13 July Bitambatmi All pages

Open Book

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी. ) स्थापन करण्याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच  उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.  राणे यांनी यावेळी  एमआयडीसीबाबत मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात प्रगत असला तरी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अजूनही खूप वाव आहे. नाधवडे परिसरातील उपलब्ध शासकीय जमीन, आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता लक्षात घेता येथे नवीन एम.आय. डी. सी. विकसित करणे गरजेचे आहे.
त्यामुळे, मौजे नाधवडे येथील शासकीय जागेवर औद्योगिक वसाहतीची  स्थापना झाल्यास सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल आणि जिल्ह्यातील युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. तसेच सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. निवेदन देतेवेळी नाधवडेचे सुपुत्र, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर उपस्थित होते.

अनिल ठाणेकर
ठाणे-कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रासी चाळ येथे काल घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. यावेळी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १२ वर्षीय बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली.
ही चाळ सुमारे २५ ते ३० वर्षे जुनी असून, पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी पाहणीदरम्यान आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती काळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करून दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली. जखमींना तातडीने सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, मृत बालकाच्या कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत द्यावी तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी परिसरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचे तातडीने संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशीही भूमिका त्यांनी मांडली. दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या दुःखात आपण पूर्णपणे सहभागी असून त्यांना न्याय आणि आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, असा विश्वास आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.

मुळदेत कार्प मत्स्यबीज निर्मितीला वेग…!
कुडाळ : गोडया पाण्यातील मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी यांनी १० जुलै १९७० रोजी पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्प मत्स्यबीज निमिर्तीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन- २००१ पासून १० जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धेाडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देऊन पार पडला. यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय दळवी,  मत्स्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. कल्पेश शिंदे,  सहाय्यक प्राध्यापक,  डॉ. कृपेश सावंत, सहाय्यक प्राध्यापक, विनय सहस्रबुद्धे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, डॉ.वाघ,  डॉ. शेडगे, डॉ. गावडे आणि मत्स्य प्रकल्पातील कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
उद्यानविदया महाविद्यालय, मुळदे अंतर्गत मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प कार्यान्वित असून येथे गोडया पाण्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य शेती यासंबधी संशोधन कार्य तसेच विस्तार शिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सिंधुदुर्ग जिल्हयातील गोडया पाण्यातील मत्स्यशेती व शोभिवंत मत्स्यशेतीला विकसित करण्यासाठी  शासनामार्फत राबविल्या जाणा-या  मत्स्यशेतीसंबधीत निधी वितरण योजनाच्या सहाय्याने  विविध प्रकल्प या केंद्रामध्ये राबविण्यात येत आहेत.  या अनुषंगाने गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा विकास होण्याकरीता सुयोग्य आकाराच्या व उत्तम गुणवत्तेच्या कार्प मत्स्यबीजाचे सातत्यपूर्ण उत्पादन करुन मत्स्यबीजाची मागणी व पूरवठा यांमधील दरी भरून काढण्याच्या उद्दिष्टाने सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत कार्प मत्स्यबीज केंद्र स्थापन करणे हा प्रकल्प मुळदे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे.
याव्दारे निर्माण करण्यात आलेल्या विविध साधनसामग्रीचा विनियोग करुन प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करुन कटला,रोहू प्रजातीच्या मत्स्यबीजाची निर्मिती करण्यात येते व सदर मत्स्य बीज विविध आकारमानामध्ये संवर्धित करुन मत्स्यशेती करणा-या शेतकऱ्यांना पुरविण्यात येते. यामध्ये प्राधान्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच याव्यतिरिक्त मागणीनुसार कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमधील शेतक-यांचा समावेश आहे.
0000000

  प्रताप सरनाईक यांची अनोखी लोकसेवा
अनिल ठाणेकर
ठाणे, आषाढी वारी ही केवळ पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची यात्रा नसून, ती लाखो भाविकांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावविश्वाला जोडणारी अखंड जीवनयात्रा आहे. या यात्रेत अनेक वारकरी दिवसन्-दिवस पायी चालत असतात. अशा वेळी त्यांच्या हातातील मोबाईल बंद पडला, तर केवळ एक उपकरण बंद होत नाही, तर त्यांच्या घरच्यांशी असलेला संवादही तुटतो. याच भावनेची जाणीव ठेवत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५ अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन तयार करून त्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केल्या आहेत.
या मोबाईल चार्जिंग व्हॅन युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून वारीसोबत सातत्याने प्रवास करत आहेत. गरजेनुसार प्रत्येक वारकऱ्याला पूर्णपणे मोफत आणि अल्पावधीत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एका वेळी १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता असलेल्या या व्हॅनमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात. घरच्यांना केवळ एक फोन करून “मी सुखरूप आहे” एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते. मोबाईल चार्ज असल्यामुळे वारकरी आपल्या कुटुंबीयांशी २४ तास संपर्कात राहू शकतात, त्यांच्या मनातील काळजी दूर होते आणि वारीचा आनंद अधिक निश्चिंतपणे अनुभवता येतो.
या उपक्रमाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “वारी ही सेवाभावाची परंपरा आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. त्यांच्या हातातील मोबाईल चालू राहिला, तर त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य कायम राहील. ही सुविधा केवळ मोबाईल चार्ज करण्याची नाही, तर माणसामाणसांतील नाती, आपुलकी आणि विश्वास जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.”
विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि सेवाभावाच्या या अनोख्या उपक्रमामुळे प्रताप सरनाईक यांनी वारकऱ्यांच्या यात्रेत आणखी एक भावनिक आणि माणुसकीचा अध्याय जोडला आहे. श्रद्धेच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारी ही सेवा वारीतील लोकसेवेचा आदर्श ठरत आहे.

 अयोद्धेतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणी आंदोलन
कल्याण : अयोध्येतील कथित राममंदिर चोरी प्रकरणी कल्याण काँग्रेसच्या वतीने कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरा समोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राम, लक्ष्मण सीतेच्या वेशात आंदोलनात सहभाग घेतला व हनुमान मंदिरात आरती करण्यात आली.  तर यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढत संबंधितांवर कारवाई करण्याचा मागणीचे निवेदन देण्यात आले.
देशातील 142 कोटी जनतेने जी देणगी दिली या देणगीतून हे राम मंदिर बांधण्यात आले असून त्यात करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे.  त्यासाठी नेमण्यात आलेली कमिटी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमली होती. यांची सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीस कडून चौकशी करण्यात यावी. यामध्ये जेवढे दोषी असतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचप्रमाणे देशभरात जेवढी देवस्थाने आहेत त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्यासह इफ्तेकार खान, चंदर पांडे, रणजित डांगळे, आजम शेख, श्रेयस सिंग, रीना खांडेकर, कट्टीमणी शिवलिंगा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

– ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी पाठोपाठ आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा दिसून आला आहे.
वास्तविक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत झाली असली, तरीही बहुजन विकास आघाडीचे बँकेवर वर्षानुवर्षे असणारे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांचे उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये उभे केले होते. या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीचे दोन्ही पॅनलमध्ये मिळून १४ उमेदवार निवडून आल्याने अध्यक्षपदावर कोणाचा उमेदवार निवडून येतो हे पाहणे रंजक ठरले होते.
या रंजक राजकीय अंकानंतर झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीचे १४ तर बहुजन विकास आघाडीचे ७ उमेदवार यांनी मतदान केले. विशेष म्हणजे निवडणुकीतील पॅनलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र एकजूट दिसून आली, हा रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे एक मत फुटल्याने एकनाथ शिंदे यांना हादरा बसला आहे.
थोडक्यात, या राजकीय नाट्यानंतर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भाजपा- शिवसेना महायुतीकडे गेले आहे. अखेर बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील यांची तसेच उपाध्यक्ष पदी भाग्यश्री निलेश भोईर यांची निवड झाली आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व उलथवण्यात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे या जोडीला यश आलं आहे.
00000000

– पनवेल तालुका कृषी विभागाचा दिलासादायक उपक्रम
राज भंडारी
पनवेल : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात बियाण्यांची पेरणी बाधित झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाच्या सततच्या तडाख्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली. ही परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल तालुका कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेत यू.एन.डी.पी. अंतर्गत भात बियाण्यांची मागणी केली.
पनवेल तालुका कृषी विभागाच्या या मागणीनुसार महाबीजकडून भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
या संपूर्ण उपक्रमात पनवेल तालुका कृषी अधिकारी श्री. हेगडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक प्रसाद पाटील यांनी शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून बियाणे वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली. तसेच गुळसुंदे येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी स्थानिक स्तरावर समन्वय साधत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
याशिवाय गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी जगताप तसेच ग्रामपंचायत लेखनिक नंदकुमार नवरंगे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे, वितरणाचे नियोजन करणे आणि आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देणे यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शासन, कृषी विभाग आणि महाबीज यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात वेळेवर उपलब्ध झालेल्या भात बियाण्यांमुळे पुन्हा पेरणी करणे शक्य होणार असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पनवेल तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीविषयक कोणतीही अडचण असल्यास संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
००००००००

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे कामगार नेत्यांच्या बैठकीत सचिवांना निर्देश
(राजेंद्र साळसकर)
मुंबई : केंद्र सरकारच्या चार नवीन श्रम संहितांच्या अनुषंगाने राज्य शासनाने तयार केलेल्या चार मसुदा नियमावलींवर कामगार व कर्मचारी संघटनांशी सखोल चर्चा करून त्यांचा एकत्रित अहवाल केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे पाठवावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी कामगार विभागाला दिले.
भारत सरकारच्या नवीन श्रम संहितांनुसार तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती नियम आणि महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम या चारही नियमावलींवर कामगार विभागाच्या चार स्वतंत्र तज्ज्ञ समित्यांनी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीसोबत सविस्तर चर्चा करावी. कामगार संघटनांची मते, हरकती व सूचना पूर्णपणे जाणून घेतल्यानंतरच संयुक्त अहवाल तयार करून तो केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे पाठवावा, असे मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नावर शुक्रवारी (३ जुलै) आझाद मैदान येथे कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात इंटक, एचएमएस, आयटक, सीटू, आयसीसीटीयू, भारतीय कामगार सेना, टीयूसीआय तसेच बँक, विमा, गिरणी कामगार, अंगणवाडी, आशा सेविका, घरेलू कामगार आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीला कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, स्वप्नील कापडणीस, रोशनी कदम यांच्यासह संयुक्त कृती समितीअंतर्गत महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी, सचिव मुकेश तिगोटे, एचएमएसचे संजय वढावकर, निवृत्ती धुमाळ, आयटकचे कॉ. सुकुमार दामले, सिटूचे कॉ. विवेक माँटेरो, कॉ. उदय भट, भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके आदी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री फुंडकर म्हणाले की, नवीन श्रम संहितांची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यासाठी मसुदा नियमावली जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवण्यासाठी चार स्वतंत्र तज्ज्ञ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
तज्ज्ञ समित्यांनी संयुक्त कृती समितीशी समन्वय साधून प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करावी. ही प्रक्रिया केवळ औपचारिक न राहता परिणामकारक व्हावी, यासाठी कामगार विभागाने तातडीने बैठकींचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कामगार संघटनांकडून मांडण्यात आलेल्या सर्व रास्त मागण्या, सूचना आणि आक्षेपांची नोंद घेऊन त्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल. कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा अबाधित राहील, याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल, अशी ग्वाहीही मंत्री फुंडकर यांनी दिली.
तज्ज्ञ समित्या आणि कामगार संघटनांमधील चर्चेनंतर प्राप्त झालेल्या सूचना व निष्कर्षांचा समावेश करून सर्वसमावेशक संयुक्त अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर पुढील मंजुरी व कार्यवाहीसाठी हा अहवाल केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत विविध कामगार नेत्यांनीही कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि मागण्या मांडल्या.

 मुंबई विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करावी – मनविसे
( राजेंद्र साळसकर )
मुंबई – मुंबई विद्यापीठाने प्रा. डॉ. किशोर गायकवाड यांच्या समितीने सुमारे पाच वर्षांपूर्वी सादर केलेल्या कथित वाङ्मयचौर्य (Plagiarism) प्रकरणातील चौकशी अहवाल, दोषनिश्चिती व त्यानंतर झालेल्या शिस्तभंगात्मक कारवाईबाबत आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. या विलंबामुळे शैक्षणिक प्रामाणिकता, पारदर्शकता आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्ड यांनी केला आहे.
मनविसेच्या मते, या प्रकरणात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी आजपर्यंत कोणती भूमिका घेतली, चौकशी अहवाल अद्याप का जाहीर करण्यात आलेला नाही, चौकशी पूर्ण झाली असल्यास तो सार्वजनिक का करण्यात येत नाही आणि चौकशी प्रलंबित असल्यास त्यास जबाबदार कोण, याबाबत विद्यापीठाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे. यासंदर्भात मनविसेने मुंबई विद्यापीठाकडे पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत—
१) प्रा. संदेश वाघ यांच्या कथित वाङ्मयचौर्य प्रकरणातील चौकशीची सद्यस्थिती काय आहे?
२). संस्थात्मक शैक्षणिक प्रामाणिकता समिती (Institutional Academic Integrity Panel) व संबंधित प्राधिकरणाने या प्रकरणात कोणते निष्कर्ष नोंदविले आहेत?
३)संबंधित प्रकरणात कोणती शिस्तभंगात्मक अथवा प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे?
४) चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यास कोणता कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा आहे?
याबाबत समाधानकारक खुलासा व आवश्यक कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही मनविसेने दिला आहे. मुंबई विद्यापीठ हे राज्यातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असल्याने वाङ्मयचौर्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मौन बाळगण्याऐवजी पारदर्शक, उत्तरदायी आणि कायदेशीर भूमिका घेणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे मनविसेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *