८५ वर्षावरील ६३४ तर, १०३ दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
ठाणे : दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना आजारपणामुळे घराबाहेर पडता येत नाही, अशा व्यक्तींसाठी ही सुविधा असणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात ८५ वर्षावरील ६३४ आणि १०३ दिव्यांग नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच ८५ वर्षावरील नागरिकांना आणि दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घर बसल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रथमच गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात या प्रक्रियेला ९ मे पासून सुरुवात झाली असून विधानसभा मतदारसंघ निहाय्य ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये ९ मे रोजी तर, कल्याण लोकसभा मतदार संघा मध्ये १० मे रोजी गृह मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानुसार, ठाणे लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २५६ आणि दिव्यांग ३७ तर, कल्याण लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २१५ आणि दिव्यांग ४४ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात १६३ आणि दिव्यांग २२ असे गृह मतदान पार पडले. यातही, काही नागरिक घरी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. या नागरिकांचे मतदान १५ मे पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
काय आहे गृह मतदानाची प्रक्रिया
४० टक्के अपंगत्व आणि ८५ वर्षावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मंजूर अर्जांच्या यादीनुसार विधानसभानिहाय मतदारसंघाद्वारे ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जावून त्यांचे मतदान घेण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हे अधिकारी मतदारांना मतदान प्रक्रिया समजावतात आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून त्यांच्या कडून मतदान करुन घेतले जाते. त्यांनी केलेले मतदान हे गौपनिय राहावे यासाठी ते सील बंद केले जाते, अशी माहिती सुत्रांनी दिली.
