5 Aug Bitambatmi All pages

Open Book

ॲग्री स्टॅक वर तात्काळ नोंदणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सिंधुदुर्ग : कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ नसलेले१२०७ शेतकरी असून त्यांनी तातडीने ‘ॲग्रीस्टॅक ‘वर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन  केले आहे.
कर्जमुक्ती योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे जिल्हा सुकटे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यापैकी २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडलेली आहे अशी माहिती  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली
आधार प्रमाणे करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या ३७०८ शेतकऱ्यांचे याद्या संबंधित विकास सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका सहाय्यक निबंधक या कार्यालयांमध्ये याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत १एप्रिल २०१९ ते ३१,मार्च,२०२५ या कालावधीत वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर,२०२५ रोजी थकीत आणि ३१,मार्च,२०२६ अखेर परतफेड न झाले असल्यास मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे थकीत कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बँक किंवा संस्थेला परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता ओटीएस अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत चा लाभ मिळणार आहे तसेच २०२२-२३,२०२३ -२४ आणि २०२४ -२५ यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.
००००००००

कल्याण :  येथील आचार्य अत्रे रंगमदिरात दिवंगत गायिका, आशा भोसले, गायक रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर तसेच आणि पाऊस या विषयावरील गाण्यांना श्रोत्यांचा अलोट प्रतिसाद लाभला. यावेळी २२ गायक, गायिका यांनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत भरली. बाहेर मुसळधार पाऊस दिवसभर पडत असतानाही गुणी गायिका-गायकांस श्रध्दांजली अर्पण करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर गान रसिक जमले होते.
यावेळी ना ना करते प्यार, ये गीत किसने छेडा, मेरा प्यार भी तु है, क्या हुआ तेरा वादा, आया सावन झुमके अशी एकाहुन एक सुश्राव्य गाणी सादर करण्यात आली. सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सादर झालेल्या या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर, आशा भोसले आणि रफी यांच्या यादगार सुमधुर गाण्यांनी संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे आयोजन येथील गायक आणि शरद कराओकेचे संचालक शरद ननावरे यांनी केले होते. सुत्रसंचलनाची बाजू अर्चना वाईकर यांनी सांभाळली.

अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही बैठकीत व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. अडीच वर्षांत पुणे मेट्रोचे वेगाने काम करण्यात आले. त्याच धर्तीवर ठाण्याचे काम पूर्ण करता येईल, अशी आशा हर्डिकर यांनी व्यक्त केली. त्याचे आमदार ॲड. माधवी नाईक यांनी स्वागत केले आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाण्यातील सामान्य नागरिकांच्या शंका व भीती थेट नागरिकांबरोबर संवाद साधून दूर केली जाणार आहे. भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंग मेट्रो मार्ग जाणाऱ्या विविध भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांबरोबर एकत्रपणे संवाद साधण्याच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात ठाणे शहरातील रिंग मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली.
ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार रिंग मेट्रो प्रकल्प हा आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत महामेट्रो, महापालिका किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांकडून सामान्य नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत ठाणे शहरात गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्यासू व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे. रिंग मेट्रोच्या कामामुळे नुकसान होणार नसून, ठाणेकरांना फायदा होईल. या प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागात व नियोजित मेट्रोच्या स्थानकांच्या ठिकाणी परिसंवाद भरवावेत. त्यात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी सूचना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार लवकरच ठाणे शहरातील नागरिकांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी परिसंवाद भरविले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळातही महामेट्रोकडून रिंग मेट्रोबाबत फलक लावण्यात येणार आहेत.

अनिल ठाणेकर
ठाणे, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग करण्यात येतात व उत्पादनात भर घातली जाते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून ते आणखी उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आली आहे. कृषी एकविभागामार्फत राज्यस्तरावर खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेत सहभाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील उत्पादकता आधारभूत धरून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठरवण्यात आली होती. परंतु, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत खालीलप्रमाणे एकूण ११ पिकांचा समावेश असून त्यांच्या अर्ज करण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे:
मूग व उडीद पीक : १० ऑगस्ट २०२६, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल : ३१ ऑगस्ट २०२६ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे बंधनकारक आहे. शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे फार्मर आयडी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याची चलन पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), आणि बँक खाते चेक किंवा पासबुक डिटेल्स. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
बक्षीस तपशील
तालुका पातळी: प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये आणि तृतीय २,००० रुपये.
जिल्हा पातळी: प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये.
राज्य पातळी: प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय ४०,००० रुपये आणि तृतीय ३०,००० रुपये.
कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना जास्तीत जास्त संख्येने या पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छूकांनी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पिकस्पर्धा टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
००००

कल्याण: श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पूर्वप्राथमिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अनोख्या लोककला सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवकालीन इतिहासाचा प्रेरणादायी अनुभव घेतला. करपल्लवी गोंधळी ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ लोककला मानली जाते. धर्म, संस्कृती, इतिहास, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारे हे प्रभावी माध्यम असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात अशा लोककलांद्वारे समाजात जागृती, संघटन आणि स्वराज्यनिष्ठेची भावना वृद्धिंगत केली जात असल्याचे मानले जाते.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथील छत्रपती संभाजीराजे शाहीरी पथकाचे शाहीर संजय जाधव मिणचेकर व शाहीर सामजी वाकसे मिणचेकर यांनी  करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण केले. हातांच्या विशिष्ट मुद्रांद्वारे कथा उलगडत त्यांनी शिवकालीन पराक्रम, मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर जिवंत केला. या गोंधळी कलापथकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सात भाषांमधून व्यक्तींची नावे ओळखून करपल्लवीच्या माध्यमातून सादर करतात. या अनोख्या सादरीकरणाने विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिक भारावून गेले. अनेक विद्यार्थी व पालकांनी स्वतःची नावे सांगितल्यानंतर कलाकारांनी हाताच्या मुद्रांद्वारे ती अचूक ओळखून दाखवत उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
सादरीकरणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य तसेच गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा प्रभावी परिचय करून देण्यात आला. बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाच्या कथा आजही पोवाडे आणि गोंधळी परंपरेतून जतन होत असून, त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. मंत्रालय प्रतिनिधी  कृष्णात कदम तसेच जगन्नाथ कदम कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. विद्यालयाचे कार्यवाह  दिलीप झरकर, नितीन मांडे,  जयराम महाजन  यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी यांनी केले. कार्यक्रमामागील भूमिका कृष्णात कदम यांनी मांडली, तर सूत्रसंचालन ललिता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, संस्कृतीबद्दल जिव्हाळा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.
००००००

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून एक महिला पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत होती. तिला पोटाच्या डाव्या बाजूस वेदना तसेच पोट फुगण्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून वरच्या उदरापर्यंत मोठ्या गाठीने व्यापलेला असल्याचे निदर्शनास आले. सीटी स्कॅनमध्ये सुमारे दीड फूट लांब व एक फूट रुंद आकाराची गाठ असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, या गाठीचा इतर अवयवांवर परिणाम झालेला नव्हता. रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेली ही साडेआठ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली, सदरची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.
ही शस्त्रक्रिया डॉ. वर्षा पाटील, डॉ. क्षितीज माने, डॉ. शुभम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अरुण माने यांनी शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विजय पाटील व डॉ. केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजना पाटील यांनी रुग्णाला यशस्वीपणे भूल दिली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम आणि अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचे वजन सुमारे सहा ते सात किलोने कमी झाले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पोटाच्या मागील भागात (रेट्रोपेरिटोनियल भागात) एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मिळ असतात. मूत्रपिंड, मोठ्या रक्तवाहिन्या, स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ अशा गाठी असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत ही शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली असल्याचे अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी नमूद केले.
००००

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत ८ जणांची बिनविरोध निवड झाली असून मुंब्रा प्रभागसमिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दिपाली भगत विजयी झाल्या.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार राजेश मोरे, पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मिनल मुकुंद संख्ये, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जयश्री जेरी डेविड (गायकर), माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ दिलीप ओवळेकर, उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नारायण शंकर पवार, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विजया मनोज लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक नामदेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मात्र चुरशीची लढत झाली. ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे अन्सारी नफीस अहमद मोहम्मद अनीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या दिपाली मोतीराम भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात अन्सारी यांना ४ मते, तर दिपाली भगत यांना १० मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिपाली भगत यांना विजयी घोषित केले.

मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद
अशोक गायकवाड
रायगड- कर्जत : कर्जतचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनय सांगळे यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले. गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा वेळा ‘राष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज’ पुरस्कार डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ‘बेस्ट बॉलर’ (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात. ५६० विकेट्सचा विक्रम ‘डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज’ अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ५६० हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या डॉ. विनय सांगळे यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६
मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर आर्चेरी  अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये पोयसर  जिमखान्याच्या धनुर्धरांनी उत्कृष्ट कामगिरी केली. राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये, महाराष्ट्र संघ सर्वसाधारण विजेता ठरला. पोयसर जिमखान्याने १३ सुवर्ण आणि ५ रौप्य पदकांसह महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबई स्तर चॅम्पियनशिपमध्ये, पोयसर जिमखान्याने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १ कांस्य पदकांसह द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. २३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १ कांस्य अशा एकूण ३५ पदकांसह, पोयसर जिमखान्याने या खेळात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
पोयसर जिमखान्यातील पदक विजेते:
१. वियान नाझरेथ – ५ सुवर्ण पदक
२. पानव शाह – ४ सुवर्ण आणि ४ रौप्यपदक
३. मयूर पांचाळ – ३ सुवर्ण
४. शौर्या प्रभू – २ सुवर्ण आणि १ रौप्यपदक
५. प्रगती झा – ३ सुवर्ण
६. युग मेहता – २ सुवर्ण
७. धैर्य सोनी – २ सुवर्ण आणि २ रौप्य
८. दीपक वाधवाना – १ सुवर्ण आणि  १रौप्य
9. स्वरोव्हस्का डिसोझा – १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य
१०. रेयांश नादियाना – १ सुवर्ण
११. अध्रित पाखरे – २ रौप्य
या कामगिरीबद्दल बोलताना, प्रशिक्षक मिलिंद पांचाळ, आंतरराष्ट्रीय स्तरचे प्रशिक्षक आणि NSNIS आर्चेरी प्रशिक्षक म्हणाले, ‘हे यश आमच्या धनुर्धरांची कठोर मेहनत, पालकांचे पाठबळ आणि आमचे मुख्य प्रशिक्षक  सुभाषचंद्र नायर सर व पोयसर जिमखाना समितीच्या  मार्गदर्शनाचा परिणाम आहे. आमचे धनुर्धर महाराष्ट्र आणि मुंबईला गौरव मिळवून देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *