5 Feb Bitambatmi All pages

Open Book

एकताच्या शोर्मा स्टॉलला डोंबिवलीत मनसे साथ

डोंबिवली : डोंबिवली स्थानकाजवळ शोर्मा चिकन रोल विक्री करणाऱ्या मराठी तरुणी एकता सावंतचा स्टॉल महापालिकेच्या कारवाईत काही दिवसांपूर्वी हटवण्यात आला होता. यावर तिने सोशल मीडीयावर आवाज उठवल्यावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी तीला मनसे साथ देत तिचा स्टॉल पुन्हा उभा करून दिला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत जाऊन एकता सावंतची भेट घेतली. त्यांनी एकताची तक्रार ऐकून घेत व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. “तू स्टॉल लाव, अधिकाऱ्यांशी मी राज साहेब बोलून घेईन,” असा शब्द देत त्यांनी एकता सावंतला दिलासा दिला.

त्यानंतर आज अविनाश जाधव यांच्या हस्ते नव्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. “मराठी माणसाला व्यवसाय करू द्या,” असा भावनिक संदेशही त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्ताराखडंमधिल हरिव्दार मध्ये स्नान करुन राज्याच्या विकासासाठी मनोभावे पुजा केली.

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुचिस्तानी नागरिकांनी सरकारविरोधात एल्गार पुकारून सरकारला आवाहन दिले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध लढा पुकारून स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा देखील केल आहे. मागील काही महिन्यांपासून बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी लष्कर यातील संघर्ष वाढत चालला आहे. आताही तिथे मोठा हिंसाचार चालू असून बलुच नॅशनल आर्मीने बलुचिस्तान मधील काही भूभाग बळकावला असल्याची बातमी वाचायला मिळाली. बलुच आर्मी आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात तिथे तुंबळ लढाई सुरू असून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी लढताना पाकिस्तान लष्कराला लष्कराला अक्षरशः नाकेनऊ आले आहे. सीमेवर भारतीय लष्कराशी आणि सीमेच्या आत बलुचिस्तान लीबरेशन आर्मीशी लढताना पाकिस्तान अक्षरशः भिकेकंगाल झाला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याने पाकिस्तान जगात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला निधी दिला असला तरी त्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत. पाकिस्तानात महागाई इतकी वाढली आहे की पाकिस्तानी नागरिकांना एकवेळचे जेवण मिळणे देखील मुश्किल झाले आहे. महागाईने जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानी नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची देखील वेळ आली आहे. जर भारताने हा जल करार पूर्ववत केला नाही तर भविष्यात पाकिस्तानात मोठी पाणीबाणी निर्माण होऊ शकते यावर तोडगा म्हणून पाकिस्तानच्या शरीफ सरकारने ग्रीन पाकिस्तान इनिशीएटीव्ह हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प चीनच्या मदतीने पकिस्तान साकारणार आहे. या प्रकल्पास पाकिस्तानची दुसरी हरित क्रांती संबोधली जातेय. या प्रकल्पाअंतर्गत पाकिस्तानातील चेलिस्तान वाळवंटातील सुमारे ४८ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी शेकडो किलोमिटरची सहा कालवे काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाकडे पाकिस्तान सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहण्यात येत आहे मात्र हाच प्रकल्प आता पाकिस्तानसाठी डोकेदुखी बनला आहे कारण या प्रकल्पाने सिंध प्रांतात येणारे पाणी पंजाब प्रांतात वळवले जाईल असे सिंध प्रांतातील नागरिकांना वाटते. आपल्या हक्काचे पाणी पंजाब प्रांताला मिळणार असल्याने सिंध प्रांतातील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत या अस्वस्थतेतूनच तेथील नागरिक रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारविरुद्ध आंदोलन करत आहेत. भारत आणि बलुचिस्तान आर्मी पुढे हतबल झालेल्या शरीफ सरकारपुढे ही नवी डोकेदुखी उभी ठाकली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लोकही आता सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहेत. हे आंदोलन देखील हिंसक बनले आहे. काही दिवसांपूर्वी संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घराला आग लावली होती यावेळी झालेल्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे आंदोलन वाढतच चालले आहे. पाकिस्तान लष्कर आणि सरकारमध्ये पंजाबचे वर्चस्व असून त्यांचे सिंधच्या विकासाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याची तेथील नागरिकांची तक्रार आहे. पाकिस्तान सरकार सिंध प्रांतावर कायम अन्याय करीत असल्याची भावना तेथील नागरिकांची झाली आहे. या अन्यायाविरोधात सिंध प्रांतातील नागरिक आवाज उठवत आहेत. इतकेच नाही तर या आंदोलनात सिंध प्रांतातील नागरिकांनी स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली आहे. ही मागणी आताच नव्हे तर मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू धर्मीय नागरिक मोठया प्रमाणात राहतात. या नागरिकांवर गेल्या काही वर्षांपासून अन्यायाची मालिका सुरू असून ही अन्यायाची मालिका संपावी आणि सिंध प्रांतातील हिंदू नागरिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क प्राप्त व्हावेत यासाठी जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मागील काही काळात पाकिस्तानातील हिंदू महिलांवर विशेषतः सिंधी हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. या भागातील मुलींचे, महिलांचे फसवून, पळवून, सक्तीने धर्मांतर केले जात आहे. वाढत्या अत्याचारामुळे येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार सरकारला विनंती करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तेथील नागरिक अस्वस्थ होते त्यातच या नव्या प्रकल्पाची भर पडल्याने तेथील नागरिकांची अस्वस्थता आणखी वाढली. आपल्यावर होणारा अन्याय दूर करायचा असेल तर स्वतंत्र सिंधू देशाशिवाय पर्याय नाही अशीच भावना तेथील नागरिकांची झाली आहे त्यातूनच स्वतंत्र सिंधू देशाची मागणी करण्यात आली. मागील वर्षीच स्वतंत्र सिंधू देशाला भारत आणि अमेरिकेने पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. त्यावर दोन्ही देशांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भविष्यात या दोन्ही देशांना आंदोलनकर्त्यांच्या या मागणीची दखल घ्यावीच लागेल आणि जेंव्हा हे दोन्ही देश या मागणीची दखल घेतील तेंव्हा पाकिस्तानची आणखी शकले झालेली असतील. भारताचे शकले करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानचेच शकले होण्याची वेळ आली आहे. काश्मीरला स्वतंत्र करून भारताची शकले करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानला बलुच आणि सिंध प्रांतातच स्वातंत्र्याची आंदोलने होऊ लागल्याने पाकिस्तानचीच शकले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात पाकिस्तानातून बलुचिस्तान आणि सिंध हे दोन नवीन देश निर्माण झाले तर आश्चर्य वाटायला नको.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

मी पत्रकारितेला विराम देऊन राजकारणात उतरण्याचा प्रयत्न २/३ वर्षा पासून करीत होतो, त्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्षातील मित्र, पत्रकारिता क्षेत्रातील मित्र आणि काही सहकारी यांच्या सोबत चर्चा सुरू असायची. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या खूप पूर्वी सुमारे सात वर्ष आधी मा एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षात येण्या विषयी म्हणाले होते. मात्र त्यावेळी माझ्या मनाची तयारी काही नव्हती. पण शिवसेनेच्या सर्वच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांशी चांगले संबंध होते. तसे शरद पवार यांची राष्ट्रवादी सर्वांच्या सोबत सलोख्याचे संबंध होते. पण गेली ३५ वर्ष पत्रकारिता करत असताना राजकारण जवळून पाहिलं आहे त्यामुळे आपल्याला केवळ पत्रकारितेच्या माध्यमातून तीरावर बसून योग्य आणि अयोग्य अशी भूमिका असंख्य वेळा घेतली. मात्र विचार केला लोक इतके राजकारणा बद्दल बरे वाईट बोलतात. त्याचा आपणही प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.
दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांच्या पेक्षा डॉ श्रीकांत शिंदे यांच्याशी चांगली मैत्री जमली होती पण पक्षात प्रवेशाचे धाडस नाही होत होते. माझे मॅक्स महाराष्ट्र मध्ये चांगले चालले होते, सर्व बाजूनी प्रतिसाद मिळत होता. एवढे उंचीवर असणारे आर्थिक दृष्ट्याही चांगली स्थिती होती, हे सर्व सोडून राजकारणात पुन्हा शून्यातून उभे राहण्यासाठी उडी घ्यावी का ? घ्यावी तर कुठल्या पक्षात जावे याचे तळ्यात मळ्यात सुरू होते, त्यात मा शरद पवार साहेब यांची भेट झाली, त्यांच्या सोबत एका मंचावर बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली. “निर्भय बनो” आंदोलनात देखील प्रतिसाद मिळत होता.
पण मी काही मित्रांच्या सोबत चर्चा केल्यावर त्यांनी वेगवेगळे सल्ले दिले. अनेकांनी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पर्याय सुचवले. प्रकाश आंबेडकर साहेबांची पुण्यात भेट घेतली.
मात्र मला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात एक स्पार्क दिसला, मित्रत्वाची भावना आणि राजकारणात पुढे जाण्याची महत्वकांक्षा दिसली.
खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या पहिल्या निवडणुकी पासून ते आता पर्यंत मी बारकाईने पाहिले होते. अतिशय उच्च शिक्षण आणि मा एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून मिळालेला राजकीय वारसा, क्विक लर्नर असल्यामुळे अवघ्या ३/४ वर्षातच खासदार श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातातील एक प्रमुख नेता म्हणून उदयाला आले तसे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या खांद्यावरील एक एक भार उतरवत तो भार आपल्या मुलाच्या नाही तर पक्षाच्या एका दमदार नेतृत्वाकडे सोपविण्यास सुरुवात केली.
सर्वात मोठी कसोटी तेंव्हा लागली जेव्हा मा एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या काँग्रेस धार्जिणे पणाला विरोध करत पक्षातच विद्रोह केला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना बोलत एल्गार केला. अतिशय बिकट आणि आव्हानात्मक स्थिती होती. भारताच्या राजकीय इतिहासातील हे अभूतपूर्व आणि प्रचंड जोखमीचे असे बंड होते. यापूर्वी शिवसेनेतून अनेक लोक फुटून निघाले पण एकदम ५० आमदार आणि १२ खासदार घेऊन पक्षात विद्रोह होण्याची ही राजकारणाच्या इतिहासातील वेगळी घटना होती, ज्याची दखल केवळ महाराष्ट्र आणि भारतात नाही तर जगातील ३६ देशांनी ही दखल घेतली.
हा विद्रोह यशस्वी करण्यासाठी पडद्या मागील सूत्र हलवणारी मुख्य नेपथ्यकार व्यक्ती कोण असेल तर ती श्रीकांत शिंदे होते. त्या काळात जवळपास १० दिवस श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, कुठे किती कसा प्रवास करावा लागत होता. भेटी आणि सोबत येणाऱ्या आमदारांना विश्वास देण्याचे काम श्रीकांत शिंदे यांनी केले. याकाळात त्यांनी राजकारणातील चाणक्यगिरी नेमकी काय असते, प्रचंड दबाव आणि भविष्या बद्दलची अनिश्चितता अशा स्थिती प्रचंड तणाव असताना देखील श्रीकांत शिंदे यांनी धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे गेले. जेव्हा मा एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रात जे काम केले, पक्षाच्या आमदारांना, जिल्हा प्रमुख, संपर्क नेते आणि कार्यकर्ते यांना जी मदत केली त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या बद्दल प्रेम आणि विश्वास होता त्यामुळे त्यांच्या शब्दावर शिवसेनाप्रमुख बाळा साहेब ठाकरे यांचा पुत्र चुकीच्या मार्गाने जात आहे , ज्यांच्या विरोधात ४० वर्ष निवडणूक लढवली त्यांच्या सोबत कसे जायचे हा प्रत्येक शिवसेना खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न होता. त्यांच्या या असंतोषाला योग्य वाट एकनाथ शिंदे साहेबांनी मिळवून दिली आणि त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता.
माझी नेत्याच्या पुढे पुढे करण्याची, मस्का लावण्याची, खोटी स्तुती करण्याची सुरुवातीपासून स्वभाव नाही , कदाचित तो पत्रकारितेतून आणि अभ्यासातून आला असेल. पण अवलोकन आणि आकलन करण्याची माझी सवय असल्यामुळे मी बारकाईने सर्व गोष्टी पहात होतो.
साहेबांच्या विद्रोहानंतर महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ उठला होता. सर्वसामान्य लोक बुद्धी पेक्षा भावनेवर अधिक चालतात. त्यामुळे शिंदे साहेबांच्या सोबत खासदाराना देखील प्रचंड ट्रोल केले गेले, अतिशय खालच्या पातळीवर लोकांनी ट्रोल केले मात्र या परिस्थितीतही श्रीकांत शिंदे आपला संयम ढळू न देता परिस्थिती हाताळत होते. महाराष्ट्रातील सर्व सामान्य शिवसैनिका पासून ते शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क नेते, आमदार यांच्या सर्वांशी बोलत होते, त्यांना धीर आणि विश्वास देत होते त्यातूनच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेतील प्रदूषण दूर होत जाऊन विचारांना वाहिलेली शिवसेना आकारास येत होती.
धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून मा एकनाथ शिंदे साहेबांनी अहोरात्र लोकसेवेचा वसा घेतला होता तीच इस्टेट त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दिली त्यामुळे “दिवस असो की रात्र महाराष्ट्र आणि देशासाठी कायम उपलब्ध” हे ब्रीद घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. मग ते राजकीय बैठक असो, प्रकल्पाची चर्चा असो, पक्षाच्या बांधणीचा विषय असो की, सांस्कृतिक उपक्रम असो सर्वच बैठकीत अतिशय तयारीने काम करणारा नेता म्हणजे श्रीकांत शिंदे यामुळे कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी त्यांना वेगवेगळ्या उपमा देण्यास सुरुवात केली आहे कुणी इन्फ्रामॅन बोलतो, कुणी व्हिजन मॅन तर कुणी राजकारणातील बाजीगर आणि धुरंधर बोलतो.
पूर्वी भाषणाला टाळणारे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोक संवादाची आपली वेगळी अशी भाषणाची शैली तयार केली आहे .
महाराष्ट्राच्या विकासासोबत ठाणे जिल्ह्याचा विकास हा ध्यास घेऊन खासदार काम करीत असतात त्यामुळेच अंबरनाथ सारखे शहर आकाराला आले, कल्याण ग्रामीण मध्ये विकासाची गंगा गेली त्यामुळे भूमिपुत्रांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदार संघात एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. अंबरनाथ मधील १००० वर्ष जुने शिवमंदिर हे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जागतिक वारसा होता मात्र त्या मंदिराला जगाच्या नकाशावर अंबरनाथ शिव फेस्टिवल च्या माध्यमातून आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पुढे आणले आज देशभरातील पर्यटक शिवमंदिराला भेट देत आहेत. इरशाल वाडी या आदिवासी वाडीवर लँड स्लाइड झाल्यावर जे संकट कोसळले तिथे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून घरे बांधण्यापासून मुलाना शिक्षणासाठी दत्तक घेण्यापर्यंत जबाबदारी घेतली.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष ही अभिनव योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्याने लाखो रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला.
मैत्री होती, लोक चांगले होते पण माझ्या समोर शिवसेनेत प्रवेश करण्यात सर्वात मोठी अडचण होती विचारधारेची. अनेकदा प्रयत्न करून देखील शिवसेनेत प्रवेश करण्याचे धाडस होत नव्हते. आता पर्यंत शेकडो भाषण, आंदोलने विद्यार्थी असल्यापासून केले होते. मात्र दरम्यान मराठा आंदोलन सुरू होते. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पोटतिडकीने पाठपुरावा करत होते त्यातून शिवसेना कात टाकते आहे असे दिसले. त्यानंतर श्रीकांत शिंदेंचा कौल बघितला तर तो शाहू फुले आंबेडकरी विचारांचा द्वेष करणारा नव्हता उलट कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रासाठी त्यांनी आपली सारी ताकद पणाला लावलेली दिसली. तरीही अनेक पत्रकार मित्रांच्या सोबत बोलणे केले. गेली ७५ वर्षात सशक्त असा आंबेडकरी विचारांचा पक्ष किंवा संघटना उभी राहू शकली नाही, ३५ वर्ष सक्रिय आणि पत्रकारितेतून आंदोलन चालवूनही समाजाचे ऐक्य सिद्ध झाले नाही याची प्रचंड सल मनात होती आणि आहेच. काँग्रेस सतत वापरत आली हा इतिहास ठाऊक होता. त्यामुळे आपल्याला जिथे नेत्यासोबत थेट संवाद करता येईल योग्य आणि अयोग्य सांगता येईल, मुक्तपणे काम करता येईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिला. त्यामुळे निर्णय घट्ट झाला
मात्र ही बातमी समाजात गेल्यावर प्रचंड ट्रोल होणार, खोकेबाज वैगरे दूषण लागणार याची कल्पना होती, शिवाय आपल्यावर जळणारी लपून आणि उघड अशी अनेक ओली सुकी लाकडं यानिमित्ताने जळणार, काही दिखाऊ मैत्रीच्या आडून बदनामी करणार हे सर्व गृहीत धरले होते. माझ्या एका पत्रकार मित्राने त्यावेळी मोठा धीर दिला आणि त्याकडे लक्ष देऊ नको सांगितले.
आता मी अतिशय मुक्तपणे शिवसेनेत काम करतो आहे त्याला सर्वाधिक समर्थन आणि पाठिंबा खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. त्यांना मला सुचलेल्या अनेक संकल्पना मांडत असतो. असेच एक अभियान म्हणजे “शाखा तिथे संविधान” हे अभियान. त्यांच्या समोर भूमिका मांडताच त्याला त्यांनी होकार दिला. शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण होता शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात संविधानाची प्रास्ताविका लागून तिचे वाचन होणे, त्यानिमित्ताने संविधानाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्याचे काम सुरू झाले. हे अभियान निवडणुकीच्या काळात सुरू झाले त्यामुळे महाराष्ट्र भर त्याचा दौरा करता आला नाही मात्र आता निवडणुका संपल्या आहेत मी तुमच्या सोबत दौरा करीन असा शब्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.
मला शिवसेनेत अजून तरी कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही शिवाय खासदार श्रीकांत शिंदे आणि मोठे साहेब पाठीशी असल्याने पक्षात काम करायला फार अडचण येत नाही. मित्र आणि पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने ही सर्व स्मरण यात्रा घडली.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात प्रचंड पोटेन्शियल (potential) आहे राष्ट्रीय नेता होण्याचे त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. सिन्दुर ऑपरेशन नंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सारख्या तरुण खासदारांवर विश्वास ठेवून देशाचे नेतृत्व जगात करण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे नाव देशाच्या राष्ट्रीय पटलावर पुढे आले. उच्च शिक्षित आहे, संधी ओळखण्याची त्यांच्यात गुण आहे आणि धाडस करण्याची क्षमता एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखी आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे हे भारतीय राजकारणातील लंबी रेस का घोडा आहे.
त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो. कुठेही काही खाऊन आरोग्य खराब करू नका आणि राग येणे काही गोष्टीचा स्वाभाविक आहे, शेवटी हे राजकारण आहे प्रत्येक व्यक्ती अपेक्षा घेऊन आलेला असतो, त्यापूर्ण नाही झाल्या की विपरीत वागतो, रागाला आपले शस्त्र बनवा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, कल्याण हो

कधीच रविवारी देशाचे अंदाजपत्रक सादर केले गेले नव्हते, तोही इतिहास परवा घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील बारावे आणि निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळातील नऊवे अंदाजपत्रक संसदेत सादर झाले. त्याची प्रतिक्रिया शेअर बाजारात विरोधी उमटली कारण शेअर बाजारातील जुगारी पद्धतीच्या फ्युचर्स ट्रेडिंग प्रकारावर असलेला कर थोडा वाढवला गेला. त्यामुळे वातावरण असे झाले की अंदाजपत्रक सादर झाल्यावर शेअर निर्देशांक हजार पेक्षा अधिक पॉइंटनी कोसळला. तो रविवार होता आणि सोमवारी सायंकाळी बातमी झळकली की भारत व अमेरिका यांच्यातील प्रचंड काळ रेंगाळलेला व्यापार करार अंतिम करण्यात आला. त्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आधी ट्रुथ सोशल या समाज माध्मयांवरून केली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही करारासाठी भारतीय जनतेच्यावतीने अमेरिकेचे अभिनंदन केले. भारतीय व्यापारावर अमेरिकेने गेल्या सात आठ महिन्यांपासून पन्नास टक्के दराने अतिरिक्त कर आकारला होता. त्या मागे ट्रंप प्रशासनाचा अडमुठेपणा जसा होता तसचा वाढत्या व्यापार तुटी बाबतची अमेरिकन जनतेची चिंताही होती. गेल्या वर्षभरता या करारासाठी भारत अमेरिका यांच्या प्रतिनिधी मंडळांत, मंत्री व अधिकारी स्तरावर अनेक चर्चा झाल्या. पण काही मुद्दे अमेरिका सोडत नव्हती तर भराताने शेती व लघुउद्योगांचे हित जपण्यासाठी ताठर भूमिका घेतली होती. अखेर साऱ्या अडथळ्यांवर मात करून भारताच्या बाजारात तेजीचे वातावरण करणारा करार साकरला आहे. त्यांनी लादलेल्या पन्नास टक्के टॅरीफचा बोजा असह्य होऊन भारत अमेरिकेच्या अटी मान्य करेल अशी ट्रंप यांची अपेक्षा होती. पण भारताने दाद दिली नाही. ट्रंप यांनी जानेवारी २०२५ मध्ये सत्ता ग्रहण केली आणि तातडीने त्यांनी जगभरातील विविध देशांना दमात घ्यायला सुरुवात केली. अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तु व सेवांवर अतिरिक्त शुल्क, टॅरीफ, लावण्याचा सपाटा त्यांनी आरंभला. अमेरिकेचा जगा बरोबरचा व्यापार हा त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला होता. अमेरिका मोठ्या प्रमाणात जगभरातून विविध वस्तु व सेवांची आयात करते आणि त्यांच्याकडची निर्यात ही त्या पेक्षा कमी राहते. ही व्यापारातील तफावत अमेरिकन अर्थव्यवस्थेला हितकारक नाही या विचाराने ही व्यापार तूट अमेरिकेसाठी नफ्यात बदलण्यासाठी ट्रंप प्रशासनाने कंबर कसली होती. त्याच वेळी ट्रंप यांची नजर अत्यंत प्रतिष्ठेच्या शांतता नोबेल पुरस्काराकडेही लागलेली होती. त्यासाठी ,”रशिया युक्रेन युद्धातून मी मार्ग काढतो,” असे ते सांगत होते. इस्रायेल हमास संघर्ष संपवल्याचा त्यांचा दावा होता आणि, “मे २०२५ मधील भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरमध्येही मीच मार्ग काढला, त्यासाठी दोन्ही देशांना मी अधिक आयात शुल्काची धमकी देत होतो, त्याच परिणाम होऊन युद्ध थांबले…” हा दावा ते १० मे २०२५ पासून सतत करत आहेत. आजवर साठ वेळा त्यांनी, “भारत पाक युद्ध मीच संपवले” असे छातीठोकपणाने सांगितले. प्रत्यक्षात भारतीय सैन्याच्या दबावात असलेल्या पाकने युद्ध संपवण्यासाठी भारताची विनवणी केली होती. “ऑपरेशन सिंदूर थांबले आहे, संपलेले नाही,” हीच भूमिका भारताची आजही कायम आहे. चर्चेत भारत बधत नाही म्हटल्यावर आणखी कुरापत काढण्यास ट्रंप यांनी सुरुवात केली. “युक्रेन बरोबरचे युद्ध रशियाने संपवले नाही कारण भारत त्यांचे खनिज तेल मोठ्या प्रमाणात घेतो”, हा दावा करून ट्रंप यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादले. मूळचे २५ टक्के व शिक्षा म्हणून अधिकचे पंचवीस टक्के, असे पन्नास टक्के आयात शुल्क अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या भारतीय मालावर २७ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले. भारत पूर्वी पासून रशिया आणि अमेरिका दोन्ही कडून खनिज तेलाची तसेच नैसर्गिक वायु (एलएलजी) व पेट्रोलियम वायुची (एलपीजी) आयात करत आहे. पण गेल्या दोन तीन वर्षात २०२४ च्या मध्यापासून रशियाकडून अधिक मोठ्या प्रमाणात खनिज तेलाची खरेदी भारत करतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण ते तेल स्वस्त पडते. दुसरे कारण युरोपीय देशांना रशियाकडून तेल खरेदीत अडचणी होत्या. भारतात येणाऱ्या रशियन खनिज तेलाचे शुद्धीकरण करून, विविध पेट्रोलियम उत्पादने भारतातून युरोपीय देशांना खरेदी करता येत होती. त्या तयार बाजारामुळे भारतीय सरकारी व खाजगी रिफायनरींचा मोठा धंदा या काळात होऊन गेला. ही खरेदी २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. २०२५ च्या सुरुवातील भारत दररोज २६ दशलक्ष बॅरल इतक्या मोठ्या प्रमणाता रशियन तेल खरेदी करत होता. मग ट्रंप प्रशासनाने रशियन तेल कंपन्यांवर निर्बध आणले. रशियन तेल टॅकरवरही निर्बंध आले. मग भारताने क्रमशः ही खरेदी कमी केली. मात्र आजही दहा लाख बॅरल दररोज या दराने रशियाचे खनिज तेल भारतात येते. अर्थात पूर्वीच्या मानाने निम्यापेक्षा कमी अशी ही खरेदी असल्याने ट्रंप खुष आहेत. यात अध्याहृत भाग असा की भारत रशियाकडून अतिरिक्त खनिज तेल घेणार नाही. आता अमेरिकेकडून भारताची खनिज तेलाची खरेदी वाढेल. ट्रंप यांनी कराराची घोषणा लांब लचक ट्वीटमधून करताना जाहीर केले की भारत अमेरिकेकडून पाचशे बिलियन डॉलर्स इतक्या किंमतीच्या वस्तु विकत घेईल. त्यात इंजिनिअरिंग उपकरणे, पेट्रोलियम पदार्थ आणि शेतीमालाचा समावेश असेल. त्या एकाच मुद्द्या वरून भारताने शेतकऱ्यांचे हित मोडीत काढले असा कांगावा विरोधकांनी सुरु केला आहे. त्यात फारसा अर्थ नाही. कारण मनमोहन सिंग यांच्या काळापासून भारतात अमेरिकन बी-बियाणे (जीटी कॉटन व जीटी टोमॅटोच्या चर्चा आठवा!) येत आहे. अमेरिकन सफरचंदे आजही न्यूझीलंडच्या बरोबरीने भारतीय बाजारात येत आहेत. त्यात थोडी वाढ होईल. इंधन, पेट्रोलियम पदार्थ, गॅस, अणु ऊर्जा उपकरणे इत्यादी अन्य मालासह कृषी क्षेत्रातील माल दरसाल शंभर बिलियन डॉलर्स या प्रमाणात पढची पाच व्रषे भारत घेणार असे व्यापार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या पैकी गेल्या वर्षीच भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकन कंपन्यांबरोबर एलएनजी व एलपीजी (गॅस) खरेदीचे वर्षाचे करारही केले आहेत. आण्विक ऊर्जेशी संबंधित यंत्र समाग्री वस्तु याही भारत अमेरिकेकडून खेरदी करण्यासाठी गेल्या वर्षभरता तयाऱ्या सुरु होत्या. मागच्या वर्षी सीतारामन यंन जे अंदाजपत्राक सादर केले त्यात अमेरिकेतील बरबॉन प्रकारची व्हिस्की तसेच हार्ली डेव्हीडसन सारख्या महागड्या मोटार सायकल यांच्यासाठी भारताचे दरवाजे खुले झाले होते. त्यावरील करात मोठी कपात केली होती. संसदेच्या गेल्या अधिवेशनात भारताने आण्विक ऊर्जा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीला वाव देणारे तसेच त्यातील सुरुक्षा मानेक निश्चित करणारे शांती विधेयक मांडले व मंजूर करून घेतले. या साऱ्या गोष्टी सुरु होत्या. भारत एकेक पाऊल कराराच्या दिशेने पुढे टाकत होता. पण त्यात ट्रप यांच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या हट्टाने थोडा मोडता घातला गेला. कराराची चर्चाही त्यात थबकली. सर्जिओ गोर हे नवे राजदूत भारतात आल्यानंतर त्यांचे स्वागत नवी दिल्लीने उत्साहाने केले. कारण ते ट्रंप यांचे विश्वासू तसेच भराताचे हितैषी आहेत. गोर यांनीच सर्वात आधी ट्वीटरवरून घोषणा केली की “राष्ट्राध्यक्ष ट्रंप व पंतप्रधान मोदी यांच्यात टेलिफोन वरून चर्चा सुरु आहे. काहीतरी मोठे घडते आहे. वाट पहा…!” त्या नंतर तासाभरातच कराराची वार्ता फुटली. त्याचे अनेक परिणाम लगेचच दिसून आले. शेअर बाजार उसळला. रुपयाची घसरण थांबली. जो रुपाय सोमवारी सकाळी ९१.५० प्रती डॉलर अशा नीचंकावर गेला होता तो ९० रुपयांपर्यंत वधारला. याचे कारण अमेरिके बरोबरचा भारताचा व्यापार मोठा आहे. त्यातही इंजिनिअरंगि उत्पादने, कापड, तयार कपडे, चामड्याच्या चप्पल बूट आदि वस्तु यांच्यासाठी भारताला अमेरिके व्यतिरिक्त अनेक बाजारपेठा उपलब्ध होत्या. पण दागदागिने क्षेत्रात मात्र व्यापारात आपली पीछेहाट झाली. अमेरिके बरोबरची व्यापार कराराची बोलणी मागील मे महिन्यापासून थबकलेली होती. त्याच गतवर्षा अखेरीकडे पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टनमध्ये भारत अमेरिका वाटाघाटी झाल्या. त्यातून काही प्रगती झाली. त्या साऱ्या शांत पण ठाम मोदी धोरणाचा परिणाम आता करारात झालेला आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी आणि विडंबन गाणे तयार केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा आणि ते व्हायरल करणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांना समन्स बजावले आहे.

मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने एका स्टँड-अप शो दरम्यान ‘दिल तो पागल है’ या गाण्याच्या चालीवर एक विडंबन गाणे तयार केले होते. या गाण्यातून त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ अशी टीका केली होती. या कृत्याबद्दल भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. सुषमा अंधारे यांनी या गाण्याचे आणि कामराचे समर्थन केल्यामुळे त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले आहे.


विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, कामरा आणि अंधारे यांना १५ दिवसांपूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. आता त्यांना उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ते हजर राहिले नाहीत, तर समिती त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेऊ शकते.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मतदारयादी सुधारणा प्रकरणातर राज्याला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी वकीलीचा कोट चढवत स्वता सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. त्यांच्या या अचूक आणि आक्रमक युक्तीवादामुळे अवघा देश अवाक झालाय.

ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, 1979 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून एमए पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कोलकाता येथील जोगेश चंद्र चौधरी महाविद्यालयात एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. 1982 मध्ये त्यांनी एलएलबी पूर्ण केले.

सुप्रीम कोर्टात ममता यांनीयावेळी पश्चिम बंगालला निवडणूक आयोगाकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला. ज्या कामासाठी दोन वर्षे लागायला हवी होती ते काम तीन महिन्यांत पूर्ण केले जात असल्याचे ममता म्हणाल्या. सुनावणीनंतर, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, खरे उमेदवार मतदार यादीत राहिले पाहिजेत. ममतांच्या याचिकेवर खंडपीठाने निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ९ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्याने न्यायालयात हजर राहून आपला युक्तिवाद केला. सहसा, मुख्यमंत्र्यांचे वकील किंवा सल्लागार न्यायालयात हजर राहतात.

न्याय दाराआड रडतोय

ममता बॅनर्जी म्हणाल्या,  मी बंगालची आहे आणि मी राज्याचे प्रतिनिधित्व करते. तुमच्या दयाळूपणामुळे मी इथं आहे. खंडपीठाला माझा आदरपूर्वक नमस्कार, वकिलांना माझा नम्र नमस्कार, समस्या अशी आहे की, सर्व काही संपलं आहे, आपल्याला न्याय मिळत नाही, दारामागे न्याय रडत आहे, असे दिसते की आपल्याला कुठेही न्याय मिळणार नाही. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. मी खूप लहान व्यक्ती आहे, मी इथं माझ्या पक्षासाठी नाही तर न्यायासाठी  लढत आहे असा युक्तीवाद केला.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही महाराष्ट्र  सावरलेला नाही. अजित पवारांचे राजकारणातील सर्वेसर्वा असणारे शरद पवार आज बारामतीत आले, आपल्या लाडक्या पुतण्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवारांनी थरथरत्या हातांनी फुले उचलली अन् अवघ्या बारामतीकरांना अश्रु अनावर झाले. ओंजळीतील फुलांना अश्रुंचा स्पर्श झाला आणि अवघा परिसर अजित पवारांच्या आठवणीत हरवून गेला.

बारामतीमधील अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सह्योग सोसायटीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि खासदार शरद पवार यांनी येऊन अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांचे संपूर्ण कुटुंब येथे होते.

थरथरत्या पाऊलांनी पुढे येत, सुरक्षा रक्षकाच्या हाताला हात धरुन शरद पवार पुढे आले. त्यानंतर, अजित पवारांच्या प्रतिमेसमोर डोकं खाली करुन हात जोडले. आपल्या लाडक्या पुतण्याला काकांकडून श्रद्धांजली वाहतानाचा हा क्षण सगळ्यांच्या काळजाला हात घालणारा होता. यावेळी, संपूर्ण पवार कुटुंबीय भावुक झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शरद पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित, राजेंद्र, रणजित पवार याठिकाणी उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची त्यांच्यासोबतची ही पहीलीच भेट आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या कुटुंबीयांसोबत यावेळी शरद पवार यांनी चर्चा केली.

दरम्यान, शरद पवार मुंबईहून आज बारामतीत दाखल झाले. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांची पार्थ आणि जय पवार यांच्यासह बैठकही झाली. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांचीही उपस्थिती होती, शरद पवारांची जय-पार्थ आणि विजया पाटील यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द

मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफीक जाम एका टँकरच्या उलटल्याने झाला. टँकरमधिल वायु गळतीमुळे तब्बल २४ तासाहून अधिकचा ट्रॅफीक जाम घाटात लागल्यामुळे प्रवासातील बस ड्रायव्हर आणि प्रवाशांनी रस्त्यावरच मुक्काम टोकत चुली पेटवल्या.

या टँकर अपघातामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. दरम्यान प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणांना दिल्या. तसेच या दरम्यान संबधित वाहनांना टोलमाफी देण्याचीही आदेश दिले.

दरम्यान,राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ३७ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.

तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.

या अपघातामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही ट्रॅफीक जाम झाल्याने प्रवाशांना पुणे एक्सप्रेसचा प्रवास टाळण्याच्या सुचना देण्यात आल्या असून पर्यायी ताम्हीनी घाटाचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *