10 Sep Bitambatmi All pages

Open Book

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी
अशोक गायकवाड*
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. लोकभवन येथे झालेल्या समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्या. त्रिपाठी यांचे अभिनंदन केले. समारंभाच्या प्रारंभी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी न्या. त्रिपाठी यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना आणि अधिपत्र वाचून दाखविले. राष्ट्रगान, वंदे मातरम् आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शपथविधीनंतर वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपद रिक्त झाले होते. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. शपथविधी सोहळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, तसेच मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांचीही यावेळी उपस्थिती होती.

मुंबई, ८ सप्टेंबर: आरसीएफ स्पोर्ट्स क्लबतर्फे मुंबईत होणाऱ्या स्थानिक स्पर्धांमध्ये आरसीएफ व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच्या संघासाठी खेळाडूंच्या निवडचाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचण्या चेंबूर येथीलआरसीएफ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर शुक्रवार, ११ सप्टेंबर आणि शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घेतल्या जातील. १८ वर्षांवरील खेळाडू या चाचण्यांसाठी पात्र आहेत. निवड चाचण्यांदरम्यान पडताळणीसाठी खेळाडूंनी आपली क्रीडा प्रमाणपत्रे आणि कामगिरीचे अहवाल (मूळ आणि छायाप्रत) सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी खेळाच्या गणवेशात मैदानावर उपस्थित राहावे. खेळाडूंनी अधिक माहितीसाठी सुनील कुलकर्णी (मोबाईल: ७९७७०६७५६४) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा पुढाकार
दिवा : दिव्यातील मराठा वॉरिअर्स गडकिल्ले संवर्धक, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, वाड्या- वस्त्या तसेच शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणे तसेच क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
उपक्रमादरम्यान अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, कॅमलिन ड्रॉईंग बुक यांसह लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण व्हावे आणि त्यांच्या शारीरिक विकासाला चालना मिळावी, यासाठी क्रिकेट बॅट-बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन किट, कॅरम तसेच स्किपिंग रोप आदी क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात आले. उपक्रमाच्या नियोजनानुसार रविवारी सुतारवाडी, वाकी आदिवासी वाडी, कामत आदिवासी वाडी आणि बाईत आदिवासी वाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर सोमवारी पातरशेत आदिवासी वाडी, स्थानिक जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमासाठी कै. एकनाथ भगत तसेच ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष अजित भगत यांचे विशेष सहकार्य लाभले.
संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल दत्ताराम खैर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपाध्यक्ष रोहित जाधव, कार्याध्यक्ष नितीन शिवगण, सेक्रेटरी अमित गुरव, उपसेक्रेटरी रोहित खैर, मीडिया प्रमुख अभिजित गावडे व सुमित गावडे, संपर्कप्रमुख रवींद्र शिंदे तसेच सचिन गावडे, कार्तिक गोसावी, कलाप्पा चौगुले, यश खैर, रोहन खैर आणि रोशन खैर आदी सदस्य उपस्थित होते.
उपक्रमावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, स्थानिक ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडेसाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला तसेच सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा हा तीन दिवसीय सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सर्व नियोजित कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी परतीचा प्रवास केला.

 विवेक पंडित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
योगेश चांदेकर
पालघर :  जिल्हा परिषद शाळांची पुन्हा पुन्हा पाहणी आणि माहिती संकलन करण्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षक व मूलभूत सुविधांच्या त्रुटी निश्चित करून त्या कालबद्ध पद्धतीने दूर करा, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी राज्य शासनाकडे केली आहे. शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचे रूपांतर आता ‘त्रुटी निर्मूलन अभियानात’ करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण आयुक्तालयाने ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळांच्या पाहणीचे निर्देश दिले आहेत. मात्र UDISE व शिक्षण विभागाकडे शाळानिहाय माहिती आधीच उपलब्ध असताना पुन्हा सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल पंडित यांनी प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे. “शिक्षक नाहीत, वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, पाणी-स्वच्छतागृह-वीज नाही, हे पुन्हा शोधण्यात वेळ घालवू नका. कोणत्या शाळेत काय कमी आहे, ते कधी पूर्ण करणार आणि त्यासाठी कोणता अधिकारी जबाबदार आहे, हे निश्चित करा,” अशी मागणी त्यांनी केली.
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची School-wise Deficiency List तयार करून प्रत्येक त्रुटीसमोर जबाबदार अधिकारी, आवश्यक निधी आणि काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख नमूद करावी. दर १५ दिवसांनी बैठकींची संख्या न मोजता किती त्रुटी होत्या, किती दूर झाल्या आणि किती प्रलंबित आहेत, याचा सार्वजनिक आढावा घ्यावा, असे पंडित यांनी सुचविले आहे. पालघर हा विस्तारित आकांक्षित जिल्हा असल्याने तेथे हे अभियान ‘मॉडेल परिणामाधारित अभियान’ म्हणून राबविण्याची मागणीही त्यांनी केली. “किती शाळांना भेटी दिल्या, हा अभियानाच्या यशाचा निकष नसावा; अधिकारी गेल्यानंतर किती शाळांमध्ये प्रत्यक्ष बदल झाला, हेच शासनाने मोजावे,” असे पंडित यांनी स्पष्ट केले.

कल्याण : महावितरण कडून वारंवार आवाहन करूनही चुकीच्या मार्गाने वीज वापरणाऱ्या मांडा, टिटवाळा परिसरातील २० वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण कडून रितसर मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मांडा, टिटवाळा परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासणी केली. तपासणी दरम्यान बहुतांश वीज ग्राहक चोरी करुन वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. महावितरण कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पांडुरंग अंगम, प्रविण जा़धव, अमीना बी अख्तर, आरती शर्मा, रेणू शुक्ला, मोहम्मद मलिक अजगर अली, राबिया अन्सारी, रोषन कलसुकर, सुमित्रा भगत, मोहम्मद अयुब, अल्फिया डेव्हलपर, ए.एस.बाबा इलेक्ट्रिकल, जगदीश धुमाळ, सुनील शिंदे, विनायक पाटील, सुनील खरात, जयश्री जाधव, किशोर राठोड, आकाश पाल या वीज ग्राहकांनी महावितरणची ८७८३ युनिटची वीज चोरून वापरली अशी फिर्याद महावितरण कडून देण्यात आली आहे. मुरबाड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 शेवगा रोपाचे वृक्षारोपण
अनिल ठाणेकर
ठाणे : बालक, किशोरी, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा उंचावण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र, बांधणेपाडा येथे ९ सप्टेंबर रोजी पोषण अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यानिमित्त पोषण दिंडी, पोषण प्रतिज्ञा, बालस्नेही गाव शपथ आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोषण दिंडीमध्ये अंगणवाडीतील बालके, माता, महिला आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संतुलित आहार, बालकांचे आरोग्य, मातांचे पोषण आणि कुपोषण निर्मूलनाबाबत जनजागृती करणारे संदेश देत ही दिंडी काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बालकांना सकस व पौष्टिक आहार देणे, स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी अंगीकारणे आणि कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची पोषण प्रतिज्ञा घेतली.
गावातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरण मिळावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि गाव बालस्नेही करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, यासाठी ‘बालस्नेही गाव शपथ’ घेण्यात आली. पोषण आणि पर्यावरणाचा समन्वय साधत यावेळी शेवगा रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. शेवग्याच्या पानांमध्ये विविध पोषक घटक असल्याने पोषणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात मातृत्व वंदन योजना तसेच मातांच्या आरोग्याशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती माता व महिलांना देण्यात आली. पात्र लाभार्थींनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, तसेच गर्भवती महिला व स्तनदा मातांना स्वतःच्या आरोग्यासोबत बालकाच्या आरोग्य व पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
बालकांच्या आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांशी नियमित समन्वय साधावा, असेही सांगण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका उषा लांडगे यांच्यासह सर्व पर्यवेक्षिका, मदतनीस, प्रथम संस्थेचे समन्वयक, पालक, माता, महिला, ग्रामस्थ आणि अंगणवाडीतील बालके उपस्थित होती. पोषण अभियानाच्या शुभारंभाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकसहभागातून पोषण चळवळीला मिळणारे बळ अधोरेखित करणारा ठरला.

३४ पेट्रोल कार्डचे वितरण
अनिल ठाणेकर
ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत प्राप्त झालेल्या ३४ पेट्रोल कार्डचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते ८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका सह जिल्हा मुख्यालयातील रुग्णवाहिकेसाठी ही पेट्रोल कार्ड वितरित करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या पेट्रोल कार्डच्या माध्यमातून संबंधित रुग्णवाहिकांना एचपी पेट्रोल पंपावर कार्डचा वापर करून आवश्यक इंधन भरता येणार आहे. पेट्रोल कार्डच्या खात्यामध्ये दररोज नियोजित रक्कम जमा केली जाणार असल्याने रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेतील अडचणी दूर होऊन इंधन उपलब्धतेत सातत्य राहण्यास मदत होणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अन्य शासकीय आरोग्य संस्थांमध्ये तातडीने स्थलांतरित करण्यासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होऊन रुग्णवाहिका सेवा अधिक कार्यक्षम आणि अखंडितपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रुग्णवाहिकांसाठी पेट्रोल कार्डची सुविधा उपलब्ध झाल्याने या सेवेला अधिक बळ मिळणार आहे.

मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, समता विद्या मंदिर-साकीनाका व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात साकीनाका-अंधेरी परिसरातील ५४ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. याप्रसंगी समता विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका भारती पवळे, क्रीडा शिक्षक साधुराम व सुनील खोपकर, शिक्षिका मीनाक्षी तिवारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय एकेरी कॅरम स्पर्धा २६ सप्टेंबरपासून होणार असल्यामुळे शालेय मुलामुलींना कॅरम खेळाच्या नियम व सरावाबाबत पूर्वतयारीचे विनाशुल्क मार्गदर्शन संयोजकांमार्फत चँम्पियन कॅरम बोर्डवर दिले जात आहे. साकीनाका-अंधेरी तसेच चेंबूर परिसरातील शालेय खेळाडूंचा प्रतिसाद लक्षात घेऊन संयोजकांनी उदयोन्मुख शालेय खेळाडूंचे २३ सप्टेंबर रोजी विनाशुल्क प्रगत मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
अनिल ठाणेकर
ठाणे : गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, कचरा संकलन, ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार वृक्षांच्या फांद्यांची छाटणी यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण संवर्धन, वायू प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता व्यवस्थापन आणि महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यापक कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त, सहायक आयुक्त, उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना विनाविलंब परवानगी देण्यासोबतच शहरातील सर्व रस्ते स्वच्छ राहतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सणांच्या काळात विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले. बांधकामस्थळी टायर वॉशिंगची सुविधा, नियमित पाणी फवारणी, हिरव्या जाळ्यांचा वापर तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची सातत्याने तपासणी करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाला देण्यात आल्या.
बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तातडीने विल्हेवाट लावावी, तसेच प्रभागांमध्ये घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले. स्वच्छता अभियानात स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला.
वृक्ष प्राधिकरण, उद्यान आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे काम करून वृक्षसंवर्धन, हरित क्षेत्रवाढ आणि खुल्या जागांचे संरक्षण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, असे आयुक्तांनी सांगितले. घोडबंदर रोडवरील मेट्रो प्रकल्पाच्या कामातून निर्माण होणारा डेब्रीज आणि वापरात नसलेली यंत्रसामग्री रस्त्यालगत पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी विकासकांवर नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, एसआरए, एमआयडीसी आदी महसुली स्रोतांमधून उत्पन्न वाढविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *