ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघात मागील १२ वर्षांत गटार, पायवाटांशिवाय पदवीधर मतदारांसाठी ठोस काम झाले नाही, असा आरोप मनसेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे यांनी केला आहे. भाजपचे निरंजन डावखरे यांचे नाव न घेता अभिजित पानसे यांनी टीका केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. २७) मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा दिल्यावर मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिला. आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नसेल, तर आमचा या मतदारसंघासाठी रोजगारनामा असेल, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार का, असा सवाल केला असता आमचा पक्ष आदेशावर चालतो, मी मनसेकडून लढत आहे; मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. आमची त्यांच्याकडे चर्चा झाली नसल्याची माहिती या वेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
