मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदात्यांसाठी यंदा मतदान केंद्रावर थंडा थंडा कूल कूल अशीच काहीशी व्यवस्था असणार आहे. तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर अक्षरश: घामाघूम होत असून त्याचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना बाटलीबंद थंड पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात सावलीचीही खास सोय केली जाणार आहे

मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ असून ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयार पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

२७२८ मतदारांना गृह मतदानाची सोय

उपनगर जिल्ह्यात ८५ पेक्षा जास्त वय असलेले तब्बल ९५ हजार १८८ मतदार असून दिव्यांग मतदारांची संख्या १३ हजार ८२१ आहे. संबंधित वृद्धांना आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्यांना गृह मतदानाची सोय केली जाते. त्यानुसार आतापर्यंत २७२८ वृद्धांनी तर १७० दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी अर्ज भरला आहे. गृह मतदानासाठी २६ विधानसभा क्षेत्रात २०० टीम कार्यरत असून १० आणि ११ मे रोजी संबंधितांना गृह मतदान करता येणार आहे.

पोस्टल बॅलेट

निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना बॅलेट पेपरने मतदान करण्याची सोय आहे. सध्या २३ हजार ५१५ निवडणूक कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असून त्यांना १४ ते १६ मे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे.

सर्व मतदान केंद्र तळ मजल्यावर

मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्र यंदा तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. तसेच व्हील चेअर, मदतनीस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दारूचा महापूर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरात दारूचा महापूर आल्याचे स्पष्ट झाले आहे. आचाररसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत गस्ती पथकांनी आणि कस्टम विभागाने सुमारे १ कोटी रूपये किंमतीची तब्बल ५६ हजार ३८६ लिटर अवैध दारू जप्त केली आहे. त्याअंतर्गत २९७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी दिली. तसेच १७ कोटी ९३ लाख रूपयांचे रोकड पकडली आहे.

आचारसंहिता भंगाच्या ३४५ तक्रारी

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल अॅपवर आतापर्यंत ३४५ तक्रारी आल्या आहेत. निवडणूक विभागाने ७२ तासात त्यावर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *