17 July Bitambatmi All pages

Open Book

सिंधुदुर्गनगरी —जिल्ह्यातील बचत गट तयार करीत असलेल्या मलाचा दर्जा चांगला असेल आणि पॅकिंग चांगले असेल तरच आजच्या स्पर्धेच्या युगात बचत गटांचा टिकाव लागू शकेल.तेव्हा या दोन्ही बाबींवर भर देऊन वाटचाल करावी असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे  खासदार  नारायण राणे यांनी केले. जिल्हा विकास  समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात  पार पडली त्यावेळी राणे बोलत होते. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारची पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि राज्य सरकारच्या ‘ मनरेगा ‘ योजनांचा आढावा घेतांना रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबत राणे यांनी आक्षेप घेत रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नाहीत आणि जनतेच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना  काळ्या यादीत टाकावे असे आदेश राणे यांनी दिले. या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना मिळेल यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना राणे यांनी दिल्या. या दोन्ही योजनांच्या जिल्ह्यातील कामाबाबत आपण समाधानी नाही असे राणे यांनी स्पष्ट केले.  राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती संबंधी आढावा घेतांना राणे यांनी या कामाच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत ही कामे अधिक व्यापक प्रमाणात आणि जोमाने हाती घ्यावीत असे आवाहनही केले. सध्या जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील  कलमठ आणि वेंगुर्ला तालुक्यातील परुळे या दोनच गावांमध्ये हे काम सुरु आहे अशी माहिती यावेळी स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली.
०००००००००

 भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
डोंबिवली :“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरीवर्ग पूर्ण ताकदीनिशी देवाभाऊ सरकारच्या पाठीशी उभे आहे” असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले.
पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी रविंद्र चव्हाण यांनी सभागृहाला संबोधित केले. शेतरस्ते आणि पाणंद रस्ते, जलयुक्त शिवार अभियान, शेतीला मिळालेली AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड, कृषी पंपांना भर दिवसा मोफत वीज अशा फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या विविध निर्णय आणि योजनांचा यावेळी रविंद्र चव्हाण यांनी मागोवा घेतला. सरकारच्या कामगिरीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यादरम्यान भाजप प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून आणि देवाभाऊ यांच्या नावाने जयघोष केला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याकडे केवळ एक सत्कार सोहळा म्हणून न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी म्हणून पाहत असल्याचे नमूद केले. तसेच “कोणतीही राजकीय निवडणूक डोळ्यांसमोर नसताना आम्ही कर्जमुक्तीचा निर्णय घेतला, कारण शेतकऱ्यांचे हित हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. अनेकांना वाटत होतं सरकार कर्जमाफी करणार नाही. आपण आंदोलने करू. पण हे महायुतीचे सरकार आहे, शेतकऱ्यांच्या देवाभाऊचे सरकार आहे” असंही ते म्हणाले.
७.५ अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंपांना भर दिवसा आणि मोफत वीज देण्यात येत आहे. या पंपांसाठी असणारे ४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ करत असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. “शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला त्या पाटीवर नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे” असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामगिरीविषयी शेतकरी वर्गात समाधान असल्याचे या सोहळ्यात दिसून आले. या सोहळ्याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल बोंडे, रणधीर सावरकर, प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय कुटे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अनेक आमदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
००००

 

अनिल ठाणेकर | ठाणेकच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कच्छी समाजाशी असलेले आपले कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
समाजरत्नांचा गौरव करणारा हा उपक्रम सलग १९ वर्षांपासून सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “घरातील कार्यक्रमाला जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी दरवर्षी येथे येतो. अशा सन्मानामुळे समाजात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा विकास घडतो,” असे ते म्हणाले.
यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका ४० वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या समाजकार्याचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील, तर ते सुरेश गडा आहेत.” तसेच आषाढी बीजनिमित्त कच्छी समाजाला नववर्षाच्या शुभेच्छा देत हा दिवस कच्छी समाजासाठी नववर्षाचा प्रारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना शिंदे यांनी शहरात मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असल्याची माहिती दिली. अहमदाबाद–घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळविण्यात येणार असल्याने ठाण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यापारी हिताच्या भूमिकेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग-व्यवसायाला चालना मिळत आहे. “व्यापारी सुरक्षित आणि आनंदी असेल, तरच व्यापार वाढतो. व्यापारी समाजाच्या सुरक्षिततेची आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“ठाणेकरांनी मला शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होईपर्यंत साथ दिली. त्यामुळे हे नाते केवळ राजकीय नसून कौटुंबिक आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. साकेत येथील त्रिमंदिर परिसरात कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती देत महावीर हॉस्पिटलसह विविध संस्थांमार्फत आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छी अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे, नगरसेविका परीशा सरनाईक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कच्छी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजहितासाठी कच्छी समाजाने अशीच एकजुटीने कार्य करत राहावे, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
००००००००

अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (Construction and Demolition – C&D) कचऱ्याचे  निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी  ठाणे महापालिकेने C&D Waste Management Portal विकसित केले असून या पोर्टलचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या हवा प्रदुषणसंदर्भातील Suo Moto PIL क्र ३/२०२३ मधील निर्देशांच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने Council on Energy, Environment and Water (CEEW) यांच्या सहकार्याने (Construction and Demolition – C&D) Waste Management Portal विकसित केले आहे. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक नगररचना कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्र.मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच Council on Energy, Environment and Water (CEEW) संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या पोर्टलच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या C&D कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यत (Processing Plant) प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थान करता येणार आहे. हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्याBuilding Plan Management System शी संलग्न असून, बांधकाम पारवानगी घेताना विकसकांना C&D Waste Fee भरणे, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणे तसेच निर्माण झालेल्या व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची माहिती ऑनलाईन नोंदविणे बंधनकारक राहणार आहे.या प्रणालीमुळे बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यास मदत होणार असून, धूळ प्रदुषण व हवा प्रदुषण कमी करण्यासाठीही ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये बांधकामाचा कचरा साचून पाणी तुंबणे व पूरस्थिती निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यासही या पोर्टलची महत्वूपर्ण मदत होणार आहे.
या पोर्टलमुळे बांधकाम कचऱ्याचा संपूर्ण मागोवा घेणे शक्य होणार असून, कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. ठाणे शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी हे पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या शहरांमध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी गरज बनली आहे. तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रणालींमुळे कचऱ्याचे निर्मितीपासून प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावीपणे व्यवस्थापन करणे शक्य होईल आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल, बांधकाम कचऱ्याची योग्य विल्हेवाट केवळ हवा प्रदूषण कमी करण्यासाठीच नव्हे, तर पावसाळ्यात नाले तुंबणे, पाणी साचणे आणि पूरस्थिती निर्माण होण्यास प्रतिबंध करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. हे पोर्टल शहराच्या पर्यावरणीय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देईल असे CEEWच्या प्रार्थना बोरा यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिका व CEEW यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेले हे दुसरे डिजिटल व्यासपीठ असून, यापूर्वी Air Quality Decision Support System (AQDSS) यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहे. ही दोन्ही डिजिटल प्रणाली एकत्रितपणे ठाणे शहरातील बांधकाम क्षेत्रातून होणारे हवा प्रदूषण कमी करण्यास, पर्यावरण संरक्षणास आणि शाश्वत शहरी विकासाला गती देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे प्र.मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी नमूद केले.

ठाणे : वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गामुळे चेंदणी कोळीवाडा परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. या मार्गामुळे या कोळीवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक महत्वालाच तडे जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची आज संयुक्त बैठक घेत सकारात्मक चर्चा केली. ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोबाबत ठिकठिकाणी संभ्रम आणि तक्रारी असल्याचे पुढे आले आहे. संबंधित नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेत पाहणी दौरेही केले. यात शक्य तेथे सकारात्मक बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकल्पाचा तीन किमीचा मार्ग भूमिगत असून तो चेंदणी कोळीवाड्यातून जाणार आहे. कोळीवाड्याचे सीमांकन झाले नसताना हा प्रकल्प राबवणे इष्ट नाही. या भूमिगत मार्गामुळे येथील वारसा स्थळ असलेले श्री दत्त मंदिर, विहिरी, भूजल स्तर, पारंपरिक घरे आणि गावठाणाची सामाजिक-सांस्कृतिक परिसंस्थाच बाधित होणार असल्याची भीती ट्रस्टने केळकर यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच जोपर्यंत सीमांकन होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा झाली. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी सुरेश पारखे तसेच ट्रस्टचे  अमरीश ठाणेकर, श्रुतिका मोरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांत अनेक ठिकाणी तक्राररदार नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली, संबंधित अधिकाऱ्यांसोबत स्थळ पाहणीही केली. शक्य तेथे बदलही करण्यात आले आहेत. चेंदणी कोळीवाडा ही वसाहत सर्वात जुनी असून येथे खरे भूमिपुत्र पिढ्यान पिढ्या राहत आहेत. या प्रकल्पाबाबत त्यांच्या काही शंका आहेत. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या शंकांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे संजय केळकर यांनी सांगितले.

दिवा, दि 16 जुलै : बी.आर. नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर शाखेच्या वतीने दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे स्वच्छता, पाणी निचरा, भटके कुत्रे, धोकादायक झाडे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसह विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शाखा संघटिका श्रावणी संतोष कदम यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहर समन्वयक प्रियंका सावंत, उपविभागप्रमुख नितीन सावंत, शाखाप्रमुख शशिकांत कुंभारगण, राजकुमार गुप्ता तसेच उपशाखाप्रमुख संतोष दत्ताराम कदम उपस्थित होते.
निवेदनात परिसरातील गटारांची नियमित साफसफाई करून वेळेवर कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, धोकादायक झाडांची तातडीने छाटणी अथवा तोडणी करावी, गटारांमधील अडथळे दूर करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, बी.आर. नगरमधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवावे, नागरिकांच्या प्रलंबित वैयक्तिक तक्रारींचे तातडीने निराकरण करावे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित पदपथ, पुरेशी स्ट्रीट लाईट आणि बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्तांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. श्रावणी कदम यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे बी.आर. नगर मधील नागरिकांच्या मूलभूत नागरी प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

कल्याण : कल्याणच्या खडकपाडा येथील केएफसीमधील आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा ठपका अन्न व औषध प्रशासन विभागाने ठेवला आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण मंचचे जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांनी एका व्हिडीओद्वारे येथील केएफसी आऊटलेटबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य पदार्थांचे स्टोरेज एकत्र ठेवणे, ग्राहकांना खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची माहिती न देणे यांसह एकूण नऊ गंभीर त्रुटी आढळून आल्या.
केएफसी स्टोअर, खडकपाडा येथे अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे पुण्यार्थी यांच्या निदर्शनास आले. या स्टोअरमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठी वापरण्यात येणारे पाव  हे स्टोअरच्या मागील बाजूस शौचालयाजवळ तसेच कचऱ्याच्या पेट्या आणि घाणीच्या ठिकाणी ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे. अशा अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ ठेवणे हे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असून, त्यामुळे अन्न दूषित होण्याची गंभीर शक्यता निर्माण होते.
या संदर्भात पुण्यार्थी यांनी अन्न व औषध प्रशासनाला पत्र देत संबंधित केएफसी स्टोअरची तात्काळ तपासणी करून योग्य कार्यवाही करून दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने मे. सफायर फूड्स इंडिया लिमिटेड (केएफसी) या आस्थापनेची FosCos प्रणालीवर ऑनलाईन सखोल तपासणी करण्यात आली आहे. तपासणी अहवालातील त्रुटींच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम ३२ अन्वये सुधारणा नोटीस पाठविण्यात येतअसून  सुधारणा नोटीसच्या अनुषंगे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
००००००००

घरोघरी जाऊन फॉर्म भरणे आवश्यक -नंदकुमार देशमुख
अनिल ठाणेकर
ठाणे, मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेबाबत प्रशासनाने केलेल्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरले जात नसल्याचा आरोप ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त कर्मचारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक फॉर्म भरून घेतील, असे आवाहन केले होते. मात्र आजपर्यंत कोणताही कर्मचारी घरी आलेला नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
शिवाईनगर येथील शाळेत सुमारे ५० नागरिक माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथे बीएलओंची यादी उपलब्ध झाली. मात्र यादीतील बहुतांश अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने किंवा आवश्यक माहिती न दिल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक मतदारांना ऑनलाइन पद्धतीने माहिती मिळविणे किंवा अर्ज भरणे शक्य नसल्याने प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. बीएलओंना आवश्यक सूचना देऊन त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी व फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केली आहे.

 प्रा. विसुभाऊ बापट घेऊन येताहेत आपला ३१५० वा महोत्सवी प्रयोग
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई पासून बहिणाबाई चौधरी पर्यंत आणि कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट यांच्या पासून ना. धों. महानोर, रामदास फुटाणे यांच्या पर्यंत अनेक कवींच्या काव्यरचना मुखोद्गत असलेल्या आणि आपल्या अभिनयसंपन्न एकपात्री प्रयोगांचा एकापाठोपाठ एक असे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या प्रा. विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा ३१५०वा महोत्सवी प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विद्यमाने सोमवार, २० जुलैला  आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजतां दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हा रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवणारा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा प्रयोग प्रा. विसुभाऊ बापट हे सादर करणार आहेत. त्यांना पवित्र सावंत हे तबल्यावर साथ करणार आहेत तर तालवाद्याची रंगत डॉ. किशोर खुशाले हे आणणार आहेत. तमाम कविता प्रकारांचा काव्य गीत गायन आणि साभिनय सादरीकरणाने नटलेला ‘विश्वविक्रमी’ जागतिक एकपात्री काव्यनाट्यानुभवासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संचालक श्रीराम पांडे यांनी तमाम रसिक श्रोत्यांना आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे हा काव्यनाट्यानुभव विनामूल्य असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *