Month: May 2024

पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर पालिका अ‍ॅक्शन मोडवर!

चार अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम केले सुरू उल्हासनगर : एकीकडे महानगरपालिकेने 336 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या शक्यतेची दक्षता घेऊन उल्हासनगरातील 4 अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम करण्याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कॅम्प 1 ते 5 परिसरातील प्रभागनिहाय 336 घोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्द केली आहे.सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक आयुक्त यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ज्या अतिधोकादायक इमारती मागच्या वर्षी खाली करण्यात आल्या होत्या,ज्या राहण्यास अयोग्य आहेत अशा प्रभाग समिती 4 च्या हद्दीतील 4 इमारतींचे पाडकाम आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सुरवात केली आहे.मिनर्व्हा पॅलेस अपार्टमेंट,हिललाईन पोलीस् स्टेशन जवळ,रुपानी महल अपार्टमेंट,प्रभाराम मंदिरासमोर,गंगासागर अपार्टमेंट,सेवक बेकरीसमोर,पवनधाम अपार्टमेंट,कैलास कॉलनी, स्मशान भूमीसमोर ही पाडकाम करण्यात येत असलेल्या अतिधोकादायक इमारतींची नावे असल्याची माहिती सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.

पर्यावरण जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

नवी मुंबईत 104 मोठ्या सोसायट्यांमध्ये नवी मुंबई : शहरे पर्यावरणपूरक असावीत यादृष्टीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेने सुरवातीपासूनच उत्साहाने सहभागी होत आपले राज्यातील मानांकन कायम उंचावत ठेवले आहे. सन 2023 मध्ये ‘क’ वर्ग महानगरपालिकांत नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नावाजली गेली आहे. ही परंपरा अधिक उंचावण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात आणखी उत्तम कामगिरी करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण पर्यावरणशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून पर्यावरणपूरक कार्यक्रमांत प्रत्यक्ष लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने विभागनिहाय मोठ्या सोसायट्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येत आहे. यादृष्टीने 21 मे ते 27 मे 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवित मोठ्या सोसायट्यांमध्ये पर्यावरण जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. याकरिता प्रत्येक विभागातील 13 म्हणजे 104 मोठ्या सोसायट्या निवडण्यात आल्या. त्याठिकाणी जाऊन स्वच्छता, ऊर्जाबचत, वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक प्रतिबंध, वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, पर्यावरणपूरक वाहनांचा वापर, जलबचत, सांडपाणी प्रक्रिया अशा पर्यावरणाशी निगडीत विविध विषयांवर नागरिकांशी थेट संवाद साधून प्रबोधन करण्यात आले. एकूण 104 मोठ्या सोसायट्यांमध्ये राबविण्यात आलेल्या या पर्यावरण विषयक कार्यशाळांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या विशेष सप्ताहात नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार अशा प्रकारचे पर्यावरण जनजागृती उपक्रम महानगरपालिकेमार्फत सातत्याने राबविण्यात येतील असे अतिरिक्त आयुक्त तथा पर्यावरण विभागाचे प्रमुख श्री. शिरीष आरदवाड यांनी सांगितले आहे.

कल्याणमध्ये कांगा लीग क्रिकेट स्पर्धेची निवड

मुंबई : मुंबईत होणाऱ्या प्रसिद्ध कांगा लीग क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच कल्याणमध्ये खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे जाण्याची संधी आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक इच्छुक क्रिकेटपटू नेहमीच उत्सुक असतात. यंदा प्रथमच कल्याण विभागातील क्रिकेटपटूंची निवड कल्याणमध्येच होणार आहे. निवड प्रक्रिया शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. निवड प्रक्रिया युनियन क्रिकेट अकादमी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर, वाली नगर, कल्याण पश्चिम येथे होणार आहे. कांगा लीग ‘एफ’ क्रिकेट संघ निवडीसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. तरी या निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमाणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२३८९०१८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

दिव्यातील नालेसफाईच्या कामांना मुहुर्त नाहीच

आमदार राजू पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना धरले धारेवर ठाणे : पावसाळा जवळ आला असतांना आजही ठाणे शहरातील विविध भागात नाले सफाईच्या कामांच्या गंगाटळ्या सुरुच असल्याचे चित्र आहे. तिकडे दिवा भागात आजही नाले सफाईच्या कामांना मुहुर्तच सापडला नसल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे राजू पाटील यांनी मंगळवारी येथील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी हे विदारक चित्र त्यांच्या निर्दशनास आहे. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धारेधर धरले. तर नालेसफाईच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांना यंदाही उशीराने सुरवात झाली. त्यात ३१ मे पर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील असा दावा महापालिकेने केला आहे. सद्यस्थितीत ७० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. परंतु त्यानंतरही नालेसफाईच्या कामांना वेग आला नसल्याचेच चित्र दिसत आहे. दिव्यात नालेसफाईबरोबरच गटारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच दिसून येत आहेत. मनपा कडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केला जात असल्याने नागरिकांनी स्वखचार्ने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आले आहे. मात्र पावसाळा जवळ आला असताना दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे. दिव्यात कोणत्याही प्रकारे नाले सफाईच काम सुरू झाले नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाले सफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.  यावेळी त्यांनी दिवा शिळ रोड, साबे गाव, मुंब्रा कॉलनी, दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतली आहे. यावेळी ठाणे मनपाला अद्याप नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. तर यावेळी सहाय्यक आयुक्तांनी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.  यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अंतिम टप्प्यातली नालेसफाई अधिक सखोलपणे करा – आयुक्त डॉ.कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई अंतिम टप्प्यात असून आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या उत्तरेकडून दिघा, ऐरोली विभागापासून नालेसफाई कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला सुरूवात करीत अधिक सखोल नालेसफाई करण्याचे निर्देश दिले. यावर्षी कुठेही पाणी साचून राहणार नाही असा दिलासा नागरिकांना देताना आयुक्तांनी ७७ मोठ्या नैसर्गिक नाल्यांची १०० टक्के सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १९ मोठ्या नाल्यांची साधारणत: ३० टक्के राहिलेली सफाई येत्या ५ दिवसात पूर्ण होईल असे सांगितले. ही नालेसफाई जलद गतीने करताना योग्य रितीने व संपूर्ण स्वच्छता होईल याकडे बारकाईने लक्ष देऊन करावी अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देतानाच आयुक्तांनी नालेसफाई करणारे कामगार हे गमबूट, हँडग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने वापरूनच काम करीत असल्याची खात्री करून घ्यावी असेही निर्देशित केले. नाल्यांची सफाई होत असताना त्यातून काढला जाणारा गाळ लगेच उचलण्यात यावा तसेच काही नाल्यांचे डिसेल्टिंग करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून तेही काम लगेचच पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तत्पूर्वी आयुक्तांनी दिघा विभागाच्या पावसाळापूर्व पाहणीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कामे झाली आहेत काय याची पुनर्पाहणी केली. दिघा भाग काहीसा सखल आहे. तसेच इलठणपाडा येथील धरणाचा विसर्ग पश्चिमेकडील खाडीकडे वहात येताना मध्ये झोपडपट्टी, एमआयडीसी भागातील नाले काहीसे अरूंद असल्याने त्यांची सखोल सफाई होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नाल्यांतून खाडीत वाहून जाणारे पाणी विनाअडथळा वाहून जाण्याच्या दृष्टीने नालेसफाईची पाहणी केली व अधिक सखोल नालेसफाईचे निर्देश दिले. यावेळी काही ठिकाणी नाल्यांमधून जाणा-या केबल्समुळे प्रवाहात कचरा अडून राहू शकतो हे लक्षात घेत त्याठिकाणी चॅनल टाकावेत व केबल त्यावर बांधून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या. त्याचप्रमाणे नाल्यांच्या काठांच्या भिंतीवर उगवलेली रोपटीही काढून टाकावीत असे त्यांनी सूचित केले. नालेसफाई प्रमाणेच परिसर स्वच्छतेकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देताना आयुक्तांनी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने स्वच्छतेबाबत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही असे स्पष्ट संकेत दिले. रस्त्यांच्या शेजारील हरितपट्टे तसेच सुशोभित जागा यांची नियमित निगा राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच पदपथ नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा खुले राहतील तसेच त्यावरील झाकणे तुटली असतील तर ती तातडीने बदलून घ्यावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. नवी मुंबई शहरातील पावसाळापूर्व कामांची सद्यस्थिती आयुक्तांनी काल २७ मे रोजी विशेष आढावा बैठक घेत संबंधित अधिकारी यांचेकडून जाणून घेतली आणि आज दिघा, ऐरोली विभागापासून प्रत्यक्ष पाहणीला सुरूवात केली.

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा आजपासून 

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त २९ मेपासून आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धा शिवाजी पार्क मैदानात रंगणार आहे. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे नानावटी हॉस्पिटल विरुध्द लीलावती हॉस्पिटल यामध्ये बुधवारी सकाळी ९.०० वा माहीम ज्युवेनील खेळपट्टीवर प्रारंभिक लढत गौरवमूर्ती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते,  शिवछत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. स्पर्धेप्रसंगी सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. मनोज यादव आणि नानावटी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू प्रतिक पाताडे यांचा विशेष गौरव होणार आहे. अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेच्या ‘ए’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविण्यासाठी अष्टपैलू प्रतिक पाताडे, ओमकार जाधव, दिनेश पवार, प्रणव हरियान, डॉ. नवनीत राय, नितीन रांजे, किशोर कुयेस्कर आदींचा नानावटी हॉस्पिटल; अष्टपैलू रुपेश कोंडाळकर, मनोहर पाटेकर, धर्मेश स्वामी, सिध्देश घरत, संदेश पंधेरे, विजय नाडकर, विरेश दांडेकर, योगेश जांभळे आदींचा लीलावती हॉस्पिटल; नरेश शिवतरकर,  सुभाष शिवगण, जगदीश वाघेला, रोहन म्हापणकर, मनोज जाधव, राकेश शेलार, विलास जाधव आदींचा जे.जे. हॉस्पिटल; अष्टपैलू अॅलन गावद्या, आनंद सुर्वे, देवेंद्र भानसे, अल्केत तांडेल, दीपक सिंघ, सुरज जयस्वाल, ओमकार पाटील, संकेत किणी आदींचा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी यामध्ये चुरस असेल. ‘बी’ डिव्हिजनच्या अजिंक्यपदासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, कस्तुरबा हॉस्पिटल यामध्ये अटीतटी असेल. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक श्री. निलेश मदाने यांच्या वाढदिवसानिमित्त विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर आपटे यांनी श्री. मदाने यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुस्तके प्रदान करुन सन्मानित केले.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आणि उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पथनाट्यातुन पर्यावरण विषयक जनजागृती-शिरिष आरदवाड

अशोक गायकवाड नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.दिलीप नेरकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.