15 June Bitambatmi All pages

Open Book

डोंबिवली : दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कल्याण-डोंबिवलीत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असे. मात्र, यंदा ‘अल निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे उन्हाळा अत्यंत रणरणता गेला असून, पावसाळ्याची सुरुवातही लांबणीवर पडली आहे. त्यातच बारवी धरणातील पाणीसाठा आता अवघा २७ टक्केच शिल्लक राहिला आहे. परिणामी, जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार शहरात २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. आता आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने, आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांवर जलसंकट अधिक ओढवले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मोहने आणि मोहिली येथील स्वतःच्या जलशुद्धीकरण केंद्रांतून शहराला पाणीपुरवठा करते. तर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना ‘एमआयडीसी’मार्फत (MIDC) पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाणी वितरण व्यवस्थेतील तांत्रिक दोष यामुळे अनेक भागात सध्यातरी पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. परिणामी नागरिक त्रस्त झाले असून, अनेक सोसायट्यांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत केडीएमसीकडून (KDMC) दरदिवशी २० टक्के पाणीकपात करून ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे आधीच टंचाईग्रस्त असलेल्या भागात जलसंकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.
असे असेल पाणी कपातीचे वेळापत्रक:
१७ जून (डोंबिवली पूर्व) : नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा डोंबिवली पूर्वेतील ‘एफ’ आणि ‘जी’ वॉर्डचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहील.
१८ जून (कल्याण) : बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा ‘डी’ आणि ‘जे’ वॉर्डचा पाणीपुरवठा बंद राहील.
१९ जून (डोंबिवली पश्चिम) : नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा डोंबिवली पश्चिमेतील ‘एच’ वॉर्डचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.
बारावे केंद्र (कल्याण पश्चिम) : बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा कल्याण पश्चिमेतील ‘बी’ आणि ‘सी’ वॉर्डचा पाणीपुरवठा बंद राहील.
मोहिली केंद्र (मांडा-टिटवाळा व परिसर) : मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा मांडा-टिटवाळा, शहाड ‘ए’ वॉर्ड, तसेच ‘बी’ वॉर्डमधील योगीधाम ते वालधुनी परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
०००००००००

आजपासून स्थानिकांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
कल्याण: कल्याण पूर्वेतील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या विकासासंदर्भात काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही बौद्ध संघटना, स्थानिक भंते यांनी आता या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या प्रमुख मागण्या अद्याप मान्य झालेल्या नसल्याचा दावा करत १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शांत झालेला बुद्धभूमीचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कल्याण पूर्वेतून वालधुनी उड्डाणपूल जात आहे. हा उड्डाणपूल जात असलेली जागा ही बुद्धभूमी फाउंडेशनची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर या पुलाच्या उभारणीसाठी पालिका प्रशासनाने या जागेवरील गौतम बुद्धांच्या मूर्ती चुकीच्या पद्धतीने बाजूला केल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत वालधुनी येथील सुमारे ३० एकर जागेवर बौद्ध विहार, स्तूप, विपश्यना केंद्र, रुग्णालय, संशोधन व शैक्षणिक संकुलासह आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादावर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र, बुद्धभूमी फाउंडेशन व भिक्खू संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, बुद्धभूमी परिसरासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूळ प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिसरातील कथित अतिक्रमण, जागेच्या मालकी व सीमांकनाचे प्रश्न, पूर्वी झालेल्या कारवाईची चौकशी, तसेच बुद्धभूमीच्या मूळ स्वरूपाचे संरक्षण यासंदर्भातील मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, १५ जूनपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित मागण्यांबाबत शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या महाबोधी संकुल प्रकल्पामुळे बुद्धभूमीचा विकास होणार असल्याचा दावा एका बाजूने केला जात असला, तरी दुसरीकडे मूळ प्रश्न सुटल्याशिवाय विकास आराखड्याला मान्यता देता येणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे बुद्धभूमीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता १५ जूनपासून प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाजाच्या मुख्य मागण्या काय?
३० मे २०२६ रोजी झालेल्या कारवाईत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती हटवणे, बौद्ध स्तूप व भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती पाडणे, तसेच ४२ झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भंतेनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ निलबांची मागणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्यावर गुन्हा नोंदवून निलंबित करावे, तसेच कारवाईत सहभागी ६०-७० जणांची ओळख पटवून अटक करावी अशी ठाम मागणी स्थानिक भंतेजी यांनी केली आहे.
तसेच, विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल बुद्धभूमी परिसराला बाधा न आणता वालधुनी नदीलगत घ्यावा, तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याचबरोबर” बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र ”विकसित करून भव्य बुद्ध विहार, विपश्यना केंद्र, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल व ५० मीटर उंच बुद्ध मूर्ती उभारण्याची मागणी ही करण्यात आली आहे.

मुंबई :राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडींग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे दर तासाला त्याचा वीज वापर मोबाईल फोनवर समजतो. त्यामुळे वीज बिलाबाबत पारदर्शिता राहते. स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहकाला त्याच्या वीजवापरावर व वीजबिलावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
स्मार्ट मीटरच्या ॲपद्वारे ग्राहकाला त्या घरात अथवा कार्यालयात अर्थिंगची समस्या अथवा वीजगळती होत असल्यास समजते. त्या माहितीचा ग्राहकाला लाभ होतो. ग्राहकाने कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे स्मार्ट मीटरमुळे समजते. त्या आधारे घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत मिळते. याशिवाय मोबाईल ॲपद्वारे बिल भरल्यास डिजिटल पेमेंटची सवलत आणि गो ग्रीनची दरमहा दहा रुपये सवलत मिळते.
00000000

ठाणेः ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वाद ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहेत. तर त्यांच्यासमोर आमदार किसन कथोरे यांचे सहकार पॅनल असणार आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरूद्घ भाजप असाच सामना रंगत असल्याचे चित्र आहे.
सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था समजल्या जाणाऱ्या दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालवधीसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत सुरूवात झाली आहे. २७ जून २०२६ रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २८ जून रोजी मतमोजणी होईल.
बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांनुसार प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली. सध्या अर्ज मागे घेण्याची मुदत सुरू आहे. या दरम्यान राजकीय खेळी करत अनेक अर्ज मागे घेतले गेले असून काही पदांसाठी अवघे एकच अर्ज आल्याने जवळपास १० ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे.
मात्र बिनविरोध निवडणुकीच्या निमित्ताने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनोखे राजकारण पाहायला मिळते आहे. २१ पैकी १० ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आल्यानंतर आता या निवडून आलेल्या सदस्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू असून त्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील भाजपातील पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
त्यांनी या पॅनलला महायुतीचे पॅनल म्हणून घोषीत केले आहे. तर दुसरीकडे आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आतापर्यंत दहा पैकी ८ जागांवर सहकार पॅनलचे सदस्य निवडून आल्याचा दावा केला जातो आहे. तर दोन ठिकाणी परिवर्तन पॅनलचे सदस्य निवडून आल्याचा दावा केला गेला आहे.
त्यामुळे २१ सदस्यांच्या या बॅंकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलले आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र या निमित्ताने भाजपातील दोन नेत्यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या निवडणुकीतही किसन कथोरे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या सोबतीने कपिल पाटील यांच्या आघाडीला धक्का दिला होता. यंदा त्यांना शिवसेनेची साथ मिळणार आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कथोरे आणि पाटील संघर्ष पाहायला मिळाला होता. लोकसभेत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. त्यात कथोरेंचा हात होता असा उघड दावा अनेकदा पाटील यांनी केला होता. त्यानंतर या दोघांतील वाद वाढला आहे. आता विधानसभेनंतर जिल्हा निवडणुकीत पाटील आणि कथोरे एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाची सरशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कल्याण : कल्याण जवळील मोहने येथील प्रसिध्द रील स्टार प्रेम भाटी (३०) यांचा शनिवारी मध्यरात्री मोहने येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाला मोहने भागात रस्ते काम करणारे पालिका प्रशासन, संबंधित कामाचा ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत स्थानिकांनी या अपघात प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केली आहे.
प्रेम भाटी मृत्युप्रकरणी प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य आपल्या रिक्षा बंद ठेऊन रस्त्यावर आंदोलन करतील. यावेळी प्रवाशांची गैरसोय झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिला आहे. रील स्टार प्रेम भाटी आपल्या कुटुंबीयांसह मोहने येथे राहतो. समाज माध्यमातील सध्याचा प्रभावशील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे विविध प्रकारचे समाज माध्यमातील रील चर्चेचा विषय आहे. या रील्समुळे समाज माध्यमांत त्यांचे लाखो चाहते आहेत.
मोहने भागात रस्त्याची कामे ठेकेदाराकडून सुरू आहेत. या कामासाठी रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग करण्यात आले आहेत. ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीमुळे, भटकी कुत्री या खडीवर येऊन दिवसभर उड्या मारतात. आणि पादचाऱ्यांच्या येण्या जाण्याने खडी रस्त्यावर पसरली आहे.
ही रस्त्यावर पसरलेली खडी पादचारी, वाहन चालक, दुचाकी स्वार, रिक्षा चालक यांना घातक ठरत आहेत. दररोज या भागात खडीवर घसरून अनेक दुचाकी स्वार पडतात. ही खडी दूर करावी किंवा या भागातील रस्ते काम लवकर पूर्ण करावे म्हणून स्थानिकांनी ठेकेदार, प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
रील स्टार प्रेम भाटी शनिवारी मध्यरात्री मुंबई, ठाणे परिसरातील आपले कामे आटोपून दुचाकीवरून मोहने येथील आपल्या घरी परतत येत होता. मोहने येथे रस्ते काम सुरू असलेल्या ठिकाणी त्याची दुचाकी खडीवरून घसरली. दुचाकी वेगात असल्याने प्रेम भाटीला दुचाकीवर नियंत्रण आणता आले नाही. खडीवरून दुचाकीवरून घसरताच दुचाकी दुचाकीच्या वेगामुळे ती रस्त्यावर घसरत ४० फूट पुढे गेली.

धरणांचा तालुका असलेल्या शहापूरमध्ये पाण्यासाठी रणकंदन
कसारा: मुंबई, ठाणे आणि कल्याणची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस लांबल्याने पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. भातसा, तानसा, वैतरणा आणि मध्य वैतरणा या महाकाय धरणांच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींना मात्र घोटभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्या तुडवत मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. एकीकडे प्रकल्पांसाठी लाखो लिटर पाणी सहज उपलब्ध होत असताना दुसरीकडे तहानेने व्याकूळ झालेल्या आदिवासींच्या वाट्याला कोरडी घागर आणि प्रशासनाची उदासीनता आली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि पाऊस उशिरा पडल्याने शहापूरमधील पाणीटंचाई आता मानवी संकटात रूपांतरित होत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.
धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये शेकडो गावे आणि पाड्यांतील नागरिकांना उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी डोंगर-दऱ्या पालथ्या घालाव्या लागतात. विहिरी, कुपनलिका, ओढे आणि नदीपात्रे कोरडी पडल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुले मैलोनमैल चालत पाण्याचा शोध घेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, टंचाई निवारणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. २००८ पासून मंजूर असलेल्या अनेक नळपाणी पुरवठा योजना आजही भ्रष्टाचार, दिरंगाई आणि निष्क्रियतेच्या गर्तेत अडकलेल्या आहेत.
परिणामी, धरणांच्या उंबरठ्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या नशिबी आजही पाण्यासाठीची वणवण कायम आहे. एका बाजूला नागरिक घोटभर पाण्यासाठी त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांसाठी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिकांच्या मते, रोज तीन ते चार लाख लिटर पाणी विविध प्रकल्पांकडे वळवले जात असताना प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. गरीब आदिवासींना पाणी मिळत नसताना प्रकल्पांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
टंचाईग्रस्त भागात बांधण्यात आलेले अनेक बंधारे निकृष्ट कामांमुळे पाणी साठवण्यात अपयशी ठरत आहेत. पाटबंधारे आणि वन विभागाने दुरुस्ती केलेल्या काही बंधाऱ्यांमध्येही पाणी टिकत नसल्याने ते कोरडे पडले आहेत. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर खर्च झालेला निधीही वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कळभोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच जया सोमनाथ वाख म्हणाल्या, मुंबईकर धरणातील शुद्ध पाण्याचा आनंद घेत आहेत; पण धरणालगत राहणाऱ्या आम्हाला पाणीही मिळत नाही. हा आमच्या नशिबी आलेला अन्याय आहे.
यंदा हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे पाणीस्रोत झपाट्याने आटत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनांमुळे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहापूरमधील आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. धरणांच्या कुशीत राहूनही तहानेने होरपळणाऱ्या या नागरिकांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 नगरसेविका रेश्मा निचळ यांचा उपक्रम
कल्याण : शिवसेना, ताठे स्टाफिंग आणि के. सोपानराव निचळ फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात कल्याण पूर्वेतील अनेक बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळाला. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ११ च्या शिवसेना नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी निचळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.
या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून १०वी, १२वी,  आयटीआय, डिप्लोमा तसेच सर्व शाखांच्या पदवीधर उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी थेट मुलाखत घेऊन त्वरित निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये अनुभवी  आणि फ्रेशर या  दोघांसाठीही संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच आलेल्या उमेदवारांना  करिअर बाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले असून सोमवार पासून ते कामाच्या ठिकाणी रुजू देखील होणार आहेत. या रोजगार मिळालेल्या युवकांनी नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांचे आभार मानले.

कल्याण : शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा महागडा मोबाईल पाडून चोरी करणाऱ्या फटका गँगच्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. हसन जफर असे या चोरट्यानेचे नाव आहे.
अमरावती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडण्यात आला होता. मोबाईल पडताच आरोपीने तो लंपास केला. या प्रकरणी पीडित प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती गोळा करून तपास सुरू केला. आरोपी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हसन दारा जफर या फटका गँगच्या सदस्याला रंगेहात ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीकडून फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने आणखी किती मोबाईल चोरी केले आहेत, याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस पथकाने केली असून, आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

मुकुंद रांजाणे
माथेरान : धनाढ्य मंडळींनी बिनधास्तपणे अव्वाच्या सव्वा बांधकामे करा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशीच काहीशी भूमिका बजावत माथेरान नगरपालिका प्रशासन अधिकारी आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या सत्तेतील ज्या लोकप्रतिनिधींचे पाठबळ आहे.त्याबद्दल स्थानिक मंडळींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.एकीकडे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांना स्वतःचा निवारा उभारण्यासाठी बांधकाम साहित्य आणण्यास बंदी घातली जाते आणि दुसरीकडे धनाढ्य लोकांच्या बांधकामांना आर्थिक लोभापायी अभय देण्याची भूमिका पार पाडली जात असल्याने सत्तेचा गैरवापर होत असल्याचे नागरिकांमधून उघडपणे बोलले जात आहे. येथील अलेक्झांडर हॉटेलमध्ये विनापरवाना बांधकामांना उत आला असून या पर्यावरण दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या माथेरानमध्ये सनियंत्रण समिती, हेरिटेज कमिटीची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेतलेली नसून नगरपालिके मधून किरकोळ दुरुस्ती परवानगीच्या नावावर मोठया प्रमाणात अतिक्रमीत बांधकाम सुरू केले आहे.याबाबत शिवराष्ट्र पॅनेलचे विरोधी पक्षनेते,नगरसेवक यांनी
मुख्याधिका-यांना लेखी निवेदन सादर करून अलेक्झांडर हॉटेलमध्ये सुरू असलेले विनापरवाना बांधकाम त्वरीत बंद करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. परंतु सद्यस्थितीत पालिका प्रशासन अधिकारी आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधीनी याबाबत मौन पाळले असून एकप्रकारे निवेदनाला केराची टोपली दाखविल्या सारखेच आहे. एकीकडे नगरपालिका वृक्षारोपण कार्यक्रमाचा दिखावा करत असून दुसरीकडे झाडांची कत्तल करण्यास धनाढ्य लोकांना मुभा दिली जात आहे. याच अलेक्झांडर हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी विनापरवाना तंबू लावून व्यवसाय केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच एका तंबूवर झाड कोसळून पर्यटक मुलीचा गंभीर अपघात झाला होता.तरीसुद्धा ह्या हॉटेलच्या आवारात तंबू लावण्यात आले आहेत. विनापरवाना बांधकामांना पाठबळ एकटा अधिकारी देऊ शकत नाही त्यांच्या मागे भक्कम आधार हा सत्तेतील काही लोकप्रतिनिधींचा आहे त्यामुळेच मोठमोठ्या बंगल्याची कामे सर्रासपणे झाडांची कत्तल करून सुरू आहेत. अशीच परिस्थिती यापुढेही राहिली तर माथेरानचा आगामी काळ पर्यटनास धोकादायक ठरू शकतो असे जेष्ठ मंडळी बोलत आहेत.
————————————————–
अलेक्झांडर हॉटेलमध्ये सुरू असलेले विनापरवाना बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे.याठिकाणी मोठया प्रमाणावर वृक्षतोड सुध्दा करण्यात आली असून पर्यटकांसाठी तंबू लावून व्यवसाय सुरू आहे, स्विमिंग पुलाचे सुध्दा काम सुरू असून या सर्व कामांना सनियंत्रण समितीची कोणत्याही प्रकारची  वैध परवानगी नसताना कामे कशी सुरू आहेत याबाबत मागील आठवड्यात निवेदन दिले आहे परंतु मुख्याधिका-यांनी काहीच उत्तर दिलेले नाही.
सीताराम कुंभार—-विरोधी पक्षनेते माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *