Category: ठाणे

Thane news

न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पूल प्रकल्पातील बाधित नागरिकांना मिळाला दिलासा

ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या…

ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जोरदार आंदोलन

ठाणे : प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले. प्रांताध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, शिक्षक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली…

 होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ, स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती संघांची आगेकुच

 श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा ठाणे :- होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुषांत, तर स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिलात श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत”…

काळू व शाई धरणासाठी मंत्रालयात संयुक्त बैठक होणार

 वन मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर  काळू व शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे वन मंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी आज येथे दिले. गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू व शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच त्यांचे ठाणे शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावे, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या बैठकीला स्थानिक आमदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे २००२ पासून सुरू आहे. मात्र, काळू व शाई ही दोन्ही विविध मुद्द्यांवरून रखडली. दोन्ही धरणांचे भूसंपादन पूर्ण झाले नसून, ग्रामस्थांकडून विरोधही केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रश्नावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका व तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असे पॅकेज देण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू व शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात ४०० ते ५०० चौरस फूटांची सदनिका किंवा एकरकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 000000

अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवणारे विधान करणारे संजय शिरसाट यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध !

अनिल ठाणेकर ठाणे : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. आम्ही आवाहन करीत आहोत की महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित  सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून  दाखवू.छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे. मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि अफवांच्या प्रभावाखाली अनेक गोष्टींची कल्पना करतो. अंधार, एकटेपणा, मानसिक ताण किंवा पूर्वग्रह यांच्या परिणामामुळे लोकांना “काहीतरी आहे” असे वाटू शकते. पण त्या अनुभवांचा अर्थ अलौकिक शक्ती असा होत नाही.महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की—कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे,भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तव नाहीत,समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने २०१३ ला मंजूर झाला असून त्या कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा ,मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.त्याचा मंत्रालयाचा मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात,याचा आम्ही निषेध करतो,मंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा.अशा अवैज्ञानिक,अतार्किक विधाने करणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्र मागे खेचत आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा भीती पसरवणाऱ्या कल्पनांपासून दूर राहूया, आणि विवेक, विज्ञान व सत्याच्या बाजूने ठाम उभे राहूया.विवेकी समाज बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी विधाने समाजाला घातक ठरतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे :  ठाणे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग ४ परिसरात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत  आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वसंत विहार सर्कल, नळपाडा, खेवरा सर्कल, हॅपी व्हॅली…

कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन

अनिल ठाणेकर   ठाणे : महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधकी वारसा माणूसपण राखणारा, चिकित्सा करणारा आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पर्यायी समाज व्यवस्था फुले यांनी उभी केली. अंधश्रद्धा, बुवाबाजीमुक्त समाज करण्याचे काम अंनिस करीत आहे. अंनिसने दोन हजार हून अधिक सत्यशोधक विवाह लावले आहेत जात,धर्म,लिंग भेदाला विरोध करण्याचा विचार जोतीराव यांनी दिला.सत्यशोधक परिषदेचा उद्देश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले वैचारिक मूल्यांचा वारसा पुढे शाहू महाराजांनी तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर हल्लीच्या काळात दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे नेला त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की तो वैचारिक वारसा पुढे न्यायचा. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊन ते कार्य पुढे न्यावे. असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले. महात्मा जोतिबा फुले जन्मद्विशताब्दी वर्षाचा आरंभ,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाचे शंभरावे वर्ष आणि लोकनेते दि बा पाटील यांची जन्मशताब्दीचे वर्ष या प्रसंगांचे औचित्य साधून  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय सत्याशोधक परिषदेचे आयोजन १२ एप्रिल रोजी के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लौकीकाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तुकाराम महाराज यांच्या गाथेच्या आणि  महात्मा जोतिबा फुले  यांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती एकेका प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एकावर एक रचून आणि त्यावर हाताचे मॉडेल आणि त्यावर सत्यशोधन करणाऱ्या मेंदूची प्रतिकृती असा तुकारामांच्या गाथेवर उभारलेला एक छोटासा अर्थपूर्ण मनोरा तयार करण्यात आला. मुंबई नवी मुंबई ठाणे व रत्नागिरी सह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास २५० कार्यकर्त्यांनी आणि विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या उद्घाटनाचे कौतुक केले. याप्रसंगी उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार  सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे उपस्थित होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी याही आवर्जून उपस्थित होत्या. या सत्राचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड हे होते. खासदार सुरेश म्हात्रे  यांनी या उपक्रमाचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे कौतुक केले. श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषण अजिबात असू नये असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीमागे आपण उभे असून समितीच्या कार्यासाठी  सर्व प्रकारे मदत करण्याचे तसेच गरज असेल तेव्हा संसदेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतले. सुरेखा दळवी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील यांच्या कार्याविषयी विवेचन केले. सध्याच्या परिस्थितीत समाज कुंठित अवस्थेत गेलेला असून आता काय करावे असा प्रश्न पडला आहे अशी  चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच हल्ली समाजाला प्रतिकांमध्ये अडकवून सांस्कृतिक विषमता आणण्याचे काम सुरू आहे असा इशारा त्यांनी दिला. सगळीकडे अंधार दाटलेला असल्यामुळे, पणती जपून ठेवा अंधार फार झाला… ही कवितेची ओळ लक्षात ठेवून अंधार वाढू देऊ नका असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. “सत्यशोधक विचार व अंनिस” या चर्चासत्रात सुशीला मुंडे यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या अखंडांचा दाखला देऊन फुले यांचे विचार संविधानात आल्याचे आणि अंनिस त्यानुसारच कसे कार्य करते याचे तपशीलवार विवेचन केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम जोगदंड यांनी महात्मा फुले यांचे हे वेगवेगळे अखंड उद्धृत करून महात्मा फुले यांनी त्यांच्या काळातील अफवांचे आणि त्यातून होणार्‍या अन्याय अत्याचारांचे  फॅक्ट चेक करून या व्यवस्थेचा  भांडाफोड केल्याचे सांगितले. तसेच महात्मा फुले यांनी  त्याची संपूर्ण कारण मिमांसा करून दलितांना आणि बहुजनांना शिक्षणाचा मार्ग कसा दाखवला याबाबत विवेचन केले. तसेच त्यांनी  सुरेखा दळवी यांच्या भाषणाचा आढावा घेतला. “जोतिबा ते दि बा-  वारसा सत्यशोधनाचा” हा दुसऱ्या सत्राचा विषय होता. प्रमुख वक्त्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर तसेच शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड रोशन पाटील. या सत्राचे अध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे.  या परिसंवादात ॲड. रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान, यांनी शिवरायांची उपेक्षित ठेवली गेलेली समाधी महात्मा फुले यांनी  शोधून काढली असल्याचे सांगून त्यांनी शिवराय हे रयतेचे राजे कसे होते, त्यांचा वैचारिक वारसा महात्मा फुले यांनी आणि नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे कसा चालवला, त्यांना या त्यांच्या कार्यात कसे अडथळे आणले गेले याची माहिती दिली.  रेखा ठाकूर यांनी महात्मा फुले यांच्या अखंडांचा उल्लेख करून त्याचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना शिक्षणावर भर देणे किती गरजेचे आहे या बाबत आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे यांनी परिसंवादात ज्यांनी विचार व्यक्त केले त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वर्तमान परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करणे किती आवश्यक आहे यावर विवेचन केले. 0000

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कल्याण: कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर संचलित मॉडेल इंग्लिश हायस्कूल आणि मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने संपूर्ण परिसर भीममय झाला होता. जयंती उत्सवाची सुरुवात माता रमाबाई चौक, सिद्धार्थ नगर ते कोळसेवाडी येथील मॉडेल शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मुख्य आकर्षण शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह हे होते. रॅली शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. मंचावरील मान्यवर आणि शिक्षकांनी आपल्या भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली आणि उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवत विविध भीमगीते सादर केली. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः भीमगीतांवर आधारित नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली, ज्याला पालकांनी भरभरून दाद दिली. शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, केवळ शालेय शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ महोत्सव, विज्ञान प्रदर्शने, विविध सण उत्सवासह सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. यात पालक आणि शिक्षकही तितक्याच आनंदाने सहभागी होतात. पुढील वर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव असल्याने आणखीन जोरदार कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही तांबोळी म्हणाले. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी भगवान भोईर, बी.जी. उन्नीथन, के.व्ही. सुर्वे, नरेंद्र सूर्यवंशी, आनंद नायर, दत्ता गायकवाड तसेच मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, शिरीन गोंसालवेझ, ममता भट्टाचार्य, कल्याणी अधारी, संगीता तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर ठाणे : आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिप्रादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांनी केले. क्राऊड बुद्धिस्ट कम्युनिटी, लोढा माजिवडा,ठाणे यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड, उपाध्यक्ष प्रतीक पवार, सुभाष आचालखांब, सचिव निलेश गरुड, सहसचिव प्रवीण धुतराज, खजिनदार दीपक जाधव, सहखजिनदार निलेश निरभवणे, सल्लागार रवींद्र जाधव, महेंद्र नाकते, सदस्य सुनील माने, भत्ते लघु पवार सोसायटी नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे संदीप गोवळकर म्‍हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची जबाबदारी देते. पण प्रत्यक्षात समाजात याच्या अगदी उलट चित्र दिसते. अंधश्रद्धा, चमत्कारांचे दावे आणि अवैज्ञानिक समजुती आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही घटनेमागील कारण शोधण्याची वृत्ती. जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास  ही त्याची भूमिका. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनीच सत्य समजून घेता येते. कोणी मोठी व्यक्ती सांगते म्हणून ते सत्य मानणे, किंवा एखाद्या ग्रंथात लिहिले आहे म्हणून त्याची चिकित्सा न करणे ही गुलाम मानसिकता आहे.चमत्कार हे वास्तव नसतात; ते हातचलाखी किंवा अज्ञानाचा फायदा घेणारी फसवणूक असते. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ‘चमत्कार’ हा शब्दच माणसाला विचार करणे थांबवायला भाग पाडतो. मानवाची आजवरची सर्व प्रगती ही विज्ञानामुळेच झाली आहे. विज्ञान नम्र आहे, बदल स्वीकारते आणि स्वतःची चूकही मान्य करते. पण धर्म अंतिम सत्याचा दावा करतो  हीच मोठी समस्या आहे.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी बालपणापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवले. जातीय भेदभाव, सामाजिक अन्याय आणि उपेक्षा यांना न जुमानता त्यांनी ज्ञान, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर इतिहास घडवला.बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी होता. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या संघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रतीक पवार यांनी केले.

ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत

ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत अनिल ठाणेकर ठाणे,शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.  ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत ठाणे  जिल्ह्यातील २५१४ रुग्णांना सुमारे २१  कोटी ७४ लाख ५० हजार  रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.