महापौर सुजाता पाटील यांनी केली दुर्घटना स्थळांची व नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी

नवी मुंबई : पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा फिल्डवर जाऊन घेताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तेथील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
४ जुलैला से – १९ शहाबाज गाव, बेलापूर येथील अविघ्न सोसायटी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब पडण्याची घटना घडलेली आहे. या इमारतीमध्ये १७ कुटूंब वास्तव्यास होती. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून या कुटुंबांना महापालिकेच्या वारकरी भवन, बेलापूर येथील तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यापैकी काही कुटुंबे त्यांच्या नातेवाईकांकडे गेली असून एक कुटुंब निवारा केंद्रामध्ये आहे. सदर इमारतीच्या ठिकाणी भेट देत तेथे उपस्थित असलेल्या इमारतीतील रहिवाशांशी महापौरांनी संवाद साधला. यावेळी रहिवाशांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावर महापौरांनी इमारतीची महापालिकेमार्फत स्ट्रक्चरल तपासणी झाल्यानंतर घरामध्ये असलेले त्यांचे आवश्यक सामान  काढण्यासाठी परवानगी देता येईल असे सांगितले. जेणेकरुन इमारतीत गेल्यानंतर आणखी काही दुर्घटना घडायला नको. याकरिता सर्व रहिवाशांनी सहकार्य करावे असेही आवाहन महापौरांनी केले. महापालिकेने तत्परतेने स्ट्रक्चरल तपासणी करुन घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या ठिकाणी उपायुक्त डॉ.अमोल पालवे व सहा.आयुक्त प्रशांत नेरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
00000000

डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रदूषणाचा गंभीर प्रकार उघड
कल्याण : एमआयडीसी परिसरात मुख्य गटारातून ओव्हरफ्लो होऊन निळ्या रंगाचं रासायनिक पाणी थेट रस्त्यावर वाहताना आढळलं. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा कल्याण जिल्हा सचिव आशुतोष सिंह यांनी दिला आहे. यावेळी भाजप जिल्हा सचिव दुर्गेश चव्हाण, भाजयुमो जिल्हा सचिव अभिषेक यादव उपस्थित होते.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा आणि  तुंबापुरी झालेल्या भागाचा दौरा करीत परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गटारे, नाले, तुंबल्याने  सखल भागात पाणी शिरले. या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर आँन फिल्डवर उतरत त्यांनी शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मांडा पश्चिम, टिटवाळा पुर्व, इंदिरानगर, बल्याणी परिसराचा आधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी समवेत पाहणी  केली. यावेळी सखल भागात पाणी शिरल्याचा तसेच नाले, गटारे यांचा पाण्याचा निचारा होण्यासाठी तातडीने मार्ग काढण्याच्या सुचना केल्या. तसेच जेसीबीच्या सहाय्याने प्रवाह मोकळा करून पाण्याचा निचारा होईल, याकडे भर दिला. तसेच नाल्यांच्या काठावर झालेली अनाधिकृत अतिक्रमणे, अनाधिकृत भराव  तातडीने काढून टाकण्याच्या सुचना सहाय्यक आयुक्तांना केल्या.
तसेच सखल भागात पाणी शिरल्याने त्या परिसरात प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांच्या पथका मार्फत ५०० जेवणाचे पाकिटं तसेच पाणीबॉटल वाटण्यात आले. तसेच डोंबिवली लोधा हेवन गावदेवी चौक येथे झालेल्या अपघाताची पाहणी करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला रुग्णालयात जाऊन दुखापतीची चौकशी करून डॉक्टरांना आदेश करून तत्काळ निवारण करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या  कॅन्सर रुग्णालयाच्या बेसमेंटसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे शेजारील दोन इमारतींजवळील संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने याठिकाणचा देखील पाहणी दौरा करण्यात आला.

कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील खंडित झालेल्या सुमारे ६ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा भर पावसात महावितरण कडून सुरळीत करण्यात आला आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काका धाबा परिसर, आरवली, ढोकळी, तिसवली, नांदीवली, हाजी मलंग परिसरात मुसळधार पावसामुळे खोल भागात पाणी जमा झाल्याने भूमीगत वीज वाहिन्यांना इजा होऊन अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा  तात्पुरता बंद करण्यात आला होता.
वरील परिसरात एकुण १८ वीज रोहित्रांना मुसळधार पावसाचा फटका बसला. परिणामी सहा हजार वीज ग्राहक अंधारात होते. पुराचे पाणी ओसरल्यावर पण पाऊस सुरू असताना टप्याटप्याने खंडीत झालेला वीज पुरवठा रविवारी सायंकाळी सुरू करण्यात आला.
सखोल भागात पाणी जमा झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण कडून तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्यात येतो. पुराचे पाणी ओसरल्यावर वीज यंत्रणेची तपासणी करून नंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येतो. यंदा उन्हाळ्यात अती तापमानामुळे वीज वाहिन्यावर ताण वाढला. अचानक अतीवृष्टीमुळे भूमीगत वीज वाहिनीत बिघाड झाला असे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांची मागणी
कल्याण : जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्यात १ मे ते १५ जून या अधिकृत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत जनगणना कार्य करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना तात्काळ मानधन अदा करावे तसेच नियमानुसार बदली रजा मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हजारो शिक्षकांनी स्वतःच्या वैधानिक उन्हाळी सुट्टीचा त्याग करून घरसूचीकरण, क्षेत्रीय पडताळणी, माहिती संकलन, पर्यवेक्षण तसेच जनगणना विभागाने सोपविलेली विविध कामे अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली. त्यांच्या योगदानामुळे जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण होण्यास मोठी मदत झाली. भारताचे महापंजीयक व जनगणना आयुक्त यांनी २५ जूनला सर्व राज्यांना जनगणना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मानधन कोणत्याही विलंबा शिवाय अदा करण्याचे निर्देश दिले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑक्टोबर २०१० च्या परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्टीत जनगणना कार्य करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा देण्याची स्पष्ट तरतूद असून, संबंधित शैक्षणिक वर्षात ती घेणे शक्य नसल्यास अर्जित रजा खात्यात जमा करण्याची व्यवस्था असल्याचे घागस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ मध्ये उन्हाळी सुट्टीत प्रत्यक्ष कार्य केलेल्या सर्व शिक्षकांना मंजूर मानधन तात्काळ अदा करावे, कोणताही पात्र शिक्षक लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी तसेच सर्व पात्र शिक्षकांना नियमानुसार बदली रजा मंजूर करण्याचे आदेश तातडीने निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“जनगणना हे राष्ट्रहिताचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून शिक्षकांनी नेहमीच शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखत शासनाने न्याय्य व सकारात्मक निर्णय घ्यावा,” असेही राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी निवेदनात म्हटले आहे. तर “शिक्षकांनी राष्ट्रहितासाठी स्वतःच्या उन्हाळी सुट्टीचा त्याग करून जनगणना-२०२७ चे कार्य निःस्वार्थपणे पूर्ण केले आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान म्हणून मानधन आणि बदली रजा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून नैतिक बांधिलकीही आहे. शासनाने याबाबत तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना कल्याण-डोंबिवली महानगर जिल्हा कार्यवाह थॉमस शिनगारे यांनी दिली.

पूरग्रस्त व बाधित भागांची पाहणी, नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी
सुनिल इंगळे
उल्हासनगर : शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे तसेच इतर आपत्कालीन घटनांची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी पडलेली झाडे हटविणे, धोकादायक फांद्या बाजूला करणे, वीजवाहिन्यांवरील अडथळे दूर करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, वालधोनी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठील सखल भागांतील काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी संबंधित परिसरांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच महानगरपालिका आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास दिला. आवश्यकतेनुसार तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळून घरांवरील पत्र्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाची मदत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशीही त्यांनी विनंती केली.
यावेळी नागरिकांना मुसळधार पावसाच्या काळात कोणताही धोका पत्करू नये, तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून, ओढ्यांपासून तसेच धोकादायक झाडे व वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कुठेही झाड पडण्याचा धोका, वीजवाहिन्यांवर झाडे, पाणी साचणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणा २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असून प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका पत्करू नका. तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्या. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा आपल्या मदतीसाठी २४ तास सज्ज आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केले.


‘एसआयआर’ मोहिमेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी
मुंबई: राज्यात सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीचा ३१ जुलैपर्यंतचा कालावधी अपुरा आहे. त्यात जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग मिळण्यासाठी त्या मोहिमेला सप्टेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनीअर्स असोसिशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पश्चिम बंगालमधील २७ लाख मतदारांपाठोपाठ ओडिशात २० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच १७ लाख लोकसंख्या असलेल्या गोवा राज्यातही दीड लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. बाद करण्यात येणाऱ्या मतदारांची वाढती  संख्या अविश्वसनीय आणि चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी निमित्त संविधान जागर अभियानतर्फे जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात रामटेके यांचा विशेष पुढाकार आहे. त्या मोहिमेद्वारे ‘एसआयआर’मध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदानाचा अधिकार जपा; लोकशाही बळकट करा, असे आवाहन थेट संपर्कातून केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात पेरणीच्या कामासाठी शेतकरी आणि शेतमजूर हे गावात घरी सापडत नाहीत. ते शेतावर जातात. त्यामुळे गावात ‘बीएलओ’ आणि त्यांची भेट होणे कठीण आहे, असे कुलदीप रामटेके म्हणाले. खेड्यापाड्यातील गावकरी बांधवांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड फोन नसतात.
आवश्यक कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीपासून ग्रामीण मतदार मोठ्या संख्येने वंचित राहण्याचा आणि यादीतून बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे सांगत एसआयआर मोहिमेला सप्टेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ मिळण्याची नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

 महिलेसह चारजण जखमी
मिरा -भाईंदर : काशिमीरा येथील एका निर्माणधीन बिल्डिंगमधून आज बैठ्या चाळीतील घरावर पेवर ब्लॉक कोसळला. यात एका महिलेसह चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  पावसाच्या पाण्याने सगळीकडे पाणी भरलेल्ले असताना आज या चाळीवर दुहेरी संकट कोसळले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे आज सकाळी पेवर ब्लॉक घरावरील पत्र्यावर पडला. पत्रा तोडून आत आलेल्या या ब्लॉकमुळे एका महिलेसह चार जण जखमी झाले. पहाटेच्या झोपेत असल्याने त्यांना सावरता आले नाही. मिरा गावठाण मधील विघ्नहर्ता ही बिल्डिंग निर्माणधीन असून लगतच्या हरिधाम सोसायटीतील चाळीतील घरावर हार्दिक ब्लॉक पडला. बिल्डर तसेच संबंधितांवर निष्काळजीपणाबद्दल कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

वृत्त प्रसारित होताच होताच प्रशासन जागे;
सुरक्षिततेसाठी निवारा केंद्रात हलविण्याचा प्रस्ताव
कल्याण : टिटवाळ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरानगर स्मशानभूमी रस्त्यावरील पालांडे चाळ परिसरात पाणी साचण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील चाळ क्रमांक ३, खोली क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय सखूबाई मुरलीधर हिरे यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांना स्वतःच घरातील पाणी बाहेर काढावे लागले. या घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तसेच  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर केडीएमसी प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
एकट्याच वास्तव्यास असलेल्या सखूबाई हिरे यांना सतत घरात शिरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयाच्या या टप्प्यावरही घरातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसून येते. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सखूबाई हिरे यांची विचारपूस करण्यात आली तसेच त्यांना बिस्किटे व अन्य आवश्यक साहित्य देण्यात आले. वृद्ध महिलेची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याची विनंतीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय, केडीएमसीचे सहायक आयुक्त जयवंत चौधरी हेही पालांडे चाळ परिसराची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर होणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पालांडे चाळ परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे केवळ पाहणी आणि तात्पुरत्या मदतीवर न थांबता प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारून या भागातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याची गरज असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने शंभर टक्के यश संपादन करुन ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांना ४८४ पैकी ३६६ मते मिळाली. त्या निमित्ताने अध्यक्ष संदीप चव्हाण आणि  उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या स्वाती घोसाळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मनोहर विचारे प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक  अध्यक्ष अजय विचारे यांनी सत्कार केला. डावीकडून दुसऱ्या  प्रतिष्ठानाच्या मानद सचिव पूर्णिमा कोटीयन सुद्धा उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *