Month: April 2024

मतदान जनजागृतीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेचा

पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम स्लग- मतदान ओळखपत्र असणाऱ्यांना पुस्तकांवर २० टक्के सवलत उल्हासनगर : यंदाचा १ मे हा महाराष्ट्र दिन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या १ मेला उल्हासनगर येथील ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ या संकल्पनेवर आधारीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपायुक्त किशोर गवस आणि सुभाष जाधव तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपस्थिथ राहणार आहेत. यंदाचे वर्ष हे निवडणुकाचे वर्ष असल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी नाविन्यपूर्ण अशा या उपक्रमाचे आयोजन या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे या पुस्तक प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना १० टक्के सवलत् मिळणारच आहे पण ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल अशा वाचकांना अतिरिक्त १० टक्के म्हणजे एकूण वीस टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे, अशी माहिती उल्हासनगर महानगर पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांनी दिली. इतकेच नाही तर ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष या पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. या कक्षात मतदान ओळखपत्राची प्रक्रीया सुरु केल्यास त्या वाचकाला देखील अतिरिक्त दहा टक्के  सवलतीचा लाभ पुस्तक खरेदीवर घेता येणार आहे. त्यासोबतच या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतली जाणार आहे आणि त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत. मतदार जनजागृती करीत असतानाच उल्हासनगर महानगरपालिकेतील बालकांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही विशेष उपक्रम या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केला जाणार आहेत असेही आयुक्त शेख यांनी सांगितले. या पुस्तक प्रदर्शनात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर सत्कार करण्यात येणारच आहे पण त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या या नैपुण्याला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, त्यांच्या शिक्षकांचा आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल अशी यामागील कल्पना आहे त्यासोबत उल्हासनगरमधील रहिवासी असणारे अभिषेक ताले हे नुकतीच प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचाही विशेष सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तक प्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण व्हावा हा त्यामागील उद्देश. या तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शनास आपण भेट देऊन पुस्तकांशी दोस्ती करण्याचे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे.

भिवंडीतील तृतीयपंथीय व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मतदान करावे-दिपाली मासिरकर

अशोक गायकवाड भिवंडी : २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला यांची मतदानातील टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या पथकाने भिवंडीतील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात उपस्थित तृतीयपंथीय तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर यांनी केले आहे. तृतीयपंथीय मतदार, देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये मतदान जनजागृती होणे आवश्यक आहे, यासंदर्भात निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर, वरिष्ठ सल्लागार साधना राऊत, आणि कक्ष अधिकारी उदिता कांडपाल, मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयातील कार्यक्रम अधिकारी पल्लवी जाधव यांनी भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात तृतीयपंथीय मतदार, तसेच देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी १३७ भिवंडी पूर्व मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप,१३६ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अस्मिता मोहिते, नायब तहसीलदार स्मितल यादव, मनपा उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त अजय एडके, भिवंडी महानगरपालिका निवडणूक प्रमुख नितीन पाटील तसेच दोन्ही मतदारसंघाचे स्वीप पथकाचे अधिकारी सदस्य उपस्थित होते.

उल्हासनगर पोलीस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन मोडमध्ये

राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार उल्हासनगर : लोकसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष्यांमध्ये बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद होत असतात.अशाप्रसंगी पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी उल्हासनगरातील पोलीस हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राईड-स्कीमच्या प्रत्यक्षिकांचा थरार सादर करून आम्ही सज्ज असल्याचा मॅसेज दिला. कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही 20 रोजी होणार असून आज महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.येत्या काही दिवसात विविध राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाल्यावर बॅनर्स-पोस्टर्स-कट आऊट्स झळकणार आहेत.अशावेळी बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद आणि दंगे होत असतात.त्यामुळे पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे,सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी राईड स्कीम प्रत्यक्षिकांच्या थराराचे आयोजन 17 सेक्शन वरील महामार्गावर केले होते. या राइड स्कीम मध्ये एस.आर.पी.एफ ची तुकडी,झोन फोर स्ट्राइकिंग,मध्यवर्ती पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस सहभागी झाले होते.यावेळी दंगल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत ट्रेनिंग देण्यात आले.

‘रामसेतू’ मोहिमेसाठी जलतरणपटू सज्ज

ठाणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू ३ आणि ४ मे रोजी ‘रामसेतू’ तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत. अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे. यामध्ये अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे १२ तरुण जलतरणपटू ‘पाल्क स्ट्रेट’ ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी संपूर्ण टीमने घंटाळी मंदिरात घंटाळी देवी आणि प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेतले. प्रभू रामचंद्रांना पवमान अभिषेक करून घंटाळी मंदिराचे पुजारी ओंकार चिक्षे गुरुजी यांनी मंत्रोच्चारासह आशीर्वाद दिले. यावेळी जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनय सहस्रबुद्धे, मृणाल पेंडसे, विकास घांग्रेकर, अश्विनी बापट, वरदराज बापट, अमोल फडके, क्षमा पातकर, मंगेश ओक, रामचंद्र चिवकुल याचबरोबर मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, प्रशिक्षक भारती सावंत, तसेच माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कळव्यात वाहतुकोंडीमुळे वाहनांच्या रांगा

कळवा : मुंब्रा बायपास रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. त्याचवेळी सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा रेल्वे सबवेखालून जाताना एक कंटेनर…

कोटेच्या यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक

देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबईः ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा दगड दोघांना लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांनी सोमवारी प्रचाराला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री त्यांचा प्रचार गोवंडी परिसरात सुरू असताना अचानक एक दगड प्रचारातील रथावर येऊन पडला. हा दगड तक्रारदार निहारिका खोदले (५४) यांना लागला. पुढे तोच दगड कलप्पा गुनाळे यांच्या उजव्या गालाला लागला. त्यानुसार खोदले यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३३७, ३३६ अंतर्गत व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात देवनार पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. गोवंडी येथील न्यू गौतम नगर परिसरात सोमवारी सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर खोदले यांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी मध्यरात्री याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीटीव्हीच्या मदतीने याप्रकरणी तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

कोंकण भवनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

नवी मुंबई : थोर  संत व समाजसुधारक संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे 50 पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती केली.

मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश राजीव चंदने मुरबाड : नगरपंचायतचे हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटणाऱ्या राहुल हिंदुराव या ठेकेदाराने लाखो रुपयांचा काळा पैसा मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत टाकला असल्याने नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली असुन या प्रकरणाची चौकशी  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे करीत असुन त्या चौकशी कडे तमाम मुरबाड करांचे लक्ष लागले आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने नगरोथ्तान योजनेतुन कोट्यवधी रुपये मुरबाड नगरपंचायतला दिले.मुरबाड नगरपंचायतने हि कामे  आपल्या मर्जीतील ठेदारांना देऊन शासनाचा निधी खर्च  केला मात्र  उघडी गटारे, रस्ते व शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वस्तीत येत असल्याने त्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली असता सदर ठिकाणी राहुल हिंदुराव या ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत परंतु ती कामे अस्तित्वात नसल्याचे उघड झाले.याबाबत शिवसेना कार्यकर्ते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे ,सागर भंडारी,दिपक दुधाळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली असता प्रसारमाध्यमांनी  हा प्रकार उजेडात आणला, त्यामुळे ठेकेदाराचे पायाखालची वाळू सरकली व त्याने मुरबाड नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरोथ्तान खात्यावर सुमारे आठ लाख चौतीस हजार रुपये जमा केले.याबाबत नगरपंचायतीने राहुल हिंदुराव ठेकेदाराला लेखी पत्र दिले असता त्याने समाधान कारक खुलासा केला नाही त्यामुळे नगरपंचायतने  जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत. कोट मुरबाड नगरपंचायतीच्या नगरोत्थान खात्यावर संबंधित ठेकेदाराने अनाधिकृत पणे जमा केलेल्या रकमेची जिल्हाधिकारी स्तरावरुन चौकशी सुरू आहे.त्याचे चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे आहेत –मनोज म्हसे.मुख्याधिकारी.मुरबाड नगरपंचायत.

आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला – विजय कुवळेकर

रमेश औताडे मुंबई : खिळे जुळविण्याच्या पत्रकारितेच्या पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात फोटो स्पष्ट दिसू नये म्हणून शाई जास्त टाका असे सांगणारे  व आजची पत्रकारिता पाहता , ज्या दोन व्यक्ती भेटल्याच नाहीत त्यांची दृश्ये एकत्रित करण्याची कला पाहता आजच्या पत्रकारितेचा विकास झाला की दृष्टीला तडा गेला. ‘तंत्रज्ञान’  कोणतेही असूद्या मात्र ‘मंत्र’ तोच आहे. असे जेष्ठ पत्रकार व्यासंगी व्यक्ते विजय कुवळेकर यांनी जेष्ठ छायाचित्रकार घन:श्याम भडेकर यांच्या ‘शूट आऊट’  या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या वेळी सांगितले. यावेळी माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे, पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण म्हणाले,  लेखणी हि तलवार असते. मात्र घन:श्याम भडेकर यांच्या कॅमेऱ्याची लेन्स ही बुलेट ठरली आहे. त्यांनी काढलेला एक फोटो लाखो शब्दापेक्षा मोलाचा आहे. जीवनात काही  प्रसंग असे येतात त्यावेळी आपल्याला राग येतो. मात्र घन:श्याम भडेकर यांना मी कधीही रागावलेले पाहिले नाही. आज त्यांच्या १९१ पानी शूट आऊट या पुस्तकाच्या   प्रकाशन समारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवरांची गुंफण घन:श्याम यांनी केली आहे. त्यांची अशी अजून शंभर पुस्तके निघोत हिच सदिच्छा असे संदीप चव्हाण म्हणाले. यावेळी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे यांनी चारोळ्याच्या माध्यमातून घन:श्याम भडेकर यांच्या पुस्तकाचे व त्यांचे कौतुक केले. तर संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी आपटे यांनी घन:श्याम भडेकर यांच्या सोबत सुरू केलेली कारकीर्द कशी होती याबद्दल सांगितले. माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे म्हणाले, १६ वर्षा खालील व महिलांना जबानी घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरी जावे असा कायदा आहे.मात्र त्याचे पालन कोणी करत नाही. घनश्याम यांनी त्यांच्या काळातील फोटोग्राफी बद्दल जे काही सांगितले तेव्हा सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या.असे अनेक किस्से सांगत त्यांनी घनश्याम यांचे कौतुक केले.

पी. वेलरासू यांनी कोंकण विभागीय महसूल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

अशोक गायकवाड नवी मुंबई :कोकण विभागात विकासाच्या दृष्टीने काम करण्यास भरपूर संधी आहे. कोकणातील नागरिकांना महसूल विभागातर्फे सूलभ सेवा देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकण विभागातील अनुभवी अष्टपैलू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकांना सेवा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. पी. वेलरासू यांनी आज कोंकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवी मुंबई मधील एस आर ए विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांची कोकण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. वेलरासू हे २००२ च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. पी. वेलरासू यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक व ठाणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात सदस्य सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. पी. वेलरासू यांचे मास्टार्स इन पब्लिक अफेअर पब्लिक पॉलीसी ॲनालीसीचे शिक्षण कॅलीफोरनीया विद्यापीठातून झाले आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण केले आहे. यावेळी आयुक्त पी. वेलरासू यांनी कोकण विभागीय कार्यालयासह महसूलच्या विविध विभागांची पाहणी केली. आणि कोकण भवन मधील महत्त्वाच्या विभागांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केली.