30 May Bitambatmi All pages

Open Book

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक वास्तव आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’मधून श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानवी संघर्ष यांचा वेगळा दृष्टिकोन मांडला होता. तब्बल अकरा वर्षांनंतर आलेला देऊळ बंद २ हा चित्रपट केवळ त्या कथेला पुढे नेणारा सिक्वेल नाही, तर तो आजच्या ग्रामीण वास्तवावर, शेतकऱ्यांच्या मानसिक तणावावर आणि श्रद्धेच्या बदलत्या अर्थावर भाष्य करणारा संवेदनशील सिनेमॅटिक अनुभव ठरतो.
कथानक : श्रद्धा, वेदना आणि आत्मसंघर्ष
चित्रपटाची सुरुवातच एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाने होते. संगीता पायगुडे (स्नेहल तरडे) ही संकटांनी ग्रासलेली शेतकरी महिला आयुष्याच्या टोकावर पोहोचलेली असते. कर्जबाजारीपणा, सामाजिक दबाव आणि सततची निराशा यामुळे तिचा देवावरचाच विश्वास उडालेला असतो. नदीकाठी असलेल्या स्मशानाजवळ ती देवाला जाब विचारते आणि त्याच क्षणी तिच्यासमोर श्री स्वामी समर्थ (मोहन जोशी) प्रकट होतात.यानंतर सुरू होतो श्रद्धा आणि वास्तवाचा प्रवास. स्वामी फक्त संगीतालाच दिसत असल्याने तिच्या वागण्याकडे इतर जण संशयाने पाहतात. तिच्यासोबत तिचा दीर आणि त्याचा मित्र रफीक असतो. संगीता स्वामींना परीक्षा द्यायला लावते, मात्र कोणताही चमत्कार न करता ती पूर्ण करण्याची अट ठेवते. या कथानकातून चित्रपट शेतकरी आत्महत्या, मानसिक खच्चीकरण, सामाजिक असंवेदनशीलता आणि राजकीय व्यवस्थेवर थेट भाष्य करतो.चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कुठेही प्रवचनात्मक वाटत नाही. कथा हळूहळू उलगडत जाते आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

अभिनय : स्नेहल तरडे यांची दमदार छाप

चित्रपटातील सर्वात प्रभावी बाजू म्हणजे स्नेहल तरडे यांचा अभिनय. ‘संगीता’ ही व्यक्तिरेखा भावनिकदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीची आहे. देवावरचा विश्वास हरवलेली, आतून तुटलेली आणि परिस्थितीशी झुंजणारी स्त्री त्यांनी अत्यंत ताकदीने साकारली आहे. त्यांच्या अभिनयातील रांगडेपणा आणि भावनिक हळवेपणा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.मोहन जोशी यांनी साकारलेले स्वामी समर्थ हे चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण आहे. त्यांच्या शांत, संयमी आणि प्रसंगी हलक्या विनोदाने भारलेल्या अभिनयातून स्वामी समर्थांची प्रतिमा प्रभावीपणे उभी राहते. विशेष म्हणजे गंभीर आजारातून सावरल्यानंतर त्यांनी ही भूमिका साकारल्यामुळे त्यांच्या अभिनयाला वेगळी भावनिक किनार लाभते. प्रवीण तरडे यांनी ‘सदू शेठ’ या भूमिकेत नकारात्मक व्यक्तिरेखेचे प्रभावी चित्रण केले आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक म्हणून त्यांनी कथा कुठेही भरकटू दिलेली नाही.
प्रसाद ओक, महेश मांजरेकर आणि ओम भूतकर यांच्या अतिथी भूमिका अल्प असल्या तरी प्रभावी ठरतात. त्यांच्या व्यक्तिरेखांभोवती ठेवलेली गुप्तता उत्कंठा वाढवते. तसेच सविता मालपेकर यांनी कथेला भावनिक आधार दिला आहे.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन चित्रपटाची ताकद ठरते. ग्रामीण वास्तव आणि अध्यात्म यांचा समतोल त्यांनी उत्तम साधला आहे. चित्रपट श्रद्धेला महत्त्व देतो, मात्र अंधश्रद्धेला कुठेही खतपाणी घालत नाही, ही त्याची मोठी जमेची बाजू.सिनेमॅटोग्राफर प्रशांत मिसळे यांनी ग्रामीण भागातील दृश्ये अत्यंत सुंदर टिपली आहेत. गावाकडचा निसर्ग, शेतकऱ्यांचे जगणे आणि त्यामागील उदास वास्तव कॅमेऱ्यातून प्रभावीपणे समोर येते. तन्मय भिडे यांचे संगीत कथेला पूरक ठरते. संवाद दमदार आणि लक्षात राहणारे आहेत.

सामाजिक वास्तवावर थेट भाष्य

‘देऊळ बंद २’ हा केवळ भक्तीप्रधान चित्रपट नाही. तो शेतकरी आत्महत्या, नैराश्य, कर्जबाजारीपणा आणि समाजातील असंवेदनशीलता यांसारख्या गंभीर प्रश्नांवर भाष्य करतो. चित्रपट श्रद्धेचा आधार देतो, मात्र समस्यांवर चमत्कारिक उपाय सुचवत नाही. त्यामुळे तो वास्तववादी वाटतो.आजच्या काळात मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारे चित्रपट कमी होत चालले आहेत. अशा वेळी ‘देऊळ बंद २’ हा सामाजिक आशय आणि भावनिक ताकद यांचा संतुलित संगम साधणारा चित्रपट ठरतो.

श्रद्धा, भक्ती, सामाजिक वास्तव आणि भावनिक संघर्ष यांचा प्रभावी संगम अनुभवायचा असेल तर ‘देऊळ बंद २’ नक्की पाहावा असा चित्रपट आहे. सशक्त अभिनय, प्रभावी संवाद, वास्तववादी मांडणी आणि भावनिक गाभा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ राहतो. विशेष म्हणजे चित्रपटाच्या शेवटी ‘देऊळ बंद ३’ची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

 

संघर्ष रहिवासी संघटनेचे केडीएमसी, पोलिसांना पत्र

कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी संघर्ष रहिवासी संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

टिटवाळा येथील इंदिरानगर स्मशानभुमी रस्ता विभागात सतत घरांमध्ये चोरी, दुचाकी चारचाकी वाहन चोरी, मोबाईल चोरी अशा अनेक चोरीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असुन महिला मुलींचे छेडछाड करणारे टपोरी मुले माणसं यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं रस्त्यावर बसून गांजा दारू बियर खुलेआम पित बसतात. या सर्व समस्यांबाबत संघर्ष रहिवासी संघटनेने स्थानिक पोलिस ठाणे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत. यावर लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे आश्वासन केडीएमसी आणि पोलीस प्रशासनाने दिले आहे.

 

 

कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक २८ मे रोजी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आरोग्य योगा अँड नॅचरोपॅथी, जीवन फाउंडेशन व डॉक्टर विजय कुकरेजा यांच्या नेतृत्वाखाली २५ दिवसीय योग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रम प्रसंगी मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग जिल्हा समन्वयक जीवन विचारे, ह.भ.प. कैलास महाराज नचिते, अनिल घरत, जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, स्मिता घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, प्रकाश रोहणे, मुख्याध्यापिका भावना कुंभार, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, प्रा. डॉ. संदेश जायभाय यांच्यासह योगा शिक्षक उपस्थित होते.

शरीराला स्वास्थ्य व मनाला शांतता देण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे याचे सर्वोत्परी महत्त्व डॉक्टर विजय कुकरेजा यांनी विद्यार्थी प्राध्यापक व उपस्थित मान्यवर मंडळींना समजावून सांगितले. या योग महोत्सवाचा डिजिटल स्क्रीनवर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आमदारांनी देखील सर्वांना योगा बाबत योग्य मार्गदर्शन केले. या योग प्रशिक्षणाचा पाया जीवनदीप महाविद्यालयात आज रोवला गेला महाविद्यालयात योगा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.

 

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची मागणी

ठाणे : चितळसर-मानपाडा येथील १९३ एकर वन जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाणे महापालिकेने समझोता केल्यानंतर देण्यात येणाऱ्या २८०० कोटींच्या `टीडीआर’बाबत महापालिका आयुक्तांनी ठाणेकरांना खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. तसेच २८०० कोटींचा `टीडीआर’ शहरात वापरल्यास नागरी सुविधांचा बोजवारा उडेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

मेसर्स डी. दाह्याभाई अँण्ड कंपनीच्या मालकीची १९३ एकर जमीन असल्याचा निर्णय व उद्यान आरक्षणाचा हक्क सर्वोच्च न्यायालयाने अबाधित ठेवला. तसेच या निकालानंतर जमिनीच्या मोबदल्यात २८०० कोटी रुपयांचा `टीडीआर’ देण्याची प्रक्रिया ठाणे महापालिकेकडून वेगाने सुरू झाली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यावरुन ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे. तब्बल २८०० कोटी रुपयांचा `टीडीआर’चा हक्क देण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय हा ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांवर विपरित परिणाम करणारा ठरेल, असे भाकित नारायण पवार यांनी केले आहे.

मेसर्स डी. दाह्याभाई अँण्ड कंपनीबरोबर महापालिकेने समझोता करण्याचा निर्णय का घेतला? या निर्णयावर अंतिम स्वाक्षरी, समझोत्याची शिफारस आणि समझोत्याचा प्रस्ताव कोणी तयार केला. या निर्णयाबाबत वन विभागाला अवगत केले होते का, संबंधित जागेचा टीडीआर देण्याबाबत एप्रिल २०१९ मध्ये निर्णय कोणत्या अधिकाऱ्याने घेतल्या. तसेच त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणत्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या, या कंपनीबरोबर समझोता करण्याबाबत महापालिकेने महासभेला विश्वासात का घेतले नाही, असे सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी उपस्थित केले आहेत. तसेच या कंपनीबरोबर समझोता करण्याची घाई का केली, समझोता केला नसता, तर महापालिकेचे व ठाणेकरांचे कोणते नुकसान होत होते, याबद्दल माहिती देण्याची मागणी केली आहे.

मेसर्स डी. दाह्याभाई अँण्ड कंपनीने जुने ठाणे व महापालिका क्षेत्रातील दाटीवाटीच्या क्षेत्रात वापरल्यास टीडीआर वापरल्यास तेथील नागरी सुविधांवर पडणाऱ्या ताणाचा महापालिकेने अभ्यास केला आहे का, तसेच या कंपनीबरोबर समझोता करण्यापूर्वी महापालिकेने न्यायालयीन खर्च वसूल करण्याची अट ठेवली आहे का, असे सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी केले आहेत.

00000000

 

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून MahaDBT 2.0 मध्ये परावर्तित (Migration) होत आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण विभाग, ठाणेचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहेत.

सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची वेळेत पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कोणताही विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे इंगळे यांनी नमूद केले.

तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांची तात्काळ तपासणी करून मंजुरी व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रकरणी दिरंगाई झाल्यास संबंधित प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिला आहे.

 

 

अंबरनाथ : शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी दरवाढ व टंचाई विरोधात पेट्रोल पंपासमोर तीव्र धरणे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ येथे करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांना अंबरनाथ तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

गेल्या १२ वर्षात पेट्रोलच्या किंमती ३८ टक्क्यांनी तर डिझेलचे किंमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत तर मागील ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत ८ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेल्या आहेत ही दरवाढ आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.

याप्रसंगी शंभू म्हात्रे, रविष तांडेल, जयवंत पवार, अकबर खान, सोमनाथ मिरकुटे, शरद ठाकरे, रंजन येडवणकर, देवेंद्र भेरे, तुषार देसले, अनिल चिराटे, केतन पवार, अमोल सुरोशी, मोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅलन्स पर्यंत पोहोचले असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊन दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जनतेवर पडू दिला नाही पण मागील काही वर्षात तेलाचे भाव ५० ते ५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांच्या आसपास होते अशी वस्तुस्थिती यशपाल भिंगे यांनी मांडली.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवराज अलंजाडे, नईम शेख, सुधीर जाधव, बिपिन भावार्थ, स्मिता बंगेरा व सहकारी, आसिफ काजी, जयवंत हरड, ज्योती पवार, गुरुनाथ देशमुख, आशिष दुप्पली, इशांत जाधव, दीपा तिवारी आदींनी मेहनत घेतली.

000000000

कल्याण: कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकऱ्यांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी तिघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमेश्वर गोपाळ महाले (वय ४५) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीच्या सार्वजनिक जागेत कोणतीही वैध परवानगी न घेता बकऱ्यांची कत्तल करण्यात येत होती. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून नियमांचे उल्लंघन झाल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी सलीम शेख (सोसायटी सचिव), शब्बीर मेमन (सोसायटी चेअरमन) तसेच उस्मान उमर यांच्यासह अन्य चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका आणि संबंधित विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी पशू कत्तल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५, २२३(३)(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १०५, ११७ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पेट्रोल -डिझेल -गॅस दरवाढीविरुद्ध
सिंधुदुर्ग: पेट्रोल – डिझेल-गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘रद्द करा, रद्द करा, पेट्रोल- डिझेल -गॅस दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा देत, हातात रिकामे ‘कॅन’ घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ही निदर्शने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निदर्शनात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस साई चव्हाण,जिल्ह्याचे उपाध्यक्ष मेघनाद धुरी,विद्याप्रसाद बांदेकर,व्ही. के. सावंत,मालवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर जिल्हा सेवा दल अध्यक्ष अजिंक्य गावडे, किरण टेंबुलकर आदींनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात मोजकेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गेल्या अकरा दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किंमती आठ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आल्या असल्याने सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. ही दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांना सुरुवात झाली असून जिल्ह्यात ‘पॉवर टिलर’ आणि ‘ट्रॅक्टर’च्या सहाय्याने शेती केली जाते मात्र डिझेलची झालेली दरवाढ आणि भासणारा तुटवडा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा, कोणतीही बाधा न येता सुरळीत रहावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
त्यानंतर जिल्हाध्यक्ष मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शासनाला पाठविण्यात येईल असे सुकटे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
000000000

000000

पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात
राजेंद्र साळसकर
मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडने आता जागतिक स्तरावरही मुंबईची बदनामी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस (UCLA) यांच्या २०२६ च्या STOP Methane Project अहवालानुसार कांजूरमार्ग लँडफिलला जगातील सर्वाधिक प्रदूषित लँडफिल्समध्ये १२वा क्रमांक मिळाला आहे. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले असून, हे प्रदूषण जवळपास दहा लाख SUV वाहनांच्या प्रदूषणाइतके धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही मुंबई महापालिका आणि राज्य सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कांजूर डम्पिंग ग्राऊंड मुळे कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, विक्रोळी परिसरातील लाखो नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले आहे. दुर्गंधी, प्रदूषित हवा, वारंवार लागणाऱ्या आगी व मिथेन वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, फुफ्फुसांचे आजार, दमा, ऍलर्जी यांसारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सर्वाधिक धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांचे आयुष्मान कमी होत असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबईतील जवळपास ९० टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या कचराभूमीबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मात्र पूर्णपणे बेजबाबदार असल्याचा आरोप होत आहे. उपाययोजना सुरू आहेत, वृक्षलागवड केली जाईल, पर्यायी जागेचा शोध सुरू आहे अशी केवळ कागदी घोषणा करण्यात येत असताना प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. १८५ लाख मेट्रिक टनांहून अधिक जुना कचरा या परिसरात साचलेला असून, त्यातून होणारे मिथेन उत्सर्जन थांबविण्यासाठी कोणतीही ठोस व प्रभावी कृती करण्यात आलेली नाही.
या गंभीर प्रश्नावर न्यायालयाने देखील अनेकदा महापालिका व राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याबद्दल न्यायालयाने कठोर निरीक्षणे नोंदविली, तरीही प्रशासन जागे झालेले दिसत नाही. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर पालिकेचे अपयश उघड झाले असून, नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. ईशान्य ंमुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा सातत्याने आक्रमकपणे मांडला आहे. पालिका आयुक्तांसोबतच्या बैठका, डीपीडीसी बैठका तसेच दिल्लीतील लोकसभेतही त्यांनी ईशान्य मुंबईतील डम्पिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबवा, कांजूर डम्पिंगला पर्याय द्या, अशी ठाम भूमिका त्यांनी सातत्याने घेतली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला आहे. दरम्यान, देवनार येथे ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सात मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे पालिकेने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात त्यातून नागरिकांना किती दिलासा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर करूनही प्रदूषण व दुर्गंधी कमी करण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका होत आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंड आता केवळ कचराभूमी राहिलेली नसून ती ईशान्य मुंबईतील लाखो नागरिकांच्या आरोग्यावर घोंगावणारे “विषारी संकट” बनले आहे. प्रशासन अजून किती नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणार आणि या प्रश्नावर ठोस निर्णय कधी घेणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *