18 Sep Bitambatmi All pages

Open Book
Open Book
Open Book
Open Book
Open Book

ठाणे : शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री आनंद भारती समाजाच्या वतीने यंदाही संस्थेच्या सभागृहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सचिव संदिप कोळी यांनी दिली. संदीप कोळी म्हणाले संस्थेच्या गणेशोत्सवाचे यंदा ११६ वे वर्ष आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात ७५वा नाखवा पारितोषिक वितरण समारंभाचा समावेश आहे. या शैक्षणिक कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ॲड अभय श्रीनिवास ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर हे या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष असतील. याशिवाय प्रश्नमंजुषा, निबंध,चित्रकला, स्मरणशक्ती, वत्कृत्व, महिलांसाठी पाककला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होईल. संस्थेचे जेष्ठ रंगावलीकार सुभाष शाक्यवार  हे नशा – व्यसनमुक्तीवर आधारित सजावट साकारणार आहेत.
0000000
0000000

मुंबई – आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ.शिरोडकर हायस्कूल व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात परेल परिसरातील ६८ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी, डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा माने, क्रीडा शिक्षक सत्यविजय डामरे, राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांनी सर्व सहभागी शालेय खेळाडूंना कॅरमचा प्राथमिक सराव, बसण्याची पध्दत, स्ट्रायकर सोडण्या संदर्भात  बोटांच्या पकडी, ब्रेक करण्याची कला, कॅरमच्या पृष्ठभागावरील निशाणांचा होणारा उपयोग, एकाग्रता निर्माण करण्यासाठी उपयुक्त असलेले प्राणायाम, खेळण्यापूर्वी करावे लागणारे हातांचे वॉर्मअप, प्रमुख नियम आदीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक सराव देऊन त्यामधील निवडक उदयोन्मुख शालेय खेळाडूंना नियमित सरावाबाबत महत्वाचे कानमंत्र दिले.

 पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात दमदार कामगिरी
गोवा : गोव्यात झालेल्या तेराव्या पश्चिम विभागीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राची १५ वर्षीय नेमबाज स्वामीज्ञा विलास शेडगे हिने उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदक पटकावले. स्मॉल बोअर स्पोर्ट रायफल ५० मीटर प्रोन या प्रकारात वरिष्ठ, युवा आणि कनिष्ठ अशा तिन्ही गटांत स्वामीज्ञाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
स्वामीज्ञाच्या या यशात तिचे प्रशिक्षक निलेश अभंग यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. सातत्यपूर्ण सराव, अचूक नेमबाजी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर तिने पश्चिम विभागीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील पात्रता आणि सहभागासाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. पश्चिम विभागांतर्गत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेशातील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या स्पर्धेचे आयोजन गोव्यात करण्यात आले. स्वामीज्ञाच्या तिहेरी सुवर्णकामगिरीमुळे तिच्या पुढील राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीला मोठे बळ मिळाले असून, तिच्या या यशाचे नेमबाजी क्षेत्रातून कौतुक होत आहे.

नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महासभेत निर्णय
ठाणे : महापालिकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर, महापालिकेच्या सचिवपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी फिल्डींग लावलेल्या बड्या अधिकाऱ्याची `महापालिका वापसी’ लांबणीवर पडली आहे. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महापालिका सचिव पदावरील उमेदवाराची निवड ही महापौरांच्या दालनातील बैठकीनंतर केली जाईल. तोपर्यंत या पदावर कोणत्याही उमेदवाराची निवड करू नये, असा निर्णय आजच्या महासभेत घेण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या सचिव विभागाकडील काम कार्यक्षमतेने होण्यासाठी वर्ग १ मधून निवृत्त झालेल्या अनुभवी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी महापालिका सचिव (कराराधिष्ठित) पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी ४ सप्टेंबर रोजी `वॉक इन’ मुलाखती पार पडल्या होत्या. त्या एका विशिष्ट अधिकाऱ्याला डोळ्यासमोर होत्या, असा आरोप नारायण पवार यांनी केला. या जाहिरातीला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला. महापालिका अधिनियमानुसार, सचिव पदावरील अधिकाऱ्याची कराराने नियुक्ती करता येत नसल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी मांडला. त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिका सचिवपदाची करार पद्धतीने नियुक्ती करता येत नसल्याचे मान्य केले. मात्र, विवक्षित म्हणजे काही विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करता येत असल्याचे गोदेपुरे यांनी सांगितले. त्यावर महापालिका सचिव पदासाठी जाहिरात का काढली, असा सवाल नारायण पवार यांनी केला. त्यावर महापालिका प्रशासनाला ठोस उत्तर देता आले नाही. त्यानंतर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी तूर्त महापालिका सचिव पदावर नियुक्ती करू नये. या संदर्भात महापौरांच्या दालनात बैठक झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत दिरंगाई होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक अतिरिक्त आयुक्त हा शासन सेवेतील, तर दुसरा महापालिका सेवेतील अशी तरतूद आहे. मात्र, आता दोन्ही पदांवर शासन सेवेतील अधिकारी आहेत. सहायक आयुक्तांच्या १८ पदांपैकी निम्मी पदे पालिकेतील अधिकाऱ्यांना द्यायला हवीत. मात्र, काही वर्षांपासून पदोन्नती रखडविल्या गेल्या. वेळीच पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात नसल्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले.
महापालिकेकडून ९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तीन हात नाका ते माजिवडा नाक्यापर्यंतचा सेवा रस्ता कंत्राटदारांकडून खोदण्यात आला. तर अनेक भागात कंत्राटदारांनी रस्ते खोदल्यानंतर त्यांच्याकडून शुल्क घेतलेले नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या कंपन्यांना महापालिका प्रशासनाकडून अभय दिले जात आहे, असा आरोप नारायण पवार यांनी केला.
0000

विनोदाच्या रंगात रंगलेलं रहस्यमय नाटक!
‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’
मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या प्रवाहाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने समृद्ध करणारे दिग्दर्शक आणि कलाकार लाभले आहेत. त्यामुळे विनोदी नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक रंगमंदिरातून मनमुराद हसून, हलक्याफुलक्या मनाने बाहेर पडतो. विनोदी नाटकाचे दोन हुकमी एक्के—दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेते भाऊ कदम यांचं नवं कोरं नाटक ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ सध्या रंगभूमीवर दाखल झालं आहे.
नाटकाचं नाव ऐकल्यावर प्रेम, लग्न आणि विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणारी कथा असेल,असा अंदाज प्रेक्षक बांधू शकतो. मात्र, नाटकाचं शीर्षक ज्या दिशेने घेऊन जातं, त्यापेक्षा प्रत्यक्ष रंगमंचावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. विनोदाला रहस्याची जोड देत कथा पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.मोहन, त्याची पत्नी स्वाती आणि मुलगी आदिती असं हे कुटुंब. काळाच्या ओघात मोहनच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. मात्र, आपल्या मुलीला सांभाळत तो एकटाच आयुष्याचा प्रवास सुरू ठेवतो.
वडिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा,  यासाठी आदिती एक   निर्णय घेते. या निर्णया मुळे मोहनच्या आयुष्यातील भूतकाळाचा वर्तमानाशी काय संबंध आहे? आदितीचा निर्णय पुढे काय वळण घेतो?  आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र नाटक पाहतानाच मिळतात.विशेष म्हणजे कथेत जाणवणारी एक अदृश्य उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत राहते. तिचं गूढ उलगडणं ही नाटकाची महत्त्वाची रंगत आहे. त्यामुळे कथानकाचा पुढचा भाग सांगून नाटकाची मजा घालवण्यापेक्षा हा रहस्यमय विनोदी  नाट्यप्रवास रंगमंचावर अनुभवणंच अधिक योग्य!
संतोष पवार यांनी कौटुंबिक नात्यांमधील भावनिक पदर आणि विनोदाची लय यांचा सुरेख मेळ साधला आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवणं हे दिग्दर्शनाचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान पवार यांनी प्रभावीपणे पेललं आहे.प्रत्येक कलाकारानं कडून उत्तम अभिनय करून घेतला आहे
भाऊ कदम म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर विनोदाची एक वेगळीच शैली उभी राहते. ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ या नाटकातही त्यांच्या अभिनयाची हीच सहजता प्रकर्षाने जाणवते. मोहन ही व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी केवळ विनोदावर भर न देता त्याच्या मनातील भावनिक कोंडी, एकटेपणा आणि नात्यांमधील गुंतागुंतही प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांची संवादफेक, प्रसंगानुरूप देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव यामुळे विनोदी प्रसंग अधिक खुलतात. भाऊ कदम यांच्या अभिनयातील सहजपणा ही या प्रयोगाची मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या रंगमंचावरील उपस्थितीने प्रसंगाला वेगळीच रंगत येते आणि प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद निर्माण होतो.मैथिली वारंग, सुजाता किरण, पूनम सरोदे परब आणि साकार देसाई यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत नाटकाच्या एकूण सादरीकरणाला पूरक साथ दिली आहे.
लेखक स्वप्नील बारसकर यांनी विषयाची मांडणी हलक्याफुलक्या शैलीत केली आहे. संवादांमधून विनोद निर्माण करतानाच नात्यांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न दिसून येतो. विशेष म्हणजे विनोद आणि रहस्य यांचा समतोल राखत कथा पुढे नेण्यात लेखनाची भूमिका महत्त्वाची ठरते. नाटकाची तांत्रिक बाजूही कथेला पूरक ठरते. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा योग्य वापर करण्यात आला आहे. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती होत असल्याने नाटकाच्या सादरीकरणाला उठाव मिळतो.
पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ हे नावापेक्षा वेगळा अनुभव देणारं, हलक्याफुलक्या विनोदातून प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहणारं मनोरंजनप्रधान रहस्यमय नाटक आहे. गंभीर विषयाचा बोजडपणा न आणता विनोद आणि रहस्य यांची सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न या प्रयोगातून केला आहे.
संपदा सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *