मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नीचा आरोप
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी प्रताप चौधरी यांची त्यांच्याच घराजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर आता मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी थेट महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळेच आपल्या पतीचा जीव गेला असून, महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आपले पती आज जिवंत असते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी नेहा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवत या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात राहणारे प्रताप चौधरी यांची त्यांच्या राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य आरोपी रोहित शेलार याला अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद नसून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिलेली तक्रार कारणीभूत असल्याचे मृताच्या पत्नीने समोर आणले आहे.
परिसरातील संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी केडीएमसीकडे अधिकृतपणे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने आजतागायत त्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महापालिकेने वेळेत दखल घेऊन ते बांधकाम पाडले असते, तर आरोपींनी हे भयंकर पाऊल उचलले नसते आणि माझे कुंकू पुसले गेले नसते, असा उद्विग्न आरोप नेहा चौधरी यांनी केला आहे.
नेहा चौधरी यांनी केवळ महापालिकेवरच नाही तर पोलीस यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपी रोहित शेलार याला पोलिसांनी पकडले असले, तरी या संपूर्ण हत्येच्या कटात त्याला मदत करणारे आणि पाठीशी घालणारे इतरही अनेक चेहरे आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ एकाला पकडून तपास थांबवू नका, तर या हत्येचा कट रचणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या इतर सर्व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0000000000
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
कल्याण : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयामागे नक्की कोणते राजकारण होते, याबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला आणि काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात बोलत होते, असा दावा चव्हाण यांनी केला होता.
या राजकीय वादात आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट उडी घेतली असून सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शिंगावर घेतले आहे. मंदिराच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण बंद करा, असे सुनावत त्यांनी उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करण्याचे थेट आव्हान दिले आहे. या संपूर्ण वादामुळे भाजपामधील एका बड्या नेत्याकडे संशयाची सुई जात असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
डोंबिवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात सातत्याने बोलत होते, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर केला.
चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तो संबंधित व्यक्ती कोण आहे, याची पूर्ण माहिती रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि महायुतीतील इतर नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे. हाच धागा पकडत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या वादात थेट उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्ट करत भाजपाला थेट शिंगावर घेतले आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या नावाने सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण तात्काळ बंद झाले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. आमचे पिंपळेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून खोटे बोलणाऱ्यांचा देव नक्कीच आवाज बंद करेल, असा टोला त्यांनी लगावला.
उगीचच हवेत संशयाच्या पुड्या सोडण्यापेक्षा, मंदिराला जागा मिळू नये म्हणून उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करा, अशी ठाम मागणी राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
000000000
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – भरत गोगावले
अलिबाग, दि. १२ (प्रतिनिधी) : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा हा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा अभिमान आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी रायगडावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कामे वेळेत पूर्ण करून सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात योगदान द्यावे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंडप व्यवस्था, भोजन व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सेवा सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्ट्रेचर आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. सर्पदंशासारख्या संभाव्य घटनांचा विचार करून आवश्यक उपचार साहित्य आणि औषधे उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून आरोग्य, पाणीपुरवठा, परिवहन, विद्युत व्यवस्था, खानपान, मंडप, स्वच्छता, शौचालये, राजशिष्टाचार आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून समितीनिहाय कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे.
बैठकीत विविध समित्यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा सादर केला. तसेच कोकणकडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या नियोजनाबाबत विविध सूचना मांडल्या. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
००००००००००००
– दिव्यात बिल्डरांच्या कथित दादागिरी विरोधात नागरिकांचा संताप
दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार.राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला.पोलिस प्रशासनास कळवले,दिवा प्रभाग समिती यांना कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्तेक वर्षा पासून हिच परिस्थिती आहे.कोण बोलणार? गुंडागर्दी,हुकूमशाही सुरू आहे.माणुसकी जिवंत राहिली नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा.

मुंबईला पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भिती
अविनाश उबाळे
ठाणे : कडक ऊन्हाळा वातावरणातील प्रचंड तापमान व पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणी पातळी ही पुर्णपणे खालावली आहे.धरणातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने भातसा तलावातील डोंगर,टेकड्या आता जलाशयातील पाण्याबाहेर डोकावू लागल्या आहेत.जून महिना उजाडला तरी अद्यापही पाऊस पडत नाही यंदा मान्सून लांबत असल्याचे चित्र दिसत आहे.पाऊस असाच लांबला गेला तर मग मात्र पुढील काळात पाणीकपातीला मुंबईला तोंड द्यावे लागेल अशी एकंदरीत परिस्थिती भातसा जलाशयाच्या पाणी पातळीवरुन दिसून येत सध्या धरणात केवळ २९.४५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जलाशयातील पाणी आटत चाल्याने पुढील काळात पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भीती आहे.सध्यास्थिती धरणातून मुंबई व ठाणे शहरासाठी पाणीपुरवठा महापालिकांच्या मागणीनुसार सुरु असून सध्या सिंचनासाठी सोडण्यात येणारे भातसा उजवा कालव्याचे पाणी देखील बंद करण्यात आलेले आहे.तर जलाशयावरील १५ मेगाव्हॅट वीज केंद्र ही बंद करण्यात आलेले आहे.मुंबईला सर्वात जास्त पाणीपुरवठा करणारे धरण म्हणून भातसा जलाशयाची ओळख आहे.भातसा तलावातील पाणी जरी कमी झालेले असले तरीही जून अखेरीपर्यंत मुंबई व ठाण्याला तलावातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे.एवढा पुरेसा पाणीसाठा भातसा धरणात शिल्लक असल्याचा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.शहापूर तालुक्यातील भातसा,तानसा, मोडकसागर,मध्यवैतरणा,धरणांतून प्रतिदिन ३ हजार ९०० एमएलडी इतके पाणी मुंबई ,व ठाणे शहरांना पुरविले जाते यात सर्वाधिक भातसा धरणातून प्रतिदीन जवळपास २२०० एमएलडी पाणी मुंबई व ठाणे महानगराला पुरविण्याची जबाबदारी भातसा जलाशयावर आहे.या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमिटर आहे.तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमिटर आहे.भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमिटर आहे.सध्यास्थितीत धरणाची पाण्याची पातळी यंदा १११.०२ मीटर इतकी आहे.तर जलाशयात उपयुक्त साठा यंदा २७७.४९५ दशलक्ष घनमीटर इतका आहे.
00000
स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन
पुणे, दि. १२ : यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता पुढील वर्षीच्या स्पर्धेला अधिक व्यापक, दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना त्यांनी स्पर्धेसाठी स्वतंत्र नियामक परिषद (गव्हर्निंग कौन्सिल) स्थापन करण्याचे निर्देश दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ चे उद्दिष्ट केवळ मागील वर्षाच्या यशाची पुनरावृत्ती करणे नसून या स्पर्धेला नवी उंची देणे आहे. पुणे हे जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनावे, युवकांना सायकलिंग सारख्या क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावे आणि पुण्याची ओळख आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील व्यापक दृष्टिकोन आहे.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे आणि विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे गतवर्षीची स्पर्धा यशस्वी झाली. अत्यंत कमी कालावधीत प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली.
आगामी स्पर्धेच्या नियोजनासाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी संस्था आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली नियामक परिषद स्थापन करण्यात यावी. या परिषदेने दरमहा बैठक घेऊन तयारीचा आढावा घ्यावा तसेच आयोजन समिती स्थापन करून प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सर्व महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनीही आर्थिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पर्धा मार्गावरील गावांमध्ये स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच इको-टुरिझमला चालना देण्यासाठी बांबूपासून तयार वस्तूंचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गतवर्षीच्या यशस्वी वाहतूक व्यवस्थापनाचा उल्लेख करत यंदा अधिक लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देताना सांगितले की, गतवर्षीच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक सायकलिंग संघटना ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’ (यूसीआय) ने स्पर्धेचा दर्जा यूसीआय २.२ वरून २.१ असा उन्नत केला आहे. यंदा स्पर्धेचे टप्पे चारवरून सहा करण्यात आले असून एकूण १,०९९ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असणार आहे. बैठकीत गतवर्षी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या विविध अंमलबजावणी यंत्रणांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
00000
सत्ताधाऱ्यांना अमित म्हात्रेंचा राजीनाम्याचा इशारा
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, परिवहन, पाणीपुरवठा, वीज, फुटपाथ आणि कचरा व्यवस्थापनासह अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारत विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करू, असा इशारा डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांनी दिला.
डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव वर्षा शिखरे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे, एकनाथ म्हात्रे, संकेत लोके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा कोणताही अंकुश राहिलेला नसल्याचा आरोप करत म्हात्रे म्हणाले की, फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षातील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाच मोर्चे काढावे लागत आहेत. महापौर स्वतः फेरीवाल्यांकडून खरेदी करत असल्याचे चित्र दिसत असल्याने सत्ताधाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी ई-बस प्रकल्प अपयशी ठरल्याचा आरोप केला. बसेससाठी पुरेशा चार्जिंग सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यांची अवस्था खराब असताना कचरा वाहतुकीसाठी छोट्या गाड्या आणल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. पॉड टॅक्सी सारख्या संकल्पनेद्वारे नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भागशाळा मैदानाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या भाजपच्या चिन्हावर आक्षेप घेत त्यांनी, सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांवर कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित फलक तातडीने हटवावेत, अन्यथा काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला.
कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत अनेक खासगी गृहसंकुले स्वतः कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे राबवत असताना त्याचे श्रेय केडीएमसी घेत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याबाबत विचारले असता, “गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे,” अशी प्रतिक्रिया देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर पक्षांतील काही पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा करत याबाबतचा अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी नमूद केले. येणाऱ्या काळात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्याबरोबरच महापालिका सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली जाईल, असेही अमित म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
000000000
– मुंबई महापौर चषक ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
मुंबई : यजमान श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेते पदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत विजेते पदाचा मान श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने अबाधित ठेवला आहे. लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी स्थानिक आमदार सना मलिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मोहिते, जयप्रकाश अग्रवाल, लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, हरिश्चंद्र गवस, हिरा मोराळे, डॉ. महेंद्र चेंबूरकर, सचिव मोहन बामणे, आंतरराष्ट्रीय पंच मंदार म्हात्रे यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. देव स्पोर्ट्स अॅकॅडमाला उपविजेते पद मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल ससाणे, सुनिल रणपिसे, योगेश पवार, रमेश सकट, सुहास यादव यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचा विजेता संघ पुढील प्रमाणे – १) वुमेन्स पेअर – विशाखा दोरगे व रूणल रणपिसे २) मेन्स पेअर – यज्ञेश भोस्तेकर व नमन महावर ३)मिक्स पेअर – भूमिका भारंबे व आदित्य दिघे ४) वुमेन्स ग्रुप – श्रद्धा मोहिते, वैदही मयेकर व साक्षी गावडे ५) मेन्स ग्रुप – दिक्षांत ससाणे, समर्थ खन्नुकर, अथर्व जानसकर, नमो उनियाल.
पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात जल अभियंत्यांकडे धाव
– डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला!
मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.
000000000
नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटनेच्या मान्यतेने कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ १० व्या श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे दि. ४ ते ६ जुलै २०२६ दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ₹१,१०,०००/- ची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली असून त्याची लिंक संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम मुदत दि. १४ जून २०२६ आहे. मुंबईतील प्रवेश महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सायं. ६ ते ८ या वेळेत स्वीकारले जातील. इतर सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंची नावे त्यांच्या जिल्हा संघटनेमार्फतच स्वीकारण्यात येतील.

दिव्यात बिल्डरांच्या कथित दादागिरी विरोधात नागरिकांचा संताप
दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार.राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला.पोलिस प्रशासनास कळवले,दिवा प्रभाग समिती यांना कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्तेक वर्षा पासून हिच परिस्थिती आहे.कोण बोलणार? गुंडागर्दी,हुकूमशाही सुरू आहे.माणुसकी जिवंत राहिली नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा.
