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्लांनी पदकाची लयलुट केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे.
शरद पवार यांचे आभार र्व्यक्त करीत काका पवार म्हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्या वेगाने पवार हेच कुस्तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, गुरूवर्य काका पवार यांच्या सल्ल्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
चौकट
शासनाकडून नोकरीचे आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काक पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्यावेळी येत्या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचे काका पवार यांनी सांगितले आहे.
