भाजपा प्रदेश पदाधिकारी जाहीर
नवनाथ बन मुख्य प्रवक्ते
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. तरुण तडफदार आणि नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळेत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे.
आज जाहिर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यात १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस,१२ चिटणीस, कोषाध्यक्ष, सह कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता, विविध मोर्चाच्या अध्यक्षांची समावेश आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाणांनी ही यादी घोषित केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय संघटन मंत्री बी. एल.संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या कार्यकारिणीची घोषणा केल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश सरचिटणीस म्हणून आ.निरंजन डावखरे, आ.योगेश सागर, आ. संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे या सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लढा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी…
हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला भाव, दुष्काळग्रस्तभागात निधी वाटप आदी मागण्या करत महाविकास आघाडीने आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुपारी, संत्र्यांची प्रतिकात्मक माळ गळ्यात घालून हे आंदोलन करण्यात आले.

भाजपाच्या करवाढी विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन-अरविंद जोशी
मीरारोड – विधिमंडळात विरोधकांचा जोमाने एकत्रित मुकाबला करणारे सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना रस्त्यावर मात्र एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. मीरा भाईंदरमध्ये तर भाजपाने केलेल्या अन्याय करवाढीविरोधात शिंदेसेनेने रस्त्यावर उतरून भाजपाविरोधात भीकमांगो आंदोलन केले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने पहिल्याच महासभेत नागरिकांवर मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात तब्बल ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. त्या निषेधार्थ शिंदेसेनेने महापालिकेत भाजपा विरोधात भीक मागो आंदोलन केले. मुख्यालयात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालना बाहेर ठिय्या मारला तसेच आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली.
पहिल्याच महासभेत सत्ताधारी भाजपाने भाड्यावरील मालमत्ताच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेतलाच शिवाय मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. कर योग्य मूल्य दरात वाढ केल्याने मालमत्ता कर मध्ये मोठी वाढ होणार आहेच शिवाय रस्ता कर, पाणी पुरवठा लाभकर, मलप्रवाह सुविधा कर, वृक्ष कर, शिक्षण कर, अग्निशमन कर देखील वाढणार आहेत. ह्या कर वाढी वरून टीकेची झोड सुरु आहे. याविरोधात पालिका मुख्यालया बाहेर शिवसैनिकांनी भीक मागत भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक हे मुख्यालयात शिरले. दुसऱ्या मजल्यावर भाजपा महापौर डिम्पल मेहता यांच्या दालना बाहेर ठिय्या मारत करवाढ रद्द करण्याची मागणी केली.
शिंदेसेनेच्या नगरसेविका वंदना पाटील, शर्मिला बगाजी, फ्रिडा डिमेलो, जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हा संघटक निशा नार्वेकर सह माजी नगरसेवक प्रवीण पाटील व तारा घरत, पदाधिकारी सचिन मांजरेकर, विक्रमप्रताप सिंह, प्रसाद सुर्वे, विकास पाटील आदींनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना निवेदन दिले. विषयपत्रिकेवर विषय नसताना बेकायदा ठराव केला असून करवाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
भाजपाचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी आदीं कडून हि वाढ नागरिकांवर केलेली नाही तर १ एप्रिल नंतर कर आकारणी होणाऱ्या घर – दुकाने आदी मालमत्तां वर लागणार आहे असे सांगत आहेत. मात्र हि नागरिकांची दिशाभूल व खोटेपणा असल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे.
भाजपा के नाम से दे दे बाबा…. मीरा भाईंदरमध्ये नागरिकांवर लादण्यात आलेल्या अन्याय करवाढीविरोधात एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून भाजपा के नाम से दे दे बाबा अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.
लबाड सरकार ढोंग करतय- भास्कर जाधव
मुंबई : सराकर लबाड असून ते नुसतेच ढोंग करतेय. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
सरकारकडे तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काय आहे?राज्यपालांच्या भाषणात मुद्दे येणे विषयी ही आजपर्यंतची प्रथा परंपरा आपण अनुभवली. पण यावेळचे राज्यपालांचे भाषण हे बेचव होतं. कोणतेही प्रकारे उत्साहवर्धक नव्हते. कोणालाही उत्सहा वाटेल असं नव्हतं, राज्यपाल साहित्यिक असावे असं मला वाटतं असा टोला जाव यांनी लगावला. तसेच लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन देखील जाधव यांनी सरकारवर टीका केली.
सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विरोधकांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या उत्पादनांची माळ घालून आंदोलन केले.
टाटा, वेदांत, बल्क ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प या राज्यात आलेले आणि कोणाला तरी जी हुजूर करावंलागत म्हणून गुजरात ला पाठल्याची टीका जाधव यांनी सरकारवर केली. ज्या योजना केल्या होत्या त्याच काय असित्व आहे. नवीन घोषणा करता, इव्हेंट करता. २०२४ मध्ये लाडका भाऊ आणलेला १० लाख तरुणांना नोकरीं देणार सांगितलं. माझ्याककडे व्ह डिओ किल्प आहेत. आज ती मुलं वणवन फिरत आहेत.
अपल्याला लाडकं काही न्हवत फक्त खुर्ची होती. खुर्ची मिळाली, आता लाडका भाऊ पण गेला आणि बहिण पण गेली अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
अजित दादांच्या मृत्यूस कारणीभूत व्हिएसआरच्या विमानांस उड्डाण बंदी
रोहीत पवारांनी पहिली लढाई जिंकली.0 चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना बंदी
नवी दिल्ली : अजित पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्हिएसआरच्या विमानांना केंद्र सरकाराने दणका दिला आहे. त्यांच्या चार विमानांना भारतात उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून व्हिएसआ व्हेंचअर्सच्या चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिअरजेट 40/45 या मॉडेलच्या चार विमानांना उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या विमानांमध्ये उणीवा आढळल्यामुळं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यापूर्वी रोहित पवार.यांनी लिअरजेट विमानाच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानांचे उत्पादन अमेरिकेत होते. ही विमाने अमेरिकेत अनेक वर्ष वापरली गेली होती. त्यानंतर ती भारतात आणली होती असे रोहित पवार यांनी सांगितले होते. याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
डीजीसीएची ही कारवाई म्हणजे आमच्या लढ्यास आलेले नखाएवढे यश आहे. अजून खुप मोठी लढाई लढायची बाकी आहे अशी प्रतिक्रीया रोहीत पवारांनी दिली.
डीजीसीएच्या अहवालानुसार, विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजे उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आला आहे. विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची चार लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या व्हीडी- व्हीआरे, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हिआरए आणि व्हीटी- व्हीआरआय या चार विमानांची उड्डाणं करू नयेत असं या अहवालात म्हटलं आहे.

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा
समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा महाघोटाळा ० ड्रायव्हरच्या नावे हिबानामा ० अंबादास दानवेंचा पुराव्यानिशी आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा समृद्ध घोटाळ्याचा आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पर्दापाश केला आहे. समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील २३ एकर ३० गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे ‘हिबानामा’ (बक्षीस पत्र) करून बळकावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. एनअधिवेशनाच्या काळात दानवे यांनी या भ्रष्ट्राचाराचे पुरावेच उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. समृद्धी मार्गातील जमीन संपादनात भुखंडांचे श्रीखंड खाण्यासाठी हा प्रताप भुमरेंनी केल्याचा आरोप दानवेंनी केला.
अंबादास दानवे यांच्या आरोपानुसार, संबंधित जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा (बक्षीस पत्र) करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा हिबानामा १९७१ साली झाल्याच्या दाखवलं जात आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म १९८५ मध्ये झाल्याचा दावा दानवे यांनी केला. त्यामुळे १९७१ मध्ये जन्माआधी त्याच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समृद्धी महामार्गासाठी संपादन
जटवाडा येथील ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केल्याचे सांगितले जाते. समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्याचे आदेश झाल्यानंतर तिचे संपादन मूल्य तब्बल ११५० कोटी रुपये निश्चित करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या रकमेच्या मोबदल्यासाठी काही जणांनी मालकी हक्काचा दावा करत पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत खासदार संदीपान भुमरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आपल्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. तसा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसुल हा माझा ड्रायव्हर आहे, पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोप करण्यात आलेला जावेद हा दुसराच असेल. अंबादास दानवेंना सगळीकडे संदीपान भुमरेच दिसतात. अंबादास दानवे यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावं.”असे आव्हान भुमरेंनी दिले.
चौकट
सीआयडी चौकशीची दानवेंची मागणी
या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. चौकशी झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
केरळ नव्हे आता केरळम म्हणा !
नवी दिल्ली : भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्याला आता यापुढे केरळम म्हणावे लागणार आहे. केळरचे नाव बदलून ‘केरळम्’ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली केरळ सरकारची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये केरळ विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून राज्याचे नाव ‘केरळ’ ऐवजी ‘केरळम्’ करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती. या ठरावांचे प्रस्ताव मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मांडले होते. अलीकडेच केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला.
२०२४ मधील ठरावात नमूद करण्यात आले होते की, मल्याळम भाषेत राज्याचे मूळ नाव ‘केरळम्’ आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली, तेव्हापासून केरळ राज्याच्या स्थापनेचा दिवस ‘केरळ पिरवी’ म्हणून साजरा केला जातो. मल्याळम भाषेत राज्याला ‘केरळम्’ असेच संबोधले जाते. मात्र, भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत राज्याचे नाव ‘केरळ’ असे नोंदविण्यात आले आहे.
या विसंगतीमुळे संविधानाच्या कलम ३ अंतर्गत दुरुस्ती करून अधिकृत नाव ‘केरळम्’ करण्याची मागणी केरळ विधानसभेने केली होती. अखेर केंद्र सरकारने या मागणीला मंजुरी दिल्याने राज्याच्या अधिकृत नावात बदल होणार आहे.
या निर्णयाला आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले असून, मल्याळम भाषिक अस्मितेला मान्यता देणारा हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

पुणे : बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना घोषित झाला असून, ३ मार्च रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) चे महाराष्ट्राचे सचिव बरोबरच कलाकृती निवडताना वेगळा समाज प्रबोधनपर मार्ग निवडणारे अभिनेते व दिग्दर्शक म्हणून रविंद्र देवधर हे नाट्य वर्तुळात सुपरिचित आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अकथित पण महत्त्वपूर्ण पानं उलगडणार्या, देवधर यांची संकल्पना व मुख्य भूमिका असलेल्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे २४९ प्रयोग त्यांनी केले आहेत. माजी एअर मार्शल भूषण गोखले, ऑस्करपर्यंत मजल मारलेले ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे यांसारख्या अनेक नामांकितांनी ‘प्रत्येक भारतीयाने अनुभवायला हवा असा नाट्यानुभव’ या शब्दांत ‘मी भारतीय’ला गौरवलेलं आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषद – मध्यवर्ती शाखेचा ‘नाट्यकला मंदिर पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषद – पुणे शाखेचा ‘भालबा केळकर पुरस्कार’, देवधर मंडळाचा ‘चतुरस्त्र व्यक्तिमत्व’ पुरस्कार यांशिवाय विविध प्रवाहबाह्य नाट्यकृतींसाठी पटकावलेली राज्य नाट्य स्पर्धेची अनेक पारितोषिकं देवधर यांच्या नावावर यापूर्वी जमा आहेत.
पुरस्कार वितरण मंगळवारी ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. त्यानंतर ‘मी भारतीय’ नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
याशिवाय या कार्यक्रमात चित्रपट समीक्षक, मुक्त पत्रकार कृपाशंकर शर्मा यांना ‘साहिर लुधियानवी पुरस्कार’, डॉ. बालाप्रसाद बडायले यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि छायाचित्रकार व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या दीप्ती लोंढे यांना महान दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ऋत्विक घटक पुरस्कार’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल.

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला
( राजेंद्र साळसकर )
मुंबई -अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी रेल्वे बोर्डात प्रधान कार्यकारी संचालक (पायाभूत सुविधा) म्हणून रुजू होणाऱ्या एस. एस. गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारला. मालखेडे हे १९९१ च्या बॅचचे आयआरटी एस अधिकारी आहेत. त्यांनी २०२४-२०२६ दरम्यान मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, २०२२ ते २०२४ दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि २०१९ ते २०२२ दरम्यान दक्षिण पश्चिम रेल्वेचे हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
२०१३-१५ या वर्षात जेव्हा अत्यंत महत्त्वाच्या लुमडिंग- बदरपूर- सिलचर मार्गाचे गेज-रूपांतरण सुरू होते, तेव्हा त्यांनी ईशान्य सीमावर्ती रेल्वे (एनएफआर) येथे मुख्य मालवाहतूक व्यवस्थापक (सीएफटीएम) म्हणून आव्हानात्मक पद भूषवले आहे. या कार्यकाळात, त्यांनी त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि लोअर आसाम सारख्या दूरच्या राज्यांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्याचे नियोजन केले. मालखेडे यांनी मध्य रेल्वेमध्ये परिचालन, वाणिज्य विभाग आणि सामान्य प्रशासन यासारख्या विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी मुंबई विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, उपमुख्य परिचालन व्यवस्थापक (मालवाहतूक), उपमहाव्यवस्थापक (जनरल), उपमुख्य दक्षता अधिकारी (ट्रॅफिक) आणि इतर पदांवर काम केले आहे. त्यांनी २०१५ ते २०१९ या काळात आयआरसीटीसीमध्ये पश्चिम विभागाचे ग्रुप महाव्यवस्थापक म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केले आहे. १९९९-२००४ दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील कॉन्कर (CONCOR) मध्ये डीडी इनलँड कंटेनर डेपो (ICD) येथे स्थापित केलेल्या प्रतिनियुक्तीवर होते तसेच आयसीडी नागपूरचेही ते प्रमुख होते.
अरविंद मालखेडे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि ते चेव्हनिंग गुरुकुल स्कॉलर आहेत. २००९ मध्ये त्यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मधून नेतृत्व आणि व्यवस्थापन कार्यक्रमाचा अभ्यास केला आणि युरोपमधील आंतरराष्ट्रीय संस्थांचा त्यांनी अनुभव घेतला. त्यांनी आयएनएसईएडी (INSEAD) सिंगापूर, आयसीएलआयएफ (ICLIF) मलेशिया, हाँगकाँग, जर्मनी इत्यादी ठिकाणी विविध प्रशिक्षण आणि कार्यक्रमात सहभाग घेतले आहेत. मुंबईतील रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत ते सामाजिक कार्यात जवळून सहभागी आहेत.
