14 July Bitambatmi All pages

Open Book
Open Book

हरिभाऊ लाखे
नाशिक : खासदार संजय राऊत यांना गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर कुठे दिसत आहेत ? त्यांनीच ते शोधून द्यावेत. स्वतः काही करायचे नाही आणि काहीही बोंब ठोकतात. त्यांच्या मागे आता कोणी उरलेले नाही. पंतप्रधानांपासून ते सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाटेल ते बोलणे, हा एकच गुणधर्म त्यांच्याकडे उरला आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. राऊत यांच्या जिभेला हाड नाही, हा त्यांचा ‘मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट’ आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भाजपचे संकटमोचक मंत्री महाजन यांनी रविवारी नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कुंभमेळ्याची सर्व कामे ही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्याच्या राऊत यांच्या आरोपांवर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, राऊत यांच्या आरोपांना फार उत्तर देण्याची गरज नाही. पूर्वी ‘हम दो, हमारे दो’ चालत होते, पण आता ठाकरे गटात ‘उद्धवजी, आदित्यजी आणि त्यांचे हे एक अपत्य (संजय राऊत)’ एवढेच उरले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
नाशिकमधील नगरसेवकांच्या संभाव्य फुटीवर मंत्री महाजन म्हणाले की, मला याची पूर्ण कल्पना नाही, पण सध्या ठाकरे गटाकडे शिल्लक तरी कोण राहिले आहे, त्यांची महापालिका नाही, १७ पैकी एकही आमदार नाशिकमध्ये निवडून आला नाही, नगरपालिका त्यांच्याकडे नाही. भविष्यात त्यांचे काहीच दिसत नाही. त्यांचे भविष्य आता २ ते ५ टक्केही उरलेले नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष बुडवला, हेच त्यांच्यासाठी काफी आहे, असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यांवर मंत्री महाजन म्हणाले की, मी कधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो. खडसेसाहेब पूर्वी शर्यतीत होते आणि ते स्वतः तसे म्हणायचे. मी कधीही असा दावा केला नाही. तसेच, खडसेंना अमित शाह यांचा फोन आल्याच्या मुद्द्यावर त्यांची दिल्लीसोबत डायरेक्ट ‘हॉटलाइन’ आहे, असे ते स्वतःच म्हणायचे. आम्ही छोटे लोक आहोत, त्यामुळे त्या हॉटलाइनबाबत आम्ही न बोललेलेच बरे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
आमदार बच्चू कडू हे महायुतीचे मोठे नेते आहेत. ते रोज काही ना काही बोलत असतात, त्यांना काही तरी झाले असेल. हे काही असे लोक आहेत की त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे, असे म्हणत मंत्री महाजन यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले.
००००००००

 अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने
दिवा : अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ३४० सातारकर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेवक ॲड. आदेश भगत, नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे तसेच अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला सातारा जिल्हा रहिवासी संघाचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने माता- भगिनी उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सातारकर बांधव, विद्यार्थी, माता- भगिनी, पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही समाजहिताचे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
संस्थापक राम पवार, खजिनदार राजेंद्र शेलार, सह सचिव आनंद कोळेकर, संपर्क प्रमुख रविंद्र शेजवळ, दिनकर सकपाळ, अध्यक्ष काशिनाथ साळुंखे, कार्याध्यक्ष आदित्य कदम, उपाध्यक्ष नितीन काळे, निलेश पवार, संघटक संतोष शेजवळ, सचिव रामचंद्र पवार, उप कार्याध्यक्ष तानाजी पवार, सह खजिनदार मच्छिंद्र सकपाळ, मा. अध्यक्ष/ सल्लागार संतोष फणसे, सल्लागार शंकर सुर्यवंशी, साहेबराव पिंपळे, सुहास गायकवाड, रघुनाथ यादव, सदस्य चेतन पवार, आकाश वाघ, सुर्यकांत मोरे, विलास जाधव आदी सर्व सभासद आणि सातारा जिल्हा रहिवाशी संघ दिवा शहरातील नागरिक तेव्हा उपस्थित होते.
00000000

– साहित्य भारती आणि साईज्योती पब्लिकेशन्स चे आयोजन
नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १ भाग २ आणि भाग ३ चे प्रकाशन गुरुवार दिनांक १६ जुलै  २०२६ रोजी सायंकाळी  ६ वाजता नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत, आणि साईज्योती पब्लिकेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे हस्ते हे प्रकाशन होणार असून माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर पुस्तकांवर भाष्य करणार आहेत.
आपल्या ५४ वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक जीवनाच्या कालखंडात ज्या अनेक मान्यवर व्यक्तींशी अविनाश पाठक यांचे व्यक्तिगत संबंध आले आणि ते उभयपक्षी जपले गेले, अशा एकूण  ५१ मान्यवर व्यक्तींवर अविनाश पाठक यांनी लेख लिहिले असून त्याचे संकलन तीन भागात साईज्योती पब्लिकेशन ने “आयुष्यातले सांगाती” भाग १, २ आणि ३ असे प्रकाशित केले आहेत. या ५१ मान्यवर व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले, गिरिजा कीर, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपती शक्तीकुमार संचेती, पत्रकार मा.गो. वैद्य, संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला, प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी, पत्रकार नीला उपाध्ये, सुरेश द्वादशीवार, श्रीपाद सहस्रभोजने, राम खांडेकर, अनंत तरे, डॉ. तनुजा नाफडे, दत्ता मेघे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. प्रमिलाताई मेढे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, चैनसुख संचेती, डॉ  विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, डॉ उदय निरगुडकर, हंसराज अहिर, वामनराव चोरघडे, मारोती चितमपल्ली, शुभांगी भडभडे, भगतसिंह कोशियारी, उल्हास पवार, न्या. विकास सिरपुरकर, डॉ वि.भि.कोलते, गोपीनाथ मुंडे, प्रा बी.टी.देशमुख, डॉ श्रीकांत जिचकार, वसंतराव साठे, डॉ मनोहर पिंगळे, अभिनंदन थोरात, गंगाधरराव फडणवीस,दत्ताजी डिडोळकर, कवी अनिल, डॉ मधुकर आष्टीकर, प्रतापदादा सोनवणे,नीतिन केळकर,सद्गुरुदास महाराज, डॉ प्रमोद कोलवाडकर या मान्यवरांचा समावेश आहे. या तीन भागांना डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे आणि अजय संचेती यांच्या प्रस्तावना आहेत.
अविनाश पाठक यांची यापूर्वी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच, शह काटशह आणि सत्तेच्या सावलीत हे तीन राजकीय कथासंग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखांचे संग्रह, दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, काल प्रवाहाच्या वळणांवरून आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे देशातील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, आणि मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत.
या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, कार्याध्यक्ष डॉ शेखर भुसारी, महामंत्री विनय माहुरकर साईज्योती पब्लिकेशन चे ज्योती खापेकर,  गणेश राऊत प्रभृतींनी केले आहे.
0000000000

सुनिल इंगळे
उल्हासनगर : युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी उल्हासनगर शहरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची सखोल तपासणी करून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनासोबत हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे उल्हासनगर शहरातील काही दुकानदार, कंपन्या आणि आरओ व पाणी जार प्रकल्पांची यादीही सादर केली असून, संबंधित प्रकल्पांची तातडीने तपासणी करण्याची विनंती केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना उल्हासनगरातील अनेक आरओ व पाणी जार प्रकल्पांकडे FDA ची वैध नोंदणी, आवश्यक परवाने तसेच गुणवत्ता तपासणीसंदर्भातील कागदपत्रे नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, निकृष्ट किंवा दूषित पाणी पुरवठा झाल्यास विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणे ही प्रत्येक प्रकल्प चालकाची जबाबदारी असल्याचे नमूद करत हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील सर्व आरओ व पाणी जार प्रकल्पांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच प्रत्येक प्रकल्पातून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत त्यांची गुणवत्ता तपासावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत १) उल्हासनगर शहरातील सर्व RO व पाणी जार प्रकल्पांची विशेष तपासणी करण्यात यावी. २) FDA नोंदणी, आवश्यक परवाने व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. ३) सर्व प्रकल्पांमधून पाण्याचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता चाचणी करण्यात यावी.४) बेकायदेशीर अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ५) शहरातील एकूण आरओ व पाणी जार प्रकल्पांची संख्या आणि त्यापैकी वैध परवाना असलेल्या प्रकल्पांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी.६) नागरिकांना सुरक्षित, शुद्ध व दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात.
यावेळी हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) म्हणाले, “पिण्याच्या पाण्याचा विषय हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये. FDA प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून सर्व आरओ व पाणी जार प्रकल्पांची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.”  दरम्यान, या निवेदनामुळे उल्हासनगरातील आरओ व पाणी जार व्यवसायातील कथित नियमबाह्य कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, FDA प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढील काळात कोणती कारवाई करते, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
000000000

लोककला रसिकांसाठी पर्वणी
अनिल ठाणेकर
ठाणे : कोकणातील पारंपरिक लोककलेचा अनोखा ठेवा असलेल्या ‘कलगीतुऱ्या’चा थरार आता ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, १७ जुलै, सायंकाळी ७.३० वाजता भव्य कलगीतुऱ्याच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत लोककला रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बहारदार सामन्यात कलगीवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांच्यात सवाल-जवाब, हजरजबाबी फटकेबाजी, उत्स्फूर्त सादरीकरण आणि पारंपरिक लोककलेचा रंगतदार आविष्कार पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कलगीतुऱ्याचा वारसा आधुनिक सादरीकरणातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे.
अतुल कदम आणि सुनील कदम यांच्या निर्मितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरभाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, तिकिटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यक्रम हाऊसफुल होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, माजी महापौर अशोक वैती, युवासेना अधिकारी ऋषिकेश माने, अभिनेते मंगेश देसाई, भाऊ कदम, गौरव मोरे, उद्योजक विकास दाभाडे तसेच समाजसेवक संदीप बिरवटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विशेष म्हणजे, कलगीतुऱ्याच्या इतिहासात प्रथमच १० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. कोकणच्या मातीत रुजलेली ही समृद्ध लोककला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीने तिचा वारसा जपावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. लोककलेची आवड असलेल्या प्रत्येकाने या सांस्कृतिक मेजवानीला उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या अंदाजे १२ लाख असून  या समाजाचे लोक प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वसई भागात वास्तव्यास आहेत. पूर्वी ख्रिश्चन विवाह निबंधक हे मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी (Gazetted Officers) असत. परंतु सध्या मंत्रालयात कोणताही ख्रिश्चन राजपत्रित अधिकारी उपलब्ध नाही. यापूर्वी हे काम पुणे जिल्ह्यातील एका तहसीलदाराद्वारे पाहिले जात असे. विवाह निबंधकच नसल्याने नागरिकांना निबंधकाच्या भेटीची वाट पाहावी लागते तरी आपण या प्रश्नी लक्ष घालून ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करून या समाजाचा प्रश्न सोडवावा असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
00000000

अनिल ठाणेकर
ठाणे : समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी–मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, रेहाना शेख यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायद्याचा (Uniform Civil Code) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.
सर्व जाती-धर्मांतील महिलांना समान न्याय, समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पोटगी अशा नागरी बाबींमध्ये महिलांना समान हक्क आणि न्याय मिळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा झाल्याच पाहिजेत. समान नागरी कायद्याच्या कोणत्याही चर्चेच्या केंद्रस्थानी सर्व जाती-धर्मांतील महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष मूल्ये असली पाहिजेत.
मात्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीची रचना पाहता तिच्या सर्वसमावेशकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. समान नागरी कायद्याबाबत देशभरात सर्वाधिक चर्चा ज्या मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्यांच्या संदर्भात होत असते, त्या मुस्लिम समाजातील कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी किंवा सामाजिक तज्ज्ञ यांना समितीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित अल्पसंख्याक समाजांचेही प्रतिनिधित्व समितीत दिसून येत नाही. याशिवाय, सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींनाही समितीत स्थान देण्यात आलेले नाही.
अशा महत्त्वाच्या विषयावर तयार होणारा कायदा व्यापक सामाजिक स्वीकारार्हता मिळवायचा असेल, तर त्याच्या मसुदा प्रक्रियेत सर्व संबंधित समाजघटकांचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील जाणकार कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ज्ञ, तसेच सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समितीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कायद्यात महिलांच्या सामाजिक न्याय, समान हक्क आणि घटनात्मक संरक्षणासंबंधी अधिक प्रभावी तरतुदी करता येतील.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र शासनाकडे पुढील मागण्या करीत आहे: समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजातील पात्र कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी व सामाजिक तज्ज्ञांचा तातडीने समावेश करावा. सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींना समितीत स्थान द्यावे, जेणेकरून कायद्यात महिलांच्या सामाजिक न्यायाची प्रभावी हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट करता येतील.ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित समाजघटकांचेही प्रतिनिधित्व समितीत सुनिश्चित करावे.समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवावी.सर्व संबंधित धार्मिक, सामाजिक, महिला व कायदेविषयक संघटनांशी व्यापक सल्लामसलत करूनच अंतिम मसुदा तयार करावा.
कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्याऐवजी भारतीय राज्यघटनेतील समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या आधारे कायदा तयार करावा. लोकशाही व्यवस्थेत अशा स्वरूपाचा व्यापक परिणाम करणारा कायदा लोकसहभाग, संवाद आणि सर्वसमावेशकतेच्या आधारेच तयार झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने समितीची पुनर्रचना करून त्यामध्ये मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक आणि सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  करत आहे.
00000000000

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल सात महिन्यानंतर विषय समित्या आणि सभापती पदाची निवड अखेर बिनविरोध झाली. १७ सदस्यांच्या समितीत भाजपा गटबंधन ८ तर शिवसेना गटबंधन ९ अशा सदस्य संख्याबळानुसार सभापती पदाची निवड  खेळीमेळीत  पार पडली.  यामध्ये बांधकाम समिती सभापती पदी शिवसेनेचे शैलेश भोईर, शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या रेश्मा गुडेकर, उपसभापती शिवसेनेच्या किरण चौबे, नियोजन व विकास समिती सभापती पदी भाजपाचे महेश फुलोरे, महिला व बालकल्याण सभापती पदी भाजपाच्या स्वाती पाटील, तसेच पाणीपुरवठा समिती सभापती पदी राष्ट्रवादीच्या सुनीता तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष हे आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असतील असा निर्णय घेण्यात आल्यामुळे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील हे आरोग्य समितीचे सभापती असतील. दरम्यान मागासवर्गीय समितीच्या सभापती पदाची निवडणूक गुरुवारी होणार असून त्यासाठी भाजपने कबीर नरेश गायकवाड यांचे नाव जवळजवळ निश्चित केले आहे.
प्रत्येक विषय समिती करिता एकच नामनिर्देशक पत्र आल्याने कुणी सदस्यांनी माघार घेतलेली नाही त्यामुळे समितीमध्ये केवळ एकच नामनिर्देशन पत्र आल्याने निवड घेण्याची गरज पडलेली नाही. सभापती पदांची निवड झाल्यानंतर स्थायी समिती गठित करण्यात आली. १० सदस्यांच्या  स्थायी समितीच्या अध्यक्ष या नगराध्यक्ष असतात. प्रत्येक विषय समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य मिळून ७ सदस्यांसह उर्वरित नामनिर्देशित तीन सदस्यांमध्ये शिवसेनेचे रवींद्र करंजुले भाजपचे पवन वाडेकर आणि अनिता भोईर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाली.
विषय समित्या सदस्य, सभापती आणि स्थायी समिती निवड प्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून उल्हासनगरचे प्रांत अधिकारी  विजयानंद शर्मा यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपमुख्याधिकारी उमेश राऊत, महेंद्र नेर यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.  दरम्यान तब्बल सात महिन्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेला विषय समिती सभापती मिळाले असून आता पालिकेचा कारभार अधिक गतिमान होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेनेचे गटनेते रवींद्र करून दिले यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *