रवी कटकधोंड, राजकीय पक्षांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील कापडणीस, सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी कटकधोंड म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. तसेच प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलिसांचीही परवानगी घ्यावी. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक असून निवडणूक अर्ज भरण्याअगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार असल्याचे कटकधोंड यांनी या वेळी सांगितले.

अधिसूचना शुक्रवारी निघणार

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण १५ लाख २४ हजार ९३९ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख २७ हजार १७८, महिला मतदार ६ लाख ९७ हजार ७१८ आणि इतर ४३ मतदार आहेत; तर मतदान केंद्र १,५२७ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *