ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधीना बोलू दिले जात नसल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे, त्यांच्या विरोधात ११८ खासदारांना अविश्वासाच्या ठरावावर स्वाक्षरी केली आहे. लोकसभेच्या अध्यंक्षाविरोधात अविश्वास ठराव आणण्याची आजवरची ही चौथी वेळ आहे.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली या प्रस्तावाची सूचना सचिवालयात सादर करण्यात आली. या प्रस्तावात तृणमूल काँग्रेस विरोधकांसोबत नाही.
आतापर्यंत असे तीन अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. पहिला १८ डिसेंबर १९५४ रोजी तत्कालीन सभापती जी.व्ही. मावळणकर यांच्याविरुद्ध होता, हा प्रस्ताव चर्चेनंतर फेटाळण्यात आला. दुसरा २४ नोव्हेंबर १९६६ रोजी सभापती हुकम सिंह यांच्याविरुद्ध होता. ५० पेक्षा कमी सदस्यांचा पाठिंबा असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तिसरा १५ एप्रिल १९८७ रोजी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष बलराम झाखर यांच्याविरुद्ध होता. हा प्रस्तावही चर्चेनंतर फेटाळण्यात आला.

चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या मशालीवर भाजपचे कमळ फुलले
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर सनसनाटी झाला. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही असे सकाळच्या पत्रकार परिषदेत ठासून सांगणाऱ्या संजय राऊतांचे शब्द हेवेत विरत नाही तोच ठाकरेंच्या सेनेने चंद्रपुरमध्ये भाजपाचा महापौर बनवित उपमहापौर पदरात पाडून घेतले. अखेर ठाकरेंच्या मशालीवरच भाजपाचे कमळ फुलल्याचे मिम्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव विजयी झाले आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय. तर काँग्रेस हायकमांडकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे.
अजितदादांच्या ३ महत्वपूर्ण निर्णयांवर
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
मुंबई: अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी घेतलेल्या ३ महत्वपुर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत सुरवातीला आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्य सचिव यांनी शोकप्रस्ताव वाचला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारीक ओळख करुन देत स्वागत केलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अजितदादांनी सांगितलेल्या ३ महत्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलं. त्यात बारामती क्रिडा संकुलाला ७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच वालचंदनगर-रत्नापूर एमआयडीसी साठी १००० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निधनापुर्वी काही दिवसांपासून अजितदादांनी महसूलमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा घेतला होता.
दरम्यान, यापुढे पक्षकारांना इलेक्ट्रॉनिक मेलव्दारे नोटीस बजाविणे आता कायदेशीर असणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहियेतील कलमांत सुधारणा करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आला आहे. महसूल सुनावणीला असलेली राज्यातील जमीन विषयक विविध प्रकरणे प्रकरणे जलद गतीने निकाली काढणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम २३० नुसार इलेक्ट्रॉनिक मेलव्दारे नोटीस बजावण्याच्या पद्धतीला कायदेशीर करण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुलाच्या लग्नाला यायचं हं !
नवी दिल्ली : भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि त्याची होणारी पत्नी सानिया चांढोक यांच्या लग्नाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीचे छायाचित्र सचिन तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान अर्जुन तेंडुलकर, भावी पत्नी सायना चंडोक, सचिन यांची कन्या सारा तेंडुलकर तसेच पत्नी अंजली तेंडुलकर उपस्थित होत्या.
दरम्यान, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांढोक यांच्या विवाहसोहळ्यांना ३ मार्च २०२६ पासून सुरुवात होणार असून, ५ मार्च २०२६ रोजी मुख्य विवाहविधी पार पडणार आहे. याआधी ऑगस्ट २०२५ मध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाला होता.
अर्जुन तेंडुलकर हा सध्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंटसकडून खेळत आहे. लखनऊने मुंबई इंडियन्सकडून त्याला घेतले आहे. पुढील हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना अर्जुनवर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाचे लक्ष राहणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुनने मुंबईकडून सुरुवात केल्यानंतर तो गोवा संघासाठी महत्त्वाचा गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. उंचकाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीत उपयुक्त फलंदाज असलेल्या अर्जुनने २०२२ मध्ये गोव्याकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करताना शतक झळकावले होते. विशेष म्हणजे, वडील सचिन तेंडुलकर यांनी जसा पहिल्याच प्रथमश्रेणी सामन्यात शतकाचा पराक्रम केला होता, त्याचाच पुनरावृत्ती अर्जुनने केली होती. तर सानिया चांढोक ही यशस्वी उद्योजिका असून, ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात आहे.

अजित पवारांचा घातच झाला ?
० रोहीत पवारांनी केले अपघाताचे पोस्टमार्टेम
० अजित पवारांना विमानाने जाण्यासाठी भाग पाडणारे ते दोन नेते कोण ?
० दादा गेले काही दिवस प्लास्टिक एवेजी काचेच्या बाटलीतून पाणी का पित होते ? दादांना घातपाताचा संशय आला होता का ?
० शेवटच्या क्षणी पायलट का बदलले गेले ?
० इस्त्रालयच्या मोसाद असे अपघात घडवण्यात तरबेज
० पायलट आत्मघाती मिशनवर होता का ?
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच होता असा संशय यायला पुरेसा वाव असलेली स्फोटक माहिती त्यांचे पुतणे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातात निधन झाले होते. या घटनेच्या १३ दिवसानंतर आज रोहित पवारांनी आज अनेक पुरावेच मीडियासमोर सादर केले. दरम्यान अजित पवारांचे काका आणि रोहीत पवारांचे आजोबा शरद पवारांनी मात्र अपघात झाल्यानंतर लगोलग हा घात नव्हे तर अपघातच होता अशी जाहिर प्रतिक्रीया दिली होती. त्याबाबत आज रोहीत पवारांना छेडले असता शरद पवार साहेबांनी अपघातानंतर सहा तासाने ती प्रतिक्रीया दिली होती, मी १३ दिवसानंतर अभ्यासाने बोलत आहे. अनेक तथ्य मला या दिवसात सापडली. शरद पवारांना अजून मी हे प्रेझेंटेशन दिलेले नाही. पण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न या अपघातावर उपस्थित केले आहेत. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी बदलला की कुणाकडून जाणीवपुर्वक बदलवला गेला का ? हे पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचं बंद केलं होतं अशी खळबळजनक माहिती रोहित पवारांनी दिली. त्याचसोबत विमान प्रवास किंवा हेलिकॉप्टर प्रवास करताना खात्रीच्या व्यक्तीचे हेलिकॉप्टर वापर असा सल्ला दादांनी आपल्याला दिल्याची आठवण रोहित पवारांनी सांगितली.
इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर संघटनेकडे अशाप्रकारचे अपघात करण्याची क्षमता असल्याचे रोहीत पवार म्हणाले.
विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही? असे काही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
याची उत्तरे मिळायलाच हवी…
१.अजितदादा बारामतीला कारने जाणार होते. पण एका नेत्याच्या सांगण्यावरून फाईलवर सही करण्यासाठी दादा थांबले. त्याला उशीर झाला. तसेच त्यांच्या पक्षाचा एक नेता त्यांना भेटण्यासाठी उशीरा आला. उशीर झाल्यामुळे दादांनी विमानाने जायचं ठरवलं. अजितदादांचा प्लॅन कुणी बदलवला का?
२. दादा ज्या विमानातून जाणार होते त्या विमानाचा पायलट आणि को पायलट, दोघेही ऐनवेळी का बदलवण्यात आले?
३. दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही?
४. विमान खाली येताना एका बाजूला कलल्याचं दिसलं, त्यामागे कारण काय?
५. विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?
६. विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?
७. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई का करण्यात आली नाही?
८. या आधी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघाताचा रिपोर्ट दाबण्यात आला आहे का?
९. सुमीत कपूर या पायलटवर दारू प्यायल्यामुळे तीन वर्षे बंदी आणली होती अशी माहिती आहे. मग अशा पायलटला व्हीआयपी लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं?

दादांची जागा कुणीच घेऊ
शकत नाही – सुनेत्रा पवार
मुंबई : दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन, अशी प्रतिक्रीया सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर दिली.
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. पण त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.

मोहनराव, जे चूक ते चूकच !
राज ठाकरे
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
जय महाराष्ट्र ।
डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुली हौशी गोल्फ स्पर्धा
पारोमिता मुखर्जी पहिल्या दिवशी आघाडीवर
मुंबई: बीपीजीसी लेडीज सेक्शन्स आयोजित सीपीपीच्या सह-प्रायोजित१४व्या डब्ल्यूआयजीए बीपीजीसी महिला खुल्या हौशी गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी एव्हीटी टूरची अव्वल क्रमांकाची गोल्फपटू बेंगळुरूची पारोमिता मुखर्जीने ७८ गुणांसह आघाडी घेतली.
बीपीजीसी येथे सुरू झालेल्या स्पर्धेत पहिल्या दिवशी देशभरातील आघाडीच्या हौशी गोल्फपटूंनी चांगली कामगिरी केली. त्यात गोल्डन डिव्हिजनमध्ये पारोमिता हिच्यासह मुंबईची उमा मेनन आणि दिल्लीची सोनाल चौधरीने छाप पाडली. ८१ गुणांसह दोघीही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
सिल्व्हर डिव्हिजनमध्ये पुण्याची पुनम कालरा ८५ गुणांसह आघाडीवर असून ज्युनियर खेळाडू वाणी मेनन (८६ गुण) तिच्या पाठोपाठ आहे.
पारोमिता पहिल्या नऊ होलमध्ये तीन पूर्ण केले. त्यानंतर आणखी पाच पूर्ण करत ७८ गुणांची कमाई केली.
ब्राँझ विभागात मुंबईच्या मुली सिंथिया संधू आणि मीनल सांडू यांनी अनुक्रमे ९६ आणि ९८ गुणांसह पहिले व दुसरे स्थान मिळवले.
तिन्ही विभागांमध्ये एकूण ९६ गोल्फपटू अव्वल पुरस्कारांसाठी रिंगणात आहेत.
ही स्पर्धा बीपीजीसी महिला विभागाच्या सततच्या वचनबद्धता आणि समर्पित प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, ज्यांचे बारकाईने नियोजन आणि खेळाबद्दलच्या आवडीमुळे महिला गोल्फपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ तयार करण्यात मदत झाली आहे.

तुर्भे विभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभाग अंतर्गत धनपाल गोकुळ पाटील व श्रीम. मालती धनपाल पाटील, घर क्र. ५१८, सेक्टर – ५, सानपाडागांव, सानपाडा, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या ९.४० मी. x ५.० मी. मोजमापाच्या क्षेत्रफळामध्ये चौथ्या मजल्याचे (G+४) आर.सी.सी. स्वरुपाचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते.
त्याअनुषंगाने, अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कारवाई करुन सदरचेअनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेलेआहे.
सदर मोहिम आयुक्त सो. यांचे आदेशान्वये अति. आयुक्त राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त, तुर्भे सागर मोरे, यांचे नियंत्रणाखाली तुर्भे विभागातील विनोद आंब्रे, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे.
तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते. वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता ४ इलेक्ट्रीक हॅमर, १० मजूर यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृत बांधकामावर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे राधिका जोशी यांचे गायन
मुंंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर हे साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२-२४३०४१५०. राधिका जोशी ही जयपूर अत्रौली घराण्याची भारतीय शास्त्रीय गायिका आहे. ती गानसरस्वती श्रीमती किशोरी आमोणकर यांच्या वरिष्ठ शिष्या पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या आहेत. तिने कोलकाता येथील संगीत संशोधन अकादमीमध्ये पद्मविभूषण श्रीमती गिरिजा देवी जी यांच्याकडून अर्धशास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला आहे. राधिका ही एक बहुमुखी गायिका आहे आणि ऑल इंडिया रेडिओने शास्त्रीय तसेच हलक्या शास्त्रीय (ठुमरी, दादरा, काजरी, होरी, इत्यादी) संगीतात ग्रेड मिळवलेल्या काही गायिकांपैकी ती एक आहे.
