
नवी दिल्ली : जगभराला नादावलेल्या आर्टीफिशिएल टेक्नॉलॉजी म्हणजेच एआयच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या समिटमध्ये आज एका कुत्र्यावरून वाद उद्भवला. मेक इन इंडियाचे प्रॉडक्टम्हणून या समिटमध्ये भारतीय युनिव्हर्सिटी नोएडाच्या गलगोटियाने दावा केलेला रोबॅटिक कुत्रा हा मुळ चायनिज बनावटीचा होता. समाजमाध्यमावर ही बनवेगीरी उघडकीस येताच समिटमधून गलगोटिया विद्यापीटाची हकालपट्टी करण्यात आली.
एका व्हिडिओमध्ये या विद्यापीठाने दावा केला होता की एक चिनी रोबोटिक डॉग हा त्यांचा स्वतःचा शोध आहे. व्हिडिओमध्ये, विद्यापीठाच्या प्राध्यापक नेहा सिंह म्हणतात की रोबोटिक डॉगचे नाव ‘ओरियन’ आहे, जे गॅलगोटियास विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केले. त्यांनी असेही म्हटले आहे की विद्यापीठ एआयच्या क्षेत्रात ३५० कोटींची गुंतवणूक करत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, अनेक तंत्रज्ञान तज्ञ आणि वापरकर्त्यांनी दावा केला की ते प्रत्यक्षात चिनी कंपनी युनिटीरी चे गो२ मॉडेल आहे, जो बाजारात २-३ लाखांना उपलब्ध आहे.
चौकट
कुत्रा आमचा नाही,
विद्यापीठाची कबुली
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, गॅलगोटियास विद्यापीठाने म्हटले आहे की, गॅलगोटियासने हा रोबोटिक डॉग तयार केला नाही आणि आम्ही कधीही दावा केला नाही. परंतु भारतात अशाच तंत्रज्ञानाची रचना, अभियांत्रिकी आणि निर्मिती करतील. नवोपक्रमाला मर्यादा नसतात. शिकण्यालाही मर्यादा नसावी. आम्ही जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणत राहू जेणेकरून आमचे विद्यार्थी अभ्यास करू शकतील, आव्हान देऊ शकतील आणि त्यांना सुधारू शकतील आणि शेवटी जागतिक दर्जाचे उपाय तयार करू शकतील.
स्वाती घोसाळकर
मुंबई: जोवर संपुर्ण तपास पुर्ण होत नाही तोवर अजित दादांच्या विमान अपघाताला घात झाल्याचा संशय कायम राहणार आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती इतकी चक्रावणारी आहे की त्यामुळे विमानाच्या पायलटवरच हा अपघात घडवून आणण्यासाठी दबाव होता का असा संशय घ्यायला पुरेशी जागा असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी केला.
रोहित पवार यांनी आज आपल्या दुशऱ्या प्रेझेंटेशनमध्ये अनेक गंभीर चुका उघडकीस आणल्या. मुख्य पायलट सुमित कपूर यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. जेटमध्ये १०-१२ लाख पगार असताना नंतर कमी वेतनावर काम करावे लागले. ते डिप्रेशनमध्ये होते का? त्यांचा गैरफायदा घेण्यात आला का? याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, २७ जानेवारीला अपघाताच्या आदल्या रात्रीला काही व्यक्ती दादांना भेटायला आल्या होत्या तसेच संध्याकाळी ६.५० ते ७.०५ या वेळेत फोनवर संभाषण झाले होते. या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे रोहीत पवारांनी नमूद केले.
रोहित पवार म्हणाले की, विमान मुंबईहून बारामतीला जात असताना त्याचे फ्यूल टँक पूर्ण भरले होते. “बारामतीला दादांना सोडल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर पुढील प्रवासात इंधन भरता आले असते. मग सुरुवातीलाच टँक पूर्ण भरण्याची गरज काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकारच्या एजन्सीकडून तो जळाल्याचे सांगण्यात आले असले तरी तज्ज्ञांच्या मते ११०० अंश सेल्सिअस तापमानातही तासभर राहिल्यासच ब्लॅक बॉक्स डॅमेज होतो, तसेच ६ हजार मीटर पाण्याच्या दाबातही तो टिकतो. मग येथे तो पूर्णपणे जळाला कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घटनास्थळी कागद कमी जळालेले दिसत असताना ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
या दुर्घटनेमागे विम्याचा मुद्दा असू शकतो, असा गंभीर आरोप करत पवार म्हणाले की संबंधित VSR कंपनीच्या विमानाची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये असली तरी प्रत्यक्ष बाजारमूल्य १० ते १५ कोटींपर्यंतच असू शकते. मात्र विमानावर ५५ कोटींचा विमा आणि २१० कोटींची लायबिलिटी असल्याचे त्यांनी सांगितले.
“१००-२०० कोटींसाठी कंपनीला वाचवू नका. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी गुंतवणूकदारांना दिला.अपघात की घातपात याचे सत्य समोर येण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई : महापालिका निवडणुकीतील कडूगोड आठवणी बाजूला सारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदेंचे ठाण्यातील घर नंदनवन गाठले. राज ठाकरे नंदनवनात आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांत सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेच्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. तसेच, महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे या भेटीत केडीएमसीसह इतर राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या. मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, महापौर निवडीवेळी मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना, मनसेचा हा पाठिंबा चर्चेचा विषय ठरला होता.
दरम्यान, या भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे मनसेचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावे किंवा न भेटावे, यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. या भेटीत आक्षेपार्ह असे काही नाही,” असे त्या म्हणाल्या.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या राज्यसभेतील जागेसह अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी येत्या सोमवारी १६ मार्चला मतदान होणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या देशभरात रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२६ असेल. अर्जांची छाननी ६ मार्च रोजी केली जाणार असून ९ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नसून घातच असल्याचा दावा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन रोहीत पवार यांनी आज मीडियासमोर मांडला. साहेबांचा विमान अपघात घडवून आणल्याचा संशय रोहीत पवरांनी व्यक्त केला.

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या मुंबई भेटीत खास वेळ काढून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवसोहळा आवर्जुन पाहिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी या शिवसोहळ्याचा अनुभव घेतला. शिवसोहळ्यातील शिवाजी महाराजांचे भारदस्त रुप आणि सोबत निर्माण करण्यात आलेला शिवकालीन साज यामुळे मॅक्रॉन भारावून गेले.
दरम्यान, दिवसभराच्या अधिकृत बैठका आणि बॉलीवूड स्टार्ससोबतची चर्चा आटोपल्यानंतर मॅक्रॉन यांनी रात्री उशिरा आपली पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला (सीएसएमटी) भेट दिली. हे स्टेशन केवळ एक रेल्वे टर्मिनल नसून ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट’ आहे.
मॅक्रॉन यांना वास्तुकलेची विशेष आवड आहे. (सीएसएमटी) स्टेशन हे ‘व्हिक्टोरियन गोथिक रिव्हायव्हल’ आणि भारतीय पारंपारिक वास्तुकलेचा एक अद्भूत संगम आहे. ब्रिटीश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी डिझाइन केलेली ही इमारत पॅरिस किंवा बार्सिलोनासारख्या ‘गोथिक शहरां’ची आठवण करून देते. मॅक्रॉन यांनी स्टेशनमधील बारीक नक्काशी, घुमट आणि तिथल्या दुकानांची बारकाईने पाहणी केली. भारतीय कारागिरांनी ब्रिटीश शैलीत मिसळलेली भारतीय कला त्यांना जवळून अनुभवायची होती म्हणून त्यांनी बिन्धास्तपणे रेल्वे स्टेशनला भेट दिली.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा
अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा येत्या २० फेब्रुवारीला आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
यावेळी महापालिका सचिव मनिष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते. महापौरांनी सभागृहातील आसनव्यवस्था, ध्वनी प्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची तपासणी केली. ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय १३१ नगरसेवक निवडून आले असून, याशिवाय १० स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसनव्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतला. महापौरांनी नमूद केले. ९सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनिव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच महासभेच्या कामकाजाचा प्रारंभ बदललेल्या सुचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम् आणि राज्यगीताने, तर महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनीफितीवर लावण्यात यावीत असेही महापौरांनी नमूद केले. एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यानुसार सोमवार, २ मार्चला होळी, शुक्रवार, २८ ऑगस्टला रक्षाबंधन आणि शुक्रवार, २५ सप्टेंबरला अनंत चतुर्थी या सणांच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या तीनही दिवशी रायगड जिल्ह्यातील शासनाच्या सर्व खात्यांतील कार्यालये बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

४ मार्च रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
अलिबाग : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. मात्र मार्च २०२६ महिन्यातील पहिला सोमवार (२ मार्च) हा होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टीचा दिवस असून ३ मार्च रोजी धुळीवंदनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर असल्याने मार्च महिन्याचा लोकशाही दिन बुधवार, ४ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकशाही दिन दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी दिली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने संबंधित कागदपत्रांसह सादर करून या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
