9 Sep Bitambatmi All pages

Open Book

अनिल ठाणेकर

ठाणे, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशभक्तांच्या वाहनांना पथकर माफी देण्याबरोबरच विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारितील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवर गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. अटल सेतू मार्गावरील पथकर नाक्यांचाही या निर्णयात समावेश करण्यात आला आहे. गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी मिळण्यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ – कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टिकर वाहनावर लावणे आवश्यक राहणार आहे. या स्टिकरवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद करून संबंधित परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस यंत्रणा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या समन्वयाने पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पास दाखविल्यानंतरच पथकरमाफीचा लाभ संबंधित वाहनांना मिळणार आहे.

चौकट

एसटी बसनाही टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनाही पथकरमाफी देण्यात येणार आहे. संबंधित बसगाड्यांसाठी आवश्यक त्या प्रमाणात पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या एसटी बसच्या बससेवा मार्गावर संबंधित पास लावून किंवा दाखवून पथकरमाफीचा लाभ घेता येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पथकरमाफी आणि उपलब्ध सुविधांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचावी, यासाठी पोलीस व परिवहन विभागाने आवश्यक त्या प्रमाणात अधिसूचना/जाहिरात प्रसिद्ध करावी, असेही शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जात नसल्याने, श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी गेले २ वर्षांपासून मोर्चा, धरणे,  निदर्शने आणि २८ दिवसांचे साखळी उपोषण अशा विविध प्रकारे लढा दिला.  ठाणे औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार मे. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, पुणे यांनी न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत म्हणून शेवटी श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी ६८ कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाच्या थकीत रक्कम वसुलीसाठी ठाणे कामगार उप आयुक्त कार्यालयात किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत वसुली दावा दाखल केला.

सहा सात वर्षे किमान वेतन कायद्यानुसार वेतनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व ६८ सफाई कामगारांना शेवटी सहा महिन्यांची वेतन फरकाची रक्कम दुप्पट दंडासहित रूग्णालय प्रशासनाने कामगारांच्या बॅंक खात्यात सोमवारी ७ सप्टेंबर २०२६ रोजी जमा केल्याने कामगारांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं आहे. लवकरच उर्वरित किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्याची आशाही निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी कामात कंत्राटीकरण रद्द होणे, कामगारांना योग्य वेतन व भत्ते हक्क म्हणून मिळणे आदी मुद्दे अद्याप बाकी असून, त्यासाठी कसून लढण्यास युनियन कटिबद्ध आहे, असे युनियनचे उपाध्यक्ष डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी जाहीर केले आहे.

सुमारे वर्षभर  वसुली दाव्याच्या प्रक्रियेनंतर, सहाय्यक कामगार आयुक्त तथा प्राधिकारी किमान वेतन अधिनियम यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी सहा महिन्यांच्या थकीत वेतन फरकाच्या रकमेच्या दुप्पट दंडासहित एकूण ५८ लाख रुपये आदेशाचे दिनांकापासून ४५ दिवसांत ठेकेदार यांनी अदा करावे. ठेकेदार यांनी सदरील रक्कम अदा केली नाही तर पुढील ६० दिवसांत मूळ मालक रूग्णालय प्रशासनाने सदर रक्कम अदा करावी; असे आदेश पारित केले. परंतु ठेकेदार आणि प्रशासनाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही. ठेकेदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे औद्योगिक न्यायालयाचे ११ जून २०२४ चे आदेश आणि वसुली दाव्यात प्राधिकारी किमान वेतन अधिनियम १९४८ यांनी दिलेले आदेशाची अंमलबजावणी चार आठवड्यांत करण्याचे आदेश दि. १६ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित केले. मुंबई उच्च न्यायालयात युनियन तर्फे वरिष्ठ अधिवक्ता गायत्री सिंह आणि सुधा भारद्वाज यांनी कामगारांची बाजू मांडली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामगारांना न्याय मिळाला आहे.

 

अनिल ठाणेकर

ठाणे, सहा महिन्यांच्या थकीत वेतन फरकाच्या रकमेच्या दुप्पट दंडासहित एकूण ५८ लाख रुपये ४५ दिवसांत ठेकेदार यांनी अदा करावे. ठेकेदार यांनी सदरील रक्कम अदा केली नाही तर पुढील ६० दिवसांत मूळ मालक रूग्णालय प्रशासनाने सदर रक्कम अदा करावी; असे आदेश पारित केले होते यानुसार ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सर्व ६८ सफाई कामगारांना, सहा महिन्यांची वेतन फरकाची रक्कम दुप्पट दंडासहित रूग्णालय प्रशासनाने कामगारांच्या बॅंक खात्यात सोमवारी ७ सप्टेंबरला जमा केली असून, कामगारांसाठीच्या श्रमिक जनता संघ युनियनच्या लढ्यास अखेरीस यश प्राप्त झाले आहे.

रूग्णालयातील कर्मचारी व श्रमिक जनता संघ युनियनचे युनियनचे संघटक दीनानाथ देसले, अनिता कुंभावत, शर्मिला लोगडे, संजय सेंदाणे, सोनी चौहान आदी कार्यकर्त्यांनी या लढ्यात सातत्याने विशेष परिश्रम घेतले. कामगारांच्या साखळी उपोषण काळात श्रमिक जनता संघ युनियनची ठाणे, कल्याण, मुंबई येथिल इतर युनिट्स तसेच ठाण्यातील अन्य कामगार युनियन्स व संघटनांनी लढ्यास पाठींबा दिल्याबद्दल, युनियनचे सचिव सुनील दिवेकर व सुनिल कंद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

मुंबई, ८ सप्टेंबर: आरसीएफ स्पोर्ट्स क्लबतर्फे मुंबईत होणाऱ्या स्थानिक स्पर्धांमध्ये आरसीएफ व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच्या संघासाठी खेळाडूंच्या निवडचाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचण्या चेंबूर येथीलआरसीएफ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर शुक्रवार, ११ सप्टेंबर आणि शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घेतल्या जातील. १८ वर्षांवरील खेळाडू या चाचण्यांसाठी पात्र आहेत. निवड चाचण्यांदरम्यान पडताळणीसाठी खेळाडूंनी आपली क्रीडा प्रमाणपत्रे आणि कामगिरीचे अहवाल (मूळ आणि छायाप्रत) सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी खेळाच्या गणवेशात मैदानावर उपस्थित राहावे. खेळाडूंनी अधिक माहितीसाठी सुनील कुलकर्णी (मोबाईल: ७९७७०६७५६४) यांच्याशी संपर्क साधावा.

भारताच्या यश फडतेने जिंकले आरहूस स्क्वॉश स्पर्धेचे जेतेपद

मुंबई, ८ सप्टेंबर: भारतीय स्क्वॉशपटू यश फडतेने डेन्मार्क येथील आरपीएम पॉवर आरहूस ओपन ही स्क्वॉश स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा डॅनिश स्क्वॉश कॅलेंडरमधील तसेच युरोपियन स्क्वॉश सर्किटमधील एक प्रमुख स्पर्धा मानली जाते. संपूर्ण स्पर्धेत फडतेने उत्कृष्ट कामगिरी केली आणि विजेतेपदापर्यंतच्या प्रवासात त्याच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंना पराभूत केले.

उपांत्यपूर्व फेरीत गोव्याच्या फडतेने तिसऱ्या मानांकित आयर्लंडच्या कार्ल मॅकलॉघनीला ३-० (११-७, ११-८, ११-९) अशा फरकाने हरवले. त्यानंतर, उपांत्य फेरीत त्याने दुसऱ्या सीडेड डेन्मार्कच्या माल्थे लॉरसेनवर ३-१ असा विजय मिळवला.

अंतिम सामन्यात फडतेसमोर टॉप सीडेड डेन्मार्कच्या मॅग्नस लॉरसेचे आव्हान होते. यातही त्याने उत्कृष्ट खेळ करत ६२ मिनिटांत ३-१ (११-८, १८-१६, ७-११, ११-४) असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले.

आरहूस स्क्वॉश स्पर्धेमधील सर्वोत्तम कामगिरीनंतर यशने बेल्जियममधील पीएसए अरामिस ओपनवर लक्ष केंद्रित केले आहे. ही स्पर्धा १० दिवसांनी सुरू होणार आहे. त्यानंतर तीन आठवड्यांनी तो फ्रान्समधील ब्रेस्ट येथे होणाऱ्या पीएसए ब्रेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेत सहभागी होईल.

0000000

स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या १३व्या राज्यस्तरीय स्टेट गेम्स या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले तर यजमान कोल्हापूर संघाने उपविजेतेपद पटकावले. बीडला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये राज्यातील ६३० खेळाडूंनी भाग घेतला होता.

ठाणे जिल्ह्याच्या १४५ खेळाडूंनी ॲथलेटिक्स, स्केटिंग, फुटबॉल आणि क्रिकेट या स्पर्धेमध्ये सहभाग घेत सर्व खेळांमध्ये आपलं वर्चस्व राखलं. या स्पर्धेतील सर्व विजेते खेळाडू रोहतक हरियाणा येते २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय  स्टुडन्ट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे महाराष्ट्राचे सचिव सुनील शिंदे यांनी सांगितले.  ठाण्याच्या या सर्व विजयी खेळाडूंना प्रशिक्षक राम निंबाळकर, मनोज जाधव, राजू घुले, गणेश बागुल, किसन यादव, राजेंद्र पवार, नरेंद्र वामनोरे, ऐश्वर्या मदने, योगेश जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं.

शहर पथविक्रेत्यांचा इंदिरा चौकातून मनपा कार्यालयावर मोर्चा

कल्याण : पथविक्रेत्यांवर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ शहर पथविक्रेता समितीच्या वतीने बुधवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक येथून निघणार असून, महानगरपालिका कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती केडीएमसीच्या शहर पथ विक्रेता समितीचे सदस्य भालचंद्र पाटील यांनी दिली. शहर पथविक्रेता अधिनियम २०१४ नुसार पथविक्रेत्यांना संरक्षण देणे आवश्यक असताना, प्रशासनाकडून कायद्याचे उल्लंघन करून कारवाई केली जात असल्याचा आरोप पथविक्रेता समितीने केला आहे. कारवाईमुळे अनेक पथविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे समितीचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर पथविक्रेत्यांवरील कारवाई तात्काळ बंद करावी, जप्त केलेल्या गाड्या व साहित्य तातडीने परत करावे, नोंदणीकृत पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोर्चानंतर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

 

भरत गोगावले यांचा गौरवोद्गार; किशन जावळे यांनीही रेस्क्यू पथकांच्या धैर्याचे केले कौतुक

अशोक गायकवाड

अलिबाग – अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी अशा संकटांत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. रायगड पोलिसांच्या ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत कुरुळ येथील आर.सी.एफ. सभागृहात ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल उपस्थित होते. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वाढणार असल्याने पोलीस, प्रशासन व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अपघातांच्या वेळी तातडीने बचावकार्य करता यावे, यासाठी रेस्क्यू पथकांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही गोगावले यांनी दिली. ‘वेगापेक्षा सुरक्षा आणि घाईपेक्षा जीवन महत्त्वाचे,’ असा संदेशही त्यांनी दिला. रायगडमध्ये विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी रेस्क्यू पथकांनी धैर्याने काम केले असून, प्रशासनाला त्यांची मोठी साथ मिळते, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. यावेळी विविध रेस्क्यू पथकांचा सन्मान करण्यात आला. रिलायन्स फाउंडेशन, नागोठणे यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला बचाव नौका व साहित्य किट सुपूर्द करण्यात आले.

0000

 

महापौर कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव उपक्रमात

मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित  मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या चेंबूर परिसरातील पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात सार्थक वाघमारे सर्वोत्तम शिबिरार्थी ठरला. सार्थकला पुरस्कार देऊन नगरसेवक महादेव शिवगण, चेंबूरनाका मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रजीत कौर, मुख्याध्यापक यशवंत पवार, डॉ. जितेंद्र लिंबकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू व राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांच्या मार्गदर्शनामुळे नवोदित व उदयोन्मुख शालेय खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा करीत दुसऱ्या दिवशी उत्तम सराव केला. परिणामी शाळेने देखील उदयोन्मुख खेळाडूंना दररोज चँम्पियन कॅरम बोर्डवर एक तास सराव देण्याचे ठरविले आहे. सर्वोत्तम शिबिरार्थी सार्थक वाघमारेला आयुष जगताप, रुद्र कडलक, अहमद रझा, विष्णू स्वर्णकार आदींनी चुरशीचे आव्हान सहभागी ६५ शालेय खेळाडूंमध्ये दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात होणार आहे.

 

०००

अनिल ठाणेकर

ठाणे : ठाण्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रिंग मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली लोकमान्यनगरातील हजारो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असा आक्रमक इशारा लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीने दिला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य केला जाणार नाही. रिंग मेट्रोमुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि जास्तीत जास्त ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, अशा पर्यायी मार्गांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काही मोजक्या हितसंबंधांसाठी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची घाई करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिंग मेट्रो प्रकल्पामुळे कमीत कमी नागरिक बाधित होतील आणि बाधित नागरिकांचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ग्वाहीही सरनाईक यांनी दिली. तसेच लोकमान्यनगरातील रहिवाशांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसून, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बैठकीला जितेंद्रकुमार इंदिसे (आरपीआय एकतावादी), जयेंद्र दरेकर (उपशहरप्रमुख, शिवसेना), रामचंद्र गुरव, राजीव शिरोडकर, भालचंद्र देसाई, प्रदीप चव्हाण (भाजप), सागर भोसले (मनसे), बालेश हत्तीआंबीरे (राष्ट्रवादी काँग्रेस—शरदचंद्र पवार पक्ष), मल्हारी सावरे, शीतल संतोष ढमाले (नगरसेविका) आणि राकेश शिंदे (नगरसेवक) यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिंग मेट्रोसाठी लोकमान्यनगरातील हजारो घरे बाधित झाल्यास पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. काही बिल्डरांच्या कथित हितासाठी लोकमान्यनगर उद्ध्वस्त करून क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न आहे का, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

विभागप्रमुख संतोष ढमाले यांनी लोकमान्यनगरच्या विनाशावर विकासाची इमारत उभी करू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या घरांवर बुलडोझर चालवून कोणताही प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाल्यास जनतेचा रोष रस्त्यावर दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, काही विघ्नसंतोषी व्यक्ती स्वार्थासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरून रिंग मेट्रोला समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगरसेवक राकेश शिंदे यांनी केला. अशा भूलथापांना लोकमान्यनगरची जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्याचा विकास हवा; मात्र लोकमान्यनगरच्या विनाशाच्या किमतीवर नाही. नागरिकांचे हित, बाधितांचे योग्य व १०० टक्के पुनर्वसन आणि पर्यायी मार्गांचा विचार केल्याशिवाय रिंग मेट्रो प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *