ज्येष्ठ नागरिकांनी लुटला पावसाळी सहलीचा आनंद
गाणी, नृत्य खवय्यांची धूम धमाल
मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांची पावसाळी सहल कर्जत येथील एंजल रिसॉर्ट येथे गेली होती. या सहलीसाठी गेलेल्या दोन बसमध्ये ५५ महिला व ४५ पुरुष सभासद असे एकूण १०० सभासद सहभागी झाले होते. सानपाडा येथील विरंगुळा केंद्राच्या कार्यालयाजवळून बस सुटण्यापूर्वी सहलीत सहभागी झालेल्या सर्वांना गुळाचा चहा देण्यात आला. बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाला पाण्याची बाटली व थोडासा नाष्ता म्हणून सुकामेवा देण्यात आला. महिलांचा सहभाग असल्यामुळे बसमध्ये अगदी आनंदाने गाणी म्हणत अडीच तासात कर्जत येथे रिसॉर्टवर बस पोहोचल्या. रिसॉर्टवर आगमन झाल्यानंतर सर्वांनी नाष्ता घेतला. त्यानंतर तेथील सदनिकांमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर तरणतलावात बहुतेक सभासदांनी पोहण्याचा आनंद घेतला. काहींनी चांगले नृत्य केले. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमांमध्ये महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला. मुंबईला परत निघण्यापूर्वी रिसॉर्ट मालकांनी सर्वांना गरम भजी आणि चहा दिला. सर्व ज्येष्ठ नागरिक पावसाळी सहलीचा आनंद लुटत प्रवास करत नवी मुंबईला सुखरूपपणे पोहोचले. ज्येष्ठ नागरिकांच्या या एकदिवशीय सहलीमध्ये संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, नाट्यकलाकार, अभिनेते व संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर, संघाचे सचिव जगदीश एकावडे खजिनदार महादेव पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे सीमा बोराडे सहसचिव राजेंद्र कदम राजाराम घोलप, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ. विजया गोसावी, माजी सचिव चंद्रकांत पारपिल्लेवार, माजी खजिनदार विष्णूदास मुखेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.
मराठीची नवी ओरिजिनल सीरिज २४ जुलैपासून
संपदा सावंत
Zee5 मराठीने आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज **‘अगं आई अहो आई’**चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून, ही सीरिज २४ जुलै २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये मुलगी, तिची आई आणि सासू यांच्यातील हळुवार, जिव्हाळ्याच्या नात्याचा वेगळा पैलू उलगडण्यात आला आहे.
वरुण नार्वेकर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन, तर कल्याणी पंडित यांनी लेखन केले आहे. जिओ स्टुडिओज, बहावा एंटरटेन्मेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. प्रेम, स्वीकार आणि आपुलकीमुळे कुटुंब अधिक घट्ट जोडले जाते, हा या सीरिजचा मुख्य संदेश आहे.
पुणे आणि कोल्हापूर या दोन वेगळ्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत लग्नानंतर एका तरुणीचा नव्या कुटुंबात स्वतःचे स्थान शोधण्याचा भावनिक प्रवास दाखवण्यात आला आहे. जन्मदात्या आईचे नाते जपत नव्या आईचा स्वीकार करताना तिच्या आयुष्यात घडणारे बदल, नव्या नात्यांमधील विश्वास आणि समजूतदारपणा यांचे प्रभावी चित्रण या सीरिजमध्ये करण्यात आले आहे. सासू-सुनेच्या नात्याकडे संघर्षाऐवजी मैत्री, प्रेम आणि परस्पर आदराच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या कथेत करण्यात आला आहे.
झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर आणि Zee5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांनी बदलत्या काळातील वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा Zee5 मराठीचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी अनेक वर्षांपासून सासू-सुनेचे नाते संघर्षाच्या चौकटीत दाखवले गेले असले, तरी या सीरिजमध्ये त्याची सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.
अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या, प्रत्येक आईला आपल्या मुलीला नव्या घरात प्रेम, आधार आणि समजून घेणारी माणसे मिळावीत, अशी अपेक्षा असते. ही भावना ‘अगं आई अहो आई’मध्ये अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आली आहे. निर्मिती सावंत यांनीही सासू-सुनेच्या नात्याविषयीच्या पारंपरिक समजुती मोडणारी ही कथा असल्याचे सांगितले. तर हृता दुर्गुळेने लग्नानंतर नव्या आयुष्याला सामोरे जाणाऱ्या अनेक तरुणींच्या भावना आणि त्यांचा स्वीकाराचा प्रवास या भूमिकेतून साकारताना वेगळा अनुभव मिळाल्याचे सांगितले.
आपुलकी, विनोद, भावनिक प्रसंग आणि प्रत्येक घरात घडणाऱ्या सहज घटनांमधून कुटुंब, स्वीकार आणि नात्यांचा सुंदर उत्सव साजरा करणारी ‘अगं आई अहो आई’ ही ओरिजिनल सीरिज २४ जुलै २०२६ पासून केवळ Zee5 मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
0000000
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे वक्तव्य
३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ
सिंधुदुर्ग | राजन चव्हाण
पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२५-२६ च्या आंबा व काजू फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी रुपयांची विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळणारी विमा भरपाई यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून, हे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नियोजनाचे फलित असल्याचे सावंत यांनी नमूद केले. मे महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली, असे त्यांनी सांगितले.
यंदा अनेक मंडळांमध्ये पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ ते ९५ हजार रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळत असून, आंबा-काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. काही मंडळांतील काजू उत्पादक शेतकरी अद्याप विम्यापासून वंचित असून, त्याबाबतही पालकमंत्री राणे यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी ३१ जुलैपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. ई-पीक पाहणी केल्यास पीक विम्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या पुढाकाराने नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या ७,३१० शेतकऱ्यांच्या खात्यात २ टक्के व्याज रिबेटपोटी एकूण १ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६–२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.
या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर
या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार
मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ‘पैलवान दत्तक योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.”
गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत
युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ
देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले, पैलवान दत्तक योजना’ ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल.
शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम
युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.
दिग्गज मल्लांची उपस्थिती
या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने युवा मल्लांचा उत्साह आणखी उंचावला.
निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका
या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
महाराष्ट्राच्या आखाड्यांना नवी ऊर्जा
कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
0000

रमेश औताडे
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आरोग्य शिबीर वह्या वाटप, गुणवंताचा सत्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टाव्हरे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंचरे, वाफगाव प्राथमिक केंद्र वाफगावच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.मेघना जाधव,खेड ता.भाजपचे उपाध्यक्ष दिलीप माशेरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे, खेड.ता.ख.वि.संघाचे संचालक संतोष गोरडे, ॲड.सुहास दौंडकर, प्रा.बाळासाहेब माशेरे, उद्योजक उमेश दौंडकर. भाऊसाहेब फुके, ॲड समीर गोडसे, नीलेश घोडके, समाजसेवक बाबा हजारे, पवना हाॅस्पीटलचे व्यवस्थापक भारत, दांगट आदी मान्यवर कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधायक उपक्रम राबवित असताना पवना हाॅस्पीटल, प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व स्टाफ यांचे आभार मानले.तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा वर्ल्ड कप-२०२६च्या अंतिम सामन्याचे साक्षीदार ठरलेले महेंद्रशेठ घरत. न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर पत्नी शुभांगीताई आणि पुत्र कुणाल यांच्यासह त्यांनी अर्जेंटिना–स्पेन लढतीचा अविस्मरणीय अनुभव घेतला.
आदिवासींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम.. दखल घेण्याची काळाची गरज…
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील नऊआरोग्य केंद्रा पैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवाची पायपीट होऊ नये यासाठी शासनाने सन २०२२ मध्ये पाटगाव परिसरातील चाफेवाडी,गेटाची वाडी,बाटलीची वाडी.वाघाची वाडी अशा सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून बांधलेले आरोग्य केंद्र ,गेल्या तीन वर्षांपासून धुळखात पडले असल्याने हजारो आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने आरोग्य विभागाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात सुमारे सत्तर हजार लोकसंख्या असल्याने त्यांना छोट्या मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी म्हसा आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते.त्यामुळे छोटे मोठे अपघात, सर्पदंश तसेच गर्भवती महिलांना तातडीचे उपचार वेळीच मिळत नसल्याने काहीना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे.यावर पर्याय म्हणुन शासनाने पाटगाव परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना तात्काळ उपचाराची सुविधा मिळण्यासाठी तेथे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून प्रशस्त असे आरोग्य केंद्राची उभारणी केली.त्या ठिकाणी लाईट , पिण्याचे पाणी.तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांचे निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच त्या आरोग्य केंद्रात लागणाऱ्या मशिनरी पुरविल्या परंतु आरोग्य विभाग हे केंद्र सुरू करण्यात उदासीनता दाखवत असल्याने.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मलेरिया टायफॉइड तसेच इतर आजारांनी डोके वर काढल्याने अनेक नागरिकांना त्याची बाधा झाली असुन ते आपल्या शेजारी मोफत उपचार मिळण्यासाठी बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र धुळखात पडले असल्याने सुमारे पाच ते सात किलोमीटर ची पायपीट करून म्हसा येथे मोफत उपचारासाठी येतात,परंतु तेथे ही डॉक्टर नसल्याने खाजगी उपचार घेण्यासाठी भटकंती करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या बाबतीत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे..
कोट
पाटगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन ते तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य दोनअधिकारी यांनी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी.प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसा यांना दिलेले आहेत. त्यांनी अजुन ते सुरू का केले नाही,याचा लेखी खुलासा मागविण्यात येत आहे. —-डॉ.श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.पं. समिती मुरबाड.
००००००००००
कोंडी व अपघातांवर उपाययोजना
नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आरती परब
दिवा: शिळफाटा-कल्याणफाटा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर या दोन्ही महत्त्वाच्या चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिळफाटा- कल्याण फाटा चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असून, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत होती. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि वाहनचालकांकडून सातत्याने सिग्नल बसविण्याची मागणी केली जात होती.
प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या प्रश्नाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, ठाणे महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि एमएसआरडीसीकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच नगरसेविका अर्चना पाटील व नगरसेविका वेदिका पाटील यांनीही या मागणीसाठी प्रयत्न केले.
जून महिन्यात झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्यासोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या, तर आमदार राजेश मोरे यांनीही संबंधित विभागांशी समन्वय साधून या कामाला गती दिली.
महापालिकेच्या वतीने आता सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक केबल टाकणे, खांब उभारणे आणि तांत्रिक कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
००००००००
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली मागणी
कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जवाबदार असून त्यांनी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत आपली मागणी लावून धरली.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्यासह जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रुपेश थळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, नरेश वायले, अनिल सावंत, निखिल कदम, वैभव माळी, संगीता मोरे, शिल्पा कांबळे, प्रेरणा तांबे, भानुदास घुगे, स्वप्निल शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आलेले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे. भरती प्रक्रियेतील कठीण गैरव्यवहार ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पोलीस भरतीतील कथित अन्याय तसेच विद्यार्थी युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील 20 हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु असंवेदनशील सरकारने अद्याप पर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी व युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक व अन्यायकारक असल्याची भावना समाजात वाढत आहे. या सर्व जनविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या विरोधी धोरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करत असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी सांगितले.
यावेळी दिलेल्या निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या कंपनीने ब्लॅक लिस्टेड आहेत त्या व अशा कंपन्यांमधील संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येऊ नये. एनटीए संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी. ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमधील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासार्य प्रणाली लागू करावी. पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय जाहीर करावे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, ऑनलाईन घेण्यात येऊ नयेत व त्यासाठी कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
