आवक घटल्याने शहाळ्यांच्या किमतीत वाढ

वाशी – वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील झपाट्याने कमी होत जाणारी पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी लोक पाण्यासोबतच विविध शीतपेये, सरबतांचा आधार घेत असतात. त्यातही उन्हाळ्यात नैसर्गिक आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेल्या शहाळ्यांच्या पाण्याला अधिक पसंती दिली जाते. मात्र, आता बाजारात शहाळ्यांची आवक घटल्याने किमतीत वाढ झाली आहे.

शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी असून त्यात अॅंटीऑक्सिडेन्ट मोठ्या प्रमाणात असतात. शहाळ्याचे पाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करते. शिवाय शरीरातील अपायकारक घटक काढून शरीर शुद्धीकरणसाठीदेखील मदत करते. शरीराला पोषक घटक शहाळ्याच्या पाण्यात असल्याने उन्हाळ्यात कृत्रिम शीतपेयांपेक्षा नागरिक शहाळ्याच्या पाण्याला पसंती देताना दिसतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात रेल्वेस्थानके, बाजारपेठा, व्यावसायिक कार्यालये या भागात शहाळे विक्रेते दृष्टीस पडत असतात. हवामान बदलाचा फटका जरी शहाळ्यांच्या आवकीवर बसला असला तरी ही आवक लवकर सुरळीत होईल, असे नवी मुंबईतील नारळ विक्रेते व्यंकटेश कुट्टी यांनी सांगितले.

६० ते ८० रुपयांना विक्री

महाराष्ट्रात कोकणसह केरळ, आंध्रप्रदेश येथून मोठ्या प्रमाणात शहाळ्यांची आवक होते; परंतु हवामान बदलामुळे गेले काही दिवस ही आवक कमी झाली असल्याचे नारळ विक्रेते सांगत आहेत. परिणामी, शहाळ्यांच्या किमतीत २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी ४५ ते ५० रुपयांना मिळणारे शहाळे सध्या ६० ते ८० रुपयांना विकले जात आहेत. तसेच १० ते १५ रुपयांना मिळणारे लहान नारळ २० ते २५ रुपयांना मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *