ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे आयोजन
ठाणे : सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषविणारे नरेंद्र मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे बुधवारी सकाळी १० वाजता गावदेवी मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून गौरव प्राप्त केला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी महाआरती करण्याची सूचना भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार नौपाड्यातील गोखले रोडवरील गांवदेवी मंदिरात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १० वाजता महाआरती करण्यात येणार आहे.
ठाण्याचे ग्रामदेवत असलेल्या श्री गांवदेवी मंदिराला १२५ वर्ष पूर्ण झाली आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गांवदेवी मंदिराच्या माध्यमातून ठाण्याच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासाची साक्ष मिळते. या मंदिरात महाआरतीचा गजर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आशीर्वाद मागण्यात येणार आहे.
ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चिंतामणी कोळी यांच्यातर्फे सलग १९ व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांचे भारत लीडरशिप समिटमध्ये आश्वासक वक्तव्य
मुंबई : लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नुकताच मुंबईतल्या अंधेरी येथे “भारत लीडरशिप समिट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राजकीय सामाजिक आणि मनोरंजन वर्तुळातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली.६ जून रोजी अंधेरी पूर्व येथील कोर्ट यार्ड बाय मॅरीएट येथे या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.”सन्मान गुणवंतांचा संवाद महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचा” या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये अनेक महत्त्वाचे विषय मांडले गेले.
महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि राज्य व देश हिताच्या विषयांवर राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमात सखोल चर्चा केली. यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक रवींद्र चव्हाण आणि युवा नेते सिद्धेश कदम यांच्यातील चर्चा चांगल्याच रंगल्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लोकशाही समूह नवीन इंग्रजी वृत्तवाहिनी लॉन्च करत असण्याची घोषणा करण्यात आली. लोकशाही इंग्लिश या नावाने लवकरच इंग्रजी वृत्तवाहिनी कार्यान्वित होणार आहे.
भारत लीडरशिप समिटमध्ये आपले विचार मांडताना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबत अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे विधान केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याला तब्बल ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. सध्या या ठिकाणी मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांचे माध्यमातून बंदरे कार्यान्वित असली तरी देखील त्यांच्या मर्यादा ध्यानात घेता या ठिकाणी जागतिक स्तरावरील बंदराची निर्मिती झाली पाहिजे अशी सर्वांचीच धारणा होती. परंतु आमच्या अगोदरच्या सरकारांनी फक्त विचार केला, त्याला मूर्त आणि वास्तव स्वरूप दिले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच. तब्बल ७२ हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वाढवण बंदर उभे राहत आहे. ज्याप्रमाणे जे एन पी ए नजीक नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाले आहे तशाच पद्धतीने वाढवण बंदरा नजीक देखील विमानतळ कार्यान्वित करण्याचे व्हिजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे.
वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भारतात २० मीटर खोली असलेल्या बंदराचा अभाव असल्याने मालवाहू जहाजांना प्रथम कोलंबो (१५ मीटर खोल) किंवा सिंगापूर (१२ मीटर) या बंदरावर माल उतरावा लागतो. जो नंतर लहान मालवाहू जहाजातून जेएनपीटी (११ मीटर खोली)सारख्या भारतीय बंदरांवर येतो. आपला आयात-निर्यातीचा ९०% माल समुद्रमार्गे जात असल्याने आयातदार व निर्यातदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. यासाठी भारताला पश्चिम किनाराऱ्यावर २० मीटर खोलीचे बंदर झाल्यास मालवाहतूक वाढेल. कंटेनर जहाजांचा वाढता आकार असल्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल कंटेनर पोर्ट विकसित होणेही अत्यावश्यक आहे. वाढवण किनाऱ्याजवळ जवळपास २० मीटरची नैसर्गिक खोली आहे, ज्यामुळे बंदरावर मोठ्या जहाजांना हाताळणे शक्य होईल. या बंदराच्या विकासामुळे १६०००-२५००० टीईयू क्षमतेच्या कंटेनर जहाजांची वाहतुकीसाठी कॉलिंग सक्षम झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा फायदा होऊन इतर खर्च कमी होईल.
या समिटमध्ये लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर हे देखील सहभागी झाले होते तसेच मर्दिनी या मराठी चित्रपटाची टीम देखील सहभागी झाली होती आणि त्यांनी निवोदितांना संधी व अभिनयातील आव्हानांवर आपले विचार मांडले.

१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू
सचिव पुनिता गुरव यांचे आवाहन
रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थी व पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळाने विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन (काउन्सिलिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.परीक्षांचे वेळापत्रकइयत्ता १२ वी (एचएससी) परीक्षा: १६ जून ते ८ जुलै २०२६इयत्ता १० वी (SSC) परीक्षा: १६ जून ते ३० जून २०२६समुपदेशन सेवा (८ जूनपासून सुरू)विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये किंवा इतर मानसिक अडचणी येऊ नयेत यासाठी ८ जूनपासून परीक्षा संपेपर्यंत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. खालील समुपदेशकांशी पालक व विद्यार्थी संपर्क साधू शकतात: संदिप दत्ताराम शिर्के : ९५५२०६४६४० भाग्यविधाता भास्कर वारंग : ९४२३२१३२४०शंका निरसनासाठी मंडळाचे अधिकारी व संपर्क क्रमांकविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे: अधिकारी / कर्मचारी यांचे नावपद / विभागमोबाईल क्रमांक पुनिता गुरव विभागीय सचिव ९०११२६२८४० प्रेरणा शिंदे विभागीय सहाय्यक सचिव ९६७३०८००७७ अनिल पवार पर्यवेक्षक लिपिक (इ. १२ वी)९६७३MT१२६७ (९६७३१२१२६७) राजेंद्र यादगिरे पर्यवेक्षक लिपिक (इ. १० वी)९४२०५१८२१३ गजानन जाधव लेखा व भांडार शाखा८०८७७४६१२२ विशेष हेल्पलाईन क्रमांक: विद्यार्थी आणि पालकांसाठी ०२३५२ २३१२५० हा मुख्य हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध असून, यावर सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत संपर्क साधता येईल.

उपाशीपोटी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० कोटीचा निधी
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
रमेश औताडे
मुंबई : पोटभर अन्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तरच देशाचे भविष्य घडते. याच विचारातून मलाबार ग्रुपने राबविलेल्या “ हंगर फ्री वर्ल्ड “ उपक्रमाला मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात नवी दिशा मिळाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सन २०२६-२७ साठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या सीएसआर निधीची घोषणा करण्यात आली आहे
आजही अनेक विद्यार्थी आणि युवक उपाशीपोटी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रम त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे. भारतासह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हा उपक्रम दररोज एक लाखाहून अधिक गरजू लोकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “युवकांना सक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र शिक्षण आणि कौशल्य विकासाचा पाया हा पोषणावर आधारित असतो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर ते शिक्षण आणि स्वतःच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.”
मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनीही पोषण आणि शिक्षण यांच्यातील अतूट नात्यावर भर दिला. “भूक आणि शिक्षण एकत्र नांदू शकत नाहीत. दर्जेदार शिक्षणासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. ‘हंगर फ्री वर्ल्ड’च्या माध्यमातून आम्ही ही मूलभूत गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र हे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे केंद्र ठरत आहे. येथे व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांची रोजगारक्षमता वाढून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होत आहे. भूकमुक्त समाज आणि कौशल्यसंपन्न भारत या दुहेरी उद्दिष्टांकडे वाटचाल करणारा हा उपक्रम केवळ अन्नदानाचा कार्यक्रम नसून हजारो युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला आशेचा सेतू असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

तलासरी पोलिसांकडून घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत छडा करजगाव घरफोडी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
योगेश चांदेकर
पालघरः तलासरी तालुक्यातील करजगाव, पाटील पाडा येथे घरफोडी करून त्यात तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान अजय नरेश घुटे हे पाटीलपाडा, करजगाव हे त्यांचे राहते घर बंद करून त्यांच्या दुकानात गेले होते. घरी कुणी नाही, याबाबत पाळत ठेवून १६ वर्षांच्या मुलाने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडला. घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तोडले. त्यातील तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विशेष पथकाची कामगिरी
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत तलासरी पोलिसांना तातडीने या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा त तपास करण्यासाठी तलासरी पोलिसांनी एक विशेष पोलिस पथक तयार केले. या परिसरातील सीटीव्ही कॅमेरे, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलाकडे संशयाची सुई जात होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये रोख, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पाचशे रुपये किमतीची बॅग असा एकूण तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
देशमुख यांच्या काळात तपासाची वाढली गती
पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख पोलिस अधीक्षक म्हणून आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा घालण्यात यश मिळवले आहे. वारंवार विविध पोलिस ठाण्यांना मार्गदर्शन करून तपासाची सूत्रे कशी फिरवावीत याचे निर्देश ते देत असतात. पालघर जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांच्या योजनेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही देशमुख यांच्या काळातच मिळाले. आत्ताच्या करजगाव घटनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय गोरड, पोलिस उपनिरीक्षक विष्णू राजड, संदीप नांगरे, अनिल सोनवणे, योगेश मुळे यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासात घरफोडीचा तपास करून मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

नालेसफाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन
दिवा, दि. 9 जून : दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना पुराचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन करण्यात आले. कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे आणि दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी गटर पूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला तसेच तातडीने संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली.
आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, जिल्हा सचिव भैय्यासाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहरप्रमुख सचिन पाटील, उपशहरप्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम, संजय जाधव,यांच्यासह उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, संतोष कदम, उमेश भानसे, शशिकांत कुंभारगण, विलास उतेकर, तुषार सावंत. उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

सहा वर्षे, हिमालयाएवढा लढा – भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी
बालताल (जम्मू-काश्मीर), ९ जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे, हिमस्खलन आणि गोठवणारी थंडी यांचा सामना करत अनेक वर्षे घालवणाऱ्या मेघा इंजिनीअऱींगच्या शेकडो कामगार, अभियंते, यंत्रचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा एका अशा प्रवासाचा अंतीम टप्पा होता, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. १३.१५३ किमी लांबीचा झोझिला बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण होणे भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला आहे. तरीही, यामागे जगातील सर्वात बांधकाम करण्यास कठीण परिस्थितींपैकी एक असलेल्या ठिकाणी दाखवलेल्या जिद्दीची आणि चिकाटीची मानवी कहाणी दडलेली आहे.
जवळपास सहा वर्षे, मेघा इंजिनीअरीगंच्या बांधकाम पथकांनी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर काम केले आणि अनेकदा उणे ३० अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाचा सामना केला. हिवाळा केवळ थंडी घेऊन आला नाही, तर त्यासोबत हिमस्खलनाचे संकटही ओढवले.
मेघा इजिनीअरींगच्या प्रकल्पात १,२०० हून अधिक लोकांनी योगदान दिले, ज्यामध्ये जवळपास ८० टक्के लोक जम्मू-काश्मीरमधील स्थानिक समुदायांमधील होते. त्यांनी संपूर्ण भारतातील बोगदा-बांधणी तज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, सुरक्षा तज्ञ आणि यंत्रचालक यांच्यासोबत काम केले.
कामकाज अविरत चालू ठेवण्यासाठी, पर्वतांमध्ये एक संपूर्ण यंत्रणा (इकोसिस्टिम) उभी करावी लागली. कामगार विशेषतः विकसित केलेल्या छावण्यांमध्ये राहत होते; या छावण्यांमध्ये वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वयंपाकघर आणि चोवीस तास काम सुरू ठेवण्यास सक्षम अशा निवासस्थानांची सोय होती.
कारगिल आणि लडाखच्या रहिवाशांसाठी, हा प्रकल्प आरोग्यसेवा, शिक्षण आणि जीवनावश्यक वस्तूंचा अधिक विश्वसनीय पुरवठा करण्याचे काम करेल. व्यापाऱ्यांसाठी मालाचा पुरवठ्यातील अनिश्चितता कमी होईल. पर्यटकांसाठी, यामुळे वर्षभर प्रवास करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, अनेक स्थानिक कुटुंबांसाठी हा बोगदा अधिक वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक आहे: ते म्हणजे हंगामी विलगीकरणाचा अंत.
टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात जेव्हा कामगार बोगद्याच्या जोडणीच्या ठिकाणाहून बाहेर आले, तेव्हा हे यश केवळ अभियंते आणि यंत्रांचेच नव्हते, तर त्या हजारो लोकांचेही होते ज्यांनी हवामान, उंची किंवा भौगोलिक परिस्थितीला आपल्या मार्गातील अडथळा बनू दिले नाही. हिमालयाच्या कुशीत त्यांनी पर्वताला छेदून एक मार्ग तयार केला आहे — आणि कदाचित संपूर्ण प्रदेशाचे भविष्यच बदलून टाकले आहे.

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील
इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात
सुनिल इंगळे
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले.
महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.
आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार
ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चिंतामणी कोळी यांच्यातर्फे सलग १९ व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.
