अनिल ठाणेकर
ठाणे, जनमत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटरविरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेक अप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी १० वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर, बाळकूम येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती वेक अप ठाणेकर या संस्थेच्या वतीने देण्यात आली.
बाळकूम येथील ५३ एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज १२ दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास ९० डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. युरोप अमेरिकेतून हद्दपार केलेला हा प्रकल्प ठाण्यात आणण्यामागे नक्की कारण काय आहे, असा सवाल करून या प्रकल्पाविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतला आहे, असे वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, हिमानी वर्मा, जतीन कोठारे, गुरासिस बुमरा, लावण्या पाटील यांनी सांगितले. शनिवारी सकाळी १०.०० वाजता कल्पतरू, बाळकूम येथील डेटा सेंटरबाहेर परिसरातील नागरिक निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात किमान १ हजार नागरिक सहभागी होतील, असे वेक अप ठाणेकरच्या वतीने सांगण्यात आले.
०००००००००००
००००००००
वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे आयोजन, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती
ठाणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात २२ जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील.
वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती. दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदंराजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, असे नमूद करीत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मियतेचा धागा होता. त्याचबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्याअनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहील. त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले. त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबरच कार्यक्रम सादर करण्यात येतील, असे प्रबोध डावखरे यांनी सांगितले.
००००००००
रमेश औताडे
मुंबई : बांधकाम साहित्य क्षेत्रातील अदानी सिमेंट ने मजूर ते उद्योजक या प्रेरणा सन्मान उपक्रमात बांधकाम क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणारे मजूर ते उद्योजक असा प्रवास करणारे सुरेंदर चौहान यांचा प्रेरणा सन्मान उपक्रमात सन्मान केला. १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंदर अधिक चांगल्या संधी आणि स्थिर भविष्यासाठी मुंबईत आले. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजूर आणि गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी बांधकाम तंत्र, कारागिरी आणि बांधकाम स्थळावरील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला. कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत गेल्यानंतर सुरेंदर यांनी स्वतंत्रपणे छोटे बांधकाम प्रकल्प स्वीकारण्यास सुरुवात केली.
०००००००००
निवडणूक आयोगाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
ठाणे, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपवर भारत निवडणूक आयोग (@ecisveep) आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (@ceo_maharashtra) यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे.
व्हायरल होत असलेल्या संदेशात, “SIR-२०२६ दरम्यान मतदाराच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली असून, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल,” असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने नागरिकांना अशा कोणत्याही बनावट संदेशांना किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकांना प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. मतदार यादी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) किंवा मतदार ओळखपत्रासंबंधी कोणतीही माहिती केवळ भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पाहावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करत, नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये, असेही निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
००००
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ वयोगटामधील विजेतेपदासाठी एकूण ९२ खेळाडूंमध्ये १८ जुलै रोजी चुरस राहील. आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त होणाऱ्या स्पर्धेमधील प्रत्येक वयोगटात मुलांसाठी १० बक्षिसे व मुलींसाठी ५ बक्षिसे दिली जाणार आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी, सकाळी ९.३० वा. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये होईल.
न्यू इंडिया अॅशुरन्स-आयडियल जलद बुध्दिबळ स्पर्धेत विविध जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू अर्णव पोर्लेकर, पराव जोशी, निकिता संदीप, राज गायकवाड, निवान छेडा यांच्यासह आयुष जैठलीया, साईश आचरेकर, आनंद चैतन्या, अथर्व मुळीक, आयांश पाटील, अरिंजय भट्टाचार्जी, आर्यन भोसले, विप्रा दांडेकर, जीतेज गाडगे आदी खेळाडू गटविजेतेपदाच्या दावेदारीसाठी उत्सुक आहेत. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांच्या सहकार्याने ८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील सहा वयोगटात ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची आहे. दोन गटामध्ये प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या विजेत्यास विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कुटुंबाची मदतीची मागणी
ठाणे : शहापूर तालुक्या मध्ये डोलखांब विभागतील परिसरात बुधवारी विजांच्या कडकडास पाऊस झाला गांडूळवाड येथील बुधा धर्मा हंबीर यांच्या घरावर वीज पडून शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी साकाळच्या सुमारास घडली. ठाणे जिल्ह्यासह डोलखांब परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने. याचा फटका हंबीर कुटुंबीयांना बसला.
बुधवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. तसेच घराच्या भिंतीलाही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. घरावर वीज पडताच मोठा आवाज झाला घरामध्ये बुधा हंबीर व दोन महिला व लहान मुलं इतर सदस्य होते. घरातील एका पुरुषाला आणि दोन महिलांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी इजा झाली नाही.
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतीपत्र तसेच तामिळनाडू विधानसभा शोक प्रस्तावाची प्रत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रशासनाच्यावतीने गुरुवारी बारामती येथे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी स्मृती पत्राचे तसेच तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी शोक प्रस्तावाचे वाचन केले. यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, दौंडचे उप विभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडस, गटविकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.
०००००००००

कल्याण : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामुळे मागील वर्षभरापासून फरार आहेत. सतत पाठपुरावा करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत म्हणून या प्रकरणातील तक्रारदाराने कल्याणमध्ये पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर भर पावसात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी त्यांना खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते तक्रारदार कल्पेश जोशी यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रवीण म्हात्रे यांनी दादागिरी, दांडगाईचा अवलंब करून डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंबिवली भागात इतर भूमाफियांच्या सहकार्याने आरोही हाईट्स नावाने बेकायदा इमारत उभारली आहे. ही इमारत उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. या इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना विक्री करताना प्रवीण म्हात्रे यांनी पालिका महसूल विभागाचे जुनी डोंबिवली, नवी डोंबिवलीतील सात बारा उतारे, नगररचना, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्क्यांचे कागदपत्र तयार केले.
या भूमाफियांनी डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागातील पालिकेच्या ह प्रभाग हद्दीतील नवीन सर्व्हे क्रमांक १६-१४, नवीन सर्व्हे क्र. २६-१५, नवीन सर्व्हे क्र. २६-१६-१-अ, तसेच नवी डोंबिवलीतील सर्व्हे क्र. ६३-२-ब या मिळकर्तीचे बनावट सात बारा उतारे तयार केले आहेत. या जमिनींशी दुरान्वये संबंध नसताना या सात बारा उताऱ्यात प्रवीण म्हात्रे, राजेंद्र शेरेगर यांची नावे घुसविण्यात आली आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
आरोही हाईट्स इमारत अधिकृत आहे हे दाखवून घर खरेदीदारांना या बेकायदा इमारतीमधील सदनिका अधिकृत इमारत म्हणून विक्री करण्यात आल्या आहेत. या बेकायदा इमारतीच्या जमिनीचे सात बारा उतारे महसूल विभागाने तयार आणि भूमाफियांना दिले नसताना दस्त नोंदणी करताना मात्र या बनावट सात बारा उताऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. तक्रारदार जोशी यांनी महसूल विभागाने आरोही हाईट्स इमारत उभारणी करताना जमीन मालकीचे सात बारा इमारत उभारणाऱ्या माफियांना दिले होते का, अशी विचारणा डोंबिवलीच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे केली होती.
मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांनी चौकशी करून कल्पेश जोशी यांच्या तक्रारीप्रमाणे अशाप्रकारचे कोणतेही सात बारा उतारे प्रवीण म्हात्रे किंवा इतरांना देण्यात आले नाहीत. या उताऱ्यावरील ग्राम महसूल अधिकाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ही सर्व बनावट कागदपत्रे सदनिका विक्री करताना दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणीकरणासाठी भूमाफियांनी वापरली आहे. या सर्व प्रकरणात शासन, घर खरेदीदार यांची प्रवीण रमेश म्हात्रे यांच्यासह इतर २३ भूमाफियांनी फसवणूक केली म्हणून मंडळ अधिकारी जमदरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण म्हात्रेसह इतर आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणातील प्रवीण रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करा, अशी तक्रारदाराची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी शुक्रवारपासून कल्याणमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या गुन्ह्यात महेश पार्टे, गजानन नार्वेकर, यशवंत जोशी, माया पाटील, बनुबाई जोशी, रणजित रामदास जोशी, रवींद्र जोशी, दमयंती जोशी, भारती पाटील, साधना तांबे, विनोद बिभीषण जोशी, अशोक भानजी जोशी, अशोक पांडुरंग जोशी, प्रवीण म्हात्रे, राजेंद्र शेरेगर, वंदना जोशी, विमल जोशी, लक्ष्मीबाई जोशी, शशिकांत जोशी, मार्गेश जोशी, लोकेश गावडा, वर्षा विजय पंडित, विजय गजानन पंडित हेही आरोपी आहेत.
००००००००
– माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
कल्याण : कल्याण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आणि भटाळे तलावाच्या जतन – संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कल्याणच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भटाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच परिसरात पूर्वी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी विस्तीर्ण भटाळे तलाव अस्तित्वात होता. मात्र कालांतराने या तलावात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्याने तसेच अतिक्रमण झाल्याने तलावाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले असून आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.
तसेच तलावामध्ये हळूहळू बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे सांगत जनावरांचे मलमूत्र तसेच सांडपाणीही सोडले जात आहे. परिणामी तलावातील पाणी प्रदूषित झाले असून पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्व असलेल्या या तलावाचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत तलावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावांचे पुनरुज्जीवन आणि विकास कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
०००००
