अजितदादांच्या ३ महत्वपूर्ण निर्णयांवर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबईअजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी घेतलेल्या ३ महत्वपुर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत सुरवातीला आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्य सचिव यांनी शोकप्रस्ताव वाचला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारीक ओळख करुन देत स्वागत केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अजितदादांनी सांगितलेल्या  महत्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलं. त्यात बारामती क्रिडा संकुलाला ७५ कोटी रुपये  मंजूर करण्यात आले. तसेच वालचंदनगर-रत्नापूर एमआयडीसी साठी १००० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निधनापुर्वी काही दिवसांपासून अजितदादांनी महसूलमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा घेतला होता.

दरम्यान, यापुढे पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलव्दारे नोटीस बजाविणे आता कायदेशीर असणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहियेतील कलमांत सुधारणा करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आला आहे. महसूल सुनावणीला असलेली राज्यातील जमीन विषयक विविध प्रकरणे प्रकरणे जलद गतीने निकाली काढणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम २३० नुसार इलेक्ट्रॉनिक मेलव्दारे नोटीस बजावण्याच्या पद्धतीला कायदेशीर करण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.