शहरापासून खेड्यापर्यंत रोटरीची जलक्रांती

पर्जन्य जल संचायनाचे विविध प्रकल्प
कल्याण : जलसंवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून वर्षा जल संचयन ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कल्याण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या पुढाकारातून शहरी भागात आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात प्रत्येकी एक अशा दोन वर्षा जल संचयन प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल व मीनाताई ठाकरे उद्यान डोंबिवली पश्चिम येथे वर्षा जल संचयन प्रकल्प यशस्वीपणे साकारण्यात आला आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड येथे रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने उपक्रम राबविण्यात आला आहे. अध्यक्षा रो. रुईता सपकाळे, सचिव जय राठोड, प्रकल्प प्रमुख आत्माराम घाणेकर आणि सह-प्रकल्प प्रमुख वैशाली परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही प्रकल्प राबवण्यात आले. या प्रकल्पांमुळे दरवर्षी लाखो लिटर पावसाचे पाणी भूगर्भात पुनर्भरण होणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास, भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल आणि मीनाताई ठाकरे उद्यान, डोंबिवली (पश्चिम) येथील इमारतींच्या छतावर पडणारे दरवर्षी सुमारे ३ लाख १५ हजार लिटर पावसाचे पाणी भूगर्भात रिचार्ज केले जाणार आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड येथील शाळेच्या इमारतीच्या छतावर पडणारे दरवर्षी सुमारे २ लाख ७० हजार लिटर पावसाचे पाणी भूगर्भात रिचार्ज केले जाणार आहे. हे पाणी अत्याधुनिक फिल्टर प्रणालीद्वारे शुद्ध करून आवश्यकतेनुसार वापरासाठी साठवले जाणार असून, अतिरिक्त पाणी भूगर्भात पुनर्भरण करण्यात येणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमुळे पावसाच्या पाण्याचा प्रभावी व शाश्वत वापर होणार असून, भूजल पातळी वाढण्यास व भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मोलाची मदत होणार आहे. विशेषतः मानेखिंड गावातील जलसुरक्षेला बळकटी मिळून स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा दीर्घकालीन लाभ होणार आहे.
शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल आणि मीनाताई ठाकरे उद्यान डोंबिवली पश्चिम पर्जन्य जलसंचयन या प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. डिस्ट्रिक्ट वॉटर अँड सॅनिटेशन सल्लागार हेमंत जगताप तसेच केडीएमसी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यांसह रोटरी क्लब ऑफ कल्याणचे दिलीप करडेकर, जयश्री करडेकर, पराग कापसे, घनश्याम गुप्ता, गौरव राय, माधवी कुलकर्णी हे सदस्य देखील उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड वर्षाजल संचयन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला माजी जिल्हा गव्हर्नर  मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अश्विनी रणदिवे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता चौधरी उपस्थित होते.

अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे येथील ‘विंडसर मशिन्स लिमिटेड’ कंपनीच्या ९९ कामगारांची गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली २४ कोटी रुपयांची थकबाकी आणि हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता २४ कामगारांनी गमावलेला जीव, हा अतिशय गंभीर मुद्दा आज महाराष्ट्र विधान परिषदेत मांडला गेला. भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री  प्रमोद जठार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने या ९९ कामगारांवरील अन्यायाचा विषय आमदार  प्रमोद जठार, तसेच कामगारमंत्री आणि कामगार सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. सुराज्य अभियान याचा पाठपुरावा करत आहे.
हा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार जठार यांनी कंपनीकडून झालेल्या अन्यायी कारभाराचा पाढा वाचला. वर्ष २००० ते २०२६ या २५ वर्षांच्या काळात कंपनीने ९९ कामगारांना त्यांच्या पगार, ग्रॅच्युइटी आणि बोनस अशा नऊ वेगवेगळ्या घटकांच्या न्याय्य रकमेपासून वंचित ठेवले आहे. कंपनीने ठाण्यातील आपली मालमत्ता १६२ कोटी रुपयांना विकून प्रचंड नफा कमावला; मात्र ज्यांच्या कष्टावर कंपनी उभी राहिली, त्या वयोवृद्ध आणि आजारी कामगारांना केवळ ४.५ कोटी रुपयांची नाममात्र रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. एवढेच नाही, तर कंपनीने कामगारांचे ७.४१ कोटी रुपये अनधिकृतपणे ‘राईट-बॅक’ (Write-Back) करून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता ९९ पैकी २४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित कामगार मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याची भीषण वास्तविकता त्यांनी सभागृहासमोर मांडली.
आमदार जठार यांनी शासनाकडे ठोस मागण्या केल्या. कामगारांच्या हक्काची २४ कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने कृती करावी, या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रतिनिधी, कामगारमंत्री, कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापन यांची तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि कंपनीने केलेला पीएफ घोटाळा, तसेच आर्थिक गैरव्यवहारांची ‘आर्थिक गुन्हे शाखेमार्फत’ सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
आमदार जठार यांनी मांडलेल्या या वास्तवानंतर पीठासीन अधिकारी  संजय खोडके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कामगारमंत्र्यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. यावर राज्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असे सांगून पुढील कारवाईच्या दृष्टीने सभागृहाला आश्वस्त केले. या चर्चेअंती आमदार  जठार यांनी अन्यायग्रस्त कामगारांचे निवेदन कामगारमंत्र्यांकडे सुपूर्द केले. आता शासनाच्या या आश्वासनानंतर उर्वरित कामगारांना त्यांच्या हयात असताना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे.

रेल्वे व केडीएमसी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी; तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी
कल्याण  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या मौजे उसरघर गावातील नागरिक मागील काही महिन्यांपासून गावात जाण्याकरिता रेल्वे मोरीतून तसेच उड्डाणपुलावरून थेट पोहोच रस्ताच नसल्यामुळे रेल्वे केडीएमसी प्रशासना विरोधात आक्रमक झाले आहेत.
उसरघर गावाच्या हद्दीलगत केंद्र शासनाच्या डीएफसीसी आयएल ( डेडिकेटेड फ्रेट रेल्वे कॉरिडोर ) या मालवाहू रेल्वे खालून ग्रामस्थांना येजा करण्याकरिता भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. परंतु या भुयारी मार्गात उन्हाळ्यामध्ये सुद्धा चार फूट पाणी साचलेला असतो आणि आता पावसात तर हा भुयारी मार्ग पूर्ण तुडुंब भरलेला आहे त्यामुळे या भुयारी मार्गातून येथील नागरिकांना येजा करता येत नसल्यामुळे अर्धा तास पायपीट करून रेल्वेच्या उड्डाण पुलावरून गावात प्रवेश करावा लागतो. तसेच याच रेल्वे मार्गालगत मध्य रेल्वेचे वसई कोपर पनवेल रेल्वेचे सुद्धा दोन मार्ग प्रस्तावित असून मध्य रेल्वेने तर भुयारी मार्गच अजून बनवलेला नाही.परंतु या दोन्ही भुयारी मार्गातून येजा करण्याकरिता रेल्वे रेल्वेच्या हद्दीपासून गावाच्या मुख्या रस्त्याला जोडण्याकरिता पोहोच रस्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा अजून बनवून दिलेला नाही.
याच रेल्वे प्रशासनाने मानपाडा ते दिवा या रस्त्यातील उसरघर गावाच्या हद्दीत उड्डाण पुलाचे अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे या उड्डाण पुलावरून खाली उतरल्यानंतर या गावातील नागरिकांना आपली वाहने वळवताना खूप कसरत करावी लागत. कधी कधी तर पाठीमागून येणारे वाहने सुद्धा एकमेकांना धडकत आहेत. शाळेच्या बसला तर अर्धा किलोमीटर पुढे जाऊन यूटर्न मारून यावं लागत आहे.
मुळात इतिहास असा आहे की 1970 च्या दशकामध्ये प्रीमियर कंपनी या चार चाकी वाहन निर्मिती कारखान्याच्या स्थापनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने कारखान्याच्या सिमेलगतच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मानपाडा-संदप-उसरघर रस्त्याचे प्रयोजन करून दिले होते. हाच रस्ता थेट पुढे दिव्यातून ठाण्यापर्यंत जातो.या रस्त्याचे जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीने आज पर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात आली. एप्रिल 2018 मध्ये माय सिटी या प्रकल्पालगत येथील बांधकाम व्यवसायिकाने स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता वापरात असलेल्या अस्तित्वातील रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून भिंत घालण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन करून हा खोदलेला रस्ता पुन्हा बुजवून पूर्वत केला होता.
‘ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या डीएफसीसीआयएल या मालवाहू रेल्वे प्रशासनाने उसरघर ग्रामस्थांकरिता भुयारी मार्ग बनवला आहे. तशाच प्रकारचा भुयारी मार्ग मध्य रेल्वेने सुद्धा तातडीने बनवून द्यावा.  पुढे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गावापर्यंतचा अर्धवट असलेल्या रस्ता पूर्ववत करून द्यावा. तसेच चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट करून तयार करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे योग्य पद्धतीने अलाइनमेंट करून ग्रामस्थांकरिता थेट गावात प्रवेश करता येईल असा रस्ता तयार करून द्यावा. अन्यथा हे चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट केलेल्या उड्डाणपुलामुळे उरलेली जागा बिल्डरला मिळावी याकरीता अधिकाऱ्यांनी केलेले हे संगणमत समजण्यात येईल आणि त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल’, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन  पाटील यांनी दिला आहे.

दिवा : शिवसेना दिवा युवतीसेना आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात कल पार पडला. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सेंट मेरी शाळेतील हॉल मध्ये आपली उपस्थित दर्शवीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसंगी दिवा शहरातील ४२ शाळा आणि कॉलेजेस मधील जवळपास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी, पालक तसेच विविध शाळांतील संचालक व मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रसंगी इयत्ता १२ वी मध्ये दिवा शहरात प्रथम येणाऱ्या श्वेता शिंदेसह इयत्ता १० वी मध्ये दिवा शहरात यश घाणेकर ९३% गुण मिळवले असून इयत्ता १० वी मध्ये ७०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या शेकडो यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
गुणगौरव सदर सोहळ्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक असलेले शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या पालकांच्या कष्टांचे मोल ओळखा. आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याचा निर्धार करा आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घ्या.” मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक विद्यार्थी दिशाहीन होत असल्याची खंत देखील व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. तसेच नगरसेविका साक्षी मढवी, नगरसेवक शैलेश पाटील व आदेश भगत यांनी देखील मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेत वाढ केल्याची घोषणा रमाकांत मढवी यांच्या तर्फे करण्यात आली. तसेच दिवा परिसरात लवकरच अभ्यासिका (स्टडी रूम) सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. “शिवसेना कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व करिअरच्या वाटचालीस शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रसंगी दिवा शहर प्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, ऍड. आदेश भगत, दीपक जाधव तसेच नगरसेविका साक्षी मढवी, स्नेहा पाटील, दर्शना म्हात्रे तसेच भालचंद्र भगत, उमेश भगत, विनोद मढवी, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, गुरुनाथ पाटील, सचिन चौबे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई ‘बकाल’ केली – वर्षा गायकवाड*
बीएमसीत ३० वर्ष सत्तेत राहून मलई खाणाऱ्या भाजपाने अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ?
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून स्वतःचे खिसे भरणाऱ्या भाजपाला जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुंबईची वाताहत होण्यास भाजपाच जबाबदार आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपाचा सडकून समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर दवर्षी १०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते, इतर खर्च वेगळाच करत असूनही एक दोन पावसातच मुंबई जलमय होते, मोठ मोठे वृक्ष कोलमडून जिवीत व वित्त हानी होते, रस्ते खचतात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतूक कोंडी होती. महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे नेते १०० टक्के कामे झाल्याचा दावा करतात पण मुंबईची अवस्था काही बदलत नाही. मुंबईकरांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापौर स्वतःचे ‘रील्स’ बनवण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे, तर आयुक्तांनीही काहीही उल्लेखनीय काम केलेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांची भाजप केवळ थट्टाच करत आहे.
भाजपाचे काही बोलभांड नेते आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, विरोधक फक्त टिका करतात अशी गरळ ओकत आहेत. पण रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले? भाजपाची कृती ही वरातीमागून घोडे अशी आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे, मग कोट्यवधी रुपये खर्चून कोणाचा विकास केला? सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवून देणे विरोधकांचे कामच आहे, त्यावर आगपाखड करण्याची गरज काय? भाजपा विरोधी पक्षात असताना काय करत होते? प्रत्येक कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येता, मग जबाबदारी का नको? हिंदू मुस्लीम व बांग्लादेशीचा मुद्दा पुढे करून फक्त सामाजिक द्वेष पसरवण्यात भाजपाला स्वारस्य आहे, मुंबईकर मेला तरी भाजपाला काहीही वाटत नाही. भाजपाने मुंबई शहर बकाल केले व वरून तेच आरडाओरड करत आहेत. काम करा आणि स्वच्छ व सुरक्षित मुंबई करा, नाहीतर खूर्ची खाली करा, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून टेस्टिंग कसले करता?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १३ किमीच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर भाजपा महायुती सरकारने ७,१८० कोटी रुपये खर्च केला व १ मे रोजी त्याची मोठी प्रसिद्धी करत उद्घाटन केले पण पहिल्याच पावसाने या महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पाडले. महामार्गावर खड्डे पडले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ही तर टेस्टिंग…कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात…पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री रस्त्याची टेस्टिंग आहे म्हणत आहेत, हे अत्यंत हास्यास्पद आहे. प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून टेस्टिंग कसले करता आणि महामार्गावर टेस्टिंग होते तर या काळात टोल वसुली का थांबली नाही? करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या महामार्गावर दोन महिन्यांत खड्डे पडत असतील, तर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. दुर्दैव म्हणजे, अपयश मान्य करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्यांनाच दोष देत आहे. जबाबदारापासून पळ काढणे हा भाजपा नेत्यांचा स्थायीभाव आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

भरत गोगावले यांच्या हस्ते नवीन पुलाचे उद्घाटन
अशोक गायकवाड
राजगड—कर्जत :  कर्जत शहरात उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी गोगावले यांनी कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक भरत गोगावले यांनी केले. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील नवीन ‘श्रीराम पुलाचा’ लोकार्पण सोहळा कर्जत येथे झाले. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला असून आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर,भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे,तसेच भाजपचे राजेश भगत,शरद लाड,जिल्हा उप प्रमुख भाई गायकर, विजय पाटील, शिवराम बदे, यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपविभागीय अभियंता राहुल देवांग आदी प्रमुख उपस्थित होते. पुलामुळे आता अवजड वाहनांची कोंडी फुटणार असून कर्जत शहर व तालुक्याच्या विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल व सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत यांच्या वतीने करण्यात आले होते. पुलाचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या शुभहस्ते आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा पूल इंग्रजकालीन आणि जुना झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला व वाहनांच्या संख्येला अपुरा पडत होता. शहरात जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असे. पावसाळ्यात तर पर्यटकांची गर्दी वाढल्याने तासनतास वाहनांच्या रांगा लागत असत. हीच कोंडी आणि स्थानिक वाहनचालक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी या नवीन पुलासाठी अथक परिश्रम घेतले. पावसामुळे पुलाचे अंतिम रंगकाम आणि विद्युत दिव्यांचे काम काहीसे लांबणीवर पडले होते. मात्र पुलाच्या सौंदर्यापेक्षा पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणे आणि त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असे थेट आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करून लोकार्पण निश्चित केले.
००००००००

नाल्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार
कल्याण  : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडखालून संतोषनगर प्रभागातून लोकग्रामकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नाल्याची रुंदी व उंची वाढविण्याच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. या नाल्यात पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा केरकचरा, प्लास्टिक तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या अडकून पाण्याचा प्रवाह खोळंबतो. परिणामी पावसाचे पाणी साचून संतोषनगर तसेच परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरत असल्याची समस्या निर्माण होते.
रविवारी दुपारी शिवसेना संपर्क प्रमुख तथा प्रभागाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते स्वतः नाल्याच्या तोंडाशी खाली उतरून अडकलेला केरकचरा व इतर अडथळे हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या जाड फांद्या अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने मोकळा होऊ शकला नाही.
यावेळी बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, “या नाल्याच्या रुंदीकरण व उंची वाढविण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असला, तरी काम तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी या कामाचा सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.” नाल्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.
0000

ठाणे: नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे, असे मत ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी व्यक्त केले. नालेसफाईच्या ठेकेदारांची मुजोरी आणि ठाणे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाची झळ कळवा येथील साईनाथ नगर, शनी मंदिर परिसरातील नागरिकांना बसली. घरात पाणी शिरल्यानंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करावे लागल्याने काँग्रेसने प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करून नाले सुरळीत प्रवाहित ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची करारानुसार जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात हे काम वेळेत न झाल्याने मुसळधार पावसात नाल्यांमध्ये गाळ साचला आणि त्याचा फटका नागरिकांना बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
धक्कादायक म्हणजे, नागरिकांच्या तक्रारीनंतर नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. संबंधित ठेकेदाराने “आज रविवार असल्याने आम्हाला सुट्टी आहे,” अशी भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची नालेसफाईची बिले ठेकेदारांनी घ्यायची आणि प्रत्यक्ष काम मात्र महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून करून घ्यायचे का, असा संतप्त सवाल काँगेस शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांची बिले रोखावीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला.

000000
कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने काही बंद फ्लॅट फोडून घरफोड्या केल्या आहेत. हे दरोडेखोर चेहऱ्यावर फडका लावून आले होते. त्यांच्याकडे हत्यारे असल्याने येथील रहिवाशी भयभयीत झाले असून त्यांनी मानपाडा पोलिसांना याची तक्रार दिली असून पोलिस या दरोडेखोरांच्या तपास करीत आहेत.
निवासी मधील सर्व्हिस रोडवरील सिमेन्स सोसायटी (RH 82) आणि त्याच्या बाजूची गुरुराज सोसायटी (RH 83) मध्ये हे दरोडेखोर आले होते. याच सोसायटी मधील काही बंद फ्लॅट या दरोडेखोरांनी फोडले असून त्यातील रहिवाशी बाहेर गावी असल्याने काही किंमती ऐवज गेल्याचे अद्याप समजले नाही आहे. निवासी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या होत असून पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडून येथील रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात आज रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून विज पुरवठा खंडित झाला होता.  उच्च दाबाच्या वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे किंवा स्पर्श झाल्याने स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित होत होता. शिवाय हेवी करंट मुळे मेन फिडरचा लग आणि उच्च दाबाच्या वाहिन्यांवरील कंडक्टर तुटल्याने तसेच ट्रान्सफॉर्मर लायटिंग अरेस्टर फुटल्याने असे अनेक प्रकाराच्या समस्या या पावसामुळे आल्याने आज रविवारचा सुट्टीचा दिवस रहिवाशांना विजेविना काढावा लागला.
सकाळ साडे दहा वाजल्यापासून ते संध्याकाळ पाच वाजेपर्यंत लाईटचा खेळखंडोबा सुरू होता. गेलेले लाईट कधी अचानक मधूनच यायचे आणि ताबडतोब जायचे पण. काही ठिकाणी वीज पुरवठा डीम आणि चढउतार  होत असल्याचे तक्रारी बऱ्याच रहिवाशांनी केल्या आहेत. त्यात एमआयडीसी पाणी खात्याकडून मेसेज आला की दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिक वैतागले होते.
एमआयडीसी निवासी रहिवाशांच्या रविवार सुट्टीचा दिवशी टिव्ही, वायफाय असे करमणुकीचे साधने बंद राहिल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. सायंकाळी पाच वाजता बहुतेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू झाला. वीज पुरवठा चालू करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी यासाठी जोराचा पाऊस असूनही मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *