26 Aug Bitambatmi All pages

Open Book

अशोक गायकवाड
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मंगळवारी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली. लोकभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांनी न्या. सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली असून ही नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवशीपर्यंत असेल. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे अन्य सदस्य तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम व राष्ट्रगीताने झाला. न्यायमूर्ती (निवृत्त) सुनील शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी १९८० साली पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केले आणि नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी मिळवली. न्यायिक सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कोल्हापूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन (ठाणे) येथे सहसंचालक, तसेच नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि २०१३ मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे (एमएसबीसीसी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
०००००००००००

अनिल ठाणेकर
ठाणे-मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे ऊस तोडणी वाहनधारक, मुकादम व ऊस तोडणी मजुरांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी मजुरी वाढी चा त्रिपक्षीय करार न झाल्यास संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. करार झाल्याशिवाय कोयता हातात घेणार नाही, गाव सोडणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष व सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली.यावेळी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष  दत्ता डाके, जिल्हा सचिव सय्यद रज्जाक, शेतमजूर युनियनचे राज्यसचिव मारोती खंदारे, अजय बुरांडे, बळीराम भुंबे, अंकुश अंबुलगेकर, सुदाम शिंदे,  बाळसाहेब चोले, प्रकाश उजगरे, मनिषा करपे, बंडुराम गरड, किशोर कचरे उपस्थित होते.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे कल्याणकारी स्वरूप बदलून सदर मंडळ माथाडी मंडळाच्या धर्तीवर गठीत करण्यात यावे. हंगाम सुरू होण्यापूर्वी किंवा हंगाम सुरू झाल्यानंतर एकाच महिन्यात मंडळात सर्व कामगारांचे नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. गळीत हंगाम २०२६ ते २९ अखेर या तीन वर्षाकरिता मजुरी वाढीचा त्रिपक्षीय करार  करावा. ऊस तोडणी व बैलगाडी वाहतूक दरामध्ये प्रति टन ८० टक्के मजुरी वाढ करावी. मुकादमाचे कमिशन २५% करावे व वाहतूकदारांच्या दरामध्ये ५० टक्के वाढ करावे.ऊस तोडणी मजूर मुकादम यांचे आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी स्वतंत्र कायदा करावा. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी व वाहतूक कामगार कल्याणकारी मंडळास साखर कारखान्याकडून गेल्या पाच वर्षाचा देय असलेला प्रति टन दहा रुपये प्रमाणे निधी जमा करण्यात यावा. जे कारखाने याची पूर्तता करणार नाही त्यांना ऊस गाळप परवाना माननीय साखर आयुक्त यांनी देऊ नये तसेच राज्य सरकारने पाच वर्षाचा देय असलेला प्रति टन दहा रुपये प्रमाणे आपला सर्व थकीत निधी महामंडळाकडे जमा करावा.ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मुला मुलींसाठी यापूर्वी जाहीर झालेली सर्व शंभर वस्तीग्रह सुरू करण्यात यावीत तसेच पुणे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावे.ऊस तोडणी व वाहतूक कामगारांना घरासाठी दहा लाख रुपये अनुदान द्यावे व पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी.गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया झालेल्या महिला ऊस तोडणी कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्या. सुमोटो केस च्या निर्देशानुसार साखर आयुक्त यांचे तीन जुलै २०२५ रोजी चे पत्रात सुचवलेल्या २८ प्रकारच्या सेवा सुविधांची येत्या गलीत हंगामात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. ऊस तोडणी मुकादम वाहतूकदार व मजुरांना अल्प व्याज दरात भांडवल उपलब्ध होण्यासाठी निधीचे नियोजन करावे.लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूक कामगार कल्याण मंडळातल विविध समित्यावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत तसेच जिल्हास्तरावर प्रतिनिधी मंडळ स्थापन करावे. यावेळी बैठकीला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून ऊस तोडणी कामगार, वाहन मालक, मुकादम व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
००००

अनिल ठाणेकर
मुंबई : तरुणांचा असंतोष हा केवळ एखाद्या दिवसाच्या आंदोलनातून निर्माण झालेला नसून, बेरोजगारी, अन्याय, दडपशाही, संस्थांचा ऱ्हास आणि दीर्घकाळ साचत गेलेल्या अस्वस्थतेचा परिणाम आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी केले. वर्षानुवर्षे मनात साचलेले मौन एका क्षणी आवाज बनून रस्त्यावर उतरते, असे सांगत त्यांनी मुंबई व दिल्लीतील अलीकडील तरुणांच्या आंदोलनांच्या संदर्भात आपली भूमिका मांडली.
नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सभागृहात हजाराहून अधिक उपस्थितांच्या साक्षीने नेहा बोरा यांचे भाषण झाले. त्यांच्या निर्भीड आणि प्रभावी मांडणीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाषणादरम्यान टाळ्यांचा कडकडाट तसेच घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.
तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करताना बोरा यांनी बेरोजगारी, असुरक्षितता, अन्याय आणि भीती यांसारख्या दैनंदिन अनुभवांचा लोकशाही व राजकीय प्रश्नांशी संबंध जोडला. आजच्या तरुणाईच्या प्रश्नांना केवळ आकडेवारी किंवा राजकीय घोषणांच्या माध्यमातून समजून घेता येणार नाही, तर त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातील अनुभवांकडेही पाहणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यांच्या भाषणातील वैशिष्ट्य म्हणजे तरुणांशी थेट संवाद साधणारी शैली. वस्त्या, घरे, महाविद्यालये, वसतिगृहे, रोजगाराच्या संधी, मैत्री, असुरक्षितता आणि अपमान अशा दैनंदिन अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी व्यापक सामाजिक व राजकीय वास्तवाचे संदर्भ उपस्थित केले. त्यामुळे भाषणातील अनेक मुद्दे उपस्थित तरुणांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी संबंधित वाटत होते.
इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टीवरही त्यांनी भाष्य केले. इतिहास हा केवळ भूतकाळात बंदिस्त विषय नसून वर्तमानातील सामाजिक आणि राजकीय प्रश्न समजून घेण्याची खिडकी आहे, असे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक संदर्भांना वर्तमानातील परिस्थितीशी जोडत त्यांनी लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
सत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाही संस्थांसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी भीतीच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे बोरा यांनी सांगितले. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे ही तरुण पिढीची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला.
भाषणादरम्यान काही वेळा सभागृहात गोंगाट वाढला. मात्र बोरा यांनी शांतपणे थांबत पुन्हा आपली मांडणी सुरू केली. त्यानंतर उपस्थितांनीही शांतता राखत त्यांचे विचार ऐकून घेतले. त्यांच्या वक्तृत्वातील निर्भीडपणा आणि तरुणांशी साधलेला थेट संवाद यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमानंतरही उपस्थितांमध्ये नेहा बोरा यांच्या भाषणाची आणि त्यांच्या विचार मांडणीच्या शैलीची चर्चा होती. आजच्या तरुणाईच्या प्रश्नांना वैचारिक दिशा देणारा आणि लोकशाही मूल्यांची बाजू मांडणारा तरुण आवाज म्हणून त्यांच्या भाषणाकडे पाहिले गेले.

अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा-ब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी गणेशमूर्ती व देवीमूर्ती विसर्जनाची सेवा करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण, मानधन तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व ठाणे महापालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
याबाबत २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मुल्ला यांनी म्हटले आहे की, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातून हजारो गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विशेषतः रेतीबंदर विसर्जन घाटावर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्र निःशुल्कपणे विसर्जनाची सेवा बजावत आहेत.
गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करताना अनेकदा मोठ्या व वजनदार मूर्ती पाण्यात नेण्याचे काम करावे लागते. त्यामुळे या युवकांना मोठी जोखीम पत्करावी लागते. त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा साधने, बचाव पथक, वैद्यकीय सुविधा किंवा विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने दुर्घटना घडल्यास संबंधित युवकांच्या कुटुंबीयांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना अपघाती विमा संरक्षण, आवश्यक सुरक्षा साहित्य, लाईफ जॅकेट, वैद्यकीय सुविधा तसेच पिण्याचे पाणी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या युवकांनी बजावलेल्या सेवेला योग्य मोबदला म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना योग्य मानधन देण्यात यावे, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रशस्तिपत्र देण्यात यावे, अशीही मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेतीबंदर तसेच इतर विसर्जन घाटांवरील स्थानिक भूमिपुत्रांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांची सेवा ही केवळ परंपरा नसून ठाणे शहराच्या गणेशोत्सवातील महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे.

 विद्यार्थ्यांना सर्पसंवर्धनाचा संदेश
ठाणे-नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भरणे येथे विद्यार्थ्यांसाठी ‘साप, सापांचे जीवन आणि सापांविषयीच्या अंधश्रद्धा’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते .यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर, जिल्हा कार्याध्यक्ष नंदलाल शिंदे, वैज्ञानिक जाणीवा प्रमुख नियती गोवळकर, भिकू गोवळकर हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते
यावेळी उपस्थित विद्यार्थीना नियती गोवळकर यांनी, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतातील उंदीर साप खात असतो. सर्वच साप विषारी नसतात. सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, सापांचे पर्यावरणातील महत्त्व, विषारी व बिनविषारी साप यांतील फरक तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती दिली
सापांविषयी समाजात प्रचलित असलेल्या विविध अंधश्रद्धा, गैरसमज आणि भीती यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खंडन करण्यात आले. साप हा मानवाचा शत्रू नसून पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साप दिसल्यास घाबरून किंवा त्याला मारण्याऐवजी योग्य पद्धतीने त्याची सुटका करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
आज ही भारतात साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे घेऊन जाण्याचे प्रमाण मोठे आहे. सर्पदंशाच्या उपचारासाठी मांत्रिक, भगत किंवा पारंपरिक उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने शासकीय किंवा योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, असेही यावेळी सांगितले. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयीची भीती कमी करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण  करण्यात आला.
००००

स्वयंघोषित ट्रस्ट स्थापन केल्याने खळबळ
  वारकरी संप्रदायात तीव्र संताप
मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने)
तालुक्यातील  हजारो भाविक व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन भृगंऋषी माळ मठ, शिरोशी (माळ मठ) वर ताबा मिळविण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळ मठाचे योगी कानिफनाथ गुरु जगन्नाथ महाराज यांना काही दिवसांपूर्वीच समाधी झाली. त्यांच्या पश्चात मठाची गादी सध्या मठाधिपती योगी ज्ञाननाथ गुरु कानिफनाथ महाराज सांभाळत आहेत. महाराजांना समाधी होताच याची संधी साधून काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी घाईघाईत “गोरक्षनाथ मठ शिरोशी (माळ मठ) ट्रस्ट” नावाने स्वयंघोषित ट्रस्टची नोंदणी केली आहे.
हा मठ केवळ शिरोशी पुरता मर्यादित नसून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल, अलिबाग येथील हजारो वारकरी, नाथ संप्रदायाचे साधक व भाविक येथे दर्शनासाठी येतात. या स्वयंघोषित ट्रस्टला मठाधिपती, मठाचे सेवेकरी, ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाने तीव्र विरोध केला आहे. हा मठ सार्वजनिक असून तो कोणत्याही एका ट्रस्टच्या मालकीचा होऊ शकत नाही. हा प्रकार म्हणजे भाविकांच्या श्रद्धेवर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुरातन माळ मठाचे पावित्र्य, परंपरा आणि मालमत्ता यांचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
००००

चेंदणी कोळीवाडा उत्सवासाठी सज्ज
ठाणे : रौप्य महोत्सवी वर्षात पंचवीस जोडप्यांकडून होणारी दर्याची पूजा हे चेंदणी कोळीवाड्यात यंदाच्या वर्षी चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच तर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या पूजेचे वैशिष्ठ असणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाजत गाजत दर्या किनारी जाऊन ज्याच्यामुळे आपली उपजीविका होते त्या दर्याची पूजा करणे हे कुठल्याही कोळीवाड्यात हमखास पहायला मिळते. ठाणे शहराला समुद्र किनारा नसला तरी खाडीकिनारा आहे. त्यामुळे खाडी किनारी जाऊन तिथे विधिवत पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा चेंदणी कोळीवाड्यात अनेक वर्षापासून होती पण नंतरच्या काळात सामुदायिकरित्या पूजा करणे बंद झाले होते. त्याची खंत राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार विजेते सुभाष बाळकृष्ण कोळी यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत चेंदणी कोळीवाड्यातील इतरांशी संवाद साधत नारळी पौर्णिमेच्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या नारळ पौर्णिमेचा उत्सव तत्कालीन राज्यसभेचे खासदार आणि पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या हस्ते नारळाची पूजा करून वाजत गाजत दर्याला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सुभाष कोळींच्या पश्चात त्यांचे चिरंजीव, चेदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचे विद्यमान पदाधिकारी विक्रांत कोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या उत्सवाची जबाबदारी सांभाळली आहे.
यंदाच्या वर्षी उत्सवाचे पंचविसावे वर्ष असल्याने कोळीवाड्यातील “मान आमच्या ठाण्याचा पहिला” ही एकविरा मातेच्या चैत्र नवरात्री पालखी उत्सवासाठी गाजलेल्या गीताचे दिवंगत शाहीर रमेश नाखवा यांचे चिरंजीव अभिनय नाखवा यांनी लिहिलेला आज सन नारळी पुनवेचा हे गाणे स्थानिक कलाकारांनी एकत्रित येऊन तयार केले आहे. यंदा पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरात नारळाची पूजा करण्यात येणार आहे.त्यानंतर या नारळाची सवाद्य मिरवणूक काढून दत्त मंदिर, सिडको बस स्टॉप, ग. मो. कोळी मार्ग, नारायणराव कोळी चौकातून थेट चेंदणी कोळीवाडा विसर्जन जेटीवर येईल. तिथे खाडीला नारळ वाढवण्यात येईल.

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडी येथील माजी विद्यार्थी निखिल अनिल मोहिते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करून विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक निबंधक श्रेणी-१ या पदांसाठी निवड होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, सखी सावित्री समिती, माजी विद्यार्थी संघ, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, संगमेश्वर पंचायत समिती सदस्य अपर्णा जाधव, दत्ताराम लाखन, चिखली ग्रामपंचायतीच्या प्रशासक मैथिली कानाल, चिखली केंद्रप्रमुख फुंगे सर, कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष यादव, संगमेश्वर महसूल मंडळ अधिकारी उद्धव माने यांच्यासह धर्मदास मोहिते, दत्ताराम पांडव, नंदकुमार मयेकर आणि श्वेता संसारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निखिल मोहिते यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका घुगे यांनी केले, तर प्रास्ताविक पूनम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव मोहिते, राजा पवार, नितेश बल्लाळ, तुषार जाधव, सागर पांडव, चंद्रकांत पाले, मनोज मोहिते, अभिराज मोहिते, अभिराज पवार आणि संस्कृती ओकटे यांनी विशेष मेहनत घेतली.

रमेश औताडे
मुंबई: आंबेडकरी आंदोलनाचे तसेच अनुसूचित जाती, जमाती,भटके विमुक्त समाजातील कर्मचारी वर्गाचे केंद्र बिंदू असलेल्या कास्ट्राईब कार्यालयाला नागपूर महानगर पालिकेतील अधिकारी यांनी नुकतेच सील लावून आंबेडकरी आंदोलन संपवण्याचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा संपूर्ण राज्यभरात २८ ऑगस्ट २०२६ ला राज्यातील सर्व  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.
या राज्यव्यापी आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. मुंबईत आझाद मैदानावर  आंदोलन करून सरकारला या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्यासाठी साकडे घालणार आहे असे बागडे यांनी सांगितले.
००००
महिलेचा श्वसनमार्ग मोकळा झाल्याने श्वास झाला मुक्त
मुंबई : फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या ५७ वर्षीय महिलेचा श्वसनमार्ग ट्यूमरच्या वेगाने झालेल्या वाढीमुळे जवळपास पूर्णपणे बंद झाला होता. किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील डॉक्टरांनी अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची थेराप्यूटिक ब्रोन्कोस्कोपी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत रुग्णाचा श्वास पुन्हा सुरळीत केला. डॉ. मानस मेंगार आणि त्यांच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. ट्यूमर श्वासनलिकेच्या मधल्या भागात आणि दोन्ही मुख्य श्वसनमार्गांपर्यंत पसरल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली होती.
ट्यूमरमध्ये रक्तवाहिन्यांचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याचा तसेच फिस्टुलाचाही मोठा धोका होता. या यशस्वी प्रक्रियेनंतर रुग्णाला ऑपरेशन टेबलवरच व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले आणि प्रकृती स्थिर झाल्याने शस्त्रक्रियेनंतर चौथे दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.उपचाराच्या साडेपाच महिन्यांनंतरही रुग्णाची प्रकृती उत्तम असून ती स्वतःची दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *