13 Feb Bitambatmi All pages

Open Book

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर

परभणी परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर विराजमान झाला.

आज पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदावर बाजी मारली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे.

आज झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौर पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना २६ मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केले नाही.

परभणी महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी 10 मतांनी विजय मिळवला. गणेश देशमुख यांना 37 मतेतर राष्ट्रवादीच्या उमेदवार नाजमा अब्दुल रहीम यांना 27 मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेतली. 

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम

मुंबई : भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या विजय मल्याला आज मुंबई हायकोर्टाने भारतात परतण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. विजय मल्या याने भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण चालवावे, असे नमूद करून तो भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला शेवटची संधी दिली.

मध्यसम्राट मल्या हा त्याच्याविरोधात सुरू केलेल्या कार्यवाहीपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीला खंडपीठाने मल्या याला उपरोक्त इशारा देताना स्पष्ट केले.

भारतात कधी परतणार किंवा भारतात परणार आहात की नाही ? याबाबत मल्याला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश याआधी न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुन्हा एकदा मल्याला तो भारतात आल्यावरच त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.


मल्ल्याला फरारी घोषित केल्यानंतर आणि लंडनमध्ये प्रत्यार्पणाची कार्यवाही प्रगतीपथावर असतानाच त्याने एफईओएला आव्हान दिल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीने महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी केला. दुसरीकडे, कायद्याचे स्वरूप पाहता, मल्या हा प्रत्यक्ष भारतात परतल्याशिवाय त्याची बाजू ऐकली जाऊ शकते, असा दावा त्याच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर मल्या हा परत येण्यास इच्छुक नाही असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करू शकतो. परंतु, त्यला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय न्यायक्षेत्रात यावेच लागेल, असेही न्यायालयाने मल्याला भारतात परत येणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देताना स्पष्ट केले.

क्षण आनंदाचाअभिमानाचा!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले.

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले

रमेश औताडे

मुंबई :  लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या मंत्रालयात अण्टी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीनं सापळा रचून एका क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले. अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतलं. तपास झाल्यानंतर मग या संबंधित क्लर्क ला ताब्यात घेऊन गेले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आलं.

राहुल गांधींची खासदारकी रद्द रण्यासाठी मोर्चेबांधणी

भाजपा खासदार निशिकांत दुबेंच खाजगी प्रस्ताव

 निवडणूक लढण्यास कायमची बंदी घाला

नवी दिल्ली : अमेरिका ट्रेड, मेजर जनरल नरवणेंच्या आत्मचरित्रात चीनची झालेली घुसखोरी आणि एप्स्टिन फाईलमधिल भारतीय राजकारण्यांची आलेली नावे यामुळे संसद दणाणून सोडणाऱ्या राहुल गांधींची खासदारकीच रद्द करण्यासाठी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेत देशाची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवत दुबे यांनी राहुल गांधींना निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी घालावी अशी खाजगी प्रस्तावात मागणी केलीय.

 दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. दरम्यान भाजपाने कितीही शक्ती खर्ची घातली तरी मला ते सत्य सांगण्यापासून रोखू शकत नाही अशी प्रतिक्रीया यावर राहुल गांधी यांनी दिली.

‘देशाला धोका असणाऱ्या जॉर्ज सोरोस या शक्तींच्या मदतीने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे’, अशी माहिती दुबे यांनी दिली. जॉर्ज सोरोस हे हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश गुंतवणूकदार आहेत. जॉर्ज यांनी जगभरात उदारमतवादी विचारांना पाठिंबा दिल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या संघटना करतात.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’  मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.

भारताचा नामिबियावर विक्रमी विजय

नवी दिल्ली : इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर भारताने नामिबियाचा ९३ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकात अनोख्या विक्रमाची नोंद केली. धावांच्या विजयी फरकाच्या दृष्टीने हा भारताचा टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा विजय २०१२ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध ९० धावांचा होता. धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयांच्या यादीत भारत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे. यासोबतच टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमध्ये सलग १० सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. हा विक्रम क्रिकेटविश्वात ऐतिहासिक मानला जात आहे. भारताने या सलग दुसऱ्या विजयासहीत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ बाद २०९ धावा उभारल्या, तर प्रत्युत्तरात नामिबियाचा डाव १८.२ षटकांत ११६ धावांत संपुष्टात आला.

इशान किशनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत अवघ्या २४ चेंडूत ६१ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. संजू सॅमसनने ८ चेंडूत २२ धावा करत वेगवान सुरुवात केली. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. कर्णधार सूर्यकुमार यादव (१२) यालाही फार काळ टिकता आले नाही. मधल्या फळीत हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ५२ धावा करत डाव सावरला. शिवम दुबे बरोबर (१६ चेंडूत २३) त्याने पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचत भारताला २०९ धावांपर्यंत पोहोचवले. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड एरॅस्मसने ४ षटकांत २० धावांत ४ बळी घेत प्रभावी मारा केला. त्याच्या विविधतेमुळे काही काळ भारतीय धावगती रोखली गेली.

२१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही. वरुण चक्रवर्तीने २ षटकांत ७ धावांत ३ बळी घेत सामन्याचा वेग भारताकडे वळवला. महत्वाचं म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवने ६ गोलंदाज वापरले आणि त्या सहाही जणांच्या खात्यात विकेट पडल्या. अखेरीस नामिबियाचा डाव ११६ धावांत आटोपला आणि भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय साकारला.

चायनिज वर पिझ्झा भारी

स्वाती घोसाळकर

मुंबई : भारतात चायनिज फुडवर मक्तेदारी असणारे नेपाळी आणि जगभरात पिझ्झावर मक्तेदारी असणारे इटली आज वानखेडेवर आमनेसामने आले. पण दिवसमावळतीला अखेर चायनिज फुडवर पिझ्झा भारी पडला. इटलीने टी२० वर्ल्डकप क्रिकेटमध्ये नेपाळचा पराभव करीत आपला पहिला एतिहासिक विजय मिळविला. पिझ्झा, फुटबॉलनंतर आता क्रिकेटमध्येही आपली मोहर उमठवण्यासाठी इटालीयन क्रिकेटर सज्ज आहेत असा इशाराच जणू त्यांनी आपल्या खेळाने दिला.

पिझ्झामध्ये जसे विविध चटकदार पदार्थ असतात तसे चटकेदार फटकेबाजी आज इटलीच्या फलंदाजांनी केली. नेपाळी बॉलर्सला आज सिक्सरचा वर्षाव करीत वानखेडेची हवाई सफर घडवून आणली.

इटलीसारख्या उदयोन्मुख संघाचा हा विजय केवळ आकडेवारीतला यश नाही; तो जागतिक क्रिकेटच्या विस्ताराचा पुरावा आहे. क्रिकेट नव्या भौगोलिक सीमांमध्ये पाय रोवत आहे. सहयोगी देशांमधील पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे.

अँथनी आणि जस्टिन मोस्को या बंधूंच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर इटलीने नेपाळवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

कर्णधार हॅरी मॅनेंटी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इटलीच्या गोलंदाजांनी नेपाळच्या फलंदाजांना कोंडीत पकडले. बेन मॅनेंटी याने भेदक मारा करत चार षटकांत २ बाद ९ धावा अशी प्रभावी कामगिरी केली, तर क्रिशन कलुगामागेने १८ धावांत ३ बळी घेत नेपाळचा डाव १२३ धावांत आटोपला.

१२४ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इटलीला मॉस्का बंधूंनी झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनीही नाबाद १२४ धावांची सलामी भागीदारी रचत नेपाळला पूर्णपणे नामोहरम केले. अँथनी मॉस्काने ३२ चेंडूत ६२ धावांची आक्रमक खेळी साकारली, तर जस्टिन मॉस्काने ४४ चेंडूत ६० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ?

राजधानी दिल्लीतून रोहीत पवरांचे खळबळजनक आरोप

सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि माध्यम सल्लागर नरेश अरोरांवर संशय

अरोरांचे माध्यम सल्लागाराचे कंत्राट दादा रद्द करणार असल्याचा गौप्यस्फोट

अरोरांवरून तटकरे आणि दादांत मतभेद होते ?

अरोरांनी दोन विमाने विकत कशी घेतली ?

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातच होता असे मुंबईत जाहिर पणे पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत त्याहून खळबळ उडवून दिली.

अजित दादांच्या विमान अपघाताची चौकशी राष्ट्रीयस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडूनही करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी दिल्लीत केली. या अपघाताच्या पुर्वसंध्येला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी असलेल्या शेकडो कोटींच्या करारावरूनही अजित पवार आणि सुनील तटकरें यात वाद झाल्याचा खळबळजनक दावा रोहीत पवार यांनी केला आहे. या शेकडो कोटींच्या कंत्राटावरुन वाद विवाद झाल्यानेच अजित पवार यांना उशीर झाला आणि म्हणून त्यांनी बारामतीला कार ने न जाता विमानाने जाण्याचा फैसला घेतला असा दावाही रोहित पवार यांनी केला. तसेच, बारामतीतही नरेश अरोरा यांच्या लोकांना दादांनी झापल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित दादा जर गाडीने गेले असते तर दुर्देवी घटना घडली नसती. त्यामुळे, काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत. फाईल मुद्दामहून आणली गेली का? दादांनी फाईलवर सही केली, त्यानंतर ७ वाजून १३ मिनिटांनी दादांच्या विमानांचे बुकींग झाले. मी कोणावरही प्रश्न उपस्थित केले नाहीत, पण याचा तपास व्हावा, जे खरं आहे मी तिथे बोललो, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

अपघाताच्या पुर्वसंध्येला २७ जानेवारीला तटकरे म्हणताहेत की मी तिथे आलो उशीरपर्यंत थांबलो, त्यावेळी माध्यम सल्लागार नरेश अरोराच्या कराराची तिथे चर्चा झाली. दादाकडून त्या व्यक्तीचे शेकडो कोटीचे कंत्राट रद्द केले जाणार होते, त्यावरून वाद विवाद झाला म्हणून उशीर झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. आम्ही पुण्यात बारामती हॅास्टेलला बसलो होतो, तेंव्हा नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापले होते. नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला तेवढे पैसे द्यायला पाहीजे होते, असा काही नेत्यांचा आग्रह होता. कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे, असे म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटवरुन सुनिल तटकरेंकडे कंत्राटवरुन बोट दाखवले आहे.

सत्तेत नसतानाही अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, मला वेळ मिळाली नाही. परंतु, ई-मेलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार आहे. विरोधात असतानाही आम्ही लढतोय, पण जे सत्तेत आहेत ते बोलत नाही. संसद सुरू अससल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, विमान उड्डाणमंत्री यांनी वेळ दिला नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले. मोदी आणि अमित शाह यांना काकी भेटल्या, पार्थ जय होते. मी अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून जो काही अपघात झालाय तो घातपात होता की अपघात होता हाच मुद्दा मांडला असावा. तपास यासाठी व्हायला पाहिजे की ब्लॅक बॅाक्समध्ये काहीच मिळालं नाही. रेकॅार्डींग काहीच मिळालं नाही, अशी फालतू कारणं महाराष्ट्र ऐकणार नाही. अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, याकडे नेत्यांचे लक्ष नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही रोहित पवार यांनी म्हटले. यात क्रिमिनल इन्वेस्टीगेशन व्हायला पाहीजे, पारदर्शक पद्धतीने तपास व्हायला पाहीजे. ब्लॅक बॅाक्स बंद करता येत नाही. पण, काहीजण म्हणत असतील की ब्लॅकबॅाक्स बंद आहे, तर मी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले असं होईल, असे म्हणत रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. डीजीसीएनं तपास सुरू केला आहे, परंतु एका महिन्यांत इंटरनॅशनल एजन्सीद्वारे तपास व्हावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत राज्यात दरवर्षी विभागनिहाय बाल, युवा आणि महिलांसाठी स्वतंत्र साहित्य संमेलनांचे आयोजन चक्राकार पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक संमेलनासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने या सर्व संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे.

राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात मराठी भाषा धोरण जाहीर केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. या धोरणानुसार ३६ जिल्ह्यांत साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बालक, महिला आणि तरुणांमध्ये मराठी भाषेबद्दल रुची आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने ही स्वतंत्र संमेलनांची संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमांमुळे मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरवर्षी १२ वर्षांखालील मुलांसाठी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनांत मुलांच्या सक्रिय सहभागातून मराठी भाषेविषयी सहज आणि आनंददायी शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. मराठीतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचारांची ओळख, शब्दकोडी तसेच विविध कल्पक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

संमेलनांची ठिकाणे मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक असतील, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच या संमेलनांत बाल मानसशास्त्रज्ञ आणि बाल साहित्यिकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *