कल्याण आगीत १२ वाहने खाक
कल्याण: कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागातील एका उच्चभ्रू इमारतीच्या तळमजल्याला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत १२ वाहने जळून खाक झाली. यामध्ये मोटार, दुचाकी आणि सायकलींचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
आग नक्की कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही. आगीत तीन मोटारी, सहा दुचाकी, तीन सायकली जळून खाक झाल्या. पहाटेच्या सुमारास इमारतीच्या परिसरात धूर आणि टायर जळल्याचा वास सर्वदूर पसरला.
दोन दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेत मानपाडा रस्त्यावरील सागाव भागात चेरानगरमध्ये रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंटच्या तळमजल्याला पहाटे चारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत रहिवाशांच्या तळमजल्याला उभ्या केलेल्या एकूण २९ दुचाकी, मोटारी जळून खाक झाल्या. यावेळी घरातून बाहेर पडताना आगीची झळ लागून पाच रहिवासी जखमी झाले होते.
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक
मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसी टीव्ही कॅमेरा प्रकल्प’ हाती घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल १११ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बस स्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये; तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७,०३५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक हालचालीवर सतत नजर राहणार आहे, असे सरनाईक म्हणाले.
या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी इ-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) या संस्थेकडे सोपवली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी एक वर्ष निश्चित केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (यूएटी) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येईल.
प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालये सुरक्षित होतील. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

अंत भला तो सब भला…
शेवट्च्या मॅचमध्ये नेपाळचा पहिला विजय वर्ल्डकप विजय
स्कॉटलंडचा केला पराभव
वाढदिवशी गुलशन झाने ठोकला विजयी चौकार
मुंबईत : टी२० क्रिकेट वर्ल्डकपच्या आपल्या शेवटच्या मॅचमधये मुंबईत रंगलेल्या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडवरील थरारक विजयासह स्पर्धेचा संस्मरणीय शेवट केला. वर्ल्डकपमधिल नेपाळचा हा पहिलाच विजय ठरला. नेपाळचे फॅन्स खूप दिवसापासून ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण अखेर काल वानखेडे स्टेडियमवर त्यांना मिळाला आणि वानखेडे स्टेडियमवर अखेर नेपाळचा जल्लोष घुमला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात नेपाळने ७ गडी राखत विजय मिळवत या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला वहिला विजय मिळवला. नेपाळला या वर्ल्डकप स्पर्धेत वेस्टइंडिज, इंग्लंड आणि इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता.
आजच्या मॅचमध्ये नेपाळला शेवटच्या षटकात ६ चेंडूंमध्ये ५ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर एक धाव काढली गेली आणि सर्वांच्या नजरा वाढदिवस साजरा करणाऱ्या २० वर्षीय गुलशन झाकडे वळल्या. झाने वाइड लॉन्ग-ऑन च्या दिशेने दमदार फटका मारत चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. सीमारेषेजवळ जॉर्ज मुशेने झेल वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे पाय दोरीला लागल्याचे स्पष्ट होताच चौकार घोषित झाला आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जल्लोष उसळला. हा सामना औपचारिक असला तरी खेळातील थरार आणि स्कॉटलंड संघांची झुंजार कामगिरी यामुळे संस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धचा सामना नेपाळने जिंकला असता तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा चाहत्यांत रंगली होती. मात्र या विजयासह नेपाळने मान उंचावून मायदेशी परतण्याचा आनंद मिळवला.
या विजयात दिपेंद्र सिंग ऐरी आणि गुलशन झा हे दोघे नायक ठरले. दोघांनीही अभिमानाने मैदान सोडताना एकमेकांचे अभिनंदन स्वीकारले. संपूर्ण नेपाळ संघाने मैदानावर ‘लॅप ऑफ ऑनर’ घेत चाहत्यांचे आभार मानले. सामनावीर पुरस्कार ऐरीला देण्यात आला. मायक्रोफोन हातात घेताच प्रेक्षकांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. मुंबईत चारही सामने खेळताना साथ दिलेल्या सर्व चाहत्यांचे ऐरीने मनापासून आभार मानले.
अन्ततः जित्यौं…
अन्ततः जित्यौं… म्हणजे अखेर जिंकलोच्या मेघ गर्जनेने विजयाचा अवघा आसमंत आज दुमदुमून गेला… नेपाळच्या पाठीराख्यांनी वानखेडे हाऊसफुल होते. स्कॉटलंडवरील विजयानंतर नेपाळच्या संघाने स्टेडियमला विजयी परेड केली आणि त्यांच्या चाहत्यांनीही अन्ततः जित्यौँ असे खास नेपाळी भाषेत अखेर जिंकलोच म्हणत त्यांचे कौतुक केले…
हर्षवर्धन सपकाळांची जाहीर दिलगिरी
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देत छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्याअसल्यास आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे सपकाळ यांनी आज सांगितले.
सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्यास समाजात तेढ निर्माण न होता ऐक्याचा संदेश जावा, हा आपल्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा गाभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय असून ते आपले आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सपकाळ यांनी नमूद केले.
मुंबई महापालिकेत ५७ हजार पदे रिक्त
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील तब्बल ५७ हजार पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कामगार संघटनांव्दारे केली जात आहे. राज्यात लवकरच ७० हजार सरकारी पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या भरतीसहीत महापालिकेतीलही हा अनुषेश भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे महापालिकेतही नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या पत्रात कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे – बापेरकर यांनी म्हटले आहे की, मुंबई व मुंबई उपनगरातील जनतेला उत्तम नागरी सेवा पुरविता याव्यात यासाठी पालिकेचे १२९ विभाग व खाती कार्यरत आहेत. ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये व ५ संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठीची रुग्णालये, प्रसुतिगृहे यामधून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. हे सर्व विभाग आणि रुग्णालये योग्य प्रकारे चालविली जावीत यासाठी पालिकेच्या रचना व कार्यपध्दती विभागाने सखोल अभ्यास करून, कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या १ लाख ४५ हजार १११ अशी निश्चित केली आहे. तथापि, सध्या ही कर्मचारी संख्या सेवानिवृत्ती, मृत व इतर कारणांमुळे कमी झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेत जेमतेम ९० हजाराच्या आसपास कामगार – कर्मचारी आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येत आहे. रिक्त पदांमुळे अत्यावश्यक सेवेतील काम ठप्प होऊ नये म्हणून कंत्राटी कर्मचारी भरती केली जात आहे. कोणेतही कायमस्वरुपी व सततचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेणे उचित नसताना पालिका मागील अनेक वर्षांपासून रिक्त शेडयुल्ड पदे न भरता कंत्राटी भरती करत आहे. ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कामगार भरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, मुंंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्यात येतील. असे आश्वासन पालिका प्रशासनाच्यावतीने वारंवार दिले जाते. मात्र रुग्णालयातील अत्यावश्यक रिक्त पदे पुन्हा कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याकरीता नुकतीच जाहिरातही देण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी भरती बंद करावी आणि पदभरती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून तुटपुंजा पगारामध्ये कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, शासनाच्या भरती धोरणाच्या अधीन राहून कायम करावे व उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रान मुंबईच्या रस्त्यावर धावले…
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सुरक्षेचे सारे संकेत धुडकावत मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या रस्त्यावर जॉगिंग केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईच्या रस्त्यावर धावतांना दिसताच मुंबईकरांनी अचंबित होत त्यांचे फोटो काढले आणि व्हिडीयो शुट केले. मॅक्रान यांनीही आनंदाने त्यांना पोझ देत आपल्या जॉगिगंचा आनंद लुटला. मॅक्रान यांच्या दौडीचे हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले हो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मॅक्रोन यांचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम होते पण त्यापुर्वी मॅक्रान यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर जॉगिगं चा आनंद लुटला. नेव्ही ब्ल्यु टिशर्ट आणि शॉर्टस् मध्ये मॅक्रानची ही दौड टिपण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. सुरक्षेचे सारे संकेत पाळत आणि आपल्या दौडीचा मुंबईकरांना कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेत मॅक्रॉन यांनी आपली दौड पुर्ण केल्याचा विशेष उल्लेक नेटीजन्सनी आपल्या पोस्टमध्ये आवर्जून केला.

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्रालयातील मिलिंद शेणॉयांची बदली
अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दिवशी त्यांचा विरोध असणाऱ्या फाईलींना दिली होती मंजुरी
शासकीय दुखवटा असताना राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना दिला अल्पसंख्यांक दर्जा
प्रत्येक फाईलीसाठी २५ लाखांची तोडपाणी झाल्याचा रोहीत पवारांचा आरोप
स्वाती घोसाळकर
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी सकाळी अपघाती निधन झाल्याची संधी साधून त्याच दिवशी दुपारी त्यांनी रोखून ठेवलेल्या राज्यातील शिक्षण संस्थाना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या फाईलींनी लगोलग मंजुरी देण्यास सुरुवात करणारे अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या सगळ्या मंजुंरींना तात्काळ स्थगिती दिली होती. आज या खात्याच्या मंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने शेणॉय यांना पाचारण केले आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली.
राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून स्थगित करण्यात आली होती. त्यावेळी माणिकराव कोकाटे हे या खात्याचे मंत्री होते. त्यांचे खाते काढून घेतल्यानंतर या खात्याचा कारभार अजित पवारांकडे होता. अजित पवार यांनीही हाँ निर्णय रोखून धऱला होता. पण अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांत मंत्रालयातून ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेषता अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा असतानाही शेणॉय यांनी ही कर्तबगारी दाखवली. याच कारणास्तव अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलींद शेणॉय यांची आता बदली करण्यात आली असून याप्रकरणी आणखी सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक फाईलमागे २५ लाखांची देवाण-घेवाण झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला.
अल्पसंख्यांक दर्जांच्या शाळांना आरटीई कायदा लागू नाही. आरटीई कायदा लागू नसल्यानं २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बंधन नाही तसेच अल्पसंख्याक शाळांत शिक्षकांना TET ची अट नाही . अल्पसंख्यांक संस्थांच्या शाळांना आरटीआय कायदाही लागू नाही. अल्पसंख्यांक शाळांना विविध कारणांसाठी कोट्यवधींचे अनुदान,देणगी घेण्याची मुभा आहे आणि यासाठीच ही फिल्डींग लावली गेली होती.
विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व…
स्लग : भारत–फ्रान्समधिल मैत्रीचे नवे पर्व ० जागतिक स्थैर्यासाठी उभय देशातील भागीदारी महत्त्वाची
मुंबई : विश्वास, मुक्तसंचार अन् महत्वकांक्षेचे नवे पर्व फ्रान्स आणि भारतात आजपासून सुरु होतेय अशा शब्दात फ्रान्सचे ऱाष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या भारत भेटीचे वर्णन केले. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यानंतर या पत्रकार परिषदेचा फोटो व्टिटरवर पोस्ट करताना मॅक्रॉन यांनी या फोटोसाठी वरील भावना व्यक्त केल्या.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. त्यांनी फ्रान्सचे वर्णन युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून केले. त्यांनी सांगितले की २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील सौहार्दपूर्ण संबंधांवर भर दिला. तसेच फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे असेही म्हटले की अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून, आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व ऊर्जा दिली आहे.
सावरकरांच्या शौर्याला उजाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शौर्याला उजाळा दिला. त म्हणाले, फ्रान्सचं सर्वात मोठं पोर्ट ज्यातून भारतातील सैनिकांनी पहिल्या विश्व युद्धात आपले पाऊल टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजापासून सुटकेसाठी ज्या जहाजातून उडी घेतली, त्या समुद्राजवळील हे शहर आहे. मला त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य गतवर्षी मिळाले होते. भारताच्या गेट वे मध्ये आज मॅक्रोन यांचे स्वागत आपण करतोय, असे म्हणत मोदींनी मॅक्रोन यांचे मुंबईसह भारतात स्वागत करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने आहेत, आपल्या भागिदारीला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ग्लोबल स्टॅबिलिटी आणि विकासाची ही भागीदारी आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मितीचे उद्घाटन त्याचेच उदाहरण आहे. भारत माऊंट एव्हरेस्टपर्यंत पोहोचणार हेलिकॉप्टर बनवणार आहे, आणि निर्यात देखील करणार आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले. आम्ही युरोप सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलय. याला गती देण्यासाठी आपणास नक्कीच फायदा होणार आहे. दुप्पट कर न देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल, असे मोदींनी म्हटले. इंडिया-फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर असणार आहे. संरक्षण, क्लीन एनर्जी, स्पेसच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणी देखील केली जाईल. एआय इन हेल्थ, डिजिटल सायन्स इन टेक्नोलॉजी आणि एरोनॉटिक्सची उभारणी आपण करणार आहोत, असेही मोदींनी यावेळी म्हटले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत स्वागत करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत-फ्रान्सच्या मैत्रिचे नवे पर्व अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी या मॅक्रॉन यांच्या या भारतभेटीचे वर्णन केले.
