6 Aug Bitambatmi All pages

Open Book

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करत नोंदवला निषेध
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना गुंगी गुडिया असा अपशब्द काँग्रेस पक्षाच्या सोशल हॅंडलवर करण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घुसून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काँग्रेसकडून माफीनामा आला नसल्याने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने हाताला काळ्या फिती लावून आणि संविधान हातात घेऊन जोरदार मूक आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आमदार सना मलिक-शेख, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
०००००००

मुंबई दि. ५ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा पदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष पदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती सकाळी करण्यात आली तर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिन्मय गाढे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन २००९ पासून काम करत आहेत. नाशिक विद्यार्थी शहराध्यक्ष, युवक शहर कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत आणि आता विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
०००००००

कल्याण:  इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागांच्या संयुक्त विद्यमाने “युवा सक्षमीकरण आणि करिअर: आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन” या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन संमिश्र पद्धतीने नुकतेच करण्यात आले.
महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात आयोजित या वेबिनारमध्ये १०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन सहभाग नोंदविला. परदेशातील सहभागींच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वेबिनारमध्ये डॉ. इनिबेहे जॉर्ज उकपोंग, कृषी विस्तार व व्यवस्थापन विभाग, फेडरल पॉलिटेक्निक, एकोवे, बायल्सा स्टेट, नायजेरिया यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता, नेतृत्वगुण, नवोपक्रम आणि जागतिक संधी यांवर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या जागतिक रोजगार बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी डिजिटल कौशल्ये, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर, उच्च शिक्षण, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय संधींबाबत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन मिळविले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IQAC समन्वयक प्रा. सोनम चव्हाण यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले.  श्रेयसी उपाध्याय (एस.वाय.बी.एस्सी.) हिने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. प्रा. सायली म्हात्रे, प्रा. जयवंत मोरे, प्रा. दिनेश धनगर आणि पंकज चन्ने यांनी कार्यक्रम समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच प्रज्ञा पाटील आणि प्रा. उल्हास गायकर यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विलास गायकर यांनी प्राचार्या तसेच सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व परिश्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशाच दर्जेदार आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप प्रा. सचिन कांबळे यांनी आभार प्रदर्शनाने केला. कार्यक्रमातील सर्व नोंदणीकृत सहभागीांना ई-प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. देश-विदेशातील सहभागींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा आंतरराष्ट्रीय वेबिनार अत्यंत यशस्वी ठरला.
००००

कल्याण: इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेखाली गणेश मैदान, गोवंडी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या वाडेघर गावातील साई फिटनेस जिमच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये पदकांची लयलूट केली. खेळाडूंच्या या यशामुळे जिमसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेत साई फिटनेस जिमचे मुख्य प्रशिक्षक महेश पाटील यांनी ६६ किलो मास्टर-१ रॉ बेंचप्रेस गटात सुवर्णपदक पटकावत “स्ट्राँगमन बेंचप्रेस” हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. तसेच दिव्यांशु पाटील यांनी ५३ किलो सब-ज्युनियर रॉ बेंचप्रेस गटात सुवर्णपदक जिंकत “स्ट्राँगमन बेंचप्रेस” हा विशेष बहुमान मिळविला.
याच स्पर्धेत सनी सकपाळ यांनी ९३ किलो वरिष्ठ गटातील रॉ बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक, प्रथमेश इंगळे यांनी ७४ किलो सब-ज्युनियर एसबीडी प्रकारात सुवर्णपदक, सर्वेश जामदार यांनी ७४ किलो सब-ज्युनियर रॉ बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक, स्वयम ऋतु सिंह यांनी ८३ किलो रॉ बेंचप्रेस गटात ९५ किलो वजन उचलत कांस्यपदक, गायकवाड यांनी ७४ किलो ज्युनियर डेडलिफ्टमध्ये रौप्यपदक, कर्तव्या यांनी ५३ किलो ज्युनियर डेडलिफ्टमध्ये रौप्यपदक, तर यश यांनी ६६ किलो सब-ज्युनियर डेडलिफ्टमध्ये कांस्यपदक पटकावत साई फिटनेस जिमच्या यशात मोलाची भर घातली.
या सर्व यशामागे महेश  पाटील यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे खेळाडूंनी सांगितले. साई फिटनेस जिममध्ये तयार होत असलेली गुणवंत खेळाडूंची फळी आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कल्याण: ठाणे जिल्हा राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व सर्व तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन क्रीडा शिक्षकांची सर्वसाधारण सभा रविवार ९ ऑगस्ट, सकाळी ११ ठाणे भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय, टी.एम.टी बस स्टॉप, गावदेवी मंदिराच्या बाजूला, ठाणे पश्चिम येथे आयोजित केलेली आहे.
या सभेला महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे चे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्य सचिव चांगदेव पिंगळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी नव्याने तयार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई विभाग सचिव अंकुर आहेर यांनी केले आहे. क्रीडा शिक्षकांनी ८४२२९१९६१२ या नंबरवर संपर्क साधावा.

नवी मुंबई : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत गणनापत्र (Enumeration Form) दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टवरून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे मतदारांना आता १७ ऑगस्टपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे गणनापत्र सादर करता येणार आहे.
१ ऑक्टोबर हा पात्रता दिनांक गृहीत धरून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम ३० जूनपासून सुरू आहे. बीएलओमार्फत गणनापत्रांचे वितरण, संकलन आणि डिजिटलायझेशनचे काम सुरू असून, सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे पुनर्रचनाकरण आणि पुनर्व्यवस्थापनही १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदारयादीचे प्रकाशन २४ ऑगस्ट करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील. प्राप्त दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान पार पडेल. अंतिम मतदारयादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आतापर्यंत १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४ लाख ९७ हजार ३८० मतदारांपैकी ४ लाख ५९ हजार १५३ गणनापत्रांचे वितरण करण्यात आले असून, २ लाख २३ हजार ८०८ गणनापत्रे भरून प्राप्त झाली आहेत. त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे.
तर १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघात ४ लाख २२ हजार ३१७ मतदारांपैकी ४ लाख १० हजार ८६३ गणनापत्रांचे वितरण झाले असून, २ लाख १८ हजार २८ गणनापत्रे बीएलओंकडे जमा झाली आहेत. या अर्जांचे डिजिटलायझेशनही पूर्ण करण्यात आले आहे. गणनापत्र न भरल्यास नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाणार निवडणूक प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, १७ ऑगस्टपर्यंत गणनापत्र भरून बीएलओंकडे जमा न केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाऊ शकते.
सन २००२ च्या मतदारयादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव आढळले नाही, तरीही नागरिकांनी गणनापत्रातील कॉलम क्रमांक ३ मध्ये सध्याची माहिती भरून स्वाक्षरी करावी आणि निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र जोडून बीएलओंकडे अर्ज सादर करावा. अन्यथा मतदारयादीत नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-६ भरून संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल.
नागरिकांच्या सोयीसाठी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील संबंधित बीएलओंची माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी नागरिकांना अंतिम मुदतीची वाट न पाहता गणनापत्र तातडीने भरून बीएलओंकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी
विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद
अशोक गायकवाड
रायगड- कर्जत :देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणे ही काळाची गरज असून राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी.वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे यश केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की,मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेचे विशेष कौतुक करीत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृषी अभ्यास सहल हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुस्तके, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळत असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सन २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अथक परिश्रमाने देशाला अन्न सुरक्षित ठेवत आहेत. त्यांच्या हितासाठी कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून विद्यापीठाच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत भात लागवड
दौऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले, तर शेतकऱ्यांशी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत चर्चा करत कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची सांगड घालणे,ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाला त्यांनी भेट दिली.     यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून ऍड.अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले.
कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, विद्यापीठाचे उपसंचालक( बियाणे ) डॉ. अरुण माने, मंडळ अधिकारी चिचवली श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी आकाश काळे, भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, भाजपचे उत्तर रायगड इंजिनियर सेल अध्यक्ष मंदार मेहंदळे यांच्यासह प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
– तातडीने कार्यवाहीचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश
छत्रपती संभाजीनगर: पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अद्यापही शासनाने जाहीर केलेली रोख पारितोषिकाची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा आता विधान भवनापर्यंत पोहोचला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विश्वविजेत्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक आणि शासकीय सेवेत नोकरी देण्याची ठाम मागणी केली.
दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ₹१० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप / वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या सांघिक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक देण्याची तरतूद असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अद्यापही जाहीर केलेले पारितोषिक मिळालेले नाही. त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित खेळाडूंना रोख बक्षीस तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये आयोजित “पल पल दिल के पास – म्युझिक फॉर अ कॉज” या संस्मरणीय संगीत मैफिलीत संगीत, आठवणी आणि संवेदनांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांच्या उपस्थितीत, त्यांचे सुपुत्र अमित कुमार आणि सुमित कुमार, तसेच नात मुक्तिका गांगुली यांनी किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करत त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आयोजित या कार्यक्रमातून वंचित कर्करोगग्रस्त कर्करुग्णांसाठी निधी उभारण्यात आला. संगीत, वारसा आणि मानवतेचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *