Month: May 2024

अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई

बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष ठाणे : पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर जाग आलेल्या ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित केले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांनी बेकायदा पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तसेच अशा अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला आहे. ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यापुर्वीच ठाणे पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यासंदर्भात लोक चळवळही सुरू केली. यावर अधिवेशनातही आवाज उठवला. यानंतर ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाली. पण, त्यांनतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याची बाब आमदार केळकर यांनी आयुक्त डुंबरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर अशा अवैध व्यवसायांना त्या-त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहणार असल्याचे सांगून त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. या संदर्भात ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्ध लोकचळवळ सुरू केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने काम केले, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यामुळे यावर ठोस कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. संजय केळकर (आमदार, ठाणे शहर)

रस्त्यावरील बालकांप्रती संवेदनशील व्हावे…!

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत- प्रियंक कांगजू ठाणे : स्त्यावरील बालकांच्या समस्येबाबत समाजाने संवेदनशील होणे आवश्यक असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न समाजातील सर्व घटकांकडून होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात श्री.कांगजू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बाल हक्क संरक्षण विषयाबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, एनसीपीसीआर, नवी दिल्ली च्या मेजर श्रीमती रुपाली बॅनर्जी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जे.जे.बी. मेंबर, ठाणे स्वाती रणदिवे, कामगार उपायुक्त ठाणे लक्ष्मण सावंत, महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती चारुशिला खरपडे, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, ठाणे मनपा चे दशरथ  वाघमारे, सहयोग ट्रस्ट अध्यक्ष विश्वकांत लोकरे, फिरते पथक अल्ताफ काजमी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या तेजश्री शिंदे, महिला व बाल कल्याण विकास प्रतिनिधी जि.प.ज्योती प्रकाश महाडीक आदि मान्यवर उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांच्या समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, वर्ष 2016 पासून या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली, राज्य शासन आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकत्रित समन्वयातून मार्गदर्शक कार्यपद्धती आखण्यात आली आहे. फक्त एका मुलाचे पुनर्वसन हा या समस्येवरील परिणामकारक उपाय नसून त्या मुलासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे शाश्वत पुनर्वसन गरजेचे आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांची आर्थिक क्षमता वाढविणे आवश्यक असून या मुलांना शाळेत भरती करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व समस्यांवर “सहकारी तत्त्वावरील निवारागृहे” हा एक परिणामकारक उपाय होवू शकतो, असेही त्यांनी सुचविले. याबाबत भोपाळ येथील प्रकल्पाचे त्यांनी उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांसह या प्रकल्पास भेट देवून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करावा आणि ठाणे जिल्ह्यातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारावा, असेही श्री. कांगजू यांनी सुचविले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.महेंद्र गायकवाड यांनी महिला व बाल विकास विभागाने बाल हक्क संरक्षण संदर्भात केलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष महोदयांना दिली. त्याबद्दल श्री.कांगजू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व महिला बालविकास विभागाने केलेल्या कामांचे विशेष कौतुकही केले. शेवटी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांच्या ठराविक वाणांचा आग्रह धरु नये-कृषी संचालक विकास पाटील

ठाणे : महाराष्ट्र कापूस बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापसाच्या विशिष्ट वाणांसाठी आग्रह धरु नये, असे आवाहन कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्यात कापूस पीक क्षेत्र 40.20 लाख हेक्टर आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टर 4.2 पाकिटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्रासाठी 1 कोटी 70  लाख पाकिटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता, साधारपणे 1.75 कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कापूस बियाण्याची कमतरता नाही. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याबरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुद्धा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करू नये, याबाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने खरीप 2024 साठी कापूस BG II चा दर 864 रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांच्यामार्फत आदेश देण्‍यात आलेले आहेत. तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषी विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण एच.टी. बीटी कापूस बियाणेबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी कारवाई करण्यात आल्या. त्यामध्ये 4568.30 किलो (एकूण किमत 66.85 लाख) बियाणे साठा जप्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात 30 क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणच्या कारवाईत 1807 एच.टी.बीटी कापूस बियाणे पाकिटे (37.96 लाख किमतीचे) साठा जप्त करण्यात आला. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तीन ठिकाणी 113 बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून त्याची किमत 1.55 लाख रुपये आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकामार्फत मोहिम स्वरुपात तपासणी करण्यात आली असून त्याअनुषंगाने दोषींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठ व गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी कळविली आहे.

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी- अशोक शिनगारे

ठाणे : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनसाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हीआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वासाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल. तसेच वरिष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.आरोग्य  विभागाच्या  मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन  करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे. उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार ठाणे जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

विविध प्राधिकरणांनी पावसाळा कालावधीत समन्वयाने काम करा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे कार्यरत असून या सर्वांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेसह इतर सर्व प्राधिकरणांनी पावसाळ्यात सतर्क रहावे असे निर्देशित केले. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी समितीच्या विशेष बैठकीत सर्व प्राधिकरणांच्या उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी केलेल्या पावसाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगाही काढला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत तायडे तसेच विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता हे प्रत्यक्ष विशेष समिती सभागृहात तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, मोबाईल प्रोव्हायडर, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि मोठ्या उधाण भरतीची वेळ जुळून आल्यास काही सखल भागात पाणी साचते. अशा साधारणत: १४ ठिकाणांची माहिती असून त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची आवश्यक त्या प्रमाणात आत्ताच तजवीज करून ठेवण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. यावर्षी साधारणत: १० जून पासून पावसाला सुरूवात होईल असा हवामान खात्याचा अंदाज असून अंतिम टप्प्यात असलेली नालेसफाईची कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश देण्यात आले. विशेषत्वाने एमीएमसी मार्केटमधील नाले व गटारे सफाईची कामे तत्परतेने पूर्ण करून घ्यावीत अशा सूचना करण्यात आल्या. पावसाळा कालावधीत भाजीपाला, फळे यांच्या कच-याची योग्य रितीने विल्हेवाट लागेल याची विशेष काळजी घ्यावी व पदपथावर विक्रीस परवानगी देऊ नये असे निर्देशित करण्यात आले. रेल्वे प्लॅटफॉर्म, रूळ तसेच रूळांच्या बाजूला असलेले नाले यांची सफाई लगेचच पूर्ण करावी त्याचप्रमाणे रेल्वेचे अंडरपास व सबवेही स्वच्छ करून घ्यावेत तसेच रेल्वेची उद्घोषणा प्रणाली तपासून घ्यावी अशा सूचना सिडको आणि रेल्वे प्रशासनास करण्यात आल्या. रेल्वे हद्दीत लागलेल्या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण तातडीने करून घ्यावे असे सूचित करतानाच होर्डींगला स्थानिक नियोजन प्राधिकरणाची परवानगी घ्यायला हवी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.एमआयडीसी क्षेत्रातील नालेसफाईवर संबंधित विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष द्यावे व ती पूर्ण करून घ्यावी असे निर्देशित करण्यासोबतच आयुक्तांनी एमआयडीसी क्षेत्रात रस्त्याच्या कडेला पडलेले डेब्रीज ड्रेनेजमध्ये येऊन पाणी तुंबण्याची घटना घडणार नाही याकडे प्राधिकरणाने लक्ष द्यावे असे सूचित केले. नवी मुंबईतील डेब्रीज पडण्याच्या संभाव्य स्थळांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी पोलीस विभाग तसेच वाहतुक पोलीस विभाग यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वाहतुक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेणेबाबत आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास सूचना केल्या. कालच दिघा व ऐरोली विभागातील नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिलेल्या सूचनांची सर्वच विभाग अधिकारी यांनी अंमलबजावणी करावी व तातडीने नालेसफाई पूर्ण करून घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी देत प्रत्येक ठिकाणी विभाग अधिकारी यांनी स्वत: भेट देत प्रत्यक्ष पाहणी करावी व काम झाल्याची खातरजमा करून घ्यावी असे निर्देश दिले. या सर्व कामांवर त्रयस्थ परीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या अधिका-यांसोबत ३ अधिकारी, कर्मचारी देऊन या पथकाने नेमून दिलेल्या विभागातील नाले व गटार सफाई, स्वच्छता, रस्त्यांची स्थिती अशा बाबींची काटेकोर तपासणी करून कामे व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी आणि तशा प्रकारचा अहवाल द्यावा असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणे असून त्यांनी परस्पर समन्वय राखून पावसाळा कालावधीत काम करावे व महानगरपालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्राशी संपर्कात राहून काम करावे अशा सूचना नमुंमपा आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी देत नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी २७५६७०६० / २७५६७०६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

ठाण्यात पाणी कपातीचा धोका लांबला

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागात शुक्रवारी २४ तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार होता. परंतू, काही अपरिहार्य कारणांमुळे दुरुस्तीचे हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली. एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून २४ तासासाठी बंद राहणार होता. या कालावधीत महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ व ३१ येथील काही भाग वगळता ), कळवा, वागळे इस्टेट, रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक दोन, नेहरुनगर तसेच कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर, पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. परंतु, दुरुस्तीचे काम काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.

त्यांची नार्को टेस्ट करून कॉल डिटेल्स चेक करा – उमेश पाटील

अंजली दमानिया यांचा ‘बोलविता धनी’ कोण आहे हे समजण्यासाठी मुंबई : अंजली दमानिया या सुपारी घेऊन आमचे नेते अजितदादा पवार यांच्यामागे लागल्या असून त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे समजण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करून कॉल डिटेल्स चेक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सरकारकडे पत्रकार परिषदेत केली. पुणे कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजितदादा पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती यावर बोलताना उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे यात वादच नाही. या घटनेने सर्वांचे मन हेलावून सोडले आहे. या घटनेची योग्य पध्दतीने कारवाई होताना आपण पहात आहोत. या घटनेतील अपराध्यांना मदत करणार्‍या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणात मुलाला, वडिलांना आणि आजोबांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणात जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना सुपारी घेऊन टार्गेट करण्याचा उद्योग काही लोकांनी चालवला आहे अशी जोरदार टीका उमेश पाटील यांनी केली. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने अजितदादा पवार मंत्रालयात बैठक घेत होते तर काही लोक जम्मू – काश्मीरमध्ये श्रमपरिहार करण्यासाठी गेले आहेत. मतदान संपताच दुसर्‍या दिवशी अजितदादा पवार मंत्रालयात येऊन काम करत होते. मात्र अंजली दमानिया अजितदादा कामाचा आव आणतात असे बोलत आहेत. अहो, तुमच्यासारखा समाजसेवेचा आव आणत नाहीत. ३५ वर्षे झाली हा महाराष्ट्र पहातोय अजितदादा पवार सकाळी सहा वाजता उठून लोकांच्या कामांसाठी उपलब्ध असतात म्हणूनच लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात. तुम्हाला कुणी निवडून दिले आहे का? तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कधी निवडून आला आहात का? एखादी निवडणूक लढवून लोक किती तुमच्या पाठीशी आहेत हे तपासून का घेत नाही असे अनेक सवाल उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांना केले. अजितदादा पवार यांच्यावर आरोप करणार्‍या अंजली दमानिया यांच्याकडे पुरावे आहेत का? पुण्याच्या कमिशनरला पालकमंत्री म्हणून त्यांनी विचारणा करायची नाही का? की अजितदादांनी अंजली दमानिया यांना विचारुन कॉल करायचा होता? तुमच्यासारख्या मिडियासॅव्ही असलेल्या व्यक्तीला ती गरज आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला मिडिया आहे की नाही याच्याशी घेणेदेणे नसते असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले. अंजली दमानिया राज्यात ज्या अनेक घटना घडल्या त्या घटनांबद्दल खरंच संवेदनशील आहेत का? की फक्त पुणे घटनेवर त्यांनी कुणाची सुपारी घेतली आहे हे जाहीर करावे असे स्पष्ट आव्हान उमेश पाटील यांनी दिले. मनुस्मृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला मान्य नाही. परंतु ज्या पद्धतीची नौटंकी जितेंद्र आव्हाड करत आहेत. त्यांचा मनाचे श्लोक, भगवद्गीता यापैकी नेमका कशाला विरोध आहे. मनुस्मृतीला की, भगवद्गीतेला विरोध आहे की, समर्थ रामदासांना विरोध आहे. जितेंद्र आव्हाड यांचा समर्थ रामदासांना विरोध आहे असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला. शालेय शिक्षणात मुल्यशिक्षणाला महत्व आहे. मुल्यशिक्षणाचे गांभीर्य पुण्यातील दुर्घटनेवरुन लक्षात येते.भगवद्गीतेचा समावेश शालेय शिक्षणात आला तर जितेंद्र आव्हाड यांना काय आक्षेप आहे. मनाच्या श्लोकातून मुलांवर संस्कार होणार असतील तर त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप आहे का? चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ती मनुस्मृतीमध्ये स्वीकारली गेली त्याला विरोध असणे समजू शकतो त्याला आमचाही विरोध आहे. आमचे सरकार असेपर्यंत ते कुठल्याही अभ्यासक्रमात समाविष्ट करु दिले जाणार नाही असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारकडून सूचना आणि हरकती मागविल्या गेल्या आहेत. एखादा निर्णय थेट होत नाही. याबाबत जितेंद्र आव्हाड आपण सरकारला पत्र लिहिले आहे का? की फक्त स्टंटबाजी करण्यासाठी मनुस्मृती जाळण्याचा उद्योग तुम्ही करत आहात. मनुस्मृती जाळली म्हणून तुम्ही पुरोगामी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा  मनापासून आत्मसात आहे त्याला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

अंजुरच्या संस्कार इंग्लिश स्कूलचा सलग नवव्यांदा १०० टक्के निकाल

सिद्धी माळी ९१ टक्के गुणांसह प्रथम भिवंडी : ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळाच्या अंजुर येथील संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलने सलग नवव्यांदा १०० टक्के निकालाची अखंड परंपरा कायम ठेवली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत सिद्धी माळी ही ९१ टक्के गुणांसह प्रथम आली असून, संस्थेचे अध्यक्ष राम माळी व सचिव दीपक म्हणेरा यांनी अभिनंदन केले आहे. अंजूर, भरोडी, अलिमघर, सुरई, सारंगगाव, वेहेळे, भाटाणे, माणकोली, अंजुरदिवे या ९ गावातील तरुणांनी एकत्र येऊन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली होती. या शाळेत अल्प शुल्कामध्ये इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाते. या शाळेत १४०० विद्यार्थी असून, शाळेचा स्थापनेपासून दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागत आहे. यंदाच्या परीक्षेत ह्रदेश वर्मा याने ९० टक्के, एलिना पाटील हिने ८९ टक्के, आर्यन पाटील याने ८८.२० टक्के, राणी भोईर हिने ८८ टक्के गुण मिळविले. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे.

एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्‍या बापाला अडचणीत आणले – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : किरण शिखरे यांच्यावर दबाव दडपशाही वापरायची गरजही नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. कळवा मुंब्र्यात २०१४ व २०१९ पेक्षा २०२४ ला सर्वाधिक मतदान झाले आहे. यामुळे आव्हाड यांचा दावा चुकीचा. आव्हाड यांनी एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्‍या बापाला अडचणीत आणले. आभाराचे ट्विट करणाऱ्या छगन भुजबळसाहेबांनाच आव्हाड गद्दार म्हणाले होते. सरड्यापेक्षाही रंग बदलणारे आव्हाड आहेत, अशी सणसणीत आरोप माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत, धीरज शर्मा यांच्याबरोबर किरण शिखरे हेएकटे आले होते आणि एकटेच परत गेले आहेत.दिल्या घरी तु सुखी रहा अशा शुभेच्छा देऊन यापेक्षा अधिकचे महत्व त्यांना देण्याची गरज नाही.२ जुलै २०२३ रोजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांनी वेगळा राजकीय निर्णय घेतला त्यांच्याबरोबर तेव्हा मी पहिला जिल्हाध्यक्ष होतो जो २ जुलैलाच देवगिरीवर गेलो होतो आणि ठाण्यातील ९५ टक्के कार्यकर्ते हे अजितदादांबरोबर आले. महाराष्ट्रातील ठाण्याचे आमचे पहिले कार्यालय होते ज्याचे उद्घाटन ९ ऑगस्टला अजितदादांच्या हस्ते झाले होते. आमच्यावर तर कधी कोणी दबाव आणला नाही. जगातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या फक्त कळवा मुंब्र्यातच होतात अशाप्रकारचे चित्र भासविण्याची कायम जितेंद्र आव्हाड यांना सवय आहे. यामुळेच आजकाल मी त्यांना रिसर्चचे डाॅक्टर झालेले न म्हणता, नौटंकीकार, नकलाकार, नाटककार असे म्हणतो. लोकसभेचे २० मे ला मतदान झाल्यानंतर असा काही त्यांनी प्रचार केला की कळवा मुंब्राकडे मुद्दामहून मतदानाचा स्पीड कमी करण्यात आला होता. कळवा मुंब्र्यातील मतदानाची आकडेवारी पाहता, २०१४ व २०१९ पेक्षा २०२४ ला सर्वाधिक म्हणजे २ लाख १६ हजार मतदान झाले आहे. मतदानासाठी मुंबई ठाण्यातही रांगा लागल्या होत्या व पिण्याची पाण्याची, पंख्याचा आदी सोईसुविधा जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून केली गेली नसल्याने मतदारांची गैरसोयहो झाली होती, ही वास्तविकता आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी फक्त कळवा मुंब्र्यात कमी झाली हे आव्हाड यांचे म्हणणे आकडेवारीच खोडून काढते आहे. जे जितेंद्र आव्हाड यांनी कृत्य केले, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर येथे फाडले याच्यावर शासनाने कारवाई केलेली आहे, महाड येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत, याबद्दल  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांचे मनापासूनआभार व्यक्त करतो मला फासावर लटकवा असा ड्रामा आता त्यांनी केला. माझी त्यांना विनंती आहे की बस्स झाले, चुकून झाले, अनवधानाने झाले हे कुठलेच शब्द त्यांनी वापरणे त्यांनी बंद करावे. अशाच प्रकारचे त्यांनी शिर्डीच्या अधिवेशनात बोलताना भगवान श्रीरामाबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. आणि पक्षाला अडचणीत आणले होते. त्यानंतर धनगर समाजाचे दैवत मल्हाररव होळकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. याबद्दल त्यांना धनगर समाजाची माफी मागावी लागली होती. औरंगजेबाने हिंदू देवदेवतांची मंदिरेही तोडली… असे बोलून ते वाक्य कट करुन पुन्हा बाईट दिल्याचे लोकांनी पाहिले. काल मनुस्मृती जाळण्यासाठी आव्हाड महाड येथे गेले होते त्या पोस्टरवर परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता ते पोस्टर फाडले आणि पायाशी फेकले हे आख्या जगाने बघितले, त्यांच्या एका सहका-याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला शेवटी कपाळावर हात मारला तरीही त्यांनी व त्यांच्या आजुबाजुच्या सहका-यांनी तरीही पोस्टर फाडले त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. माझी पोलीसांना विनंती आहे की कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, वंचित आघाडी, आरपीआय, शिवसेना यांनी आव्हाड यांच्या निंदनीय प्रकाराबद्दल त्यांचा निषेध करत आहेत. सर्वांची मागणी हीच आहे की यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.बाबासाहेब यांचे जे पोस्टर आव्हाड यांनी फाडले ते डिझाईन त्यांच्या कार्यालयात झाले होते, सोशल मिडियाचा कार्याध्यक्ष असलेल्या मोहसिन शेख याने ते डिझाईन केले होते. पोस्टर चे डिझाईन बघितले गेले असेल, कोणी डिझाईन केले,कुठून प्रिंट झाले, कोणाच्या गाडीतून ते त्या स्थानापर्यत नेण्यात आले याची सर्वांची चौकशी करण्यात यावी. भाषणात म्हणायचे परमपूज्य, बोधिसत्व, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर हा माझा बाप आहे.आणि त्या बापाचेच पोस्टर त्यांनी फाडले, ज्यांना ते आपल्या विचारांचे वारसदार समजतात ते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब ज्यांना ते बाप संबोधतात त्या बापाला अडचणीत आणले. म्हणजे एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्‍या बापाला अडचणीत आणले. राष्ट्रवादीचे जयंत पाटीलसाहेबांनी शेवटी ट्विट करुन त्यांची बाजू मांडून सावरायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब यांनी ही भूमिका मांडली आहै की, याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे, कायदेशीर कारवाई झालेली आहे. मुळ मुद्दा आहे की, मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात येता कामा नयेत ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे समर्थन करीत नाही, त्याचा विरोधच करीत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांनी देखील स्पष्ट केलेले आहे की, कुठल्याही प्रकारे मनुस्मृतीमधील श्लोक हे पाठ्यक्रमात येणार नाहीत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण केवळ स्टंट करायचा आव्हाड यांनी प्रयत्न केला आणि यात परमपूज्य बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी अवमान केला.टीआरपीसाठी कुठल्या लेव्हलला जावू शकतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेले आहे. ही देखील आठवण करुन देतो की, २८ ऑगस्ट २०२३ रोजी छगन भुजबळसाहेब यांचा आव्हाड यांनी पुतळा जाळला होतात,त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता आणि हे आंदोलन तुमच्या पक्षकार्यालयाबाहेर तुम्ही केले होते आणि या आनंद परांजपे यांनी त्याच जुन्या पक्ष कार्यालयाबाहेर तुमचा पुतळा जाळला होता. त्यामुळे सरडा देखील रंग बदलत नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग जितेंद्र आव्हाड बदलणारे आपण. ज्या आभाराचे ट्विट छगन भुजबळसाहेबांच्या नावे केले आहे हे तुमचे रंग बदलणे दाखवते, असा थेट आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.

मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीचा वापर

ठाणे : सरकारी कार्यालयात फाईल्स, लेटर पॅड सारख्या स्टेशनरी साठी मोठा खर्च असला, तरी ठाणे मनोरुग्णालयात स्टेशनरी खर्चात बचत करण्यासाठी मनोरुग्णांचा हातभार लागतो आहे. मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. बुध्दीला चालना देताना व्यवसाय उपचाराचा उपयोग केला असून, मनोरुग्णांना स्टेशनरी तयार करण्याचे धडे दिल्यामुळे आता रुग्णालयासाठी लागणाऱ्या फाईल्स, डिस्चार्ज कार्ड व खावटी खर्च कार्ड  सारख्या गोष्टी रुग्णालय कामकाजासाठी उपयोगी पडत आहेत. ठाणे मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं…  मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. परंतु उपचारासोबत रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्न ही केला जातो आहे. मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जातात. व्यवसाय उपचार पद्धतीच्या सहाय्याने मानसिक आजारपणामुळे कमी झालेल्या शारीरिक व बौद्धिक कौशल्यांवर भर देऊन मानसिक आरोग्य सुधारवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील पुरुष व्यवसाय उपचार विभागात  स्टेशनरी साहित्या बरोबर पेंटिंग, शिवणकाम सारखे शिक्षण दिले जात असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. पायल सुरपाम यांनी दिली. रुग्णांनी तयार केलेल्या अनेक वस्तू ठाणेकरांच्या पसंतीला उतरताना दिसतात. सण  उत्सवाच्या काळात लागणाऱ्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण मनोरुग्णांना दिलं जात आहे. तर वर्षभर रुग्णालयासाठी लागणाऱ्या फाईलस, रुग्णालयात लागणारे डिस्चार्ज कार्ड व खावटी खर्च कार्ड बनवत आहेत. स्टेशनरी तयार करण्यासाठी कच्च साहित्य आणून दिलं जात,  त्यानंतर रुग्ण स्टेशनरी बनवत असल्याचे व्यवसाय उपचार तज्ञ  डॉ.प्रियतम दंडवते म्हणाले रुग्णालयात दर महिना पाचशे ते सहाशे फाईलस व तीनशे ते चारशे डिस्चार्ज कार्ड बनवले जातात या साहित्याचा उपयोग रुग्णालयीन तसेच कार्यालयीन कामकाजात केला जातो. यामुळे रुग्णालयावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते व रुग्णांच्या पुनर्वसनास मदत होते. डॉ.अश्लेषा कोळी (व्यवसाय उपचार तज्ञ) मनोरुग्ण लवकर बरा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न असतात. व्यवसाय उपचार थेरपीने रुग्णाची हात डोळे आणि मेंदू यांची सुसूत्रता, आकलन क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. डॉ. नेताजी  मुळीक     (वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णलय ठाणे)