4 Sep Bitambatmi All pages

Open Book
Open Book

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा
नवी दिल्ली -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवार, ३ सप्टेंबर पासून ही एक्सप्रेस ट्रेन नियमित धावणार असून दुपारी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना कोकणवासियांसमवेत ट्रेनचे जंगी स्वागत करणार आहेत. या नवीन ट्रेनमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी सोय होणार आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला नुकतीच मंजुरी दिली. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील खासदारांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश आले होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही नवीन ट्रेन उद्यापासून सुरु होत असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.  याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री सुनेत्रा पवार यांचे कोकणवासींच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत.
कोकणातील जनतेची नवीन ट्रेन सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. नवीन ट्रेन सुरू केल्याचा मी शब्द दिला होता. उद्यापासून नवीन ट्रेन सुरू होत असून आपली ही वचनपूर्ती असल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही एनडीए चे हे मोठे यश असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवासी कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी, भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि सावंतवाडी रोड दरम्यान ही दैनिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन सेवेमुळे ५१० किलोमीटरच्या मार्गावर थेट, सोयीस्कर आणि विश्वसनीय रेल्वे जोडणी उपलब्ध होईल. ज्यामुळे पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक उद्देशांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक १५०८७  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८  सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावांनी दररोज धावेल.
दैनिक एक्सप्रेसचे थांबे  – दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोंकणातील प्रमुख शहरांमध्ये अखंड रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या नव्या सेवेचा मोठा फायदा कोंकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळांना होणार आहे. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. तसेच विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे आणि दैनंदिन प्रवाशांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रादेशिक विकासाला गती या ट्रेनमुळे मिळणार असून कोंकण विभागातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवास सुलभ होऊन लोकांची ये-जा वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना देखील फायदा होणार आहे. कोंकण मार्गावरील वाढती प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. ही नवीन एक्सप्रेस सेवा रेल्वेच्या प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि देशातील संतुलित प्रादेशिक विकास साधण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि  खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
0000

 कोट्यवधी रूपयांची राॅयल्टी बुडविली -मनोज प्रधान
अनिल ठाणेकर
ठाणे -क्षेपण भूमी अर्थात डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेला भिवंडी तालुक्यातील आतकोली गावात ८3 एकरचा भूखंड देण्यात आला आहे. मात्र, या भूखंडावर दगड खानी तयार करून कोट्यवधींचा महसूल दगड माफियांनी बुडविला आहे. ठामपाच्या घनकचरा विभागाने या दगडचोरीला का अभय दिले आहे? या दगडचोरीत ठामपाचे अधिकारी सहभागी आहेत का? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केले आहेत.
भिवंडीतील आतकोली येथील ३४ हेक्टर क्षेत्र राज्य शासनाने ठाणे महापालिकेस प्रदान केले आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे. एकीकडे ठामपाच्या मालकीचे डम्पिंग ग्राऊंड असतानाही दिवा परिसरात कचरा टाकला जात असल्याने आतकोली येथे पाहणी करण्यासाठी मनोज प्रधान गेले होते. त्यावेळी या भागात चक्क दगडखाणी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले.
या ठिकाणी बेकायदेशीरपणे दगडखाणी सुरू करण्यात आल्याची तक्रार ठामपाने १० जानेवारी २०२५ रोजी पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, ही तक्रार दाखल करतानाही ठामपाच्या घनकचरा विभागाने चलाखी केली होती.  वास्तविक पाहता, ही तक्रार जिल्हाप्रशासनाकडे करण्याऐवजी ती पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ठामपा अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर दगडखाण सुरू असताना त्यावेळी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करून ठामपाने कोणाला वाचविले होते, असा सवाल करीत प्रधान म्हणाले की, आतकोली येथील ३४ हेक्टरची ही जागा सन २०२४ मध्ये ठामपाच्या ताब्यात आली आहे. ८४.२ एकरच्या या भूखंडावर आजही दगडखाण सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अंदाजे 30 फूट खोदकाम केले आहे. याचे गणित बांधल्यास एकरामागे किमान ४.५ कोटी ब्रास दगड चोरण्यात आला असावा, त्याची हजारो कोटींची राॅयल्टी सरकार दरबारी जमाच करण्यात आलेली नाही. जर, ठामपाने या जागेचा दगडखाणीसाठी रितसर लिलाव केला असता तर ठामपाच्या गंगाजळीत किमान १२ हजार कोटींची भर पडली असती. मात्र, ठामपाच्या घनकचरा विभागाने चोरांच्या हातात चक्क तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, असेही प्रधान म्हणाले.
दरम्यान, आपण या ठिकाणी भेट दिली असता येथे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. तर, दगडखाण ठाणे महानगर पालिकेच्या जागेतील नाहीत, असे सांगत असतानाच ती जागा आपलीच आहे, असेही तेथील एक मजूर सांगत होता. मात्र, याच ठिकाणी चक्क कचरा टाकून झाल्यानंतर रिकाम्या डंपरमधून माती आणि खडी भरून त्यांचे वहन केले जात असल्याचेही दिसून आले.
चौकट
एंटोनी लारा कंपनीवरही संशय
या ठिकाणी एक बाग तयार करण्यात आली असून या बागेत अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा निळ्या रंगाचा जमिनीवर टाकलेला फलक दिसून आला. त्याबाबत माहिती घेतली असता, ठाणे महानगरपालिकेने कार्यादेश क्रमांक ५७७ अन्वये, अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला ₹३२९.४५ कोटींचे कंत्राट दिले आहे. अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लि. ची उपकंपनी असलेली अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही प्रतिदिन ६०० ते ८०० टन कचरा विलगीकरण करणार, असे ठामपाकडून सांगण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी फक्त कचरा फेकून दिला जात असून प्लास्टीक,  कागद, काच किंवा ओला कचरा विलगीकरणासाठी  मानवी अथवा यांत्रिकी व्यवस्थाच नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी कचऱ्यावर फक्त माती टाकली जात आहे. त्यामुळे 330 कोटी रुपयांचे कंत्राट घेतलेली अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करते काय, असा सवाल करून या दगड चोरीप्रकरणी ठामपा अधिकाऱ्यांसह अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचीही एसआयटी नेमून चौकशी करावी,अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली.

 ६९ किलो एमडी जप्त; २१ जणांना अटक
मिरा -भाईंदर : गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले. याबाबत तुळींज पोलीस ठाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातुनच पुढे तपासातून आंतरराज्य रॅकेट उघड झाले. या गुन्ह्याचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-४ ने सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
तपासात निष्पन्न झाले की जुमा ठाकूर यांच्या मालकीचे गाव – सांधाण, गुजरात येथील शेतजमिनीत M.D. तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरू होती.  ही फॅक्टरी निष्फळ करून अयान सय्यद (जालीम गँग सदस्य) याने M.D. तयार करण्यासाठी लागणारे लॅब साहित्य व केमिकल नेरळ, जि. रायगड येथे साठवून ठेवले होते. पोलिस कारवाईची कुणकुण लागताच जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने सदर मुद्देमाल कल्याण येथे आणून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस तपासात तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच, मोईनुद्दीन शेख याच्या मदतीने M.D. आणि अमली पदार्थाची विक्री जळगाव येथे केली जात असल्याचे निष्पन्न झाले. रहीम ताहेर भजियारी आणि सय्यद मुशाहिद अली यांना जळगाव, महाराष्ट्र येथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ४ किलो ९११ ग्रॅम M.D. हस्तगत करण्यात आला.
रजनीश रामचंद्र मिश्रा आणि शिवम शंभूनाथ मिश्रा यांच्या ताब्यातून मिळालेल्या माहितीवरून प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे मुख्य M.D. ड्रग बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा कक्ष-४ च्या पथकाने प्रयागराज येथील एका शेतजमिनीच्या भाड्याच्या खोलीत तयार करण्यात आलेल्या कारखान्यावर छापा टाकून ५२ किलो ९३२ ग्रॅम M.D., M.D. तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमिकल (MMA, Acetone, Hydrochloric acid, Chloroform) व २५० आणि १५० लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम, हिटिंग मेंटल, ड्रॉपिंग फनेल, थर्मामीटर इत्यादी लॅब साहित्य जप्त केले.
या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण ६९ किलो ७५९ ग्रॅम M.D., रोख रक्कम, M.D. तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमिकल व लॅब साहित्य असा एकूण सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात M.D. तयार करणारे, केमिकल व लॅब साहित्य पुरवणारे, पेडलर, आर्थिक व्यवहार करणारे असे एकूण २१ आरोपींना नालासोपारा, मुंबई (कुलाबा, आग्रीपाडा, मानखुर्द, कुर्ला), कल्याण, नेरळ-कर्जत, जळगाव, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासण्याचे काम सुरू आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप
मुंबई -ग्राहकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त संस्थेचे मुंबई महानगर उपाध्यक्ष रमेश साहेबराव गुडेकर यांच्या वतीने विक्रोळी, भांडूप,मुलुंड विभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम नुकताच विक्रोळी कन्नमवार नगरातील लोकशाहीर विठ्ठल उमप सभागृहात संपन्न झाला.कार्यक्रमास संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद निकम, राष्ट्रीय सरचिटणीस सुर्यकांत माने, कार्याध्यक्ष विजय बने, मुंबई अध्यक्ष महेंद्र कदम, राज मातंग समाज अध्यक्ष पांडुरंग सकटे, गायिका रागिणी गोडबोले, जिल्हा ग्राहक परिषद सदस्य महाराष्ट्र शासन बाबाजी नन्नवरे, समाजसेवक पांडुरंग खवले, समाजसेवक प्रवीण यादव, भांडूप महिला अध्यक्षा स्वप्ना घाडीगांवकर, विक्रोळी महिला अध्यक्षा स्वप्ना सातपुते, कार्याध्यक्ष दामोदर नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी रमेश साहेबराव गुडेकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद निकम यांनी ग्राहक हा राजा आहे. जनसेवा ही ईश्वरसेवा म्हणून काम करत असल्याचे सांगितले. सकल मातंग समाजाचे अध्यक्ष पांडुरंग सकटे यांनी एक दिवस जरी उपाशी राहिलो तरी चालेल मातंग समाजाचा विसर होता कामा नये.त्याचा विकास झाला पाहिजे याकडे लक्ष्य वेधले. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रकाशझोत टाकला.शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वही, पेन, बॅग वाटप करण्यात आले.´जागो ग्राहक जागो´ हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे असे सांगताना शिक्षण हीच खरी सेवा आहे,चला एकत्र येऊ या असा संदेश रमेश साहेबराव गुडेकर यांनी दिला.

सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड
राजेंद्र साळसकर
मुंबई-मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. या निवडणुकीत प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ टी. कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित संचालकांमध्ये प्रवीण यशवंत दरेकर, मिलिंद तातू कांबळे, अंकुश रामचंद्र जाधव, अमोल श्रीपती खरात, वर्षा अजित माळी, शिवाजीराव विष्णू नलावडे, नितीन धोंडीराम बनकर, सतीश दत्ताराम सावर्डेकर, विजय गोविंद जाधव, अनिल दत्तात्रय गजरे, शंकर काशिनाथ अय्यप्पा, बाळासाहेब दिनकर घाडगे, मिलिंद गोविंद राऊत, श्रीधर विश्वनाथ जगताप, किशोर दत्तात्रय पाटणकर, प्रवीण दयारू डिकले, सुरेश विठ्ठल भोळेराव, विठ्ठल ज्ञानेश्वर वाळुंज, जयंत लक्ष्मण शिरसीकर, मदन दादासाहेब यादव आणि अनिषा माजगावकर यांचा समावेश आहे.
मुंबईतील सहकार चळवळ अधिक सक्षम करणे, सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासदांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणे तसेच बदलत्या काळानुसार सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्राने संघर्षाऐवजी समन्वय, स्पर्धेऐवजी सहकार्य आणि संस्थेच्या व्यापक हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश गेला आहे. सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई सहकारी बोर्डाच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देऊ, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातील विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांकडून नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे. या बिनविरोध निवडीबद्दल प्रभाग समिती अध्यक्ष व मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि.चे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, मुंबई-कोकण विभागीय मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष सुनील बांबुळकर यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्ग : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआय आर -२०२६) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३ लाख ५ हजार ७५६ पुरुष मतदार आणि २ लाख ९९ हजार ७४३ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्रे आहेत. ही माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे उपस्थित होते
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. २६८-कणकवली विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रे असून २ लाख ९ हजार २४२ मतदार, २६९-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २७९ मतदान केंद्रे असून १ लाख ९१ हजार ८४६ मतदार, तर २७०-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे असून २ लाख ४ हजार ४११ मतदार आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन धोडमिसे यांनी यावेळी बोलतांना केले.  प्रारुप मतदार यादीतील आपले नाव निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तसेच आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना पडताळता येईल असे त्यांनी सांगितले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्वीच्या ६ लाख ८८ हजार १४ मतदारांपैकी ८२ हजार ५१७ नोंदी वगळण्यात आल्या असून, प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ६ लाख ५ हजार ४९९ इतकी झाली आहे. वगळण्यात आलेल्या नोंदींमध्ये ३६ हजार ६०९ मृत मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ७ हजार ६६७ दुबार नोंदी तसेच ४ हजार ४८३ इतर कारणांमुळे अपात्र अथवा शोधूनही न सापडलेल्या मतदारांच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि वास्तवस्थितीशी सुसंगत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बऱ्याच नागरिकांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबत किंवा नोंदींबाबत शंका असू शकतात. मतदारांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील तपासून घ्यावेत. नावाचा समावेश करणे, चुकीची नोंद दुरुस्त करणे अथवा मतदार यादीतील इतर नोंदींबाबत हरकत असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येतील असे त्यांनी सांगितले.
प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य
योगेश चांदेकर
पालघर : वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य करणारे पालघर जिल्ह्यातील नामवंत वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देणारे आणि वेदपाठशाळेच्या माध्यमातून वेदपरंपरा पुढे नेणारे गुरुजी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुले आनंद व सुजन, सुना मधुरा व सुजाता, दोन नाती आणि एक नातू असा परिवार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जांभूळआडी येथे जन्मलेल्या नामजोशी यांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते पालघर येथे आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी स्वीकारली; मात्र नोकरी सांभाळतानाही वेद आणि पौरोहित्याचा अभ्यास सुरू ठेवला. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पौरोहित्याचे काम सुरू केले आणि वेदविद्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला.
याच ध्यासातून १९९१ मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरी ‘ऋग्वेद वेदपाठशाळा, पालघर’ सुरू केली. या पाठशाळेत ऋग्वेदाच्या आश्वलायन शाकल शाखेचे शिक्षण दिले जात होते. पालघर, सफाळे, केळवा, बोईसर, डहाणू, वसई, विरार, पनवेल यांसह परिसरातील विविध भागांतून विद्यार्थी वेदाध्ययनासाठी येत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंदाजे पाचशे विद्यार्थ्यांनी वेदांचे शिक्षण घेतले.
वेदाध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना धार्मिक विधींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी १९९५ ते २०२३ या कालावधीत विविध यज्ञ-याग आणि भागवत सप्ताहांचे आयोजन केले. तसेच समिधा व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील कष्टकरी समाजाला रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
गजानन नामजोशी यांनी विद्यार्थ्यांना केवळ वेदपाठच नव्हे, तर पौरोहित्याची शिस्त, धार्मिक विधी आणि संस्कारांची शिकवण दिली. त्यांच्या निधनाने पालघर परिसरातील वेदविद्येच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आणि उभी केलेली वेदपाठशाळा हीच त्यांच्या कार्याची चिरंतन ओळख ठरणार आहे.
0000

रमेश औताडे
मुंबई : पुणे जिल्ह्यात पुनर्वसन जमीनीची खोटी संपादन शीटे बनवून त्यावर भुमी-अभिलेख कार्यालयाचे शिक्के घेऊन  प्रमाणित भासवून काही व्यक्ती शासन व प्रकल्पग्रस्त यांची करीत असलेली फसवणूक याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या निवेदनानुसार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चासकमान, गुंजवणी व इतर काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शासनाने शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, जातेगाव भागात केलेले आहे. एकाच जमिनीची दोन संपादनशीटे दाखवून अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्त यांना जमिनी ताब्यात दिलेल्या नाहीत,त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त त्रस्त होऊन जमिनी विकत आहेत ही बाब गंभीर असल्याचे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी काही व्यक्ती गेली काही वर्षे दोन संपादनशीटे आहेत,मुळ मालकांवर अन्याय झाला आहे असे सांगून शासन व महसुलमंत्री यांच्याकडे पाठपुराव्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते,त्यानुसार अनेक प्रकरणी शासन व मंत्रीमहोदयांनी चौकशीचे निर्देश दिले होते.काही बाबतीत मुळ मालकांवर अन्याय होत आहे,तिथे न्याय मिळणे आवश्यक आहे,परंतु शिक्रापूर परिसरातील एका शेतकऱ्याची ३ एकर पुनर्वसनासाठी संपादित झाली होती.
संबधित गट ३ एकर २९ गुंठे क्षेत्राचा होता.प्रकल्पग्रस्त व्यक्तीने इतरांना सदर जमीन विक्री केली होती,ताबा यापुर्वी शासनाने दिला होता; परंतु दोन संपादनशीटे असल्याचे दाखवून मोजणी करण्यास विरोध केला जातो व त्यातून महसुल मंत्री यांच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी अहवाल  दोन महिन्यापुर्वी स्थगिती दिली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असलेल्या एका वकीलाला टाव्हरे यांनी दोन संपादनशीटे कशी तयार होतात अशी महिन्यापुर्वी विचारणा केल्यानंतर त्याने तो स्वतः बनवून उपअधिक्षक भुमी-अभिलेख शिरूर कार्यालयातून त्यावर शिक्के घेऊन प्रमाणित भासवतो असे सांगितले व अनेक प्रकरणी त्याच पद्धतीने केल्याचे सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी शासनाकडे केल्यानंतर महसुलमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून प्रसंगी आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *