17 April Bitambatmi All pages

Open Book

युवा पलटन, भारत पेट्रोलियम, मुंबई पोस्टलसह ११ संघांची पुढील फेरीत मजल

मुंबई :प्रभादेवी येथे आयोजित ‘ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६’ स्पर्धेत दिग्गज संघांनी दमदार कामगिरी करत बाद फेरी गाठली आहे. युवा पलटन, मुंबई पोस्टल, भारत पेट्रोलियम, सी.जी.एस.टी., मुंबई बंदर, डी.पी.यू. पुणे, मिड लाईन, मध्य रेल्वे, एच.ए.एल. नाशिक, मीरा भाईंदर महानगर पालिका, युनियन बँक आणि ठाणे महानगर पालिका या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
आदर्श नगर, वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या साखळी सामन्यांमध्ये फ गटात रायगडच्या मिड लाईन अकादमीने मध्य रेल्वेवर ४९-२० अशी एकतर्फी मात केली. धीरज बैलमारेच्या झंझावाती चढाया आणि आदर्श कुमारच्या पकडीमुळे मिड लाईनने तब्बल २९ गुणांनी विजय मिळवला. मात्र उपविजेते म्हणून मध्य रेल्वेनेही बाद फेरी गाठली.
मीरा भाईंदर महानगरपालिकेने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत जे.जे. रुग्णालयाचा ४१-३० असा पराभव केला. संकेत खाताते आणि संदीप गुरव यांच्या खेळामुळे संघाने बाद फेरीत स्थान मिळवले. जे.जे. रुग्णालयाचा रिहान शेख आणि ओमकार दारकुडे यांचा सुरुवातीचा खेळ प्रभावी ठरला, मात्र शेवटी संघाला पराभव स्वीकारावा लागला.
युनियन बँकेने हिंदुजा रुग्णालयावर ४५-२६ अशी मात करत दमदार सुरुवात केली, तर ठाणे महानगरपालिकेविरुद्ध १४-१४ अशी बरोबरी साधत बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. अतुल जाधव आणि अक्षय तावडे यांनी संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
क गटात मुंबई बंदर आणि डी.पी.यू. पुणे यांच्यात ३८-३८ अशी रोमांचक बरोबरी झाली. तेजस टक्के, सौरभ राऊत (मुंबई बंदर) तसेच विकास जाधव, सुमित घोलप (डी.पी.यू.) यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला.
ब गटात भारत पेट्रोलियमने सी.जी.एस.टी.वर ४४-४० अशी चुरशीची मात करत गट विजेतेपद पटकावले. योगेश दहिया आणि राजकमल कुमार यांच्या खेळामुळे हा विजय शक्य झाला. सी.जी.एस.टी. उपविजेते ठरले.
अ गटात युवा पलटनने मुंबई पोस्टलला ३२-३१ अशा थरारक सामन्यात पराभूत करत गटविजेतेपद मिळवले, तर मुंबई पोस्टल उपविजेते ठरले.
स्पर्धेतील साखळी फेरीतच अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले असून आता बाद फेरीत आणखी रंगत वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0000000

ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे, खेवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बुधवारी आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के व महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर व स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मालती पाटील, नम्रता पमनानी,  नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला. या नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करुन द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करुन प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरे उपलब्ध केली.
बुधवारी टेंभीनाका आनंदाश्रम येथे खासदारनरेश म्हस्के यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात 10 बाधित रहिवाशांना घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेव‍िका मालती पाटील  यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.  या रहिवाशांना पर्यायी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी रोहित पिंपळोलकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

ठाणे : प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले. प्रांताध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, शिक्षक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शिक्षण विभागाच्या विसंगत धोरणांमुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनात शिक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा मुद्दा प्रखरपणे मांडण्यात आला. एप्रिल महिना अर्धा संपत आला असतानाही मार्च महिन्याचे वेतन न मिळाल्याने शिक्षकांना कर्जाचे हप्ते आणि आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.  ‘दर महिन्याच्या १ तारखेला पगार’ ही परंपरा कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांचे समायोजन करून त्यांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, आणि तर्कहीन निकष लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याशिवाय, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांना निवडणूक कामात (BLO) सक्तीने जुंपले जात असल्याचा आरोप करत, शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची मागणी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी केली. परीक्षा व निकालाच्या धामधुमीत १० वी, ११ वी व १२ वीच्या काळात ‘पटपडताळणी’ प्रक्रिया राबवू नये, ती सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली. “प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास १६ एप्रिलचे आंदोलन ही केवळ सुरुवात असेल,” असा इशारा भगवान गावडे यांनी दिला.
या आंदोलनावेळी शहाजी खुस्पे (नगरसेवक, ठाणे महापालिका), मारुती पडळकर (सहसचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना), जगदीश भगत (कोकण विभाग अध्यक्ष), नरेंद्र शिंदे (संपर्कप्रमुख, ठाणे जिल्हा), कुलदीप पाटील (अध्यक्ष, ग्रामीण), संतोष गायकवाड (अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय), प्रमोद पाटोळे (प्राथमिक अध्यक्ष), उदय कदम (सरचिटणीस), दिलीप चौधरी (सचिव), प्रशांत सातपुते (विभागप्रमुख), स्मिता पाटील (सचिव, महिला आघाडी), भांगरे सर (प्रसिद्धी प्रमुख), महेश दहिभाते (अध्यक्ष, कोपरी-पाचपाखाडी), विजय भांगरे (समन्वयक) यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

 राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन वाशी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६० व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या सौरभ मतेने तीन पर्यंत रंगलेल्या लढतीत पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अनिल मुंढेंवर १९-२१, २५-१५ व २२-१७ असा चुरशीचा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला सेट सौरभने केवळ दोन गुणांच्या फरकाने गमावला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याने बरोबरी साधली. आणि तिसरा सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर १७-१७ अशी समान गुणसंख्या असताना शेवटच्या बोर्डात असलेल्या ब्रेकचा फायदा उठवत पाच गुण प्राप्त करून २२-१७ असा सेट आणि सामना खिशात घातला. तर दुसरीकडे विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला हार पत्करावी लागली. पुण्याच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकरने प्रशांतला तीन सेटनंतर २३-२२, ८-२५ व २४-१४ असे पराभूत केले. या सामन्यात प्रशांतने पहिला सेट केवळ एक गुणाच्या फरकाने गमावला होता.
महिला एकेरीच्या उप उपांत्य लढतीत पालघरच्या श्रुती सोनावणेने तीन सेटमधील रंगतदार लढतीत मुंबईच्या रिंकी कुमारीवर २०-७, १८-१८ व १८-६ असा विजय मिळवला. तर आंतर राष्ट्रीय कॅरमपटू निलम घोडकेने ठाण्याच्या चैताली सुवारेवर तीन सेटमध्ये पहिला सेट ०-२५ असा सहज गमावूनही पुढील दोन सेट मध्य २२-१६ व २२-२१ असा निसटता विजय प्राप्त केला.
महिला वयस्कर गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शोभा कामतने मुंबईच्या रोझिना गोदादला २५-४, २२-२१ असे सरळ दोन सेटमध्ये नमवून अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेने ठाण्याच्या मीनल लेले खरेवर तीन सेटमध्ये १०-२४, १६-१५ व २२-१९ असा जेमतेम विजय मिळवला.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे  इतर निकाल पुढील प्रमाणे
संदीप दिवे ( जळगाव ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-६, ८-२३, २५-२०
झैद अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि रहिम खान ( पुणे ) १२-२४, २५-१, २५-५
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे  इतर निकाल पुढील प्रमाणे
समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) २५-२२, २५-७
ऐशा साजिद खान ( मुंबई ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २३-१९, २३-१५
वयस्कर पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे
हेमंत पांचाळ ( मुंबई ) वि वि नूर महम्मद शेख ( मुंबई ) २५-१२, २४-१७
संजय थिटे ( पुणे ) वि वि मिलिंद वाडकर ( मुंबई उपनगर ) ७-२५, २५-१०, २५-१
सत्यनारायण दोंतुल्ला ( मुंबई ) वि वि गिरीधर भोज ( मुंबई उपनगर ) १२-१३, २३-१०, २०-१५
फय्याज शेख ( पुणे ) वि वि शब्बीर खान ( मुंबई उपनगर ) २५-१५, ६-२२, २१-७

 श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा

ठाणे :- होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुषांत, तर स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिलात श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” आपली आगेकूच सुरु ठेवली. पुरुष गटात डॉन बास्कोचा जीत सिंग, तर महिला गटात एस. आय. ई. एस. ची आस्था सिंग दुसऱ्या दिवसांतील उत्कृष्ट खेळाडू ठरले.
ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या मैदानावर  सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुरुष गटात ठाण्याच्या होतकरू मंडळाने उपनगरच्या केदारनाथ मंडळावर २८-१९ अशी  मात केली. पूर्वार्धात ०९-१० अशा पिछाडीवर पडलेल्या होतकारूने उत्तरार्धात आपला खेळ गतिमान केला आणि लोण देत सामना आपल्या बाजूने झुकविला. मितेश चव्हाण याच्या चढाया, तर तुषार यादव, देवेन पाटील यांचा भक्कम बचावला विजयाचे  श्रेय जाते. केदारनाथच्या ओमकार कदम, ओम् कदम यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.
मिडलाईन स्पोर्टस् ने अभिषेक भोईर, धीरज बैलमारे, अजित चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळाने अष्टविनायक संघाला  आरामात पराभुत केले.  अष्टविनायकचे स्वयंम गोंधळे, सागर भोईर चमकले. जय भवानी तरुण मंडळाने चिंतामणी स्पोर्टस् ला ३४-२५ असे पराभूत केले ते तुळशीदास शिर्के, कुणाल शिंदे, ऋषिकेश पवार यांच्या चढाई ,पकडीच्या शानदार खेळामुळे. . चिंतामणीचे हर्षल शहा, विशाल सणस उत्तम खेळले. बालगोपाळ मित्र मंडळाने ओवळी मंडळावर रंगतदार लढतीत  ३४-३१ असा विजय मिळविला. पहिल्या डावात चूरशीची लढत झाल्यामुळे मध्यंतरला गुणफलक १४-१४ अशा बरोबरीत होता. मध्यंतर नंतर बाळ गोपाळच्या फाजल नाडर, राज चौधरी, अतिश जीत यांनी आपला खेळ उंचावत संघाला निसटता विजय मिळवून दिला. ओवळीच्या महेश कदम, प्रिन्स यादव, चिराग सिंग यांची लढत‌ एकाकी ठरली.
महिला गटात उपनगरच्या स्नेहविकास मंडळाने ठाण्याच्या अश्वमेघ स्पोर्टस् ला २६-२५ असे चकविले. विश्रांतीला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेणाऱ्या स्नेहविकासला नंतर मात्र अस्वमेघ संघाने कडवी लढत दिली. प्राची तावडे, रिया तावडे, प्रांजल जाधव स्नेहविकास कडून, तर वैष्णवी चव्हाण अश्वमेघ संघाडून उत्कृष्ट खेळल्या.. ओम् वर्तकनगर संघाने वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव, पूर्वा इंगवले यांच्या तुफानी खेळाने उपनगरच्या सत्यम सेवा संघाला सहज‌  नमविले. मुंबई शहरच्या अमरहिंदने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी मंडळावर दणदणीत  विजय मिळवला.  छत्रपतीच्या तारा देसाई, रेखा गुप्ता चमकल्या.
इतर  निकाल :
पुरुष :
१)सत्यम सेवा वि. वि. स्व. रतन पाटील मंडळ ४१-१७,
२)श्री समर्थ- कलवार वि. वि. श्री स्वामी समर्थ ३६-१७,
३)विवेक स्मृती वि. वि. विजय क्रीडा ३३-१६,
४)गावादेवी-जाभूळ वि. वि. सन्मित्र उपनगर ४६-१०.
महिला :
१) नवशक्ती स्पोर्टस् वि. वि. किल्ले माऊली ३४-१७,
२) विवेक स्पोर्टस् वि. वि. डॉ. शिरोडकर मुंबई ५२-१८.
000000

मुंबई, 16 एप्रिल :  अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी नवीन पनवेल येथील त्यांच्या अकादमीच्या मैदानावर झालेल्या एच. डी.एफ.सी. कप साठी खेळविण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले.  पनवेल आणि आसपासच्या परिसरात क्रिकेटची गुणवत्ता ठासून भरलेली असून ती  शोधून  काढण्याची  आणि ती विकसित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.  दरम्यान करण क्रिकेट अकादमी संघाने ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघावर ९ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करणारा ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघ २०.१ षटकांत ७६ धावांत गुंडाळला गेला. आयुष जाधव  (४३) आणि अभय कन्नुजिया (१०) यांनी सातव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केल्याने त्यांना  एवढी मजल मारता आली.    आदर्श जैस्वाल  (२ धावांत २ बळी), राजवीर पाटील (२० धावांत २ बळी), श्लोक कवडे (१७ धावांत २ बळी) आणि लीला संघवी (९ धावांत २ बळी)  यांनी टिच्चून गोलंदाजी करत ही करामत केली.  या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ बिस्वास (१०) आणि पियुष दांडे (नाबाद ४१) यांनी २५ धावांची सलामी दिली तर नंतर दांडे आणि लीला संघवी (नाबाद १८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची अभेद्य भागीदारी करून आपल्या संघाच्या विजेतेपदावर शिक्का मोर्तब केले.  स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू  आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आदर्श जैस्वाल याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून रिषभ बिस्वास आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून मनसवा नांदोस्कर यांची निवड करण्यात आली.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सुमीत झुंजारराव यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :-  ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघ २०.१ षटकांत  सर्वबाद ७६ (आयुष् जाधव  ४३, अभय कन्नुजिया १० ; आदर्श जैस्वाल २ धावांत 2 बळी , राजवीर पाटील २० धावांत २ बळी, श्लोक कवडे १७ धावांत २ बळी, लीला संघवी ९ धावांत २ बळी) पराभूत वि. करण क्रिकेट अकादमी १६.२ षटकांत  १ बाद ७८ (रिषभ बिस्वास १०, पियुष दांडे नाबाद ४१, लीला संघवी नाबाद १८).

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांची सुवर्णमयी कामगिरी!

मुंबई व भुवनेश्वर येथे पार पडलेल्या विविध प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ठाण्याच्या क्रीडा विश्वात अभिमानाची नोंद केली आहे. अनुभवी खेळाडू अजिता रवींद्रन आणि उदयोन्मुख तारा समृद्धी सिंह यांनी आपल्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाने “महिला शक्ती”ची ताकद पुन्हा अधोरेखित केली.
मुंबई येथे झालेल्या ३२व्या जी. डी. बिर्ला मेमोरियल ओपन व्हेटरन मास्टर्स इंटर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ४५ वर्षांवरील महिला एकेरी गटात अजिता रवींद्रन हिने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत तिने सोनल बट्टड हिच्यावर १५–१०, १५–७, १५–१३ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत नामिता मेहता-विजयकर यांच्याविरुद्ध २१–१४, १५–२१, २१–११ अशी चुरशीची लढत जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अव्वल मानांकित पूजा झलानी हिच्याविरुद्ध २४–२६, २१–१९, २१–१८ असा थरारक विजय मिळवत अजिताने आपले अनुभव, संयम आणि जिद्द सिद्ध करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
दरम्यान, भुवनेश्वर येथे ७ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची समृद्धी सिंह हिने दुहेरी यश मिळवत आपली चमकदार कामगिरी नोंदवली. तिने सी.ए.जी. संघाचे नेतृत्व करत संघ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तसेच वैयक्तिक प्रकारात महिला दुहेरी गटात रौप्यपदक जिंकत “डबल बोनान्झा” साध्य केला. तिच्या खेळातील आत्मविश्वास, कोर्टवरील हालचाल आणि निर्णायक क्षणांतील स्थैर्य विशेष उठून दिसले.
या यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खांडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सुरू असलेल्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील प्रशिक्षण व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले तसेच प्रशिक्षक टीमच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर यश मिळत आहे.
या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपआयुक्त मीनल पलांडे यांनी अभिनंदन करताना सांगितले, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील महिला खेळाडू सातत्याने उच्च पातळीवर कामगिरी करत आहेत. अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांचे यश हे ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिबिंब आहे आणि भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली असून, महिला खेळाडूंच्या या यशामुळे ठाण्यातील क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे.

रमेश औताडे
मुंबई : सरकारने कामगारांसाठी कामगार धोरण फक्त कागदावरच ठेवले आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगार आज हलाखीचे जीवन जगत आहे.  हाच राग घेऊन भर उन्हात महाराष्ट्रातील सर्व वर्गातील कामगार भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली गुरुवारी आक्रोश मोर्च्यात सामील झाले होते. मुंबईतील बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयावर  सुमारे पाच हजार पेक्षा जास्त कामगार या मोर्च्यात सहभागी झाले. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल डुमणे व महामंत्री किरण मिलगिर यांनी शिष्टमंडळासह कामगार आयुक्त व कामगार मंत्री यांची भेट घेतली.
राज्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी धोरणे असली तरी कामगारांसाठी स्वतंत्र धोरण नाही, राज्यातील कंत्राटी, बांधकाम, घरोघरी काम करणारे कामगार, आशा व अंगणवाडी सेविका, फेरीवाले, बीडी कामगार, रिक्षा-टॅक्सी चालक, पेन्शनधारक तसेच विविध उद्योगांतील कामगार यांच्या मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत.
राज्यासाठी स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे, शासनातील कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू करणे, बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचार थांबवणे, वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवणे, तसेच विविध उद्योगांतील कायम व कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी कामगार आयुक्त व कामगार मंत्री यांच्याकडे केली.

टॅप-टू-पे दरम्यान उजळणाऱ्या LED तंत्रज्ञानासह आधुनिक पेमेंट अनुभव; स्मार्ट रिवॉर्ड्स वर भर

मुंबई, १५ एप्रिल २०२६ :
भारताची आघाडीची क्रेडिट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म चेकु ने एयू स्मॉल फाईनान्स बँक यांच्या भागीदारीत देशातील पहिले को-ब्रँडेड LED क्रेडिट कार्ड ‘चेकु एयू क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. या अभिनव कार्डद्वारे पेमेंट अनुभव अधिक सुलभ, आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्याचा उद्देश आहे.
हे कार्ड टॅप-टू-पे व्यवहाराच्या वेळी इन-बिल्ट LED लाईटमुळे उजळते, ज्यामुळे व्यवहार यशस्वी झाल्याची त्वरित दृश्य पुष्टी मिळते. विशेष म्हणजे ही LED लाईट POS टर्मिनलमधील NFC फील्डमधूनच ऊर्जा घेते, त्यामुळे वेगळ्या बॅटरीची गरज भासत नाही.
नव्या युगातील डिजिटल ग्राहकांना लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या या कार्डमध्ये सुलभ ऑनबोर्डिंग, सहज पेमेंट अनुभव आणि एकसंध रिवॉर्ड्स इकोसिस्टम देण्यात आली आहे.
१५ दशलक्षांहून अधिक क्रेडिट कार्ड्स आणि ४ दशलक्ष वापरकर्त्यांच्या अभ्यासावर आधारित या कार्डमुळे सध्याच्या क्रेडिट प्रणालीतील त्रुटी—जसे विखुरलेले रिवॉर्ड्स, गुंतागुंतीची रिडेंप्शन प्रक्रिया—यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आदित्य सोनी, संस्थापक व सीईओ, चेकु म्हणाले, “क्रेडिट कार्डसारख्या दैनंदिन वापराच्या उत्पादनात फारसा बदल झालेला नाही. आम्ही वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेत हा अनुभव अधिक सोपा आणि दृश्यात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे. LED हा छोटा बदल असला तरी तो पेमेंट अनुभव अधिक स्पष्ट करतो.”
तसेच संजय अग्रवाल, संस्थापक, एमडी आणि सीईओ, एयू स्मॉल फाईनान्स बँक यांनी सांगितले की, “चेकु सोबतची भागीदारी ही ग्राहक-केंद्रित बँकिंगला नवा आयाम देणारी आहे. या LED क्रेडिट कार्डद्वारे आम्ही नावीन्यपूर्ण, स्मार्ट आणि आधुनिक वित्तीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या लॉन्चद्वारे चेकु ने केवळ बिल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या चौकटीतून बाहेर पडत क्रेडिट कार्ड इश्यूअन्स आणि रिवॉर्ड्स-आधारित कॉमर्स क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *