10 March Bitambatmi All pages

Open Book
Open Book

ठाणे: जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मीरा-भाईंदरजवळील उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ मार्च २०२६ रोजी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या परिषदेत देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० ग्रामीण महिलांचा सहभाग असून, व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभव या व्यासपीठावरून मांडले जाणार आहेत.

यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे,  प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री पोपटराव पवार,  प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, अपर तहसिलदार निलेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते.

PHOTOT CAPTION

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे त्यांच्या लाडक्या बहीणींनी असे स्वागत केले.

रमेश औताडे

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‘पिंक ओपीडी’चा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.

राज्यातील ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्याची ही व्यापक मोहीम राबवली जाणार असून, त्यामुळे गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालता येईल. जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावले उचलत असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांच्या धर्तीवर ‘आरोग्य आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे आणली असून आरोग्य सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला जाणार असल्याचे याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला डॉक्टर, शल्यचिकित्सक, परिचारिका आणि आरोग्य सेविकांचा यावेळी आवर्जून सत्कार करण्यात आला. यावेळी

याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 

वसई : आंतरराष्ट्रीय महिला दिनी अवघं जग स्त्रिशक्तीचा जयजयकार करीत असताना वसईत आक्रीत घडले. वसई पूर्व परिसरात नवजात बालिकेला रस्त्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास वसई पूर्व येथील वसंतनगरी सिग्नल परिसरात एका हिरव्या रंगाच्या वॉशिंग पावडरच्या पिशवीत नवजात बालिका आढळून आली. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

डॉक्टरांकडून बालिकेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

माहिती मिळताच पोलीस आपत्कालीन वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती. स्थानिकांकडे चौकशी केली असता त्या बालिकेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी तातडीने बालिकेला ताब्यात घेऊन उपचारासाठी वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून बालिकेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेला रस्त्यावर सोडून दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : अमेरिका- इस्रालयने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा चटका अखेर भारताला बसला आहे. घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच नाही तर आता युद्धजन्य स्थिती पहाता २५ दिवसात एकच गॅस सिलेंडर मिळणार असल्याने गॅसचा पुरवून वापर करावा लागणार आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची  तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक २०० रुपयांनी वाढले आहेत. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, असा कुठलाही प्रकार नाही, माध्यमांनी लोकांना पॅनिक करू नये, भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, असे सांगितले.

इंधनाची कुठलीही कमतरता नाही

दोन-तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार,  विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं की, अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले.

नाहीशा होणाऱ्या मुलीं जातात कुठे ? प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलीस महासंचालक

लहान मुले व विशेषतः लहान मुली नाहीशा झाल्यास त्यासाबंधी पोलिसांकडे तक्रार मिळाल्यानंतर त्यावर तातडीने त्यांना पळविण्यात आले असण्याची शक्यता गृहीत धरून गुन्हा दाखल करावा व त्याप्रमाणे तपास करावा अशा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाते. महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात आले आहेत व त्यात प्रशिक्षित संवेदनाशील अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकारी ह्या तपासावर लक्ष ठेवून दर महिन्याला आढावा घेऊन तपास योग्य पद्धतीने करणार्‍यांना प्रोत्साहन देतात तर ज्याठिकाणी तपास नीट नसेल त्यांना कारणे दाखवायचे आदेश देतात. हरवलेल्या मुला, मुलींना शोधण्यासााठी जुलै 2015 पासून आत्तापर्यंत 14 ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आली आहेत व त्यात 96 टक्क्यांहून अधिक मुलींचा तपास लागला अहे व त्यांना पालकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ह्याशिवाय, रुग्णालयातून नवजात बालकांना पळवता येऊ नये ह्यासाठी तिथे CCTV लावून काळजी घेतली जाते. शाळांमधुन मुले पळवली जाऊ नयेत ह्यासाठी सर्व शाळाचे सुरक्षा निरीक्षण करावे असे आदेश 12/2/26 रोजी शासनाने प्रसृत केले आहेत. स्त्रिया, मुले व नवजात बालके यांच्या तस्करीस प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांमधे   Anti Human Trafficking Cell स्थापन करण्यात आली आहेत. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम राबवण्यात येत आहेत.

वरील सर्व प्रयत्न असूनही उपलब्ध माहिती प्रमाणे 2024 मधे अल्पवयीन 11316 मुली हरवल्याची तक्रार प्राप्त झाली व त्यातील 8475 मुली मिळून आल्या. 2025 मधे 12113 अल्पवयीन मुली हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या व त्यातील 10295 मुली मिळून आल्या. म्हणजेच गेल्या दोन वर्षात 4600 पेक्षा अधिक मुलांचा तपास अद्याप लागलेला नाही. ह्या संवेदनाशील विषयावर, विधान मंडळात नुकत्याच झालेल्या चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांनी अधोरेखित केले की  हरवलेली प्रत्येक मुलगी शोधली जाईल ह्यसाठी कसोशीने प्रयत्न केले जातील.

पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते हे त्यासाठी नक्कीच झटून प्रयत्न करीत आहेत. ह्यात अचूकता येण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. त्या बद्दल दोन प्रयोगांची माहिती देणे उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा येथील मनोरुग्णालयांची तपासणी करण्याचे काम मला सांगण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले की ओळख पत्राअभावी अनेक रुग्णांना कल्याणकारी योजनांचा फायदा मिळत नाही. तेव्हा मी जिल्हाधिकार्‍यांना विनंती करून त्यांना आधारकार्ड मिळवून देण्याची व्यवस्था केली. तेव्हा लक्षात आले की अनेक रुग्णांची पूर्वीची आधार साठी नोंद उपलब्ध आहे. तिचा उपयोग करून त्यांना संबंधित पालकांपर्यंत पोचवता आले. त्याच प्रमाणे नाहिशा होणार्‍या प्रत्येक अल्पवयीन मुलीचे आधार कार्ड आता नक्कीच असणार. ती माहिती जर सर्व बस स्थानके, रेल्वे स्टेशन्स, immigration check posts ह्यांना देऊन तिथे येणार्‍या प्रवाशांना तपासले तर अनेक नाहिशी झालेली मुले, मुली, महिला सापडू शकतील. रेल्वे तिकिट काढताना सध्या फक्त प्रमुख व्यक्तीचा आधार क्रमांक विचारला जातो. त्यात बदल करून प्रत्येकाचा आधार क्रमांक घेणे जरुरीचे आहे. तसेच बस, ट़ॅक्सी प्रवासासाठीही आधार क्रमांक सक्तीचा करणे उपयोगी ठरेल.  नाहीशा होणार्‍या अल्पवयीन मुली ह्यांना स्पा, डान्स बार, हॉटेल्स, कुंटणखाने अशा ठिकाणी वापरण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी आधार क्रमांकाची सक्ती केल्यास बर्‍याचशा मुली सापडतील.

दुसर्‍या प्रयोगात, मागच्या वर्षी आषाढी एकादशीवारीच्या वेळी सोलापुर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणार्‍या अतुल कुलकर्णी ह्यांनी आलेल्या प्रत्येक वारकर्‍याची अचूक मोजणी केली. 20 लाख वारकरी आले होते. त्यात facial recognition system चा वापर करून चेन स्नॅचर्सना पकडले व एकही सोनसाखळी चोर निसटू शकला नाही. त्याप्रमाणे, हरवलेल्या बेपत्ता मुलींचे फोटो अशा जत्रा, कुम्भमेळा वगैर गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध असतील तर facial recognition system चा वापर करून त्यांना शोधून काढता येईल.

किंबहुना, गृहखात्याने IIT मुंबईला जर असा एक प्रोजेक्ट करायला प्रोत्साहन दिले तर ते नवीन तंत्रज्ञान जसे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून प्रभावी उपाय शोधुन ही समस्या सोडवायला मदत करतील.

पोलीस त्यांचे काम उत्तम प्रकारे करत असताना, ह्या समस्येच्या कारणांचा ही विचार होणे गरजेचे आहे. आई, वडील दोघेही कामावर जात असल्याने पालक व वयात येणार्‍या मुली ह्यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. अनेक आकर्षणे जसे सिनेमात काम करणे, नोकरी, उच्च शिक्षण, मुलांबरोबर राहून त्यांचे प्रेम संबंध वगैरे मुळे मुली घरात न सांगताच पळून जाणे पसंत करतात. ह्याशिवाय, परजातीय, परधर्मीय मुलांशी संपर्क ठेवल्यास honour killing सारख्या घटना घडून मुलाची हत्या करायला पालक कमी करीत नाहीत. त्यामुळे घरात न सांगता पळून जाण्याचा मार्ग मुली चोखाळतात. त्यामुळे पालकांनी मुलींच्या बरोबर quality time देऊन संवाद वाढवणे, त्यांना विश्वासात घेऊन, सर्व बाबींची त्यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

शाळा, महाविद्यालयातही विषयांच्या शिक्षकांशिवाय मानसिक समुपदेशन करणार्‍या तज्ज्ञाांची नेमणूक करणे आवश्यक आहे. अनेक मुली अन्य मुलींच्या सांगण्यावरून किंवा कोणी फसवल्याने पळून जातात. अनेक जणी आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. त्यांना वेळीच सावरून आनंदी जीवन जगायला मदत करणारी व्यक्ती असल्यास त्या घर सोडून जाणार नाहीत.

ह्या समस्येच्या निराकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी म्हणजे पालक, नातेवाईक, शेजारी, स्वयंसेवी संघटना, प्रशासन, पोलीस, मीडिया ह्यांनी एकत्र येऊन ह्या प्रश्नावर तोडगा काढणे गरजेचे आहे. प्रत्येक पालक ह्या समस्येमुळे  आज काळजीत आहे.

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचा विश्वास

अलिबाग 🙁 अशोक गायकवाड )— ‘लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जात आहेत’, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शनिवारी येथे केले. अलिबाग तालुक्यातील सारळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित भव्य ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यव्यापी मोहिमेतून प्रशासनाचा कायापालट. यावेळी मार्गदर्शन करताना खारगे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात (सर्कल) राबविला जात आहे. दर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील सहा मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या शिबिरांचे नियोजन केले जाईल, जेणेकरून एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही. कार्यक्रमात बोलताना शिवाजी चौरे यांनी नमूद केले की, ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी हातात हात घालून काम करतात, तिथे विकासकामांचा वेग अधिक असतो. या अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महसूल विभाग हा केवळ एक विभाग नसून तो सर्व शासकीय विभागांना एकत्र बांधणारा समन्वय साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे विविध दाखले, परवाने आणि शासकीय योजनांचा लाभ अत्यंत सुलभपणे आणि विनाविलंब मिळावा, हाच या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे.’

या सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सारळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उदंड प्रतिसाद दिला असून, प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा

ऋतुराज, आशीष, झेनुलचे चुरशीच्या लढतीत विजय

मुंबई, ८ मार्च:  सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज कर्नाड, आशीष गोरे आणि झेनुल अर्सिवालाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवले. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत ऋतुराजने नौजद मुन्शीचा ३-२(५२-७१, ६७-३१, ६६-२८, ४४-५९, ५५-१७) असा पराभव केला. अन्य सामन्यात, आशीषने प्रदीप जाधववर ३-२ (५७-५२, १३-५३, ६१-४४, १५-५8, ४8-४४) त्याच फरकाने विजय मिळवला. झेनुल अर्सिवालाने प्रसाद वानखेडकरला ३-१ असे हरविले.

निकाल (पहिली फेरी): झेनुल अर्सिवाला विजयी वि. प्रसाद वानखेडकर ३-१ (२२-६४, ५४-३६. ५२-११, ६१-११); इमदाद खान विजयी वि. मिथुन मर्चंट ३-० (५७-१३, ५०-४०, ५३-९); एजाज मर्चंट विजयी वि. मनन शाह ३-१ (५२-३९, ६६-१, ३२-७४, ७२-३४).

जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यात ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात

दिवा: जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि ओम साई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी शक्ती सन्मान’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिव्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यातील महिला वकील, सीए, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाजसेविका, शाळा व्यवस्थापिका, कीर्तनकार तसेच बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला रोटरी ३१४२ जिल्हा सचिव विनेश नायर आणि नगरसेविका साक्षी मढवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रोटरीच्या अध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, सचिव, इतर सदस्यांच्या हस्ते महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून ‘दुसरी मी सावित्री बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. सुप्रसिद्ध कलावंत साधना चौधरी- भरे यांनी सादर केलेल्या या नाटकाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम दिवा (पूर्व) येथील एस.एम.जी. विद्यामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि सचिव स्वप्नील गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *