
रोहीत पवारांचा ‘लेटरबॉम्ब’
राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच लिहीले होते पत्र
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आज लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रफुल पटेल. तटकरेंनी निवडणूक आयोगालाच पत्र लिहीले होते असा खळबळजनक आरोप रोहीत पवार यांनी पुराव्यासहीत केला आहे.
अजित पवारांचे २८ जानेवारी २०२६ ला झालेल्या निधनानंतर अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार ‘कार्याध्यक्षांना’ (प्रफुल पटेल) देण्याची मागणी केली. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेतले नव्हते. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली आहे.
काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्रे समोर आली. हा कागद १०. ०३. २०२५ चा आहे, यामध्ये सुनेत्राकाकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात २८ जानेवारी २०२५ ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला जाईल तो ग्राह्य धरू नये. २६ फेब्रुवारीला एक पत्र अजितदादा पक्षाचे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते, त्यात सह्या प्रफुल पटेल तटकरे यांच्या आहेत, ज्यामध्ये लिहिलं होत कि, आमचा पक्षाचा कॉस्टिट्युशन बदलला आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नेशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे ताकद असेल असा या पत्रात म्हटलं गेलं होतं, सर्व निर्णय हे ते घेतील असा या पत्रात म्हटलंय. कोण होतं नेशनल वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल पटेल होते. यामध्ये सर्व अधिकार वर्किंग प्रेसिंडेन्ट यांच्याकडे असावे असा या पत्रात होतं. पण हे पत्र जेव्हा सुनेत्रा काकींना कळल्यावर सुनेत्रा काकींनी आयोगाला पत्र दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष होपर्यत कोणताही पत्र विचारात घेऊ नये, असंही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष झाल्याचे दिलेले विधान आणि त्यानंतर त्यांनी ते ‘चुकीने बोललो’ असे सांगणे, या घटनाक्रम संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले. पण आधीच नेत्यामध्ये ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेत्रा काकींना सांगायचं आहे, राजकारण लय वगाळ झालं आहे, सुनील तटकरे प्रफुल पटेल यांनी सांगितलं होत की, अधिवेशनात कोणीही अजित पवार यांच्या अपघातबद्दल बोलायचं नाही, म्हणून काही आमदार सोडले तर कोणीही सभागृहात याबद्दल बोलत नव्हते. जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते त्याचा काय झालं. त्याने पण पत्रकार परिषद घेतली नाही असेही रोहीत पवार यावेळी म्हणाले.
खारगे समितीच्या अहवालात
पार्थ पवारांबाबत ‘मौनव्रत’
मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा जंबो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. या अहवालात कुणालाही स्पष्टपणे क्लीन चिट देण्यात आलेली नाही, पार्थ पवारबाबत बरेच मौन बाळगण्यात आले असून, अनेक अधिकारी आणि संबंधितांवर मात्र कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.
सहायक दुय्यम निबंधक रवींद्र तारु आणि तहसीलदार सूर्यकांत येवले यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शीतल तेजवानी आणि अशोक गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्ह्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पार्थ पवार यांचे मावस भाऊ दिग्विजय पाटील यांना अमेडिया कंपनी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच, अधिक चौकशीत दोषी आढळणाऱ्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
खारगे समितीने या प्रकरणी एकूण ७ बैठका घेतल्या असून, अहवालासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंध असलेले तहसीलदार आणि सहायक दुय्यम निबंधक यांच्या बडतर्फीची शिफारस करण्यात आली आहे. शासकीय जमिनीचे नियमबाह्य हस्तांतरण करण्यासाठी खरेदी दस्त नोंदवण्यात आल्याची गंभीर बाबही या अहवालात नमुद करणअयात आली आहे. याला महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांची चूक असल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच उदय सामंत यांच्या उद्योग विभागाने एनओसीऐवजी इरादापत्र जोडणे ही नियमबाह्य कृती असल्याचेही त्यात म्हटले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क न करता इरादापत्र देण्यात आले हे चुकीचे होते असेही त्यात म्हटले आहे.
अहवालात पार्थ पवार यांच्यावरील कारवाईबाबत थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, भविष्यातील फौजदारी तपासात अधिक लोकांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे समितीने नमूद केले आहे.


महाराष्ट्रात चाललंय काय ?
झिरवळ हे वागणं बरं नव्हं
माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांचे सेक्सकांड
० सरकारी बंगल्यात तृतीयपंथीसोबत शय्यासोबत आणि ‘दारू’बाजी
० पवन यादव या तृतीयपंथीविरोधात त्याच्या भावानेच केला भांडाफोड
० भावकीच्या वादात झिरवळांची गोची ० वादग्रस्त व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात खळबळ
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातच्या काळया कृत्याने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच भोळाबाबड्या चेहऱ्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या सेक्सकांडाने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. पवन यादव या तृतीयपंथीयासोबत सरकारी बंगल्यात शय्यासोबत करतानाच दारूपार्टीही केल्याचा व्हिडीयो व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकाऱण्यांची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. पवनचा भाऊ रवी यादवने भावकीच्या वादातून झरहरी यांचा हा व्हिडीयो पत्रकार संघात व्हायरल केला आणि सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झालाय.
राज्याच्या राजकारणात माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून विविध राजकीय पक्षांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
व्हिडिओमधील दृश्ये आणि त्यातील आशयामुळे विरोधकांनी झिरवळ यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी नैतिकतेचे पालन करावे, असा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारेनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, यावर झिरवळ यांची प्रतिक्रीय आली नसली तरी झिरवळ समर्थकांनी हा व्हिडिओ “कट-छाट करून प्रसारित” करण्यात आल्याचा दावा करत त्यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओची सत्यता आणि संदर्भ तपासल्याशिवाय निष्कर्ष काढू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडिओची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नसून, पोलिसांकडून किंवा संबंधित यंत्रणांकडून याबाबत अधिकृत भूमिका येणे अपेक्षित आहे.
गेल्याच महिन्यात झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनात लाचखोरी करताना त्यांच्या कर्मचाराला पोलिसांनी रंगेहात पकडले होते.
पवन यादवने बलजितसिंग भाटीयाच्या मदतीने आपणाकडून २५ लाखाची खंडणी मागितली होती. ती न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात तुला अडकवीन अशी धमकी दिली होती. काही पोलिस अधिकारीही त्यात सामिल होते असा आरोप रवि यादवने केला आहे. पवन यादवचे चारित्र काय आहे हे जनतेसमोर यावे यासाठीच हा व्हिडीयो त्याने पत्रकार परिषद घेऊन उपस्थित पत्रकारांना दिला. पण हा व्हिडीयो व्हायरल झाल्यामुळे झिरवळांचे आता वांदे झाले असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
photo caption
पवन यादवचे कारनामे पत्रका परिषदेत उघड करताना रवी यादव
फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून
हटवण्यासाठी खरातची अघोरी पूजा
स्लग- जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
३८ आमदारांनी अघोरी पुजेसाठी अनामिका कापल्या

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी भोंदू बाबा अशोक खरात यांने अघोरी पुजा केली होती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासाठी अशोक खरातकडे राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात यानेही या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक स्फोटक दावे केले.
अशोक खरातने २००७ साली सर्वात आधी पत्रकार बाळू तुपे याचा बळी दिल्याचा खळबळजनक दावाही केला. त्यावेळी अनेक वर्तमानपत्रांनी याबाबत खरातचा पर्दापाश करणारी मालिका चालवली होती. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, मी खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.’
अशाप्रकारच्या काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, ईशान्येश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे ३८ आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकाराचा पैसा जातोय, रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टिंग खरातकडून केल्या जात आहेत. हे काय सुरु आहे? अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्य असणाऱ्यांना अजून अटक का झाली नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
कोकणातील आंबा-काजू
शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
0 विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये
० विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मिळणार
० हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान
० सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न या सर्वांनाच यश आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.ते म्हणाले,१७ मार्च २०२६ रोजी कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सूचनांच्या आधारे शासनाने कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्राथमिक अहवाल मागवला असून त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३०२ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. यामध्ये ३५,५८० हेक्टर क्षेत्रावरील ८०,४१८ शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा घेतला आहे. कमी व जास्त तापमानामुळे सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे.
आंबा पिकासाठी कमी तापमानामुळे प्रति हेक्टर ६,०७१ ते ३४,००० रुपये, तर जास्त तापमानामुळे १७,१७१ ते ६८,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मेपर्यंत विमा संरक्षण लागू आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.
दरम्यान, काजू पिकाखाली कोकणात १,७५,१४० हेक्टर क्षेत्र असून १९८ महसूल मंडळांपैकी सुमारे १५० मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे. काजूसाठी प्रति हेक्टर १६,८०० ते ४२,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये आहे.

सेक्स, सौंदर्य,सत्ता आणि संपत्ती भोंदूगिरीचे चार खांब !
सेक्स, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती हे मनुष्य जातीचे कायम आकर्षण केंद्र राहिले आहे आणि संपूर्ण आयुष्य त्याचे याच्या भोवती फिरत असते.
यापैकी कुठले तरी एक किंवा दोन किंवा सर्व मिळवण्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असते. त्यासाठी तो कायम प्रयत्न करीत असतो. जर सहज मार्गाने प्राप्त झाले तो उपभोग घेत असतोच. मात्र खुपदा त्याच्या या सुप्त इच्छा जर संधी मिळाली आणि गुपित रहात असेल तर तो सहज आपली ही छुपी प्रवृती बाहेर काढतो.
कुठलाही बदमाश भोंदूबाबा, मग तो भविष्य, कुंडली बघणारा असो, पूजा पाठ करणारा, आश्रम चालवणारा मठपती किंवा अन्य कुणीही बदमाश भोंदू हे अतिशय योग्य रीतीने जाणतो
आता खरात प्रकरणाचे बघाल तर हे प्रकरण कधीच बाहेर आले नसते जर त्याच्या पीए याने त्याचे पेन ड्राईव्ह चोरले नसते आणि महिलांना ब्लॅक मेल करण्याचा प्रयत्न केला नसता.
सर्वजण तो लोकांना लघवी प्यायला द्यायचा किंवा वीस फूट नाग काढायचा हे सर्व किंवा असेच प्रकार यापूर्वी अनेक भोंदू, तांत्रिक करीत आले आहेत. विष्टा खायला लावणे, मुत्र प्राशन, विकृत समागम हे करायला लावण्या मागे बदमाश भोंदूचे एक शास्त्र असते की, सदरची महिला किंवा पुरुष आपल्या किती वश आहे. तीन वर्ष एखाद्या महिलेवर बलात्कार कसा होऊ शकतो ?
यामागे महिलांची देखील मानसिकता समजून घेतली पाहिजे. इतक्या सर्व महिला समाजात वावरत असतात. सर्वच महिला काही बदमाश भोंदू बाबाच्या नादी लागत नाही. शिवाय प्रत्येक महिलेला एक सिक्स सेन्स असतो, समोरचा पुरुष कुठल्या हेतूने बघतो आहे, स्पर्श करतो आहे , बोलतो आहे हे पटकन समजते. मात्र महिलाना दाखवलेले स्वप्न हे इतके भव्य असते, शिवाय भोंदूच्या एजंट लोकांनी त्याची अशी काय स्तुती केलेली असते त्यात बड्या बड्या लोकांचा राबता पाहिल्यावर महिला तिला मिळणाऱ्या सिग्नल्स कडे सपशेल दुर्लक्ष करते आणि मग भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकत जाते. त्यासोबत खुपदा महिलाना छोटे मोठे लाभ होत असतात त्याचा मोह देखील त्यांना आवरला जात नाही आणि त्या मग कुटुंबाशी प्रतारणा करीत सरळ भोंदू बाबाच्या लीन होतात. बाहेरख्याली पणात देखील हेच घडत असते.महिला पुरुषांच्या आधीन जाते आणि नवरा सोबत प्रतारणा करीत असते.
एकदा एखादी महिला जर एखाद्या पुरुषाच्या आधीन झाली तर तो तिचा संबंध तिचा फायदा दाखवून इतर पुरुषासोबत सहज करून देऊ शकतो, त्यात गुपित रहाण्याची खात्री आणि विश्वास असल्याने महिला सहज तयार होते
पुरुषांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास या ट्रॅप मध्ये उद्योगपती, बडे अधिकारी, राजकारणी सहज येतात याची कारणे शोधली तर ती देखील नवी नाहीत. ज्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अस्थिरता असते मग ती सत्ता असो, पद असो की सेक्स पॉवर असो. एका वयानंतर कुठल्याही पुरुषांची समागम करण्याची शक्ती क्षीण होत जाणार हा निसर्ग नियम आहे. मग ती कायम ठेवण्यासाठी काही पुरुष व्यायाम करतील, काही आयुर्वेदिक औषध घेतात काही आलोपथी औषध घेत असतात. जस जसे वय होते तसे सेक्स पॉवर कमी होते मात्र पैसा, पद, सत्ता बघून अनेक ललना आपल्या सौंदर्याची जादू चालवत असतात, मात्र या तरुण महिलेला पूर्ण पडू का याबद्दल ५०/५५/६० वयाच्या मनात संशय असतो. त्यामुळे एखाद्या अशा भोंदू बाबाने असे काही चमत्कारिक औषध दिले त्यात ज्यादा प्रमाणात व्हायग्रा सारख्या औषधी टाकून दिल्या आणि मानसिक शक्ती दिली की औषध आपले काम करते आणि मानसिक आधार श्रद्धा सेक्स करण्याची मानसिक तयारी करते त्यात एकदा व्यक्ती यशस्वी झाला की मग तो सहज त्या भोंदू बाबाच्या चरणी लीन होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी मंदिराचा पुजारी हा खास व्यक्ती पाठवून लाखो रुपयांचे ओशोनिक जल आणि मध मागवून घेत असे .
वास्तविक सेक्स हे निसर्गाने प्रजोत्पादन करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे, त्यात आनंद यासाठी भरला की, स्त्री पुरुषाने ते करावे आणि प्रकृती पुढे चालावी. घडीभर विचार करा त्यात जर निसर्गाने आनंद भरला नसता तर स्वतः हून कुठल्या स्त्री पुरुषाने असले कृत्य केले असते? आणि एवढी जगाची लोकसंख्या तरी वाढली असती का ?
राजकीय व्यक्तिना केवळ बाहेरचेच नाही तर पक्षाच्या अंतर्गत देखील स्पर्धा आणि शत्रू असतात त्यामुळे लोकांच्या समोर आपण देखील धार्मिक आहोत ही प्रतिमा प्रमाणित करण्यासाठी आणि बाबाच्या भक्तांची आयती मते मिळवण्यासाठी मोठे मोठे राजकीय नेते बाबा बुवांचा भजनी लागलेले, त्यांच्या धर्मपीठावर गेलेले आपण पाहिले, यातून लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी ते अलिकडचे नरेंद्र मोदी अमित शहा देखील सुटलेले नाही. या प्रत्येक बाबाची वेगवेगळी खासियत असते कुणी गुरू मंत्र देतो, कुणी काही तावीज करून देतो, कुणी काही पाणी देतो जे एक हजार दिवस जप करून त्यात मंत्र शक्ती उतरली असल्याचा दावा करतो. काही प्राण्याचे दुर्मीळ अवयव, किंवा अघोरी पूजा करण्यास सांगतो असे नवे नवे प्रकार भोंदू बदमाश करीत असतात. त्यात राजकीय लोकांच्याकडे गडगंज पैसा असल्याने त्यांना काही लाख किंवा कोटींची मदत आपल्या धार्मिक गुरुला करणे मुळीच अवघड असत नाही.
पण यासर्वात स्वार्थ, सत्ता, सौंदर्य यांनी बुद्धी बधीर झालेले नेते मंडळी एक गोष्ट विसरतात की धर्माची निर्मिती ही मनुष्याला सत्य, अहिंसा, करुणा, मैत्री, प्रेम आणि बंधुत्व शिकवण्यासाठी झाली आहे. ईश्वर जर दुष्प्रवृतीच्या विरोधात लढून ईश्वर झाला असेल तर तो आपल्याला किंवा हा तथाकथित बाबा बुवा जी भोंदूगिरी करतो आहे त्याला सत्यवादी ईश्वर कसा मदत करेल ? इतर सर्व लोकांना सोडून तो माझ्यात जर लायकी नसेल तर मला तो का निवडेल ? आणि माझ्यात जर लायकी असेल मला तो का डावलेल असा साधा प्रश्न जरी व्यक्तीने स्वतःला विचारला तरी तो अशा ट्रॅप मध्ये फसणार नाही.
प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात प्रचंड मोठी अशी विवेकवादी, सुधारणावादी संत आणि समाज सुधारकांची परंपरा आहे. ज्यांनी आपल्या अभंग, ग्रंथ आणि प्रबोधनातून अशा गोष्टीवर वेळोवेळी आसूड ओढले आहे. मात्र देशातील प्रचंड लोकसंख्या, नोकऱ्या कमी, अपुरी साधने आणि बड्या भांडवलदार, राजनेते आणि धार्मिक प्रचारक यांची युती झाल्याने विविध माध्यमातून दैववादाचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो मग वेगवेगळ्या उत्सवातून , सण, टीव्ही सिरीयल, सिनेमे , साहित्य , धार्मिक मेळे आणि बैठका यातून कायम रतीब घातला जात आहे. असे करण्या मागे सर्व सामान्य लोकांना त्यांच्या दुःख, समस्याचे खरे कारण समजू नये हे आहे. त्यांना योग्य शिक्षण का मिळत नाही? आरोग्याच्या सुविधा का उपलब्ध नाही ? त्याचा मुलगा इतका शिकून त्याला रोजगार का नाही ? याचे खरे कारण देशातील सत्ताधारी आहेत. मात्र लोकांनी सत्तेला लक्ष करण्या ऐवजी आपल्या नशिबाला दोष देत रहावा, माझ्या मागे साडेसाती आहे, माझे ग्रह ठीक नाही असा दैववादी विचार करावा. त्यामुळे आपण क्रोनी कॅपिटलिसम चे बळी आहोत हे त्यांना उमजू नये
कुठलाही धर्म किंवा धर्म संस्थापक हा मानवी कल्याणाची मूल्ये रुजवत असतो. प्रेम, करुणा, अहिंसा , शील , सदाचार हा त्याच्या शिकवणुकीचा गाभा असतो मात्र त्याच्या मागे त्याचे बदमाश भक्त आपल्या फुकट उत्पन्नाची आणि ऐशोआरामाची सोय म्हणून त्याच्या नावाने नाही नाही ते देव्हारे माजवत असतात आणि अज्ञानी, हतबल, लालची, सत्ता लोलुप लोकांना आरामात लुटत असतात.
हे सर्व प्रकार बंद व्हावे असे वाटत असेल तर आपण जे आपल्या धर्माचे अधिकार कुठल्या पुजारी, बाबा, मंदिर किंवा तीर्थस्थानात न ठेवता आपल्या स्वतः जवळ ठेवावे. आपल्या धर्माची मूळ पुस्तकं आपण स्वतः आणून अभ्यास करावी. केवळ एक पुस्तक न वाचता वेगवेगळी पुस्तक वाचावी. कुणी विचारवंत विवेकी आणि साक्षेपी भावनेने काही सांगत असेल तर ते ऐकावे, बरे वाटते किंवा तर्क शुद्ध वाटते म्हणून लगेच विश्वास न ठेवता त्याचा स्वतः अभ्यास करावा, पडताळून पहावे , चिंतन करावे त्यानंतर जर ते अनुकरणीय असेल तर नक्की कृतीत आणावे.
धर्मात जर चुकीचे मानवता विरोधी सांगितले असेल तर ते नाकारण्याची हिंमत आपण आपल्या संत आणि महापुरुषांच्या प्रमाणे ठेवावी. तरच महाराष्ट्र या भोंदूगिरातून बाहेर येईल अन्यथा खरात प्रकार हे भोंदूगिरीच्या पर्वताचे छोटे टोक आहे, अजून असे लाखो भोंदू ठीक ठिकाणी धर्मक्षेत्रात, मंदिरात, आश्रमात, सर्वत्र व्याप्त आहेत.
मी अतिशय प्रामाणिक कळकळीने हे लिहिले, यामागे कुठल्या धर्म अथवा देवाचा अपमान करण्याचा हेतू नसून देव आणि धर्माचे चेहरे लाऊन चालणाऱ्या विकृतीवर प्रहार करण्याचा हेतू आहे. तुम्ही हे सर्व वाचले त्याबद्दल आपले आभार. यावर विचार करा आणि मी जे बोलतो त्यात तथ्य असेल तर इतराना सांगा. किंवा हा लेख आपण सहज पुढे पाठवू शकता. धन्यवाद
-किरण सोनावणे
पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल प्रकरणी चौकशीची मागणी
कल्याण: डोंबिवलीतील के. व्ही. पेंढारकर कॉलेज व सिस्टर निवेदिता स्कूल तसेच संबंधित ट्रस्टच्या कार्यपद्धतीबाबत विविध गंभीर प्रश्न समोर येत असून, या संदर्भात निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी ‘Save Education Society’ अंतर्गत साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेतील अनियमितता, विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भातील प्रश्न, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकतेचा अभाव, तसेच शैक्षणिक संस्थांच्या वापराबाबत निर्माण झालेल्या शंका या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात येणार आहे. या सर्व बाबींवर संबंधित प्राधिकरणांकडून सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
हे साखळी उपोषण गुरुवार, २६ मार्च रोजी के.व्ही. पेंढारकर कॉलेज समोर आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रोहिदास सुरवसे करत असून, हा लढा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
00000000

ठाणे : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी २३ मार्च बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये प्रलंबित महानगर गॅसची कनेक्शन त्वरित सुरू करण्याबाबतची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले.
या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजीत पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मीना मकवाना, उपआयुक्त मधुकर बोडके, शिधावाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण सुभाष डुंबरे, रोहित माळकर, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी चित्रा नायर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मयांक तलरेजा, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे सारंश शाहू, तसेच महानगरगॅसचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळत आहे. तसेच वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे एचपी गॅसचे जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर यांनी नमूद केले. विशेषतः लहान व्यावसायिकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असून शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील मागण्या संकलित करून त्या संबंधित कंपन्यांकडे पाठवाव्यात. त्यानुसार महानगर गॅस व इतर गॅस कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही. अशा ठिकाणी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नसल्याचे निदर्शनास आले. काही भागांमध्ये ४ ते ५ वर्षांपासून गॅस पुरवठा प्रलंबित असल्याची बाबही समोर आली. या प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
गॅस पाइपलाइन सप्लायवर अधिक लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक प्रभागात रेशनिंग ऑफिस व गॅस एजन्सींमध्ये समन्वय वाढवणे, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांची यादी तयार करून ठराविक वेळेत निपटारा करणे, गॅस कनेक्शनसंदर्भातील कामासाठी निश्चित टाइमलाइन ठरवणे तसेच स्थानिक नगरसेवकांकडून प्राप्त तक्रारी संकलित करून त्या गॅस कंपन्यांकडे पाठवाव्यात आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी. एकूणच, गॅस कनेक्शनचा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून देशव्यापी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांनुसार स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १०० दिवसांची विशेष मोहीम- निक्षय मित्रांचा होणार सत्कार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाद्वारे शहरातील क्षयरोगाचे उच्चाटन करून “टीबी मुक्त कल्याण-डोंबिवली” हे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जागतिक क्षयरोग दिना निमित्त रुक्मिणीबाई रुग्णालय येथे विशेष जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी रुग्णासाठी पोषण आहार वाटप तसेच MDR रुग्णाकरिता विशेष PFT आणि XRAY तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ कल्याण, रोटरी क्लब ठाणे जिल्हा ३१४२ आणि आय एम ए कल्याण यांच्यावतीने एकूण २१० क्षय रुग्णांना पोषण आहार किट यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी आणि उपचार पूर्ण करावा शिवाय भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या या पुढील शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयएमए प्रेसिडेंट डॉ सुरेखा इटकर यांनी केले.
या कार्यक्रमावेळी बाई रुक्मिणी बाई रुग्णालय यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुलक्षणा त्रिभुवन,डॉ गणेश डोईफोडे , शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके, चेस्ट फिजिशियन डॉ श्रेयस गोडबोले, डॉ रुतिका भोसले, डॉ धाकतोडे इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या दीप्ती दिवाडकर, डॉ चिटणीस, एड नीता कदम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विविध जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे, तसेच तपासणी व उपचार सुविधा राबविण्यात येणार आहेत. २४ मार्च पासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुढील १०० दिवस निरनिराळे कार्यक्रम राबवून क्षयारोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
या मोहिमेत घराघरांत जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणे. मोफत कफ तपासणी व एक्स-रे सुविधा, निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करणे, उपचार पूर्णत्व दर वाढवण्यासाठी विशेष पाठपुरावा, उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहेत.
क्षयरोग निर्मूलनासाठी “निक्षय मित्र” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह तसेच नागरिकांनी टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार, मानसिक आधार व आवश्यक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निक्षय मित्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शासनाच्या “निक्षय पोषण योजना” अंतर्गत टीबी रुग्णांना उपचार कालावधीत दरमहा ₹१०००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे रुग्णांच्या पोषण स्थितीत सुधारणा होऊन उपचार परिणामकारक होण्यास मदत होते.
“क्षयरोग हा संसर्गजन्य पण पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी व उपचार पूर्ण करावेत. तसेच ‘निक्षय मित्र’ बनून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा.” असे आवाहन या वेळी महापालिकेतर्फे करण्यात आले.
0000000

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा
ठाणे : पियुष कनोजियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने गोदरेज स्टाफ क्लबचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील विजयी आगेकूच कायम राखली. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पियुष कनोजियाने पाच षटकांत अवघ्या दोन धावांत सहा बळी मिळवून छाप पाडली. गोदरेजच्या १३१ धावांचे आव्हान अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने १४ षटकात १३७ धावा करत पार केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोदरेज स्टाफ संघाच्या आघाडीचे फलंदाज धावा करण्यात सपशेल अपयशी ठरले असताना पूर्वार्य गुंडुर आणि प्रशांत खावरेने दहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पूर्वार्याने नाबाद ६० आणि प्रशांतने ४o धावा बनवल्या. या डावात पीयुषसह ओमकार करंदीकरने तीन फलंदाज बाद केले. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश जांगिडने ६० धावांची खेळी केली.अश्विन माळीने नाबाद २३ आणि शंतनु नायकने नाबाद २७ धावा बनवल्या.
संक्षिप्त धावफलक : गोदरेज स्टाफ क्लब : ३३.४ षटकात सर्वबाद १३१( पूर्वार्य गुंडुर नाबाद ६०, प्रशांत खावरे ४०, पियुष कनोजिया ७-५-२-६, ओमकार करंदीकर ७-३९-३) पराभूत विरुद्ध अरुप्रीत टायगर्स एलएलपी : १४ षटकात ३ बाद १३७ ( आकाश जांगिड ६०, अश्विन माळी नाबाद २३, शंतनु नायक नाबाद २७).
000000
