16 Feb Bitambatmi All pages

Open Book

हर हर महादेव…

महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यातील किसननगर २ विभागातील प्राचीन गंगेश्वर महादेव मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवशंकराचे भक्तिभावाने दर्शन घेत विधिवत पूजा करून दुग्धाभिषेक केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, नगरसेवक प्रकाश शिंदे, नगरसेवक योगेश जानकर, उपविभागप्रमुख सुनील मोरे उपस्थित होते.

भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू

स्लग – गणेश नाईकांची शिंदे पितापुत्रांवर पुन्हा टिका

नवी मुंबई : भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू असे जहरी शब्द वापरत भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या भस्मासुरांनी १० वर्षे महाराष्ट्राला लुटलं, यांची जागा जेलमध्ये असल्याची घणाघाती टीका गणेश नाईकांनी केली.

महापालिका निवडणूकीदरम्यान मला परवानगी द्या शिंदेंचा टांगा पलटी करतो आणि घोडाही फरार करून टाकतो असे वक्तव्य केल्याने वातावरण चांगलेच चिघळले होते. आता त्यापुढे जाऊन माझ्या नादी लागाल तर माजी खासदार करेन असा इशारा भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला.

पक्षाने मोकळीक द्यावीअस्तित्व संपवतो

गणेश नाईक म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या हातात ठाणे, पालघरमधील एकही महानगरपालिका जाऊ देणार नाही. पक्षाने मला फक्त मोकळीक दिली पाहिजे, यांचे अस्तित्व संपवून टाकेन. हे भस्मासूर, बकासूर असून यांनी महाराष्ट्र लुटून खाल्ल्याने राज्य १० वर्ष मागे गेले आहे. यांनी केलेले पाप लक्षात आल्यास यांची जागा जेलमध्ये असेल.”

खुमखूमी असेल तर…

श्रीकांत शिंदेंचा पलटवार

श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना त्याच शब्दात प्रत्युतर दिले आहे. गणेश नाईकांना वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे असा टोला खासदार शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना लगावला.

जर जास्त खुमखुमी असेल तर गणेश नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढून दाखवावं असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी दिलं. त्यामुळे आता मंत्री गणेश नाईक विरुद्ध खासदार श्रीकांत शिंदे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डोंबिवलीत बेसमेंट पार्किंगमध्ये आग

२९ दुचाकी जळून खाक 

पाच जण जखमी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेयेथील चेडा नगरातील रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे सुमारे सव्वाचार वाजता अचानक भयानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.

आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला. यामुळे झोपेत असलेले रहिवासी घाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. ही आग

शॉर्ट सर्किट की इतर कोणत्या कारणानी लागली याचा तपास सुरु आहे. पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आग विझवल्यानंतर घटनास्थळाची कसून पाहणी केली. पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मुंबईकरांनो लोकल तिकीटचे युटीएस ॲप बंद होणारा

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून लोकल तिकिट घेण्यासाठी मुंबईकर वापरत असलेले युटीएस ॲप आता बंद होणार आहे. येत्या १ मार्चपासून हा ॲप प्रवाशांसाठी कायमचा बंद होणार आहे. सध्या या ॲपवरून पास बुकींगची सेवा कधीच बंद झाली आहे २८ फेब्रुवारीनंतर सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत.

भारतीय रेल्वेने युटीएस ॲप २७ डिसेंबर २०१४ मध्ये सुरू केलं होतंसुरुवातीला फक्त उनगरिय रेल्वेसाठी उपलब्ध असलेला हा ॲप हळू हळू सर्व शहरांमध्ये सुरु करण्यात आलामुंबई लोकलचं तिकिट काढण्यासाठी हा उत्तम पर्याय होतापण आता हा ॲप बंद झाल्यावर मुंबईकरांना रेलवन या ॲप RailOne कडे वळावे लागणार आहेएक महिन्यापासून रेलवनवरून पास बुकिंग सुरु झालं आहे आता  मार्चपासून सर्व तिकिट बुकींगसाठी हा एकमेव पर्याय असणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जुलै २०२५ मध्ये RailOne ची सुरुवात केली होती

मुलुंड अपघाताच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक

मुंबई : मुलुंड येथे मेट्रोब्रिजचा भाग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने एक विशेष पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो-४ मार्गिकेची सखोल तपासणी करणार आहे.

 या पथकाचे नेतृत्व एमएमआरडीएचे संचालक बसवराज एम करणार असून त्यांच्या सोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करणार आहे. त्यांच्या सोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन ९ आणि ५ चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे दहा ते बारा अधिकारी देखील असणार आहे.

दरम्यान, आज पासून पुढील 3 ते 4 दिवस किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत हे पथक अहोरात्र काम करणार आहे. त्यांच्या तपासणीचे, साईट विझिटचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. या पथकाचे मुख्य काम सखोल बारकाईने तपासणी करून काल झालेला अपघात पुन्हा होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आणि ज्या ठिकाणी काही चुकीचे अथवा नियमांचे उल्लंघन करून किंवा धोकादायक काम सुरू असेल तिथे ते थांबवणे आणि योग्य रित्या काम सुरू करून घेणे हे असेल.

अशातच, तपासणीच्या वेळी नुकत्याच झालेल्या अपघातासारखे स्लैब, स्लैबचे तुकडे, बांधकाम साहित्य, सिमेंटचे भाग या आणि अश्या इतर गोष्टी धोकादायक स्थितीत दिसून आल्यास लगेच कारवाई करणे आणि काढून टाकणे, हे देखील या पथकाचे मुख्य काम असेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख एक रिपोर्ट बनवून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार, या रिपोर्ट मध्ये कुठे कुठे धोकादायक स्थितीत गोष्टी आढळल्या, त्यावर काय कारवाई केली, मेट्रोच्या बांधकामात तपासणीवेळी काय काय दिसून आले, हे सर्व रिपोर्टमध्ये द्यावे लागणार आहे.

राज्यभरात एटीएसकडून छापे

एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २१ ठिकाणी धाडी 

अनेकजणांची चौकशी

मुंबईएन महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात तब्बल २१ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने राज्यभर एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु झाले. या छाप्यात अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आली होती. जी राज्यात अनेक ठिकाणी शनीवार रात्रीपासून  तळ ठोकून होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एटीएस २० पथक या धाडीत सहभागी झाली होती.

अत्यंत गोपनीय पद्धतीनं राज्यातल्या अनेक ठिकाणी एटीएस पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्थानिक घरांमध्ये जात लोकांकडून चौकशी केल्या जात आहे.  संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी काल मध्यरात्रीपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यातीळ विविध परिसरात कारवाईला सुरुवात केली. कारवाई सुरू असताना यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला गेला होता..

टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा

दगडफेकीत एकमेकांची डोकी फोडली

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यभर भाजपाने जोरदार निदर्शने केली. पुण्यात तर भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावर चालून आले. यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली.  हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी जोरदार निषेध केला होता. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही कारच्या काचा फुटल्या, तसेच गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तर दगडफेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे पुण्यात काही वेळ मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, भाजपाच्या पोस्टरबाजीविरोधात काँग्रेसने भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे महाराजांबाबतेच वादग्रस्त वक्तव्य असलेले पोस्टर झळकावले होते.

“आजचा दिवस हा एकदम वाईट दिवस आहे, कारण पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ?

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. ते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.

इशान किशनचे तांडव, पाकिस्तान भस्मसात

टीम इंडियाची ‘सुपर ८’मध्ये धडक

कोलंबो- महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इशान किशनने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टीवर अक्षरशः तांडव करत धावांचा ‘अग्निवर्षाव’ केला आणि पाकिस्तानला भस्मसात केलं. इशांतच्या बॅटीतून उसळणाऱ्या अग्नीलोळाला थांबविण्याचे धाडस पाकिस्तानच्या कोणत्याच गोलंदाजात नव्हते. चौकार षटकारांची आतषबाजी करीत इशांतने टी२० वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तानवर तब्बल ६१ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केलाय.

सामन्यात भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेत निर्णायक कामगिरी बजावली.

प्रेमदासा मैदानाची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना पूरक होती त्यामुळे पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला पहिली फलंदाजी दिली. पाकिस्तान टीमने गोलंदाजीची सुरुवातच फिरकीने केली आणि भारताची सुरुवात धक्कादायक ठरली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने स्वतः ऑफ-स्पिन टाकत अभिषेक शर्माला बाद केलं. त्यानंतर साईम अयूब (३/२५) आणि इतर फिरकीपटूंनी पॉवरप्लेमध्ये अचूक मारा करत भारताला रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र इशान किशनने आक्रमणाची धुरा सांभाळत प्रेमदासा स्टेडियमला अक्षरशः आपल्या ताब्यात घेतले. शहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मारलेला जबरदस्त पुलअयूब व आगा यांना फटकारलेले चौकारतर लेग-स्पिनर अब्रार अहमद आणि शादाब खान यांना मारलेले षटकार पाक टीमचा घाम काढण्यात पुरेसे ठरले. किशनने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४० चेंडूत ७७ धावांची खेळी साकारली.

किशनने तिलक वर्माबरोबर (२५ धावा) ८७ धावांची भागीदारी केली. मात्र अयूबच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात किशन बाद झाला आणि पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. अयूबने सलग चेंडूंवर तिलक व हार्दिक पंड्या (०) यांना बाद करत भारताला १२६/२ वरून १२६/४ अशा स्थितीत आणले. कर्णधार सूर्यकुमार यादव (३२) आणि शिवम दुबे (२७) यांनी संयमी फलंदाजी करत संघाला १५० पार नेले. दुबेने उस्मान तारीकला काही आकर्षक फटके लगावलेतर अखेरच्या षटकात आफ्रिदीला १५ धावा चोपत दुबे आणि रिंकू यांनी भारताला १७५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला. नियमित अंतराने बळी घेत भारताने १८ षटकांत पाकचा डाव अवगहीए ११४ धावांत रोखला आणि ६१ धावांनी दणदणीत विजय साकारला. हार्दिकबूमराहअक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर कुलदीप आणि तिलकने एकेक विकेट घेतली.

 कोलंबोतील सामन्यात हस्तांदोलन न करण्याची भूमिका कायम

सूर्यकुमार यादव याने रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान पारंपरिक हस्तांदोलन टाळत आपली भूमिका कायम ठेवली. गेल्या वर्षी दुबई येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेपासून बीसीसीआई ही भूमिका अवलंबत आहे. काश्मिरमध्ये पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी २६ निरअपराध भारतीय पर्यटकांची हत्या केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी सुर्यकुमार यादवने आशियाकपमध्ये पाकिस्तानचा कॅप्टनशी हस्तांदोलन केले नव्हते.

वनवासी कल्याण आश्रम, चिंचवली केंद्रात ‘रानपाखरं’च्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात
चिंचवली : वनवासी कल्याण आश्रम विद्यार्थी वसतिगृह, चिंचवली केंद्र येथे ‘रानपाखरं’ या मासिकाच्या ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या अंकाचे प्रकाशन केंद्रातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात संपादिका मृदुला परचुरे यांनी ‘रानपाखरं’च्या ७५ अंकांच्या प्रवासाचा आढावा घेत मासिकाची वाटचाल उलगडून सांगितली, तर सह-संपादिका सुवर्णा भट यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. कोकण प्रांत संघटन मंत्री प्रदीपजी पाटील यांनी संघटनेची भूमिका व कार्य यावर मार्गदर्शन केले. ज्योतीताई जपे व प्रियाताई आचवल यांनी शिक्षण आयामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. कार्यक्रमाला कोचरेकर काका (वरिष्ठ कार्यकर्ते), हेमांगी भागवत (कै. सुनीताताई गोगटे यांच्या कन्या) आणि भाटवडेकर काका (माजी पालक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंचवली केंद्रप्रमुख विवेक फुफाणे यांनी केले, तर समारोप प्रियाताई आचवल यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

‘रानपाखरं’ या मासिकाची सुरुवात कै. सुनीताताई गोगटे यांनी २००४ साली वनवासी मुलांसाठी केली. हा अंक वनवासी कल्याण आश्रमच्या आश्रमशाळा, वसतिगृहे आणि संस्कार केंद्रांमध्ये वितरित केला जातो. वैविध्यपूर्ण माहिती, विविध सदरं आणि आकर्षक मांडणीमुळे ‘रानपाखरं’ वनवासी, ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय ठरले असून ७५ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा हा त्याच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *