Month: May 2024

सुएसो माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा निकाल ८६.३६ टक्के

ॲड. प्रसाद पाटील यांनी केले अभिनंदन अशोक गायकवाड अलिबाग :सु.ए.सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सु ए सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. कुमारी शबा रिजवाना रजिउल्ला सिद्दीकी हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी अपूर्वा धनश्री माधव गोसावी हिला ७८.४० टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रणय भारवी भरत कांबळे याने ७८.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व ज्यांना यश मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे. सर्व पालक, ग्रामस्थ, शाळेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्यातुन पर्यावरण विषयक जनजागृती-शिरिष आरदवाड

अशोक गायकवाड नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.

सेवा संस्था तयार करणार नवीन रोड मॅप

2030 पर्यंत ठाणे जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सोशल एम्पॉवरमेंट अँड वॉलेटरी असोसिएशन (सेवा) संस्थेने नवी दिल्ली येथे (19 व 20 मे ) पार पडलेल्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आयोजित बालविवाहावरील कार्यशाळेत भाग घेतला. ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेच्या 200 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन 2024-25 साठी बालविवाहाच्या विरोधात रोडमॅप तयार केला आहे, 2030 पर्यंत देशातून बालविवाह दूर करण्याचा दृढनिश्चय केला आहे. कार्यशाळेत एकत्रित केलेल्या उपाययोजना  आणि त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी, ठाणे जिल्ह्यातील  कार्यरत असलेली सेवा संस्थाही 2030 पर्यंत ठाणे जिल्हा आणि शेवटी राज्य बालविवाहमुक्त करेल असा विश्वास आहे. 2022 मध्ये तळागाळात सुरू करण्यात आलेल्या ‘बालविवाह मुक्त भारत’  मोहिमेचा  प्रभाव आणि सहयोगींचे जाळे लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. गेल्या वर्षीपर्यंत देशातील 17 राज्यांतील 300 जिल्ह्यांमध्ये या अभियानाच्या 161 सामाजिक संस्था कार्यरत होत्या, तर आता ही मोहीम 22 राज्यांमध्ये पोहोचली आहे. यापैकी बहुतांश जिल्हे हे असे आहेत की ज्यांची ओळख बालविवाहाचे उच्च दर असलेले जिल्हे म्हणून करण्यात आली आहे. मुलांची तस्करी आणि बाल लैंगिक शोषण यांसारख्या मुलांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवरही संस्था काम करत आहे. नुकतेच ठाणे जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे एकूण 18 बालविवाह सेवा संस्थेने प्रशासनाच्या मदतीने  थांबविले आहे. बालविवाह मुक्त भारत मोहीम देशातून बालविवाह दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या निकट समन्वयाने कार्य करते. कार्यशाळेत ठरवण्यात आलेल्या रोडमॅपची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित करताना बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे निमंत्रक रवीकांत म्हणाले, “समाजातील खोलवर रुजलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्तीचे उच्चाटन करण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणावर संयुक्त धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे. बालविवाह जर आपल्याला या आव्हानाला सामोरे जायचे असेल, तर त्यासाठी एक सामान्य आणि विचारपूर्वक धोरण राबविणे आवश्यक आहे. कार्यशाळेतून मिळालेल्या अनुभवांबद्दल आणि शिकण्याबद्दल बोलताना, सेवा संस्थचे  संचालक ॲड. अशोक पवार म्हणाले, आमच्यासारख्या अनेक संस्था बाल हक्कांसाठी काम करत आहेत. यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत. बालविवाह समाप्त करण्याचे सामाईक उद्दिष्ट या कार्यशाळेत आम्ही नवीन आणि लक्ष्याभिमुख पद्धती शिकलो आणि आम्ही तळागाळात नवीन कल्पना राबवू आणि आम्ही पंचायत, जिल्हा परिषद आणि एकत्र काम करत राहू आपल्या जिल्ह्य़ातील पंच-सरपंचांनी जनजागृती मोहीम आणि कायदेशीर हस्तक्षेप करून लोकांमध्ये नैतिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याबरोबरच बालविवाह हा गुन्हा आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील याची जाणीव करून देता येईल, मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर हस्तक्षेप हे सर्वात प्रभावी साधन आहे. या स्वयंसेवी संस्थांचा उद्देश बालविवाहविरोधी कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि बालविवाह प्रतिबंध अधिकारी (CMPO) यांच्या समन्वयाने जनजागृती मोहीम चालविणे, लोकांना बालविवाह न करण्याबद्दल पटवून देणे आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे हा आहे. उपायांच्या मदतीने बालविवाह रोखले पाहिजेत. प्रसिद्ध बाल हक्क कार्यकर्ते भुवन रिभू यांनी त्यांच्या ‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन: टिपिंग पॉइंट टू एंड चाइल्ड मॅरेज’ या पुस्तकात बालविवाह बंद करण्यासाठी सुचवलेली कृती योजना हा या मोहिमेचा गाभा आहे, असेही ते म्हणाले.

कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली डोंबिवली स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी

ठाणे : डोंबिवलीतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या अपघातस्थळाची राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील जखमी कामगारांचीही विचारपूस केली. तसेच स्फोटामुळे  बाधित झालेल्या कारखान्यांची माहिती घेतली. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील अमुदान केमिकल्स प्रा. लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये दि. 23 मे 2024 रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या स्फोटाच्या घटनास्थळी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भेट देऊन यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, कामगार आयुक्त  संजय देशमुख, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक देविदास गोरे, बाष्पके संचालनालयाचे धवल अन्तापूरकर यांच्यासह कामगार व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्फोट झालेल्या कारखान्यात ओर्गानिक्स पेरॉक्साईड या रसायनाचे उत्पादन केले जात होते. दि.२३ मे, २०२४ रोजी या कारखान्यात  रिअॅक्टर मध्ये स्फोट झाला होता. यामुळे आजूबाजूच्या इतर ३६ कारखान्यांचे नुकसान झाले. या घटनेमध्ये एकूण 12 मृत आणि 68 व्यक्ती जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या घटनेची औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालायाकडून चौकशी सुरु असून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे श्री. खाडे यांनी सांगितले. स्फोटामध्ये जखमी झालेल्या कामगारांची एम्स हॉस्पिटल, डोंबिवली येथे जाऊन कामगार मंत्री श्री. खाडे यांनी विचारपूस केली. औषधोपचार घेत असलेल्या कामगारांचा खर्च शासनाकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या स्फोटामध्ये मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याबाबतची माहिती कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिली. याशिवाय मृत कामगारांच्या वारसदारास मिळणाऱ्या नुकसान भरपाई करीता कामगार न्यायालय आणि राज्य कामगार विमा विभागाकडे पाठपुरावा करण्याबाबत संबंधिताना निर्देश दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या भेटीदरम्यान स्फोट झालेल्या कारखाना मालकाविरुद्ध सुरक्षेमध्ये हलगर्जी केल्यामुळे कारवाई सुरु करण्यात आली असून पोलिसांकडून कारखान्याचे संचालक मलय मेहता यांना अटक करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी होणार कमी

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकानंतर ठाणे हे दुसऱ्या क्रमांकाचे गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकाची प्रवाशांची गर्दी सामावून घेण्याचे क्षमता संपल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या बाजूने सुमारे पाच ते दहा फूट रुंदी वाढवली जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला हे रुंदीकरण सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रुंदीकरणामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे स्थानकात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत येथे सात ते साडेसात लाख प्रवाशांची गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत ठाणे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळते. विशेषतः प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहावर तुफान गर्दी असते. लोकल पकडण्यासाठी प्रवासी उभे असतात; मात्र प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्याने प्रवाशांसाठी धोका वाढला आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून हालचालींना वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला प्लॅटफॉर्मचे काम सुरू होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहावरून लोकलबरोबर लांबपल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस गाड्या थांबतात. २४ डब्यांची ट्रेन थांबणाऱ्या या प्लॅटफॉर्मची रुंदी कमी आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत पाच अणि सहा प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते; मात्र आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार अणि पाचच्या मधोमध मोठी जागा आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या बाजूने कमाल रुंदी तीन मीटरने वाढवण्यात येणार आहे. प्रवाशांची तारांबळ प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहावर २४ डब्यांच्या ट्रेन थांबतात. त्यामुळे अरुंद प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांची तारांबळ उडत असते. या प्लॅटफॉर्मवर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. हातात मोठ्या प्रमाणात सामान असते. तसेच वृद्ध आणि लहान मुलेही असतात. त्यांना या रुंदीकरणाचा फायदा होणार आहे. ७२ तासांचा मेगाब्लॉक प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी साधारणतः ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी लागणारे साहित्य आणण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मेगाब्लॉकच्या दिवशी पाच क्रमांकावरून धावणाऱ्या लोकल गाड्या रद्द अथवा धीम्या रुळावर वळवण्यात येण्याची शक्यता आहे.

वसईच्या पूर्व पट्टीत भीषण पाणी टंचाई

७० हजार नागरिकांना होतोय पाच टँकरनी पाणी पुरवठा विरार : वसईच्या पूर्वपट्टीतील काही गावांना आजही नदीच्या खड्डयांतून पाँइगोला करून आपली तहान भागवावी लागत आहे. य गावासाठी ६९ गावाची पाणी पुरवठा योजना १५ वर्षा पूर्वी मंजूर झाली असून, पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. परंतु त्यात पाणी नसल्याने आज या ठिकाणच्या जवळपास ७० हजार नागरिकांना पालिकेच्या ५ टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातील कोल्ही, चिंचोटी, देवदल, कामण सागपाडा आणि खिंडीपाडा येथील नागरिकांना बोअरवेल आटल्याने पालिकेच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या गावांची लोकसंख्या साधारण पणे ७० हजारच्या आसपास आहे. त्यातच या भागात मोठ्या प्रमाणात छोटे छोटे कारखाने असल्याने त्यांची पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील गावामध्ये १०० च्यावर बोअरवेल असून त्यांनी तळ गाठल्याने ते बंद पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. या भागात कामाण नदी असून त्या नदीचे पाणी व्यवस्थित पणे अडविले जात नसल्याने ते एका बाजूला वाया जात आहे. तर दुसऱ्या बाजूला तबेल्यामुळे ही नदीही दूषित झाली आहे. येथील नागरिक पाण्यासाठी महापालिका अस्तित्वात आल्यापासून संघर्ष करत आले आहेत त्यांच्या या संघर्षाला अजून पर्यंत यश काही आले नाही. ग्रामपंचायतीच्या काळातील दोन पाणी पुरवठा योजना ही बंद पडल्या आहेत. त्यामुळे मार्च पासूनच येथील नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे. ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजने या गावाचा समावेश असून, त्या अंतर्गत याठिकाणी उंच पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. परंतु पाणी येत नसल्याने त्याही पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाण्यासाठी येथी नगरसेविका आणि नागरिक पाठपुरावा करत असून यावेळी मात्र त्यांच्या पाठपुराव्याला यश येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संधर्भात येथील नागरिकांनी आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची वस्तुस्थिती सांगितल्यावर क्षितिज ठाकूर यांनी पालिका अधिकर्त्यांशी बोलून तातडीने उद्या (मंगळवार) एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी पुरवठ्यातून पाणी मिळते कि, सूर्याचे पाणी तातडीने देण्यात येते याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागात विचारले असता पूर्वपट्टीला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यातले.

डोंबिवलीत कंपनी स्फोटाने नुकसान झालेल्या ९४१ मालमत्तांचे पंचनामे

डोंबिवली : येथील एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटामुळे नुकसान झालेल्या एक ते दोन किलोमीटर परिसरातील कंपन्या, हॉटेल्स, इमारती, घरे अशा एकूण ९४१ मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळे यांनी दिली. अनेक मृतदेहांची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या माध्यमातून बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नुमने घेऊन ते फोरेन्सिक प्रयोगशाळा आणि डीएनए चाचणीसाठी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या बेपत्ता कामगाराची अद्याप ओळख पटत नसल्याने आणि त्याचा शोध लागत नसल्याने अनेक कामगार कुटुंबीय शोकाकूल आहेत. आमच्या कामगारांचा शोध लावून द्या, असा दबाव या कुटुंबीयांकडून तपास यंत्रणांवर वाढत आहे. तज्ज्ञांचा सहभाग अमुदान स्फोट प्रकरण तपासात कोणतेही कच्चे दुवे राहू नयेत म्हणून रासायनिक तज्ज्ञ आणि कंपनीशी संबंधित इतर तज्ज्ञांचे सहभाग आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. याशिवाय फोरेन्सिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयातील अधिकारी यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. सबळ पुरावे या प्रकरणात आरोपींविरुध्द गोळा करून हे प्रकरण न्यायालयात सादर करण्यापूर्वी भक्कम केले जात आहे. कंपनी स्थळावरून विविध प्रकारचे रासायनिक आणि अन्य नमुने गोळा केले जात आहेत, असे या प्रकरणातील तपास अधिकारी उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कोळी यांनी सांगितले. या स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मलय मेहता याच्या घरातून कंपनी, उत्पादन निगडित काही महत्वाची कागदपत्रे तपास पथकाने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांचे आधारे, परवाने, नुतनीकरण आणि त्याप्रमाणे कंपनीतील उत्पादन प्रक्रिया सुरू होती का हे तपासले जाणार आहे. या कंपनीतील बाष्पकला परवानगी नसल्याचे बाष्पक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या अनुषंगाने तपास केला जाणार आहे, असे कोळी यांनी सांगितले. अमुदान आणि लगतच्या सप्तवर्ण, कॉसमॉस केमिकल कंपनीतील एकूण नऊ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. बचाव कार्य करताना कामगारांचे विविध अवशेष सापडतात. ते एकत्रित करून शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात येतात, असे पालिका अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आठ कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय स्फोटातील मृतदेहांच्या विविध अवेशषांचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कलिना येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांनी दिली. आतापर्यंत १८ विविध प्रकारचे नमुने फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जसे विविध अवयव बचाव पथकाकडून रुग्णालयात येतात. त्याप्रमाणे ते नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले जातात, असे डॉ. रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले. अमुदान कंपनी स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकूण २५ तलाठी नेमण्यात आले होते. कंपनी परिसरातील नुकसान झालेल्या मालमत्ता, आस्थापना यांचे एकूण ९४१ पंचनामे करण्यात आले आहेत. -सचिन शेजाळे, तहसीलदार, कल्याण.

ठाण्यातील घोसाळे तलाव, कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घोषित करावा – नितीन देशपांडे

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील घोसाळे तलाव हा कासव संरक्षण व संवर्धन तलाव म्हणून सुरक्षित करून, ठाणे महापालिकेने  पर्यावरण, जैवविविधता याबाबत, संपूर्ण भारतातील आगळेवेगळे स्थान निर्माण करण्याची संधी घालवू नये व ठाण्यातील नैसर्गिक जैवविविधतेची साखळी अबाधित रहाण्यास प्रयत्नपूर्वक काम करावे, अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना केली आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत, ठाणे शहरातील घोसाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम मुदत संपली तरी चालू आहे. हा तलाव ऐतिहासिक असून, ठाणे गॅझेटमधे या तलावाचा उल्लेख असून, ८२५ फूट लांब आणि ४९५ फूट रुंद असलेल्या या तलावाची  जास्तीतजास्त खोली १६ फूट आहे. या तलावात  वर्षभर पाणी असते व सिंचनासाठी यातील पाण्याचा उपयोग होत असतो. मात्र, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने, अनैसर्गिकरित्या घोसाळे तलावाचे सुशोभीकरण केल्यामुळेच, यातील कासवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असल्याने, या तलावाला कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घोषित करण्यात यावे, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २३ मे हा दिवस, ‘कासव दिन’ म्हणून भारतासह, संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून, मोठ्याप्रमाणावर कासवांची तस्करी होत असल्यामुळे, काही दुर्मिळ प्रजाती धोक्यात आल्या आहेत. निसर्ग आणि जैवविविधतेचे महत्त्व, काळाची गरज आणि पर्यावरण-साखळी अबाधित राहावी म्हणून कासव वाचविणे व संवर्धन करणे महत्त्वाचे असून, भारतीय संविधान ५१-अ (जी) नुसार नैसर्गिक जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे शासनास कटिबद्ध रहाणे बंधनकारक असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात ठामपणे नमूद केले आहे. दरम्यान, कासवांमध्ये नैसर्गिकरीत्या पाणी स्वच्छ व निर्मळ करण्याची क्षमता प्रचंड असून, भविष्यात पाणी स्वच्छ रहाण्यासाठी विजेवर चालणारी उपकरणे लावण्याची गरजही भासणार नाही. घोसाळे तलावात प्रचंड प्रमाणात कासवे असणे याचा, जैवविविधता व पर्यावरणीय संबंध आहे व त्याचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य असल्याचे, नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी आयुक्तांचे लक्ष वेधताना, देशपांडे यांनी पुढे म्हटले आहे की, तलावात केलेल्या पिचिंग कामामुळे एकाच बाजूला कासवे दिसत आहेत, याची गंभीर दखल घ्यावी. सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण कासवांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा आणत आहात, हेच यावरून स्पष्ट होत असून, संविधानानुसार ही बाब अजिबात मान्य नसल्याने, याची तत्काळ दखल घेण्यात यावी आणि सुशोभीकरण करताना, कासवांच्या व इतर जलचरांच्या संरक्षण, संवर्धनासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नेमकी काय व्यवस्था केली, याची माहिती जाहीर करावी वा तशी केली नसल्यास, तत्काळ तज्ज्ञाकडून सल्ला घेऊन अंमलात आणावी व कासवांची शिकार होऊ नये म्हणून, तत्काळ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्यासोबतच, घोसाळे तलाव हा कासव संरक्षण व संवर्धन तलाव म्हणून सुरक्षित करावा असे नितीन देशपांडे यांनी ठामपा आयुक्त सौरभ राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारायला लाज वाटते का ?

मुख्यमंत्र्यांना भेटणार-ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ ठाणे: पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी  यांचा पुतळा पुन्हा उभारायला लाज वाटते का ? असा सवाल प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी केला आहे. गडकरी पुतळ्याबाबत आपण त्वरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पुतळा उभारणीबाबत विनंती करणार आहोत असेही अशोक समेळ यांनी सांगितले. कल्याणच्या भाषाप्रभू राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार व रविवारी व्याख्यानाचे आयोजन केले होते. रविवारी नाटककार अशोक समेळ यांनी गडकरी यांच्या नाटकातील सौदर्यस्थळे या विषयावर सुमारे सव्वा तास अभिनयासह विवेचन केले. गडकरी यांच्या नाटकातील `स्वगत’ त्यांनी साभिनय सादर केले. नाटकात स्वगत हा प्रकार आता संपला आहे असे सांगतांना गडकरी यांचे नाटके कशी अजरामर आहेत याबाबत त्यांनी विविध दाखले देत प्रतिपादन केले. `भावबंधन’ पासून ते `राजसंन्यास’पर्यंत त्यांची नाटके आणि त्यांचे महत्व विशद केले. त्यांच्या नाटकातून नायिका ज्या घराघरात पोहचल्या त्या मालती, सिंधू, सुशिला, वसुंधरा इत्यांदी नायीकांची सोशिकवृत्ती ते कुलवधू मधील बंडखोर लतिकाचे वर्णन केले. शारदा या नाटकाने राम गणेश गडकरी यांना सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले. पैसे असलेल्या म्हातार्‍यांशी लहान मुलींचे लग्न लावून देण्याची त्या काळी प्रथा होती. त्यावर केलेल्या विडंबनाला तोड नाही असे सांगतांनाच त्या नाटकातील अनेक गाणी रसिक गुणगुणत असत. `म्हातारा तितुका’ हे सर्वांत लोकप्रिय गाणे होते. त्या काळातील पौराहित्य संस्कारावर आधारलेले `प्रेमसंन्यास’ आणि `दारुची संगत माणसाला संपवते त्यावरील `एकच प्याला’ नाटकाचे त्यांनी रसभरीत वर्णन केले राम गणेश गडकरी एकदा सहजच बालगंधर्वाना म्हणाले `तुला एक दिवस फाटक्या वस्त्रात आणून उभा करीन हे त्यांनी `एकच प्याला’मध्ये शब्दश: करुन दाखविले. ब्रिटीशांच्या राजवटीत `राकट देशा कणखर देशा, माझा महाराष्ट्र देशा’ हे त्यांचे स्फूर्ती गीत अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. आयुष्यभर खस्ता खाणारा हा माणूस शारीरिक व्याधींशी लढत होता. परंतु सारखे लिहित होते. त्यांना माहिती होते माझे आयुष्य एवढेच आहे. जेवढे देता येईल तेवढे मी समाजाचे देणे लागतो. या पध्दतीने त्यांनी लिखाण केले. २२ जानेवारी १९१८ रोजी रात्री झोपतांना आपल्या सेवकाला राजसंन्यासचे कागद काढून ठेव मला उद्या नाटक पूर्ण करायचे आहे. असे सांगून झोपी गेलेले राम गणेश गडकरी उठलेच नाही. त्यांचा झोपतच २३ जानेवारी १९१८ रोजी मृत्यू झाला. गडकरी यांना त्यांचा नाटकाचा आनंद कधीच घेता आला नाही. गडकरी जयंती निमित्ताने कल्याणच्या गडकरी कट्ट्यावर त्यांच्यासाठी एवढी माणसे जमतात हे ते स्वर्गातून पाहत असतील. खरं तर गडकरी कट्टा ही संकल्पनाच वेगळी आहे आणि ती राबविली गेली पाहिजे. मराठी भाषेला खर्‍या अर्थाने वैभव प्राप्त करुन देण्याचे काम राम गणेश गडकरी यांनी केले. त्याला साज बालगंधर्व, कुसुमाग्रज, कानिटकर यांनी नंतर चढविला असे सांगून पुन्हा एकदा गडकरी यांच्या पुतळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रारंभी गडकरी कट्ट्यांचे तुषार राजे यांनी प्रास्ताविक केले. २ जानेवारी २०१७ रोजी गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि २०१८ साली त्यांच्या शताब्दी महोत्सवाप्रसंगी कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्याची स्थापना करण्यात आली. गडकरी कट्ट्याने राबविलेल्या विविध उपक्रमाची  माहिती देण्यात आली. गडकरी कट्ट्याचे मेघन गुप्ते यांच्या हस्ते अशोक समेळ यांचा सत्कार करण्यात आला. सैनिकी शिक्षण आवश्यक शनिवारी सावरकर जयंती निमित्त `सैन्यांपुढील आव्हाने व `सैन्यातील संधी’ या विषयावर वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले विचार प्रगट केले. केवळ बंदूक चालविणाराच सैन्यात काम करु शकतो असे नव्हे तर सर्व कौशल्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, विविध विषयातील तज्ञांना सैन्यात काम करता येते. सैनिकाला व त्यांच्या कुटुंबाला शासन कधीच वार्‍यावर सोडत नाही. त्यामुळे आपला पहिला अग्रव्रâम हा सैन्य असायला हवा असे आवाहन केले. शनिवार दि. २५ व रविवार दि. २६ मे रोजी झालेल्या दोन दिवसाच्या जयंती महोत्सवात कल्याणकर रसिकांनी मोठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन रत्ना हिले व योगेश बुडुक यांनी केले. कार्यव्रâमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री तुषार राजे, पुरुषोत्तम फडणीस, प्रविण देशमुख, मेघन गुप्ते, प्रा. मुकुंद बापट, दिपक देशपांडे, प्रसन्न कापसे, दिपक अग्रवाल, नविन राजे, अनुश्री फडणीस इत्यांदींनी मेहनत घेतली.

अंमली पदार्थ विरोधात शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी – एम. देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली आहे. नार्को को ऑर्डीनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदी उपस्थित होते. २४ एप्रिलच्या रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एनडीपीएस अंतर्गत दाखल गुन्हे तसेच इतर प्रकरणातील प्रलंबित असणारे हद्दपारीचे गुन्हे त्यांनी मार्गी लावावेत. आप-आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्यासाठी विविध यंत्रणांचे सहकार्य घ्यावे. पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत जनजागृती करणाऱ्या छोट्या फिल्मस् बनविण्यात आल्या आहेत. त्याचा प्रसारही सर्वत्र करावा. या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार सहभागी झाले होते.