मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने हाणून पाडला- याप्रकरणी ९ महिलांना अटक
(राजेंद्र साळसकर)
मुंबई- मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने २२ एप्रिलला गाडी क्रमांक १२११५ या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि या गुन्ह्याप्रकरणी ९ महिला गुन्हेगारांना अटक केली. २२ एप्रिलला कुर्डुवाडी स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे (CPDS) हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना ३ महिला संशयास्पद रीतीने फिरताना दिसल्या. या महिलांना त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल विचारपूस करण्यात आली आणि स्थानक सोडून जाण्याचा इशारा देऊन त्यांना सोडून देण्यात आले. परंतु या महिला गाडी क्रमांक २२१०८ लातूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसल्या आणि त्यानंतर सोलापूर पथकाला संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट जारी करण्याची माहिती देण्यात आली. आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या, जिथून त्या दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गाडी क्रमांक १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या.
आरपीएफचे पथक आधीच मागावर होते आणि सिध्देश्वर एक्सप्रेसच्या एस्कॉर्टिंग टीमला, म्हणजेच हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते. तसेच, छायाचित्रे व प्रवासी इत्यादींच्या मदतीने संशयितांवर सतत पाळत ठेवत होते.लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होते, जिथे सर्व ९ आरोपी महिला गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. १८ ते ४० वर्षे वयोगटातील या संशयित महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
या आरोपींना जीआरपी/कुर्डूवाडीच्या ताब्यात देण्यात आले आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी) अंतर्गत गुन्हा क्र. २६/२०२६ द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यामध्ये संशयितांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेतला जात आहे. या टोळीबाबतची संबंधित माहिती पुणे विभागाला कळवण्यात आली आहे, कारण ते सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागांमध्ये कार्यरत आहेत. या प्रदेशात प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) समन्वित प्रयत्नांचे मध्य रेल्वेने कौतुक केले आहे. प्रवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना कळवण्याचा किंवा मदतीसाठी १३९ डायल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन वित्तहानी झाली आहे सुदैवाने जीवितहानी हानी झाली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. शहरात तसेच आसपासच्या गावांमध्ये मध्यरात्रीची वेळ असल्याने लोक गाढ झोपेत होते. रस्त्यावर रहदारी नसल्याने आणि सर्वत्र शुकशुकाट असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही नसल्याची माहिती प्रशानाकडून प्राप्त झाली आहे.
या वादळाचा सर्वाधिक फटका श्री पंचम खेमराज (एसपीके) महाविद्यालयाला बसला आहे.यावेळी वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की महाविद्यालयाच्या जुन्या इमारतींचे कौलारू छत पूर्णपणे कोसळले तर नवीन इमारतीवरील लोखंडी पत्रे कागदासारखे हवेत उडून दूरवर फेकले गेले काही पत्रे तर उडून आजूबाजूच्या तीन मजली इमारती ओलांडून कॉलेजच्या मागील बाजूस जाऊन पडले इतका वाऱ्याचा वेग होता. त्याशिवाय शहरातील मुख्य शॉपिंग कॉम्प्लेक्स असलेल्या ‘रामेश्वर प्लाझा’ इमारतीचे पत्रे उडून थेट एस.पी.के कॉलेजच्या परिसरात जाऊन पडले. या इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
या वादळामुळे शहराच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजवाडा परिसरातील नारळाची झाडे उन्मळून पडली आहेत तसेच राजवाड्याच्या संरक्षक कठड्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिव उद्यानातील अनेक झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. उभा बाजार परिसर आणि आरपीडी हायस्कुल परिसरात कांही घरांवरील पत्रे उडाले आहेत तसेच जाहिरातीच्या कमानीही कोसळल्या आहेत.
खबरदारीचे उपाय म्हणून तसेच तांत्रिक बिघाडामुळे शहराचा विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित करण्यात आला होता.त्यामुळे शहरात व आसपासच्या गावांमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले होते. काल सकाळपासून आपत्कालीन व्यवस्थापन महसूल यंत्रणा तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे रस्त्यावरील झाडे हटवण्याचे आणि जनजीवन पूर्ण पदावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. काल संध्याकाळी तसेच मध्यरात्री सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस, कलंबिस्त व सातूळी, रोणापाल, तिरोडा, मडुरा, इन्सुली, आजगाव आदी गावात वादळी वाऱ्यासहा पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील नारूर, चाफेली व गोठोस या गावांमध्येही पाऊस झालेला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे, मातोंड, शिरोडा व म्हापण या गावांमध्ये पाऊस पडल्याचे वृत्त आहे.
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांची एकमुखी निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा वैभव नाईक यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.दरम्यान उद्धवजी ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन वैभव नाईक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने आणि एकदिलाने शिवसेना संघटनेचे काम करण्याचे आवाहन उद्धवजी ठाकरे यांनी केले.
वैभव नाईक बोलताना म्हणाले, उद्धवजी ठाकरे यांनी जी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून, सर्वांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या जान्हवी सावंत,बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, रुपेश राऊळ, संग्राम प्रभुगावकर,हरी खोबरेकर, कृष्णा धुरी, सचिन कदम,प्रथमेश सावंत, जयेश नर,नंदू शिंदे, चंद्रकांत कासार, गणेश गावकर,उत्तम लोके,रवींद्र जोगल, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, संकेत नाईक, जयेश धुमाळे,योगेश धुरी,बाबी जागी,संजय गवस, नितीन वाळके,राजू राठोड,तपस्वी मयेकर,महेंद्र म्हाडगुत,बाळा गावडे,अवधूत मालणकर, दिनेश चमणकर,वैदेही गुडेकर,सुशील चिंदरकर,समीर लब्दे, रुपेश आमडोसकर, अमर घाडी,अमोल वस्त,स्वप्नील आचरेकर,सुहास गावडे व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
0000000000
