Month: April 2024

पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर

नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण डोंबिवली : पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील नांदिवली पंचानंद येथे रविवारी पुनर्विकासासाठी एक इमारत तोडताना ठेकेदाराने धुळ प्रतिबंधक कोणत्याही उपाययोजना न करता शक्तिमान यंत्रांच्या साहाय्याने दिवसभर तोडकाम केल्याने या भागात धुळीचे लोट पसरले होते. परिसरातील रहिवासी, पादचारी, प्रवासी या धुळीने हैराण होते. विशेष म्हणजे इमारत तोडण्याच्या बाजुला एका खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील रुग्णांना या धुळीचा प्रचंड त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. परिसरातील रहिवाशांच्या घरात धूळ पसरल्याने त्यांना दरवाजे, खिडक्या बसून घरात बसावे लागते. या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत होता. मुंबई उच्च न्यायालयाने हवेतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकांंना केल्या आहेत. गेल्या वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी धूळ प्रतिबंधक उपाययोजना न करता इमारत तोडणाऱ्या, धुळीचे प्रदूषण करणाऱ्या अनेक विकासक, ठेकेदारांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. नांदिवलीत धुळीचे लोट हे माहिती असुनही डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे नांदिवली लाईफ केअर रुग्णालयाच्या समोर रविवारी सकाळपासून एक इमारत पुनर्विकासासाठी तोडण्याचे काम शक्तिमान यंंत्राच्या साहाय्याने ठेकेदाराने सुरू केले होते. हे तोडकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने इमारतीच्या चारही बाजुला २५ फूट उंचीचे पत्रे, चारही बाजुने हिरव्या जाळ्या लावून धूळ नियंत्रित करणे, पाडकाम करण्यापूर्वी आणि करताना इमारतीवर टँकरव्दारे पाण्याचे फवारे मारणे ही कर्तव्य पाडकाम करताना संबंधित ठेकेदाराने पार पाडणे आवश्यक होते. ठेकेदाराने यामधील एकही अट पूर्ण केली नाही, असे या भागातील रहिवाशांंनी सांंगितले. पाडकाम करण्यापूर्वी या भागातील अनेक रहिवाशांनी ठेकेदाराला धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याची सूचना केली, त्याची दखल ठेकेदाराने घेतली नाही. दिवसभर तोडकाम करून ठेकेदाराने परिसरात धुळीचे प्रदूषण केले, अशा तक्रारी रहिवाशांंनी केल्या. हे पाडकाम करणाऱ्या ठेकेदाराने न्यायालयाच्या आदेशाचा आणि पालिका प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित करून इमारत पाडकाम केल्याने या ठेकेदारावर पालिकेने दंडात्मक कारवाई करून धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या शिवाय ठेकेदाराला इमारत बांधकाम तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला

भाईंदर : ठाणे लोकसभा जागेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे भाजप- शिवसेना पक्षांअंतर्गत संभ्रम वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी मिरा भाईंदर शहरातील प्रचार थंडावल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. शिवेसना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून ठाणे मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. भाजपाने दावा करून संजीव नाईक यांचे नाव पुढे केले होते. त्यांनी प्रचारदेखील सुरू केला होता. नंतर शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले. पण त्याची देखील अधिकृत घोषणा झाली नाही. दोन्ही पक्षांच्या या रस्सीखेचामुळे मिरा भाईंदर शहरातील महायुतीचा प्रचार थंडावला आहे. शनिवार रविवारी तर शहरात कुठेही प्रचार मेळावे, सभा आयोजित करण्यात आलेले नव्हते.. सुरवातीला नरेंद्र मोदी यांना उमेदवार समजून प्रचार करण्यात येत होता. मात्र आता उमेदवाराबाबत एवढी अनिश्चितता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. परिणामी महायुतीचा प्रचार थंडावत गेला. महाविकास आघाडी जोरात.. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने त्यांचा प्रचार थंडावला असला तरी दुसरीकडे हाविकास आधाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी हा मतदार संघ पिंजून काढला असून अन्य पक्षातील नाराज उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. महायुती मध्ये उमेदवारीवरून सुरु असलेल्या वादामुळे अंतर्गत गटातटाचे राजकारण महायुतीला हानीकारक ठरू शकेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. तर भाजपाच्या स्थानिकांना करावा लागणार सरनाईकांचा प्रचार ठाणे लोकसभेसाठी भाजपातून इच्छुक असलेल्या संजीव नाईक यांनी मागील वर्षभरापासून मिरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई मधील कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतून आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, आणि नरेश मस्के हे इच्छुक असल्याचे समजते. प्रताप सरनाईक आणि भाजपाच्या एका गटात वाद आहे. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर भाजपाच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या प्रचारात उतरावे लागणार आहे.

‘मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती’

मनसे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी डोंबिवली : आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे ट्रिपल इंजिनचे सरकार काम करत होते. आता या इंजिनना मनसेचे मूळ इंजिन जोडले गेल्याने या ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती मिळेल आणि वेगवान विकास पाहण्यास मिळेल, असा विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी रविवारी डोंबिवलीत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या येथील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरातील कार्य अहवाल प्रकाशन समारंभात व्यक्त केला. ट्रिपल इंजिनचे सरकार असले तरी या इंजिनमध्ये खरे इंजिन हे मनसेचे मूळ इंजिन आहे, याची जाणीव ठेवावी असे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. शिंदे यांच्याकडे पाहत मिश्किल टिपणी केली. महायुतीमध्ये मनसे सामील झाली असली तरी मनसेचे कार्यकर्ते महायुती उमेदवारांचा प्रचार करतील का, अशा वावड्या उठल्या आहेत, याविषयी बोलताना आमदार पाटील यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील दोन्ही उमेदवारी यापूर्वी मनसेमध्ये होते. ते दोन्हीही मनसे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आता आमचा काही संबंध राहिलेला नाही. अशा सोडून गेलेल्यांकडे मनसे ढुंकुण पाहत नाही, असे सांगून आमदार पाटील यांनी मनसे भक्कमपणे कल्याण लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे आणि भिवंडीत कपील पाटील यांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले. विकास कामे, निधी विषयांवरून यापूर्वी आमचे आणि खासदार शिंदे यांच्यात काही लुटुपुटुच्या लढ्या झाल्या असल्या तरी ते वाद तात्विक होते. आम्ही एकमेकांची मने कायमची तोडली नाहीत, अशा शब्दात आमदार पाटील यांनी आपण डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भक्कमपणे असल्याची ग्वाही दिली. महायुतीला पाठिंबा देण्याबाबत आपणास यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क केला होता. आपण ही जबाबदारी आपले नेते राज ठाकरे याच्याशी बोलून निर्णय घ्या, असे कळविले. महायुतीकडून राज ठाकरे यांना विचारणा होताच मोदी यांच्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. हीच कृती यापूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलून केली असती तर आता राज्यात वेगळे चित्र दिसले असते, असे सांगून पाटील यांंनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाण्यातील बाळकुम, गायमुख भागातून येणारा उड्डाण पूल कोपर, रेतीबंदर भागापर्यंत आणून उतरविला तर वाहतुकीचे विभाजन होऊन नागरिकांना पाच मिनिटात मुंब्रा शहरापर्यंत जाणे शक्य होईल. तसेच या भागात सर्वाचेपचारी रुग्णालये आणि क्रीडासंंकुले विकसित करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होत्या. शिवसेनेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. विकासाच्या विषयावर बोलताना आमदार राजू पाटील यांचा उल्लेख करताना खासदार शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटत होती.

वसुंधरा दिनानिमित्त सागरी किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : 22 एप्रिल या ‘वसुंधरा दिवस’ (Earth Day) निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धक विविध उपक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे, परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल  यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात टी. एस. चाणक्य सागरी किनाऱ्यापाठीमागील भागात नवी मुंबई महानगरपालिका व टी एस चाणक्य युनिव्हर्सिटीचे  विद्यार्थी यांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहीम हाती घेऊन किनाऱ्याची स्वच्छता केली. या मोहिमेत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई कर्मचारी व टी एस चाणक्याचे विद्यार्थी सहभागी होते. यावेळी उपस्थितांना जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची माहिती सांगण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाची माझी वसुंधरा शपथ सामुहिकरित्या घेण्यात आली.

तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची उपाययोजना

पाणपोई सुरू, शीत रूम, औषधे यांची सज्जता ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाहीस सुरूवात झाली आहे. सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहेत. तसेच, महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालय यांनी शीत रुम आणि औषधे यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रण करण्यासाठी सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. ठामपा क्षेत्रातील ३३ आरोग्य केंद्रे, ५ प्रसूतीगृहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात, त्याची लक्षणे, घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहेत. तसेच, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे, शीत रूम तयार ठेवलेली आहे. आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील रहिवासी संकुलामध्ये जनजागृती पत्रके लावली आहेत. त्याचबरोबर, खाजगी रुग्णालयांनाही उष्णतेच्या आजाराला सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. शाळा, महाविद्यालये येथेही जागृती करण्यात येत आहे. संस्थांची बैठक या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी काय करावे, काय करू नये, उष्णतेच्या आजाराची लक्षणे कोणती, पाणपोईची व्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार, सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन बैठक सत्राचेही आयोजन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले होते. त्यात, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, कामगार उपआयुक्त यांचे प्रतिनिधी, उपआयुक्त (शिक्षण), एमसीएचआय-क्रेडाई, हॉटेल असोसिएशन, उद्योग संघटना, टीसा, मेट्रो, एमएसआरडीसी, रेल्वे, एसटी महामंडळ, आरटीओ यांचे प्रतिनिधी, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तीन ठिकाणी पाणपोई सुरू आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे. तसेच, ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जात आहे. सध्या ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्था करणार आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

दिवंगत आर.आर.पाटील यांच्या सूचनेकडे गृहविभागाचे अद्यापही दुर्लक्ष

रमेश औताडे मुंबई : दक्षिण मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या महिला प्रसाधनगृहात घुसून एका वकील महिलेचा विनयभंग करणारा सरकारकडे अद्यावत माहिती नसलेला परप्रांतीय सुरक्षा रक्षक संदीप पांडे याला पोलिसांनी अटक केली. याअगोदर अशा घटना घडल्या आहेत. त्यातील 99 टक्के सुरक्षा रक्षक परप्रांतीय आहेत. परराज्यातून  तडीपार केलेले हे गुंड महाराष्ट्रात नोकरी करतातच कसे ? या  तक्रारीवरून दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांची एकत्रित माहिती गोळा करून त्याचा एकत्रित डाटा एका क्लिकवर मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पुढे त्यावर सरकारने व गृहविभागाने अद्यापही गांभिर्याने काहीच केले नसल्याने परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिलांच्या विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत व त्या सुरूच राहतील अशी भीती महिला संघटना करत आहेत. तीन दिवसांपूर्वी झालेल्या ताज्या घटनेतील महिला वकील असून ती खासगी लॉ फर्ममध्ये कामाला आहे. ती एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी सुरक्षा रक्षक संदीप पांडे हा महिलांच्या वॉशरूममध्ये तिला दिसला. महिला प्रसाधनगृहात तुझे काम काय ? असे तिने त्याला विचारले. त्यानंतर पांडे हा घाबरला व तो बाहेर पळाला. त्यानंतर पीडितेने प्रसाधनगृहाच्या आतून कडी लावली. तेव्हा पांडे तिला पुन्हा आत दिसला. पीडितेने मदतीसाठी धावा सुरू केला. तेव्हा पांडे याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला बुक्का मारून लाथ मारली. त्यानंतर पांडे हा प्रसाधनगृहातून बाहेर पडला. या प्रकरणानंतर संबंधित आरोपीविरोधात पीडितेने आझाद मैदान पोलिसात तक्रार नोंदवली गेली. आता तपास सुरू होईल व त्याला शिक्षा होईल व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होईल. मात्र यावर कायम स्वरुपी तोडगा निघणार आहे की नाही ? असा सवाल महिला करत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी चे मालक मंत्रालयात बिनधास्तपणे फिरत असतात.  त्यांना कोणाचा आशीर्वाद असतो ? १९८१ साली सरकारने सुरक्षा रक्षक कायदा केला. सरकारचा हा कायदा असा आहे की , अनेक कंपन्या , मॉल , बँका , आस्थापना , कारखाने , महामंडळे इतर सरकारी कार्यालयात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नियुक्त केले पाहिजेत. किंव्हा त्या त्या कंपन्यांचे सुरक्षा रक्षक त्यांनी नियुक्त केले पाहिजेत. जर सुरक्षा मंडळाकडे सुरक्षा रक्षक नसतील तर तसे हमी पत्र घेऊन खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीने सूट प्राप्त अर्ज करून त्या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा कार्यरत करावी.असे आदेश आहेत.कायदा आहे. मात्र मंत्रालयात  सर्वत्र आलबेल आनंदी आनंद असल्याने खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीचे मालक बिन्धास्त मोकाट मंत्रालयात फिरत आहेत. सरकारी सुरक्षा रक्षक मंडळातील कोरोना काळात ऑन ड्युटी मृत सुरक्षा रक्षकांच्या विधवा पत्नी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असताना व दिवंगत आर आर पाटील यांच्या सूचनेला दाखवलेली केराची टोपली सामान्य जनतेला आच्छे दीन कधी आणणार असा सवाल महिला वर्ग करत आहेत.

निवडणूक निरीक्षक राहूल यादव व सुधांशु मिश्रा यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

अशोक गायकवाड रत्नागिरी : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव आणि निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून येथील अल्पबचत सभागृहात आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, विशाल खत्री आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या. होम वोटींगच्यावेळी गोपनीयता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. व्हिव्हीपॅट कसे हाताळावे, याबाबतही एक व्हीडीओ सर्वांना देण्यात येईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये एकूण उमेदवार, त्यांचे आलेले अर्ज, दिव्यांग तसेच ८५ वर्षापुढील मतदारांसाठी करण्यात आलेली तयारी, प्रशिक्षण, ईव्हीएमची सरमिसळ, केंद्रस्तरीय परिवेक्षक, मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, भरारी पथक, स्थिर निगरानी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनीही सादरीकरण करुन, सीमा तपासणी नाके, प्रतिबंधात्मक आदेश, केलेली कार्यवाही, शस्त्रास्त्र, परवाने, स्ट्राँगरुम बंदोबस्त अशी एकूणच कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

मॉर्डन क्रिकेट क्लब सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब…

नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्यावतीने डोंबिवलीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार

ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड,…

भारतीय पुरुषांचा अंतिम फेरीत ८५ धावांनी दारूण पराभव

कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा दारूण पराभव करत इंग्लंड-एशिया कपावर नाव…