31 July Bitambatmi All pages

Open Book
Open Book

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध जैव विविधता भविष्यात अबाधित राहणार काय असा सवाल करत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग,अवैध मायनिंग , येऊ घातलेले अणु ऊर्जा प्रकल्प या सारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘सिंधुदुर्ग डॉक्टर्स फ्रेटरनिटी क्लब ‘तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विकास परिषदेत’ या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आंबोली -चौकुळ  येथे आयोजित करण्यात आलेल्या या   परिषदेत वैद्यकीय विषयांसह  ‘सिंधुदुर्गातील जैवविविधते समोरील आव्हाने’ या विषयावर एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे सूत्रचालन व निवेदन डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना डॉ. परुळेकर म्हणाले, सिंधुदुर्गातील निसर्ग अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच संवेदनशील आहे अशा प्रकारची जैवविविधता निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. इथला प्रदेश हा जगातील ३६ जैविविधता ‘हॉटस्पॉट’ पैकी एक आहे. हा भाग संपूर्ण देशासाठी एक अमूल्य नैसर्गिक ठेवा आहे. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी आपले संशोधन आणि निरीक्षणे मांडली. जिल्हा वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी तिलारी परिसरातील पट्टेरी वाघांच्या अस्तित्वासह गेल्या काही वर्षांमध्ये विकसित होत असलेल्या व्याघ्र प्रजनन क्षेत्राची माहिती दिली. संशोधक हेमंत ओगले आणि डॉ.दत्तप्रसाद सावंत यांनी पश्चिम घाटातील सुमारे १६०० किलोमीटरच्या जैव विविधतेचा आढावा घेतला.
अंबोली- चौकुळ परिसरात असलेल्या फुलपाखरांच्या विविध प्रजातींची माहिती दिली तसेच या परिसरात  आढळून आलेल्या ‘चतुर’ या कीटकाच्या नव्या प्रजाती विषयी माहिती दिली. संपूर्ण श्रीलंका देशात  ‘चतुर’ कीटकांच्या जितक्या प्रजाती आहेत तितक्याच प्रजाती एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.अशी माहिती त्यांनी दिली. पक्षी तज्ञ भाग्यश्री परब यांनीही अतिशय उदबोधक  माहिती दिली. पूर्वी जिल्ह्यात २५० पक्षी प्रजातींची नोंद होती. आता हा आकडा ४०० च्या वर गेला आहे. मात्र बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागल्यामुळे या दुर्मिळ पक्षांच्या अधिवासाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी नमूद केले.
जैव विविधता अभ्यासक काका भसे यांनी पर्यटन विषयक धोरण, तसेच अन्य शासकीय योजनांसंबंधीच्या धोरणांमुळे पर्यावरण विषयक  समस्या वाढल्या असून या संकटाच्या पार्श्वभूमीवर जैववविधतेच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली. या क्लब तर्फे अशा प्रकारच्या कार्यशाळा परिषदा आणि अभ्यास वर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणार असून त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांमध्ये पर्यावरण बचावासाठी जनजागृती होऊ शकेल असा विश्वास ‘क्लब’चे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
00000000

शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली!
 राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी – प्रताप सरनाईक
ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले ‘ठाणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करताना केवळ पायाभूत सुविधांचा विस्तार पुरेसा नाही, तर युवकांना प्रशिक्षण, खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि नागरिकांना विविध उपक्रमांसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरानंदानी इस्टेट जवळील मौजे वाघबीळ येथे उभारण्यात येणारे हे सुविधा भवन त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल,’
प्रस्तावित प्रकल्पासाठी २०२०.४८ चौ.मी. क्षेत्रफळाचा सुविधा भूखंड असून, सुमारे ४५२२.०५ चौ.मी. बांधकाम क्षेत्रात बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. बेसमेंटमध्ये ३० चारचाकी आणि ५० स्कूटरसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर ट्रेनिंग हॉल, कॅफे, किचन, प्रसाधनगृह, शस्त्र-साहित्य वाटप कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालय प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर १० मीटर शूटिंग रेंजची ११ लेन, ६५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, ट्रेनिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल आणि प्लेअर लाऊंज असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर २५ मीटर शूटिंग रेंजच्या १० लेन, ५५ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष, स्टोअर रूम आणि प्रसाधनगृह; तर तिसऱ्या मजल्यावर ५० मीटर शूटिंग रेंजच्या ८ लेन, ४० प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, नियंत्रण कक्ष व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘ठाण्यातील नेमबाजीपटूंना दर्जेदार सराव आणि प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यासाठी सक्षम पायाभूत व्यवस्था निर्माण व्हावी, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. ठाण्याच्या क्रीडा विकासाला नवी ओळख देणारे केंद्र म्हणून हे सुविधा भवन विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जनसंपर्क विभाग

000
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी-विभाग, ऐरोली कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई करत बांधकामाचा काही भाग निष्कासित केला. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त व उपआयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी साधना पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या माहितीनुसार, ऐरोली येथील संजयकुमार दुबे, प्रतिभाकुमारी आणि ठेकेदार संतोष हळसे यांनी परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. या बांधकामासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये २१ जानेवारी २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. संबंधितांना बांधकाम स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोटीसकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवल्याने महापालिकेने प्रत्यक्ष तोडक कारवाई केली.
या मोहिमेत जी-विभागाच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, १८ मजूर, दोन ब्रेकर, दोन घण, एक गॅस कटर, दोन जनरेटर तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेने स्पष्ट केले असून, शहरातील अनधिकृत बांधकामांवर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.

झडपोली (विक्रमगड) | प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेनिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांना हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. झडपोली येथील जिजाऊ नगरीमध्ये दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
जिजाऊ संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार, शेती विकास आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्याचा लाभ घेतलेल्या अनेक विद्यार्थी व नागरिकांनी यावेळी सांबरे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या जीवनातील प्रेरणास्थान असल्याचे सांगत आशीर्वाद घेतले.
यावेळी विद्यार्थ्यांनी “गुरु केवळ शिक्षण देत नाही, तर आयुष्याला दिशा देतो,” अशी भावना व्यक्त केली. तसेच विविध क्षेत्रांतील शिक्षक, मार्गदर्शक आणि गुरुजनांचा सन्मान करून गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त झालेला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा स्नेह व आदर हा जिजाऊ संस्थेने समाजासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कल्याण : फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या जोरावर डोंबिवली मधील एम्स कॉलेज ऑफ फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) कडून शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापनात उत्कृष्ट श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. हे मानांकन संस्था, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
महाविद्यालयाने अध्यापनातील गुणवत्ता, प्रभावी शैक्षणिक व्यवस्थापन, आधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांच्या आधारे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा राज्यस्तरावर नोंद झाली आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करताना, भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण यावर अधिक भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, “एमएसबीटीईकडून मिळालेली ‘उत्कृष्ट’ श्रेणी ही केवळ सन्मानाची बाब नसून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पोचपावती आहे. आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्टतेचा हा प्रवास कायम ठेवला जाईल.” फार्मसी क्षेत्रात सक्षम, कुशल आणि जबाबदार व्यावसायिक घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या एम्स कॉलेज ऑफ फार्मसी डोंबिवलीने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्वतंत्र ओळख निर्माण केली असून,  एमएसबीटीईचे हे मानांकन त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 
कल्याण : कल्याण पश्चिमेतील काळा तलावात मंगळवारी एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्या केली की, तिला तलावात ढकलून हत्या केली हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे तलाव परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी महापौर हर्षाली चौधरी आणि मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संताप व्यक्त केला आहे.
हि तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह काळा तलावात आढळून आला. तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला असून  या तरुणीने तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात असला तरी तिला कोणी ढकलून दिले का  त्यामुळे तिचा तलावात बुडून मृत्यू झाला या बाजूनेही बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. या तलावाच्या विकासासाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या तलाव परिसरात ३२ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सायंकाळी तरुणीचा मृतदेह तलावात मिळून आल्याने नक्की घटना कशी घडली हे सीसीटीव्हीत पाहता येईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. तेव्हा तलाव परिसरातील ३२ सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याची  धक्कादायक बाब समोर आली.
या प्रकरणी मनसे नगरसेवक गणेश लांडगे आणि विभाग प्रमुख कपिल पवार यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेतली. यावेळी विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव  यांच्याकडे याबाबत विचारणा करुन संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही लावले असले तरी त्यांची देखभाल दुरुस्तीच केली जात नसल्याची बाब याघटनेच्या निमित्ताने उघड झाली आहे. महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकार्यांसमवेत काळा तलाव येथे धाव घेऊन तलाव परिसराची पाहणी केली. तसेच तलावाच्या सुरक्षेसंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

कल्याण : कल्याण पूर्वेतील नेतिवली चौक परिसरातील कोकण किनारा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरफोडी करून २८ हजारांची रोकड आणि एका ग्राहकाचा मोबाईल फोन लंपास केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यवस्थापक सुरेश शेट्टी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ जुलै रोजी पहाटे १ ते सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्याने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील महिला स्वच्छतागृहाच्या खिडकीची काच काढून आत प्रवेश केला. त्यानंतर तळमजल्यावरील कॅश काऊंटरच्या दोन्ही ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यामधील २८ हजारांची रोकड आणि एका ग्राहकाचा मोबाईल फोन चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
0000000

डोंबिवली, दि. २९ जुलै (आरती परब) : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मलंगगडावर जाऊन बाबा मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले तसेच पूजा- अर्चना करण्यात आली. यावेळी “आई भवानी शक्ती दे… मलंगगडाला मुक्ती दे…” या जयघोषाने संपूर्ण मलंगगड परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी राज्याच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सुख- समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या आरोग्य, ऐक्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी आमदार महेश लांडगे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रसिद्धी प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे, गटनेते शशिकांत कांबळे, उपमहापौर राहुल दामले, नाना सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश चव्हाण, आशु सिंग, सुजल म्हात्रे, अभिषेक यादव, विपुल म्हात्रे तसेच मलंगगड परिसरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि हिंदू परंपरेप्रती असलेली अढळ श्रद्धा व्यक्त करण्यात आली. मलंगगडाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *