ठाणे : शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री आनंद भारती समाजाच्या वतीने यंदाही संस्थेच्या सभागृहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सचिव संदिप कोळी यांनी दिली. संदीप कोळी म्हणाले संस्थेच्या गणेशोत्सवाचे यंदा ११६ वे वर्ष आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात ७५वा नाखवा पारितोषिक वितरण समारंभाचा समावेश आहे. या शैक्षणिक कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ॲड अभय श्रीनिवास ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर हे या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष असतील. याशिवाय प्रश्नमंजुषा, निबंध,चित्रकला, स्मरणशक्ती, वत्कृत्व, महिलांसाठी पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होईल. संस्थेचे जेष्ठ रंगावलीकार सुभाष शाक्यवार हे नशा – व्यसनमुक्तीवर आधारित सजावट साकारणार आहेत.
0000000
0000000
मुंबई – आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ.शिरोडकर हायस्कूल व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात परेल परिसरातील ६८ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी, डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा माने, क्रीडा शिक्षक सत्यविजय डामरे, राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांनी सर्व सहभागी शालेय खेळाडूंना कॅरमचा प्राथमिक सराव, बसण्याची पध्दत, स्ट्रायकर सोडण्या संदर्भात बोटांच्या पकडी, ब्रेक करण्याची कला, कॅरमच्या पृष्ठभागावरील निशाणांचा होणारा उपयोग, एकाग्रता निर्माण करण्यासाठी उपयुक्त असलेले प्राणायाम, खेळण्यापूर्वी करावे लागणारे हातांचे वॉर्मअप, प्रमुख नियम आदीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक सराव देऊन त्यामधील निवडक उदयोन्मुख शालेय खेळाडूंना नियमित सरावाबाबत महत्वाचे कानमंत्र दिले.
पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात दमदार कामगिरी
गोवा : गोव्यात झालेल्या तेराव्या पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राची १५ वर्षीय नेमबाज स्वामीज्ञा विलास शेडगे हिने उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदक पटकावले. स्मॉल बोअर स्पोर्ट रायफल ५० मीटर प्रोन या प्रकारात वरिष्ठ, युवा आणि कनिष्ठ अशा तिन्ही गटांत स्वामीज्ञाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
स्वामीज्ञाच्या या यशात तिचे प्रशिक्षक निलेश अभंग यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. सातत्यपूर्ण सराव, अचूक नेमबाजी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर तिने पश्चिम विभागीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील पात्रता आणि सहभागासाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. पश्चिम विभागांतर्गत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेशातील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या स्पर्धेचे आयोजन गोव्यात करण्यात आले. स्वामीज्ञाच्या तिहेरी सुवर्णकामगिरीमुळे तिच्या पुढील राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीला मोठे बळ मिळाले असून, तिच्या या यशाचे नेमबाजी क्षेत्रातून कौतुक होत आहे.
नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महासभेत निर्णय
ठाणे : महापालिकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर, महापालिकेच्या सचिवपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी फिल्डींग लावलेल्या बड्या अधिकाऱ्याची `महापालिका वापसी’ लांबणीवर पडली आहे. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महापालिका सचिव पदावरील उमेदवाराची निवड ही महापौरांच्या दालनातील बैठकीनंतर केली जाईल. तोपर्यंत या पदावर कोणत्याही उमेदवाराची निवड करू नये, असा निर्णय आजच्या महासभेत घेण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या सचिव विभागाकडील काम कार्यक्षमतेने होण्यासाठी वर्ग १ मधून निवृत्त झालेल्या अनुभवी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी महापालिका सचिव (कराराधिष्ठित) पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी ४ सप्टेंबर रोजी `वॉक इन’ मुलाखती पार पडल्या होत्या. त्या एका विशिष्ट अधिकाऱ्याला डोळ्यासमोर होत्या, असा आरोप नारायण पवार यांनी केला. या जाहिरातीला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला. महापालिका अधिनियमानुसार, सचिव पदावरील अधिकाऱ्याची कराराने नियुक्ती करता येत नसल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी मांडला. त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिका सचिवपदाची करार पद्धतीने नियुक्ती करता येत नसल्याचे मान्य केले. मात्र, विवक्षित म्हणजे काही विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करता येत असल्याचे गोदेपुरे यांनी सांगितले. त्यावर महापालिका सचिव पदासाठी जाहिरात का काढली, असा सवाल नारायण पवार यांनी केला. त्यावर महापालिका प्रशासनाला ठोस उत्तर देता आले नाही. त्यानंतर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी तूर्त महापालिका सचिव पदावर नियुक्ती करू नये. या संदर्भात महापौरांच्या दालनात बैठक झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत दिरंगाई होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक अतिरिक्त आयुक्त हा शासन सेवेतील, तर दुसरा महापालिका सेवेतील अशी तरतूद आहे. मात्र, आता दोन्ही पदांवर शासन सेवेतील अधिकारी आहेत. सहायक आयुक्तांच्या १८ पदांपैकी निम्मी पदे पालिकेतील अधिकाऱ्यांना द्यायला हवीत. मात्र, काही वर्षांपासून पदोन्नती रखडविल्या गेल्या. वेळीच पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात नसल्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले.
महापालिकेकडून ९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तीन हात नाका ते माजिवडा नाक्यापर्यंतचा सेवा रस्ता कंत्राटदारांकडून खोदण्यात आला. तर अनेक भागात कंत्राटदारांनी रस्ते खोदल्यानंतर त्यांच्याकडून शुल्क घेतलेले नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या कंपन्यांना महापालिका प्रशासनाकडून अभय दिले जात आहे, असा आरोप नारायण पवार यांनी केला.
0000
विनोदाच्या रंगात रंगलेलं रहस्यमय नाटक!
‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’
मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या प्रवाहाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने समृद्ध करणारे दिग्दर्शक आणि कलाकार लाभले आहेत. त्यामुळे विनोदी नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक रंगमंदिरातून मनमुराद हसून, हलक्याफुलक्या मनाने बाहेर पडतो. विनोदी नाटकाचे दोन हुकमी एक्के—दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेते भाऊ कदम यांचं नवं कोरं नाटक ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ सध्या रंगभूमीवर दाखल झालं आहे.
नाटकाचं नाव ऐकल्यावर प्रेम, लग्न आणि विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणारी कथा असेल,असा अंदाज प्रेक्षक बांधू शकतो. मात्र, नाटकाचं शीर्षक ज्या दिशेने घेऊन जातं, त्यापेक्षा प्रत्यक्ष रंगमंचावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. विनोदाला रहस्याची जोड देत कथा पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.मोहन, त्याची पत्नी स्वाती आणि मुलगी आदिती असं हे कुटुंब. काळाच्या ओघात मोहनच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. मात्र, आपल्या मुलीला सांभाळत तो एकटाच आयुष्याचा प्रवास सुरू ठेवतो.
वडिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा, यासाठी आदिती एक निर्णय घेते. या निर्णया मुळे मोहनच्या आयुष्यातील भूतकाळाचा वर्तमानाशी काय संबंध आहे? आदितीचा निर्णय पुढे काय वळण घेतो? आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र नाटक पाहतानाच मिळतात.विशेष म्हणजे कथेत जाणवणारी एक अदृश्य उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत राहते. तिचं गूढ उलगडणं ही नाटकाची महत्त्वाची रंगत आहे. त्यामुळे कथानकाचा पुढचा भाग सांगून नाटकाची मजा घालवण्यापेक्षा हा रहस्यमय विनोदी नाट्यप्रवास रंगमंचावर अनुभवणंच अधिक योग्य!
संतोष पवार यांनी कौटुंबिक नात्यांमधील भावनिक पदर आणि विनोदाची लय यांचा सुरेख मेळ साधला आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवणं हे दिग्दर्शनाचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान पवार यांनी प्रभावीपणे पेललं आहे.प्रत्येक कलाकारानं कडून उत्तम अभिनय करून घेतला आहे
भाऊ कदम म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर विनोदाची एक वेगळीच शैली उभी राहते. ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ या नाटकातही त्यांच्या अभिनयाची हीच सहजता प्रकर्षाने जाणवते. मोहन ही व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी केवळ विनोदावर भर न देता त्याच्या मनातील भावनिक कोंडी, एकटेपणा आणि नात्यांमधील गुंतागुंतही प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांची संवादफेक, प्रसंगानुरूप देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव यामुळे विनोदी प्रसंग अधिक खुलतात. भाऊ कदम यांच्या अभिनयातील सहजपणा ही या प्रयोगाची मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या रंगमंचावरील उपस्थितीने प्रसंगाला वेगळीच रंगत येते आणि प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद निर्माण होतो.मैथिली वारंग, सुजाता किरण, पूनम सरोदे परब आणि साकार देसाई यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत नाटकाच्या एकूण सादरीकरणाला पूरक साथ दिली आहे.
लेखक स्वप्नील बारसकर यांनी विषयाची मांडणी हलक्याफुलक्या शैलीत केली आहे. संवादांमधून विनोद निर्माण करतानाच नात्यांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न दिसून येतो. विशेष म्हणजे विनोद आणि रहस्य यांचा समतोल राखत कथा पुढे नेण्यात लेखनाची भूमिका महत्त्वाची ठरते. नाटकाची तांत्रिक बाजूही कथेला पूरक ठरते. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा योग्य वापर करण्यात आला आहे. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती होत असल्याने नाटकाच्या सादरीकरणाला उठाव मिळतो.
पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ हे नावापेक्षा वेगळा अनुभव देणारं, हलक्याफुलक्या विनोदातून प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहणारं मनोरंजनप्रधान रहस्यमय नाटक आहे. गंभीर विषयाचा बोजडपणा न आणता विनोद आणि रहस्य यांची सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न या प्रयोगातून केला आहे.
संपदा सावंत
अर्जुन बिराजदारचा तिहेरी मुकुट
बिराजदार बंधूंचा दुहेरी मुकुट, अकॅडमीला ५ सुवर्णांसह १ कांस्यपदक
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे राबविण्यात येणाऱ्या ‘सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजने’अंतर्गत प्रगत प्रशिक्षण घेणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी बिलासपूर, छत्तीसगड येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य वैयक्तिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत महाराष्ट्रासह ठाण्याचा झेंडा उंचावला. अकॅडमीच्या खेळाडूंनी तब्बल पाच सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांतील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी युवा खेळाडू अर्जुन तानाजी बिराजदार याने केली. त्याने एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावत तिहेरी मुकुट मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. अर्जुन आणि आर्यन तानाजी बिराजदार या बंधूंनीही दोन गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.
वरिष्ठ पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अर्जुन आणि आर्यन बिराजदार जोडीने नैवेद्य तोंडे व रुद्र प्रताप ठाकूर जोडीवर मात करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटातही अव्वल मानांकित अर्जुन-आर्यन जोडीने याच प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव करत दुसरे सुवर्णपदक मिळवले. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरीत अर्जुन तानाजी बिराजदार याने ठाण्याच्या सिया वायदंडे हिच्यासोबत खेळताना अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सार्थक कांत थॉमस व इशिका पोद्दार जोडीचा पराभव केला. त्यामुळे अर्जुनच्या नावावर तीन सुवर्णपदके जमा झाली.
वरिष्ठ मिश्र दुहेरीत द्वितीय मानांकित सर्वेश महेश यादव याने नेहल गोसावीच्या साथीने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सौरभ साहू व हिरल चौहान जोडीवर मात करत सुवर्णपदक पटकावले. वरिष्ठ महिला दुहेरीत अव्वल मानांकित अनघा करंदीकर हिने नेहल गोसावीच्या साथीने द्वितीय मानांकित आशिता दुबे व स्वाती सोलंकी जोडीचा पराभव करत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. वरिष्ठ पुरुष एकेरीत सर्वेश महेश यादव याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत कांस्यपदक मिळवले. त्यामुळे अकॅडमीच्या खात्यात पाच सुवर्ण आणि एक कांस्य अशी पदकांची दमदार कमाई झाली.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपआयुक्त मीनल पालांडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक आणि संपूर्ण प्रशिक्षक चमूचे अभिनंदन केले. ठाणे महानगरपालिकेकडून खेळाडूंना मिळणाऱ्या दर्जेदार क्रीडा सुविधा, अद्ययावत पायाभूत सोयी आणि प्रशासकीय पाठबळामुळे ठाण्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि फूलचंद पासी हे खेळाडूंच्या शारीरिक, तांत्रिक आणि मानसिक तयारीसाठी मेहनत घेत आहेत. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची कठोर मेहनत यामुळेच हे यश मिळाले असून, अकॅडमीच्या या कामगिरीचे ठाणे शहर आणि क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने
सात देश, पाच वयोगट आणि युवा क्रिकेटपटूंसाठी जागतिक व्यासपीठ
प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका : जगभरातील युवा इनडोअर क्रिकेटपटूंच्या कौशल्याची खरी कसोटी ठरणारी वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशनची ज्युनिअर वर्ल्ड सिरीज २०२६ येत्या २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथील यू-प्रो ॲटरबरी ॲक्शन स्पोर्ट्स एरिना येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) असे सात देश या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने युवा इनडोअर क्रिकेटचा हा जागतिक महाकुंभ ठरणार आहे.
वर्ल्ड इनडोअर क्रिकेट फेडरेशन (WICF) मान्यतेने इनडोअर क्रिकेट साऊथ आफ्रिका (ICSA) यांच्या आयोजनातून ही स्पर्धा होत आहे. इनडोअर क्रिकेटमधील बलाढ्य ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या मजबूत संघांविरुद्ध खेळाडूंना खेळण्याचा अनुभव मिळणार आहे. भारत, श्रीलंका आणि यूएईचा सहभाग असल्याने प्रत्येक सामना कौशल्य, वेग, रणनीती आणि मानसिक ताकदीची परीक्षा घेणारा ठरणार आहे. जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी सातही देशांचे युवा खेळाडू सज्ज झाले आहेत. या जागतिक स्पर्धेत पाच वयोगटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. १३ वर्षांखालील मुलांचा, १५ वर्षांखालील मुलांचा व मुलींचा, तसेच १७ वर्षांखालील मुलांचा व मुलींचा समावेश आहे. त्यामुळे विविध वयोगटातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेची प्रशासकीय आणि कार्यकारी राजधानी प्रिटोरिया या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यू-प्रो ॲटरबरी ॲक्शन स्पोर्ट्स एरिना येथे सात देशांतील युवा खेळाडू आमनेसामने येतील. आपल्या देशाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हा अनुभव अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण असणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणे ही निश्चितच मोठी कामगिरी आहे; मात्र खरी परीक्षा प्रिटोरियाच्या मैदानावर होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्य, वेगवान निर्णयक्षमता, सांघिक खेळ, दबाव हाताळण्याची क्षमता आणि निर्णायक क्षणी योग्य खेळ करण्याचे कौशल्य या सर्व बाबींची कसोटी लागणार आहे.
सात देश, पाच वयोगट आणि आठ दिवसांचा जागतिक इनडोअर क्रिकेटचा थरार अशी या स्पर्धेची भव्यता आहे. मात्र या स्पर्धेचे खरे महत्त्व पदक किंवा विजेतेपदापलीकडे आहे. युवा खेळाडूंच्या भविष्यातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा पाया मजबूत करण्याची ही मोठी संधी आहे. २६ सप्टेंबरपासून प्रिटोरियात भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे प्रशिक्षक, निवडकर्ते आणि इनडोअर क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक सामना त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. देशासाठी खेळताना मिळणारा हा अनुभव भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना अधिक सक्षम करणार आहे.
२६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रिटोरिया येथे इनडोअर क्रिकेटच्या युवा विश्वातील सर्वोत्तम प्रतिभेचा सामना पाहायला मिळणार आहे. जागतिक मंच सज्ज आहे, सात देश मैदानात उतरणार आहेत आणि युवा खेळाडूंच्या स्वप्नांना आता प्रत्यक्ष कामगिरीची जोड द्यायची आहे. प्रिटोरियातील ही स्पर्धा अनेक युवा खेळाडूंसाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पहिली मोठी ओळख ठरण्याची शक्यता आहे असे भारतीय आयआयएसएफचे अध्यक्ष सेट्रिक जो, सेक्रेटरी प्रसन्ना कुमार, चेअरमन अजय नाईक व माजी सेक्रेटरी मिलिंद पुंजा यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सवालाही संधी; अर्जाची अंतिम मुदत १६ व २० सप्टेंबर
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त आणि सामाजिक प्रबोधनाची जोड देण्यासाठी यंदा ‘नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. महापौर श्रीमती सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीने पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेला व्यापक स्वरूप देत यंदा घरगुती गणेशोत्सवाचाही समावेश केला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.
गणेशोत्सव पर्यावरणाचा सन्मान राखून साजरा करण्याचे आवाहन महापौर श्रीमती सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. त्यानुसार शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, मूर्तीची उंची सहा फुटांपर्यंत मर्यादित ठेवणे, विसर्जनासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या १७० कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करणे, सजावटीमध्ये प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक साहित्याचा वापर करणे, तसेच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण जागृती, संस्कृती संवर्धन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ, उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव (५ दिवस), उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव (१० दिवस) आणि पर्यावरणपूरक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशा विविध प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय उत्कृष्ट गणेशमूर्ती, उत्कृष्ट देखावा, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट पारंपरिक गणेशोत्सव, उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पना, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्कृष्ट सामाजिक संदेश अशा विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय पुरस्कार दिले जाणार आहेत. एकूण चार लाख २७ हजार रुपयांच्या पुरस्कारांसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.nmmcganesha.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव (५ दिवस) या श्रेणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर असून, इतर सर्व पुरस्कार श्रेणींसाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
नवी मुंबईतील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि सर्व समिती सदस्यांनी केले आहे.
000000
६५ किलो फ्रीस्टाइल गटात करणार भारताचे प्रतिनिधित्व; ‘शिवसेना विथ जेन झी’ उपक्रमातून सत्कार
कल्याण : कल्याण पूर्व, नांदिवली येथील जय बजरंग कुस्ती आखाड्याची युवा कुस्तीपटू वैष्णवी पाटील हिची अमेरिकेतील लास वेगास येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ६५ किलो फ्रीस्टाइल गटातून वैष्णवी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, ही स्पर्धा १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणार आहे.
वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण व उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘शिवसेना विथ जेन झी’ उपक्रमाच्या माध्यमातून तिचा सत्कार करण्यात आला. चिंचपाडा शिवसेना विभागाच्या वतीने शिवसैनिक दुर्गेश बागुल आणि संतोष माने यांनी वैष्णवीचा गौरव करून आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वैष्णवीच्या यशामागे कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, हाडवैद्य वसंत साळुंखे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रज्वलदीप ढोणे, नांदोली गावचे माजी सरपंच विलास ढोणे, शिवसैनिक श्वेता ढोणे, समाजसेवक पंकज ढोणे आणि गणेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वैष्णवीने मिळवलेले हे यश कल्याण पूर्वसह संपूर्ण कल्याण-डोंबिवलीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. लास वेगास येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना वैष्णवीने देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावावा, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
00000
