
आज २१ मे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज ३५ वा स्मृतीदिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. आधुनिक विचार आणि कठोर निर्णयामुळे राजीव गांधी यांनी जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली. २० ऑगस्ट १९४४ रोजी जन्मलेले राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान बनले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांचे जेष्ठ सुपुत्र असलेले राजीव यांना राजकारणात रस नव्हता. देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकीय घराण्यात जन्म घेऊनही राजीव गांधी हे राजकारणापासून दूरच होते. राजीव गांधी यांचे शिक्षण डेहराडूनच्या शाळेत झाले त्यानंतर ते हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डुन च्या निवासी शाळेत दाखल झाले. तिथे त्यांना अनेक मित्र भेटले या मित्रांशी त्यांनी आयुष्यभर मैत्री जपली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते केम्ब्रिजच्या ट्रीनीटी महाविद्यालयात गेले पण लवकरच लंडन स्थित इम्पेरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान या विषयात खूप रस होता. ते या विषयाची पुस्तके वाचून काढत. विमान उड्डाण करून आकाशात उडावे अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी वैमानिक होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये त्यांनी फ्लायिंग क्लबची परीक्षा दिली आणि वैमानिक बनले. लगेचच ते इंडियन एअर लाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले. लंडनमध्येच त्यांची आणि सोनिया गांधी यांची मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १९६८ साली त्यांचा विवाह झाला. राजीव गांधी हे अपघातानेच राजकारणात आले. १९८० साली राजीव गांधी यांचे बंधू संजय गांधी यांचा अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी मागणी काँग्रेस मधील नेत्यांकडून होऊ लागली. आई इंदिरा गांधी यांनीही राजीव गांधी यांना राजकारणात उतरण्याची सूचना केली तेंव्हा राजीव यांनी आपल्या भावाच्या संजय गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघातुन निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने ती जिंकली. १९८२ साली दिल्लीत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेच्या नियोजनाची सर्व जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे होती त्यांनी ती यशस्वीरीत्या पेलून ही स्पर्धा यशस्वी केली. ३१ नोव्हेंबर १९८४ इंदिरा गांधी यांची हत्या झाली. हत्या झाली तेंव्हा इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला. पंतप्रधानपदासारखे देशातील सर्वोच्च पद जास्त दिवस रिक्त ठेवता येणार नाही असे घटना तज्ज्ञांचे मत होते त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. वैयक्तिक पातळीवर दुःख असूनही त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. त्यानंतर झलेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या निवडणुकीत काँग्रेसला ४०० हुन अधिक जागा मिळाल्या. स्वतः राजीव गांधी हे विक्रमी मतांनी जिंकून आले होते. पंतप्रधान असताना त्यांनी देशात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने प्रगती करायला हवी असे त्यांचे मत होते. २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे असेल त्यासाठी देशातील प्रत्येक तरुण हा संगणक साक्षर असायला हवा असा त्यांचा आग्रह होता त्यामुळेच त्यांनी देशात संगणक आणला. राजीव गांधी जेंव्हा संगणकावर बोलत होते तेंव्हा अनेकजण त्यांच्यावर टीका करत होते. पण संगणक क्रांती आणणार हा ध्यास त्यांनी घेतला होता. राजीव गांधींमुळेच सर्वसामान्य घरात संगणक पोहचला. राजीव गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ८ टक्के म्हणजे तेरा लक्ष कोटींचा माहिती तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला. यातून पन्नास लाख लोकांना थेट रोजगार मिळतो आहे. माहिती प्रधान सभ्यता, ज्ञान प्रधान सभ्यता, बुद्धिमत्ता प्रधान सभ्यता या तीन क्रांतीची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. त्याचीच फळे आज भारत देश चाखतो आहे. राजीव गांधी यांच्या दुरदृष्टीमुळे भारताचा वेगाने विकास झाला आणि लोकांचे जीवनमान उंचावले. स्वभावाने गंभीर पण आधुनिक विचाराच्या राजीव गांधी यांनी देशात माहिती तंत्रज्ञान युगाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळेच त्यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हणतात. राजीव गांधी यांनी दूरसंचार क्रांती बरोबरच नवे शैक्षणिक धोरण आणून देशभरात नवोदय विद्यालयाची स्थापना केली. त्यासोबतच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना राजकारणात मोठी संधी दिली. राजीवजींनी घेतलेले हे निर्णय भारताच्या जडणघडणीत आणि विकासात मैलाचा दगड ठरले आहेत. भारत देशाला राजीव गांधी यांनी तंत्र वैज्ञानिक दृष्टी दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती बनवून भारताला स्वाभिमान दिला. पुढच्या पन्नास वर्षाचा अर्थव्यवस्थेचा पाया राजीव गांधी यांनी त्यावेळेला रचला होता त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहचू शकलो. देशाला माहिती तंत्रज्ञानात परिपूर्ण करून महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या पंतप्रधानाचे २१ मे १९९१ रोजी लिट्टे या दहशतवादी संघटनेने मानवी बॉम्बचा वापर करून हत्या केली म्हणून आजचा दिवस देशभर दहशतवादी विरोधी दिवस म्हणूनही पाळण्यात येतो. राजीव गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

ही घटना २०२४ च्या नोव्हेंबर महिन्यातली आहे. मी अखिल भारतीय साहित्य परिषदेचा विदर्भाचा एक पदाधिकारी म्हणून गत काही वर्षांपासून कार्यरत आहे. २०२२ पासून विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात दर महिन्यात एखादा तरी कार्यक्रम आयोजित केला जात असे. मात्र एक ऑगस्ट २०२४ पासून ते गंभीर रित्या आजारी झाले. त्यांना पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती, मात्र पूर्ण तळ्यावर आले नव्हती.
डिसेंबर २०२४ मध्ये साहित्य परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार होती. त्यात प्रत्येक प्रांतात असे गत तीन महिन्यात काय कार्यक्रम झाले त्याचा अहवाल द्यायचा होता. अविनाश पाठक आजारी असल्यामुळे आमचे कोणाचेच मन नव्हते, आणि काहीही कार्यक्रम होऊ शकले नव्हते. मग काय करायचे हा प्रश्न समोर आला.
अविनाश पाठक आजारी असल्यामुळे मी त्यांना घरी भेटायला जात असे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा प्रश्न आला तेव्हा त्यांच्या घरी गेल्यावर मी त्यांना सहज विचारले, तेव्हा ते म्हणाले,” डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एखादा कार्यक्रम घेऊ या.” त्यावेळी ते उठण्याच्या अवस्थेत नव्हते. मात्र त्यांनी त्याही परिस्थितीत ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर परिसंवाद घ्यायचा असे ठरवले आणि अंथरुणावर पडल्या पडल्या फोनवर संपूर्ण कार्यक्रम सर्व संबंधितांशी बोलून त्यांनी आखला. मग मी आणि प्रकाश एदलाबादकर सर आमच्यावर त्यांनी जबाबदारी टाकली आणि ठरल्याप्रमाणे ६ डिसेंबरला देवी अहिल्या मंदिराच्या सभागृहात हा दणदणीत कार्यक्रम पार पडला होता. अंथरुणावर पडल्या पडल्या अविनाश पाठक यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्याकडून तो यशस्वी करून घेतला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते स्वतः कार्यक्रमाला राहू शकले नव्हते. मात्र कार्यक्रम त्यांनी यशस्वी पार पाडला. हे त्यांचे संघटन कौशल्य दाद देण्याजोगेच होते.
त्याच महिन्यात २८ डिसेंबरला साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक नागपूरला यायचे होते. त्यांनी विदर्भातील पदाधिकारी यांची एक बैठक आपल्यासोबत व्हावी असे सुचवले. तेव्हाही अविनाश पाठक यांनी कॉटवर बसून फोनवर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. पूर्ण विदर्भात त्यांनी संपर्क केला. धरमपेठ शाळेच्या सभागृहात बैठक ठरल्याप्रमाणे पार पडली. या बैठकीला एका सहका-याच्या कारमध्ये बसून अविनाश पाठक स्वतः उपस्थित राहिले. कारमधून उतरून वॉकरच्या साह्याने ते बैठकीत येऊन बसले आणि बैठक यशस्वी पार पाडली होती. बैठकीनंतरच्या जवळच्या एका हॉटेलमध्ये स्नेहभोजनात देखील ते सहभागी झाले होते
अविनाश पाठक हे एक पत्रकार आणि साहित्यिक म्हणून त्यांचे नाव मी नेहमी ऐकत होतो. मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता. साहित्य परिषदेच्या कामाबाबतही मी ऐकून होतो. त्यांच्याकडे साहित्य परिषदेचे दायित्व आले आणि मार्च २०२२ मध्ये त्यांनी साहित्य परिषदेचा पहिला कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबत वृत्तपत्रात वाचून मी त्या कार्यक्रमाला पोहोचलो. कार्यक्रमात पूर्ण वेळ मी उपस्थित राहिलो. त्यावेळी एक रजिस्टर प्रेक्षकांमध्ये फिरवले होते. त्यात सर्वांची नावं पत्ते आणि मोबाईल नंबर घेतले होते. दोनच दिवसांनी अविनाश पाठक यांचा मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलावले आणि मला साहित्य परिषदेशी जोडून घेतले. तेव्हापासून मी पूर्णवेळ सक्रिय झालो. नंतर जवळजवळ तीन वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. एक पत्रकार म्हणून तर त्यांना समाजात मान होताच, पण त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिकही आहेत हे मला हळूहळू लक्षात येऊ लागले. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आणि त्यांचे नियमित सुरू असणारे लेखन, त्याबाबत त्यांचा असलेला दांडगा अभ्यास आणि लेखनातील सातत्य हे कुठेतरी सुखावून जाणारे होते. त्याचबरोबर त्यांचा सर्वच क्षेत्र क्षेत्रात व्यापक जनसंपर्क असल्याचे देखील माझ्या लक्षात आले. कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा तर त्यासाठी वेगवेगळ्या मान्यवर वक्त्यांना ते संपर्क करून बोलायचे आणि यांच्या शब्दाला मान देऊन ते वक्ते कार्यक्रमाला यायचे देखील. साहित्य परिषदेत डॉ. वि.स. जोग, डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. दादासाहेब आपटे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर, डॉ. शरद निंबाळकर, पत्रकार सुधीर पाठक असे अनेक मान्यवर त्यांनी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर आणले. इतकेच काय पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील अविनाश पाठकांच्या संबंधाखातर दोनदा साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर आले. डॉ. उदय निरगुडकर माधव भंडारी अशा विदर्भ बाहेरच्या मान्यवरांचे कार्यक्रम त्यांनी विदर्भात घडवून आणले होते. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात त्यांचा संपर्क होता. त्यातून त्यांनी वर्षाच्या आत अकराही जिल्ह्यांमध्ये साहित्य परिषदेच्या शाखा कार्यरत केल्या. ११ पैकी ८ जिल्ह्यांमध्ये ते स्वतः जाऊन देखील आले होते.
अविनाश पाठक हे सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. साहित्य परीक्षण परिषद ही संघ परिवाराची संघटना, तिचे दायित्व त्यांनी तीन वर्ष सांभाळले. त्याआधी त्यांनी भारत विकास परिषदेचे दायित्व तेवढेच सक्षमपणे सांभाळले होते. साहित्य परिषदेच्या कामातून मोकळे झाल्यावर त्यांनी विदर्भातील संघाशी संबंधित पत्रकारांची संघटना बांधण्याचे काम हाती घेतले आणि सहा महिन्यात विदर्भातील पत्रकारांशी संपर्क करून संघटना उभी देखील केली. संघटनेचे काम आता सुरू आहे. अविनाश पाठक इथेही विदर्भाचे अध्यक्ष आहेत. हे काम उभे करताना देखील त्यांचे संघटन कौशल्य आणि जनसंपर्क किती सक्षम आहे हे दिसून येते.
एक पत्रकार या नात्याने त्यांनी महाराष्ट्राच्या विविध मान्यवर वृत्तपत्रांमध्ये काम केलेले आहे. आजही ते विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चांमध्ये सहभागी झालेले दिसतात. राजकीय विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये ते प्रामुख्याने सहभागी झालेले दिसतात. आठ वर्ष त्यांनी एका दिवाळी अंकाचे संपादन केले. त्या दिवाळी अंकाने २५ प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले होते. याशिवाय स्वतः अविनाश पाठक विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.
त्यांची आतापर्यंत पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्या पुस्तकांना देखील विविध प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. नुकतेच म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांचा शह काटशह हा राजकीय कथांचा संग्रह प्रकाशित झाला. त्याला माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर जातीने उपस्थित झाले होते. यावेळी बोलताना दूरदर्शनचे वृत्त संचालक नितीन केळकर आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी अविनाश पाठक यांच्या एकूणच वांङमयीन कर्तृत्वावर टाकलेला प्रकाश हा निश्चितच सुखावणारा होता, आणि अशा व्यक्तीशी आपले स्नेहबंध असल्याचा अभिमान सुद्धा वाटून गेला होता. त्याच्या काही पुस्तकांचे यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोशियारी, राष्ट्रसेविका समितीच्या शांताक्का, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अशा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.
असे सिद्धहस्त पत्रकार अभ्यासू लेखक कुशल संघटक स्तंभलेखक उत्तम वक्ते आणि व्यापक जनसंपर्काचे धनी अविनाश पाठक आज २१ मे २०२६ रोजी वयाची ७१ वर्ष पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गतवर्षी आलेले आजारपण त्यामुळे शरीरात आलेले काहीसे शैथिल्य हे सर्व बाजूला ठेवत आजही ते तितक्याच उत्साहाने कार्यरत राहिलेले आहेत. त्यांना एकाहात्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वराने त्यांना उदंड दीर्घायुरारोग्य प्रदान करावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना
महेश आंबोकर
लेखक वायुदलातील निवृत्त अधिकारी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.
आव्हान युद्धसज्जतेचे
‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्याची सविस्तर चर्चा अलिकडे झाली, मात्र त्या मोहिमेकडे केवळ सीमापार केलेली लष्करी कारवाई म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. दहशतवादाला उत्तर देताना भारताने स्वीकारलेली नवी रणनीती, राजकीय इच्छाशक्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठाम भूमिका अधोरेखित करणारा तो एक निर्णायक टप्पा ठरला. आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय आणि तिन्ही सैन्यदलांमधील एकत्रित नियोजन यामुळे भारताची क्षमता नव्या पातळीवर गेल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने पहायला मिळाले. संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरण, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर क्षमता आणि अचूक क्षेपणास्त्र प्रणाली यांचा वापर भविष्यातील युद्धाचे स्वरूप बदलत असल्याचे संकेत देतो; मात्र कोणतीही लष्करी कारवाई हे अंतिम उत्तर नसते. दहशतवाद ही केवळ सीमापारची समस्या नाही, तर विचारसरणी, कट्टरता आणि भू-राजकारण यांच्या गुंतागुंतीतून निर्माण होते. त्यामुळे सीमा सुरक्षा, गुप्तचर यंत्रणांची मजबुती, स्थानिक पातळीवरील विश्वास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या सर्व आघाड्यांवर सातत्याने काम करावे लागेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या सुरक्षा धोरणात मानसिक बदल घडवला. ‘हल्ला सहन करायचा आणि विसरायचा’ या जुन्या प्रतिमेऐवजी ‘प्रत्युत्तर देण्याची क्षमता आणि तयारी’ ही नवी प्रतिमा उभी राहिली. तथापि, राष्ट्राची खरी ताकद केवळ शस्त्रांमध्ये नसते, तर संयम, जबाबदारी आणि शांततेसाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये असते. म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ची वर्षपूर्ती झाल्यानंतर सुरक्षित आणि स्थिर भविष्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय परिपक्वता जपणे अधिक महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने परिस्थितीचा वेध घ्यायला हवा.
मागील वर्षी भारतीय लष्कराने सीमेपलीकडील दहशतवादी तळांना लक्ष्य केलेच; पण त्याही पलीकडे जाऊन तांत्रिक आणि आर्थिक आघाड्यांवर पाकिस्तानची रसद तोडण्याचे काम केले. या ऑपरेशनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली आणि त्यांच्या छुप्या युद्धाचा (प्रॉक्सी वॉर) बुरखा फाटला. गेल्या वर्षभरात भारताने पाकिस्तानची तीन स्तरांवर कोंडी केली आहे. भारताने जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानला ‘दहशतवादाचा केंद्रबिंदू’ म्हणून यशस्वीपणे कलंकीत केले आहे. पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. भारताने व्यापार पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे आणि जागतिक वित्तीय संस्थांकडे पाकिस्तानची बाजू कमकुवत केल्यामुळे त्यांच्यावर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. भारताने सीमेवरील देखरेख इतकी कडक केली आहे, की घुसखोरीचे 70 टक्क्यांहून अधिक प्रयत्न कमी झाले आहेत. काश्मीरमध्ये स्थानिक लोकांचा भारतावर वाढलेला विश्वास ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा ठरली आहे. या काळात पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. भारताच्या परराष्ट्र धोरणाने पाकिस्तानला एकाकी पाडण्यात यश मिळवले आहे. एकीकडे देश भुकेने व्याकुळ असताना आणि परकीय चलन साठा संपत आला असतानाही पाकिस्तानचे लष्करी आणि राजकीय नेतृत्व आजही भारताशी वैर करण्याच्या मानसिकतेत अडकलेले आहे.
1960 मध्ये झालेला ‘सिंधू पाणीवाटप करार’ जगातील सर्वात यशस्वी करारांपैकी एक मानला जातो; पण पाकिस्तानने याचा उपयोग भारताच्या विकासकामात अडथळे आणण्यासाठी केला आहे. भारताने अलीकडेच या करारात सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. किशनगंगा आणि राटले जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्तानने घेतलेले आक्षेप तांत्रिक नसून राजकीय हेतूने प्रेरित आहेत. भारत आपल्या वाटणीच्या नद्यांवर (रावी, बीस, सतलज) धरणे बांधतो किंवा पश्चिम नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकल्प राबवतो, तेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो, पण त्याला समर्थन मिळत नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही हे भारताचे ब्रीदवाक्य आता कृतीत उतरत आहे. भारताने स्पष्ट केले आहे, की आम्ही कराराचे पालन करू; पण पाकिस्तानच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भारताच्या वाटणीचे पाणी पाकिस्तानात जाऊ देणार नाही. शाहपूर-कांडी धरण आणि उझ प्रकल्प यांमार्फत भारत आता आपले पाणी पूर्णपणे उपयोगात आणत आहे. गेल्या 65 वर्षांमध्ये हवामानबदल आणि लोकसंख्यावाढीमुळे परिस्थिती बदलली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ते सिंधू पाणीवाटपापर्यंतचा प्रवास हा भारताच्या आत्मविश्वासाचा प्रवास आहे. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानची जीवनरेखा आहे. त्यांनी भारताच्या संयमाचा अधिक अंत पाहिला, तर भारत याबाबत कठोर पावले उचलू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला प्रगती करायची असेल, तर पहलगामसारख्या घटना थांबवाव्या लागतील आणि सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आणि त्याआधीही भारताने आधी थेट कारवाई आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भारताच्या सुरक्षा धोरणात अधिक आक्रमक आणि प्रत्यक्ष प्रतिसादाची दिशा दिसून आली. या कारवाईनंतर जागतिक प्रतिक्रियादेखील भारतासाठी महत्त्वाचा धडा ठरल्या. अनेक देशांनी दहशतवादाचा निषेध केला असला, तरी पाकिस्तानचे थेट नाव घेण्याचे टाळले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नैतिकतेपेक्षा राष्ट्रीय हितसंबंध अधिक महत्त्वाचे ठरतात, हे पुन्हा स्पष्ट झाले. तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील संघर्ष केवळ सीमांपुरते मर्यादित राहणार नाहीत. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती युद्ध, डेटा विश्लेषण आणि आर्थिक शक्ती हे घटकही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे भारताला संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशीकरणावर अधिक भर द्यावा लागणार आहे. आज भारताने संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधिक गांभीर्याने समजून घेतल्याचे मानले जाते. ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रप्रणाली आणि सायबर क्षमता विकसित करणे ही भविष्यातील गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. विश्लेषकांच्या मते, दहशतवाद, भू-राजकारण, आर्थिक ताकद आणि तांत्रिक स्पर्धा आदी घटक आता एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत भारत अधिक आत्मविश्वासाने आणि थेट प्रतिसाद देणाऱ्या रणनीतीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
(अद्वैत फीचर्स)

नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा
ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकातील नविन सार्वजनिक शौचालय, एक्सलेटरच्या कामाला गती देणे, फलाटांवर मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, वैद्यकिय कक्ष कायान्वयित करणे, पावसाळापूर्व कामे तातडीने पुर्ण करणे, दिघा विभागातील इलठणपाडा येथिल रेल्वेच्या मालकीचे `मोगली धरण’ नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करणे आदी विविध विकासकामांना गती देण्यासाठी बुधवार, २० मे रोजी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न झाला. हरिष मीना यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाल्याने पावासात रुळांवर पाणी साचणार नसून मुलुंड दिशेला पादचारी पूलाला मंजूरी मिळाल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच ठाणे पूर्व येथिल सॅटिस पूलावरुन टीएमटीची वाहतूक सुरु होईल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध प्रलंबित प्रश्न, रखडलेली कामे आणि प्रवाशांच्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात संपूर्ण ठाणे स्थानक परिसराची पाहणी केली गेली. त्यानंतर स्टेशन मास्तर यांच्या कक्षात रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनीधी यांची बैठक संपन्न झाली.
डी-मार्टच्या सीएसआर फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता हे कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील सरकत्या जिन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्यालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. लवकरच ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
नवी मुंबई आणि परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या ताब्यात असलेल्या मोगली धरणाचा विषयही बैठकीत उपस्थित करण्यात आला. हे धरण सध्या नादुरुस्त असून रेल्वे प्रशासन त्याचा वापर करत नसल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात हे धरण दिल्यास परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील नगरसेविका सौ. चांदणी विजय चौगुले, अॅड. श्वेता सुभाष काळे, गौरी किशोर आंग्रे यांनी डीआरएम हिरेश मीना यांना लेखी निवेदन बैठकीत दिले.
बी केबिन परिसरातील रहिवशांच्या घरांना निष्कासनाची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. यामुळे स्थानिक नागरिक बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर झाला आहे. आज रेल्वे प्रशासनासमवेत सकारात्मक चर्चा झाली असून कामे तातडीने सुरु होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
यावेळी मध्य रेल्वेचे डीआरएम हिमेश मीना यांनीही सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “ठाणे रेल्वे स्थानकावर विविध प्रकारची विकासकामे सध्या सुरू आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही मोठ्या प्रकल्पांना, विशेषत सॅटीस सारख्या कामांना थोडा वेळ लागणार असला तरी ते कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
ते पुढे म्हणाले, “पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे आणि गाड्या वेळेत सोडणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जे काही अडथळे किंवा समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार माधवी नाईक, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, किरण नाकती, रमाकांत पाटील, विकास पाटील, निखिल बुडजडे, विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, सचिन माने, वृषाली वाघुले, संतोष बोडके, किरण नक्की, ज्येष्ठ शिवसैनिक प्रीतम राजपूत आदी पदाधिकरी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जगण्यातील मूल्य नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा – धर्मगुरू कृष्ण गौर दास
कल्याण : हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. धर्मगुरू कृष्ण गौर दास यांनी ‘हिंदुत्व व सद्यपरिस्थिती’ या विषयावर भाष्य करताना आपल्या संस्कृतीची जोपासना करताना आपण कोणत्याही प्रांतातले असू पण प्रथम आपण हिंदू आहोत हे विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजानेही राम आणि कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. त्यामुळे जगण्यातील मूल्य, शरीराची अंतर्बाह्य जोपासना ही आपल्या ग्रंथानीच होते हे विसरू नका आणि नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी आपल्या विवेचनात संगितले.
डॉ. रुपाली जोशी ‘महिला सशक्तिकरण’ या विषयावर मार्गदर्शन करताना “आजच्या काळात स्त्री एकटी का पडते आणि तिला बाहेर आधार का शोधावा लागतो?” याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. अनिल भालेराव यांनी संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाच्या प्रवासावर आणि भविष्यातील ध्येयांवर प्रकाश टाकला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, आत्मबोध, पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर भाष्य करत त्यांनी प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले.
केवळ व्याख्यानेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कलाप्रकार या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या सुरवातीला गोमाता, भारतमाता यांचे पूजन करून शंखनाद करण्यात आला. नवीन पिढीतील बाल आणि युवा कलाकारांनी नांदी, पोवाडा, शौर्य गीत, बासरी आणि तबला वादन तसेच गणेश वंदना (नृत्य) सादरीकरण केले. योगाभ्यासावरील प्रात्यक्षिक हिमगौरी प्रमोद शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले.
समाजात ऐक्य निर्माण करणे आणि सद्यस्थितीत हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या अध्यक्ष डॉ आशिष एकलहरे, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, रवींद्र वाणी, सचिव प्रमोद शेट्टी, उपसचिव महेश दीक्षित, उपसचिव जयश्री कोलते, कोषध्यक्ष सीए मनोहर नेवे व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
००००००००००००००

यू बिझनेस मिट ने केले होते आयोजन
नवी मुंबई : नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उद्योजकांनी उपस्थित रहात या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड या दोन देशातील व्यवसाय निष्णात प्रभुतींच्या चर्चांमधून अनेक नवनवीन उद्योजक आणि व्यापार संधी उदयास येण्याचे यामुळे चिन्ह निर्माण झाली आहेत.
विविध व्यवसाय आस्थापनांना व्यवसाय सुलभता प्रदान करण्याच्या हेतून यू बिझनेस मिट ही संस्था काम करत असते. फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,मंदार दोंदे, विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्यामध्ये द्विदेशीय व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, फार्मसीटीकल्स, लाइफस्टाइल अँड हेल्थकेअर, बँकिंग, इन्शुरन्स, इंटरनॅशनल मीडिया, रिअल इस्टेट,हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी, टुरिझम अशा क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर, सिटी बेल समूह संपादक मंदार दोंदे यांनी मॉडरेटर म्हणून या पॅनल डिस्कशन मध्ये उत्तमरित्या सुसंवाद घडवून आणला.
यू बिझनेस मिट यांच्या वतीने व्हर्च्युअल स्टुडिओ, मीटिंग रूम आणि एम ओ यू साईन करण्याकरता लीगल टीम देखील तैनात केली होती. अनेक उद्योजकांना या सुविधांचा लाभ झाला. बेलापूर येथील दि पार्क या तारांकित हॉटेलमध्ये सोमवार दिनांक १८ मे रोजी हे समिट संपन्न झाले. आमदार प्रशांत ठाकूर, निलेश म्हात्रे यांनी आवर्जून उपस्थित रहात नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. थायलंड येथून PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश हे उपस्थित होते तर इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ थायलंडचे संचालक तथा PEITA चे सल्लागार प्रो. डॉ. चियांचुंग ओदि कलायांनामित्र, थायलंड पंतप्रधान कार्यालयातील फॉरेन अफेयर्स सचिव प्रसर्त पियासाचादेश, वर्ल्ड पीस फाउंडेशनच्या संस्थापिका पी.ओरावान हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत होते.
एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव असणारे ओमकार हरी माळी यांची चित्तरंजन टेंभेकर यांनी घेतलेली मुलाखत या समिटचे विशेष आकर्षण ठरली. तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांची रवींद्र प्रताप गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत देखील लक्षवेधी ठरली. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक डॉक्टर संजय भिडे, ह्यूमन केअर वर्ल्ड वाईड चे डी एस चक्रवर्ती, गोमाता विजन चे विकास कोळी, यू के एस रिसॉर्ट चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संतोष पाटील, तेरणा हॉस्पिटलचे हेल्थकेअर ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट डॉक्टर मनीष राय, निवृत्त महासंचालक यशवंत ठाकरे, विभव इंटरनॅशनल कल्चरल अँड एज्युकेशनल फोरम चे दिलीप ठाणेकर,टेलेक्स चे जितेश पाटील आणि जयेश पाटील, प्लास्टिक सर्जन तथा कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ शंकर सावंत यांनी ग्लोबल समिट आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
यु बिझनेस मीट चे फाउंडर आणि एन्जॉय को वर्किंग स्पेस, वेब प्रिंट सोल्युशन्स या संस्थांचे संचालक असणारे वैभव सोनटक्के यांनी या समिटच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. तर या ग्लोबल बिझनेस समिट चे आयोजनात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समृद्धी वाणी यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
००००००००००००
कल्याण: विद्या प्रसारक मंडळाचे आर झेड शाह महाविद्यालात मोठ्या दिमाखात वार्षिक दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली. तसेच मुबई विद्यापीठाचे डी.एल.एल.इ प्रमुख प्रोफेसर बळीराम गायकवाड यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
संस्थेचे चेअरमन तसेच दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष रमेश चीनीवर यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाच्या परीक्षा प्रमुख डॉ. सुजाता गुडी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचा रिपोर्ट सादर करण्यात आला. यावेळी संस्थेचे ट्रेझरर प्रमोद मुलगुंड, सेक्रेटरी दत्तात्रय मुळे, सदस्य अजित देशपांडे तसेच कुलसचिव मंगेश कोरडे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या द्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणाने संबोधित करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालाच्या वार्षिक पत्रिकेचा वितरण सोहळा पार पडला.
महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान तसेच विविध शाखांमधून सर्वोच्च अंक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणांच्या करकमलाने मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. दीक्षांत सोहळ्यात उपस्थित सर्व प्राध्यापकवर्ग, उप प्राचार्य अन्जेनिका उदय, विलास महाजन, प्रा. राजश्री प्रभू, प्रा.युवराज वाघ, प्रा.प्रतिभा जितेश, डॉ. ओम देवानी, प्रा. प्राची रावराणे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग सर्व विद्यार्थी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे कार्यक्रमात सहभागी व्यक्तींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे कुलसचिव मंगेश कोरडे तसेच डॉ. ज्योती थोरात यांच्या द्वारे करण्यात आले.
०००००००००००००

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे अनुकरण इतर महापालिकांनी करावे – मुकेश सारवान
ठाणे (२०) : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, उपाआयुक्त जितेंद्र निकम, डॉ. मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या वतीने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी १० कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरे, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणे, आरोग्य विषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यत वारसाहक्काने दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली.
सफाई कर्मचारी हा महत्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केली त्या निवेदनांवर १५ दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचात्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

मुकुंद रांजणे (माथेरान)
माथेरानच्या निसर्गावर निस्सीम प्रेम असणारे भूमिपुत्र राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरण प्रेमी अवलिया अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून प्लास्टिक बाटल्या, रपेर्स, तसेच अन्य प्लास्टिक जन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगार यांच्या मार्फत योग्य स्थळी हलविण्यात येत आहे. त्यांच्या या निस्सीम कार्याची दखल घेऊन गोवा येथील
लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश विलास कोकळे यांचा १९ रोजी गोवा राज्यात स्वच्छतेच्या कार्याबद्दल विशेष सत्कार पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच एक्स BARC शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शरद काळे तसेच लायन्स क्लबचे मुर्तुजा ताहेर माथेरानवाला यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राकेश कोकळे हा एक ध्येयवेडा असून त्याचा स्वच्छता बाबतीत खूपच कटाक्ष आहे. प्रत्येक पॉईंट्स वर जाऊन तेथील जंगल भागातील परिसराची पाहणी करून जेवढ्या प्रमाणात प्लास्टिक जन्य कचरा असेल तो गोळा करण्यासाठी आपल्या मित्र परिवार सोबत नेहमीच तत्पर असतो त्याच्या या निस्वार्थ कृतीचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
००००००००००
