नारायण राणेंचा तोल सुटला
मुंबई : लोकसभेच्या प्रचार भाषणात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांवर टीका करताना तोल ढळाला. चार वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असूनही शरद पवार काहीही करु शकले नाहीत. गेल्या 84 वर्षांत विकास कामांसाठी शरद पवार कधीही अस्वस्थ झाले नाही. मी राजकारणी आहे. मी काही लोकांचा अभ्यास केला आहे, शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्षे जगले नसते, म्हणत नारायण राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
माणसाला आजकाल हवामान बदल झाला की 50-55 वर्षात अटॅक येतो, माणसे जातात. 84 वर्षात जग इकडचं तिकडे होत पण शरद पवारांना काही होत नाही, बिनधास्त असतात. मोदींना सांगतात तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही, मात्र आमचं सरकार जाणार नाही.400 पेक्षा जास्त खासदार येऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे.
शरद पवारांना माझे एकच सांगणे आहे, आमचे साधु -संत सांगून गेले आहेत. चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे, तो विरोधक असला तरी त्यामुळे शरद पवार साहेब चांगल्याला चांगलं म्हणा हा माणुसकीचा धर्म आहे. मोदी आणि पवार चांगले मित्र आहेत म्हणता, मग मित्राला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नका असा हल्लाबोल नारायण राणे यांनी शरद पवार यांच्या वर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या भटकती आत्मावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मोदींना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे. त्यावर आज नारायण राणेंनी शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाही, असे म्हटले आहे.
