22 June Bitambatmi All pages

Open Book

ठाणे : जागतिक योग दिनानिमित्त रविवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास केला. यावेळी योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्य कसे राखता येते याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. नियमित योगाभ्यासाचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा संकल्पही करण्यात आला….
फोटो प्रफुल गांगुर्डे

कल्याण : ‘सकल आदिवासी संस्था’ तालुका कल्याण, यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, पालीवली येथे सदिच्छा भेट देण्यात आली. सकल आदिवासी संस्थेच्या संस्थापिका तथा सचिव योगिनी कोसराबे, अध्यक्षा सुचिता बारापात्रे, कोषाध्यक्ष संगीता निनावे, व सहकोषाध्यक्ष उमा निपाणे, तसेच संस्थेच्या ३१ सदस्य अशा ३५ जणींची सकल आदिवासी ही रजिस्टर संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम  राबविले जातात. त्यात मुख्य म्हणजे गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे. या वर्षी सकल आदिवासी संस्थेचा पहिला वहिला कार्यक्रम नुकताच पार पडला.  त्यात २०० मुलांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल तसेच शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप भिवंडी येथील जिल्हा परिषद शाळा, पालीवली येथे करण्यात आले.
येथील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. येथील बहुतेक विद्यार्थी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबातील असून त्यांना शैक्षणिक साहित्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. शासनाच्या वतीने योग्य मदत मिळत नाही. असा मुलांचे शिक्षण थांबू नये, त्यांना एक मदतीचा हात मिळावा हे सकल आदिवासी संस्थेचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

००००००००००
ठाणे, मधुमेह शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वेगाने पसरत असून, ही एक गंभीर समस्या बनत आहे. मधुमेहाच्या प्रतिबंधाबद्दल जनजागृती करणे, उपचार करणे आणि औषधांचे वाटप करणे यासाठी १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘डायबिटीज केअर सेंटर’ या संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ओम प्रकाश शर्मा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ठोस उपाययोजना करून सर्वसामान्यांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे आवाहन केले आहे. मधुमेहाच्या प्रतिबंध आणि उपचारांबद्दल जनजागृती करण्यासाठी, संस्थेने केवळ तज्ञांसोबत परिसंवाद आयोजित केले नाहीत, तर तीन भाषांमध्ये पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.
त्यांनी स्पष्ट केले की, एकेकाळी केवळ शहरी भागापुरता मर्यादित मानला जाणारा मधुमेह आता ग्रामीण रहिवाशांनाही प्रभावित करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना नियमित औषधोपचार घेणे परवडत नाही. जागतिक आरोग्य अंदाजानुसार, भारतात १० कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. देशातील प्रौढ मृत्यूंपैकी एक टक्का मृत्यू मधुमेहाच्या रुग्णांचे आहेत. जरी हा आजार थेट प्राणघातक नसला तरी, तो हृदय, डोळे, मूत्रपिंड, पक्षाघात आणि नसा यांना नुकसान पोहोचवू शकतो, ज्यामुळे हळूहळू व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. शर्मा म्हणाले की, आहार, संयम आणि नियमित व्यायामाने मधुमेह बरा होऊ शकतो. हा एक असा आजार आहे जो आयुष्यभराचा सोबती बनतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, हा एक असा जीवनसाथी बनतो जो एकदा जडला की मृत्यूपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहतो. जागतिक स्तरावर, दर नऊ सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि प्रौढांमधील प्रत्येक अकरा मृत्यूंपैकी एका मृत्यूसाठी मधुमेह जबाबदार असतो. २०२५ पर्यंत, १३% लोकसंख्या मधुमेहाने बाधित होईल. गेल्या २५ वर्षांत मधुमेह असलेल्या लोकांची संख्या तिप्पट झाल्याचा अंदाज आहे. पूर्वी हा आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळत असे आणि आता तरुण लोकही मधुमेहाने ग्रस्त होत आहेत, ज्यामुळे देशासमोर एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सरकारने मधुमेही रुग्णांसाठी नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि उपचारांची योजना राबवली पाहिजे. जेणेकरून मधुमेही रुग्णांना महागडी औषधे खरेदी करण्यापासून दिलासा मिळेल आणि त्यांना निरोगी जीवन जगण्याची संधी मिळेल.
००००००००

ठाणे- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमात योअया वतीनेग मार्गदर्शक प्रविण धुरी आणि मनोज पटेल तसेच अॅथलेटिक प्रशिक्षण योजनेतील योग प्रशिक्षक मंगला देवरुखकर व डॉ. सुधीर देवरुखकर यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करून सहभागींकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला.
योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतो आणि जीवनशैली अधिक संतुलित व सकारात्मक बनते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले. या कार्यक्रमास ठाणे महापालिकेच्या कबड्डी व क्रिकेट संघातील खेळाडू, ॲथलेटिक प्रशिक्षण योजनेतील खेळाडू, योजना प्रमुख अशोक आहेर, राजेंद्र मयेकर, क्रीडा समन्वयक बरकडे  तसेच क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
००००००००
नगरसेवक अभिजीत पवार यांच्या योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अनिल ठाणेकर
ठाणे, कळवा परिसरातील पारसिक नगर येथे नगरसेवक अभिजीत पवार यांच्या माध्यमातून नागरिकांसोबत योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नागरिक उपस्थित होते
माणसाचे शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे माणूस त्रस्त आहे बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मानव देत असून यावर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या योग शिबिरात कळवा पारसिक नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या योग शिबिरात नागरिकांना विविध योगासनांचे धडे देण्यात आले. प्रत्येक योगासनाचे शरीरासाठी असणारे फायदे देखील नागरिकांना पटवून देण्यात आले. योगा फक्त योग दिना दिवशी न करता दैनंदिन जीवनात देखील योगासन करावे असे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले.

– स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिर
मुंबई :   आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिक सहाय्यक केंद्र संचलीत ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळातर्फे झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ ट्रॉफी योग शिबिरात शालेय लहान गटात श्रेयस जायभाये तर मोठ्या गटात रितू जगताप यांनी सर्वोत्तम योग शिबिरार्थीचा पुरस्कार पटकाविला. विजेत्यांना आकर्षक चषक व भेटवस्तू पुरस्कार स्वरुपात देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, केंद्राचे सचिव सुर्यकांत कोरे व मुख्याध्यापक महेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने शालेय १३९ मुलामुलींच्या सहभागाने झालेल्या योग शिबिरात लहान गटात काव्या म्हसकर द्वितीय व अर्णव कांबळे तृतीय तर मोठ्या गटात यश पोकळे द्वितीय व छायांक उघडे तृतीय पुरस्कार विजेते ठरले. प्रमुख पाहुणे लीलाधर चव्हाण यांनी शारीरिक तंदुरुस्ती व मनशांतीसाठी योग उपयुक्त असल्याचे सांगितले तर सचिव सुर्यकांत कोरे यांनी शास्त्रोक्त पध्दतीने प्रमुख योगासने करून घेत खुलासेवार माहिती दिली. वृषाली सावर्डेकर, संचित बुरुंगळे, संजय बर्गे, प्रवीण शिंदे, तानाजी खाडे, मनीषा पुराडकर आदी शिक्षक मंडळींनी योग शिबीर यशस्वी केले.
०००००००००

महेंद्रशेठ घरत यांचे बॅडमिंटनसाठी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व
उलवे, ता. २० : “महेंद्रशेठ घरत हे गेली अनेक वर्षे कामगारांसाठी उत्तम काम करीत आहेत. आता तर जागतिक पातळीवर कामगारांच्या हक्कासाठी लढतोय. त्याने उत्तम फिटनेस राखली आहे, तो साठीतही तरुणच असेल, एवढी त्याने व्यायामाने तब्बेत सांभाळली आहे. त्याला खेळाची आणि खेळण्याचीही आवड आहे. त्यामुळे खेळाडूंना तो नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. त्याने अनेक चांगले गुण आत्मसात केलेत. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्याचे भरीव योगदान आहे, याची मला जाण आहे,” असे माजी खासदार रामशेठ ठाकूर गुरुवारी म्हणाले.
योनेक्स-सनराईझ रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी १६ ते १८ जून रोजी घेण्यात आली. त्याच्या पारितोषिक वितरणप्रसंगी रामशेठ ठाकूर बोलत होते. बॅटमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडने याचे आयोजन केले होते. यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे प्रायोजक होते. त्यांनी अडीच लाख रुपयांचे प्रायोजकत्व स्विकारले होते.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे देशात अव्वल असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे सर्वाधिक मोठे देणगीदार आहेत. त्यांनी आपले सासरे दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावे शिक्षण संस्था सुरू करून उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणाऱ्या शाळा सुरू केल्या आहेत. उच्च गुणवत्ता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, या कामात मी सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे. १०० कोटींच्या घरात त्यांनी त्यासाठी खर्च केले आहेत, जेणेकरून खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील. आज देशभरातून उलवे नोडमध्ये नागरिक राहायला आलेत, त्यांना आणि त्यांच्या मुलांना या स्टेडियमचा चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे येथील खेळाडू येत्या काळात जागतिक पातळीवर चमकतील, असा मला ठाम विश्वास आहे. येथील बॅडमिंटन खेळाडूंना सहकार्य करीत आलो आहे, यापुढेही करणार आहे.”
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला.
१८४ खेळाडूंनी २५ गटांमध्ये २६३ प्रवेशिका पाठविल्या. स्पर्धा मुले व मुलींसाठी एकेरी आणि दुहेरी प्रकारात ९ वर्षांखालील, ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि खुला गट अशा विविध वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, वाय. टी. देशमुख, साईकुमार जी., माताप्रसाद त्यागी हे विशेष उपस्थित होते. या प्रसंगी रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना सुमारे ३ लाखांची रोख बक्षिसे व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. याशिवाय, मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 मागील सात – आठ वर्षांच्या कालावधीत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची चौकशी करण्याची केली मागणी
ठाणे : मागील आठ वर्षांच्या कालावधीत रायला देवी तलाव आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण या तलाव आणि परिसराची सध्याची परिस्थिती पाहता महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे झिरपला आहे असा सवाल समाजसेवक आणि स्थानिक नागरिक नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. पाण्यासारखा पैसा खर्चूनही रायला देवी तलाव आणि परिसराची बकाल अवस्था का आहे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून संबंधिंतावरी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिवराळे यांनी केली आहे.
यासंदर्भात नरेंद्र (रवी) हिवराळे म्हणाले, तलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेने २०१९साली सुमारे साडे दहा कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्यात तलावाची खोली वाढवण्याबरोबर तिथे संरक्षक भिंत बांधण्याची अट होती. पण  न्यायालयीन आदेशामुळे सिमेंट काँक्रिटची भिंतीच्या ऐवजी गॅबियन वॉल बांधण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला.  त्यानुसार   तलावाची रुंदी कमी करून केवळ  केवळ अडीच बाजूला गॅबियन वॉल बांधण्यात आली. याशिवाय तलावाची खोली वाढवण्यासाठी मोठे पंप लावून त्यातील पाण्याचा उपसा करण्यात आला. हा उपसा करत असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे तिथे असणारे जलचर, भारतीय प्रजातीची कासवं मरण पावलीत. याशिवाय तलावाची सध्याची परिस्थिती पाहता त्याठिकाणी तलावाची खोली किती वाढवण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या तलावात कुठल्याही प्रकारचे पक्के बांधकाम करू नयेत असे स्पष्ट निर्देश असताना त्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम केलेले पहायला मिळते. या कामासाठीही नंतर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोप नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केला.  अर्धवट सुशोभीकरणामुळे तलावाच्या उत्तर दिशेला रानटी झुडपं उगवली असून त्याठिकाणी कुठल्याही वेळेला प्रेमी युगल बसलेली आढळतात. याशिवाय पश्चिम बाजूला उत्तर भारतीय.  नागरिकांच्या छट पूजेकरता तात्पुरत्या छोटे पाण्याचे हौद तयार करण्यासाठी विटा आणि भुसा वापरण्यात आला होता. आता एवढे दिवस उलटून गेल्यावरही त्याठिकाणी तो भुसा तसाच पडून असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपोळलकर यांच्या कडे केली होती. ही मागणी जरी रास्त असली तरी त्याठिकाणी केवळ एकच सुरक्षा चौकी बांधण्यात आली आहे. तलावाचा एकूण परिसर पाहता त्याठिकाणी किमान पाच ते सहा सुरक्षा चौकींची आवश्यकता असल्याचे नरेंद्र मोदींनी (रवी) हिवराळे यांनी सांगितले. तलावाची सध्याची बकाल अवस्था पाहता अमृत योजनेच्या माध्यमातून मिळालेले चार कोटी रुपये, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नागपूरच्या कंत्राटदाराने कुठे खर्च झाला याची चौकशी करावी अशी आग्रही मागणी नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केली आहे. मागील आठ वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही बकाल अवस्थेत असलेला रायला देवी तलाव आणि परिसर सर्वसामान्यांसाठी केव्हा खुला होणार असा सवाल नरेंद्र ( रवी) हिवराळे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई: फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सूर्यनमस्कार चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला देशभरातून तसेच परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष. सूर्यनमस्कार चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. सहभागींनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून त्यांचे फोटो व व्हिडिओ विशेष योग दिन ग्रुपमध्ये अपलोड केले. देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून योग व फिटनेसप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शविली. चॅलेंजमधील सहभागींचा गौरव करण्यासाठी योग दिन कार्यक्रमात त्यांना पदके प्रदान करण्यात आली.
अंधेरीच्या शहीद हेमंत करकरे उद्यान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहाटेपासूनच ३०० हून अधिक योगप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात फिटनेस प्रशिक्षक  संतोष पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्म-अप सत्राने झाली. त्यानंतर डॉ. अवनी कनाकिया यांनी योगसत्राचे नेतृत्व केले. त्यांना योग प्रशिक्षक अनिता आणि राजेश यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत सहभागींचे मार्गदर्शन केले.  या प्रसंगी डॉ. अवनी कनाकिया लिखित “द डिजिटल पाथ टू इनर पिस: इंटिग्रेटिंग योगा अँड टेक्नॉलॉजी इन मॉडर्न एज्युकेशन” या पुस्तकाचे The Digital Path to Inner Peace – Integrating Yoga and Technology in Modern Education” या पुस्तकाचे प्रकाशन डॅनियल वाझ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचाही उल्लेखनीय सहभाग होता. आर.सी.मारुती हायस्कूल, अंधेरी आणि फार्मा अकॅडमी, गोरेगाव या शाळांनी सहभाग नोंदविला. आर.सी. मारुती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले तसेच आकर्षक योग पिरॅमिड शो सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. फिटनेस फ्रायडे क्लबच्या कोअर कमिटी सदस्यांचे नियोजन, समन्वय आणि अथक परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाची मदत झाली.

रमेश औताडे
मुंबई : मैत्रीबोध परिवाराने शांतिक्षेत्र प्रेमगिरी आश्रम, कर्जत येथे एका अनोख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून भारताच्या सभ्यतागत आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. या विचाराला अधिक बळ देण्यासाठी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत हे कार्यक्रमाला उपस्थित होते.  या प्रसंगी  गोपाल कृष्ण अग्रवाल, आमदार  महेंद्र सदाशिव थोरवे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे  योगाचा अनुभव केवळ आसने आणि शारीरिक व्यायाम यापुरता मर्यादित न राहता, शरीर, मन आणि चेतना यांच्या एकात्मतेच्या रूपात घेता आला.
कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणण्यासाठी गणेश वंदना तसेच भारताची प्राचीन योगिक कला असलेल्या मल्लखांबाचे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. मल्लखांब ही शक्ती, लवचिकता, संतुलन आणि शिस्त विकसित करणारी भारतीय परंपरेतील एक अद्वितीय कला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *