कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात
कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात इकोची सिमेंट मिक्सरला धडक, भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू कल्याण : कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली. प्रवाशांनी भरलेली इको कार मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 1२ प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. या मृतांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने, वय २1 वर्ष, देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे, वय ४९ वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी, वय ५० वर्ष, टेंभरे मुरबाड, अनंता पवार, साखरे मुरबाड, दीपक गवळी, राहणार कल्याण, गणपत जैनू मधे, वय ३२ वर्ष, देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे, वय अंदाजे २२ वर्ष, मानसी मोहपे, वय अंदाजे २० वर्ष, प्रथमेश मोहपे, वय अंदाजे 1७ वर्ष हे तिघेही एकाच कुटुंबातील नारायणगाव मुरबाड येथील आहेत. तर अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर सकाळी रायते परिसरात झालेल्या अपघतात प्राथमिक माहिती नुसार नऊ प्रवासी मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातातील इको संर्वगातील वाहनाची सर्व कागदपत्रे वैध्य आहेत, आरटीओ इनस्पेक्टर यांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेऊन याबाबत सविस्तर अवहाल तयार करणार आहोत. अनधिकृत प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ बाबत आरोप असल्याच्या बाबत अवैध वाहतूक संदर्भात आरटीओकडून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया कल्याण उप प्रादेशिक अधिकारी अशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तर रायते येथील महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता संदर्भात, रायते येथील ग्रामस्थ संतोष सुरोशी यांनी प्रतिक्रिया दिली की, रायते, पिंपळोली ग्रामस्थांनी रस्त्या संदर्भात निवेदन देखील दिले होते. रस्त्याचे काम अर्धवट असून, दिशा दर्शक फलक लावले नाहीत, वाहतूक सुरु करू नका असे असून देखील मिक्सर अवजड वाहनांची होणारी वाहतूक पाहता आरटीओचे नियंत्रण नाही यामुळेच आजच्या या भीषण अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले असल्याचा आरोप करत शासनाचा धिक्कार करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष सुरोशी यांनी दिली. तर एनएच ६१ महामार्गावर रायते येथे इको आणि मिक्सर या वाहनांच्या अपघाततील इको मधील प्रवाशांचे मृतदेह गोवेली शासकीय रूग्णालयात आणले असून ११ मृतदेह असल्याची प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली.
