
कल्याणमध्ये निदर्शने करत व्यक्त केला निषेध
कल्याण : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाच्या संतापजनक प्रकाराविरोधात कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शेन करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शेने केल्यानंतर भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी कूच केली, मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
खर्गे यांचा अपमान हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर सामाजिक समानता आणि संविधानिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मानसिकते विरोधातील लढा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांना जे हक्क मिळाले आहेत ते संविधानामुळे मिळाले असून हे सरकार दलित विरोधी असल्याचा आरोप जपजीत सिंग यांनी केला. त्यांनी हि दलित विरोधी विचारधारा न सोडल्यास त्यांचे शुद्धीकरण युवक कॉंग्रेस करणार असल्याचा इशारा देखील यावेळी सिंग यांनी दिला. यावेळी कॉंग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
०००००
गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसे
उत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती
ठाणे -भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव पार पडणार असून, स्व. मीनाताई ठाकरे चौक, कॅसल मिल नाका, ठाणे (प.) येथे गोविंदा पथकांच्या थराराचा अनुभव ठाणेकरांना घेता येणार आहे, अशी माहिती आयोजक ठाण्याचे उपमहपौर कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे गोविंदा पथकांसाठी तब्बल ५५ लाख रुपयांची बक्षिसे व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. पुरुष गोविंदा पथकांसाठी १० थर रचणाऱ्या पथकास ११ लाख ११ हजार १११ रुपये, तर त्यानंतर प्रत्येक १० थर रचणाऱ्या पथकास ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ९ थरांसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये, त्यानंतर प्रत्येक ९ थरांसाठी २ लाख २२ हजार २२२ रुपये, तर ८ थरांसाठी ५१ हजार रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय ७ थरांसाठी १५ हजार, ६ थरांसाठी ९ हजार, ५ थरांसाठी ५ हजार आणि ४ थरांसाठी ४ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.
महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम ७ थर रचणाऱ्या पथकास १ लाख ११ हजार रुपये, त्यानंतर प्रत्येक ७ थरांसाठी ५१ हजार रुपये, ६ थरांसाठी २५ हजार रुपये, ५ थरांसाठी १० हजार रुपये आणि ४ थरांसाठी ५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि सामाजिक संदेश जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. उत्सवस्थळी `नशा मुक्त युवा, नशामुक्त भारत’ हा संदेश देण्यासाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदा पाटील, आणि सचिन पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘गोकुळ दहीहंडी २०२६’चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
००००००
४१२ तक्रारींचा तात्काळ निपटारा
वसई : महावितरणच्या वसई मंडळ कार्यालयाच्या वतीने मागील आठवड्यात वीज ग्राहकांसाठी आचोळे, नालासोपारा, विरार परिसरात समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील ७७० वीज ग्राहकांनी हजेरी लावली.
या शिबिरात ४१२ वीज ग्राहकांच्या वाढीव देयकाच्या संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर संदर्भात असलेल्या अनेक शंकांचे उपस्थित तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवून स्मार्ट मीटरची उपयोगिता समजावून सांगितली. या सोबतच वीज ग्राहकांच्या समाधानासाठी ३५८ ठिकाणी समानांतर मीटर लावण्यात आले. यामुळे स्मार्ट मीटर वेगाने फिरते हा गैरसमज दूर होण्यास मदत झाली वसई -विरार, नालासोपारा, परिसरातील वीज ग्राहकांच्या समाधानासाठी यापुढे देखील समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांनी मागणी केली तर समानांतर मीटर लावण्यास महावितरण तयार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता माणिक राठोड यांनी दिली.
००००००

बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुली स्क्वॉश स्पर्धा
मुंबई, ३ सप्टेंबर: ४९व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेत पुरुष आणि महिला गटामध्ये दुसरा मानांकित राहुल बैठा आणि तिसरी मानांकित रथिका सीलन हिने अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले. बॉम्बे जिमखाना ग्लासबॅक कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत गुरुवारी दुसऱ्या सीडेड राहुल बैठाने टॉप सीडेड ओम सेमवालवर चुरशीच्या लढतीत २-११, ११-७, ३-११, ११-५, ११-७ असा विजय मिळवला. तीन गेमनंतर राहुल हा १-२ असा पिछाडीवर होता. मात्र, शेवटचे दोन गेम जिंकत त्याने जेतेपदाला गवसणी घातली. महिला एकेरीच्या एकतर्फी फायनलमध्ये तिसऱ्या/चौथ्या मानांकित रथिका सुथंथिरा सीलन हिने दुसऱ्या सीडेड आकांक्षा साळुंखेचा ११-५, ११-३, ११-३ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये टॉप सीडेड पुरव रांभियाने अगस्त्य बन्सलला ११-१, ११-३, ११-२ असे सहज हरवले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित आकांक्षा गुप्ताने दुसऱ्या मानांकित व्योमिका खंडेलवालवर ११-४, ११-४, ११-२ अशी सहज मात करत केली.
निकाल (सर्व अंतिम फेरी): १९ वर्षांखालील मुली: आकांक्षा गुप्ता विजयी वि. व्योमिका खंडेलवाल ११-४, ११-४, ११-२.
१९ वर्षांखालील मुले: पुरव रांभिया विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-१, ११-३, ११-२.
महिला: रथिका सुथंथिरा सीलन विजयी वि. आकांक्षा साळुंखे ११-५, ११-३, ११-३.
पुरुष: राहुल बैठा विजयी वि. ओम सेमवाल २-११, ११-७, ३-११, ११-५, ११-७.
मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धा
मुंबई, ३ सप्टेंबर : गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आणि बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धेत (२०२६) १३ वर्षांखालील मुलींच्या गटात राऊंड ऑफ १६ फेरीत अव्वल मानांकित हेजल जोशीने शनाया बन्सल १५-४, १५-२ असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात लिओरा डिसिल्वाने सायना सावला हिला १५-8, १५-8 असे हरवले. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या राऊंड ऑफ १६ फेरीमध्ये चित्तेश राझदानने झियान घिया याच्यावर ११-१५, १५-१३, १५-९ अशी मात केली.
निकाल – १३ वर्षांखालील मुली (राऊंड ऑफ १६ फेरी): हेजल जोशी विजयी वि. शनाया बन्सल १५-४, १५-२; रिदा सिद्दीकी विजयी वि. आराध्या दळवी १५-२, १५-०; निकिता गौतम विजयी वि. नितारा जैन १५-३, १५-०; रिशा पटेल विजयी वि. टियाना भानुशाली १५-१२, १५-६; लिओरा डिसिल्वा विजयी वि. सायना सावला १५-8, १५-8; मायरा गोराडिया विजयी वि. शनाया पै १५-६, १५-१३; अनन्या जैस्वाल विजयी वि.अनया शेठ १५-९, १५-३.
१३ वर्षांखालील मुले (राऊंड ऑफ १६ फेरी): अजिंक्य देसाई विजयी वि. विराज सिंग १५-६, १५-७; देवांश पांडे विजयी वि. निर्वाण शहा १५-५, १५-8; चित्तेश राझदान विजयी वि. झियान घिया ११-१५, १५-१३, १५-९; रेयांश कुमार विजयी वि. निहित रहाळकर १५-४, १५-७.
००००

मुंबई: संत हारळे चैरिटेबल ट्रस्ट LIC पुरस्कृत यांच्या वतीने आयोजित ‘दहीहंडी मनसे सराव शिबिर २०२६’ भायखळा घोडपदेव येथे उत्साहात पार पडले. या सराव शिबिराला विविध गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला मनसे सरचिटणीस संजय नाईक, मनसे नगरसेविका सुप्रिया दळवी, नगरसेवक रमाकांत रहाटे, जगदीश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. या सराव शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते परशुराम क्रीडा मंडळाचे थरारक सादरीकरण. मंडळाच्या गोविंदांनी तब्बल ८ थर रचून ४ चंद्र लावण्याची दमदार कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांना सरावासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना आणि खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या शिबिरामागे होता. परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन मनसे विभागाध्यक्ष अमोल रोग्ये आणि विभाग सचिव महेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे शिबिराला मोठे यश मिळाले.“एकजुटीची ताकद… मनसेची ताकद!” या घोषणेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
००००
राष्ट्रीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा
मुंबई… नांदेड येथे आयोजित १७व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या या यशात रायगडच्या खेळाडूंनी मोठा हातभार लावला.रायगडच्या खेळाडूंनी या स्पर्धेत ३१ सुवर्ण, १४ रौप्य आणि ६ कांस्य पदके अशी एकुण ५१ पदकांची घसघशीत कमाई केली. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पदक विजेत्या खेळाडूंना थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व रायगड थाई बॉक्सिंग चे अध्यक्ष . निलेश भोसले, थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ पनवेल शहर अध्यक्ष प्रतिक कारंडे , उरण तालुका अध्यक्ष सुरज टकले, प्रशिक्षक – सुरेश राठोड, रोहित तळी, योगेश बैकर, प्रथम बहिरा यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे थायबॉक्सिंग इंडियन फेडरेशन अध्यक्ष-कुलदीप सुमनाक्षर सचिव-रविंद्र सिंह ,
थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर , अध्यक्ष फरहान नबिजी यांनी अभिनंदन केले .
पदक विजेते खेळाडू. …
सुवर्ण- अविशा शिंदे ,जिजा भोसले,त्रिशा भोसले, चैत्राक्षि काकडे,वर्धन कदम, फिरोज अन्सारी, अनिकेत दुशिंग, मयूर जाधव, करण शिरोडकर, ऋषिकेश कुमार, एलीजा आदाकुल्ला, मन्मय जट, अथर्व मदाने, वंश कोकरे, जिया मांजरेकर, सानवी सावंत, तन्वी शर्मा, रिया सेल, काव्या शेजाळे, श्रेया कुंडलकर, यशस्वी सावडेकर, विक्रांत खुटले, श्रेयश पवार, शुभम पवार, प्रिशा पाटील, स्नेहा राऊत, प्रभास रहाटे, आर्या लेंडवे, आस्था भगत, दर्शित माळी, श्रेया रहाटे
रौप्य – वैष्णवी सावंत, स्वामिनी शिर्के, अनन्या पाटील, सोहम सावंत, प्रात्विक मुंडले, आराध्या नंबियार, अवनीश कंक, प्रियल पानसे, आगस्त्या वैदू, शिवांक राणा, आरव नायर, अद्विका गरगडे, निष्ठा चंदाणे, रायांश जाधव
कांस्य – मृगाक्षी पॉल, नक्ष मोरे, अस्मिता शिंदे, गुरु जाधव, केशव पाटील
०००
सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या ‘ज्युनिअर सायंटिस्ट’चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक
अनिल ठाणेकर
ठाणे-ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात झेप घेणारे बदलापूरचे सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली असून, या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पुणे येथील ‘स्पेसक्रॅट्स विद्यापीठ’ संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांमधून टप्प्याटप्प्याने निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत देशभरातून १ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. या खडतर प्रक्रियेतून ठाणे जिल्ह्यातील सोहम साळवे या विद्यार्थ्याने स्थान मिळवत ज्युनिअर सायंटिस्टचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सोहमला नुकताच प्रतिष्ठित ‘बदलापूर रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बदलापूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सोहमने वयाच्या अवघ्या नवव्या-दहाव्या वर्षापासून इस्रो-मॅजिका आणि स्पेसक्रॅटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सुरू केले होते. मागच्या तीन वर्षांच्या काळात त्याने अंतराळ आणि ब्रह्मांड या विषयावर तब्बल तीन पुस्तके लिहिली असून, तो सध्या ‘इंटरनॅशनल सायंटिस्ट प्रोग्राम’च्या दुसऱ्या वर्षात संशोधन करत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स स्पर्धेत त्याने सलग दोन वर्षे सहभाग नोंदवून गतवर्षी ‘सिल्व्हर ऑनर’ तर यावर्षी ‘ब्राँझ ऑनर’ पटकावले आहे. सोहमने एका लघुग्रहाचेही यशस्वी संशोधन केले आहे.
त्याचप्रमाणे डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयात इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणारी अदिती प्रवीण ठक्कर हिनेही अविरत मेहनत घेत अंतराळ विज्ञानात मोठे यश संपादन केले आहे. आठवीत असल्यापासून अवकाश संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अदितीने ब्रह्मांडात तब्बल १६ लघुग्रहांचा शोध लावला आहे. तिच्या या संशोधनाची थेट अमेरिकेच्या ‘नासा’ (NASA) या जागतिक अंतराळ संशोधन संस्थेने अधिकृत दखल घेत आपल्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे.
या दोन्ही बालवैज्ञानिकांचे शिक्षक डॉ. युवराज लांबोळे आणि स्पेस सायंटिस्ट प्रवीण वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेसक्रॅट्स विद्यापीठाने इस्रो, नासा अशा नामांकित जागतिक संस्थांशी संलग्नता ठेवली आहे.त्यांच्याकडे ॲनालॉग ॲस्ट्रॉनॉट, रॉकेट सायंटिस्ट आणि तरुण संशोधकांसह ३७ तज्ज्ञांची भक्कम टीम कार्यरत आहे.
देशाचे पंतप्रधान आणि इस्रोचे स्वप्न असलेल्या ‘हर घर से सायंटिस्ट’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी या टीमने पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य स्पेस रिसर्चचे प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी या दोन्ही ज्युनिअर सायंटिस्टची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारचा मोफत अंतराळ प्रशिक्षण उपक्रम राबवणारा ठाणे हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असून, येथूनच पुढे संपूर्ण देशव्यापी मोहिमेची सुरुवात होणार आहे.
या विशेष भेटीदरम्यान डॉ. युवराज लांबोळे, अवकाश वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांच्यासह सोहम साळवे आणि अदिती ठक्कर यांचे पालक व जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे, संशोधक वृत्तीचे आणि पुस्तकरूपी लेखनाचे मनापासून कौतुक करत त्यांना अंतराळ मोहिमांमध्ये भारताचे नाव आणखी मोठे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रकरणी
अनिल ठाणेकर
ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सध्या अनागोंदी माजली आहे. जेवणात झुरळ मिळत आहेत. शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना २४ तास काम करूनही सुविधा दिल्या जात नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पालिका अधिकारी भगवान शिंदे आणि रूग्णालय अधिष्ठात्री स्वप्नाली कदम यांना चांगलेच फैलावर घेतले. जर, येत्या आठ दिवसात परिस्थितीत सुधारणा केली नाही तर रूग्णालयातच आंदोलन केले जाईल, असा इशारा नताशा आव्हाड आणि गटनेते अभिजीत पवार यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील अनागोंदीबाबत नताशा आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी गटनेते कार्यालयात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांकडून असंबद्ध माहिती दिल्याने नताशा आव्हाड आणि अभिजीत पवार हे चांगलेच संतप्त झाले.
या बैठकीनंतर बोलताना नताशा आव्हाड म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात एका रुग्णांच्या जेवणात झुरळ सापडले होते. या संदर्भात आम्ही रूग्णालयाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी तेथे एवढी अस्वच्छता होती की आम्हाला तिथे उभे राहणे शक्य होत नव्हते, कॅन्टीनच्या बाजूला एक शौचालय आहे, त्या शौचालयामध्येच कॅन्टीनमधील भांडी धुतली जात होती. याच ठिकाणी बांधकामाचा राडारोडा पडलेला होता. याबाबत, ठामपाच्या बांधकाम विभागाचे अधिकारी भगवान शिंदें यांना विचारणा केली असता, “आम्ही एकदम पटापट हे काम करू”, असे उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर गोलमाल आहे. आम्ही सहा महिन्यांपूर्वी विजिट केली होती, तेव्हाही कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते, आजही कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे.
रुग्णालयाच्या बाहेर बायोमेडिकल वेस्ट, चक्क सॅनिटरी पॅडसारख्या वस्तू उघड्यावर टाकल्या जात आहेत. सर्वात मोठा विषय म्हणजे, प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्स चोवीस- चोवीस तास, काम करतात. त्या नंतर ते हॉस्टेलच्या रूममध्ये जेव्हा जातात, तेव्हा तिथेही त्यांना घाणीत आराम करावा लागत आहे. प्रसाधनगृहातील नळ॔ तुटलेली आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांचे पाणी बंद केले होते. हा प्रकार मानवतेला अनुसरून नाही. आम्ही हा प्रकार सहन करणार नाही, असेही नताशा आव्हाड म्हणाल्या.
गटनेते अभिजीत पवार यांनी, सदर बैठकीत भगवान शिंदे हे उडवाउडवीची उत्तरे देत होते. पार्किंगच्या वादातून ते प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्सवर झालेल्या वादाचा ते राग काढत आहेत. दिवसरात्र काम करणाऱ्या डाॅक्टर्सचे पाणी तीन दिवस बंद करण्यात आले होते. हे सहन करण्यासारखे नाही. आता त्यांना आठ दिवसाची मुदत दिली आहे. आठ दिवसात जर मार्ग निघाला नाही तर अकरा तारखेला आम्ही रूग्णालयावर धडक देऊ आणि सुविधा मिळेपर्यंत तिथेच बसून राहू, असा इशारा दिला.
