1 June Bitambatmi All pages

Open Book

लोकहिताच्या सामाजिक सुधारणा प्राधान्याने राबविणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ०००००००

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेस १ जून रोजी प्रारंभ होत असून विविध जिल्ह्यातील ३२ खेळाडूंमध्ये चूरस राहील. परेल येथील आरएमएमएस सभागृहात पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे विरुध्द मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखील भोसले यामधील उद्घाटनीय लढत क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे, विलास डांगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय खेळाडूंना डीएसओ कॅरम स्पर्धेच्या तयारीसाठी सरावात्मक विनाशुल्क स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेतेपदाच्या दावेदारीसाठी न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार हायस्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे व पुष्कर गोळे, कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरचा तीर्थ ठाकर, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा देविका जोशी, महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, कनोसा हायस्कूल-कांदिवलीची वेदिका पोमेंडकर आदी शालेय कॅरमपटू सर्वांगसुंदर खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा रंगणार असून पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांचे आयोजन
कल्याण : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२६ रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे सदस्य मेहुल पुण्यार्थी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात पार पडला. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा हा सुवर्णक्षण स्मरणात राहावा यासाठी दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदाचा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शाहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
स्वराज्याच्या इतिहासात कल्याण नगरीला विशेष स्थान आहे. हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या भूमीतून मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रायगडावर पोहोचून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या समन्वयासाठी विशेष व्हॉट्सॲप कम्युनिटी तयार करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली व ठाणे जिल्ह्यातील इच्छुक शिवभक्तांनी ९७६८८८८५२५ या क्रमांकावर संपर्क साधून कम्युनिटीमध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘२०० कोटींची भीक नको, न्याय हक्क हवा’ – कामगारांचा निर्धार
कल्याण : मुंबई येथे पार पडलेल्या मॅनेजमेंट आणि कामगार युनियन यांच्या बैठकीत कामगारांसाठी २०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे वृत्त समोर आले होते. एन.आर.सी कंपनीतील नव्या वेतन कराराविरोधात कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात कामगार एकजूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच महादेव मंदिर यादव नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या बैठकीत शेकडो कामगार उपस्थित होते नव्या कराराचा निषेध करत कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत उपस्थित कामगारांनी ‘२०० कोटींची भीक नको, आमच्या हक्कांचा योग्य मोबदला द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नव्या करारामुळे कामगारांचे आर्थिक आणि सेवा विषयक नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेक वर्षे वाट पाहून कामगारांच्या पदरात जर काहीच पडत नसेल तर असा करार काय कामाचा असा सवाल कामगार नेते भीमराव डोळस, माजी नगरसेवक जे.सी कटारिया, शाहीर अर्जुन पाटील, वासुदेव पाटील, अविनाश नाईक या कामगारांनी उपस्थित केला
कामगारांनी एन आर सी मजदूर संघावरही गंभीर आरोप करत संघटनेच्या भूमिकेमुळे कामगारांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. “कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी संघटनेने व्यवस्थापनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून त्यामुळे हजारो कामगारांची वाट लागली आहे,” अशी टीका बैठकीत करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांच्या प्रतिमा झळकत होत्या. कामगारांनी केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कामगार नेत्यांनी सांगितले की, कामगारांच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही करार स्वीकारला जाणार नाही. आगामी काळात मोठ्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी विविध बैठका घेण्यात येणार असून सर्व कामगारांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

 मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा २०२६
पुरुष व महिला गटात विजेतेपद; व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वेचा महापौर चषकावर कब्जा
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.) येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये पुरुष व महिला गटाचा दुहेरी मुकुट मिळवताना उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने पुरुषांमध्ये श्री समर्थ व्या. मंदिरला व महिलांमध्ये सरस्वती कन्या या दोन्ही मुंबईच्या संघांना तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वेने मुंबई पोलिसांना  पराभूत करत मुंबई महापौर चषकावर नाव कोरले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यशवंत किल्लेदार (नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष) यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब (बाळ) तोरसकर, सुरेंद्र विश्वकर्मा, नरेंद्र कुंदर, पांडुरंग परब, डलेश देसाई, श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, रुपेश शेलटर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी शिवाजी पार्क परिसरातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने श्री समर्थ व्यायाम मंदिरचा ११-९ (मध्यंतर ११-५) असा १ डाव व २ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या रामचंद्र झोरे (२.२०, २.३० मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (२, २.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रतिक देवरे (२ मि. संरक्षण), ऋषिकेश मूर्चावडे (१.४० मि. संरक्षण), निहार दुबळे  (५ गुण) व यांनी मुंबई महापौर चषकावर नाव कोरले. तर पराभूत श्री समर्थच्या पियुष घोलम (२ मि. संरक्षण), हितेश आंग्रे (१.४० मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाके (१.१० मि. संरक्षण) व ओम भरणकर (४ गुण) यांनी पराभवातही चांगली कामगिरी केली.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात सुध्दा शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने सरस्वती कन्या संघावर १०-३ (मध्यंतर १०-१) असा १ डाव व ७ गुणांनी धामाकेदार विजय साजरा केला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या साक्षी वाफेलकर (६.४० मि. संरक्षण व २ गुण), देविका अहिरे (नाबाद २.२०, ४.४० मि. संरक्षण व १ गुण), सृष्टी पाष्टे (३ मि. संरक्षण) साक्षी पारसेकर व मनाली दुपारगुडे (प्रत्येकी २ गुण) यांनी मुंबई महापौर चषकावर कब्जा केला तर पराभूत सरस्वतीच्या सेजल यादव (२.१०, २.५० मि. संरक्षण), काजल दिवेकर (१.१० मि. संरक्षण) खुशबू सुतार (नाबाद १.१० मि. संरक्षण) व वैदवी बटवळ (२ गुण) यांनी दिलेली लढत विजय मिळवून देऊ शकली नाही.
व्यवसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने मुंबई पोलीसांचा १३-११ (मध्यंतर १३-५) असा एक डाव राखून २ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात मध्य रेल्वेच्या शुभम थोरात (२.१०, १.४० मि. संरक्षण), अर्णव पाटणकर (२ मि. संरक्षण व १ गुण), अवधूत पाटील (२ मि. संरक्षण व १ गुण), रामजी कश्यप (नाबाद १, १ मि. संरक्षण व ३ गुण), दिलीप खांडवी (१.१०, २.४० मि. संरक्षण व २ गुण),  व आकाश कदम (३ गुण) यांनी संघाला मुंबई पहापौर चषक मिळवून दिला. तर पराभूत मुंबई पोलीसांच्या सुजित पालव (१.१०, १ मि. संरक्षण), स्वप्निल सावंत (१.१० मि. संरक्षण), अक्षय खापरे (४ गुण), निखिल घाडगे (३ गुण) यांनी दिलेली लढत विशेष नोंद करून गेली.
पुरुष गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा (९-५) असा ४ गुणांनी पराभव केला. महिला गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात श्री सह्याद्री या संघाने अ.भी गोरेगावकरवर चुरशीच्या सामन्यात ६-६ असा लघुत्तम आक्रमणात ११.३१ सेकंदाने विजय मिळवला. तर व्यवसायिक गटाच्या तृतीय क्रमांकाच्या चुरशीच्या सामन्यात महावितरण कंपनीने स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा लघुत्तम आक्रमणात (८-८) असा १.१४.०३ मि. राखून पराभव केला.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू : (पुरुष गट, महिला गट व व्यावसायिक गट)
उत्कृष्ट संरक्षक – पियुष घोलम (श्री समर्थ), सेजल यादव (सरस्वती कन्या), शुभम थोरात (मध्य रेल्वे)
उत्कृष्ट आक्रमक – निहार दुबळे (महात्मा गांधी), साक्षी वाफेलकर  (महात्मा गांधी), अक्षय खापरे (मुंबई पोलीस)
अष्टपैलू खेळाडू : धीरज भावे (महात्मा गांधी), देविका अहिरे (महात्मा गांधी), दिलीप खांडवी ( मध्य रेल्वे)
000000000

जोसेफ दिलराज आणि अक्षीत जोडीचे पुरुष दुहेरीत दिमाखदार विजेतेपद”
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध राज्यांमधील अनेक खेळाडू गेली काही वर्ष प्रगत बॅडमिंटनचे धडे गिरवीत आहेत यातीलच केरळ राज्यातील खेळाडूंनी ठाण्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे .
केरळ राज्यातील बॅडमिंटन विश्वात अत्यंत प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अखिल भारतीय आमंत्रितांच्या बॅडमिंटन टूर्नामेंट’ स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या जोसेफ दिलराज याने अक्षीतसोबत पुरुष दुहेरी गटात शानदार विजेतेपद पटकावत ठाण्याच्या क्रीडा विश्वाचा लौकिक पुन्हा एकदा उंचावला. २४ मे २०२६ रोजी केरळमधील त्रिशूर येथील भव्य हायलाईट मॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल आणि निमंत्रित अशा केवळ ८ पुरुष दुहेरी जोड्यांचा सहभाग होता.
संपूर्ण केरळ राज्यातील बॅडमिंटनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच अत्यंत वेगवान, आक्रमक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले. हायलाईट मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी प्रत्येक सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेचे वातावरण अधिक रंगतदार बनवले. देशातील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष ग्लॅमर आणि प्रतिष्ठा लाभली होती.
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणारा जोसेफ दिलराज हा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असून, मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली  मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुळे, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराज्य स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात जोसेफ आणि अक्षीत या जोडीने उत्कृष्ट समन्वय, आक्रमक स्मॅशेस आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी जोड्यांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यातही त्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि वेगवान खेळ करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या खेळातील सातत्य, कोर्ट कव्हरेज आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता विशेष उठून दिसली.
आपल्या बॅडमिंटन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या ध्येयाने जोसेफ दिलराज याने स्वतःचे संपूर्ण आयुष्य ठाण्यात स्थायिक करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमधील आधुनिक प्रशिक्षण सुविधा, स्पर्धात्मक वातावरण आणि प्रशिक्षकांचे बारकाईने केलेले मार्गदर्शन यामुळे अनेक खेळाडूंप्रमाणेच जोसेफचाही खेळ अधिक परिपक्व आणि आक्रमक होताना दिसत आहे. राज्यापासून राष्ट्रीय आणि आता आंतरराज्य स्पर्धांमध्येही अकॅडमीचे खेळाडू सातत्याने यश मिळवत ठाणे शहराच्या क्रीडा परंपरेला नवी उंची देत आहेत.
जोसेफ दिलराजच्या या उल्लेखनीय विजेतेपदाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी विशेष आनंद व्यक्त करत, “मोठ्या स्पर्धांमध्ये दबावाखाली खेळण्याची जोसेफची क्षमता आणि त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा त्याला आगामी काळात आणखी मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी जोसेफ, त्याच्या सहकाऱ्यांचे आणि संपूर्ण प्रशिक्षक वर्गाचे अभिनंदन करत, ठाणे बॅडमिंटन अकॅडमी राज्याबरोबरच देशातील बॅडमिंटन क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
(अशोक गायकवाड
मुंबई -जुहू येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणावर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ७० अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे निष्कासित करण्यात आली. यामध्ये अंदाजे ८ हजार चौ. फूट शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. ही कारवाई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच अपर जिल्हाधिकारी(अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगर गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), बांद्रा वैशाली परदेशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईत महानगरपालिका व पोलीस विभागाचे अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त होऊन ती शासनाच्या ताब्यात आली आहे. लवकरच या जमिनीस संरक्षण भिंत बांधली जाणार आहे.

अमेरिकेच्या युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘टेक्नोव्हा २.०’ यशस्वी
कल्याण : एसएसटी महाविद्यालय आणि अमेरिकेतील युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिषद ‘टेक्नोव्हा २.० – २०२६’ यशस्वीरीत्या पार पडली. “टेक्नॉलॉजी, सायन्स आणि मल्टीडिसिप्लिनरी इनोव्हेशनमधील उदयोन्मुख प्रवाह” या विषयावर आधारित परिषदेत भारतासह विविध देशांतील संशोधक, प्राध्यापक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऑनलाइन माध्यमातून झालेल्या या परिषदेत विज्ञान, तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय संशोधन क्षेत्रातील नव्या संकल्पना, संशोधन निष्कर्ष आणि नवोपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहभागी संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर करत विविध क्षेत्रांतील आधुनिक घडामोडी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला.
तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव, विज्ञानातील अत्याधुनिक संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावरील संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून ज्ञान व संशोधनाची देवाणघेवाण घडवून आणण्याचे महत्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या SSTRACC समिती, व्यवस्थापन, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, तांत्रिक सहाय्यक तसेच युडॉक्सिया रिसर्च युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
000000
Heading – आगरी समाजातील तरुणांची पोलीस भरतीत उत्तुंग भरारी
Slug – २०२५-२६ च्या पोलीस भरतीत आगरी समाजातील अनेक तरुणांची निवड
कल्याण : ‘आगरी साहित्य शाळा, महाराष्ट्र राज्य’ या समूहाने  जाहीर झालेल्या निकालाचे विश्लेषण करून एक यादी तयार केली त्यात आगरी समाजातील मुला-मुलींनी पोलीस भरतीत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५-२६ च्या पोलीस भरतीत अनेक उमेदवारांची पोलीस दलात निवड झाली आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण आगरी समाजात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी उमेदवारांमध्ये रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई परिसरातील विविध ग्रामीण भागांतील मुला-मुलींचा समावेश आहे. पेण, कर्जत, अलिबाग, मुरबाड, कल्याण, शहापूर, टिटवाळा, अंबरनाथ आणि उरण यांसारख्या दुर्गम व निमशहरी भागांतून आलेल्या या तरुणांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे यश खेचून आणले आहे. यशस्वी उमेदवारांनी पोलीस गणवेश परिधान करण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. यामध्ये मुलींनीही मोठ्या प्रमाणावर बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
या यशाबद्दल ‘आगरी साहित्य शाळा, महाराष्ट्र राज्य’ समूहाच्या वतीने सर्व यशस्वी उमेदवारांचे “समद्यांचा पक्का पक्का आबीनंदन!” अशा मराठमोळ्या आणि आगरी बोलीभाषेच्या शैलीत जाहीर कौतुक करण्यात आले आहे. “आगरी साहित्य शालेला तुमचा आबीमान हं!” अशा शब्दांत समूहाने या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पोलीस दलात निवड झालेल्या या सर्व नवतरुणांवर आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या ‘आगरी साहित्य शाळा’ समूहावर सध्या संपूर्ण स्तरातून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
००००००

 वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी!”
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
पाचपाखाडी (इंदिरानगर)  राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, WWA आणि RAWW संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले.
वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रण आढळले.
उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका  वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कोट
बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
मयूर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *