सुनिल इंगळे
उल्हासनगर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या १० लाख मोफत वही वाटप उपक्रमा अंतर्गत,नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा, शिवनेरी नगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई), उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद सालेकर, विभागप्रमुख प्रमोद पाण्डेय, विभाग संघटक आदेश पाटील, युवासेना उल्हासनगर संपर्क प्रमुख तुषार बांदल, विजय इंजे, प्रदीप आयरे, अनंत सावंत, अरुण कोळी तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व समस्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शिक्षण हीच खरी ताकद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध!” असलायचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी सांगितले.
०००००००
डॉ. अशोक ढवळे यांची घोषणा
अनिल ठाणेकर
ठाणे, शेतकरी, कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांवर १० ऑगस्ट रोजी देशभर प्रत्येक जिल्हा स्तरावर होत असलेले जेल भरो आंदोलन श्रमिकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संघर्ष ठरणार आहे. १० ऑगस्टच्या या लढ्यात संपूर्ण ताकदीने सामील होण्याचे आवाहन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्थीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी केले आहे.
अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे २८ व २९ जून रोजी संपन्न झाली. सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात तीव्र झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची दोन दिवस सखोल चर्चा केल्यानंतर किसान सभेने हे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी शेतकऱ्यांचा देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक दिली आहे.
शेतीमालाचे पडलेले भाव, वाढता उत्पादन खर्च, पीक विमा, जमीन अधिग्रहण, खतांची कमतरता, फसव्या कर्जमाफी योजना, अन्न महामंडळाचे महत्व संपवण्याचे कारस्थान, ऊस दर, भारत अमेरिका, भारत युरोप, व भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे भारतीय शेतीवरील दुष्परिणाम इत्यादी प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या व श्रमिकांच्या इतर प्रश्नांवर देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर इतर शेतकरी संघटनांना एकत्र करत शेतकरी संघटनांची देशव्यापी एकजूट मजबूत करण्याची आवश्यकता आहे. २८ जुलै रोजी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व संघर्ष तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत घेण्यात येणार असून यात किसान सभा सहभागी होऊन आपले योगदान देईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शेतकरी एकजुटीला श्रमिक एकजुटीत परिवर्तित करून सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार संघटनांची २९ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवर होत असलेली संघर्ष परिषद यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
किसान सभेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची हाक यावेळी देण्यात आली.१५ नोव्हेंबर रोजी हुतात्मा बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभेचे ध्वजारोहण करून देशातील हजारो गावांत शेतकरी प्रश्नांवर सभा, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ नोव्हेंबर २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे होत असून याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकरी आंदोलनाला आणखी चालना मिळेल असा विश्वास देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला.
००००००
ठाणे- दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र – मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ३२ व्या वार्षिक समता संस्कार शिबिराच्या समारोपात काढले.
संस्थेचे कार्यकर्ते अक्षता दंडवते, किशन सिंग बेदी, ओम गायकवाड, एनॉक कोलियार, अजय भोसले, मयूर बने यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन मेहनत केली. संस्थेचे हितचिंतक शरद जोशी, संध्या धारडे, संगीता धनुकटे, सुप्रिया कर्णिक, विनीता मोकाशी, प्रशांत पाटील, सहभागी एकलव्यांचे पालक आदिनी शिबिराला भेट देऊन मुलांचे अभिनंदन केले.
समता विचार प्रसारक संस्थेने येऊरच्या निसर्ग समृद्ध वातावरणात हे चार दिवसीय युवा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले होते. संजय मं गो पुढे म्हणाले, “शिबिरातील स्त्री – पुरुष संबंध, मुली मुलांमधील प्रेम व आकर्षण या सत्रांमधून तुम्हाला तुमची आई, बहीण व मैत्रीण यांच्याकडे पाहण्याचा जो समतेचा दृष्टीकोन मिळाला आहे तो कधीच विसरु नका. जसं जगण्यासाठी अन्न आवश्यक असलं तरी आपण ठराविक वेळी व प्रमाणात खातो तसेच मोबाईल सोबत वागा. दिवसांची ठराविक वेळच मोबाईल हातात घ्या. त्या वेळात वर्तमानपत्र, अवांतर पुस्तकं वाचा, चांगल्या फिल्म्स पहा. आपल्या परिसरातील अनेक समस्या तुम्ही मांडल्यात. आता त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या! आपल्या करियरविषयी अधिक पर्यायांचा विचार करा.
यावेळी शिबिरार्थींनीही मनोगतात शिबिर अनुभव अविस्मरणीय आहेत. आम्हांला खूप महत्वाचे ज्ञान शिबिरातून मिळाले, हे आवर्जून सांगितले. पालकांनीही आम्हा सामान्य परिस्थितीत जगणाऱ्यांच्या घरातील मुली – मुलांसाठी संस्था करत असलेल्या धडपडीसाठी आभार व्यक्त केले. संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी यांनी मुलांना शिबिरात मिळालेली शिकवण लक्षात ठेऊन त्या प्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संस्थेच्या सचिव लतिका सु. मो. यानी मुलांना संस्थेच्या कार्यक्रमांशी जोडून रहा असे सांगत संस्थेच्या पुस्तक पेढी उपक्रमाची माहिती दिली.
या वर्षीचे हे युवा शिबिर एकलव्य गौरव पुरस्कार प्राप्त एकलव्यांनी आणि वंचितांच्या रंगमंचाच्या कलाकारांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साही वातावरणात आणि संस्थेची माजी एकलव्य दिपाली सावंत आणि संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांच्या संयोजनात संपन्न झालं. संस्थेच्या संस्थापनात सक्रिय असलेले बिरपाल भाल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी उद्घाटनाच्या सत्रात मुलांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली. या वेळी ठाणे शहरातील किसन नगर, येऊर, मानपाडा, धर्मवीर नगर या वस्तीतील विद्यार्थ्यांबरोबरच घणसोली, काल्हेर, केवणी – दिवे येथील आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांची वैचारिक, सामाजिक आणि कलात्मकतेची जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने खेळ, कार्यशाळा, व्याख्याने, गट – चर्चा आणि नाटिकांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या साठी अनेक तज्ज्ञ व्यक्ती शिबिरार्थींशी संवाद करायला आले होते.
राजेंद्र बहाळकर यांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मित्र – मैत्रिणींशी निखळ मैत्रीच्या दृष्टीने खेळकरपणे समजुतीने कसे राहायचे, मोबाईल फ़ोन, सोशल माध्यमांचा प्रभावावर मात करून टेन्शन फ्री पण ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कसे करायचे या बद्दल खूप प्रभावीपणाने दाखवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बुवांच्या चमत्कारांमागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितले. जादूटोणा, करणी, भूताखेतांच्या गोष्टींमागचा खोटेपणा प्रयोगांद्वारे उघड करून मुलांच्या विचारात बदल घडवून आणला.
आरती नाईक यांनी शरीर विज्ञानामध्ये स्त्री – पुरुषांच्या शारिरीक जडणं घडणीची शास्त्रीय माहिती दिली. वयात येताना प्रकर्षाने जाणवणाऱ्या आकर्षण, प्रेम आणि सेक्स या विषयांवरही त्यांनी शिबिरार्थींना सविस्तर माहिती दिली. मुलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारत मोकळेपणाने चर्चा केली.सतीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पुढे घेता येऊ शकणाऱ्या विविध करियर निवडींबद्दल माहिती सांगत विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली.मकरंद जोशी यांनी मुलांना अल्गोरिदमची माहिती आणि महत्व समजावून सांगत ते आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अनुभवाशी कसे निगडित आहे हे अतिशय छान समजावून सांगितले.
आसावरी जोशी यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ वस्तू हस्तकलेने कसा साध्य करू शकतो हे शिकवलं आणि मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनात कागदाच्या वस्तू बनवल्या. सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी नाट्य कार्यशाळा घेऊन मुलांना नाटक या कलेबद्दल माहिती दिली आणि त्यांचे ४ गट पाडून त्या गटांची ४ छोटी नाटकं बसवण्याची तयारी केली. मुलांनी या नाटकांची तालीम करून ती बसवली आणि शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
००००००००

शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा – महापौर ॲड. हर्षाली चौधरी
कल्याण : शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या किन्नर महोत्सव २०२६ या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त यांनी आपल्या भाषणात काढले. या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली.
मुंबई : हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त खासदार आदरणीय अरविंदजी सावंत आणि जाणीव ट्रस्ट यांच्या पुढाकाराने तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशच्या सहकार्याने दक्षिण मुंबईतील कॅरम खेळाडूंकरिता रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ व १२ जुलै रोजी समाज मंदिर वातानुकूलित सभागृह, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई येथे हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून प्रत्येक गटातील पहिल्या आठ क्रमांकाच्या खेळाडूंना रोख पारितोषिक व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी दक्षिण मुंबईतील कॅरमपटूंनी आपल्या आधार कार्डाच्या प्रतीसह दक्षिण विभागातील उबाठाच्या शिवसेना शाखेत ३ जुलैपर्यंत संपर्क करावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.
ठाणे : प्रती वर्षीप्रमाणे यंदाही श्री माँ विद्यालयाच्या वतीने आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही ‘योग’ स्पर्धा शनिवार २७ जूनला सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आली. इ. ५ वी ते १० वी मधील ठाणे, डोबिवली, बोरीवली, बदलापूर, अंबरनाथ इत्यादी शाळेतील विद्यार्थी या ‘योग’ स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले गेले. ठाण्यातील आणि ठाण्याबाहेर एकुण २७ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ‘योग’ स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे गुणवत्ता प्रशस्ती प्रमाणपत्र व चषक (ट्रॉफी) देण्यात आली. ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या दोन स्वरुप श्रेणींमध्ये घेण्यात आली होती.
निकाल पुढील प्रमाणे –
सिनियर ग्रुप – प्रथम पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; द्वितीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर; तृतीय – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणे
ज्युनिअर ग्रुप – प्रथम पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; द्वितीय – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणे; तृतीय – दि एसआयए प्रायमरी अँड हायस्कुल, डोबिवली
सिनियर ग्रुप (सोलो) – प्रथम पारितोषिक युनीव्हर्सल हायस्कुल, ठाणे; द्वितीय – डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; तृतीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर
ज्युनिअर ग्रुप (सोलो) – दि एसआयए प्रायमरी अँड हायस्कुल, डोबिवली; द्वितीय – अंबर इंटरनॅशनल स्कुल, ठाणे; तृतीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर
००००००००

महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व!
उलवे : सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, मानवी मूल्यांचे जतन करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपले वाहनचालक मेहबूब लदाप यांना सव्वा कोटी रुपये किमतीचा, सर्व आधुनिक सुविधा असलेला ‘मयुरेश व्हिला’ हा बंगला अधिकृतपणे नावावर करून दिला आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बंगल्याचे सोमवारी सोनाली रिअॅलिटीचे डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि मेहबूब लदाप याच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत, कुणाल घरत उपस्थित होते.
ही घटना श्रमाचा गौरव करणारी आणि संपत्तीचा वापर सामाजिक न्यायासाठी कसा करावा, याचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे. कष्टाचे मूल्य केवळ पैशात न ठरवता त्याला कौटुंबिक भावना देणे ही गोष्ट आजच्या काळात अत्यंत दुर्मीळ मानली जात आहे. पाच वर्षांच्या सेवेमध्ये एका कर्मचाऱ्याला थेट सव्वा कोटी रुपयांचा बंगला भेट देण्यामागे महेंद्रशेठ यांची कोणतीही जात-पात न मानता माणूस म्हणून सर्वांना समान मानण्याची भूमिका दिसून येते. स्वतःला एकच मुलगा असून त्याला राहण्यासाठी एक बंगला पुरेसा आहे, या विचाराने दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी धर्म, प्रांत किंवा भाषा असा कोणताही संकुचित विचार मनामध्ये आणला नाही, तर केवळ तिशीतील एका सामान्य तरुणाचे आणि त्याच्या कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. शेलघर येथील त्यांचा ‘सुखकर्ता’ हा बंगला गरजू लोकांसाठी नेहमीच हक्काचे ठिकाण राहिला असून तिथून कोणताही गरजू माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही, हा जनमानसातील विश्वास या घटनेमुळे अधिक दृढ झाला आहे.
या अनपेक्षित भेटीमुळे भारावून गेलेले चालक मेहबूब लदाप यांनी वृत्तप्रतिनिधींशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, २८ एप्रिल २०२१ रोजी गव्हाण येथील शांतादेवी यात्रेच्या दिवशी मी कामाच्या शोधात महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील ‘सुखकर्ता’ बंगल्यावर गेलो होतो. तेथे महेंद्रशेठ यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी चालक म्हणून काम करण्याची मला संधी दिली. गव्हाणच्या शांतादेवी यात्रेचा तो दिवस माझे संपूर्ण जीवन बदलणारा ठरला आणि शांतादेवीच मला प्रसन्न झाली. आपण केवळ साहेबांची गाडी चालवत होतो, पण ते आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत आहेत. मेहबूब लदाप यांनी पुढे सांगितले की, मी कोण आणि कुठल्या गावचा, याचा महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांनी कधीही विचार केला नाही. केवळ पाच वर्षांच्या सेवेमध्ये आपल्या कर्मचाऱ्याला आलिशान बंगला थेट भेट म्हणून देणारी अशी दानशूर व्यक्ती महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांनी हे स्वप्न माझ्यासारख्या तिशीतील तरुणासाठी प्रत्यक्षात आणले आहे. आजचा दिवस माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठा आनंदाचा असून ‘मयुरेश व्हिला’ हा बंगला नावावर करून साहेबांनी एक आदर्श निर्माण केला आहे. जनसेवेचे हे काम असेच सुरू राहण्यासाठी महेंद्रशेठ आणि शुभांगीताई यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना मेहबूब आणि त्यांच्या कुटुंबाने केली आहे.
महेंद्रशेठ घरत यांचे हे काम केवळ याच घटनेपुरते मर्यादित नसून त्यांच्या सामाजिक जीवनाचा तो एक भाग आहे. त्यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून आतापर्यंत सुमारे १५०० लोकांना हक्काच्या घरांसाठी लागणारे साहित्य किंवा थेट आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. अनेक गरजू व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांनी अनेक अनाथ आणि गरीब मुले दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक फी, कपडे आणि इतर आवश्यक गरजांचा खर्च स्वतः उचलला आहे. आर्थिक अडचणींमुळे ज्या पालकांना आपल्या मुलांना जास्त शुल्क भरून इंग्रजी माध्यमात शिकवणे शक्य नव्हते, अशा सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाण येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली आहेत. याशिवाय त्यांनी आजवर अनेकांना चारचाकी गाड्या आणि महागडे मोबाईल फोन देखील भेट दिले आहेत.
महेंद्रशेठ घरत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची कौटुंबिक मूल्ये आणि लिंगसमानतेविषयीची स्पष्ट भूमिका होय. समाजात मुलगा आणि मुलगी समान मानण्याच्या केवळ गप्पा मारल्या जात असताना, त्यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतील चार हिस्से केले आणि मुलीला, मुलाला आणि शुंभांगीताईंनाही समान वाटा दिला. मुलीचाही समान अधिकार असतो, हे महेंद्रशेठ घरत यांनी कृतीतून सिद्ध केले. नवी मुंबई परिसरामध्ये साडेबारा टक्के जमिनींच्या वाटणीवरून, अनेक कुटुंबात वाद निर्माण होऊन नाती कोर्टकचेऱ्यांत अडकल्याचे त्यांनी जवळून पाहिले होते. अनेक रक्ताची नाती तुटली आहेत. आपल्या कुटुंबात असा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांनी पत्नी शुभांगी आणि मुलगा कुणाल यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
मालमत्ता किती मूल्याची आहे यापेक्षा ती देण्याची मानसिकता महत्त्वाची असते, हेच त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. यासोबतच, त्यांना मिळालेली सर्व वडिलोपार्जित संपत्तीही भावांना, बहिणींना व्यवस्थित वाटप केली. तसेच त्यांनी आपल्या आईच्या नावाने यमुना सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट स्थापन करून समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे.
संपत्तीपेक्षा कौटुंबिक शांतता, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्ये किती श्रेष्ठ असतात, याचा एक नवा पायंडा महेंद्रशेठ घरत यांनी या संपूर्ण कार्यातून घालून दिला आहे. यावेळी एम. जी. ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी मेहबूब लदाप याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
००००००००

जादा बिलाची चौकशीची मागणी
रमेश औताडे
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे येथे सहा महीने उपोषण करून माहिती अधिकारात माहिती मिळवली असताना मंजुरीपेक्षा सव्वा कोटींचे जादा बिल दिले असल्याची माहिती उघड झाली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील जबाबदार कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांचेवर कारवाई करावी अशी मागणी भाई आकाश निर्मल यांनी अप्पर मुख्य सचीव सार्वजनिक बांधकाम विभाग व मंत्रालय विभागात केली आहे.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम ठाणे क्रमांक १ यांनी वाडा मनोर राज्य महामार्ग ३४ या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मे २०२२ रोजी २ कोटी ७६ लाख ३४ हजार ४०५ रुपयांचा कार्यारंभ आदेश गंधे यांच्या नावाने आदेश दिला असल्याची माहिती समोर आली आहे. हा आदेश २९ बिलो होता असताना मार्च २०२३ मध्ये याचे अंतीम देयक ३ कोटी ९३ लाख ८८ हजार ५१ रु मंजुर केले. म्हणजे तब्बल १ कोटी १७ लाख ५२ हजार ६४८ रुपये जादा काढले. असा आरोप भाई आकाश निर्मल यांनी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे घेतलेल्या माहितीतून उघड झाला आहे.
हि जादा रक्कम काढताना क्लॉज ३८ नुसार मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांची परवानगी घेतली नसून संदर्भ एम बी नोंद नसल्याने कामाचे चाचणी अहवाल नाहीत. काम सुरु करताना आणि पूर्ण झाल्यावर लेवल रजिस्टर नसल्याची माहिती अधिकारात माहिती दिली आहे असे भाई आकाश निर्मल यांनी सांगितले.

अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धा आयोजनासाठी ₹१० कोटींच्या आर्थिक सहाय्याची मागणी
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
सुवर्णपदक विजेत्या लक्ष्य आणि उज्वल कुमार सिंह यांचा गौरव
मुंबई : स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे झालेल्या रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेतील लाईटवेट मेन्स डबल स्कल्स प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकविणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक यशानंतर आता रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) परिसरातील आर्मी रोईंग नोड (ARN) येथे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या स्थळाची उभारणी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, तांत्रिक व्यवस्था, सुरक्षा, खेळाडूंची निवास व्यवस्था, वाहतूक तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी सुमारे ₹१० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. या खर्चासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते लक्ष्य आणि उज्वल कुमार सिंह यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दोन्ही मान्यवरांनी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करत आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अण्णा बनसोडे म्हणाले की, सुवर्णपदक विजेते खेळाडूंनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आर्मी रोईंग नोड (ARN) येथे कठोर सराव करून आपल्या यशाची भक्कम पायाभरणी केली आहे. त्यामुळे त्यांचे हे यश केवळ देशासाठीच नव्हे, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठीही अत्यंत अभिमानास्पद आहे.
यावेळी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या यशामागील कठोर प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिली. तसेच आर्मी रोईंग नोड (ARN) येथे उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधांबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
आगामी रोईंग वर्ल्ड कप अंडर-१९ व अंडर-२३ आशियाई स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळाल्यास पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग स्पर्धा
मुंबई : २५ ते ३० जून या कालावधीत देहरादून येथे आयोजित करण्यात आलेल्या २१व्या राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (पीटीकेएस) ने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रथमच पीटीकेएसच्या खेळाडूने राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग स्पर्धेत सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
पीटीकेएसची खेळाडू रिदम हर्षन मामानिया हिने उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर रौप्यपदक पटकावत संस्थेसह महाराष्ट्राचा गौरव वाढवला. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे पीटीकेएसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून क्रीडाक्षेत्रात या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिदमच्या या ऐतिहासिक यशामागे सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, सातत्याने मार्गदर्शन करणे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे या माध्यमातून संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू सर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पीटीकेएसला राष्ट्रीय स्तरावर हे उल्लेखनीय यश मिळवता आले.
