
केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना
बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे
मुंबई : मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल, तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यायला हवीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
जर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करत असतील, तर ते देशात आले कसे? देशाच्या पूर्व टोकापासून दक्षिण-पश्चिम भागापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून ते कसे प्रवास करून पोहोचले? गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असताना हे लोक इतका काळ देशात कसे राहिले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेतील अपयश, गुप्तचर यंत्रणांची चूक की प्रशासनातील त्रुटी आहे का, असा सवाल उपस्थित केला. जर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असेल, तर ती थांबवण्यात आणि संबंधितांना ओळखून देशाबाहेर पाठवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आदित्ययांनी थेट भाजपवर निशाणा साधत, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा राजकीय पातळीवर उचलण्याऐवजी त्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुनेत्रा पवार १५ दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होणार !
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे रिक्त असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसात सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येते आल्या होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटीसाठी त्यांनी घेतल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी येथे दाखल झाले होते. या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. या बैठकीत अधिक वेळ न दवडता सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याबाबतचा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

मुख्यमंत्री दिल्लीत…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली भेटीत भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळ बदलाच्या बातम्यांच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वपुर्ण मानली जात आहे.
महाशिवरात्री निमित्त ठाण्यात वाहतुक बदल
ठाणे : येत्या १५ फेब्रुवारी रविवारी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. ठाण्यातील बाजारपेठेत कौपिनेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्रिच्या दिवशी ठाण्यासह विविध शहरातून भाविक मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बदल लागू केले आहेत. बाजारपेठेत वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू केली असून पर्यायी मार्गाने येथील वाहतुक वळविण्यात आली आहे. बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी असेल.हे वाहतुक बदल रविवारी पहटे ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असतील.
तब्बल वीस वर्षांनी बांगलादेशमध्ये बीएनपी सत्तेत
ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. बीएनपीने २९९ पैकी २०९ जागा जिंकल्या आहेत, ज्यामुळे बहुमताचा १५० गुणांचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत २८६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीने ७० जागा जिंकल्या. जवळजवळ २० वर्षांनंतर देशात बीएनपीने सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेख हसीनाची अवामी लीग २००८ ते २०२४ पर्यंत सत्तेत होती. या विजयासह, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान यांचे पंतप्रधानपद जवळजवळ निश्चित मानले जात आहे. तारिक यांनी दोन जागा लढवल्या आणि दोन्ही जिंकल्या. ते गेल्या डिसेंबरमध्ये १७ वर्षांनी देशात परतले होते. बांगलादेशच्या निवडणुकीत कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामीचा दारुण पराभव झाला. त्यांच्या युतीला फक्त ७० जागा मिळाल्या. बांगलादेशी लोकांनी शेख हसीनाचे सरकार पाडणारा विद्यार्थी पक्ष नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी) लाही नाकारले.
मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लाॅक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान हा ब्लॉक असेल.
तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लाॅक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. तसेच खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक संकुलाचे आणि ‘कर्तव्य भवन १ व २’ चे उद्घाटन करून हे संकुल देशाला समर्पित केले.
प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा तिर्थ
नवी दिल्ली : यापुढे भारतीय प्रशासकीय आधुनिकतेचा नवा पत्ता सेवा तीर्थ असा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्थ’ या नव्या एकात्मिक संकुलाचे आणि ‘कर्तव्य भवन १ व २’ चे उद्घाटन करून हे संकुल देशाला समर्पित केले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) एका आधुनिक आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा इमारतीत स्थलांतरित झाले असून, हा बदल प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी १०० रुपयांचे विशेष स्मारक नाणेदेखील जारी केले.
उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीचा संदेश दिला. ते म्हणाले की, रायसिना हिल्सवरील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे बांधकाम ब्रिटिशांनी त्यांच्या सम्राटाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी केले होते. त्या काळातील वास्तुकला ही भारतीय जनतेला दुय्यम लेखणारी होती, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ‘विकसित भारत’ घडवण्याच्या निर्धाराने आपण ‘सेवा तीर्थ’मध्ये प्रवेश करत आहोत. जुन्या इमारतींमध्ये जागेची कमतरता असल्याने कामकाजात अडथळे येत होते, परंतु हे नवीन संकुल केवळ धोरणे आखण्याचे केंद्र नसून ते प्रभावी आणि प्रेरणादायी सुशासनाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे नवीन संकुल पर्यावरणपूरक आणि भविष्याचा वेध घेणारे आहे. ‘सेवा तीर्थ’मध्ये पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय एकाच छताखाली आल्याने धोरणात्मक समन्वयाला गती मिळेल. त्याचप्रमाणे ‘कर्तव्य भवन १ आणि २’ मध्ये अर्थ, संरक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारखी महत्त्वाची मंत्रालये स्थलांतरित होणार असल्याने सर्वसामान्यांनाही मंत्रालयीन कामासाठी सोयीचे होणार आहे.
हे संपूर्ण संकुल ‘४-स्टार गृह’ मानांकनानुसार बांधण्यात आले असून त्यात डिजिटल पायाभूत सुविधा, स्मार्ट सुरक्षा यंत्रणा आणि सौर उर्जेचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, रिक्त होणाऱ्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे रूपांतर आता ‘युगे युगीन भारत’ या भव्य संग्रहालयात केले जाणार असून, यासाठी फ्रान्सच्या तज्ज्ञ संस्थेशोबत करार करण्यात आला आहे.
नव्या दालनातून चार मोठे निर्णय
नव्या कार्यालयात पाऊल ठेवताच पंतप्रधानांनी जनहितार्थ चार मोठे निर्णय घेतले. त्यांनी अपघातग्रस्तांना दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या ‘पीएम राहत’ योजनेला मंजुरी दिली. तसेच, ३ कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट वेळेपूर्वी पूर्ण झाल्यामुळे आता मार्च २०२९ पर्यंत ६ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे नवीन लक्ष्य निश्चित केले. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी १ लाख कोटींवरून थेट २ लाख कोटी रुपये करण्यात आला असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी १०,००० कोटी रुपयांच्या ‘स्टार्टअप इंडिया फंड २.०’ ला देखील हिरवा कंदिल दाखवण्यात आला.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार
स्वाती घोसाळकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. महायुतीच्या भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षात खांदेपालट होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सुत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली असून संघटनेवर पकड मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळात बदल केला जाणार आहे.
तर, शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन पक्षात नव्याने बांधणी केली जाणार आहे. मंत्रिमंडळ स्थापन करताना एकनाथ शिंदे यंनी अडीच वर्षानंतर बदल करण्याचे सुतोवाच केले होते. पण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणूकीतील निकालामुळे शिंदे काही मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्षकार्यासाठी पाठविण्यात येईल.
कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.
भाजपामध्येही काही बदल अपेक्षित आहेत. काही मंत्र्यांच्या कार्यपध्दीतवर हायकमांड नाराज असल्याचीही चर्चा आहे. वर्षभरातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल भाजपामध्ये अपेक्षित आहे.

कोपरी येथील पुनर्विकासात ठाणेकरांची फसवणूक ?
आमदार केळकर घेणार संयुक्त बैठक
सिद्धेश शिगवण
ठाणे : झोपडपट्टी तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे महापालिकेने विकासकांना परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे स्पष्ट मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. कोपरी येथील एसआरए प्रकल्पातील अन्यायग्रस्त रहिवासी, एसआरए व महापालिका अधिकारी तसेच संबंधित विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित ८६व्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात आमदार केळकर यांनी समाजमाध्यमांशी संवाद साधला. पुनर्विकास योजनेत रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या किमान तीन तक्रारी प्राप्त झाल्या असून, अनेक वर्षांपासून इमारतीत वास्तव्यास असलेले रहिवासी विकासकांच्या त्रासाला कंटाळले असल्याचे त्यांनी सांगितले. भाडे वेळेवर मिळत नाही आणि पुनर्विकसित घरेही मिळत नाहीत. अशा रहिवाशांचे हक्क अबाधित ठेवण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
कोपरी येथील एसआरए योजनेअंतर्गत विकासकाने विक्रीसाठी इमारत उभारून त्यातील सदनिकांची विक्रीही केली आहे; मात्र मूळ रहिवाशांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. तसेच विकासकाने जवळपास पाच कोटी रुपयांचे भाडे थकवले असल्याचा आरोपही केळकर यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील आठवड्यात संयुक्त बैठकीत सविस्तर आढावा घेऊन तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाला नगरसेवक विकास पाटील, भरत चव्हाण, नगरसेविका उषा वाघ, संजय पाटील, अनिल भगत, राजेश जाधव, योगेश भंडारी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
भातसा प्रकल्पग्रस्तांचाही प्रश्न प्रलंबित
कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित असतानाच भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचा मुद्दाही रखडलेला असल्याचे केळकर यांनी सांगितले. भातसा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यामुळे बाधित ५२ प्रकल्पग्रस्तांपैकी मुंबई महापालिकेने २८ जणांना सेवेत सामावून घेण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना ठाणे व भिवंडी महापालिकांनी सेवेत सामावून घ्यावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून येत्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
