
आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत
उलवा : कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी शानदार उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. “महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे,” असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे.”
या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला.
यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.

अंथरुणाला खिळलेल्यांसाठीही विशेष सेवा
रमेश औताडे
मुंबई : वाढते शहरीकरण, तुटत चाललेली संयुक्त कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकोट येथे उभारण्यात आलेला “सद्भावना वृद्धाश्रम” अनेक निराधार वृद्धांसाठी आशेचा किरण ठरत आहे. “जगातील सर्वात मोठा वृद्धाश्रम” असा दावा करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये निराधार, आजारी, अंथरुणाला खिळलेले तसेच कर्करोग आणि कोमाग्रस्त वृद्धांना पूर्णपणे मोफत निवारा, वैद्यकीय उपचार आणि मानवी आधार दिला जात आहे. विनुभाई बघुभाई नारोळा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या वृद्धाश्रमात वृद्धांना केवळ राहण्याची सोय नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली जात आहे. तब्बल ४०० खाटांची व्यवस्था असलेल्या या प्रकल्पात सध्या ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक राहत असून, अनेक वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणुसकीचा आधार मिळत आहे.
वृद्धाश्रमामध्ये नियमित आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, मानसिक समुपदेशन, पौष्टिक आहार, औषधोपचार आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. कर्करोग आणि कोमामध्ये असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार, वृद्धाश्रमात धर्म, जात, भाषा किंवा आर्थिक स्थिती न पाहता गरजू वृद्धांना प्रवेश दिला जातो. “प्रत्येक वृद्धाला कुटुंबासारखी वागणूक मिळाली पाहिजे,” या भावनेतून संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे.
या परिसरात मोठे सभागृह, वाचनालय, आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी जागा तसेच विरंगुळ्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वृद्धांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. समाजातील नागरिकांनी निराधार, असहाय्य किंवा अंथरुणाला खिळलेले वृद्ध आढळल्यास त्यांना सद्भावना वृद्धाश्रमात आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. “कोणीही वृद्ध एकटा राहू नये,” हा संदेश देत हा प्रकल्प सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगीधाम चौक ते सिटी पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे काम सुरु असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी शिवसेना नगरसेविका अनघा देवळेकर यांनी अधिकारी आणि,कार्यकर्ता सह पाहणी दौरा शनिवारी केला. योगीधाम चौक ते सिटिपार्क रस्त्या दरम्यान डांबरी करणाचा रस्ता होता. पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होत होती. या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा गटारे सुविधा होण्यासाठी नगरसेविका अनघा देळेकर यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कडू पाठपुरावा करीत सुमारे ८० लक्ष रू. निधी उपलब्ध करून संदर्भात रस्त्याचा कायापालट करून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी संदर्भीत रस्त्याचे विकास काम मार्गी लावले.
पावसाळ्यापूर्वी संदर्भीत रस्त्याचे काँक्रीटीकरण, दुतर्फा गटारे काम, तसंच रस्त्याखालील जलवाहिनी शफिटिंग काम या बाबत शनिवारी कार्यकर्ते, नागरिक यासह पाहणी करत ठेकेदाराला पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटारे काम पुर्ण करण्याच्या सूचित केले. या प्रसंगी केडीएमसी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप तांबे देखील उपस्थितीत राहत त्यांनी या कामाचा आढावा घेत ७ जून पूर्वी संदर्भीत रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे गटाराचे काम पूर्ण होईल असे यानिमित्ताने सांगितले.
नगरसेविका नम्रता कोळी यांची लक्षवेधी
ठाणे : गावदेवी मंडईतील आगीच्या पार्श्वभूमीवर ठाणे अग्निशमन दलातील सुविधा व क्षमता आणि शहरातील सरकारी व महापालिकेच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेबाबत भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे लक्षवेधी सूचना सादर केली आहे. तसेच आगामी महासभेत चर्चा करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे.
गावदेवी मंडईतील दुर्घटनेत अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी व एका सुरक्षारक्षकाला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर गावदेवी मंडईत आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन सुविधा नसल्याचे लक्षात आले होते. ठाणे शहरात वेगाने नागरीकरण होत असून बहुमजली इमारतींचे जाळे निर्माण झाले आहे. या परिस्थितीत ठाणे अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता आहे. एकीकडे अग्निशमन दलात अनेक पदे रिक्त असताना, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलावर ताण येत आहे. बदलत्या काळानुसार आग लवकर आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल सुसज्ज असण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीकोनातून महासभेत चर्चा करावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे.
गावदेवी मंडईतील दुर्घटनेनंतर महापालिका मुख्यालयासह इतर कार्यालयीन संकुले, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व महापालिकेची इतर रुग्णालये, आरोग्य केंद्रे, शहरातील इतर सर्व भाजी मंडई आणि विविध इमारतींमधील फायर सुरक्षांचा आढावा घ्यावा. महापालिकेच्या प्रत्येक संकुलाचे फायर ऑडिट करणे गरजे आहे. त्यादृष्टीकोनातूनही लक्षवेधी सूचनेवर चर्चा करावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

३४वी एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा
मुंबई : ठाणे केंद्राचा झंझावात पहिल्या डावात १३८ धावांवर रोखल्यानंतर चर्चगेट केंद्राने ७ बाद ३७० धावांचा डोंगर उभा करत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. माटुंग्यातील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, आरूष कोल्हेने केलेली १६३ धावांची शानदार खेळी चर्चगेट केंद्राच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.
प्रथम फलंदाजी करताना ठाणे केंद्राचा पहिला डाव पहिल्या दिवशी १३८ धावांत आटोपला. प्रत्युत्तरादाखल, चर्चगेट केंद्राने दुसऱ्या दिवशी रविवारी १२४ षटकांत ७ बाद ३७० धावा उभारल्या. आरूष कोल्हेने अप्रतिम १६३ धावा करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. चर्चगेट केंद्राच्या विजयात निखिल गुरव (७७) आणि शार्दुल फागरे (६८) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. उत्कृष्ट खेळीबद्दल आरूष कोल्हे याला अंतिम फेरीतील सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, १९९१मध्ये कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत वासिम जाफर हा खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव उन्मेष खानविलकर तसेच एलआयसीचे प्रादेशिक व्यवस्थापक आय. प्रभाकरन उपस्थित होते.
धावफलक :
ठाणे केंद्र : ३५.१ षटकांत सर्वबाद १३८ धावा
(पार्थ राणे ४६, अथर्व गावडे ३०; जय म्हात्रे ३/१६, निखिल गुरव ३/२७)
पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध
वि. चर्चगेट केंद्र : १२४ षटकांत ७ बाद ३७० धावा
(शार्दुल फागरे ६८, आरुष कोल्हे १६३, निखिल गुरव ७७)
—
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी :
अंतिम सामनावीर : आरूष कोल्हे (चर्चगेट केंद्र)
सर्वोत्तम फलंदाज : शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र)
सर्वोत्तम गोलंदाज : राजवीर लाड (एमसीए अकादमी केंद्र)
सर्वोत्तम यष्टिरक्षक : तन्मय मालुसरे (ठाणे केंद्र)
उदयोन्मुख वेगवान गोलंदाज : आरव सेठी (वाशी केंद्र)
उदयोन्मुख खेळाडू : जय म्हात्रे (चर्चगेट केंद्र)
उदयोन्मुख फलंदाज : शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र)
हॅट्ट्रिक हिरो : श्लोक यादव (घाटकोपर केंद्र)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आरुष कोल्हे (चर्चगेट केंद्र)
व्ही. व्ही. करमरकर पुरस्कार : शरद कद्रेकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)
000000
सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची माहिती
अशोक गायकवाड
अलिबाग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अध्यादेश २०२१ च्या अनुषंगाने राज्याच्या सागरी क्षेत्रात यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी दिली.
या ६१ दिवसांच्या पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता सर्व मच्छिमारांनी घ्यावी, असे आवाहन संजय पाटील यांनी केले आहे. बंदी कालावधीत कायद्याचा भंग करून मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर बंदी ही केवळ यंत्रचलित व यांत्रिक नौकांना लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू होणार नाही. सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांनी १ जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक असून ३१ जुलैपूर्वी समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही.
राज्याच्या सागरी जलधि क्षेत्रात, म्हणजे किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत, बंदी कालावधीत मासेमारी करताना कोणतीही नौका आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका, मासेमारी साहित्य आणि मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम १७ नुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.
पावसाळी बंदी काळात मासेमारी करणाऱ्या नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नसल्याचेही संजय पाटील यांनी सांगितले. या काळात राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी नौकांच्या अवागमनासही प्रतिबंध राहणार आहे.
सर्व मच्छिमार सहकारी संस्था, नौकामालक आणि सभासदांनी नियमांचे पालन करून बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अलिबाग कोळीवाडा, बंदर रोड, कस्टम हाऊसजवळ, अलिबाग येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२९५२२१ वर संपर्क करावा, असेही संजय पाटील यांनी सांगितले.
००००००
मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात व्यायामप्रेमी स्व. रामचंद्र कडवे स्मृती फोर स्टेशन मशीनसह सुसज्ज व्यायामशाळेचे शानदार उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते व्यायामप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. याप्रसंगी बाल गोपाळ मंडळाचे अध्यक्ष सुनिल नागवेकर, सल्लागार तुळशीराम नाकते, व्यायाम प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त नवोदित युवा व्यायामपटूंसाठी जोर व बैठका व्यायाम प्रकारांच्या स्पर्धा देखील २७ मेपर्यंत होणार आहेत. व्यायामशाळा उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभत असल्यामुळे कामगार विभागातील युवकांना नाममात्र फी द्वारे व्यायामाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत.
गेली अनेक वर्षे सामाजिक व क्रीडा बांधिलकी जोपासणाऱ्या बाल गोपाळ मित्र मंडळाने युवकांना मोबाईलच्या विळख्यातून सोडविण्यासाठी भविष्यामध्ये विविध समाजोपयोगी क्रीडा उपक्रम आयडियल ग्रुप सहकार्याने राबविण्याचे ठरविले आहे. युवकांना व्यायामाची आवड निर्माण करून देण्यासाठी गणेशोत्सवात नवोदितांची शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच विविध व्यायाम उपक्रम साकारण्यात येणार आहेत. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या मार्फत बाल गोपाळ कॅरम विभाग पुढील महिन्यात सुरु होणार आहे. परिसरातील शालेय खेळाडूंना चँम्पियन कॅरम बोर्डवर सराव मिळणार असल्यामुळे डीएसओ कॅरम स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मंडळाचे पदाधिकारी बळीराम सावळे, प्रवीण शिंदे, अनिल सावळे, सचिन शिंदे, विजय चिले, नरेश शिगवण, दत्ताराम पवार, विलास बेलोसे, सुरेश बांडागळे, संजय तळेकर, विश्वास चांदे, चंदन यादव आदी मंडळी उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.
०००००००००

मुंबई, २४ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लबमध्ये सोमवारपासून खेळल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेसाठी (२०२६) उत्तराखंडचा अंश त्रिपाठी आणि महाराष्ट्राची निरुपमा दुबे यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला मुख्य ड्रॉमध्ये अव्वल मानांकन (सीडिंग) देण्यात आले आहे. पुरुष गटात टॉप सीडेड खेळाडूंमध्ये २० वर्षीय अंशनंतर मध्य प्रदेशच्या आदर्श बंदोडा तर महिला गटात निरुपमा हिच्या नंतर तामिळनाडूची पूजा अर्थी आर. आहे.
सहा दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील ५५८ खेळाडू सहभागी झाले असून पुरुष, महिला, मुले आणि मुली अशा विविध १६ प्रकारांमध्ये स्पर्धा होईल. या स्क्वॉश स्पर्धेने प्रस्थापित खेळाडूंसोबतच भारतातील काही उदयोन्मुख स्क्वॉश खेळाडूंची प्रतिभा पाहायला मिळेल, असे आयोजकांना वाटते. वांद्रे पश्चिम येथील ऑटर्स क्लबच्या स्क्वॉश कोर्टवर आठवडाभर सामने खेळले जातील.
नामांकन (सीडिंग्स): पुरुष गट: १.अंश त्रिपाठी (उत्तराखंड), २. आदर्श बंदोडा (मध्य प्रदेश), ३/४. मोहित भट्ट (महाराष्ट्र), ३/४. संदेश पीआर (तामिळनाडू).
महिला: १. निरुपमा दुबे (महाराष्ट्र), २. पूजा अर्थी आर. (तामिळनाडू), ३/४. अनिका दुबे (महाराष्ट्र), ३/४. राणी गुप्ता (महाराष्ट्र).
१९ वर्षाखालील मुले: १. रचित शहा (महाराष्ट्र), २. आतिक यादव (महाराष्ट्र), ३/४.. श्राविन जैन (तामिळनाडू), ३/४. दर्शिल परसरामपुरिया (तामिळनाडू).
१९ वर्षाखालील मुली: १. अनन्या नारायणन (तामिळनाडू), २. अनिका दुबे (महाराष्ट्र), ३/४. व्योमिका खंडेलवाल (महाराष्ट्र), ३/४. छवी सरन (राजस्थान).
00000000
