18 March Bitambatmi All pages

Open Book

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’

२६ लाखांच्या मुद्देमालासह ४५७ सिलिंडर जप्त

हरिभाऊ लाखे

नाशिक – एलपीजी गॅसच्या टंचाईची ओरड एकिकडे होत असताना शहरात सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सातपूर औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईतून उघड झाले. यावेळी ४५७ घरगुती-व्यावसायिक सिलिंडर आणि पाच वाहने असा सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गॅस वितरकासह कर्मचारी अशा आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. महात्मानगर येथील समर्थ गॅस एजन्सीमधील हा माल आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात संशयास्पदरित्या भरले जात होते. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर तहसीलदार अमोल निकम, एचपीसीएलचे भूपेन पाटील आणि बीपीसीएलचे राजकुमार यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मोठ्या संख्येने सिलिंडरचा साठा आढळला. चाके जमिनीत रुतलेल्या आणि नादुरुस्त वाहनातही मोठ्या संख्येने सिलिंडर होते. दोन मालवाहू वाहनेही सिलेंडर भरण्यासाठी उभी होती. पथकाने कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधितांनी काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात असल्याचे मान्य केल्याचे पुरवठा विभागाने तक्रारीत म्हटले आहे.

या कारवाईत सुमारे १३ लाख रुपयांची ४५७ घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि तीन मालवाहू वाहने ताब्यात घेण्यात आली. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री केल्या प्रकरणी गॅस एजन्सीधारक हर्षल सरनाईक (वॉटरफ्रंट सोसायटी, जलालपूर) याच्यासह प्रवीण साळुंखे, समाधान सोळंकी, रवींद्र खंडाळे, सिद्धार्थ निराळे, तेजस आढळकर, प्रितम राजपूत, व्ही. प्रताप या कर्मचाऱ्यांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भेडसावत आहे. सिलिंडरचा काळा बाजार जोमाने सुरू असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले.

गोदाम, सिलेंडर वितरणाची छाननी

समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय महात्मानगरला तर गोदाम विल्होळी येथे आहे. सिलिंडरचे वितरण नियमानुसार या दोनपैकी एका ठिकाणाहून होणे अपेक्षित असते. सातपूर औद्योगिक वसाहतीत एजन्सीने वाहन नेण्याचे काहीच कारण नव्हते. महत्वाचे म्हणजे ज्या वाहनात सिलिंडर आढळली. ते नादुरुस्त आहे, त्या वाहनाची चाके जमिनीत रुतलेली आहे. सिलिंडरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांना सादर करता आल्या नाही. हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले. प्रशासनाने एचपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. संबंधित एजन्सीच्या गोदाम व कार्यालयाची सखोल तपासणी करावी. मागील १० दिवसांत संबंधितांकडे किती गॅस सिलिंडर आले आणि त्यांनी किती सिलिंडरचे वितरित केले याची छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.

समग्र शिक्षा विभागात २५ वर्षे सेवा करूनही कायम नाही

मुंबई / रमेश औताडे

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षांतर्गत गेल्या तब्बल २५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसाठीचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. राज्यातील ३३७८ कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ९ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाकडून अजूनही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

समग्र शिक्षांतर्गत गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून कंत्राटी स्वरूपात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करून कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलने, निवेदने आणि विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समितीही स्थापन केली होती.

सदर अभ्यास समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाला सकारात्मक अहवाल सादर केला. या अहवालातील “शिफारस ब” मंजूर करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी स्पष्ट भूमिका समितीने मांडली होती. मात्र, इतका स्पष्ट अहवाल असूनही शासनाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियमवर ८ ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ३००० कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. मनोहर धोडे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले होते.

मात्र आचारसंहिता संपून जवळपास एक महिना उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ९ मार्चपासून आझाद मैदानावर पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, २५ वर्षे प्रामाणिक सेवा देऊनही शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, प्रत्यक्षात मात्र न्याय दिला जात नाही. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही संघटनेचे राज्य सरचिटणीस पराग चाटेरेकर, राज्य चिटणीस विवेक राजन, राज्य कार्याध्यक्ष सुनिल दांडे आणि राज्य अध्यक्ष योगिता बलाखे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा

स्व. किसनरावांच्या दशक्रियेला केलेल्या घोषणेची अंमलबजावणी

मुंबई, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरांदळे गावच्या आदर्श कुटुंबातील  पिता कै. किसन शिवराम विश्वासराव यांच्या स्मरणार्थ  मुले सर्वश्री मारुती, रामहरी , नरहरी, डॉ. दत्ता, मुली कमल, सगुणा यांनी दशक्रिया विधीला जाहीर केलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन  देवदत्त निकम, भाजपाचे सानपाडा येथील नगरसेवक भाऊ भापकर, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रिती थोरात, पंचायत समिती सदस्या प्रियांका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. थोरांदळे गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या विश्वासराव कुटुंबियांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  या भावनेतून दशक्रिया विधीला जाहीर केलेले प्रवेशद्वाराचे काम साडेपाच महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. साडेपाच महिन्याच्या  निमित्ताने आळंदीचे ह. भ. प. श्री. गौतमनाना बेळगावकर महाराज यांची प्रवचन रुपी चांगली सेवा झाली. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गणेश यादव, डॉ.  घाडगे, डॉ. गोरडे, दत्ता हगवणे, शिवशंकर दूध डेअरीचे  चेअरमन आणि   थोरांदळे  गावातील  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टेमगिरे,  लोकनियुक्त सरपंच जे. डी.  टेमगिरे, बाळासाहेब विश्वासराव, सोपान घुले, बाळासाहेब सोपान टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बहुभाषिक चर्मकारांना संघटित करण्याचा निर्धार!
 राष्ट्रीय चर्मकार संघाचा शानदार रौप्य महोत्सव सोहळा धारावीत संपन्न

मुंबई : चांभार, ढोर, मोची, जयस्वार, रेगर, होलार, जाट, कक्कया आदी विविध जाती-पोटजातींमध्ये विखुरलेल्या चर्मकार समाजाची एकजूट घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित शक्ती सरकारसमोर उभी करण्याचा निर्धार राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार बाबुराव माने यांनी व्यक्त केला.

धारावी येथील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो चर्मकार बांधव-भगिनींच्या उपस्थितीत राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानावरून बोलताना माने यांनी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटकसह विविध राज्यांतील चर्मकार समाजातील सर्व जाती-उपजातींना एका छताखाली आणण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या संघटित शक्तीच्या बळावर शासन दरबारी अनेक वर्षे रखडलेल्या मागण्या मार्गी लावण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सबलीकरण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक भूमिहीन चर्मकारांना मोफत जमिनी मिळवून देण्यात संघटनेने पुढाकार घेतल्याचा अभिमानाने उल्लेख करताना माने म्हणाले की, गावोगावी जात-दांडगे व धन-दांडग्यांकडून बळकावलेल्या जमिनी सरकार, पोलीस व न्यायालयीन स्तरावर लढा देऊन परत मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली आहे. तसेच चर्मकार समाजातील महिलांवरील अत्याचार प्रकरणांत आरोपींना शिक्षा होईपर्यंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने लढा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांच्या चपला-बुटांची दुरुस्ती करणाऱ्या चर्मकार कामगारांना फेरीवाले ठरवून मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरातून हटवण्याच्या प्रयत्नांनाही संघटनेने विरोध केला. गेल्या पंचवीस वर्षांत सामाजिक क्षेत्रात अशा अनेक लढ्यांद्वारे संघटनेने कामगिरी बजावली असल्याचा आढावाही त्यांनी मांडला.

प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी आपल्या भाषणात चर्मकार समाजाला सामाजिक-राजकीय लढ्यासाठी तयार करण्याचे कार्य माने सातत्याने करत असल्याचे गौरवोद्गार काढले. बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाजाने एकत्र येऊन आपली ताकद दाखवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत प्रकरणे वाढू नयेत यासाठी पोलीस तसेच प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे मत अ‍ॅड. नारायणराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती

या रौप्य महोत्सवी सोहळ्यास प्रबुद्ध साठे, प्रा. विजय मोहिते, अ‍ॅड. सिद्धार्थ हत्तरकर, पांडुरंग साळवी, अक्षय आंबेडकर, निवृत्ती सावळकर, रामभाऊ कदम, परशुराम इंगोले, सूर्यकांत गवळी, विलास गोरेगावकर, जगन्नाथ खाडे, गणेश खिलारे, शारदाताई नवले, दिलीप गाडेकर, अशोक देहरे, हनुमंत सोनावणे, अरविंद जयस्वाल, अर्चना शिंदे, पायल खरे आदींसह हजारो समाजबांधव उपस्थित होते.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात

गुढी पाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली तसेच गुढीची उभारणी

(राजेंद्र साळसकर)

मुंबई – हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्यामनगर तलाव येथे भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे. यावेळी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  गुढी पाडव्याच्या दिवशी इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्याम नगर तलाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य गुढीचे सकाळी १० वाजता खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत महिला, पुरुष तसेच तरुण सहभागी होणार असून लेझीमच्या तालावर तसेच ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्यांकडून नृत्यही सादर करण्यात येणार असून सर्वोत्तम वेशभूषा करून येणाऱ्यांंना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच अनेक स्पॉट बक्षिसेही देण्यात येणार आहे.

गुढी पूजनेनंतर भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून यात लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणार विविध विधानसभा क्षेत्रातील मिळून सुमारे १०० बाईकस्वार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. ही रॅली महाकाली गुंफा, बिंद्र कॉम्प्लेस, तक्षिला, मॉडेल टाऊन, पीएमजीपी म्हाडा सर्वोदय नगर, मेघवाडी पोलीस स्टेशन, स्वामी विवेकानंद स्कूल, मेघवाडी नाका, प्रेमनगर, समर्थ नगर, ठाकूर नगर, महाराज भुवन, धोबी घाट, जोगेश्वरी स्टेशन, सदभक्ती मंदिर, सुभाष नगर, बांद्रेकर  वाडी, जेव्हीएलआर, प्रतापनगर, रामवाडी, श्यामनगर पेट्रोल पंप, ओबेरॉय स्कूल, दुर्गानगर, मातोश्री कमाल अमरोही स्टुडिओ, एमएमआरडीए कॉलनी, पूनम नगर, नमस्कार, ग्रीनफिल्ड, कल्पतरू करून इच्छापूर्ती गणेश तलाव येथे या रॅलीची समाप्ती होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून समाजातील एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात येणार असल्याचे, आयोजक मनीषा वायकर व दीप्ती वायकर पोतनीस यांनी सांगितले

उल्हासनगरमध्ये रेग्युलरायझेशन प्रक्रियेला गती देण्याची मागणी विधानसभेत

उल्हासनगर (सुनिल इंगळे )- शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारतींच्या रेग्युलरायझेशनचा महत्त्वाचा प्रश्न आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला. यावेळी आमदार कुमार आयलानी व बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील रेग्युलरायझेशन प्रक्रियेच्या मंद गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमदार कुमार आयलानी यांनी स्पष्टपणे नमूद केले की, अनेक प्रयत्नांनंतरही रेग्युलरायझेशनचे काम अपेक्षित गतीने होत नाही. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी ‘वन विंडो सिस्टम’ तसेच विशेष शिबिरांच्या माध्यमातून उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मनपामध्ये एडीटीपी (ADTP) पदाची कायमस्वरूपी नियुक्ती कधीपर्यंत होणार याबाबत निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी सतीश मिसाळ यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २००५ पूर्वीच्या बांधकामांना अधिकृत करण्यासाठी २००६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते. त्या वेळी उल्हासनगरमध्ये एकूण २२,०१३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १५,५८७ अर्ज नामंजूर करण्यात आले, तर केवळ १३८ अर्जदारांना डी-फॉर्म देऊन रेग्युलरायझेशन करण्यात आले. तसेच २०१९ मध्ये रेग्युलरायझेशनचे अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले. मात्र २०२० मध्ये कोविड-१९ महामारीमुळे ही प्रक्रिया प्रभावित झाली. त्या काळात १०० टक्के रेडी रेकनर दर लागू असल्यामुळे नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर १४ मार्च २०२४ पासून रेडी रेकनर दर १० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुमारे १ लाख ८० हजार नागरिकांना नोटिसा पाठविण्यात आल्या.सद्यस्थितीत ४४५ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ३ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत, तर १३ प्रकरणांमध्ये डी-फॉर्म देण्यात आले आहेत. उर्वरित अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आश्वासन दिले की, रेग्युलरायझेशन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व भू-अभिलेख विभाग यांच्या समन्वयातून “एक खिडकी योजना” राबविण्यात येईल. तसेच या कामात कोणत्याही अधिकाऱ्याने निष्क्रियता दाखविल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विधानसभेत उपस्थित करण्यात आलेला हा प्रश्न शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध विकास होऊन उल्हासनगर शहराला नव्या दिशेने गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची होणार पूर्तता

मुंबई :कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले.

मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गण आणि कोकणातील आमदार व सचिव स्तरावरील आणि जिल्हास्तरावरील अधिकारी यांची संयुक्तरीत्या आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,कृषी मंत्री दत्ता भरणे,खासदार नारायण राणे,खासदार सुनील तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, किरण सामंत कोकणातील सर्व आमदार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.

आंबा व काजू पिकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांची अडचण यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेली वस्तुस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने ऐकून घेतली. “कोणत्याही परिस्थितीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल,” असा ठोस  विश्वास त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे, ही नुकसानभरपाई याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासन प्रत्यक्षात यशस्वी होणार आहे.कोकणातील शेतकऱ्यांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरुन वीज वापराबाबत डोंबिवलीत गुन्हा दाखल

कल्याण: वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरता आकडे टाकून वीज वापरणाऱ्या डोंबिवलीतील एका ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील तानाजी काळूराम काठे या वीज ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आले. फेब्रुवारी-२०२६ अखेरीसची ५६४६० रूपयांची थकबाकी न भरल्याने मुख्य कार्यालयाकडून सदर ग्राहकाचा वीज पुरवठा स्वयंचलित पद्धतीने बंद करण्यात आला. वीज पुरवठा खंडित केल्यावर सदर ग्राहकाने देयकाचे पैसे न भरता मीटर बायपास करून चोरीची वीज वापरण्यास सुरुवात केली. ही बाब महावितरणच्या तपासणी पथकाला आढळून आली. या नंतर सदर ग्राहकाचा वीज पुरवठा थेट वीज खांबावरून बंद करण्यात आला. या प्रकरणी महावितरण कडून वीज ग्राहक तानाजी काठे याच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज कायदा-२००३ कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

रामबाग परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त

नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी वेधले महासभेचे लक्ष

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सोमवारी पार पडलेल्या महासभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या समस्येकडे प्रभाग क्र. ६ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.

रामबाग परिसरात सव्वाशे ते दीडशे कुत्र्यांची संख्या असून लहानमुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो लोकांना हे भटके कुत्रे चावले आहेत. या परिसरात चार शाळा, दोन महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा भागात लहान मुलं, विद्यार्थी यांची वर्दळ जास्त आहे. काही श्वानप्रेमी त्यांना कच्चे मांस खायला देत असल्याने ते अधिक आक्रमक होत आहेत. त्यामुळे त्यांचे चावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी नगरसेविका स्वनाली केणे यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान गृहिणी असलेल्या स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत जनतेच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *