ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत

ई20 पेट्रोलमध्ये आर्द्रता (Moisture) आणि क्लोराइडच्या उपस्थितीची तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तपासणी

ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत

नवी दिल्ली : अलीकडेच ईबीएमएस (E20 पेट्रोल) मधील आर्द्रता आणि क्लोराइड संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) संपूर्ण देशभर ईबीएमएस पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त आणि सखोल तपासणी केली आहे. या तपासणीतील निष्कर्षांनी इंधनाची गुणवत्ता निर्धारित मर्यादांमध्ये सातत्याने असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.काही ठिकाणी करण्यात आलेल्या दाव्यांच्या विपरीत, वैज्ञानिक पद्धतीने आखलेल्या व्यापक यादृच्छिक (Random) चाचण्यांच्या आधारे उपलब्ध पुराव्यांवरून असे स्पष्ट होते की इंधन दूषित होण्याबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.

तेल विपणन कंपन्या आपल्या सर्व मान्यवर ग्राहकांना आश्वस्त करू इच्छितात की, इंधनाची गुणवत्ता हा त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. वाहनांच्या कार्यक्षमतेवर किंवा ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य बाबींची तातडीने वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक ती सुधारात्मक कारवाई केली जाते.

भारत सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी क्लोराइडची कठोर मानके निर्धारित केली आहेत आणि संपूर्ण पुरवठा साखळीत त्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी उच्च वारंवारतेची देखरेख व्यवस्था लागू केली आहे. देशभरातील रिफायनऱ्या, डिस्टिलऱ्या, डेपो/टर्मिनल्स आणि किरकोळ विक्री केंद्रांवर (Retail Outlets) पुरवठा साखळीतील विविध टप्प्यांवर क्लोराइडचे परीक्षण केले जात असून, त्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीत गुणवत्ता सातत्याने राखली जात असल्याची पुष्टी झाली आहे.

आधीपासून अस्तित्वात असलेल्या गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियांव्यतिरिक्त, तेल विपणन कंपन्यांनी प्रत्येक किरकोळ विक्री केंद्रावर दररोज ८ ते १२ वेळा पाण्याचा प्रवेश (Water Ingress) आणि घनता (Density) चाचण्या करून देखरेख आणखी मजबूत केली आहे. याशिवाय, विविध ठिकाणी मोबाइल इंधन गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून, सर्वोच्च गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी इंधन प्रयोगशाळांमार्फत चाचणी निकालांचे स्वतंत्र प्रमाणीकरणही केले जात आहे.

पुरवठा साखळीतील या बहुआयामी आणि अधिक कठोर तपासणी प्रक्रियेमुळे आमची सर्वोच्च इंधन गुणवत्ता मानके पुन्हा सिद्ध झाली आहेत.

 

1. रिफायनरीमधून मिळणारे मोटार स्पिरिट (MS): पेट्रोलमधील प्रत्यक्ष क्लोराइडचे प्रमाण 1 ppm पेक्षा कमी

देशातील विविध रिफायनऱ्यांमधून यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या १०० हून अधिक अतिरिक्त पेट्रोल नमुन्यांच्या तपासणीत क्लोराइडचे प्रमाण सातत्याने कमी असल्याचे आढळले असून, सर्व नमुन्यांमध्ये ते 1 ppm किंवा त्यापेक्षा कमी आहे. यावरून भारतातील मजबूत रिफायनिंग आणि वितरण प्रक्रियेमधील गुणवत्ता नियंत्रण प्रभावी असल्याचे स्पष्ट होते.

2. डिस्टिलरीमधून मिळणारे शुद्ध इथेनॉल

डिस्टिलऱ्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या, मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटक असलेल्या इथेनॉलमध्येही क्लोराइडचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आढळले आहे. यावरून उत्पादन टप्प्यावर मजबूत गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येते.

तेल विपणन कंपन्या (OMCs) आणि CHT यांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष कार्यबलाने (Task Force) गेल्या १० दिवसांत देशातील ८० डिस्टिलऱ्यांमधील इथेनॉल नमुन्यांची तपासणी केली असून, सर्व नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 3 ppm पेक्षा कमी आढळले आहे.

3. तेल विपणन कंपन्यांच्या विपणन पायाभूत सुविधांद्वारे वितरित इथेनॉल मिश्रित मोटार स्पिरिट (E20)

डेपो / टँक ट्रक : डेपो आणि टर्मिनल्सवर तपासण्यात आलेले इथेनॉल आणि ई20 नमुने निर्धारित क्लोराइड मर्यादांमध्ये आढळले आहेत. या टप्प्यावर नियमित देखरेख केली जात असल्यामुळे साठवण आणि वितरण प्रक्रियेदरम्यान इंधनाची गुणवत्ता कायम राखली जात आहे. देशभरातील विविध OMC टर्मिनल्समधून गोळा करण्यात आलेल्या ८० हून अधिक नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण 3 ppm पेक्षा कमी आढळले.

किरकोळ विक्री केंद्रे (Retail Outlets): अधिक तीव्र देखरेख कार्यक्रमांतर्गत १,००० हून अधिक नमुने घेण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत १६० नमुन्यांच्या क्लोराइड तपासणी अहवालांचे विश्लेषण करण्यात आले असून, क्लोराइडचे प्रमाण 0 ते 3 ppm दरम्यान आढळले आहे. हे अनेक शेकडो ppm असल्याच्या दाव्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

देखरेख प्रणालीमध्ये केवळ चार स्वतंत्र प्रकरणांमध्ये क्लोराइडचे प्रमाण वाढलेले आढळले. अशा ठिकाणांवरील पुरवठा तात्काळ स्थगित करण्यात आला. त्यानंतर मूळ कारणांचा सविस्तर शोध घेऊन आवश्यक सुधारात्मक उपाययोजना राबविल्यानंतरच पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.

4. पाण्याच्या प्रवेशाची (Water Ingress) तपासणी

देशातील सुमारे ९०,००० किरकोळ विक्री केंद्रांवर भूमिगत साठवण टाक्यांची अनिवार्य तपासणी आणि देखरेख सुरू करण्यात आली आहे. या भूमिगत टाक्यांची दररोज ८ ते १२ वेळा तपासणी केली जात असून, आतापर्यंत कुठेही पाण्याचा प्रवेश झाल्याचे आढळलेले नाही.

वरील सर्व चाचण्यांचा तक्त्याच्या स्वरूपातील सारांश CHT च्या अधिकृत संकेतस्थळावर www.cht.gov.in येथे उपलब्ध आहे. अधिक चाचणी अहवाल उपलब्ध होत जातील तसे हे संकेतस्थळ अद्ययावत केले जाईल.

तेल विपणन कंपन्या ग्राहकांना पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितात की, इंधनाची गुणवत्ता हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. संपूर्ण पुरवठा साखळीत गुणवत्ता तपासणी सातत्याने केली जाते आणि जिथे कुठे कोणताही अपवाद आढळतो, तिथे त्वरित आणि प्रभावी सुधारात्मक कारवाई केली जाते.

वरील सर्व बाबींच्या आधारे ग्राहकांनी ई20 पेट्रोलचा निर्धास्तपणे वापर सुरू ठेवावा, कारण तेल विपणन कंपन्यांच्या जाळ्यातून पुरविण्यात येणारे इंधन निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार असून, ग्राहकांच्या हिताचे प्रत्येक टप्प्यावर संरक्षण करणाऱ्या मजबूत गुणवत्ता नियंत्रण आणि देखरेख यंत्रणेने ते समर्थित आहे.

Open Book
Open Book
Open Book

महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करत नोंदवला निषेध
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना गुंगी गुडिया असा अपशब्द काँग्रेस पक्षाच्या सोशल हॅंडलवर करण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घुसून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काँग्रेसकडून माफीनामा आला नसल्याने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने हाताला काळ्या फिती लावून आणि संविधान हातात घेऊन जोरदार मूक आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आमदार सना मलिक-शेख, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
०००००००

मुंबई दि. ५ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा पदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष पदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती सकाळी करण्यात आली तर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिन्मय गाढे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन २००९ पासून काम करत आहेत. नाशिक विद्यार्थी शहराध्यक्ष, युवक शहर कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत आणि आता विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
०००००००

कल्याण:  इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागांच्या संयुक्त विद्यमाने “युवा सक्षमीकरण आणि करिअर: आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन” या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन संमिश्र पद्धतीने नुकतेच करण्यात आले.
महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात आयोजित या वेबिनारमध्ये १०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन सहभाग नोंदविला. परदेशातील सहभागींच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वेबिनारमध्ये डॉ. इनिबेहे जॉर्ज उकपोंग, कृषी विस्तार व व्यवस्थापन विभाग, फेडरल पॉलिटेक्निक, एकोवे, बायल्सा स्टेट, नायजेरिया यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता, नेतृत्वगुण, नवोपक्रम आणि जागतिक संधी यांवर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या जागतिक रोजगार बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी डिजिटल कौशल्ये, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर, उच्च शिक्षण, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय संधींबाबत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन मिळविले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IQAC समन्वयक प्रा. सोनम चव्हाण यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले.  श्रेयसी उपाध्याय (एस.वाय.बी.एस्सी.) हिने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. प्रा. सायली म्हात्रे, प्रा. जयवंत मोरे, प्रा. दिनेश धनगर आणि पंकज चन्ने यांनी कार्यक्रम समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच प्रज्ञा पाटील आणि प्रा. उल्हास गायकर यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विलास गायकर यांनी प्राचार्या तसेच सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व परिश्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशाच दर्जेदार आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप प्रा. सचिन कांबळे यांनी आभार प्रदर्शनाने केला. कार्यक्रमातील सर्व नोंदणीकृत सहभागीांना ई-प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. देश-विदेशातील सहभागींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा आंतरराष्ट्रीय वेबिनार अत्यंत यशस्वी ठरला.
००००

कल्याण: इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेखाली गणेश मैदान, गोवंडी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या वाडेघर गावातील साई फिटनेस जिमच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये पदकांची लयलूट केली. खेळाडूंच्या या यशामुळे जिमसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेत साई फिटनेस जिमचे मुख्य प्रशिक्षक महेश पाटील यांनी ६६ किलो मास्टर-१ रॉ बेंचप्रेस गटात सुवर्णपदक पटकावत “स्ट्राँगमन बेंचप्रेस” हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. तसेच दिव्यांशु पाटील यांनी ५३ किलो सब-ज्युनियर रॉ बेंचप्रेस गटात सुवर्णपदक जिंकत “स्ट्राँगमन बेंचप्रेस” हा विशेष बहुमान मिळविला.
याच स्पर्धेत सनी सकपाळ यांनी ९३ किलो वरिष्ठ गटातील रॉ बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक, प्रथमेश इंगळे यांनी ७४ किलो सब-ज्युनियर एसबीडी प्रकारात सुवर्णपदक, सर्वेश जामदार यांनी ७४ किलो सब-ज्युनियर रॉ बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक, स्वयम ऋतु सिंह यांनी ८३ किलो रॉ बेंचप्रेस गटात ९५ किलो वजन उचलत कांस्यपदक, गायकवाड यांनी ७४ किलो ज्युनियर डेडलिफ्टमध्ये रौप्यपदक, कर्तव्या यांनी ५३ किलो ज्युनियर डेडलिफ्टमध्ये रौप्यपदक, तर यश यांनी ६६ किलो सब-ज्युनियर डेडलिफ्टमध्ये कांस्यपदक पटकावत साई फिटनेस जिमच्या यशात मोलाची भर घातली.
या सर्व यशामागे महेश  पाटील यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे खेळाडूंनी सांगितले. साई फिटनेस जिममध्ये तयार होत असलेली गुणवंत खेळाडूंची फळी आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कल्याण: ठाणे जिल्हा राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व सर्व तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन क्रीडा शिक्षकांची सर्वसाधारण सभा रविवार ९ ऑगस्ट, सकाळी ११ ठाणे भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय, टी.एम.टी बस स्टॉप, गावदेवी मंदिराच्या बाजूला, ठाणे पश्चिम येथे आयोजित केलेली आहे.
या सभेला महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे चे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्य सचिव चांगदेव पिंगळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी नव्याने तयार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई विभाग सचिव अंकुर आहेर यांनी केले आहे. क्रीडा शिक्षकांनी ८४२२९१९६१२ या नंबरवर संपर्क साधावा.

नवी मुंबई : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत गणनापत्र (Enumeration Form) दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टवरून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे मतदारांना आता १७ ऑगस्टपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे गणनापत्र सादर करता येणार आहे.
१ ऑक्टोबर हा पात्रता दिनांक गृहीत धरून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम ३० जूनपासून सुरू आहे. बीएलओमार्फत गणनापत्रांचे वितरण, संकलन आणि डिजिटलायझेशनचे काम सुरू असून, सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे पुनर्रचनाकरण आणि पुनर्व्यवस्थापनही १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदारयादीचे प्रकाशन २४ ऑगस्ट करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील. प्राप्त दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान पार पडेल. अंतिम मतदारयादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आतापर्यंत १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४ लाख ९७ हजार ३८० मतदारांपैकी ४ लाख ५९ हजार १५३ गणनापत्रांचे वितरण करण्यात आले असून, २ लाख २३ हजार ८०८ गणनापत्रे भरून प्राप्त झाली आहेत. त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे.
तर १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघात ४ लाख २२ हजार ३१७ मतदारांपैकी ४ लाख १० हजार ८६३ गणनापत्रांचे वितरण झाले असून, २ लाख १८ हजार २८ गणनापत्रे बीएलओंकडे जमा झाली आहेत. या अर्जांचे डिजिटलायझेशनही पूर्ण करण्यात आले आहे. गणनापत्र न भरल्यास नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाणार निवडणूक प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, १७ ऑगस्टपर्यंत गणनापत्र भरून बीएलओंकडे जमा न केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदारयादीतून वगळले जाऊ शकते.
सन २००२ च्या मतदारयादीत स्वतःचे किंवा पालकांचे नाव आढळले नाही, तरीही नागरिकांनी गणनापत्रातील कॉलम क्रमांक ३ मध्ये सध्याची माहिती भरून स्वाक्षरी करावी आणि निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र जोडून बीएलओंकडे अर्ज सादर करावा. अन्यथा मतदारयादीत नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-६ भरून संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल.
नागरिकांच्या सोयीसाठी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील संबंधित बीएलओंची माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी नागरिकांना अंतिम मुदतीची वाट न पाहता गणनापत्र तातडीने भरून बीएलओंकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *