
उल्हासनगर महापालिकेवर दिव्यांगांचा भव्य मोर्चा
आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी
दिव्यांग बांधवांना पालिकेत प्रवेश नकारल्याने तणावाचे वातावरण
उल्हासनगर : महापालिकेला अनेक वेळा आपल्या विविध मागण्याचे निवेदन देऊनही पालिका या मागण्या पूर्ण करत नसल्याने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी महापालिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिव्यांग बांधवांना मुख्यालयामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. याशिवाय पालिकेच्या समोर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यावेळी आपल्या विविध मागण्या अद्याप पर्यंत पूर्ण न केल्याने संतापलेल्या दिव्यांग बांधवांनी पालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी पालिकेच्या गेटवर चढून जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
महापालिकेवर आंदोलन करण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांशी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी संपर्क साधत पालिका आयुक्त हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याचे सांगितले. त्यावेळी आंदोलनासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध अनेक मुद्द्यांवर विषय काढत भ्रष्टाचाराचाही आरोप केला. त्यावेळी दिव्यांग बांधवांनी काही आपल्या प्रमुख मागण्या त्यावेळी उपस्थित केल्या. त्यात दिव्यांगांना ४५०० मानधन देण्यात यावे. दिव्यांगांना कंत्राटी कर्मचारी म्हणून रोजगार उपलब्ध करून द्यावा. दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत. गंभीर आजारांसाठी दिव्यांगांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. अशा मागण्या होत्या.
आपल्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी केलेल्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ झाली होती. दिव्यांग बांधवांच्या मागण्या महापालिका का पूर्ण करत नाही. वेगवेगळ्या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही का करत नाही, याशिवाय दोषींवर कारवाई का करत नाही. असे अनेक प्रश्न दिव्यांग बांधवांना पडले आहेत. निदान पालिकेने आता तरी या दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे
ठाणे जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल पाटील गेल्या चार वर्ष दिव्यागांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लढत आहेत. गेल्या चार वर्षापासून पालिकेकडे मागण्या करत आहेत. दिव्यांगाना स्वयंरोजगारांसाठी स्टॉल द्या, पण प्रत्येक वेळा वेगवेगळी कारणे दिली जातात. दिव्यांगांचा जो मूलभूत प्रश्न आहे त्यापासून त्यांना डावळला जातो. असे दिव्यांग बांधवांनी सांगितले. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी उल्हासनगर महापालिकेवर हा भव्य मोर्चा काढला होता. आमच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा आक्रमक मोर्चा उल्हासनगर महापालिकेवर काढण्यातील असा इशारा स्वप्निल पाटील यांनी दिला आहे

नाट्य प्रशिक्षण शिबिराला सुरवात
कल्याण : गुरुवार 5 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि अप्पा जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तुर्भे येथे केले आहे. या नाट्य प्रशिक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी रवी वाडकर, श्रीहरी पवळे, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, शिबिर संचालक अशोक केंद्रे, समन्वयक मच्छिंद्र पाटील उपस्थित होते. हे नाट्य प्रशिक्षण शिबिर विनामूल्य असून होतकरू कलाकारांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक ज्येष्ठ तज्ञ रंगकर्मी मार्गदर्शन करणार आहेत उपस्थित सर्व ज्येष्ठ रंगकर्मींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रसेन सोनावळे यांच्यावतीने मांडा-टिटवाळा येथे ‘अन्नदान सेवा’ उपक्रम
कल्याण : समाजसेवेचा वारसा जपत आणि वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सिद्धीविनायक अन्नछत्र मंडळ मांडा – टिटवाळा यांच्या माध्यमातून भव्य ‘अन्नदान सेवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला होता. टिटवाळा येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. शेकडो भाविकांनी आणि नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
केवळ हार-तुरे आणि अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजूंच्या पोटाला आधार देण्याच्या या भावनेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन श्री सिद्धीविनायक अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष विजय देशेकर, नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सोनवळे यांच्या वतीने अशा सामाजिक उपक्रमांतून नेहमीच जनसेवेचा प्रयत्न केला जातो, असे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी चंद्रसेन सोनावळे यांच्यावर हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत झोपड्यांविरोधात वाशी विभाग नवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व मा. अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व मा. उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
वाशीगाव परिसरातील सेक्टर-30 येथील केरला भवन समोरील भुखंडावर हाय टेन्शन वायरखालील नमुंमपा व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडपटटयांवर तोडक कारवाई करुन एकूण 150 अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, अतिक्रमण पोलीस, सुरक्षा रक्षक, मजूर व 01 जेसीबी च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
कल्याणात शिवजयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक
कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार असलेल्या जयंती निमित्त शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण नगरीत जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देवून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसेना शहर शाखेच्या वतीने चलचित्र रथांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक गणेश जाधव, जयवंत भोईर, किरण भांगले, प्रतिक पेणकर, माजी नगरसेवक सुनील वायले, अरविंद पोटे, प्रभुनाथ भोईर, नगरसेविका विजया पोटे, शालिनी वायले, डॉ. तनुजा वायले, शिवसेना पदाधिकारी देवानंद भोईर, प्रताप परदेशी आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासींचे तारपा नृत्य, झांजांचा निनाद, ढोल ताशांचा गजर, शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ, परस्त्री माते समान असे आकर्षक चित्ररथ आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत कल्याणात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. सायंकाळच्या सुमारास सरकारी विश्रामगृहापासून मिरवणुकीला सुरुवात झाली.
कल्याण शहरात चौकाचौकात शिवसेना शाखांतर्फे शिवरायांच्या पराक्रमाचे गोडवे गाणारे देखावे सजवण्यात आले होते. भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा यांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सकाळ पासूनच भगवे फेटे बांधलेले आणि भगवे झेंडे डौलाने मिरवणारे मावळे शिवाजी राजांना वंदन करत होते.
अल्पसंख्यांक आयोगावर सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करा
दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनची राज्यपालांकडे मागणी
कल्याण : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगावर घटनेप्रमाणे सर्व जाती धर्माच्या व्यतिंची नियुक्ती करण्याची मागणी दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनने राज्यपालांकडे केली असून राज्य सरकार कडून दोन महिन्यात नियुक्ती न झाल्यास या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशनचे संस्थापक नोवेल साळवे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांची नियुक्ती राज्य सरकार कडून करण्यात आली होती. ही गोष्ट एका प्रकारे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी व त्यांना ताकद देण्यासाठी उपयुक्त ठरेल. परंतु घटनेप्रमाणे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगावर अल्पसंख्यांक असलेले काही जाती धर्माच्या व्यक्तींचा समावेश न केल्यामुळे राज्य अल्पसंख्यांक आयोग पुर्ण मानले जाऊ शकत नाही. यासाठी राज्य सरकारने त्या सर्व जाती धर्माच्या व्यक्तींच्या नावाचा अल्पसंख्यांक आयोगावर समावेश करून नियुक्ती करावी जेणेकरून कुठल्याही अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होणार नाही. येत्या दोन महिन्यात अपुर्ण असलेल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला घटनेप्रमाणे पुर्ण करावेत, अन्यथा नाईलाजाने अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी आंदोलन करावा लागेल असा इशारा साळवे यांनी दिला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा
पनवेल (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त कररावली स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने रविवार दिनांक ०८ मार्च रोजी खांदा कॉलनी येथे रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन पनवेल महानरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कररावली स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ट्रस्टच्या चेअरमन महाबला शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरती मलीक लॅबच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. आरती मलिक, नगरसेविका कविता चौतमोल, कुसुम पाटील, सीता पाटील, अर्थतज्ञ शलाका सोळसे, श्वेता शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडल, श्री खांदेश्वर अय्यप्पा भक्त वृंद, कर्नाटका संघ नवीन पनवेल आणि उडुपि श्रीकृष्णा भजन मंडळ खांदा कॉलनी यांचे सहकार्य लाभणार आहे.
बदली होऊन तीन महिने लोटले तरी व्यवस्थापक कल्याण आगारातच
कल्याण : ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आगारात आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले महेश भोये यांची पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे बदली केल्याचे आदेश निघून आता तीन महिने उलटले आहेत. मात्र, ते अद्याप कामाच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नक्की वरदहस्त कोणाचा आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आगार म्हणून कल्याण आगाराकडे पाहिले जाते. सध्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत पुनर्विकासाचे काम येथे सुरू आहे. त्यामुळे काही बससेवा तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारातून किंवा जवळच्या बॅडमिंटन कोर्ट परिसरातून चालविल्या जातात. आगाराचा कारभार विठ्ठलवाडी डेपोतून सुरू असल्याने या ठिकाणचे आगार व्यवस्थापक भोये यांची आणि विठ्ठलवाडी आगाराचे व्यवस्थापक नवजोत गावडे यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. त्यामुळे गावडे यांनी भोये यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी डेपोत केक कापून आणि फटाके वाजविले. याच ठिकाणी ‘सीएनजी’ पंप असून, तिथे फटाके फोडल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेची गंभीर दखल घेत परिवहन महामंडळाने गावडे यांची बदली वेंगुर्ला येथे, तर भोये यांची बदली डहाणू येथे करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर गावडे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. मात्र, भोये यांनी आदेश येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप नवीन कार्यभार स्वीकारला नाही. ‘सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा, राज्य कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय आणि कल्याण आगारातील भोंगळ कारभार याविषयी लेखी निवेदन दिले आहे.
महामंडळात एका अधिकाऱ्याला तीन वर्षे झाली की, त्याची बदली करावी लागते; पण याला कल्याण आगारातील भोये हे अपवाद आहे. मागील ११ वर्षांपासून ते कल्याण डेपोमध्ये कार्यरत आहेत. साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, प्रभारी डेपो मॅनेजर, नियमित डेपो मॅनेजर ही सर्व पदे त्यांनी याठिकाणी भूषविली आहेत; पण बदलीच्या ठिकाणी ते का रुजू होत नाहीत, अशी चर्चा आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

आयुष बिडवईची अष्टपैलू कामगिरी
ठाणे : सामनावीर ठरलेल्या आयुष बिडवईची अष्टपैलू कामगिरी आणि आकाश जांगिडच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने मालवण कट्टा संघाचा चार गडी राखून पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात आगेकूच केली. मालवण कट्टा संघाचे २२५ धावांचे आव्हान अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने २८ व्या षटकात २२७ धावा करत पार केले.
सुरुवातीला वैभव लांडेच्या ६६ आणि अनिकेत परिहारच्या नाबाद ४६ धावांमुळे मालवण कट्टा संघाने २२५ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या ओम कांबळेने २८ आणि ऋषिकेश पवारने २५ धावांची भर टाकली. अभिषेक श्रीवास्तव आणि आयुष बिडवईने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
उत्तरादाखल आकाश जांगिडने तडाखेबंद नाबाद ८१ धावांची खेळी करत संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. फलंदाजीतही छाप पाडताना आयुषने ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भूषण पाटीलने ३२ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीतही आपली उपयुक्तता दाखवून देताना वैभव लांडे आणि ध्रुव गोठीने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक – मालवण कट्टा : ३५ षटकात ८ बाद २२५ ( वैभव लांडे ६६, अनिकेत परिहार नाबाद ४६, ओम कांबळे २८, ऋषिकेश पवार २५, अभिषेक श्रीवास्तव ७-४९-२, आयुष बिडवई ५-२९-२) पराभुत विरुद्ध अरुप्रीत टायगर्स एलएलपी: : २८ षटकात ६ बाद २२७ ( आकाश जांगिड नाबाद ८१, आयुष बिडवई ५२, भूषण पाटील ३२, वैभव लांडे ४-३०-२, ध्रुव गोठी ७-३५-२).
