विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा
अनिल ठाणेकर
ठाणे : उद्यानात लहान मुले खेळत असतात, तर वयोवृध्द नागरिक फेरफटका मारत असतात, या कारणांमुळे वर्तकनगर येथील उद्यानात ट्रान्सफोर्मर बसविण्यास नकार देणाऱ्या उपायुक्तांच्या आदेशाला अभियंत्यांनी केराची टोपली दाखवत एमएसईबीला परवानगी दिली आहे. यामुळे येथील रहिवासी संतप्त असून काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि माजी स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी `काम थांबवा’ अन्यथा २३ जून रोजी पालिका मुख्यालयावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत भीमनगर येथील बिल्डिंग नं. ५४ च्या पाठीमागे ठाणे महापालिका निगा व देखभाल करत असलेले म्हाडाचे उद्यान आहे. एमएसईबीने या उद्यानात ट्रान्सफोर्मर बसविण्याची विनंती केल्यानंतर म्हाडाने ठाणे मनपाकडे `ना हरकत पत्र’ मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला होता. उद्यानाच्या जागेत असलेले मंदिर तसेच प्रवेशद्वाराकरीता जागा उपलब्ध नसलयाने आणि ट्रन्सफोर्मर मधून स्पार्क किंवा शार्ट सर्किट सारखी दुर्घटना घडल्यास लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, या कारणांमुळे उपायुक्तांनी ना हरकत प्रमाण पत्र देऊ नये असे स्पष्ट केले होते, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत बांधकाम खात्याचे किरण भोये, संदीप गायकवाड, रणधीर राणे, सुधीर गायकवाड, शहर विकास विभागाचे रविशंकर शिंदे यांनी परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देण्याबरोबरच उद्यानही म्हाडाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. लहान मुलांच्या जीवशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांचा विक्रांत चव्हाण यांनी निषेध केला असून या अधिकाऱ्यांच्या निलंबासाठी व ट्रन्सफोर्मर बसवू नये या मागण्यांसाठी २३ जून पासून पालिका मुख्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिला आहे.
0000000000

मुकुल गरे यांचा हृदयस्पर्शी उपक्रम
कल्याण : लग्नसमारंभात आपण आनंदाने जातो. मंडप सजलेला असतो, सनईचे सूर घुमत असतात, नवदांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अशा वेळी आपण खिशातून लिफाफा काढतो आणि नव्या संसाराला हातभार म्हणून शेकडो, हजारो रुपयांचा आहेर देतो. त्या आहेराची चर्चा होते, फोटो काढले जातात, कौतुक होते.मात्र दुसरीकडे एखाद्या हॉस्पिटलच्या आयसीयूच्या बाहेर एक कुटुंब जीवन-मरणाच्या संघर्षातून जात असते. आत आपल्या माणसाचा श्वास यंत्रांवर सुरू असतो आणि बाहेर औषधांच्या चिठ्ठ्या, तपासण्यांची बिले आणि पैशांची जुळवाजुळव यांचे युद्ध सुरू असते. अशा वेळी धीर देणारे अनेक असतात, पण आर्थिक आधार देण्यासाठी पुढे येणारे फारच कमी. याच वास्तवाची जाणीव ठेवून कल्याणातील मुकुल गरे यांनी समाजासमोर एक वेगळी आणि माणुसकी जपणारी संकल्पना मांडली आहे –‘हॉस्पिटल लिफाफा’. बाईक घसरून अपघातात जखमी झालेल्या आपल्या मित्राला स्वतःहून आर्थिक मदतीचा लिफाफा देत त्यांनी या चळवळीची सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे मुकुल गरे हे स्वतः आयसेन मेंगर सिंड्रोम या दुर्मीळ आणि गंभीर हृदयरोगाने त्रस्त आहेत. हृदयाला असलेले दोन सेंटीमीटरचे छिद्र, त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या, रुग्णालयातील फेऱ्या, उपचारांचा खर्च आणि कुटुंबाची होणारी घालमेल याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या कुटुंबावर कोणता मानसिक, भावनिक आणि आर्थिक ताण असतो, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे.
अनेकदा रुग्णाच्या नातेवाईकांकडे औषधासाठी, इंजेक्शनसाठी किंवा तपासणीसाठी पैसे कमी पडतात. घरातील दागिने विकले जातात, बचती मोडल्या जातात, नातेवाईकांकडे हात पसरले जातात. अशा वेळी कोणी स्वतःहून पुढे येऊन दिलेले शंभर, पाचशे किंवा हजार रुपयेही त्या कुटुंबासाठी अमूल्य ठरतात. हे कटू सत्य पाहता काही तरी करावे असा विचार आपल्या डोक्यात घोंघावत होता.
“काळजी करू नका, सगळं ठीक होईल” असे शब्द दिलासा देतात, पण कधीकधी त्या दिलाशासोबत दिलेला छोटासा लिफाफा एखाद्या इंजेक्शनची व्यवस्था करू शकतो, एखादी तपासणी पूर्ण करू शकतो आणि कदाचित एखाद्याचा श्वासही वाचवू शकतो,” असे मुकुल गरे यांनी सांगितले.
ही संकल्पना केवळ एका व्यक्तीच्या उपक्रमापुरता न राहता समाजात माणुसकीचे हरवलेले धागे पुन्हा जोडणारी चळवळ बनू शकते. आज समाजात आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी अनेक जण पुढे येतात, मात्र दुःखाच्या काळात हात धरून उभे राहणारे मोजकेच असतात. मुकुल गरे यांनी सुरू केलेला ‘हॉस्पिटल लिफाफा’ उपक्रम ही केवळ आर्थिक मदतीची संकल्पना नसून संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिलासा देणारी माणुसकीची चळवळ आहे. उद्या कोणावरही कठीण प्रसंग येऊ शकतो. अशा वेळी आपला छोटासा हातभार एखाद्या कुटुंबासाठी जीवनदायी ठरू शकतो. त्यामुळे ‘हॉस्पिटल लिफाफा’ ही प्रथा केवळ कल्याणपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजात रुजावी, अशी अपेक्षा मुकुल गरे यांनी व्यक्त केली आहे.
मुकुल गरे हे जनसंपर्क सल्लागार, प्रेरणादायी वक्ते, वैद्यकीय समुपदेशक, अभिनेते आणि लेखक म्हणून ओळखले जातात. ‘झुंज श्वासाशी’ या त्यांच्या प्रेरणादायी पुस्तकाला महानायक अमिताभ बच्चन यांचीही दाद मिळाली आहे. स्वतः गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही ते समाजात सकारात्मकता, प्रेरणा आणि माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. इतकेच नाही तर आयसेन मेंगर सिंड्रोम हा दुर्मीळ गंभीर हृदयरोग असणारे लाँगेस्ट लिव्हिंग पर्सन म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया एलाईट बुकमध्ये त्यांची नोंद झाली आहे.
कोळशेवाडी पोलिसांची धडक कारवाई; आरोपीकडून अवैध पिस्टल जप्त
कल्याण : कल्याण पूर्व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक तरुण कल्याण पूर्वेतील १०० फूटी रोड परिसरात पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.
रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित तरुण घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची ओळख निलेश शिरसागर अशी पटली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिरसागर याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. जप्त करण्यात आलेली पिस्टल कुठून आणण्यात आली होती, ती कोणाला विकली जाणार होती आणि या अवैध शस्त्र व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी सांगितले की, परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा
हिंदु जनजागृती समितीची मागणी
कल्याण : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात ‘भारतीय बालरोग अकादमी’ द्वारे लहान मुलांच्या पूरक आहार पत्रकात ‘गोमांस’ खाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि शासनाने गोमातेला ‘राज्य माता’ घोषित केले असतांना सरकारी रुग्णालयात असा बेकायदेशीर प्रचार करणे हा कायद्याचा भंग व शासनाचा थेट अवमान आहे. याप्रकरणी दोषी संस्था व अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनाही दिले आहे. हे निवेदन रवींद्र नलावडे, अशोक सावंत, गोविंद प्रसाद दुबे यांनी सुपूर्त केले. या निवेदनाची प्रत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकड़ेही पाठवली आहे.
हिंदु धर्मीय जनमानसात गाईला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असून गोहत्येला महापातक मानले गेले आहे; तसेच आईचे दूध न मिळणाऱ्या बालकांसाठी गोमाता हीच दुसरी माता असते. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमीवर कोवळ्या बालकांना गोमांस खाण्यास प्रवृत्त करणारी ही विकृत धारणा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावणारी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. आज एकीकडे पाश्चात्य देश भारतीय वंशाच्या देशी गाईंचे महत्त्व ओळखून मानसिक शांतीसाठी ‘काऊ थेरपी’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत, तर दुसरीकडे आपल्याच देशातील गीर, साहिवाल आणि देवणी यांसारख्या दुर्मिळ प्रजातींची संख्या घटत आहे. अशा स्थितीत भारतातील एका जबाबदार आरोग्य संस्थेकडून गोमांस भक्षणाला छुपे प्रोत्साहन दिले जाणे हे एका मोठ्या षडयंत्राचा भाग असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर गैरप्रकाराचा जाहीर निषेध करत हिंदु जनजागृती समिती प्रशासनाकडे ही आग्रही मागणी करत आहे की, भारतीय बालरोग अकादमी या संस्थेवर आणि वाशी महानगरपालिका रुग्णालयातील ज्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या विघातक पत्रकाला परवानगी दिली, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच नवी मुंबई क्षेत्रातील व राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून ही विवादास्पद व आक्षेपार्ह पत्रके तात्काळ जप्त करून ती नष्ट करण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात यावेत. प्रशासनाकडून यावर वेळेत आणि ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही घनवट यांनी दिला आहे.
शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांचे केडीएमसी आयुक्त, महापौरांना पत्र
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील काही बांधकामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या बांधकामांना आवश्यक परवानग्या आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांनी संबंधित बांधकामांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे. तसेच ही बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज आणि बांधकामांच्या वैधतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मासिक महासभेमध्ये नगरसेवक मंदारं हळवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अनधिकृत बांधकाम व अनागोंदी कारभाराबाबत तहकुबी ठेवलेली होती. या तहकुबी मध्ये दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचे मुख्य कारण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचा अंधाधुंदी कारभार व अनधिकृत बांधकाम. या तहकुबी मध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामाबाबत नगरसेवक रोहन कोट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, बाजार समितीच्या मंजूर नकाशामध्ये ८-४ येथे २० व्यापारी गाळ्याचे बांधकाम चालू आहेत. प्रत्यक्षात कृ. उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा ३० जानेवारी २०२४ येथे २० गाळे बांधण्याचा ठराव करण्यात आला व त्या अनुषंगाने ११ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवानगी २० दुकाने प्लस, १८ ऑफिस अशी घेण्यात आली.
हे कोट यांनी पिठासन अधिकारी, आयुक्त व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगर रचना विभागात माहिती घेतली असता संचालक मंडळाचा ठराव बांधकाम घेताना नगर रचना विभागाला दिलेला नाही. नगर रचना विभागाकडून ही बांधकाम परवानगी कोणत्या अधिकारात देण्यात आले याचा अहवाल येणाऱ्या महासभेच्या २ दिवस आधी देण्याची मागणी रोहन कोट यांनी केली आहे. तसेच हा विषय गंभीर असून या प्रकरणाची आपण कसून चौकशी करावी व ही बांधकाम परवानगी रद्द करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी नगरसेवक रोहन कोट यांनी केली आहे.
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे – मुंबईसह विविध शहरांत असंघटीत कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. गेली अनेक वर्षे घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्यावतीने १६ जून रोजी श्रम सन्मान सोहळ्याचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसूझा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिसे तसेच जेष्ठ पत्रकार संजय शिंदे हे ही मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्यात उपस्थित घरकामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाणे-मुंबईसह राज्यभरात लाखो घरकामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झाला आहे. घर कामगार महिला या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घरकाम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे. जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन श्री. केळकर यांनी केले.
इतर कामगारांप्रमाणे या महिलांना देखील किमान वेतन, भरपगारी साप्ताहिक, प्रासंगिक, आजारपणाच्या सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा, विविध बँकांमार्फत कर्ज योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ अनुदान, निवृत्ती वेतन आदी सुविधांचा लाभ या महिलांना मिळायला हवा यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असेही केळकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोझा यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांनी समाजातील या घटकांच्या प्रश्नांची दखल फार कमी घेतली जाते, असे सांगितले. या लढ्यात नेहमीच आपल्या सोबत असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
सोहळ्यात घरकामगार महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर आदी भागातून घर कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका जांभळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन साधना मोरे यांनी केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता करात मिळणा-या सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आणि मालमत्ता करासंदर्भात इतर माहिती उपलब्ध होण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी हा मालमत्ता क्रमांकाशी नोंदणी करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर Property KYC वर क्लिक करा आणि Property No नोंदवून, आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अपडेट करा.
हि सुविधा करदात्यांच्या सहकार्य व सहभागावर अवलंबून आहे. मालमत्ता करातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आजच नोंदणी करा. मोबाईल क्रमांक नोंदणीची सुविधा सर्व प्रभागात कार्यालयात देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी, या सुविधेचा लाभ घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागातर्फे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा देणारा दिवस आहे. १९ जून हा राहुल गांधी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी मुंबई काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात व वार्डात वृक्षारोपण करून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, ‘मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरणचा संदेश दिला जाणार आहे. भाजपाचे सरकार विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठा प्रमाणात ऱ्हास करत आहे. अंदमान निकोबार बेटावरील विपुल जंगल संपत्ती तोडून अदानीला ती जागा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मुंबईतही आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मदर डेअरीच्या जागेवरील शेकडो मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. निसर्ग उद्यान मोडीत काढले जात आहे. नाशिकमधील तपोवनही नष्ट केले जात आहे. मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका मुंबईकरांनाही बसत आहे.’ वृक्षारोपणाच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा’, हा संदेश राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.

मुंबई महापौर करंडक स्पर्धा
मुंबई : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १३ व १४ जून २०२६ रोजी झालेल्या मुंबई महापौर करंडक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पीटीकेएसच्या मुला-मुलींनी उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल ६८ पदके आणि ६ सांघिक करंडकांची कमाई केली. स्पर्धेत पीटीकेएसच्या खेळाडूंनी १९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि १८ कांस्य पदकांसह एकूण ६८ पदके जिंकली. तसेच एक प्रथम, चार द्वितीय आणि एक तृतीय क्रमांकाचा करंडक पटकावत संस्थेच्या यशात भर घातली.
पुरुष कलात्मक जिम्नॅस्टिक्स (MAG) गटात यश पांचाळ याने लेव्हल-७ मध्ये फ्लोअर एक्सरसाइज, पॉमेल हॉर्स, रिंग्स, पॅरलल बार्स आणि ऑल-अराउंड प्रकारात सुवर्णपदके जिंकली, तर व्हॉल्ट आणि हॉरिझॉन्टल बारमध्ये रौप्यपदके मिळवली. संघालाही प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळाले. मैराव बोहरा याने दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकून चमकदार कामगिरी केली. आर्थर मेलेक आणि नील भिडे यांनीही पदकांची कमाई करत संघाच्या विजेतेपदात मोलाचे योगदान दिले.
महिला कलात्मक जिम्नॅस्टिक्स (WAG) गटात एराह शाह हिने लेव्हल-४ मध्ये बॅलन्स बीम प्रकारात सुवर्णपदक जिंकले. लेव्हल-५ मध्ये अश्लेषा नेवरेकर हिने तीन रौप्यपदके, तर अवंतिका सिंह हिने दोन कांस्यपदके मिळवली. लेव्हल-६ मध्ये सारा पटवर्धन हिने दोन सुवर्ण, दोन कांस्य आणि ऑल-अराउंड सुवर्णपदक पटकावत विशेष लक्ष वेधून घेतले.
लेव्हल-७ मध्ये स्वाती मोहिते हिने तीन पदके जिंकत ऑल-अराउंडमध्ये रौप्यपदक मिळवले. वरिष्ठ गटात नीती दोशी हिने फ्लोअर एक्सरसाइज, बॅलन्स बीम, व्हॉल्ट आणि ऑल-अराउंड प्रकारात चार सुवर्णपदके जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. टियाना क्रास्टो हिने फ्लोअर एक्सरसाइजमध्ये रौप्यपदक पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि समर्पणामुळे पीटीकेएसने मुंबईतील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपली वेगळी छाप उमटवली आहे.
0000000000
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी लाचार झालेल्या खासदारांनी लोकशाही, जनमत आणि जनतेशी गद्दारी केली असून विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपाचा हा सुनियोजित खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षांत लोकशाही आणि संविधान कमकुवत करण्याचे काम केले आहे. देशात सक्षम विरोधी पक्ष राहू नये, ही मानसिकता भाजपामध्ये वाढीस लागली असून त्यातूनच विविध पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला गेले असून त्यांनी केवळ पक्षाशीच नव्हे तर जनतेने दिलेल्या कौलाशीही विश्वासघात केला आहे, असे त्या म्हणाल्या.
भाजप विरोधकांना संपवण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या सर्व नीतींचा वापर करत असल्याचा आरोप करताना गायकवाड म्हणाल्या की, इतर पक्षांतील आमदार आणि खासदारांना फोडणे हा भाजपाचा राजकीय उद्योग बनला आहे. यापूर्वी राज्यात ‘५० खोके, एकदम ओके’ हा प्रकार चर्चेत आला होता. आता या सहा खासदारांची बोली किती कोटींना लागली, हेही लवकरच जनतेसमोर येईल, असा टोला त्यांनी लगावला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीने भाजपाविरोधात एकजुटीने लढा दिला होता. जनतेनेही भाजपाविरोधात कौल दिला होता. मात्र, ज्यांच्यासाठी महाविकास आघाडीने दिवस-रात्र प्रचार केला, त्याच काही लोकांनी सत्तेसाठी भूमिका बदलली, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
“सत्तेच्या मोहापोटी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका बदलणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे. पैशाने विकले जाणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी,” अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी संबंधित खासदारांवर निशाणा साधला.
