प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशसेवेचे स्वप्न साकार; मुरबाड तालुक्यात अभिमानाचे वातावरण
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील फणसोली गावचा सुपुत्र संविधान रविंद्र चंदने याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संविधान हा रेखा व रविंद्र चंदने यांचा सुपुत्र असून त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शांत, संयमी आणि जिद्दी स्वभावाचा संविधान लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून होता. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने शिक्षण आणि सैन्यभरतीची तयारी यामध्ये सातत्य राखत कठोर परिश्रम घेतले. औरंगाबाद येथील डिफेन्स शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करताना तो कुटुंबापासून दूर राहिला. त्यानंतर कल्याण येथे एनसीसीचे प्रशिक्षण घेत असताना रोजचा कल्याण-मुरबाड प्रवास, वेळेचे काटेकोर नियोजन आणि शारीरिक मेहनत या सर्व आव्हानांचा त्याने खंबीरपणे सामना केला.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी देशसेवेचे स्वप्न कधीही डळमळू दिले नाही,” असे संविधानने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय तो आई रेखा चंदने यांनी दिलेल्या संस्कारांना तसेच वडील रविंद्र चंदने यांच्या सामाजिक कार्यातून मिळालेल्या प्रेरणेला देतो.
संविधानच्या या यशामुळे फणसोली गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून युवकांसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, हे संविधान चंदने याने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
0000
१,५७० ग्राहकांचे सर्व मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर
रायगड : राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या शाखा कार्यालयातील सर्व १,५७० वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर करण्यात आले असून रायगड जिल्ह्यात १०० टक्के स्मार्ट मीटर बसविणारे हे पहिले शाखा कार्यालय ठरले आहे.
महावितरणच्या कोंकण प्रादेशिक विभागाने आतापर्यंत सर्वाधिक ४३ लाख ३ हजार स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यामध्ये भांडुप परिमंडलाने १० लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसवून राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. रायगड जिल्ह्यात पेण मंडळ कार्यालयांतर्गत चार विभाग, १७ उपविभाग आणि १०५ शाखा कार्यालये कार्यरत असून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक व पारदर्शक वीज वापराची माहिती मिळत आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज वापरावर लक्ष ठेवणे शक्य होत असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर घरगुती ग्राहकांना सवलतीचाही लाभ मिळत आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३.४० लाख वीज ग्राहकांना एकूण २.८३ कोटी रुपयांची वीजबिल सवलत देण्यात आली आहे.
चौल-२ शाखा कार्यालयाची ही यशस्वी कामगिरी शाखा अभियंता देवरत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती व प्रबोधन करून साध्य केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वीज वापरावर नियंत्रण आणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक सुलभ होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. ही मोहीम अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड आणि उपविभागीय अधिकारी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
0000000
कल्याण : दि.ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व आकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आकाश पाटील हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाते. आधुनिक व्यवस्थापन, वित्तीय नियोजन आणि विकासाभिमुख विचारसरणी यांचा उत्तम समन्वय साधत त्यांनी सामाजिक, व्यावसायिक आणि सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांशी असलेला त्यांचा घनिष्ठ संपर्क, जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि विकासासाठीची बांधिलकी यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मोठा पाठिंबा लाभला. तर माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाचा वारसा लाभलेल्या आकाश पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार, शेतकरी व सभासद-केंद्रित धोरणे आणि बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस दृष्टीकोन मांडला आहे.
आकाश पाटील याचे आजोबा स्व.बाळाराम पाटील हे १९८६ पासून ते २००८ पर्यंत बँकेवर संचालक मंडळावर होते आणि ते ४ वेळा अध्यक्ष होते.आकाशचे वडील बाबाजी पाटील हे सुद्धा २००८ ते २०२६ पर्यंत संचालक मंडळावर होते आणि ते दोन वेळा अध्यक्ष होते. आकाश पाटील यांच्या रूपाने पाटील कुटुंबीयची तिसरी पिढी बँकेच्या राजकारणात सक्रिय झाली आहे.
आपल्या निवडीबद्दल बोलताना आकाशने सांगितले की, “ही निवड माझ्या वैयक्तिक यशाची नसून ठाणे तालुक्यातील सभासद, शेतकरी, सहकारी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अधिक सक्षम, आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन. युवा शक्ती, तंत्रज्ञान आणि सहकार यांचा संगम घडवून बँकेच्या प्रगतीस नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न राहील.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासह दुभाजक रंगविणे व वृक्षारोपणावर भर
सुनिल इंगळे
उल्हासनगर : शहरातील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकाम प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामांना गती देऊन ती दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत रस्ते बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना आमदार आयलानी यांनी बहुतांश कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी ती अपूर्ण असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत त्यांनी अनावश्यक विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही दिला.
रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष भर देत, ज्या ठिकाणी काम मानकांनुसार झालेले नाही, त्या भागांची पुनर्बांधणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक निधीतून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टिल्सन मार्केट परिसरातील पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेबाबत महापालिकेचे अभियंता संदीप जाधव यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी जाधव यांनी कल्याण-अंबरनाथ रस्ता तसेच हनुमान मंदिर परिसरात आवश्यक ड्रेनेज व्यवस्था विकसित करण्यात आल्याची माहिती दिली.
आमदार आयलानी यांनी डॉल्फिन रोडवरील दुभाजकांना पुन्हा रंग देण्याचे तसेच उच्च दर्जाचा एक मिलिमीटर जाडीचा रंग वापरण्याचे निर्देश दिले. याशिवाय पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासह पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्यावर त्यांनी भर दिला. राधास्वामी परिसरातील रस्ते बांधकाम अद्याप सुरू न झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. वाहतूक वळविण्याची प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित कंत्राटदाराने दिले.
दरम्यान, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून विविध चौकांच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी आवश्यक मार्किंगबाबत माहिती घेतली. पुढील आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील प्रमुख चौकांची कामे प्राधान्याने पूर्ण करून त्यांचे आकर्षक सुशोभीकरण करण्याचे निर्देशही आमदारांनी दिले. बैठकीच्या शेवटी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या शहर अभियंत्यांना रस्ते प्रकल्पांवर नियमित देखरेख ठेवून गुणवत्ता तपासणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी शहर अभियंता निलेश शिरसाटे, अभियंता संदीप जाधव, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, वाहतूक विभागाचे नाना आव्हाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत मानकर, अनिल पाटील तसेच कल्याण-अंबरनाथ रस्ता प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र
कल्याण : डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील शिष्यवृती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी माहिती दडपणे, चौकशी टाळणे, तक्रारदारावर पुरावे सादर करण्याचा दबाव आणणे याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया समोर झुरळ फेको आंदोलन करण्याचा इशारा सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रोहिदास सुरवसे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे.
प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी सुरवसे यांच्याकडून कथित शिष्यवृती घोटाळ्याबाबत पुरावे व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितले आहे. हि बाब अत्यंत गंभीर, कायदेशीरदृष्ट्या चुकीची व प्रशासनिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न दर्शविणारी आहे. सुरवसे यांनी वेळोवेळी के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डॉबिवली येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती, आर्थिक अनियमितता, निधी अपहार, विद्याथ्यांच्या हक्कांचे उल्लंघन तसेच विविध प्रशासकीय गैरप्रकारांबाबत शासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अनेक आरटीआय अर्ज करुन संबंधित माहिती मागविण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत संबंधित विभाग व महाविद्यालयाकडून कोणतीही संपूर्ण, सत्य व कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
विशेष बाब म्हणजे, सेव एज्युकेशन सोसायटी व सेव पेंडरकर कॉलेज संदर्भातील विविध आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, प्रशासकीय गाँधळ व गंभीर घोटाळ्यांबाबत गेल्या दीड वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. या तक्रारींची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने स्वतः के. व्ही. पेंडरकर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. शासनाने काढलेल्या प्रशासक नियुक्ती आदेशामध्ये देखील संस्थेमध्ये गंभीर अनियमितता व प्रशासकीय बिघाड असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
अशा परिस्थितीत देखील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रत्यक्ष चौकशी करण्याऐवजी तक्रारदारालाच “तुम्ही पुरावे द्या, मग आम्ही कारवाई करू” असे सांगितले जात आहे, ही बाब अत्यंत धक्कादायक, निषेधार्ह व संशय निर्माण करणारी आहे. माहिती अधिकार अंतर्गत माहिती न देणे आणि त्यानंतर तक्रारदाराकडूनच पुरावे मागणे हे वस्तुतः माहिती दडपण्याचा व चौकशी टाळण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे आहे.
त्यामुळे तक्रारदाराकडून अशक्य स्वरूपाचे पुरावे मागण्याऐवजी संबंधित सर्व अभिलेख स्वतः ताब्यात घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सन २०१० पासून आजपर्यंतच्या सर्व शिष्यवृत्ती निधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे. उपयोगिता प्रमाणपत्रांची सत्यता तपासणी करण्यात यावी, व मंजूर व वितरित शिष्यवृत्तीची तुलना रिपोर्ट द्यावा. माहिती दडपणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक हक्कांशी संबंधित या गंभीर प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व माहिती अधिकार अंतर्गत मागविलेली सर्व माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी सेव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणात निष्पक्ष व प्रभावी कारवाई न झाल्यास दिनांक २० जून रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथील प्रकल्प अधिकारी यांच्या दालनासमोर समोर झुरळ फेको आंदोलन करण्याच्या इशारा रोहिदास सुरवसे यांनी दिला आहे.
00000000000
त होते.
000000000
दिवा, दि. 3 जून (आरती परब) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन दिवा शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० मे पूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, पावसाळा तोंडावर असताना देखील कामांचा वेग अत्यंत संथ असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अल्प पावसातही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळेल असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यावर्षी नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एवढा मोठा खर्च करूनही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने होत नसल्यास तो सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे. दिवा प्रभाग समिती मधील प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मध्ये मोठा गाजावाजा करत नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. संबंधित नालेसफाईच्या कंत्राटदाराला सहाय्यक आयुक्तांसमोरच फोन केला असता कंत्राटदाराने २५० कामगार नालेसफाई साठी काम करत असल्याची माहिती दिली. पण काम कुठे सुरू आहे याची माहिती विचारातच कुठलेही समाधानकारक उत्तर कंत्राटदाराला देता आले नाही. ज्या स्वच्छता निरीक्षकांनी या सर्व कामावर देखरेख ठेवायला हवी त्या स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी यांनाही नालेसफाई नेमकी कुठे सुरू आहेत, तिथे किती कामगार काम करतात याची माहिती नव्हती.
अशा पद्धतीने जर दिवा शहरात कामे होत असतील तर नालेसफाई कशा पद्धतीने होत असेल याचा विचार न केलेला बरा, असे मनसेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. ठाणे महापालिकेने ८०% नालेसफाई झाल्याचा दावा केलेला असताना दिव्यात मात्र सगळा सावळागोंधळ दिसून येत आहे. दिव्यात सध्या २०% ते २५% नालेसफाई झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांना मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा दिवा मनसेने दिला आहे. यावेळी दिवा शहराध्यक्ष तुषार भास्कर पाटील, शहर सचिव प्रशांत प्रभाकर गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, शरद पाटील, संतोष पाटील, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थि
– राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
अशोक गायकवाड
मुंबई : ‘भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचे दृढ बंध असून या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण भारत दौऱ्यावर आलो आहोत. आर्थिक सहकार्य, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढविणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे’, असं मत म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. त्यापूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग बोलत होते.
राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग म्हणाले की, भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांचा वसाहतवादाचा समान इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही दोन्ही देशांमधील संबंध कायम घनिष्ठ राहिले आहेत. भारत आणि म्यानमार यांच्यात सुमारे १,६०० किलोमीटरची भौगोलिक सीमा असून विस्तीर्ण सागरी सीमाही दोन्ही देशांना जोडते. त्यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि परस्पर सहकार्याच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
भारत भेटीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई दौऱ्यात त्यांनी जवाहरलाल नेहरू बंदराला भेट देऊन व्यापार परिषदेत सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत वैद्यकीय पथके, तात्पुरते रुग्णालय, मदतसामग्री आणि मानवतावादी सहाय्य पाठविल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. कोविड-१९ काळात भारताने पुरविलेल्या लस, ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्नसामग्रीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, भगवान बुद्ध हे भारत आणि म्यानमार यांना जोडणारे अध्यात्मिक सेतू आहेत. विपश्यना साधना पद्धती भारतात लुप्त होत असताना म्यानमारने ती जतन केली आणि आज जगभरातील लाखो लोकांना त्याचा लाभ होत आहे. भारतातील बुद्धिस्ट सर्किटमुळे दोन्ही देशांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणांमध्ये म्यानमारला विशेष महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद करत राज्यपालांनी म्यानमार हा भारतासाठी आग्नेय आशिया आणि आसियान देशांकडे जाणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांच्या भारत भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, भारताचे म्यानमारमधील राजदूत अभय ठाकूर, म्यानमारचे भारतातील राजदूत तसेच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
त्यानंतर आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमास राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मरिटाईम एअर ऑपरेशन्सचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0000000000
नालेसफाईनंतरचा गाळ व कचरा तात्काळ हटविण्याबाबत आयुक्तांची सूचना
मिरा-भाईंदर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांनी विविध भागांतील नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान मूर्धा खाडी, राई गाव, डोंगरी आईस फॅक्टरी परिसर, पाली, गणेश देवल नगर, प्रशांत हॉटेलजवळील रेल्वे समांतर नाला, एस.एन. कॉलेज परिसर, चाळघर उघाडी, काशिमीरा हायवे तसेच महाजनवाडी येथील बाप्पा सीताराम मंदिर ते महाविष्णू मंदिर परिसरातील प्रमुख नाले आणि जलनिस्सारण मार्गांची तपासणी करण्यात आली. यावेळी नालेसफाईची गती, कामाचा दर्जा, गाळ उपसा, कचरा निर्मूलन आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व नालेसफाईची सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले, गटारे आणि जलनिस्सारण मार्गांची साफसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना आयुक्तांनी उर्वरित कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि इतर अडथळे तातडीने हटविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ व कचरा रस्त्यालगत अथवा नाल्यांच्या कडेला दीर्घकाळ न ठेवता त्याची तात्काळ विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन कामांना अधिक गती देण्यास सांगितले.
महानगरपालिकेकडून यंदा मान्सूनपूर्व नाले सफाईची कामांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित क्षेत्रीय पाहणी केली जात आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि जलमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन, उद्यान अधीक्षक नागेश वीरकर, स्वच्छता निरीक्षक, संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.
दोन तरुणांचा मृत्यू
कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-मुरबाड महामार्गावर वरप येथे मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टिटवाळा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर मुरबाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून येणारी बर्कमन गाडी कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीतील तीनपैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतांची ओळख पवन गुप्ता (वय २८, रा. चोप्रा कोर्ट, उल्हासनगर) आणि राजू गुप्ता (वय २२, रा. वरप) अशी झाली आहे. अपघातात जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच कंटेनर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले, “वरप परिसरात पहाटे झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.”
निवडणुकी वेळी निकष आठवले नाहीत का?; महायुती सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा राज्यातील महिलांच्या विश्वासाचा घात असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांची मते मिळवण्यासाठी योजना जाहीर करण्यात आली, मात्र सत्तेत आल्यानंतर निकष आणि अटींचा आधार घेत लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान ही रक्कम २,१०० रुपये करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून राज्यातील महिलांनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने विविध निकष लागू करून लाखो महिलांना योजनेतून वगळण्यास सुरुवात केली आहे.
महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत विविध नियम, अटी आणि शर्थी लागू करत लाभार्थींची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले असून आता तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील महिलांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्षा गायकवाड यांनी पुढे म्हटले की, निवडणुकांच्या काळात मोठमोठी आश्वासने देणारे भाजप आणि महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची पूर्तता करण्यात अपयशी ठरत आहे. महिलांना २,१०० रुपये देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. उलट सध्या मिळणाऱ्या लाभावरही गदा आणली जात असल्याने महिलांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका ही महिलांप्रती अन्यायकारक असून राज्यातील महिलांच्या भावना दुखावणारी आहे, अशी टीकाही खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
