Month: April 2024

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी-कोलशेत-ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

ठाणे : वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले आहेत. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर बदल केले. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्गही वाहतूक विभाग आणि ठाणे मनपा प्रशासनाने बंद केला होता. हा मार्ग बंद झाल्याने कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर, ब्रह्मांड, लोढा अमारा येथील सुमारे पावणे दोन लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती. हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकूम येथील राम मारुती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता. परिणामी या रस्त्यांवर देखिल प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा हा मार्ग जरी बंद केला असला तरी कापूरबावडीच्या विरुध्द दिशेने या मार्गावर अनेक जण वाहतूक प्रवास करत असल्याने कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती. तसेच वयोवृध्द नागरिक, महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच अपघाताचीही भिती होती. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते देवाराम भोईर, मा. नगरसेविका उषा संजय भोईर, मा. नगरसेवक भुषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हायलंड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तेव्हाही संजय भोईर यांनी या रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला.

बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान 

प्रत्येक महिन्याला ‘बुक कल्चर’मार्फत बालवाचक कट्टा आयोजित करण्यात येईल – संदीप माळवी ठाणे : लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरु केली आहे. सविता राणे यांच्या बुक कल्चर मधील एक लहान मूल वर्षाला १०० पुस्तके वाचत आहे. ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतांनाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही कौतुक करायला हवे. प्रत्येक महिन्याला बुक कल्चर मार्फत बाल वाचक कट्टा आयोजित करण्यात येईल, असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी जाहीर केले. ठाणे, आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे सुरु केलेल्या बुक कल्चर चळवळीचे त्यांनी कौतुक केले. बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये दोन हजाराहून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचेही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी करत भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंकाच नाही असे मत शेवटी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी संपन्न झाले.

अथर्व, अर्जुन, आर्यन चमकले

ठाणे : अथर्व अधिकारी, अर्जुन बागायतकरची दमदार शतके आणि आर्यन दलालच्या पाच विकेट्सच्या जोरावर यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने मांडवी मुस्लिम संघाचा १८९ धावांनी धुव्वा उडवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती समरलीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अथर्वच्या नाबाद १०३ आणि अर्जुनच्या १०४ धावांच्या जोरावर २० षटकात २ बाद २४८ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आर्यन दलालने आपल्या भेदक गोलंदाजीने मांडवी मुस्लिम संघाला अवघ्या ५९ धावांवर गुंडाळत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करताना अथर्व आणि अर्जुनने मोठ्या खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची शतकी भागीदारी केली. अथर्वने आक्रमक खेळी करताना ५७ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद शतक झळकवले. तर अर्जुनने ३० चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. या डावात प्रशांत मोरे आणि प्रशांत ठोंबरे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नांत आर्यनच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीसमोर मांडवी मुस्लिमच्या फलंदाजानी अक्षरशः शरणगती पत्करली .आर्यनने  ४ षटकात २ निर्धाव षटकांसह अवघ्या ७ धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ गारद केला. निरेक गावंड आणि  यश जठारने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : २० षटकात २ बाद २४८ (अथर्व अधिकारी नाबाद १०३, अर्जुन बागायतकर १०४, प्रशांत मोरे ४-३५-१, प्रशांत ठोंबरे ३-२९-१) विजयी विरुद्ध मांडवी मुस्लिम क्लब : १३.१ षटकात सर्वबाद ५९ (आर्यन दलाल ४-२-७-५,निरेक गावंड २.१-१-१३-२, यश जठार ३-१४-२).

‘मतदान जनजागृती सेल्फी स्टॅण्ड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणे : ‘उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा’, ‘मतदान राजा ठेव कर्तव्याचे भान’, ‘सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान’ असे आवाहन सेल्फी स्टॅण्डच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी हातभार तक्रारीचा, बोटभर उपाय असा जनजागृती करणारा सेल्फी स्टॅण्ड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून कार्यालयात येणारे नागरिक या ठिकाणी सेल्फी घेत आहेत. देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घेवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृतीवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेला सेल्फी स्टॅण्ड या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘तुमचे मत तुमचा अधिकार’, ‘वृद्ध असो किंवा जवान’, ‘सर्वजण करा मतदान, तुमचे मत खरा आधार लोकशाहीचा’ आदी घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हानिवडणूक कार्यालयाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.‍ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेला हा सेल्फी स्टॅण्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून याठिकाणी नागरिक सेल्फी देखील काढत आहे. सेल्फी स्टॅण्डवर मतदारांना ऑफलाईन माहितीसाठी मतदार मदत क्रमांक देण्यात आला आहे. नागरिकांनी या सेल्फी स्टॅण्डचा लाभ घेवून मतदान प्रक्रियेत स्वत: सहभागी व्हावे व आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष-अजित नैराळे

कर्जत : आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यांत आली आहे. ३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी, १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दुरध्वनी क्रमांक ०२१४८ – २२२०३७, ९३७३९२२९०९ आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

अशोक गायकवाड रायगड : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने संजीवकुमार झा यांची नियुक्त्ती केली असून त्यांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. निवडणूक निरीक्षक झा यांनी महाड विधानसभा मतदार संघास भेट देऊन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार खोपकर उपस्थित होते. यावेळी झा यांनी महाड मतदार संघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी केली. तसेच मतदान यंत्र वितरण आणि संकलन केंद्राची पाहणी केली. मतदान यंत्र तयार करणे बाबत आवश्यक ती सर्व नियमानुसार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

२५६ आरोपी गजाआड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १६ मार्च ते २२ एप्रिलपर्यत राज्य…

‘संवेदना’ उद्यानाबाबत महापालिका ‘असंवेदनशील’

नवी मुंबई : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या सानपाडा सेक्टर १० येथील ‘संवेदना’ उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे दिव्यांगांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदन दिले. उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सानपाडा सेक्टर १० येथे ‘संवेदना’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. उद्यानांमध्ये दिव्यांग मुलांसाठी खेळणी, व्हीलचेअरचा झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळ चौकटी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक इत्यादी सुविधांचा समावेश असून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. सौंदर्याला बाधा उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी उद्यानात पडलेली दिसत आहेत. तसेच कारंजे बंद पडले असून पाण्याचे हौद पाण्याअभावी ओस पडले असून झाडेही सुकून गेली आहेत. विद्युत दिवेसुद्धा तुटले असून त्यांचा खच एका कोपऱ्यात पडलेला आहे. स्वच्छतागृहातील नळ खराब झाले असून शौचास बसण्यासाठी असलेले भांडेसुद्धा तुटून पडले आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे उद्यानाचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उद्यानात सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोट सानपाडा येथील संवेदना उद्यानातील दुरुस्ती करण्याबाबत शहर अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जी काही कामे आहेत ती अभियांत्रिकी विभागाकडून केली जातील. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग

अंबरनाथमध्ये ९०० नव्या पुस्तकांचे प्रदर्शन

‘ग्रंथाभिसरण’ वाचनालयाची वाचकांसाठी साहित्‍यिक मेजवानी अंबरनाथ-  वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील ग्रंथाभिसरण वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त तब्बल ९०० नव्या कोऱ्या पुस्तकांच्या संचांचे प्रदर्शन आयोजित करून साहित्यिक मेजवानी दिली आहे. पुस्‍तक प्रदर्शनाला वाचकांनी…

पालिकेने हटविली निविदेतील ‘ती’ अट!

अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात ठाणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महापालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथील केल्या. अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरात ३४, उथळसमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजीवाडा- मानपाडा ४४, मुंब्रयात ८० नाले असल्याची नोंद आहे. यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यामुळे पालिकेने मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या होत्या. महापालिकेने टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. तसेच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली होती. त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजविली होती. त्यामुळे पालिकेने वारंवार निविदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर याठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत २२ एप्रिल पर्यंत वाढविली होती. ही मुदतवाढ देत असतांना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथील करण्यात आली. ही अट शिथिल करण्यात आल्याने अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळाले आहेत. त्यानुसार आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.