
बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग
साउथ मुंबई मॅनियाक्सवर दोन गुणांनी मात
मुंबई, २७ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात, १३-वर्षांखालील मुलींच्या गटातील चुरशीच्या सामन्यात मुंबई स्नायपर्सने साउथ मुंबई मॅनियाक्सचा ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२) असा पराभव केला. या विजयात जेना सूर्याने मोलाची भूमिका बजावली.
गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत स्नायपर्सच्या आक्रमणाची धुरा सांभाळणाऱ्या जेनाने सर्वाधिक २४ गुण नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. साउथ मुंबईकडून इंचारा कडलीने १७ गुण मिळवले. तत्पूर्वी, रायगड क्रॉसर्सने ४५-१९ (मध्यंतर १८-१०) असा सहज विजय मिळवला. रायगड क्रॉसर्सकडून वाणी मेनन (११ गुण), टियाना सिक्वेरा (१० गुण) आणि बरजाताने (८ गुण) सर्वाधिक योगदान दिले.
मुलांच्या गटात चुरशीच्या सामन्यात, साउथ मुंबईने मुंबई स्निपर्सवर एका गुणाने विजय मिळवला. विजेत्या संघाकडे मध्यंतरापर्यंत २९-२८ अशी निसटती आघाडी होती. त्या आधी, एका एकतर्फी सामन्यात जेबी नवी मुंबईने पुणे ग्लोबल स्पोर्ट्सवर ७१-३५ (मध्यंतर ३६-२४) असा विजय मिळवला.
निकाल (मुली): रायगड क्रॉसर्स (वाणी मेनन ११, टियाना सिक्वेरा १०, बरजाता ८) विजयी विरुद्ध नवी मुंबई स्पोर्ट्स स्ट्रायडर्स (रिया जैन ६) – ४५-१९ (मध्यंतरापर्यंत १८-१०).
मुंबई स्नायपर्स (जेना सूर्या २४) विजयी विरुद्ध साउथ मुंबई मॅनियाक्स (इंचारा कडली १७) – ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२).
मुले: साउथ मुंबई मॅनियाक्स (मोईन के. २५, तनाय बदानी ९) विजयी. मुंबई स्निपर्स (जोहान जोशुआ ३०, झायाद एस. ११) – ६०-5९ (HT: २९-२८).
जेबी नवी मुंबई (अर्नेश गांगुली २5, अभिर शेट्टी १२, ज्ञान पारेख १०) पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (वेदांत कदम २०) – 7१-३5 (३६-२4) असा पराभव केला.

मुंबई, २७ ऑगस्ट: ५९ व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेसाठी ६९० इतक्या प्रवेशिका (एन्ट्रीज) आल्या आहेत. बॉम्बे जिमखाना येथील ग्लास-बॅक कोर्ट्सवर २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २३ प्रकारांमध्ये (इव्हेंट्स) आपला खेळ सादर करतील. त्यात ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले आणि मुली तसेच पुरुष आणि महिला गटाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मास्टर्स गटाचाही स्पर्धा प्रकारांमध्ये समावेश आहे. ही स्पर्धा एसएफआरआयच्या विद्यमाने आयोजित केली जाणार आहे.

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील अंदाड येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, सचिव मधुसूदन राऊत, कोषाध्यक्ष अॅड. अनिल मेश्राम, विश्वस्त विश्वनाथ जांभूळकर, प्रो. डायरेक्टर सुनित धाणके तसेच सामाजिक कार्यकर्ते धर्मा गायकवाड, बोधाचार्य मनोज गायकवाड, मुख्याध्यापक प्रवीण शिर्के आणि शिक्षिका संगीता कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सचिव मधुसूदन राऊत यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत शालेय साहित्य वाटप, वैद्यकीय शिबिरे तसेच महिलांसाठी रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम संस्थेतर्फे सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि आई-वडिलांचा आदर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मन लावून अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष बालकदास मेश्राम यांनी अंदाड येथील शाळेतील शैक्षणिक वातावरणाचे कौतुक केले. डिजिटल आणि विज्ञान विषयक साहित्याने शाळा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक प्रवीण शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. तसेच शालेय साहित्य वाटपाबद्दल पारमिता धर्मादाय न्यासाचे आभार मानले. यावेळी शिक्षक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००

रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप
मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारा श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणारा मराठी चित्रपट ‘समर्थ’ ला केवळ दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले. यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे साकडे घालण्यात आले आहे. ‘समर्थ’ चित्रपटाची कथा संकल्पना साकार करणारे निर्माते रवींद्र पाठक यांनी या संदर्भात आपली कैफियत मांडतांना सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी समर्थ हा समर्थ रामदास स्वामी यांनी केलेल्या समाजप्रबोधनाचे विचार समाजासमोर आणण्यासाठी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याचवेळी दोन मोठे बहुचर्चित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु समर्थ चित्रपट लोकप्रियता मिळवू लागला. सुमारे दहा हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहिला. विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या साठी आम्ही हा चित्रपट सवलतीच्या दरात दाखविले. आणखीही काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहण्यासाठी तयारी दाखविली. त्याचवेळी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि समर्थ या मराठी चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रयत्न करुनही चित्रपटगृह नाकारण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपट जी कमाई आम्हाला मिळवून देणार आहे ती कमाई आम्हाला समर्थ चित्रपट लावून मिळणार नाही, मग आमचे नुकसान कोण भरुन देणार? असे उर्मटपणे उत्तर ऐकायला मिळते. या चित्रपटाला सर्व चित्रपट समीक्षकांनी दर्जेदार म्हणून गौरविले आहे. अशा परिस्थितीत जर मराठी चित्रपटाला चित्रपटगृह नाकारण्यात येत असतील तर काय होणार? असा उद्विग्न सवालही समर्थ चे निर्माते रवींद्र पाठक यांनी केला आहे. शंकर महादेवन, पंडित संजीव अभ्यंकर, आर्या आंबेकर, जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, रोहित राऊत यांनी गीते गायली असून केदार पंडित आणि रोहित राऊत हे संगीत दिग्दर्शक तर आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत आणि दिग्दर्शक योगेश फुलफगर आहेत.

मुंबई लाइट फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीच्या इमर्सिव्ह प्रोजेक्शन मॅपिंगसह कुलाब्यातील मुंबईचे ऐतिहासिक अफगाण चर्च उजळले. (छाया: शत्रुघ्न सिंग)
महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन
मुंबई: यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच उत्सव कालावधीत केवळ अधिकृत वीज जोडणीच (वीज कनेक्शन) घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना वा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते तसेच गल्लीबोळांतील विजेच्या तारांची (वीजवाहिन्या) उंची लक्षात घेऊनच गणेशमूर्तीची उंची व रथाची रचना निश्चित करावी. त्याचप्रमाणे मंडप आणि रोषणाईसाठी वीज संचाची मांडणी करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जावे. अपघात टाळण्यासाठी केवळ प्रमाणित आणि कुशल विजेच्या ठेकेदारांकडूनच हे काम करून घ्यावे. गणेश मंडळांसाठी वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया महावितरणने अत्यंत सोपी केली आहे. मंडळांना महावितरणच्या अधिकृत मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करून त्वरित तात्पुरती वीज जोडणी मिळवता येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता कोणत्याही मंडळाने अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये, तसेच विजेच्या तारा किंवा खांबाजवळ मंडप उभारताना पुरेशी काळजी घ्यावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील आदिवासी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान, रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान, संकुलात वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यासंबंधी गंभीर समस्या उघडकीस आल्या. संकुलात सर्वत्र पसरलेली घाण आणि अव्यवस्था पाहून महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
महापौरांनी सांगितले की, रहिवाशांना केवळ आधारवाडीतच नव्हे, तर नगरपालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी संकुलातील सर्व प्रमुख समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या भेटीमुळे आदिवासी वस्तीला भेडसावणाऱ्या दीर्घकाळच्या मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

कल्याण : आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ, कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कोळी समाजबांधव सहभागी झाले होते.
पारंपरिक वेशभूषेतील महिला-पुरुष, ढोल-ताशांचा गजर, तिरंगा आणि उत्साही वातावरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. कोळी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाच्या पारंपरिक जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित मासेमारीसाठी साकडे घालण्याची परंपरा आहे. त्यानुसार मिरवणुकीनंतर दुर्गाडी गणेश घाट परिसरात समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, महापौर हर्षाली थविल, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक सुनील वायले, प्रभुनाथ भोईर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आगरी कोळी समाजाच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
०००००००
अनिल ठाणेकर
ठाणे : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य कोणतेही राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. रस्त्यावर येताना मराठी शिकलेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांची मोठी गर्दी पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
“मराठी भाषा तोडणारी नाही, तर जोडणारी आहे. रिक्षा-टॅक्सीमध्ये प्रवाशाला ‘कुठे जायचे?’ एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकाला ‘हळू उतरा’ असे प्रेमाने म्हणता आले पाहिजे. प्रवाशांनी चालकांशी मराठीत संवाद साधावा. त्यामुळे मराठीचा प्रचार-प्रसार वाढेल आणि चालकांचा व्यवसायही वाढेल,” असे शिंदे म्हणाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, प्राचार्य, शिक्षक आणि मराठीप्रेमींना सोबत घेऊन कठीण काम सोपे केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
आपणही सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली असल्याचा अभिमान व्यक्त करत शिंदे यांनी रिक्षा-टॅक्सी सेवा ही केवळ व्यवसाय नसून सेवाही असल्याचे सांगितले. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करण्याचे आवाहन करताना प्रवाशांचे पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर त्या पोलिसांकडे जमा करणाऱ्या प्रामाणिक चालकांचे त्यांनी कौतुक केले. अशा चालकांचा समाजात आदर्श म्हणून गौरव होतो, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईत राहणारा आणि मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक मुंबईकर हा आपला नातेवाईक, मित्र आणि आपला माणूस आहे, अशी भावना ठेवण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेसह मराठी शिकविणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आपण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा निर्णय झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास मान्यता दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचाही उल्लेख त्यांनी केला.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे एक लाख ६० हजार जणांनी मराठी भाषा शिकली असून, त्याचा अभिमान बाळगा. इतरांनीही मराठी शिकावी आणि तिचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. चांगल्या कामात विघ्न आणणाऱ्यांना बळी न पडता सर्वांना सोबत घेऊन मुंबईचा विकास करण्याचे आवाहन करताना, “मुंबई रोजीरोटी देणारी आहे; मुंबईवर आणि मराठीवर प्रेम करा,” असे शिंदे म्हणाले. गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरे करून संस्कृती व परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, आमदार प्रा. मनिषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने रिक्षा-टॅक्सीचालक उपस्थित होते.
