आशाताईंनी सांस्कृतिक वारसा समृद्ध केला- मोदी
मुंबई : “भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता – फडणवीस
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहीली.
आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला – एकनाथ शिंदे
भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या ‘पद्मविभूषण’, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड – सुनेत्रा पवार
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रद्धांजली वाहीली.
अजरामर आवाज हरपला- शरद पवार
“आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
ई-बाईक टॅक्सीचालकांना
मंडळात सामावून घेणार !
मुंबई – महामुंबईसह राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळामध्ये आता ई बाईक टॅक्सी चालकांनादेखील सामावून घेणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच सभासद नोंदणी शुल्क रद्द करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’ची स्थापना केली आहे. दरम्यान, या मंडळामध्ये नोंदणी शुल्क आणि वार्षिक शुल्कावरून वाद निर्माण झाला होता. याला विरोध करत ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते, तर नोंदणी शुल्क रद्द न केल्यास ते आणखी तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.
सरनाईक यांच्या मते मुंबईमध्ये धावणाऱ्या अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाईही सुरू आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात ज्यांचे परवाने रद्द केलेले आहेत, त्यांना कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा परवाने देण्यात येतील.

कृषी विभागाच्या योजनात शेतकरी, शासनालाही ‘चुना’?
योगेश चांदेकर
पालघरः शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी खात्याची असते; परंतु राज्यात कृषी विभागातच सर्वाधिक गैरव्यहार होतात. योजनांचा निधी खर्च;परंतु कामेच नाहीत, कामे हाती घेतली, तर कामे कमी करून निधी मात्र पूर्ण लाटणे, कागदोपत्रीच कामे करणे, कामे पूर्ण होण्याच्या अगोदरच बिले काढणे असे प्रकार पालघर जिल्ह्यात वांरवार घडत आहेत. गेल्या दीड वर्षात राज्याला तीन कृषिमंत्री मिळाले. त्यातील दोघांना वादग्रस्त होऊन राजीनामे द्यावे लागले असले, तरी तिसऱ्या कृषिमंत्र्यांच्या काळातही कृषी विभागातील गैरव्यवहार काही थांबले नाहीत.
जमिनीच्या संरक्षणासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रामुख्याने मजगी (कंटूर बंडीग / टेरेसिंग) योजना राबवली जाते. जमिनीच्या उतारास आडवे बांध घालून माती व पाणी अडवण्याच्या या पद्धतीला कृषी खात्याच्या तांत्रिक भाषेत ‘मजगी’ किंवा ‘पायऱ्यांची शेती’ असेही म्हणतात. कोकणात जास्त पाऊस आणि उताराची शेती असल्याने मजगीची कामे याच विभागात मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य सरकार निधीची तरतूद करते; परंतु दरवर्षी मजगीची कामे दाखवून त्यावर निधी खर्च केला जातो. मजगीचे काम एकदा केल्यानंतर त्यावर तीन वर्षे पुन्हा निधी खर्च व्हायला नको; परंतु पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यामध्ये प्रामुख्याने पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, येथील अधिकाऱ्यांनी संगनमताने या नियमाला तिलांजली देऊन दरवर्षी त्याच त्या कामावर निधी खर्च केला असल्याचे समोर आले आहे?
अनेक योजनांतून एकाच ठिकाणी काम
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूनही नालाबंडिंगसह शेतीतील जलसंधारणाची अनेक कामे हाती घेतली जातात. जलसंधारण, मृदसंधारण विभाग तसेच कृषी विभागातूनही अशी कामे केली जातात. पालघर जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतीतील नालाबंडिंग, शेततळी तसेच अन्य अनेक प्रकारची कामे केली जातात. याच कामावर पुन्हा कृषी विभाग काम करतो. त्यातून शासनाच्या निधीचा अपव्यय होतो. शेतीत कामे करताना संपूर्ण क्षेत्राचे बील काढले जाते; परंतु काम प्रत्यक्षात फारच कमी क्षेत्रात होते. त्यातही लांबी, रुंदी जास्त दाखवून बील काढले जाते आणि प्रत्यक्षात काम तेवढे नसते.
सरकारी कोणत्याही अधिकाऱ्याला एका ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ राहता येत नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर तसा नियम करण्यात आला; परंतु कृषी खात्याचे पालघर जिल्ह्यातील अधिकारी एका एका ठिकाणी 10 15 वर्षे व त्याही पेक्षा कायम आहेत. त्यांची वरिष्ठ अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या मदतीने त्यांच्या सोयीनुसार बदली केली जाते. यामुळे त्यांनी लागेबांधे तयार केले असून, त्याचा गैरफायदा घेऊन ते गैरव्यवहार करतात. वरिष्ठही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. काही ठिकाणी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे संगनमत झाले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना कोणी हात लावत नाही. त्यातच त्यांचे फावले आहे.
चिरंतन आशा
तैयार, संस्कारी गळा हे तर गाणाऱ्याचं माध्यम! मात्र आपल्या सुरानं ऐकणाऱ्याच्या भावविश्वात घरटं बांधणं हे अलौकिकत्वाचं देणं आणि ते फेडताना ज्या काळजातून तो सूर उमटतो त्या काळजाचंही तावून-सुलाखून निघणं ओघानं आलंच! म्हणूनच तर ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ हे गाताना हुंदके देत ढसाढसा रडणाऱ्या आशाबाई आणि त्यामुळं त्यादिवशी कितीतरीवेळा स्थगित झालेलं रेकॉर्डिंग, ही कथा ऐकायला मिळते. अशी संवेदनशीलता राखल्याशिवाय तो सूर ऐकणाऱ्यांची मनं आरपार छेदून जाणं कसं शक्य होईल!? एखाद्या सुरातल्या रसरशीत जाणिवाच तर ऐकणाऱ्याच्या मनात उतरतात आणि जाणिवांची ती अपार तरलता आशाबाईंच्या सुरांत लख्ख दिसते, म्हणून त्या आपल्या काळजाशी इतक्या सहजी संधान बांधू शकतात. एखाद्या शब्दलेण्याच्या अर्थाकाराशी एकरूपत्व साधत त्या भावविश्वात एका असोशीनं स्वच्छंदपणे किंबहुना स्वैरपणे स्वत:ला झोकून देण्याचा आशाबाईंच्या सुराचा जो स्वभावधर्म आहे त्याला अक्षरश: तोड नाही! अशा त्या झोकून देण्यातलं उन्मुक्तपणच मग ऐकणाऱ्याला आवेगानं येऊन भिडतं आणि तिथेच आशाबाई ह्या ‘एकमेवाद्वितीय’ ठरतात.
कोणताही गीतप्रकार असो… प्रत्येकच गीत `हे आशाबाईच गाऊ शकतात’ असं वाटायला लावतं, ह्याचं कारण म्हणजे केवळ त्यांना लाभलेला दैवी सूर नव्हे तर त्यांचा समर्पणभाव! पाणी जसं स्वत:चं वेगळं अस्तित्व विसरून आपल्याला येऊन मिळणाऱ्या रंगात रंगून जातं तसं आशाबाई त्या-त्या रचनेच्या शब्द-सुरांशी एकाकार होऊन जातात आणि मग तिथं काहीच ‘टिपिकल’ न उरता खास त्या-त्या रचनेचा असावा तोच रंग आशाबाईंच्या सुरांतून ओतप्रोत ओसंडत राहातो. ह्या सुराच्या किती आणि कायकाय आठवणी सांगाव्या… आणि सांगायला गेलंच तरी त्या कुठून सुरू कराव्या आणि कुठं व कसं थांबावं तरी!…
‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी’, ‘झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा’ अशी गीतं ऐकताना अगदी लहान, गोंडस, गोबऱ्या गालांचं मूल ज्यांच्या सुरांतून हसताना स्पष्ट जाणवतं तोच सूर ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’ ह्या शब्दांना न्याय देताना तसूभरही मागं राहात नाही. ‘अजि मी ब्रम्ह पाहिले’, ‘ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर’ ह्या शब्दांतलं ब्रम्ह ज्यांच्या सुरांतून प्रकट होतं, ‘हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते’ ह्या शब्दांतला मीरेचा प्रेमभाव ज्या सुरांतून झरलेला ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, ‘जन्मभरीच्या श्वासांइतुके मोजियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम’ ह्या भाबड्या शब्दांतला अतूट भक्तिभाव जे सूर स्पष्ट दाखवतात तेच सूर ‘जा जा जा रे नको बोलू जा ना’, ‘हवास मज तू, हवास तू’, ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ‘चढाओढीनं चढवित होते, बाई मी पतंग उडवित होते’, ‘एक झोका चुके काळजाचा ठोका’, ‘येऊ कशी प्रिया’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ असे कित्येक अनोखे भावही अगदी नेमकेपणी टिपून ते आपल्या मनात उतरवतात. ह्यातल्या कुठल्याच रंगात रंगून जाताना तो सूर जराशीही गल्लत करत नाही.
‘तरुण आहे रात्र अजुनी’ मधल्या ऐन तारुण्यात वैधव्य भाळी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचा तो मूक आकांत, ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ ऐकताना श्वासांत जाणवू लागलेली थरथर, ‘का रे दुरावा का रे अबोला’ मधली ती काळजाला हात घालणारी मनधरणी, ‘देव जरी मज कधी भेटला’ मधे उतरलेलं मूर्तिमंत आईचं काळीज, ‘नभ उतरू आलं’ मधलं त्या सुराचं झिम्माडपण, ‘गेले द्यायचे राहून’ मधली जखम भळभळत ठेवणारी खंत, ‘दिसं जातील दिसं येतील’ मधल्या संयमी सुरांतून डोकावणारा आशावाद, ‘केव्हांतरी पहाटे’ मधल्या सुरांतला गूढ चांदणभास, ‘मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ मधली ती प्रणयोत्सुकता, ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ म्हणत त्या परमोच्च शक्तीला घातलेली विरक्तीभरली साद, ‘पाण्यातले पाहाता प्रतिबिंब हासणारे’ ऐकताना ओठांवर येणारं लाजरं हसू आणि मनात उमलणारे ते नवखे भाव, ‘भोगले जे दु:ख त्याला’ मधली मन कुरतडणारी वेदना, ‘खेड्यामधले घर कौलारू’ मधली डोळ्यांसमोर सुरम्य खेडं उभं करणारी रमणीयता, ‘समईच्या शुभ्र कळ्या’मधलं एक अगम्यपण, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ म्हणतानाचं सुरूपता वाट्याला न आल्यातलं दुखरेपण आणि एके क्षणी सत्य उमजल्यावर सुरांत उतरलेला त्या पिल्लाच्या देहबोलीतला डौल, ‘मी मज हरपुन बसले गं’ म्हणतानाचं ते सुराचं हरपलेपण, ‘स्वप्नात रंगले मी’ ऐकणाना आपलं भावविभोर होत गुंगून जाणं, ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हां’ मधल्या अपूर्णतेतल्या गोडीनं अवघा जीव व्यापून टाकणं… हा प्रत्येक आणि असे अजून कित्येक भावरंग नेमकेपणी अनुभवताना आपण आशाबाईंच्या सुराचं न फेडता येण्यासारखं देणं लागतो.
आजच्यासारखी ‘ब्रेक-ब्रेक के बाद’ रेकॉर्डिंगची सोय उपलब्ध नसताना ‘जिवलगा कधी रे येशील तू’ सारखी पाच रागांत बांधलेली अवघड रचना सहजसुंदर सुरांत पेलणं, ‘घनरानी साजणा’ मधली सुराची जितकी उंची तितकीच खोलीही सहजी जपणं, ‘चांदणे शिंपीत जाशी’ मधली चंचलता सांभाळतानाही सुराचं नेमकेपण जपणं, वडील मा. दीनानाथांच्या शैलीत त्यांनी सादर केलेली नाट्यपदं अशा कित्येक गोष्टी दैवदत्त देखण्या सुराला आशाबाईंनी मेहनतीनं पाडलेले पैलूही दाखवतात… अर्थात मी करत असलेलं हे सगळंच वर्णन म्हणजे मुळाक्षरं गिरवत असलेल्या चिमुरड्यानं अनभिज्ञतेच्या कोषात असताना एखाद्या प्रतिभासंपन्नतेची स्तुती करण्याइतकं बालिश आहे. मात्र ह्या असामान्य सुरावर वेडं प्रेम करायला तर कोणत्याच गुणवत्तेचा निकष लागू होत नाही. त्याच प्रेमभावानं केलेली ही ‘ज्योतीने तेजाची आरती’!
आशाबाई… तुमच्या सुराविषयी चार शब्द जुळवतानाही दमछाक होतेय! तुमचा सूर, त्याचं अलौकिकत्व, समर्पणभावानं तुमचं त्याच्याशी तादात्म्य पावणं हे आम्ही रसिकांनी फक्त अनुभवावं आणि त्या दिव्य अनुभूतीच्या ऋणात राहावं! तुम्ही आणि तुमचा चिरंतन सूर इथेच आहे लाखों काळजांमधे! कशा जाऊ शकाल कुठं?

-आसावरी केळकर-वाईकर

सुरांचा ‘साज’ हरपला…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन
संपदा सावंत
मुंबई – सप्तसुरांना आपल्या स्वर्गीय आवाजाने ‘साज’ चढवणाऱ्या ‘स्वरसाम्राज्ञी’ ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार उद्भवलेल्या इतर व्याधींशी त्या झुंज देत होत्या. ‘अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले असलायची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन आणि संगीतविश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 मध्ये अवघ्या 10 व्या वर्षी गायन क्षेत्रात पदार्पण केले. मराठी, हिंदीसह अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये त्यांनी प्रेमगीत, गझल, भावगीत, भजन, लावणी, कव्वाली, डिस्को ते रिमिक्स अशा विविध प्रकारची गाणी गायली. त्यांच्या गायनातील वैविध्य हेच त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.
हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. तसेच मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमारपासून ते आंतरराष्ट्रीय कलाकारांपर्यंत अनेकांसोबत त्यांनी गाणी सादर केली. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.
आशा भोसले यांच्या नावावर एक-दोन नव्हे, तर तब्बल २० वेगवेगळ्या भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गाण्याचा जागतिक विक्रम आहे. यासाठी त्यांची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. त्यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर इंग्रजी, रशियन, नेपाळी, मल्याळम, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये आपली जादू पसरवली आहे. महाराष्ट्र भूषण सारखे अनेक मोठे पुरस्कार त्यांना मिळाले.
प्रमुख पुरस्कार
पद्म विभूषण – २००८, दादासाहेब फाल्के पुरस्कार – २०००, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका) – १९८१ और १९८६, फिल्मफेयर पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका) – १९६८, १९६९, १९७२, १९७३, १९७४, १९७५ और १९७९, फिल्मफेयर स्पेशल अवॉर्ड (फिल्म “रंगीला”) – १९९६, फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड – २००१, आयफा अँवार्ड (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका) – २००२ फिल्म “लगान” चे गीत “राधा कैसे न जले” साठी, नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड – १९८७, सिंगर ऑफ द मिलेनियम – २००० (दुबई), बीबीसी लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड – २००२.

‘आशाताई’ दि लास्ट एम्परर
राज ठाकरे
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
‘पिया तू अब तो आजा’ मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. ‘आईये मेहरबान’ मध्ये लडिवाळपणा आहे, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ मध्ये नजाकत आहे. ‘दम मारो दम’ मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रध्दांजली
घसरण खरी की वाढ?
‘रुपया घसरत नाही, तर डॉलर मजबूत होत आहे,’ अशी मांडणी सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. विशेषतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही भूमिका ठामपणे मांडली आहे. जागतिक स्तरावर डॉलरची वाढती ताकद हा एक निर्विवाद घटक असला, तरी या विधानामध्ये वास्तवाचा केवळ एक भाग सामावलेला आहे, हेही तितकेच खरे आहे. कारण चलनाच्या मूल्याचा प्रश्न हा नेहमीच सापेक्ष असतो. डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर चलने कमकुवत होत असतात. सरकारकडून केले जाणारे हे स्पष्टीकरण राजकीयदृष्ट्या सोयीचे असले, तरी आर्थिक वास्तव अधिक गुंतागुंतीचे आहे. डॉलर मजबूत होण्यामागे अमेरिकेतील ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदरवाढ, जागतिक गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे राहणारा कल आणि भू-राजकीय अस्थिरतेसारखे घटक कारणीभूत ठरतात. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर दबाव येणे अपरिहार्य आहे; मात्र या दबावाचा सामना करण्यासाठी देशांतर्गत पातळीवर काय उपाययोजना केल्या जात आहेत, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. याच संदर्भात रिझर्व्ह बँकेने घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरते. रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परकीय चलन बाजारात डॉलर विकण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेला ‘इंटरव्हेन्शन’ असे म्हटले जाते. यामध्ये रिझर्व्ह बँक आपल्या साठ्यातील डॉलर बाजारात ओतते. त्यामुळे डॉलरचा पुरवठा वाढतो आणि त्याचा दर काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येतो. ही पद्धत अल्पकालीन स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रभावी मानली जाते; परंतु या हस्तक्षेपाचे परिणाम केवळ तात्कालिक मर्यादेतच मर्यादित राहत नाहीत.
रुपयाच्या घसरणीचा प्रश्न हा केवळ शब्दांच्या खेळाने किंवा स्पष्टीकरणांनी सुटणारा नाही. तो वास्तव स्वीकारून, त्यावर ठोस आणि सुसंगत उपाययोजना राबवूनच हाताळता येतो. अन्यथा, ‘रुपया घसरत नाही’ ही मांडणी केवळ राजकीय बचावाची ढाल ठरते आणि आर्थिक वास्तव मात्र आपल्या मार्गाने पुढे सरकत राहते. भारतीय रुपयाची घसरण हा केवळ चलन बाजारातील तांत्रिक बदल नसून देशाच्या एकूण आर्थिक आरोग्याचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, भांडवली प्रवाहातील चढ-उतार आणि देशांतर्गत आर्थिक आव्हाने यांच्या संगमातून रुपयावर दबाव निर्माण होतो आणि त्याचे पडसाद संपूर्ण अर्थव्यवस्थेत उमटतात. म्हणूनच रुपयाच्या घसरणीकडे केवळ आकड्यांच्या दृष्टीने न पाहता व्यापक परिणामांच्या संदर्भात पाहणे आवश्यक ठरते. रुपया कमकुवत होण्याचा सर्वात तात्काळ आणि प्रकर्षाने जाणवणारा परिणाम म्हणजे आयात महाग होणे. भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयातीवर, विशेषतः कच्च्या तेलावर अवलंबून आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरतो, तेव्हा तेल आयात करण्यासाठी अधिक रुपये मोजावे लागतात. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होतो आणि त्यानंतर वाहतूक खर्च वाढून महागाईला चालना मिळते. ही महागाई केवळ इंधनापुरती मर्यादित राहत नाही, तर अन्नधान्यापासून दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये पसरते. महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो. पगार तेवढाच राहतो; पण खर्च वाढतो.
या पार्श्वभूमीवर मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांच्या अर्थसंकल्पावर सर्वाधिक ताण पडतो. परिणामी, उपभोग कमी होतो आणि अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होण्याची शक्यता निर्माण होते. ही मागणी घटल्यास उत्पादनक्षेत्रावर परिणाम होतो आणि रोजगारनिर्मितीवरही दुष्परिणाम दिसून येतात. निर्यातक्षेत्रासाठी रुपयाची घसरण काही प्रमाणात लाभदायक ठरते, असा पारंपरिक युक्तिवाद केला जातो. रुपया स्वस्त झाल्यामुळे भारतीय वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात तुलनेने स्वस्त होताआणि निर्यात वाढू शकते; परंतु हा फायदा प्रत्यक्षात अनेक मर्यादांमध्ये अडकलेला असतो. कारण निर्यात वाढण्यासाठी केवळ चलनाचा दरच पुरेसा नसतो, तर उत्पादनक्षमता, गुणवत्ता, जागतिक मागणी आणि व्यापार धोरणेही तितकीच महत्त्वाची असतात. त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा निर्यातीवर होणारा सकारात्मक परिणाम मर्यादित आणि असमान असतो. रुपयाच्या घसरणीचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे परकीय कर्जाचा बोजा वाढणे. ज्या कंपन्यांनी किंवा सरकारने परकीय चलनात कर्ज घेतले आहे, त्यांना ते परत करताना अधिक रुपये मोजावे लागतात. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर ताण येतो. काही वेळा याचा परिणाम गुंतवणुकीच्या निर्णयांवर होतो आणि आर्थिक वाढीचा वेग कमी होऊ शकतो. या साऱ्या प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदरांमध्ये बदल करते किंवा परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करते; मात्र या उपाययोजना नेहमीच संतुलित पद्धतीने कराव्या लागतात. व्याजदर वाढवले, तर महागाई आटोक्यात येऊ शकते; पण त्याचा परिणाम कर्जमहागाईवर होऊन उद्योगांवर ताण येतो.
याउलट, बाजारात डॉलर विकून रुपयाला आधार दिल्यास परकीय चलन साठ्यावर ताण येतो. त्यामुळे या धोरणात्मक निर्णयांमध्ये नेहमीच एक सूक्ष्म संतुलन साधावे लागते. रुपयाच्या घसरणीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरही होतो. परकीय गुंतवणूकदारांना चलनातील अस्थिरता नको असते. रुपया सातत्याने कमकुवत होत आहे, असे वाटल्यास ते गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. यामुळे भांडवली बाजारात अस्थिरता वाढते आणि अर्थव्यवस्थेवर आणखी दबाव निर्माण होतो. याच वेळी, सरकारसमोरही अनेक आव्हाने उभी राहतात. एकीकडे महागाई नियंत्रणात ठेवण्याचा दबाव असतो, तर दुसरीकडे आर्थिक वाढ कायम ठेवण्याची गरज असते. आयात कमी करणे, निर्यात वाढवणे, परकीय गुंतवणूक आकर्षित करणे आणि आर्थिक सुधारणा राबवणे या सर्व उपाययोजनांचा समन्वय साधावा लागतो; परंतु या उपाययोजना दीर्घकालीन असतात आणि त्यांचे परिणाम तात्काळ दिसून येत नाहीत. रुपयाच्या घसरणीकडे पाहताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे हा प्रश्न केवळ देशांतर्गत धोरणांपुरता मर्यादित नसतो. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, भू-राजकीय तणाव, तेलाच्या किंमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील घडामोडी या सर्वांचा त्यावर प्रभाव असतो. त्यामुळे रुपयाची घसरण ही अनेक घटकांच्या परस्परसंवादातून निर्माण झालेली परिस्थिती असते.

समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेत आज साठ टक्के प्रतिगामी धर्मांध शक्ती सक्रिय झाल्या आहेत असा खळबळजनक आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे चाणक्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे समाजात चांगलीच खळबळ उडाली असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
इथे प्रतिगामी आणि धर्मांध म्हणजे शरद पवारांना काय अभिप्रेत आहे हे सर्व सामान्य माणूस जाणतोच. शरद पवार हे एकूणच हिंदू धर्माच्या त्यातही एका विशिष्ट उच्च वर्णीय जातीच्या कायम विरोधात वक्तव्य देखील करतात आणि राजकारण देखील करतात. त्या विशिष्ट जातीबाबतचा त्यांचा आकस त्यांच्या अनेक कृतीतून वेळोवेळी दिसून आलेला आहे. त्यामुळे त्याच आकसापोटी त्यांनी हे विधान केले आहे यात कोणाचेही दुमत होऊ नये.
वस्तूतः महाराष्ट्रात वारकरी परंपरा सुरू झाली तिला मुळातच धार्मिक आधार होता. पंढरीचा विठोबा हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आजूबाजूच्या आंध्र कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड या परिसरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान राहिलेले आहे. त्यामागे देखील धार्मिक अधिष्ठानच आहे. पायी वारी केली तर पंढरपूरचा पांडुरंग पावतो या श्रद्धेतून ही पायी वारकरी सुरू झाली. मग पायी चालता चालता माणूस थकू नये म्हणून पांडुरंगाचा जयघोष करत टाळ मृदुंग वाजवत डोक्यावर पांडुरंगाला प्रिय असणारी तुळस तिचे वृंदावन डोक्यावर घेऊन नाचत रिंगण घालून महिलांनी इतकेच काय पण पुरुष वारकऱ्यांनी उघड्या फुगड्या झिम्मा खेळत पंढरपूरला मजल दरमजल करत पोहोचायचे. रस्त्यात विश्रांती जिथे असेल तिथे पांडुरंगाचे भजन करायचे आणि कीर्तनकारांनी कीर्तन करायचे हे सर्व रिवाज या वारीत सुरू झाले. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळेच हे सुरू झाले ना. त्यातूनही भजने कीर्तने आणि प्रवचने यातून सर्वच मान्यवर सामाजिक समरसतेचा संदेश देतच होते ना. आजही ते असा संदेश देतच असतात. फक्त पंढरपूरची वारीच नाही तर गणेशोत्सव दुर्गा उत्सव जन्माष्टमी दहीहंडी असे अनेक धार्मिक उत्सव सामाजिक समरसतेसाठीच आयोजित केलेले. असतात हे वास्तव नाकारता येत नाही.
मात्र हिंदू धर्म हिंदू प्रथा परंपरा यांना कायम प्रतिगामी ठरवून आपण पुरोगामी असल्याचा आभास निर्माण करायचा असा विचार करणारा या देशात एक वर्ग आहे. शरद पवार त्याचे म्होरकेच आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरवू नये. त्यातूनच त्यांनी हे विधान केले आहे हे स्पष्ट दिसते आहे.
हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णुतेचा संदेश देणारा धर्म आहे. इथे सर्वांना सामावून घेण्याची परंपरा अगदी पूराण काळापासून सुरू असलेली दिसून आली आहे. आज करोडो हिंदूंचे दैवत असलेले प्रभू रामचंद्र ज्यावेळी पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनवासाला निघाले, त्यावेळी रस्त्यात आदिवासी राजा निषाद याच्याकडे त्यांनी पाहुणचार घेतला होता. नंतर रस्त्यात आडवी येणाऱ्या नदीतून पुढे जायचे तर निषादराच्या राजा आपल्या होळीतून होडीतून प्रभू रामचंद्रांना स्वतः नाव वल्हवीत घेऊन गेला होता याची नोंद रामायणात आहे. रामायणातच दुसरी नोंद अशीही आहे की वनवासाला जाताना शबरी नामक वनात राहणाऱ्या वृद्ध महिलेने श्रद्धेपोटी तोडून ठेवलेली पुष्टी बोरे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली होती. कृष्णपुराणात देखील सुदामा नमक गरीब मित्राकडे भगवान श्रीकृष्ण स्वतः गेले होते अशी नोंद सापडते. त्याच सोबत श्रीकृष्णाचे सर्व बालपण गाई राखणाऱ्या गुराखी मुलांसोबतच गेले होते अशाही नोंदी आहे. हे बघता या धर्माने कायम सहिष्णुतेचा संदेश दिला आहे हे स्पष्ट होते.
आज या देशात सुरुवातीला जे कोणी होते ते हिंदूच होते. नंतर मुस्लिम या देशात आले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावर आपला धर्मप्रसार केला. इथे अनेक हिंदूंना त्यांनी बाटवून मुस्लिम केले. तोच प्रकार ख्रिश्चनांनी देखील केला. त्यांनी गोरगरिबांना प्रलोभने दाखवून बळजबरीने ख्रिश्चन केले. मात्र हिंदू धर्मात अशी कोणावरही दबाव टाकून किंवा प्रलोभने दाखवून धर्मप्रसार करण्याची पद्धत कधीच नव्हती, आणि आजही नाही. तरीही पवार हिंदू धर्माला प्रतिगामी म्हणतात हा या शतकातील विनोद म्हणावा लागेल.
जर शरद पवार स्वतःला पुरोगामी म्हणवतात तर मग ते मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे लांगुलचालन का करतात याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. कालच एका वृत्तवाहिनीवर पवार आपल्या घरी मुस्लिमांच्या रमजान महिन्यात इफ्तारची पार्टी आयोजित करतात. त्यांनी दिवाळीचे स्नेह मिलन केले किंवा घरी गणपती बसवून त्यासाठी दहा लोकांना निमंत्रित केले असे कुठे वाचण्यात आलेले नाही. ख्रिस्ती धर्माच्या बाबतही त्यांचे तेच धोरण राहिले आहे. जर तुम्ही स्वतःला पुरोगामी आणि निधर्मी म्हणून तर मग हे अन्य धर्मीयांचे लांगूलचालन तुम्हाला कसे चालते याचेही उत्तर पवारांनी द्यायला हवे.
स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांचे अवास्तव लाड करायचे आणि त्याचवेळी हिंदूंना कायम दाबून ठेवायचे असे काँग्रेसचे धोरण राहिले आहे. त्यांनी मतांचे राजकारण करण्यासाठी हे उद्योग केले. आज मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज संघटित आहे. त्यामुळे त्यांची गठ्ठा मते मिळवता येतात. हिंदू समाज काही संघटित नाही. त्यामुळे मग काँग्रेसला आणि पर्यायाने शरद पवारांना त्यांची थोडीही परवा राहिली नाही. म्हणूनच ते असे आरोप करू शकतात.
जर पवार स्वतःला पुरोगामी म्हणवतात, तर मग नाशिकमध्ये जो कार्पोरेट जिहादचा प्रकार समोर आला आहे, त्याबाबत ते का बोलत नाहीत. त्यांनी या प्रकाराला सुद्धा विरोध करायला हवा होता. म्हणजेच हिंदूंनी खाल्ले ते शेण, आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी केली ती श्रावणी, असेच पवारांचे धोरण आहे, असे इथे दिसून येते.
एकूणच पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून पवारांनी हिंदू धर्मियांवर टीका करण्यातच आयुष्य घालवले आणि आजही तेच करू बघत आहेत. मात्र आता वेळ आली आहे ती त्यांना फक्त लेखणीतून आणि तोंडाने नव्हे तर मतपेटीच्या माध्यमातून उत्तर देण्याची. त्यासाठी देशातील सहिष्णू हिंदूंना एकत्र यावे लागेल आणि काहीसे आक्रमक देखील व्हावे लागेल. तेव्हाच शरद पवारांसारखे असे कथित पुरोगामी गप्प बसतील. अन्यथा त्यांची वळवळ वळवळ सुरूच राहणार आहे हे नक्की.
कालचक्र
अविनाश पाठक

आशाताईंची सांगितिक श्रीमंती !
एक कलाकार म्हणून आशाताई प्रचंड थोरच, पण एक व्यक्ती म्हणून कसे जगायचे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. आशाताईंनी संगीतक्षेत्रावर गेली ऐशी वर्षे राज्य केले. त्याच वेळी त्यांचा मनमिळाऊ पण कणखर स्वभावही लोकांची मने जकत होता. आयुष्यातील चढउतारांमुळे येणाऱ्या कटुतेला थारा न देता कलेच्या पूजनामध्ये आयुष्य खर्चिल्यामुळे आशाताई आज थोर गायकांच्या पंगतीमध्ये जाऊन बसल्या. त्यांची आठवण जागवणारा लेख.
कोणत्याही कलाकाराच्या कारकीर्दीचा आलेखाचा परीघ फार मोठा असतो. त्यातच आशा भोसलेंसारख्या असामींची कारकीर्द एका लेखात बसवणे जवळपास अशक्यच; तरीही एखादे वेळी लहान तोंडी मोठा घास घेत आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या कलावंताबाबत लिहिण्याची संधी मिळते. आशाताईंना नव्वद वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली होती. आपल्यापैकी अनेकांचे आयुष्यच उणेपुरे 75 वर्षांचे असते. आशाताईंची तर कारकीर्दच तितकी! आपल्यातील प्रत्येकानेच आशाताईंच्या गाण्यांचा आस्वाद घेतला. त्यांच्या सुरांनी कधी आनंद दिला तर कधी डोळा पाणी आणले! एखाद्या कलाकाराच्या गायकीने संपूर्ण देशाच्या मनात घर होऊ शकते हे आपण याची देही याची डोळा अनुभवले ते आशाताईंमुळे. आशाताईंच्या जन्माने संगीत क्षेत्र श्रीमंत झाले. त्यांच्या गायकीबद्दल लिहावे तितके कमी आहे, पण एक व्यक्ती म्हणून आशाताईंचे समोर आलेले पैलू उलगडायचा हा प्रामाणिक प्रयत्न.
आजपर्यंत विविध कारणांमुळे आशाताईंना भेटण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या दिलखुलास आणि प्रेमळ व्यक्तीमत्त्वातील अनेक बारकावे समोर आले. आशाताईंबद्दल सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या अजूनही तरुण आहेत. त्या दिसतात तरुण, राहतात तरुण; पण त्यांच्या आचरणात शेवटपर्यंत चिरतरुण भाव पहायला मिळाले. नुकतीच त्यांच्या मागील वर्षीच्या वाढदिवसाची व्हिडीओ क्लिप बघत होते तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. त्यातच आशाताई नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुबईमध्ये कार्यक्रम करणार आहेत हे तेव्हा समजले तेव्हा मी अचंबित झाले होते! वयाची नव्वदी गाठणार म्हटल्यावर थकलेल्या, घरात झोपून राहिलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर येतात. पण आशाताईंनी जणू ‘म्हातारपणा’ची व्याख्याच बदलली. आशाताई शेवटपर्यंत एकदम टापटीप राहत, ग्रेसफुल दिसत. नव्वद वर्षांची एवढी उत्साही व्यक्ती मी कधी पाहिली नाही. त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत खूप चांगली होती. त्यांना प्रत्येक गाण्याच्या ओळी आठवतात. त्याचबरोबर विविध गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी घडलेले किस्से, गंमतीजमतीही त्यांना व्यवस्थित आठवत.
एका व्हिडीओमध्ये ‘मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे’ असे त्या म्हणाल्या तेव्हा हे विधान किती खरे आहे याची क्षणार्धात प्रचिती आली. त्यांनी इंडस्ट्रीमधील बदलाचे वारे लीलया झेलले आहेत. मूळ गाण्यांची नजाकत जपण्यापासून रिमिक्सच्या जमान्यापर्यंत त्यांनी संगीतक्षेत्रात झालेला प्रत्येक बदल अगदी जवळून अनुभवला. संगीतक्षेत्राशी निगडीत प्रत्येक कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्या कारकीर्दीमधील चढउतार आशाताईंनी खूप जवळून बघितले. त्यातील अनेकांना वेळप्रसंगी प्रोत्साहन दिले. मलाही कारकीर्दीच्या सुरुवातीला आशाताईंनी खूप प्रोत्साहन दिले होते. माझे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. मध्यंतरी एकदा आशाताईंवर लिहायची संधी मिळाली. तेव्हा मी लिहिलेला लेख फोनवर वाचून दाखवते असे म्हंटल्यावर त्यांनी साफ नकार दिला. ‘माझ्यासमोर बसून लेख वाचून दाखवायचास’ असा आग्रह धरत मला घरी बोलावले! नंतर विविध कारणांमुळे त्यांच्याकडे जाणे-येणे होत राहिले, हे माझे भाग्यच.
आशाताईंकडून सगळ्यात प्रकर्षाने शिकण्यासारखी बाब म्हणजे जगण्यामागची प्रेरणा! आजवरच्या आयुष्यात त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला. डोळ्यांदेखत दोन मुले देवाघरी गेली. आर्थिक स्थैर्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. लक्ष्मीचा वरदहस्त असला तरी वयानुसार आलेल्या समस्या कोणाला चुकल्या आहेत? वयाची नव्वदी गाठूनही प्रत्येक समस्येला हसतमुखाने सामोरे जाणे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते, असे मला वाटते. ‘सलाम’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशाताईंकडून खूप काही शिकायला मिळाले. आशाताईंच्या कारकीर्दीवर अवलंबून असलेल्या या कार्यक्रमासाठी अर्थातच त्यांची परवानगी घेतली. परवानगीसोबत त्यांनी वरदहस्तही दिला असे म्हणायला हरकत नाही. आशाताईंनी गायलेली गाणी म्हणण्याचा प्रयत्न करणे हा गळ्याचा व्यायाम आहे, या विधानाशी प्रत्येकच गायक सहमत असेल. पूर्वीच्या गाण्यांमधील गोडवा आणि नजाकत आता कुठे तरी हरवली आहे, असे वाटल्यावाचून रहावत नाही. पूर्वी गाण्यांच्या चालीमध्ये काही अवघड जागा असत. त्या जागा गायकांची खासियत म्हणून ओळखल्या जात. आशाताईंचे संपूर्ण गाणेच अशा जागांनी भरलेले असे.
सध्या चांगल्या कसदार चालींचे प्रमाण कमी झाले आहे. काही नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत, पण प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे अशा वेळी जुन्या गाण्यांच्या चाली, संगीतकार, गायक-गायिका यांच्याविषयी कृतज्ञता वाटत राहते. आशाताईंनी मिळालेल्या प्रत्येक गाण्याचे सोने केले. एखाद्या सुमार चालीचे गाणेही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. त्यांची गाणी गाताना गळ्याचा आणि कलेचाही व्यायाम होतो. त्यामुळे मी ‘सलाम’ या कार्यक्रमामध्ये आशाताईंची गाणी म्हणण्याचा भाबडा प्रयत्न केला. त्यांनी गायलेली गाणी हीसुद्धा एक मोठी शिकवणी आहे, हे गाताना समजते. त्यांनी अजरामर केलेली गाणी शंभर टक्के परफेक्ट आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यातील एक टक्का गायकी आत्मसात करता आली तरी कार्यक्रमाची फलश्रुती झाल्यासारखे वाटेल! याच कार्यक्रमाविषयी चर्चा करताना आशाताईंचा उदात्तपणा समोर आला. त्यांनी कार्यक्रमात प्रचंड रस दाखवला. नेहमीप्रमाणे मला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमासाठी गाण्यांची निवड करतानाही त्यांचा सक्रीय सहभाग होताच. निवड प्रक्रियेमध्ये त्यांच्या आवडीची गाणी घेण्याचा आग्रहसुद्धा होता. एखादे गाणे कार्यक्रमात का घेतले नाही, असेही त्या हक्काने विचारत.
एकदा सहज बोलता बोलता त्यांनी कार्यक्रमाला यायची इच्छा असल्याचेही बोलून दाखवले होते. पण प्रेक्षकांना आशाताईंची गाणी म्हणून दाखवणे आणि खुद्द ताईंसमोर त्यांची गाणी गाण्याचा प्रयत्न करणे यामध्ये हिमतीची तफावत असल्याचे तेव्हा प्रकर्षाने जाणवले. त्याचबरोबर त्यांचे मन किती मोठे आणि निरभ्र आहे याचीही प्रचिती आली. आभाळाएवढे काम करूनही मंगेशकर कुटुंबीयांमध्ये अहंकाराला थारा दिसला नाही. अत्यंत मनमिळाऊ कुटुंबामधील आशाताईसुद्धा ममतेने विचारपूस करत तेव्हा आयुष्यात काही कमावण्यामध्ये यशस्वी झाल्यासारखे वाटे. त्यामुळेच त्यांच्याकडे जाताना कधीच कोणताही संकोच वाटला नाही. ‘सलाम’ कार्यक्रमाचा पंचविसावा भाग झाल्यानंतर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठीही त्यांच्या घरी गेले होते. केव्हाही आशाताईंकडे गेल्यावर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. एका अन्नपूर्णेप्रमाणे आदरातिथ्य करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे प्रत्येक भेटीनंतर अनुभव श्रीमंत वाटते. त्यांच्या सहवासात खुललेल्या आल्हाददायक आठवणींची पोतडी नेहमीच सोबत राहील.
आशाताईंच्या भेटीविषयी बोलताना एक प्रसंग आवर्जून लिहावासा वाटतो. त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मी भेटायला गेले होते. आपल्या मुलाचे अकाली जाणे हा एका आईसाठी किती जीवघेणा प्रसंग! पण तरीही त्या रडत नव्हत्या. ‘मुलाच्या विरहामध्ये रडायचे नाही असे मी ठरवले आहे’ हे आम्हाला सांगताना त्यांनी धीर कुठून आणला असेल? एकदा सहजच भेटायला गेले असता त्या खोलीत एका पंजाबी गाण्याचा रियाज करत बसल्या होत्या. कसला रियाज करता आहात, असे विचारले असता त्यांनी मिश्किलपणे सांगितले, ‘अगं, माझा पंजाबमध्ये कार्यक्रम आहे. तिथल्या प्रेक्षकांना आवडेल यासाठी पंजाबी गाण्याने सुरुवात करेन म्हणते! त्याचाच रियाज करत बसले आहे.’ त्यांच्या या उत्तराने अवाक् झाले. या वयातही कलेप्रती एवढे समर्पण क्वचितच पहायला मिळते. त्यांच्या लाइव्ह कार्यक्रमांमध्ये उत्साहाचा झरा वाहत असायचा. कार्यक्रमामध्ये गाण्यांदरम्यान साडी बदलणे असो कवा चाहत्यांच्या फर्माइशीला न्याय देणे असो, एवढा उत्साह त्यांच्यामध्ये कुठ्न येतो हे समजण्यासाठी आपला सारा जन्मच अपुरा पडेल! आता तर ती संधीही नाही.
(अद्वैत फीचर्स)
आदरांजली
उत्तरा केळकर

ठाणे : पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी जीवन चन्ने यांच्या पत्नी शारदा जीवन चन्ने यांचे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्ष इतके होते.दिवगंत शारदा चन्ने यांचा स्वभाव अंत्यंत,प्रेमळ व मनमिळाऊ होता.त्यांच्या मितभाषी,स्वभावामुळे विविध समाजातील लोकांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते.कुटूंबातील नातेवाईकांशी देखील त्यांनी जिव्हाळा जोपासला होता.दिवंगत शारदा चन्ने यांच्या पश्चात,पती जीवन चन्ने मुलगा डॉ मिलिंद,अजित, प्रशांत ही तीन मुलं,दोन मुली,सुना,नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने शहापूर तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.शहापूर येथील गंगा देवस्थान येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारावेळी शहापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच शैक्षणिक,सामाजिक या विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
00000000
