कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २७ गावातील द्वारली येथे बेकायदा इमारत उभारणाऱ्या तीन भूमाफियांच्या विरूध्द आय प्रभागाच्या अधीक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्याने (एमआरटीपी) कलमाने तक्रार केली आहे. हिल लाईन पोलिसांनी तीन भूमाफियांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेतील द्वारली गावातील भगवान मारूती भोईर, सुचिता मारूती भोईर, सौरभ भोईर यांच्या विरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाच्या आवश्यक बांधकाम परवानग्या न घेता, शासकीय परवानग्या न घेता तळ आणि दोन मजल्याचे बेकायदा इमारतीचे बांधकाम केले आहे.
या बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिका वरिष्ठांच्या आदेशावरून आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी हा गुन्हा भूमाफियांवर दाखल केला आहे. पिसवली येथील एका हिंदी शाळेच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी अधीक्षक साळुंखे यांनी नुकताच एक एमआरटीपीचा गुन्हा शाळा चालकाविरूध्द दाखल केला आहे. आता त्यांनी दाखल केलेला हा दुसरा गुन्हा आहे.
गेल्या वर्षी द्वारली गावात गुन्हा दाखल भगवान भोईर, सौरभ भोईर यांनी एक बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले असल्याच्या तक्रारी पालिकेच्या आय प्रभागात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची पडताळणी तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांनी केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तत्कालीन आय प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी भोईर कुटुंबीयांना बांधकामाची बांधकाम परवानगी, जमीन मालकी हक्काची आणि इतर शासकीय परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. सदर सुनावणीला भगवान भोईर आणि इतर हजर राहिले नाहीत. त्यानंतर तात्काळ पालिकेच्या आय प्रभागाने भोईर यांचे बांधकाम महाराष्ट्र महापालिका अधिनियम ४७८अन्वये अनधिकृत घोषित केले. आणि हे बांधकाम तात्काळ तोडून घेण्याचे निर्देश दिले होते.

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सुमारे चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून त्यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली ठळक छाप पाडली होती. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या निधनाची वार्ता समोर आल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनी दु:ख व्यक्त केले. आपल्या सौम्य आणि मृदू स्वभावामुळे त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले होते.
गरिब परिस्थितीतून पुढे आलेल्या दत्ता मेघे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. पुढे ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.
दत्ता मेघे यांनी वर्धा मतदारसंघातून चार वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व केले. तसेच त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. ते तीन वेळा विधान परिषद सदस्यही राहिले होते.
२०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच निवडणूक रणनितीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यापूर्वी १९९८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी विदर्भातून मंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाले.
दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याची आठवण दीर्घकाळ राहील.
मुंबई : राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक २१ मार्च २०२६ रोजी दिलेल्या सूचनांनुसार, यापूर्वी राज्याला ३० टक्के वाटप मंजूर होते. आता २३ मार्च २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत आणखी २० टक्के वाटप वाढविण्यात आले असून एकूण गॅस पुरवठा पूर्व-संकट पातळीच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.
या अतिरिक्त २० टक्के वाटपात हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया व दुग्धव्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या योजनांनाही लाभ मिळणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, या निर्णयामुळे व्यापारी एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल आणि उपहारगृह व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, गॅस मिळविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणे आणि पीएनजी साठी अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील खाद्यव्यवसायाला मोठा दिलासा मिळणार असून पुरवठा साखळी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

करंट लागून खाली पडला ० रेल्वेसेवा विस्कळीत
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात एक अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून धिंगाणा घातल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला, तो जवळपास दोन तास त्या खांबावरच इकडून तिकडे करत होता. या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकाच्या एक आणि दोन फलाटावर रेल्वेसेवा विसकळीत झाली होती. अखेर कंरट लागल्याने तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्यानंतर, रेल्वेतील सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन मधील ओव्हरहेड वायरच्या खांबावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारासएक अज्ञात व्यक्ती चढला. रेल्वे आरपीएफ जवान आणि जीआरपी पोलिसांनी त्याला खाली येण्यासाठी विनवणी केली, ते त्याची समजूत काढत होते. मात्र, त्याने एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटाच्या दिशेने खांबावर चालण्यास सुरुवात केली. त्याला करंट लागू नये यासाठी काही वेळेकरीता रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा देखील खंडीत केला गेला होता. फलाट क्रमांक एक अ , एक, दोन , तीन आणि चार या पाच फलाटावरील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होती. लोकल गाड्या थांबल्या होत्या. रेल्वे स्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले होते. दुपारचे २ वाजून ४२ मिनिटांनी आरपीएफने त्याला खाली उतरविण्याकरीता अग्नीशमन दलाला पाचारण केले. पाच मिनिटात अग्नीशमन दलाचे जवान त्याठिकाणी दाखल झाले, त्यांनीही संबंधितास खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर देखील तो व्यक्ती खाली आला नाही. त्याला खाली उतरविता आले नाही. मात्र, वीज पुरठवा सुरू झाल्याने अचानक त्याला करंट लागला आणि तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
दरम्यान, हा व्यक्ती अधून-मधून खाली येण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने एकाकडून मोबाईल मागितला होता. त्याला पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून मोबाईल पण दिला गेला. त्यानंतर काही वेळेने त्याने तो मोबाईल पुन्हा परत दिला. सध्या या व्यक्तीवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो कोण आहे त्याने हे कृत्य का केले ? याचा तपास पोलिस आणि आरपीएफकडून सुरु आहे.

दिवसा तारे आठवले ० शक्ती गेल्याचा आलाप ० चेहरा लपवला
नाशिक : भोंदूगिरीच्या जोरावर महाराष्ट्रातील महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन उर्फ अशोक खरातला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली. अटकेनंतरही तोऱ्यात चालणाऱ्या अशोक खरातला स्वताच्या पायावरही उभे राहणे अवघड झाले होते. पोलिसांचा आधार घेत त्याला जीपपर्यंत जावे लागेल. पोलिसांच्या थर्डडिग्रीनंतर सर्व शक्ती गेल्याचा आलाप अशोक खरात करीत होता. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या जीपमध्ये बसल्यावर आपले तोंडही लपवित होता.
दरम्यान, अनेक बढ्या राजकीय नेत्यांची सिक्रेट अशोक खरातकडे असल्यामुळे त्याचा पोलिस एन्काऊंटर करतील असा आरोप पण्यातीली सामाजिक कार्यकर्यात्याने केला आहे.
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या गाजत असून विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही याच प्रकरणावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्षनेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही याप्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला आहे.
अजित पवारांच्या अपघाताशी
खरातचे कनेक्शन ?- मिटकरी
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी यांनी दिली.
अशोक खरातच कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार आहे, आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहित झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत या भोंदूबाबाचे संबंध असू शकतात. कारण, या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली, अशोक खरात आणि अजित दादांचा अपघात याच्यात संबंध आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून गेल्या तीन दिवसापासून अजित दादांचा विषय मागे पडलाय. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशीच तत्परता अजित दादांचा प्रकरणात झाली पाहिजे, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनातील नवा विक्रम स्थापित केला आहे. तब्बल सलग ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८,९३० दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे.
नरेंद्र मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पक्षाला विजय मिळवून दिला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी एकूण ८,९३१ दिवस पदावर राहून देशातील सर्वाधिक काळ शासन करणारे नेते म्हणून विक्रम केला आहे.
मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर ३ कोटी सबस्क्राइबर पूर्ण झाले. तसेच इंस्टाग्रामवर त्यांचे १० कोटी फॉलोअर्स असून, ते जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेत्यांपैकी एक आहेत.

राजू रावल
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होताच देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षासमोर विशेषतः दक्षिण भारतात आपली पकड अधिक मजबूत करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये सध्या भाजपची स्थिती अत्यंत भक्कम मानली जाते. मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राज्यात प्रभावी राजकीय पकड निर्माण केली आहे. केवळ संघटनात्मक पातळीवरच नव्हे, तर मतदारांमध्येही त्यांनी ठोस विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यशैलीत हिंदुत्ववादी भूमिका स्पष्टपणे जाणवते, ज्यामुळे विशिष्ट मतदारवर्गाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे.
दुसरीकडे, काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते गौरव गोगोई यांची उपस्थिती असली, तरी भाजपने त्यांच्या विरोधात आक्रमक प्रचारयंत्रणा उभी केली आहे. विशेषतः वैयक्तिक आणि कौटुंबिक मुद्द्यांवरून निर्माण झालेला वाद हा भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. परिणामी काँग्रेस बचावात्मक भूमिकेत गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
आसाममध्ये भाजपच्या वाढीचा आलेख विशेष लक्षवेधी ठरतो. एकेकाळी केवळ ५ जागांपुरती मर्यादित असलेली उपस्थिती काही वर्षांतच झपाट्याने वाढत सुमारे ७५ जागांपर्यंत पोहोचली आहे. हा प्रवास केवळ मतांच्या आकड्यांचा नाही, तर प्रभावी निवडणूक व्यवस्थापन, मजबूत संघटनशक्ती आणि नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांसाठी भाजपला रोखणे हे मोठे आव्हान ठरत आहे. हिमंत बिस्व शर्मा यांचा प्रभाव, संघटनात्मक बळ आणि मतदारांचे एकत्रीकरण पाहता भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अधिक दृढ होताना दिसते.
एकूणच, आसाममध्ये भाजपची स्थिती मजबूत असून विरोधकांची लढत तुलनेने कमकुवत भासत आहे. येणाऱ्या निवडणुकीत हिमंत बिस्व शर्मा यांचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दक्षिण भारत भाजपसाठी खरी कसोटी ठरणार असला, तरी ईशान्येकडील आसाममध्ये पक्षासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
रत्नागिरी : (अशोक गायकवाड )–जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सुविधा जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवेल, दुसऱ्या कोणत्याही बाह्य यंत्रणेला देणार नाही, असा धोरणात्मक निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करुन सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, फ्लोरींग करिता १ कोटी ९८ लाख रुपये ची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिध्द करावी. त्यानुसार कामकाम करुन घ्यावे. उत्तम प्रशिक्षक ठेवून त्यांना चांगल्या पगारावर नेमणूक करावी आणि जिल्हा क्रीडा संकुलाने सर्व स्वत: चालवावे. व्यावसायिक बाह्य यंत्रणेला चालविण्यास देऊ नये. सेवाशुल्क, अग्नीसेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा पुढील आठवड्यामध्ये मार्गी लावण्याची सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, महावितरणने सिंगल फेज वरुन थ्री फेज करण्याची मोहीम हाती घ्यावी. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे तसेच अनावश्यक उभे असणारे होर्डींग काढावेत. स्थानिकांसाठी त्याबाबत धोरण ठरविले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणीच विशेषतः डाजिटल होर्डींग उभी करण्याबाबत नगरपरिषदेने नियोजन करावे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र इमारत, अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत, एनसीसी इमारत, रत्नागिरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बैठक झाली.

उपराष्ट्रपतींच्या सन्मानार्थ राज्यपालांकडून चहापान
अशोक गायकवाड
मुंबई : महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे चहापानाची आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अभिनेत्री भूमी पेडणेकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
