30 March Bitambatmi All pages

Open Book

गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…!

पाच वर्षानंतर पुन्हा एकदा तडाखा…!

राजन चव्हाण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच पडलेला अवकाळी पाऊस, काही भागाला बसलेला गारपिटीचा तडाखा आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि काजूचे उरले- सुरले पीकही आता हातचे जाणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार -शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.

गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून वेळेअगोदर सुरू झाल्याने ‘कोकम’ या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याचे दरही वाढले होते यंदाही या पिकावर परिणाम होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. कोकणची काळी -मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे यंदा खायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. शिवाय जांभुळ पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे.

कणकवली,देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांच्या अनेक भागात  गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि कांही भागात तर वीजेचे  खांबही कोसळले. रामनवमीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड  उकाडा जाणवत होता आणि रामनवमीच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली.वैभववाडी तालुक्याच्या काही भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील अनेक गावांना त्याचा तडाखा बसला.

मालवण तालुक्यातील कसाल,आंब्रड,ओसरगाव,फोंडाघाट, शिवडाव आदी ठिकाणी तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. देवगड तालुक्यातील अनेक गावांनाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. बदलत्या हवामानामुळे आधीच संकटात असलेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची ब चिंता त्यामुळे अधिक वाढली आहे.शासकीय सर्वेक्षणानुसार बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे आणि आता उरले -सुरले १० टक्के पिकही हातचे जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी- बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.

 

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र

प्रक्रिया बिनविरोध, राऊळ, नारकर,साटविलकर, तांबे यांची वर्णी

राजन चव्हाण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.  कट्टर राणे  समर्थक भाजपाचे प्रितेश राऊत( शिक्षण व आरोग्य) आणि सुलोचना नारकर (महिला व बालकल्याण) तर शिंदे शिवसेनेचे संतोष साठविलकर (वित्त व बांधकाम )आणि रुहिता तांबे( समाज कल्याण) यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. या निवडीत खासदार नारायण राणे यांनी जुन्या नव्या सदस्यांना संधी दिली आहे.

रेडी वेंगुर्ले इथून निवडून आलेले प्रितेश राऊळ  यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सुलोचना नारकर या पोंभुर्ले (देवगड ) जि. प.गटातून निवडून आल्या आहेत. शिंदे सेनेचे साटविलकर हे मालवण तालुक्यातील पेंडूर जि. प. गटातून निवडून आले आहेत. तर रोहिता तांबे या जानवली (कणकवली) या जि. प. गटातून निवडून आल्या आहेत.

निवडीनंतर जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जय प्रकाश परब,उपाध्यक्ष दादा साईल शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मनीष दळवी शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे गटनेते संजय बोबडी यांनी बिनविरोध निवड झालेल्या सर्व सभापतींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी

ठाणे:  ठाणे-पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम व त्यासाठी लागणाऱ्या मतदार यादीचे काम चालू झालेले आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये मतदार यादी कायम होऊन नवीन यादी जाहीर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महानगरपालिका येथे महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, महाराष्ट्र सहकार बोर्डाचे संचालक अरुण पानसरे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे, नगरसेवक बाबाजी पाटील व शिवसेना पक्षाचे सन्मा नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेन पक्ष ज्या पध्दतीने महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण करत आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रगण्‌य आहे असे मानले जाते. सहकाराच्या माध्यमातून जिल्हयातील सहकार क्षेत्रामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे सर्व दृष्टीने एकत्र येवून ठाणे जिल्हा मध्यवर्ती व पालघर जिल्हा मध्यवर्ती निवडणूक लढवावी अशा प्रकारचे साकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे मांडण्याबाबतची भूमिका घेतली आहे.

या संदर्भात मतदार यादी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे व पतसंस्थांचे ठराव किंवा पुढील प्रक्रिया राबविण्याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये ठाणे शहरातील सर्व सन्मा. नगरसेवकांना त्याच्या प्रभागामध्ये असणाऱ्या गृहनिर्माण संस्था व पतसंस्था यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नियमाप्रमाणे जो ठराव लागतो तो ठराव 5 तारखेच्या आत अनिल भोर, खांडेकर व ज्ञानेश्वर गायकवाड समन्वयक म्हणून त्यांचेकडून देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.

सर्व पदाधिकारी, ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेबरोबर निवेदनाद्वारे चर्चा करतील व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी

फेरीवाल्यांवरील दंड ५ हजार रुपये करावा

ठाणे  : ठाणे महापालिकेने नव्या ठाणे शहरात विविध विकास प्रकल्प राबवितानाच, जुन्या ठाणे शहराचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी केली. तसेच शहराच्या विविध भागातील फेरीवाल्यांकडील साहित्य जप्त केल्यानंतर १२०० रुपयांऐवजी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणीही नम्रता कोळी यांनी केली.

ठाणे महापालिकेकडून नव्याने वसलेल्या ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांबद्दल आनंद आहे. परंतु, नवे प्रकल्प राबविताना जुन्या शहराचा विचार करायला हवा. गायमुख, नागला बंदर, बाळकूम, कोपरी येथे खाडीकिनारी सुशोभिकरण व पर्यटन सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, माझ्या प्रभागातील व जुन्या ठाण्यातील महागिरी खाडी परिसराला वगळण्यात आले. या खाडीत साचलेला गाळ नालेसफाईच्या मोहिमेतून काढण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही, याबद्दल नम्रता कोळी यांनी खंत व्यक्त केली. ठाणे शहराच्या विविध भागातून येणारे सांडपाणी प्रक्रियेविना थेट खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली.

ठाणे रेल्वे स्टेशन ते कोर्ट नाका, अशोक टॉकीज ते सिडको बस स्टॉप, सिद्धिविनायक मंदिर ते तलावपाळी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याविरोधात महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. या रस्त्यावरूनच टीएमटीची वाहतूक सुरू असल्याने लाखो लोक सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी अतिक्रमण विरोधी पथकाची जीप फिरती ठेवावी. तसेच बेकायदा फेरीवाल्यांकडून सामान व साहित्य जप्त केल्यानंतर ते सोडविण्यासाठी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली. तसेच जुन्या स्टेशन रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी १० वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोरील शाळा क्र. १ बंद आहे. या शाळेच्या ठिकाणी नवी इमारत उभारून तेथे महापालिकेची सीबीएससी शाळा सुरू करावी. तसेच चरई येथील जलकुंभासाठी तरतूद करावी, अशी मागणीही नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली.

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

अनिल ठाणेकर

ठाणे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘सेवा संवाद’ आणि ‘डिजी संवाद’ सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ‘सेवा संवाद’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी शिस्त आली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, सरकारी दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवरही प्रभावी नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना तक्रार निवारणासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे २४x७ तक्रार नोंदणीची सुविधा दिली गेली आहे. घरबसल्या केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्याने प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान झाले आहे.केवळ दैनंदिन कामकाजातच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्यातही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीच्या माध्यमातून १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी ‘कोतवाल रजिस्टर्स’ आता AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी शोधणे आता काही सेकंदांचे काम झाले आहे. तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांवर मोठा वचक बसवला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे सरकारी जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे आता अधिक सुलभ झाले आहे. या पोर्टलवरील ‘Street View’ आणि विविध GIS लेयर्समुळे अतिक्रमणे शोधणे आणि जमिनींचे संरक्षण करणे सोपे झाले असून हे भू-व्यवस्थापनातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटल मॅपिंग डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय शाळा आणि आपत्कालीन सेवांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सुलभ झाले आहे. मुख्य रस्त्यांचे जाळे आणि ड्रेनेज व्यवस्थेची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे.

‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या मूलभूत परिवर्तनासाठी आज एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी अभिमानास्पद असून, डॉ.पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित झालेल्या या डिजिटल अध्यायाने प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम

ठाणे: स्वरांचा शिलेदार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायकीतील ठुमरी, होरी, नाट्यसंगीत, अभंग, भैरवीतील नजाकतीचे स्मरण करीत पार पडलेल्या `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली.

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पुढाकार घेत विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशा खाडिलकऱ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, प्रसिद्ध गायक व कारेकरबुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सुरेश बापट, अमित प्रभाकर कारेकर, संजय वाघुले, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे, पदाधिकारी वृषाली वाघुले-भोसले यांनी दीपप्रज्वलन केले.

पंडित सुरेश बापट यांनी `मर्मबंधातील ठेव’ या नाट्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर `धन्य आनंद दिन’ पूर्ण हे नाट्यपद, `राम होऊनि राम गा रे’ हे भक्तीगीत, `बोलावा विठ्ठल’ हा अभंग, `या कागदी फुलांच्या’ भावगीताने मैफल रंगत गेली. प्रत्येक कलाकाराच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारेकर बुवांनी स्वत:ची गायकी घडविली. सुरुवातीला त्यांचा पातळ गळा होता. मात्र, त्यांनी रियाझाने दमदार बनविला होता. एका मैफिलीसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांनी कारेकरबुवांना प्रिये पहा हे नाट्यपद शिकविले होते. अन्, त्या मैफिलीनंतर प्रभाकर कारेकर नावाचा उष:काल घडला, अशी आठवण निवेदिका अनघा मोडक यांनी सांगितली.

`प्रिये पहा,रात्रीचा समय सरुनी’ या नाट्यगीताने पं. सुरेश बापट यांनी मैफिलीला उंचीवर नेले. चंदनाचे परिमळ, दिनांची माऊली, गगना गंध आला, माझ्या देहाची पालखी या गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित सुरेश बापट यांनी अजरामर झालेल्या `मै कही समझाऊं सब जग अंधा’ या भैरवीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेल्या या मैफिलीचा समारोप केला.

तत्पूर्वी कारेकरबुवा व प्रसिद्ध नाटककार सतीश दुभाषी यांच्या अखेरच्या भेटीचा किस्सा पंडित सुरेश बापट यांनी सांगितला. शिवाजी मंदिर येथे झालेल्या जून १९८० मधील प्रयोगावेळी अष्टपैलू अभिनेते सतीश दुभाषी यांनी `मै केही समझाऊं’ ही भैरवी ऐकली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कारेकर बुवांची भेट घेतली. पुन्हा कधी ही भैरवी ऐकेल माहित नाही, असे म्हणून दोन मिनिटे भैरवी सादर करण्याची विनंती केली. कारेकर बुवांनी सर्व वाद्यांसह संपूर्ण भैरवी सादर केली. दुर्दैवाने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सतीश दुभाषींचे अचानक निधन झाले होते. त्यावेळी एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद आम्ही अनुभवली होती, या आठवणीने रसिक गहिवरून गेले.

पंडित सुरेश बापट यांच्याबरोबरच गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर यांनी कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना दिली. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री, धनंजय पुराणिक आणि श्रेयस व्यास या प्रतिथयश वादकांनी समर्पक साथ दिली. तर अनघा मोडक यांनी निवेदनाची धुरा सांभाळली.

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न

कल्याण: एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा महाविद्यालयाच्या वातानुकूलित प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर  अमर लुंड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटचे जनरल मॅनेजर संजीव बजाज तसेच सुप्रसिद्ध मेंटर आणि उद्योजक सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरस्वानी आणि प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांचेही मार्गदर्शन लाभले.

अध्यक्ष डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाशी असलेले नाते पुढेही टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मेंटर  सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.

समारंभात विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान समारंभाचा पोशाख परिधान करून पदव्या स्वीकारल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करत महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव केल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम

१५० दिवसांचा ई-प्रशासन उपक्रम

हरिभाऊ लाखे

नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय गटात ‘नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला’ उपक्रम राबविणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई – प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा ई प्रशासन सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई कार्यालय, कार्यालयाचा ‘डॅश बोर्ड’, ‘व्हॉटस ॲप’, ‘चॅटबॉट’, कृत्रिम बुद्धिमत्ता व ‘ब्लॉक चेन’चा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते.

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक १५६.२५ गुण मिळवून पोलिस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलीस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. यामध्ये ‘ई मीट वीथ सीपी’, ‘वॉक इन टूर’, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आदींचा समावेश आहे. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला.

या विषयी पोलीस आयुक्त संदीपकर्णिक यांनी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलिस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालय सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

जिल्हा परिषदेचाही गौरव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. सात निकषांत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण १६५.७५ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला.

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’

दिव्यात गॅस वितरणात गंभीर गैरव्यवहार

दिवा, दि. २८ मार्च (आरती परब): दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा” मेसेज येत असला, तरी प्रत्यक्षात ८ ते १० दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांची रोजची स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉय किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार सरळसरळ फसवणूक असून न दिलेले सिलेंडर काळाबाजारात विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, देशात सध्या आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची चर्चा असताना, दिवा शहरातील काही गॅस एजन्सींकडून नागरिकांची उघडपणे लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः भारत गॅस कंपनीशी संबंधित काही एजन्सींविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संबंधित एजन्सींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनसेने प्रशासनासमोर पुढील मागण्या केल्या आहेत:

१) संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ चौकशी करावी

२) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत

३) गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून द्यावा

तसेच, काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशांत प्रभाकर गावडे, सचिव, दिवा शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना–  दिवा शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *