25 Aug Bitambatmi All pages

Open Book

– शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या ३ऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजन
कल्याण : वडाळा येथील शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटने आपल्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात दृष्टिहीन खेळाडूंसाठी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेने केली. हा कार्यक्रम ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत ३० विशेष बुद्धिबळ पटांवर एकूण ६० खेळाडूंनी सहभाग घेतला. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केवळ वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन पुनर्वसन, आत्मविश्वास वाढवणे आणि स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम करणे, या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या उपक्रमात दिसून आले. या स्पर्धेने दृष्टिहीन खेळाडूंना – ज्यामध्ये एसएसईआयच्या पुनर्वसन आणि कमी दृष्टी सेवांमधील रुग्णांचाही समावेश होता अशांना एकत्र आणले आणि त्यांना त्यांचे बुद्धिबळातील कौशल्य, आत्मविश्वास तसेच जिद्द प्रदर्शित करण्यासाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.  यात १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला; यापैकी काही खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.

 चिमुकल्याच्या हाताचा खोलवर चावा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात पाळीव कुत्र्याने एका चिमुकल्यावर केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साई शरण इमारतीत घडलेल्या या घटनेत कुत्र्याने चिमुकल्याच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात त्याच्या हाताला खोलवर जखम झाली असून, जखम एवढी गंभीर होती की हाताचे मांस बाहेर आले. हल्ल्याची संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला इमारतीच्या परिसरात असताना अचानक पाळीव कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
परिसरातील नागरिकांनी पाळीव कुत्रे पाळताना आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी संबंधितांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने समोर येत असताना प्रशासनाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी ९ थर उभारण्याचे पथकाचे स्वप्न होते. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच ९ थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता. त्यासाठी गोविंदांनी अथक मेहनत घेतली. अखेर शनिवारी रात्री ९ थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने आपला संकल्प पूर्ण केला. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने पहिल्यांदा ८ थर उभारण्याचा विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यात विशेष ओळख मिळाली.
मात्र, मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती. त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. पथकासाठी जोशपूर्ण गीत तयार करण्यात आले, तसेच आकर्षक टी-शर्टही तयार करण्यात आले. त्यामुळे गोविंदांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गेल्यावर्षी ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने विविध दहीहंडी उत्सवांमध्ये ९ थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र, ज्या ठिकाणी पथकाचा सराव होतो, त्या कर्मभूमीवर ९ थर उभारण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नव्हते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंदा सरावाच्या सुरुवातीपासूनच ९ थर उभारण्याचे ध्येय पथकाने निश्चित केले होते.
अखेर शनिवारी रात्री पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथील सरावाच्या ठिकाणी ९ थरांची यशस्वी उभारणी करून पथकाने अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. ९ थर उभारल्यानंतर गोविंदा आणि परिसरातील युवकांनी एकच जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. दहीहंडी उत्सवाच्या आधीच ‘ठाण्याचा राजा’च्या या कामगिरीने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई: बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये मिथुन निमसटकरने पुरुष गटाचे तर सुभ्रदिता कर्माकरने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. तोडीस तोड खेळ करीत रंगलेल्या अंतिम सामन्यात अखेर बिगर मानांकित मिथुन निमसटकरने निर्णायक क्षणी आपल्या भात्यातील अचूक फटके साधले आणि गतविजेत्या कुलदीप वार्ष्णेयचे आव्हान ११-५, ९-११, १३-११ असे संपुष्टात आणले. महिलांच्या अंतिम फेरीत गतविजेत्या सुभ्रदिता कर्माकरने द्वितीय मानांकित कविता राणाचा १३-११, ११-४ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
तत्पूर्वी झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात मिथुन निमसटकरने अजिंक्य नवगिरेवर ११-९, ११-९ असा तर कुलदीप वार्ष्णेयने अभिजित दळवीवर १४-१२, ११-९ असा विजय संपादन केला. महिला उपांत्य सामन्यात सुभ्रदिता कर्माकरने प्रार्थना मास्तुरला ११-२, ११-३ असे तर कविता राणाने कृतिका अग्रवालला १२-१०, ११-५ असे हरविले. दोन्ही गटामधील पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांनी बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस पुरुष व महिला संघात स्थान पटकाविले आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने ही स्पर्धा वायएमसीए टेबल टेनिस गृहामध्ये संपन्न झाली.
००००००००

 केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप
कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका  क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून, आता मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत मार्गापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे केडीएमसी आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरातील तसेच रामदासवाडी ते कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून केडीएमसी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. खड्डे बुजविणे आणि रस्त्याचे पॅचवर्क करण्याबाबत अधिकाऱ्यांचे अनेकदा लेखी तसेच तोंडी लक्ष वेधले, मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.
‘जनता त्रस्त आहे आणि प्रशासन कानात तेल घालून बसले आहे,’ असा आरोप भोईर यांनी केला. आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ये-जा असलेल्या रस्त्यांचीच अशी अवस्था असेल, तर शहरातील इतर भागांतील रस्त्यांची परिस्थिती काय असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढला आहे. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी केडीएमसी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत आणि निकृष्ट पॅचवर्कऐवजी कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 केशव बनसोडे यांच्या मृत्यूची चौकशी करून कुटुंबीयांना थकीत वेतन व आर्थिक मदत द्या — डॉ. डी. एल. कराड
अनिल ठाणेकर
ठाणे-जालना जिल्ह्यातील आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी केशव बनसोडे यांना तब्बल ६७ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सातत्याने वेतन थकीत राहिल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर ते दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आणि आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्यात अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर २२ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना थकीत वेतनासह आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी युनियनचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे केली आहे.
डॉ. कराड यांनी पणन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्याना सलग ६७ महिने वेतन न मिळणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर त्याला त्याच्या श्रमाचा मोबदला वेळेवर मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र एवढ्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत वेतन थकीत राहण्यामागील कारणे काय आहेत, संबंधित अधिकारी व प्रशासनाने कोणती कार्यवाही केली आणि शासनाच्या नियमांचे पालन का झाले नाही, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.केशव बनसोडे यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनेक महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्याच काळात बनसोडे हे आजाराने ग्रस्त झाले. उपचारासाठी आवश्यक असलेला खर्च करणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आणि अखेर त्यांचे निधन झाले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची केवळ प्रशासकीय बाब म्हणून नव्हे, तर मानवी दृष्टिकोनातूनही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आष्टी बाजार समितीतील घटना ही एकाकी घटना नसून राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त होत असल्याचा दावा डॉ. कराड यांनी केला आहे. काही बाजार समित्यांमध्ये अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले.बाजार समितीचे उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे केले जाते; मात्र आर्थिक अडचणींचा सर्वाधिक परिणाम नियमितपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होऊ नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी, व्यापारी आणि कामगारांसाठी महत्त्वाच्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिनोन्‌महिने वेतन न मिळणे आणि त्यातून त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. केशव बनसोडे यांच्या प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी डॉ. डी. एल कराड यांनी  केली आहे.

ठाण्यातील युवक पदाधिकाऱ्यांचा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश
अनिल ठाणेकर
ठाणे- ठाण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागली आहे. अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख  आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस,  आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेला अनुसरून आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारून मोठ्याप्रमाणात युवक पक्ष प्रवेश करू लागले आहेत. आज युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवा नेते वीरू वाघमारे यांच्या पुढाकाराने अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख  आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माथाडी सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, ओबीसी सेलच्या महिलाध्यक्ष मनिषा पाटील, बिपीन गेहलोत आदी उपस्थित होते.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझर अनावरण सोहळयास अभिनेते आदिनाथ कोठारे, निलेश साबळे यांची उपस्थिती
संपदा सावंत
ठाणे (२४) :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार, ३० ऑगस्ट रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपक जाधव,  शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते (श.प)अभिजीत पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त १ मनिष जोशी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेपूर्वी ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझरचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते, अभिनेते नीलेश साबळे व आदीनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हांचे अनावरण करण्यात आले. मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाही २१ किलोमीटर पुरुष व महिला, १८ वर्षांवरील पुरुष १० किलोमीटर आणि १८ वर्षांवरील महिला १० किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.
२१ किलोमीटर पुरुष व महिला गटातील स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन पुन्हा महापालिका भवन येथेच समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकाला १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला ३० हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाला २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
१८ वर्षांवरील महिलांसाठी १० किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
१८ वर्षांवरील पुरुषांची १० किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन मिलेनियम टोयोटा येथे समाप्त होईल. या गटासाठीही प्रथम २५ हजार, द्वितीय २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
१५ वर्षांवरील मुले-मुलींसाठी ५ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन ते माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ८ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ५ हजार ५००, चतुर्थ ५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ४ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ३ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम ५ हजार ५००, द्वितीय ५ हजार, तृतीय ४ हजार ५००, चतुर्थ ३ हजार ५०० आणि पाचव्या क्रमांकासाठी ३ हजार रुपयांचे पारितोषिक आहे. शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय करण्यात आली आहे.
६० वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी १ किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका भवन येथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत ३ किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. महापालिका भवन येथून सुरू होऊन याच ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होईल. या गटातील विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘रन फॉर फन’ ही १ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक विजेता ठरला तरी पारितोषिकाची संख्या आणि रक्कम समान राहणार आहे.
मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याने स्पर्धा मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावे. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने धावून मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.

आशियाई कनिष्ठ क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई, २४ ऑगस्ट: मुंबईतील आयटीसी मराठा शेरेटन येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ मुलींच्या क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत, अव्वल मानांकित डब्ल्यूएफएम प्रतीती बोरदोलोई हिने सातव्या फेरीत डब्ल्यूसीएम आद्या गौडा हिच्यावर महत्त्वपूर्ण विजय मिळवत गुणतालिकेत एकहाती आघाडी घेतली. या विजयामुळे प्रतीतीचे ७ पैकी ६ गुण झाले असून, ती आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अर्धा गुण पुढे आहे. सातव्या फेरीपूर्वी संयुक्त आघाडीवर असलेल्या तुर्कमेनिस्तानच्या डब्ल्यूसीएम शोहरादोव्हा लेला हिला शिवंशिका जी हिने बरोबरीवर रोखले, ज्यामुळे लेलाचे गुण ५.५ वर आले. एफएम पृषिता गुप्ता हिने डब्ल्यूएफएम निवेदिता व्ही. सी. हिचा पराभव करून विजेतेपदाच्या शर्यतीतील आपली दावेदारी मजबूत केली; तिनेही ५.५ गुण गाठले आणि लेलासोबत पाठलाग करणाऱ्या गटात स्थान मिळवले. कझाकस्तानची डब्ल्यूएफएम मारिया खोल्याव्हको आणि डब्ल्यूसीएम दक्षता कुमावत यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आणि त्या ५ गुणांवर पोहोचल्या. खुल्या गटात (ओपन चॅम्पियनशिप) सात फेऱ्यांनंतर अव्वल मानांकित आणि जीएम होण्याच्या मार्गावर असलेल्या मयांक चक्रवर्तीने आपली एकहाती आघाडी कायम राखली. मुख्य पटावर (टॉप बोर्ड) आयएम विग्नेश अद्वैत वेमुला याने मयांकला बरोबरीवर रोखले, परंतु हा निकाल त्याची एकूण गुणसंख्या ७ पैकी ६ वर नेण्यासाठी आणि पाठलाग करणाऱ्या खेळाडूंच्या अर्धा गुण पुढे राहिला. रशियाच्या आयएम आर्टेम पिंगिन याला आश्चर्यकारकपणे दक्ष गोयल याने बरोबरीवर रोखले, तर एफएम शर्नार्थी वीरेश याने तुर्कमेनिस्तानच्या एफएम अमनमुहम्मद होम्मादोव्ह याच्यावर महत्त्वपूर्ण विजय मिळवत ५.५ गुण गाठले. स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना, विग्नेश, पिंगिन आणि वीरेश हे खेळाडू मयांकला जोरदार आव्हान देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *