मुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात ९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे याचिकाकर्ते आणि वकील एजाझ नक्वी यांनी सोमवारी ही याचिका सादर केली. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दिलेले पाच टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये कायम ठेवले होते. या निकालाला कुणाकडूनही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं नाही.
परंतु, उच्च न्यायालयाच्या या निकालाचे पालन करण्याऐवजी राज्य सरकारने आरक्षण रद्द करण्याचा मनमानी निर्णय घेतला, असे नक्वी यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, शासननिर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेवर ९ मार्च रोजी सुनावणी ठेवली.
नक्वी यांनी याचिकेत, राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने १७ फेब्रुवारी रोजी मुस्मिम आरक्षण रद्द करण्याबाबत काढलेल्या शासननिर्णयाला आव्हान दिले आहे. तसेच, सरकारचा हा निर्णय संविधानाचे उल्लंघन करणारा आणि मुस्लिम समुदायाच्या हिताच्या विरोधात असल्याचा दावाही याचिकेत केला आहे.
सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्य़ांशी म्हणजेच मुस्लिम समुदायाशी वांशिक भेदभाव करत आहे. हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामागे कोणतेही तर्कसंगत कारण नसल्याचा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे.
मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा असं अजित पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरती भेट होईल त्यावेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार म्हणाले. तसेच अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही असंही रोहित पवार म्हणाले.
अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला असं रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या.
काकी, तुमच्या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी मी तयार असेन असं आश्वासनही रोहित पवारांनी दिलं.
रोहित पवार पुढे म्हणाले की, “एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
नवी दिल्ली : राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टानं मनाई केली आहे. राज्यात आता २२ जिल्हा परिषदा आणि त्यांअतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास मनाई केली आहे.
राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या मूळ याचिकेवर सुनावणी झाली. बांठिया समितीच्या अगोदर जी स्थिती होती त्यानुसार निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती करताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली होती. काही ठिकाणी निवडणुका देखील पार पडल्या. २२ जिल्हा परिषद आणि या जिल्ह्यांमधील पंचायत समितीत आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडली गेली होती. त्यामुळं या ठिकाणच्या निवडणुका घेण्यास स्थगिती देण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगानं 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. उर्वरित 22 जिल्हा परिषदांच्या आणि उरलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : अजित पवार आणि आम्ही कधी एकत्र येऊ असं वाटलंही नव्हतं. कारण दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. दोन सकाळ अशा आपण पाहिल्या आहेत ज्यातल्या एका सकाळच्या बातमीने अजित पवारांनी सगळ्यांना धक्का दिला होता. तर दुसऱ्या सकाळच्या अपघाताच्या बातमीने अवघा महाराष्ट्र हळहळला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पित केली.
आम्ही अनपेक्षितपणे एकत्र आलो. मनात एक अढी होती. मला प्रशासनाचा अनुभव नव्हता मी मुख्यमंत्री म्हणून इथे आलो होतो. मला एक धक्का दिला होता आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बसणार हे मला अनपेक्षित होतं. पण कामकाज सुरु झालं तेव्हा मला कळलं की अजितदादांसारखा उत्तम, दिलदार सहकारी किंवा मित्र मी गमावला आहे.
लॉकडाऊन मध्ये मंत्रालय बंद होतं, अर्थचक्र थांबतं की काय असं वाटत असतानाच महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरु ठेवलं आणि कुठलीही योजना बंद पडू दिली नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रशासन चालवण्यासाठी जे कसब लागतं ते अजिदादांनी दाखवलं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
अलिकडच्या काळात अजित पवारांचं वक्तव्य होतं की ज्यांनी त्यांच्यावर ७० हजार कोटींचे घोटाळ्यांचे आरोप केले त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे. हे का सांगतोय? कारण माणूस असतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला किती बदनाम करतो. एखाद्यावर किती आरोप करायचे? त्याला आयुष्यातून उठवायचं का? यावर आपण मर्यादा ठेवली पाहिजे. त्यांच्यावर इतके आरोप झाले पण त्यांनी त्या सगळ्या आरोपांना तोंड दिलं. अजित पवार कधीही खचून गेले नाहीत. अजित पवारांच्या कामाचा अनुभव इथे बसलेल्या प्रत्येकाने घेतला आहे. त्यांना अधिकारीही वचकून असायचे. त्यांच्या आवाजात भारदस्तपणा होता, बोलतानाही बिनधास्त बोलायचे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना अडचणींत आणलं आहे हे पण आपण पाहिलं आहे कारण त्यांच्या मनात पाप नसायचं. अजित पवारांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर हा फक्त पवार कुटुंबावर नाही तर सगळ्या महाराष्ट्रावर कोसळला आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबई : “मीही अपघातात माझी दोन मुले गमावली आहेत. माझे गुरु आनंद दिघे यांनाही अपघातात गमावले. त्यामुळे अपघात अचानक जवळचा कुणी जाणे हे दुःख काय असते, मला ठाऊक आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने देवेंद्रजी आणि मी एक मित्र गमावला आहे.”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
“ज्या दिवशी दादा गेले, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नियतीसमोर ते हरले. लाखो अनुयायांना ते पोरके करून गेले. अशा शब्दात शिंदेंनी दुख व्यक्त केले.
अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता आपण गमावला आहे. त्यांच्या हातात फाईल गेली की काय कमी आहे, हे ते लगेच सांगायचे. बैठकीत साधा कागदाचा तुकडा पडला तरी चालत नसे. ते शब्द आणि वेळेला प्रचंड महत्त्व देणारे होते.” कोरोना काळात मंत्रालयात जाऊन काम करणारे ते मोजके नेते होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
मुंबई : अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख केला. “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांच्या निधनाने हीच वेळ माझ्यावर आली आहे. हा केवळ राजकीय नुकसान नाही, तर अंत:करणाला वेदना देणारी घटना आहे.” अशा शब्दात फडणवीसांनी शब्दसुमन अर्पित केले.
“आज बोलणं कुठून सुरू करावं असा प्रश्न पडतो आहे. मनात प्रचंड वादळ आहे. अधिवेशनात सहज नजर वळली की बाजूला दादा दिसायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत कितीही उशीर झाला तरी ते आपल्या जागेवर असायचे. आज ती खुर्ची रिकामी आहे, ही खंत असह्य आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले की, यंदा अजित पवार यांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता आणि पुढील वर्षी तेरावा अर्थसंकल्प सादर करून विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचले असते. “अचानक त्यांच्या जाण्याने अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली,” असे त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “कठोर निर्णय घ्यायचे असतील तर मागेपुढे न पाहणारे ते होते. वित्त विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक भाराबाबत पुनर्विचार सुचवला तेव्हाही त्यांनी ठाम भूमिका घेत मंत्रिमंडळात विषय मांडला होता.”
राजकीय पोकळीच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “आपण अनेकदा पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण अजितदादांसारखा नेता, ज्याने स्वतःचे नेतृत्व निर्माण केले, अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली, असा व्यक्ती निघून जातो तेव्हा पोकळी म्हणजे काय, याची खरी जाणीव होते.” असे फडणवीस म्हणाले.

ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत व्यासपीठ सोडून भाजपाचे उपमहापौर मैदानात
नवी मुंबईत भाजपाच्या महापौरांना शिवसेना नगरसेवकांचा घेराव, केला सभात्याग
स्वाती घोसाळकर
ठाणे : राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून महायुतीतील भाजापा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेत मजबूतीने विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली असतानाच इकडे ठाणे आणि नवी मुंबई महानगर पालिकेत मात्र नेमके उलट चित्र पहायला मिळाले. ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत व्यासपीठ सोडून भाजपाचे उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेच्या महापौरांच्या निर्णयाविरोधात मैदानात उतरल्याने एकच खळबळ माजली तर नवी मुंबईत भाजपाच्या महापौरांच्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला आणि सभात्यागही केला. एकुणच या दोन्ही घटनामुळे राज्यात दोन्ही पक्षात फारसे आलबेल नसल्याची जोरदार चर्चा होती. कारण मुंबई महानगर पालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा यांची संयुक्त आघाडी असताना भाजपाने अशी टोकाची आक्रमक भूमिका घेतल्याची नोंद नसल्याकडेही जाणकारांनी यावेळी लक्ष वेधले
ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत प्रश्नोत्तरांना बगल देत थेट विषयपत्रिका पटलावर ठेवल्याने सभागृहात भाजपा आणि शरद पवारांच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपाचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तर व्यासपीठावरून खाली उतरून सत्ताधारी शिवसेनेला जाब विचारला. तरीही प्रशासनाने कामकाज रेटुन महासभा गुंडाळली.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या पहील्याच महासभेला कलंक लागल्याच्या घोषणा भर सभेतच भाजपच्या नगरसेवकांनी दिल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे
तर उपमहापौरपदाचा राजीमान
देईन – कृष्णा पाटील
भाजप नगरसेवकांनी आज आक्रमक पवित्रा घेत आधी ४ वर्षाचा लेखाजोखा देण्याची मागणी केली. ठाणेकर नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नगरसेवकांनी मागितली. तसेच भाजप नगरसेवकांनी मांडलेली लक्षवेधी प्रशासनाने वाचून दाखवावी अशी मागणी केली. मात्र, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व समित्या गठीत झाल्यानंतर सर्व प्रश्न उत्तरे आणि लक्षवेधी घेण्यात येईल, असे सांगत विषयपत्रिका घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिका सचिव मनीष जोशी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय झटपट वाचून दाखवल्याने सत्ताधारी शिवसेनेने चर्चेविनाच तात्काळ मंजुरी दिली. यावर पुढील सभेत बोलू दिले नाही, तर उपमहापौर पदाचा राजीनामा देईल, असा गर्भित इशारा यावेळी कृष्णा पाटील यांनी दिला आहे.
परिवहन समिती सदस्य निवडीवरून
नवीमुंबई महासभेत संघर्ष
तौलनिक संख्याबळाच्या बळावर सदस्य न निवडल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नवी मुंबई महानगर पालिकेच्या महासभेत तीव्र निषेध नोंदविला. यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.
नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समितीवर १२ सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सभागृहनेते सागर नाईक यांनी तौलनिक संख्याबळाऐवजी मतदानाद्वारे सदस्य निवडीचा मुद्दा मांडला. विरोधीपक्षनेते विजय चौगुले, शिवराम पाटील, किशोर पाटकर यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतले. यानंतर ही सत्ताधारी भाजपने परिवहन सदस्यपदासाठी नावं सुचविण्यास सुरूवात केल्याने शिंदेसेनेने महापौरांचा निषेध केला.
शिंदेसेनेने महापौरांसमोर उभं राहून निषेध केला. यानंतर भाजपा नगरसेवकांनी महापौरांसमोर केला. गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली. सभा पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपाने बहुमताच्या बळावर १२ सदस्यांची निवड केली. विरोधकांचा एकही सदस्य न घेतल्यामुळे शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
फोटो ओळ १
ठाण्यात उपमहापौरांचीच महपौरांविरोधात घोषणाबाजी
फोटो ओळ १
नवी मुंबईत भाजपाविरोधात शिवसेना नगरसेवक आक्रमक

काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !
घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.
असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.
पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.
एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.
आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं.
मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल‘चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…

अश्रुं अनावर… शब्द गहीवरले…
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला. अजित दादांच्या वरळीतील डोममधिल श्रद्धांजली सभेत राज्यभरातील दिग्गज मान्यवरांनी दादांना श्रद्धांजली वाहीली. यावेळी दादांच्या आठवणीने सभागृहात अश्रुं अनावर झाले होते अन् शब्दही गहीवरून गेले होते..
