जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचे आवाहन

ठाणे : देशासाठी  सैनिक करतात बलिदान… तुम्ही करा ना मतदान .. असा संदेश मतदान जनजागृती करण्यासाठी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात “संवाद मतदारांचा… संकल्प मतदानाचा” या सुसंवाद कार्यक्रमात ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मतदारांना दिला.

देशाच्या सीमेवर सैनिक आपले रक्षण करीत असल्यामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करीत आहेत. सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत..आपण निदान मतदान तरी करावे, असा संदेश या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून मनोज शिवाजी सानप यांनी दिला.

सीमेवर देशाचे रक्षण करताना शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे या वीरमातेची गाथा त्यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून उभी केली. देशासाठी सैनिक म्हणून मुलाचे बलिदान हा अभिमान आणि दुसरीकडे मुलगा गमावल्याचे आईचे दु:ख हा प्रसंग एका वीरमातेच्या भूमिकेतून त्यांनी साकारला. आज सीमेवर सैनिक रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान देत आहेत, मग आपल्याला तर फक्त मतदान करावयाचे आहे, असे आवाहन करीत मतदान नक्की करा आणि आपली भारतीय लोकशाही बळकट करा, हे असे आवाहन वीरमाता मतदारांना करीत असल्याचा प्रसंग मनोज सानप यांनी साकारला.

मतदान हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे ते प्रत्येकाने बजावणे आपला अधिकार आहे. सैनिक सीमेवर बलिदान करीत आहेत, आपल्याला फक्त मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे, असे जनजागृतीपर आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *