सिंधुदुर्ग : नारायण राणे सत्तेसाठी लाचार असून सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, नारायण राणे कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला भूतकाळ आठवावा, अशी परखड टीका रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे.
तुम्ही एवढे अब्जाधीश कसे झालात, चेंबूरच्या नाक्यावर असणारा माणूस आज जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावरील नऊ मजली इमारतीत जाऊन राहतो. कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्री होतो? संपत्ती कशी कमावली? याचा सगळ्याचा हिशोब द्या. उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची राणेंची कॅसेट जुनी आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना इशारा देण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला कोणती बीळ लपायला आहेत, ती शोधा. शिवसैनिक मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, तुम्हाला कोणत्या बिळात घालून ठेवू, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. निवडणुकीच्या नंतर यांना बिळातच जावं लागणार आहे, बाकी रस्ते तर सोडाच, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
प्रसाद लाड हा सुद्धा लबाड माणूस. ज्या पक्षाने वाढवलं त्याच्याशी बेइमानी करून, आता भाजपची सेवा करायला गेला आहे. तुम्ही सुद्धा रेमडीसीव्हिर इंजेक्शनच्या माध्यमातून किती करोड रुपये त्या कंपनीकडून उकळले आहेत, ते सुद्धा तुम्ही सांगा. कोरोनाच्या काळामध्ये पीएम केअर फंडातून हजारो कोटींचा निधी जमा केला आहे, त्याचं ऑडिट करू शकत नाही. त्या फंडाचा हिशोब तुम्ही दिलाय का? कोरोना काळामधील आलेले कफन त्याच्यावर सुद्धा कॅगने ताशेरे ओढले आहेत, हिम्मत असेल तर त्याचा हिशोब द्या, असं म्हणत विनायक राऊतांनी निशाणा साधला आहे.
