भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी आता दोन शिफ्टमध्ये सुरू

कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांचे विशेष प्रयत्न
कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज शनिवारपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारा त्रास यामुळे ही मागणी अधिक जोर धरत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे.
तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३० ️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५ ️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३० ️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.०० या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे.
००००००००

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए मार्फत आनंदनगर ते साकेत पर्यत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरा नगर संपकडे जाणारी ८१३ मि.मी व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी २२०० मीटरपैकी ८०० मीटर अंतरापर्यत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. ८०० मीटर अंतरापर्यत अस्तित्वातील ८१३ मि.मी व्यासाची जलवाहिनी निकामी करुन नव्याने अंथरण्यात आलेली ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्व‍ित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. सदर कामाकरिता शुक्रवार १२ जून रोजी सकाळी ९.०० ते शनिवार १३ जून रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नं. २,३, व ४, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी.तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपरुवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

सय्यद आफरीन यांचा भाजपला प्रश्न
मिरा -भाईंदर :
काशीमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या दुसऱ्या भावाचे नावही तक्रारीत समोर आले आहे.
या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन म्हणाल्या की, “महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समितीच्या सभापतींच्या निकटवर्तीयांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिला व बालकल्याण समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी आणि समितीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सभापतींनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.”
तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे.

अविनाश उबाळे
ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे.
गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
०००००००००००
००००००००

 २४ जण पोलिसांच्या ताब्यात, ५६  हजार ६५  रुपयांची रोकड जमा
ठाणे :शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे , मटके  आदी अवैद्य बाबींचा  सुळसुळाट वाढला असल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीणचे) डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे शहापुरातील  स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून शहापूर शहरातील सावंत विहार,कोकणी स्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार ६५ रुपये  रोख व जुगार खेळण्याचे साहित्य तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहापूर तालुक्यातील कसारा,किन्हवली,वाशिंद, शहापूर आदी पोलीस ठाण्याच्य हद्दीत बेकायदेशीर धंदे तसेच अवैध भंगार व्यवसाय देखील वाढले असल्याचे दिसून येत आहेत. जुगार व मटके यांना शालेय विद्यार्थी बळी पडत आहेत. या सर्व गोष्टींचा शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरच्या कारवाईत ठाणे पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस उपनिरीक्षक निरंजन पाटील, पोलीस शिपाई सचिन बोडके, एस.एस.गायकवाड, आर.टी.निवांगुने, आर. एस. मस्करे, एम.आर.तडवी, चालक पोलीस शिपाई ए.पी. हिलगुडे आदींच्या सहभाग होता. तालुक्यातील बेकायदेशीर धंदे कायमचे बंद करण्याचे काम पोलिसांनी हाती घ्यावे अशी जनतेची मागणी आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या  खाजगीकरणाच्या धोरणानुसार मुंबई पोर्ट प्रशासनाने २१ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावानुसार जून २०२६ पासून इंदिरा गोदीचे दोन भाग करून ते १० वर्षांसाठी दोन खाजगी कंपन्यांना संचालन व  दखभालीसाठी (O&M) देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविरुद्ध मुंबई बंदरातील सर्व कामगार संघटनांनी बुधवारी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालयसमोर तीव्र निदर्शने केली.
या खाजगीकरणामुळे  इंदिरा गोदीतील माल हाताळणी व गोदाम व्यवस्थापनाचे काम पूर्णपणे जे. एम. बक्षी आणि एम. दिनशॉ या  खाजगी  कंपन्यांकडे दिले जाणार आहे. भविष्यात इंदिरा गोदीतील कोणत्याही गोदामात मुंबई पोर्टचा कर्मचारी कार्यरत राहणार नाही.
मुंबई पोर्टचा महत्वाचा धंदा आयात-निर्यात असून, या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खाजगी कंपन्यांकडे जाईल, तर मुंबई पोर्टला केवळ नाममात्र रॉयल्टी मिळेल. केंद्र सरकारने अनेक वर्षांपासून कामगार भरतीवर बंदी घातली आहे. आता माल हाताळण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. हे कारण पुढे करून इंदिरा गोदी खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात येत आहे.  आज संचालन व देखभाल ( ऑपरेशन आणि मेंटेनन्स )  या मार्गाने उद्या पूर्ण खाजगीकरण करण्याचे धोरण आहे आणि पुढे गोदीची जमीन बिल्डरांच्या घशात जाण्याची शक्यता आहे.  या  गंभीर समस्येचा  प्रत्येक कामगार कर्मचाऱ्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खाजगीकरण होत असतानाही रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल, गोदामे व धक्क्यांची देखभाल, वीज व पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था, इतर मूलभूत सुविधा सर्व खर्च मुंबई पोर्टलाच करावे लागणार आहेत. मुंबई पोर्टने ३० ते ४० कोटी रुपये खर्च करून उभारलेली  गोदामे आता खाजगी कंपन्यांच्या ताब्यात दिली जाणार आहेत.   तसेच इंदिरा गोदीतील १८, १९ आणि २० क्रमांकाच्या धक्क्यांसमोरील इंदिरा गोदी निर्मितीच्यावेळी इंग्रजांनी  बांधलेला  बंधारा हटविण्यासाठी मुंबई पोर्टचे सुमारे १२५  कोटी रुपये खर्च केले जाणार  आहेत; मात्र याबदल्यात खाजगी कंपन्यांकडून कोणतीही आर्थिक भरपाई घेतली जाणार नाही.
या गंभीर विषयाबाबत  अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाने प्रमुख कामगार संघटनांशी कोणतीही सखोल चर्चा केलेली नाही. तसेच कामगार संघटनांना विश्वासात न घेता हा निर्णय पुढे ढकलला जात आहे. यांचे गंभीर परिणाम होणार असून  निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा आणि भविष्यातील कामगारांचे हक्क धोक्यात येतील. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. इंदिरा गोदीचे खाजगीकरण रोखण्यासाठी आणि कामगारांचे हक्क वाचवण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी  जोरदार घोषणा देत प्रचंड निदर्शने केली. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे अध्यक्ष  व ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के.शेट्ये, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,
ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट एस सी /एस टी अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मीनास मेंडोसा, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष बबन शिरोडकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी मानले.
०००००००००००

देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई
संयुक्त पथकाची लवकरच धडक
दिवा : बारा वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संस्थापक अमोल धनराज केंद्रे आणि मुंब्रा शहराध्यक्ष युसुफ जंगबारवाला यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करताना डॉ. प्रसाद पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी बंगाली डॉक्टर शिशिर रॉय यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एका डॉक्टरवरही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा परिसरात कार्यरत असलेल्या अन्य बोगस डॉक्टरांविरोधातही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बोगस मेडिकल दुकाने तसेच अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवरही प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोगस पॅथॉलॉजी लॅबविरोधातील कारवाईबाबत शासनाकडून आदेश अथवा पत्र प्राप्त होताच आरोग्य विभाग तातडीने पावले उचलेल, असे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिले. तसेच देवेंद्र सिंग यांच्या आई-वडिलांचे जबाब नोंदविल्यानंतर पोलीस तपास पूर्ण करून मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (एफडीए), आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून बोगस डॉक्टर, बोगस मेडिकल दुकाने आणि इतर अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने मृत देवेंद्र आशिष सिंग यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच आरोपी शिशिर रॉय यांची मालमत्ता जप्त करून ती रक्कम पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्र सिंग यांच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
०००००

नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते गौरव
दिवा: ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थी सचिन पंडित याने एसएससी परीक्षेत ९५.८० टक्के गुण मिळवत दिवा शहरात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शैलेश पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यास शाळेचे विश्वस्त महेंद्र दळवी, प्राचार्या ज्योत्स्ना सोनी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिनच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले.
मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या सचिनने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळविले. शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्याने आपल्या कुटुंबासह दिवा शहर आणि ग्लोबल इंग्लिश स्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि शाळा व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शाळा व्यवस्थापनाने सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले. सचिन पंडित याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, कठोर मेहनत, सातत्य आणि समर्पणाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
०००००००००

– आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची संकल्पना “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) ही सर्व वयोगटांतील व्यक्तींना निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. याच संकल्पनेला अनुसरून विद्यालंकार मुंबई महानगर योगासन अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,वडाळा व मुंबई शहर योगासना स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.  आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येक वयोगटासाठी योगाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. विशेषतः वाढत्या वयानुसार शरीराची लवचिकता, संतुलन, सहनशक्ती आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो.
या स्पर्धेमध्ये ७ ते १० वर्षे, १० ते १४ वर्षे, १४ ते १८ वर्षे, १८ ते २८ वर्षे, २८ ते ३५ वर्षे, ३५ ते ४५ वर्षे आणि ४५ ते ५५ वर्षे या विविध वयोगटांतील मुला-मुलींनाआणि महिला पुरुषांना  सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर,ठाणे,नवी मुंबई,पालघर,रायगड वरील विभागातील खेळाडू ह्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवू शकतात. लहान वयात योगाची सवय लागल्यास निरोगी जीवनशैलीची पायाभरणी होते, तर प्रौढ आणि ज्येष्ठ वयोगटासाठी योग आरोग्यदायी आणि सक्रिय जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग ठरतो.
या स्पर्धेचा उद्देश योगासन खेळाचा प्रसार करणे, युवकांमध्ये शिस्त व आत्मविश्वास निर्माण करणे तसेच समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे हा आहे. स्पर्धकांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार असून, त्यातून योगाच्या स्पर्धात्मक अंगालाही प्रोत्साहन मिळणार आहे.
विद्यालंकार मुंबई महानगर योगासन अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ ही केवळ स्पर्धा नसून निरोगी, सक्रिय आणि सशक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया आणि निरोगी भारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया. स्पर्धा २० जून रोजी विद्यालंकार कॅम्पस, ऑडिटोरियम, वडाळा येथे संपन्न होणार आहे.  अधिक माहितीसाठी क्रीडाशिक्षक डॉ. प्रकाश शेळके (९३२६८४६२६५) किंवा लीना पातले (८८७९२४४२२०) यांच्याकडे संपर्क साधावा.
००००

 गडकरी रंगायतन येथे होणार भव्य सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे
ठाणे : पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राम मारुती रोड, ठाणे या ऐतिहासिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा तसेच इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, ठाणे (पूर्व)च्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम सोमवार, १५ जून रोजी सकाळी ९ वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे.
सन १९२६ मध्ये संस्थापक कै. वामन नारायण भोळे यांनी सुरू केलेल्या या शाळेने गेल्या शंभर वर्षांत शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जोपासत हजारो विद्यार्थी घडवले आहेत. हे विद्यार्थी आज देश-विदेशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. “Life is Work” या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेने सातत्याने प्रगती साधली आहे.
शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २३ आंतरशालेय व संस्थेअंतर्गत स्पर्धा, भव्य रॅली, शतक महोत्सव उद्घाटन सोहळा, माहितीपट निर्मिती तसेच माजी विद्यार्थी मेळावा यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन राहणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, मनसे ठाणे-पालघर अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश जाधव, नगरसेवक सुनेश जोशी तसेच नगरसेविका मृणाल पेंडसे आणि प्रतिभा मढवी हे विशेष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शाळेच्या “१०० वर्षांचा गौरवशाली इतिहास” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास शाळेचे माजी विद्यार्थी, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *