11 March Bitambatmi All pages

Open Book

१५ वर्षाखालील मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळा विजेती

मुंबई : गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या १५ वर्षाखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एस आय ई एस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एस आय ई एस शाळेने ज्ञानविकास विद्यालय, कोपरखैरणेचा ३२-१९गुणांनी पराभव केला. एस आय ई एस‌कडून वैदेही गवळी तर ज्ञान विकास हायस्कूल कडून वैभवी सिंग यांनी उत्कृष्ट खेळ केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञान विकास हायस्कूलने सेंट जॉन हायस्कूलचा आरामात पराभव केला. सेंट जॉन हायस्कूल ची कृतिका कदम तर ज्ञान विकास विद्यालयाची उन्नती रावडे ह्या छान खेळल्या.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एस आय ई एस हायस्कूल व कुमुद विद्यालय हा सामना ३२-३२ गुणांनी बरोबरीत सुटला होता मग ५-५ चढायांच्या जादा डावात एस आय ई एसने बाजी मारली.  ह्या वेळी कबड्डी खेळातील नामांकित राष्ट्रीय खेळाडू पुष्पा डावरे, उषा सावंत, श्रध्दा म्हात्रे, सुवर्णा लोखंडे, स्वाती पार्थ, यांचा  शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच  पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुणे असलेल्या पुष्पा डावरे NIS सेंट्रल रेल्वे महिला कबड्डी कोच यांनी वरील चार हि संघांना रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. दिपक कांदळगावकर, विकास लाड, संतोष देवरुखकर, राष्ट्रीय खेळाडू भारत संघाणे, शशी चव्हाण, नितीन घाग, राजा हुमणे, सुभाष चव्हाण, प्रतिक गाढवे, मनिष मोरे, अतुल चव्हाण, निलेश झंजे, अमित कांबळे, अॅड. विश्वास कांबळे यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अविनाश महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत

शहपूरात रानमेवा दाखल कैऱ्या,करवंद,तोरणं विक्रीसाठी दाखल आदिवासींना मिळाला रोजगार

ठाणे प्रतिनिधी

करवंद,जांभळं,कैऱ्या,तोरणं ,हा दाट जंगलात मिळणारा उन्हाळ्यातील खास रान मेवा विक्रीसाठी आता आदिवासी शहापूर बाजारपेठेत दाखल झाले आहेत.या रानमेवा विक्रीतून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे .

शहापूर तालुक्यातील वासिंद किन्हवली,शेणवा, डोळखांब,खर्डी,कसारा या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद ,कैऱ्या,तोरणं आदी रानमेवा गोळा करुन उन्हाळ्यात

शहरात विक्रीसाठी घेऊन येतात हा रानमेवा मिळविण्यासाठी पहाटेच आदिवासी घराबाहेर पडतात जंगलात जमा केलेला हा रानमेवा एका टोपलीत भरुन नंतर पळसाच्या द्रोणात ठेवून विक्रीसाठी शहरात आणला जातो ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ असा रानमेवा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे.१० ते २० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या,करवंद,तोरणं,यांची विक्री केली जाते या रानमेव्याच्या विक्रीतून पुर्ण दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते असे सुकरी भला या आदिवासी महिलेने सांगितले हा रानमेवा शहापूरसह कल्याण,डोंबिवली,ठाणे,येथील बाजारपेठेत आदिवासी विक्रीसाठी आणतात या रानमेव्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने आम्हाला रोजीरोटी मिळत असते असे या व्यवसायातील आदिवासी सांगतात.

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी

इच्छाशक्ती, अंकूर, एसएसजी, पार्ले स्पोर्ट्सची थरारक सलामी

मुंबई, दि. १० (क्रीडा प्रतिनिधी)-प्रभादेवीतील चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा रणसंग्राम रंगला आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा झंझावात अनुभवायला मिळाला. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेची सुरुवातच अशी झाली की मैदानात प्रत्येक चढाईसोबत श्वास रोखले जात होते. आघाडीवरून पिछाडी, पिछाडीवरून आघाडी, एका गुणाने निसटलेला विजय, तर कधी शेवटच्या क्षणी साधलेली बरोबरी,  अशा नाट्यमय घडामोडींनी कबड्डीप्रेमींना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले. पहिल्या दिवशी रंगलेल्या थरारात इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, एसएसजी फाउंडेशन, पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि अंकुश स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार विजयांसह स्पर्धेत विजयी सलामी दिली.

टी-२० विश्वचषकाच्या गदारोळानंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या चढाई-पकडीच्या युद्धाने कबड्डीप्रेमींना अस्सल ग्रामीण थराराची मेजवानी दिली. शेवटच्या क्षणी स्पर्धेत उतरलेल्या पालघरच्या इच्छाशक्ती क्रीडा मंडळाने आपल्या झंझावाती खेळाने प्रेक्षकांचा उत्साह अक्षरशः द्विगुणित केला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, स्पर्धा संयोजक आणि आमदार महेश सावंत, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे विश्वास मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. एलआयसी, मुथुट फायनान्स, इंडियन ऑइल यांच्या पुरस्काराने सुरू झालेल्या या स्पर्धेत लायन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्धच्या सामन्यात यश निंबाळकर आणि योगेश राठोड यांच्या वेगवान चढायांनी इच्छाशक्तीला ३६-२० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्‍या डावात लायन्सच्या राज आचार्य आणि विशाल कटकटे यांनी झुंजार खेळ करत सामना रंगतदार केला. एका क्षणी २०-३६ पिछाडीवर असलेल्या लायन्सने इच्छाशक्तीवर लोन चढवत धावसंख्या ४१-३९ पर्यंत नेली आणि सामना अक्षरशः नखशिखांत थरारला. अखेर इच्छाशक्तीने ४२-४० अशी निसटती बाजी मारत विजय खेचून आणला.

प्रो कबड्डीतील सुपरस्टार खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेल्वेला अजिंक्यपद मिळवून देणार्‍या पंकज मोहितेने एसएसजी फाउंडेशनसाठी अक्षरशः वादळी खेळ केला. त्याच्या ११ गुणांच्या झंझावाती चढायांच्या जोरावर एसएसजीने प्रतिस्पर्ध्यावर ५३-३१ असा एकतर्फी विजय मिळवला. सूरज जाधव, तेजस टक्के आणि आशिष चौधरी यांनीही दमदार साथ दिली.

सुशांत साहिल याच्या तुफानी पकडींनी अंकुश स्पोर्ट्स क्लबला सिद्धीप्रभा फाउंडेशनविरुद्ध ३४-२७ असा शानदार विजय मिळवून दिला. सिद्धीप्रभाकडून रुपेश साळुंखे याने अष्टपैलू खेळ करत १६ गुणांची कमाई केली, मात्र त्याचा झुंजार प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि गोल्फादेवी सेवा मंडळ यांच्यातील लढतही तितकीच रंगतदार ठरली. अक्षय तावडे आणि प्रशांत पवार यांच्या खेळाने पार्लेला जोर मिळाला, तर धनंजय सरोज आणि शार्दुल हरचेकर यांच्या चढायांनी गोल्फादेवीने पहिल्या डावात १८-१८ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जीव तोडून संघर्ष केला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या या लढतीत पार्ले स्पोर्ट्स क्लबने ३५-३४ असा निसटता विजय मिळवला. पार्लेने आपल्या दुसर्‍या सामन्यात अमर क्रीडा मंडळाचा ४५-२८ असा पराभव करून दुसरा विजयही नोंदवला.

इच्छाशक्तीच्या दुसर्‍या सामन्यातही थराराचा कळस गाठला. यश निंबाळकरच्या वेगवान चढायांनी गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबविरुद्ध इच्छाशक्तीला २४-१६ अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसर्‍या डावात गुड मॉर्निंगच्या शार्दुल पाटीलने तुफानी चढायांनी इच्छाशक्तीच्या बचावफळीची अक्षरशः झोप उडवली. त्याने १६ गुणांची कमाई करत सामना शेवटच्या मिनिटाला ४१-४० असा आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, मात्र निर्णायक क्षणी यश निंबाळकरने शेवटच्या चढाईत दोन गुण मिळवत इच्छाशक्तीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शार्दुल पाटीलने अखेरच्या चढाईत एक गुण मिळवत सामना ४२-४२ असा बरोबरीत सोडवला आणि मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी या थराराला जोरदार दाद दिली.

ना दरवाढ, ना करवाढ असललेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर

मिरा -भाईंदर : महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी आज स्थायी समितीसमोर वर्षं २०२५-२६ चा सुधारीत आणि सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प मांडला.  कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं. स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या देशात प्रथम स्थानानंतर आता आमचे ध्येय ‘ स्वच्छ शहरातून शाश्वत शहराकडे ’ असल्याचं ते पुढे म्हणाले. आर्थिक शिस्त,  पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी तरतूद या तीन गीष्टींवर विचार करून त्यावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

करवसुली वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, बायो मायनिंग,  घनकचरा व्यवस्थापन, सोलर व्यवस्था तसेच डिजिटल व्यवस्था वाढविण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तानी सांगितले. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४३९.०२ कोटीचे अर्थसंकल्पीय अंदाज त्यांनी स्थायी समिती समोर सादर केले. या समितीच्या पुढील बैठीकीत यावर निर्णय होईल.

तेहराण इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. “ट्रम्प यांनी सावध राहावे, अन्यथा ते स्वतःच संपून जातील,” अशी धमकी संबंधित इराणी अधिकाऱ्याने दिली आहे. या युद्धामुळे खाडी देशांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे.

डोनल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणविरुद्धचे युद्ध अल्पकाळासाठी असू शकते, असे विधान केले होते. मात्र, इराणने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणल्यास ही लढाई अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. “होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केल्यास, अमेरिका आताच्या तुलनेत वीस पट अधिक तीव्र हल्ला करेल,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून म्हटले होते.

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात

मिरा – भाईंदर

भारतात महिलांमध्ये कर्करोगामुळे होणा-या मृत्यूंचे एक प्रमुख कारण गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हे आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जवळजवळ सर्व प्रकरणे ह्युमन  पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) या विषाणूच्या संसर्गामुळे होतात आणि वेळेवर लसीकरण करून हा कर्करोग प्रभावीपणे रोखता येतो.

महाराष्ट्र राज्यामध्ये सदर एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ८ मार्चला झाला आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेने १४ ते १५ वर्षे वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण मात्र अद्याप १५ वर्षे पूर्ण नाही अशा) मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सदर एचपीव्ही मोहिमेचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता, उप-महापौर ध्रुवकिशोर पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण समिती अनिता पाटील तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर लहाने यांच्या उपस्थितीत नवघर आरोग्य केंद्रात करण्यात आले.  या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस (गार्डासिल -४) सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (यूपीएचसी) आणि महानगरपालिका / शासकिय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाईल.

एचपीव्ही लस जगभरात जवळजवळ २० वर्षांपासून वापरली जात आहे, आणि जगभरात सदर लसीचे करोडो डोस दिले गेले आहेत. व्यापक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की ही लस सुरक्षित आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा जाणवणे, मळमळ, चक्कर येणे इ. किरकोळ त्रास वगळता सदर लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे सदर लसीच्या दुष्परिणामाबाबत अपप्रचार करणारे व्हिडीओज् समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्याकडे कृपया दुर्लक्ष करुन सर्व पालकांनी आपापल्या मुलींना सदर लस द्यावी असे मिरा भाईंदर महानरगपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा

आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी

केतन खेडेकर

मुंबईच्या ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) रेल्वे स्थानकाचे सर्वप्रथम सन १९९६ मध्ये नाव बदलून ‘छत्रपति शिवाजी टर्मिनस’ (CST) करण्यात आले होते. तद्नंतर जून २०१७ मध्ये या नावात ‘महाराज’ शब्द अधिकृतरित्या जोडण्यात आला आणि  या स्थानकाचे नाव ‘छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) करण्यात आले. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. खेदाची बाब हि आहे की, या स्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवून सुमारे २० वर्षाचा कालावधी लोटला तरीदेखील या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आजतागायत बसविण्यात आलेला नाही. या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे केली आहे. या स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा केंद्र सरकारने समावेश केला असल्याची ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी माहे डिसेंबर २०२५ मध्ये दिली आहे. त्यानुसार शिवरायांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी या स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा तातडीने शुभारंभ करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाद्वारे श्री मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत केली.

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि मुंबईत उष्ण व आर्द्र हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.  पुढील पाच दिवस हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे.  विदर्भात आणि मराठवाड्यात शुष्क वाऱ्यांमुळे तापमानाची धग अधिक जाणवत आहे.

मुंबईत आज तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबई उपनगरात काही भागात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत देखील तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल राम मंदिर परिसरात ४२.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे मुंबई हवामान केंद्राकडून आवाहन करण्यात आले आहे.मुंबईत सरासरी तापमानापेक्षा ६.४ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या

शरीरावर जवळपास ३२ हून अधिक वार

उल्हासनगर दि ९ ( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नशेखोर तरुणाने ऑन ड्युटी सफाई कामगारावर धारदार चाकूने जवळपास ३२ हून अधिक त्याच्या शरीरावर वार करून त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची खळबजनक घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

मिळालेल्या माहितीनुसार चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेल्या त्या सफाई कामगाराचे नाव महादू उर्फ महादेव जगताप (३५) असे आहे. तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक मधील शहाड गावठाण परिसरात राहत होता. महादू हा कोणार्क ग्रीन एन्व्हायरो या कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी तो शहरातील पॅनल क्रमांक ११ मध्ये बॅरेग क्रमांक ८९६, माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर त्या ठिकाणी लोकांच्या घरातून कचरा डब्यामध्ये टाकण्याचे काम करीत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या ठिकाणी एका नशेखोर तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून महादू याच्याशी भांडण काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या तरुणाने त्याच्या जवळील धारदार चाकूने महादू जगताप यांच्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक चाकूचे सपासप वार केले. महादू हा रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडला. हा प्रकार घडून येतात त्या तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून डांबून ठेवले. या घटनेची खबर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

जखमी महादू जगताप याला त्वरित उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी त्या तरुणाला महादू जगताप यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एकच संतापाचे वातावरण पसरले असून त्यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन त्या ठिकाणी गर्दी केली होती.

ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या हत्याची थरारक दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी या घटने प्रकरणी तपास सुरू केला असून ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव दुर्गेश गुप्त असल्याचे सांगितले आहे. कोणार्क कंपनीच्या सफाई कामगारांनी या घटनेचा निषेध केला. नशेखोर तरुणाकडून हा हात्याचा प्रकार घडून आल्याने शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कोण पुरवणार. निर्घृण हत्या करण्यात आलेल्या महादू जगताप याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्याला दोन लहान मुले आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत लढा संघटनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले महानगरपालिकेने व कोणार्क कंपनीच्या प्रशासनाने महादू जगताप यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्याच्या मुलांच्या भवितव्याचे तजबीज करता येईल, त्याच्या कुटुंबाला आधार होईल आणि ज्या आरोपीने हे कृत्य केले या घटनेच्या निषेधार्थ उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्या तरुणाने महादू जगताप यांच्यावर इतक्या भयानक प्रमाणे चाकूने सपासप वार का केले. याचीही माहिती पोलीस काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील मोकाट फिरणाऱ्या नशेखोर व गांजाडी तरुणाविरुद्ध पोलिसांनी त्वरित काहीतरी उपयोजना करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *