माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज
डोंबिवली – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अंतिम टप्प्यात जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला.
ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. पक्षाकडून जाधव यांना देखील उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले गेल्यामुळे ठाकरे गटाचा कौल नेमका कोणाकडे आहे ? याची चर्चा आता रंगली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून वैशाली दरेकर यांचे नाव पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते. मंगळवारी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन केले. दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यामुळे विविध घटक पक्षातील उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू होती. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश म्हात्रे हे निवडणूक कार्यालयात आले.
त्यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे हेदेखील हजर झाले. यामुळे राजकीय वर्तुळात चलबिचल सुरू झाली. ठाकरे गटातील माजी महापौर रमेश जाधव हे अर्ज भरून बाहेर येताच त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार मी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे सांगितले.
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आता नक्की कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो ? तसेच पक्ष दोघांपैकी कोणाला उमेदवारी जाहीर करतात हे पहावे लागेल.
नाराजीचा फटका
महायुतीचा उमेदवार ठरण्याअगोदरच महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर करत वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर केले होते. दरेकर यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात काहीशी नाराजी आहे. त्यातच ठाकरे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यामुळे ही नाराजी उघड उघड दिसून आली. पक्षातीलच काही वरिष्ठ नेते देखील दरेकर यांच्या प्रचारात फारसे दिसून येत नाहीत. तसेच दरेकर या मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलात करत नाहीत.
प्रचाराविषयी त्यांच्याशी चर्चा केली जात नाही. असे पदाधिकारी सांगत असून त्यांच्याविषयी नाराजी उघड करत आहेत. याचाच फटका बसून पक्षाने आपला दुसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे का ? अशी एक चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
विधानसभेचे गौड बंगाल
माझे महापौर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरण्यामागे विधानसभेचे गोड बंगाल असल्याचे देखील बोलले जात आहे. ऐन वेळेला राजकीय समीकरणे फिरून पुढे अडचण होऊ नये म्हणून जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी फोनवर संपर्क साधून आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. त्यानुसार शिवसेना पक्ष मशाल यावर आपण उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन्ही उमेदवारांवर पक्षाचा विश्वास असून यातून एक उमेदवार निवडला जाईल. उमेदवाराच्या अर्जात एखादी त्रुटी राहिल्यास कोणती अडचण येऊ नये म्हणून हा फॉर्म आम्ही भरला आहे.
– रमेश जाधव, केडीएमसी माजी महापौर
पक्ष त्यांचे उमेदवार ठरवत असतात. पक्ष आदेश देऊ शकतो आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शिवसैनिकांना तुम्ही फॉर्म भरा म्हणून. त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरला. पक्षाचा आदेश हेच आमचं काम आहे. तसेच पक्ष आदेश देऊ शकतो तुम्ही फॉर्म भरून ठेवा आणि आणि ही पद्धत आहे प्रत्येक पक्षाची. दोन दोन फॉर्म भरून ठेवतात. त्याप्रमाणे पक्षाने हा आदेश दिलेला आहे. जर काही असते तर भव्य रॅली काढत माझा उमेदवारी अर्ज भरला नसता. पक्षाच्या काही रणनिती असतात. सर्वच उघड करता येत नाहीत. त्यांनी फॉर्म भरला यात काही वावग नाही. पक्ष जसा आदेश देतो तसा त्यांनी फॉर्म भरला. उमेदवार चेंज होणार नाही. जस्ट वेट अँड वॉच.
– वैशाली दरेकर, उमेदवार महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट
