
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित
डोंबिवली, दि. 22 एप्रिल (आरती परब) – भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले.
या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे आणि ऊर्जावान नेतृत्व असल्याचे नमूद केले. आपल्या मनोगतात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणारा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. केंद्र व राज्य सरकारने तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचवले जातील. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले सक्षम आणि प्रभावी युवाशक्तीचे संघटन उभारणे, हेच या यात्रेचे मुख्य ध्येय आहे.”
‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’हा संदेश देणारी ही यात्रा राज्यातील युवकांना एकत्र आणत त्यांना विकास, नवकल्पना आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडण्याचे कार्य करणार आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, युवकांमध्ये जागर निर्माण करून त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस व भाजयुमो प्रदेश प्रभारी सुनील राणे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
0000000000

एक पत्रकार रेल्वेत १५ तास बेशुद्ध तरीही कुणाला माहिती नाही
मुंबई / रमेश औताडे
तब्बल पंधरा तास एक पत्रकार बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नाही. असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी लोकांचे दोस्त संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
लोकांचे दोस्त संघटनेचे चे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी मध्य रेल्वे महा व्यवस्थापक यांचे उपसचिव उमंग दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार विभागात तक्रार नोंदवली.निवेदन देताना ज्योती बडेकर, संजीता मालणकर, प्रकाश महिपती कांबळे इतर संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय वर्षे ६०) हे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये १५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत होते. शिंदे हे नेहमीप्रमाणे १५ एप्रिल २०२६ रोजी धारावी परिसरात वार्तांकन करत होते. ते दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सायन ( शीव ) रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
संजय शिंदे यांच्या मोबाईल ची रिंग वाजत होती. पण कोणीही फोन घेत नव्हते. त्यांची काळजी वाटल्याने त्यांच्या धारावी परिसरातील मित्रांनी संध्याकाळी उशिरा धारावी पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पत्नी सुषमा संजय शिंदे आणि मुलगा राहुल संजय शिंदे यांनी ते रहात असलेल्या डोंबिवली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
१६ तारखेला सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी राहुल संजय शिंदे यास मोबाईल वरून कळविले की संजय शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानकात आहेत. त्यानुसार कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी क्लिनिक मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे सकाळी सहा साडेसहा च्या दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकात, मुंबईकडे जाण्यासाठी यार्ड मधून आलेल्या लोकल ट्रेन मध्ये आढळून आले होते.
इतर प्रवाशांनी कळविल्यावरून पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतले होते. पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकातील खासगी क्लिनिक मध्ये दाखल केल्यानंतर त्यांना दोन सलाईन लावली गेली. त्याचे चार हजार रुपये बिल घेऊन त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र संजय शिंदे यांची प्रकृती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली होती. ते बेशुद्धच होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तिथूनच कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. तिथे आय सी यू मध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली. रुग्णालयाचे साठ हजार रुपये बिल भरून कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले. अजूनही त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत.त्यांना गाडीतून उतरवताना पोलिसांनी मारहाण केल्याची आणि उर्मटपणे वागवल्याची शिंदे कुटुंबीयांची तक्रार आहे.
रेल्वे पोलिसांना चौकशी निवेदन देताना लोकांचे दोस्त संघटनेचे अध्यक्ष रवी भिलाने, संजीता मालणकर, प्रकाश महिपती कांबळे उपस्थित होते.
छायाचित्र – केतन खेडेकर
शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे उपाध्यक्ष देवाभाई कदम यांचा वाढदिवस नुकताच महालक्ष्मी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे, चिटणीस संतोष बामणे, सचिन कदम, उपाध्यक्ष मिलिंद पंडित आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक रफिक शेख यांची मागणी
मुंबई प्रतिनिधी
जानेवारीमध्ये माझ्या प्रभागात मालाड येथे एका इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटाचे परिणाम इतके गंभीर होते की दुसऱ्या मळ्यापर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली होती. या स्फोटामुळे एकूण सात लोक जखमी झाले होते. त्यानंतर त्यातील पाच जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकी घटना अशी झाली की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर या सगळ्या जखमी रुग्णांना त्वरित एका लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुविधा मिळाली परंतु त्या रुग्णालयामध्ये बर्न ओढ नसल्याने तेथे त्यांचा इलाज होऊ शकला नाही. त्यांना त्वरित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे देखील बर्न वॉर्ड हा कार्यान्वित नव्हता. त्यामुळे येथील रुग्णांना पुन्हा साधी वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुन्हा कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णालयात देखील बर्न वॉर्ड कार्यान्वीत नसल्याने या रुग्णांना पुन्हा केम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून चार रुग्णालयात शिफ्ट करण्यामध्ये रुग्णांचा फार मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. यामुळे या रुग्णांना त्वरित उपचार न मिळाल्याने या रुग्णांचा जीव जातो असं माझा गंभीर आरोप आहे. या रुग्णालयातून विचार देण्यासाठी या रुग्णांकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. हे फार दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील पाच जण जर जखमी असेल तर ते रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी पैसे कसे देणार. तरी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये अशा भाजलेला रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयात एक पॉलिसी आणावी जेणेकरून प्रत्येक रुग्णांना त्वरित आणि लवकर योग्य उपचार मिळेल अशी मागणी नगरसेवक रफिक शेख यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.

मुंबई :काही कथा फक्त वाचल्या जात नाहीत. त्या मनाला हादरवून सोडतात. श्रद्धेच्या नावाखाली जे घडतंय, त्याला देव मान्यता देतो की समाज असा प्रश्नच आहे. मात्र गोपाल रायबोले यांच्या ‘अनभिषिक्त देवदासी’ या कादंबरीनं पुरुषसत्ताक माज या कमी होईल, असं प्रतिपादन गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी केलं. ‘अनभिषिक्त देवदासी’ ही केवळ एका स्त्रीची कथा नाही; ती एका संपूर्ण व्यवस्थेची कथा आहे, असं पांचाळे म्हणाले.
लेखक गोपाल रायबोले यांच्या ‘अनभिषिक्त देवदासी’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मिरा रोड येथे नुकताच पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गजलनवाझ भीमराव पांचाळे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे, अभिनेता अंकुर वाढवे, लेखक-दिग्दर्शक उदय जाधव, लेखक श्रीधर पवार, कवी-लेखक अविनाश उषा वसंत, अभिनेता प्रवीण डाळींबकर, समीक्षक डॉ. रेवत कानिंदे, पत्रकार निलेश झालटे, प्रकाशक शशिकांत पवार उपस्थित होते. कादंबरीचं भाष्य कवी वैभव छाया यांनी केलं.
लावणीसम्राज्ञी तथा अभिनेत्री मेघा घाडगे यांनी या कादंबरीचं स्वागत करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कादंबरीत मांडलेला पुरुष सर्वांना मिळावा. मला या कादंबरीतील नायिकेची कथा ही माझीच कथा वाटते, असं घाडगे म्हणाल्या. यावेळी ही कादंबरी महिलेनं लिहिलीय असं वाटलं, असं म्हणत लेखक श्रीधर पवार यांनी या कादंबरीचं कौतुक केलं. रायबोले यांच्या लेखनात नामदेव ढसाळ यांची छाप दिसते, असंही ते म्हणाले.
अनेक गोष्टी पाहून आपण अस्वस्थ होतो. माझ्या अस्वस्थतेतून ही कादंबरी आलीय. ही कादंबरी आपल्याला दाखवते की, देवदासी प्रथा केवळ इतिहासात नाही; ती आजही अस्तित्वात आहे कधी उघडपणे, कधी अदृश्य स्वरूपात… जेव्हा स्त्रीच्या शरीरावर समाज हक्क सांगतो, जेव्हा तिच्या आयुष्याचे निर्णय तिच्या परवानगीशिवाय घेतले जातात, तेव्हा ती “अनभिषिक्त देवदासी” बनते, असं मनोगतात लेखक गोपाल रायबोले म्हणाले.
‘अनभिषिक्त देवदासी’ आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारते ती खरंच संपली आहे का, की तिने फक्त आपलं रूप बदललं आहे? ही कादंबरी वाचकाला उत्तरं देत नाही; ती त्याला प्रश्नांच्या उंबरठ्यावर उभं करते आणि कदाचित हेच तिचं सर्वात मोठं यश आहे. कारण काही कथा उत्तरांसाठी नसतात, त्या जागं करण्यासाठी असतात.
असं भाष्य करताना कवी वैभव छाया यांनी म्हटलं आहे.
यावेळी अभिनेता अंकुर वाढवे, लेखक-दिग्दर्शक उदय जाधव, कवी-लेखक अविनाश उषा वसंत, अभिनेता प्रवीण डाळींबकर, समीक्षक डॉ रेवत कानिंदे यांनी देखील मनोगतं व्यक्त केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्विंकल रायबोले, नॉर्माजीन रायबोले, विजय ढवळे, अक्षय त्रिभुवणे, राहुल कावडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खामगांवकर, सौ. मृणाल चिखलीकर यांनी केलं.

मुंबई : मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे “५ वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा” उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. हि स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट कै. दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. मुंबई विभागीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील ५० संघांमधून जवळपास १ हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धा प्रमुख म्हणून आशिष देवल व स्पर्धा सचिव म्हणून संचिता देवल यांनी स्पर्धेची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. कर्ममूर्ती महादेव रानडे सर, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका सीमा शिंदे, सुप्रसिद्ध कलाकार भाग्यश्री मिलिंद, ओंकार भोजने, समाजसेवक प्रशांत पाटील, एअर मार्शल गजेंद्र सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी मंगेश नाईक, एअरफोर्स अधिकारी वाडकर सर, सुप्रसिद्ध उद्योजीका सोनाली कोचरेकर या मान्यवरांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुविद्यालय शाळा, मुंबादेवी विद्यानिकेतन, दहिसर विद्यामंदिर, समता क्रीडा भवन, बोरीवली स्पोर्ट्स कल्चरल सेंटर, शैलेन्द्र एज्युकेशन सोसायटी, समर्थ व्यायाम मंदिर दादर, श्रीमा गुरुकुल ठाणे, रुतूराज स्पोर्ट्स अकादमी या संघांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावली. भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धा देखील यावेळी उत्साही वातावरणात पार पडली, यामध्ये ५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पॅरा मल्लखांब स्पर्धेतील खेळाडूंनी स्पर्धा आयोजकांचे कौतुक केले, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मल्लखांब लव टीम चे आभार मानले. पुढील वर्षी या स्पर्धेत अधिक मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग असेल असा विश्वास स्पर्धा प्रमुख आशिष देवल यांनी व्यक्त केला.

राजमाता जिजाऊची निकिता पडवळ सर्वोत्तम खेळाडू
मुंबई, दि. २२ (क्री.प्र.)-शेवटच्या चढाईपर्यंत श्वास राखायला लावणार्या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊविरुद्ध संघर्ष ३२-३० असा जिंकला आणि महिला कबड्डीत आपणच शक्तिशाली असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र आजचा दिवस गाजवला तो निकिता पडवळच्या वेगवान-कल्पक चढायांनी. ती राजमाता जिजाऊच्या गळ्यात जेतेपदाची माळ घालण्यात थोडक्यात अपयशी ठरली असली तरी ती सर्वोत्तम खेळाडूच्या स्कुटरवर विराजमान झाली.
विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु असलेल्या कबड्डी महोत्सवाच्या राज्यस्तरीय महिला गटाच्या अंतिम सामन्यात थराराने पुन्हा एकदा वातावरण पेटवले. उपांत्य सामन्यात शिवशक्तीच्या महिलांनी धर्मवीर कबड्डी संघाला तर राजमाता जिजाऊने डॉ. पतंगराव कदम संघावर सहज मात करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही उपांत्य लढती एकतर्फी झाल्यामुळे हजारोंच्या संख्येने गर्दी करणार्या दर्दी कबड्डीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती, पण अंतिम सामन्यातील संघर्षाने त्याची सव्याज भरपाई केली. शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील सामना मुंबई विरुद्ध पुणे असा असला तरी कबड्डीप्रेमींनी दोन्ही संघांच्या खेळाला भरभरून दाद दिली. पहिल्या मिनिटापासून प्रत्येक गुणासाठी दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाल्यामुळे जो शेवटपर्यंत लढणार तोच जिंकणार, याचे संकेत मिळाले.
राज्याच्या महिला कबड्डीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ संघांनी आपापल्या पहिल्या चढाईतच एकेक गुण मिळवत जोरदार सुरुवात केली. पुढे शिवशक्तीने चांगल्या पकडी करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला तर राजमाता जिजाऊच्या निकीताने त्या आघाडीशी बरोबरी साधणारा खेळ करुन सामन्यात रंगत आणली. पहिल्या डावात केवळ दोन खेळाडू मैदानात असलेल्या शिवशक्तीवर लोण चढवण्याची नामी संधी राजमाता जिजाऊला होती, निकीताच्या सुसाट खेळानेच त्यांना ही संधी मिळवून दिली. पण तेव्हाच शुभदा खोत आणि अपेक्षा टाकळे यांनी मगरमिठीसारखी निकीताची पकड करत आपल्यावर पडणार्या लोणला वाचवले. यामुळे शिवशक्तीने मध्यंतराला १४-११ अशी आघाडी मिळवली.
मध्यंतरानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडीसाठीचा संघर्ष आणखी तीव्र झाला. पण शिवशक्तीने शुभदा आणि रियाच्या चढायांमुळे आपली आघाडी २१-१२ अशी वाढवत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते, पण तेव्हाही निकिताच्या आक्रमक चढायांनी राजमाता जिजाऊला पुन्हा सामन्यात आणण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर सामन्यातील थरार शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची दोन मिनीटे असताना शिवशक्तीवर पडलेल्या लोणने स्कोर २९-२८ वर आणला होता. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकत होती. पण झटापटीच्या त्याक्षणी शिवशक्तीने आपली आघाडी ३२-३० अशी नेत अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जेतेपदाला गवसणी घातली. या थरारक सामन्याचे राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या जोरदार आणि जल्लोषपूर्ण शैलीत निवेदन करून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
महिला विजेत्यांच्या पुरस्कारमध्ये वाढ
आमदार सुनील राऊत यांनी महिला गटातील विजेत्यांना दिली जाणारी रोख रक्कम एक लाखावरून दीड लाख रुपयांपर्यत वाढवल्यामुळे अंतिम लढतीत हा पुरस्कार जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी आपला सर्वोत्तम खेळ केला. विजेत्या शिवशक्तीला दीड लाख आणि आमदार चषकाने गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ पाऊण लाखांची मानकरी ठरली. मात्र त्यांच्या निकिता पडवळने स्कुटर जिंकली.सर्वोत्कृष्ट पकडपटूचा मानही त्यांच्याच ऋतुजा निगडेला मिळाला. शिवशक्तीची रिया मडकईकर सर्वोत्तम चढाईपटू ठरली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर,कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
बीपीसीएल-आयएसपीलमध्येच अंतिम लढत
तीन दिवसांपूर्वी प्रभादेवीत ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत जो अंतिम थरार अनुभवयाला मिळाला तोच थरार विक्रोळीतही पाहायला मिळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बीपीसीएलने आकाश पिकलमुंडे आणि मिलन दहिया यांच्या आक्रमक चढायांच्या बळावर मुंबई बंदरचा ३५-२२ असा सहज पराभव केला तर आयएसपीएलने ठाणे महानगरपालिकेचे आव्हान ४७-३२ असे मोडीत काढले. नीरज मिसाळ आणि अभिषेक गुंगे यांच्या तुफानी चढायांना रोखण्यात ठाणे पालिकेच्या खेळाडूंना अपयश आल्यामुळे मध्यंतरालाच २८-१४ अशा आघाडीसह आयएसपीएलने आपली अंतिम फेरी निश्चित केली होती. आता जेतेपदासाठी पुन्हा एकदा बीपीसीेएल आणि आयएसपीएल एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे बीपीसीएल पुन्हा विजेता होतो की आयएसपीएल आपल्या पराभवाचा वचपा काढतो याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
