4 March Bitambatmi All pages

Open Book

भारताकडे २५ दिवस

पुरेल इतका इंधनसाठा!

नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभुमिवर सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. भारतात सध्या कच्च्या तेलाचा आणि शुद्ध इंधनाचा साठा सुमारे २५ दिवस पुरेल इतका आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

“भारताकडे २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) साठा आणि २५ दिवसांचा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. तर, भारताकडे एकूण ८ आठवड्यांचा कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आहे. भारताचे केवळ ४०% कच्चे तेल ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ येते, तर उर्वरित ६०% कच्चे तेल इतर स्रोतांमधून येते. “भारत मागील करारांनुसार रशियन कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार आहे”, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

मध्यपूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेता, अधिकारी कच्च्या तेलासह एलपीजी आणि एलएनजी आयातीसाठी पर्यायी देशांच्या शोधात आहेत. तसंच, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचंही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान मोदींची फोन डिप्लोमसी

आखाती देशातील  नेत्यांना फोन

युद्धजन्य परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली  इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्ष दिवसागणित अधिक चिघळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील ८ नेत्यांना फोन करून या संघर्षाबाबत चर्चा केली आणि भारताची भूमिका स्पष्ट  केली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ तासांत ८ देशांच्या प्रमुखांची चर्चा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. कतारवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि कतारमधील भारतीय समुदायाला पाठिंबा आणि काळजी दिल्याबद्दल कतारच्या प्रमुखांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवैत आणि कतार या ८ देशांच्या प्रमुखांची संवाद साधला. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही काही देशातील समपदस्थांशी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारताने सर्व देशांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात, या प्रदेशातील परिस्थिती लक्षणीयरीत्या बिघडणे दुर्दैवी असल्याचे भारताने म्हटले आहे.

इथे मृत्यू ओशाळला…

इस्त्रालयने इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १५३ विद्यार्थिनींच्या अंत्ययात्रेत हजारोंनी सहभाग घेतला.

तेहरान : इराणमधील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब प्रायमरी स्कूलवर शनिवारी अमेरिका-इस्रायली हवाई व क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १५३ शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्या होता. आज या मुलींना एकत्रित रित्या दफन करण्यात आले. त्यांच्या अंतयात्रेला हजारो इराणी नागरिकांनी सहभाग घेत आपल्य सहवेदना व्यक्त केल्या. १५३ निरपराध मुलींच्या मृत्यबद्दल जगभरातून रोष व्यक्त करण्यात आला असून युनोनेही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे.

 ‘युनेस्को’ने या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणासाठी समर्पित ठिकाणांवर हल्ले करणे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत युनेस्कोने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसला पाठवलेल्या अधिकृत पत्रात या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या हितांचे रक्षण करणे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सागरी व्यापाराचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करणे आणि प्रादेशिक मित्र राष्ट्रांच्या सामूहिक स्वसंरक्षणासाठी हे हल्ले करण्यात आले.

ट्रम्प यांनी पत्रात स्पष्ट केले की, अमेरिकन सैन्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळे, सागरी खाण क्षमता, हवाई संरक्षण प्रणाली आणि कमांड-अँड-कंट्रोल केंद्रांवर अचूक हल्ले केले. हे हल्ले अमेरिकेच्या सैन्याचे संरक्षण, राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण आणि इस्रायलसह प्रादेशिक मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई

दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी दोन खाजगी विमान व्यवस्थांची व्यवस्था

दुबईच्या फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअर दोन विमानाव्दारे केली व्यवस्था

 

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे आखाती देशातील विमानवाहतूकसेवा पुर्णता ठप्प झाल्याने अनेक भारतीय आखाती देशात अडकले आहेत. यापैकी दुबईत अनेक महाराष्ट्रीयन नागरीकही अडकलेले होते. समाजमाध्यमांवरून त्यांनी भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे दुबईतून सुटकेची मागणी केली होती. अशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन दुबई हाती घेतले आणि दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी दोन खाजगी विमानांची व्यवस्था केली आणि त्यांना सुखरूप मुंबईत परत आणले.

या सर्वांचे विमानतळावर स्वागत करायला शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या एन.सी. शायनासहीत अनेक शिवसैनिक उपस्थित होत. गुलाबाचे फुल देऊन त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले.

शिंदेंच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअरच्या ची दोन विशेष विमाने दुपारी फुजैरा एअरपोर्ट वरून महाराष्ट्राच्या नागरिकांना घेऊन निघाली. आणि रात्री मुंबईत दाखल झाली.  यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना आज मायदेशी मुंबईत आणण्यात आले.

देवेंद्र फडणवीसही विविध यंत्रणांशी संपर्कात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे.

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी नैसर्गिक रंगांसहीत सहकुटुंब धुळीवंदन करीत महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचे रंग सदैव खुलत राहो अशा शुभेच्छा दिल्या…तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी अजित पवार तसेच पक्षातील अगदी जवळच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबात झालेल्या निधनामुळे यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. पण परंपरेप्रमाणे आनंदश्रमात धर्मवीर आनंद दिघें आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तस्बीरींना रंग लावून त्यांच्यां आठवणींना उजाळा दिला. तर तिसऱ्या चित्रात दुबईत अडकेलल्या पुण्याच्या इंदिरा बिझनेस स्कृलच्या विद्यार्थ्यांना स्पेशल विमानाने मुंबईत आणण्याची व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरीलव भयमुक्ततेचा रंग….

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण
मुंबई : परखड, अभ्यासू आणि थेट भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या पहिल्याच लेखसंग्रहाचे लोकार्पण गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे होणार आहे. साहित्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, पुस्तकप्रेमी आणि पत्रकारितेतील जाणकारांसाठी हा विशेष सोहळा ठरणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे तसेच माजी न्यायमूर्ती साधना जाधव उपस्थित राहणार आहेत.
‘कटाक्ष’ या पुस्तकात गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या निवडक राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवरील लेखांचा समावेश आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध, लोकशाही संस्थांपुढील आव्हाने, ग्रामीण-शहरी प्रश्न, तसेच माध्यमांची भूमिका या विविध अंगांनी लेखकाने मांडलेले विचार या संग्रहात वाचकांसमोर येणार आहेत.
जयंत माईणकर यांनी चार दशकांच्या पत्रकारितेत टोकदार आणि अभ्यासपूर्ण लेखनशैली जपली आहे. मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ‘कटाक्ष’ या शीर्षकाला साजेशी स्पष्ट, थेट आणि निडर मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ‘सदामंगल प्रकाशन’तर्फे करण्यात येत आहे. सुबक मांडणी आणि दर्जेदार निर्मितीमुळे हे पुस्तक वाचकांच्या संग्रहात मानाचे स्थान मिळवेल, अशी अपेक्षा संपादक आणि प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचे मनोगत, लेखकाची प्रतिक्रिया आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. साहित्यप्रेमी, पत्रकार, विद्यार्थी आणि सार्वजनिक जीवनात रस असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंत माईणकर यांनी केले आहे.

कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल

ड प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून विनायक कॉलनी येथे कारवाई

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत विनायक कॉलनी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या परिसरात घंटागाडी नियमितपणे जाऊनही काही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा न करता सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी कचरा साठवून अस्वच्छता निर्माण होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत उपायुक्त रामदास कोकरे कडक भूमिका घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी समन्वय साधून कोळशेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपआयुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड व उदय निकुंभ, स्वच्छता निरीक्षक सचिन सूर्वे, हितेश सोळंकी व अमित भालेराव, मुकादम किशोर जाधव, सानु वर्गीस, साहिल साठे, महेश बनकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना एकूण १३ समजपत्रे देण्यात आली तसेच जागेवर एन.सी. नोंदी करण्यात आल्या. गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ अनुषंगाने २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे.

महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून निश्चित वेळेत घंटागाडीतच देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे किंवा साचू देणे हे कायद्याने दंडनीय असून संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. स्वच्छ भारत अभियान व स्थानिक स्वच्छता नियमांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कल्याण धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर
खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच खाली मुख्य रस्ता, त्यावर फ्लायओव्हर आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका, अशी त्रिस्तरीय रचना या प्रकल्पांची असणार आहे. यामध्ये कल्याण-तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग–बदलापूर मेट्रो १४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ तसेच दुर्गाडी मार्गे कल्याण–उल्हासनगर–अंबरनाथ–चिखलोलीपर्यंत जाणारी ५ अ मार्गिका, शिळफाटा–रांजनोली उन्नतमार्ग आणि वालधुनी–नेवाळी उन्नतमार्ग या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी मुंबई मेट्रोपोलिटियान रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) मार्फत सुरू आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबई येथे या प्रकल्पांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत विविध विस्तारित मार्गिकांचे प्रस्ताव मांडण्यात आले. एमएमआरडीएने या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सविस्तर आराखडा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.

मेट्रो ५ चे विस्तारीकरण

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या विस्तारित ५ अ मार्गिकेला दुर्गाडी नाका ते उल्हासनगरमार्गे अंबरनाथच्या मध्यवर्ती भागात उभारल्या जाणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ५ ब (चिखलोली ते बदलापूर) आणि ५ क (दुर्गाडी ते टिटवाळा) अशा नव्या मार्गिकांसाठीही आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या मार्गिका पूर्ण झाल्यास अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.

मेट्रो १२ आणि १२ ब

मेट्रो १२ चे काम सध्या वेगाने सुरू असून पिलर आणि स्थानक उभारणीची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पाला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेट्रो १२ चे १२ ब हे विस्तारीकरण शिळफाटा–मुंब्रा–कळवा मार्गे ठाण्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

इतर महत्त्वाचे प्रकल्प

शिळफाटा–रांजनोली येथे द्विस्तरीय (डबल डेकर) रस्ता उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कल्याण (पूर्व) येथील यु-टाईप आणि श्रीमलंग रस्त्यांचे काम गतीमान करण्याबाबत निर्देश देण्यात आले. बाधित नागरिकांना तात्पुरते पुनर्वसन बीएसयुपी घरांमध्ये करून, पुढे क्लस्टर योजनेअंतर्गत त्यांना कायमस्वरूपी घरे देण्याचा प्रस्तावही चर्चिला गेला.

ऐरोली–काटई फ्रीवेवरील काटई नाका बोगद्याचे काम तसेच टप्पा ३ साठीची भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या सर्व प्रकल्पांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

पूरग्रस्तांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत

ठाणे: राज्यामध्ये दिवाळी मोसमात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटने मार्फत मदत म्हणून मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेने आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे करत संघटनेने १ लाख २५ हजार रुपयांचा निधी नैसर्गिक आपत्ती करिता (महापूर) निधी म्हणून सरकाकडे जमा केला आहे.सदर निधीचा धनादेश २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय येथे सहाय्यक संचालक वित्त विभागाचे प्रमुख धनावडे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला आहे.यावेळी मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सचिव निलेश मोरे,सल्लागार ज्ञानेश्वर सांडभोर सदस्य मुकेश उबाळे,प्रवीण गटकुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *