राजेंद्र साळसकर
मुंबई :प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) ते मडगाव दरम्यान धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०११२९ (सीएसएमटी – मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल व १४ एप्रिलला सीएसएमटी येथून पहाटे २ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक ०११३० (मडगाव – सीएसएमटी वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल २०२६ व १४ एप्रिल २०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.
या गाड्यांमध्ये १८ वातानुकूलित ३-टियर इकॉनॉमी डबे आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
ठाणे, गेली पाच दशके सिडको ते कळवा पूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या खाडीतील गाळ काढून खाडी लगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण आदी कामे करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
येथील भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले होते. गेल्या काही दशकांत या खाडीचा गाळ उपसण्यात आलेला नसल्याने खाडीची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यात तसेच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. या पार्श्वभूमीवर श्री.केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, अरीफ बडगुजर आदी उपस्थित होते. या खाडीलगत मुख्य ठाणे वसले असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली.
डॉ डी एल कराड यांची मागणी

अनिल ठाणेकर
नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC) गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे स्वागतार्ह आहे. तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC) गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड.तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते.
मुंबई: वारंवार निवेदन देऊनही तसेच मंत्री स्तरावर आदेश होऊनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले. भाऊसाहेब नळकांडे, अविनाश नळकांडे, रेखा नळकांडे, लीलाबाई नळकांडे, विठ्ठल नळकांडे, बापूसाहेब नळकांडे, सविता वाळके, विद्या टेमगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
मौजे बुरूंजवाडी,ता.शिरूर. जि.पुणे येथील गट नं १५७ बाबत तीन संपादनशीट असून तसेच ८८ आर क्षेत्र परस्पर कमी करून केलेला अन्याय, उपअधिक्षक भुमी-अभिलेख यांनी अपिल करता येऊ नये म्हणुन आदेशाची उशिरा समज देऊन तातडीने केलेली मोजणी, महसुलमंत्री यांनी दोन वेळा लेखी निर्देश देऊनही सुनावणीची प्रक्रीया न केल्याने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत सदर गटातील हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी यासाठी राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ०४/०९/२०२५ व ०७/०१/२०२६ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांना रितसर चौकशी करून नियमानुसार मुदतीत उचित कार्यवाही करावी असे लेखी निर्देश दिले होते.सदर प्रकरणी बोगस धरणग्रस्तांना जमीन वाटप केलेली आहे.
उपअधिक्षक,भूमी-अभिलेख शिरूर यांनी सदर गटातील मोजणी प्रक्रीया होण्यासाठी दिलेल्या हरकत अर्जाची सुनावणी घेऊन आदेशावर २८/११/२०२५ ही तारीख असताना जाणूनबुजून ०८/०४/२०२६ ला निकालाची समज उशिरा दिली व तातडीने १०/०४/२०२६ ला प्रतिवादी यांच्याशी संगनमत करून मोजणी करण्याचा खटाटोप केला असा आरोप भाऊसाहेब नळकांडे यांनी केला आहे.
00000000
नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. शासनाच्या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो उद्यान’ साकारुन प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील भटवाडी येथे या ‘नमो उद्यान’चा भूमिपूजन समारंभ राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘नमो उद्यान’ विकसित करा. या आराखड्यात पर्यावरणपूरक नियोजन, नागरिकांसाठी विरंगुळ्याची आधुनिक साधने तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा यांचा समावेश या उद्यानात करण्यात येणार असून, हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह नगरसेवक, स्थानिक नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत केले. सुहास गवंडळकर, गौरी मराठे व स्थानिक नागरिकांच्या वतीने राणे यांचा सन्मान करण्यात आला.
रेल्वे कर्मचारी, अधिकारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई :महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चर्नीरोड (प. रेल्वे) स्थानकावर भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
चर्नीरोड स्थानकावरील पश्चिम रेल्वे तिकीट घर ब्रिजवर वाणिज्य अधीक्षक जितेंद्र गजभिये यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. मंगेश कुपवडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर अनिता सातपुते (वाणिज्य अधीक्षक, ग्रॅन्ट रोड) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उदय राणे (स्टेशन अधीक्षक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख प्रवचनकार समाजभूषण बौद्धाचार्य सो. ना. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध वंदना व पूजापाठ संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात समाजसेवक नामदेव सरवदे, एच. एम. जाधव (सहाय्यक आयुक्त, मनपा मुंबई), उद्योगजक मयूर शहा, योगेश नंदेश्वर (प्रयोगशाळा अधीक्षक, प.रे.), शशिकांत सावंत, विठ्ठल सोनकांबळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
आयोजक जितेंद्र गजभिये यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच आम्ही आज उच्च पदावर पोहोचलो आहोत. त्यांच्या कार्याची जाणीव कामगारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. ही जयंती साजरी करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
या जयंती महोत्सवाच्या यशस्वितेसाठी नितीन सोनावणे, अविनाश शिर्के, प्रकाश बनसोडे, अजिनाथ खरात, आरती सकपाळ, राजेश लोहानी, प्रियंका आझाद, राजकुमार शर्मा, चंदनकुमार, श्रुती मोरे, सुमन कोरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. मुक्त पत्रकार समाजभूषण बौद्धाचार्य सो. ना. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यक्रम यशस्वी झाल्याची माहिती दिली.
कल्याण : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे यावर्षी नाशिक येथील काळाराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. काळाराम मंदिराचा लढा हा केवळ मूर्तीच्या दर्शनासाठी नव्हता, तर तो माणसाला माणूस म्हणून मिळणाऱ्या अधिकाराचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहातून जगाला दाखवून दिले की, ‘गुलामगिरीची जाणीव झाली की गुलाम बंड करून उठतो’. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मृतीस आणि बाबासाहेबांच्या त्या अदम्य जिद्दीस या देखाव्यातून अभिवादन केले असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितिन निकम यांनी दिली.

कल्याण : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित रिजन्सी सर्वम क्लब हाऊस,टिटवाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित एक सामाजिक बांधिलकी जपत व त्यांच्या विचारांना कृतीत आणण्यासाठी रक्तदान हेच जीवनदान या उक्तीनुसार रक्तदान शिबिराचे रिजन्सी सर्वम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित अभिवादन केले. रक्तदान शिबीरास मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर ३ व रेड स्वस्तिक सोसायटी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व रेड स्वस्तिक सोसायटी चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0000000
ठाणे, भा
रतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी उज्वला सपकाळे तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या समस्यांना मिळणार आता हक्काचं व्यासपीठ. प्रशासकीय कामांतील अडथळे असोत किंवा नागरी समस्या, आता प्रत्येक प्रश्नावर थेट चर्चा आणि तात्काळ निवारण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मीरा-भाईंदरचे लाडके लोकप्रतिनिधी प्रताप सरनाईक यांच्या वतीने मीरा-भाईंदर शहरात गुरुवार, १६ एप्रिल रोजी भव्य “लोकदरबार” चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे कलादालन, भाईंदर पूर्व येथे सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत हा लोकदरबार संपन्न होणार आहे.
