Month: May 2024

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे २०२४ रोजी लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, डॉ. सी. जी. देसाई मार्ग, मनमाला मंदिरासमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०००१६ येथे मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून स्पर्धेची नावे ९ मे २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, मुंबई – ४०० ०१६ येथे क्लब मार्फत स्वीकारण्यात येतील.

रिक्षा-टॅक्सीच्या उत्पन्नात तापमानवाढीमुळे घट

उन्हामुळे मुंबईकरांचे त्रस्तीचे जीवन मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये मुंबईकर घराबाहेर पडायचं टाळत आहेत. अशा कडक उन्हातदेखील वाहतूक पोलिस, रिक्षा-टॅक्सी चालक, पोस्टमन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात उन्हामुळे रिक्षा, टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे रिक्षा, टॅक्सीचालकांनी सांगितले. मुंबईतील दादर, सीएसएमटी, भायखळा, सायन, चेंबूर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.  यंदा उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त होत आहेत. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिस चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये शहरातील चौकात उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काही काळ विसावा घ्यायचा झाल्यास त्यांना उड्डाणपूल किंवा जवळच्या झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. उन्हामुळे रिक्षाचालकांचे खूप हाल होत आहेत. रिक्षाचे छत तीव्र उन्हामुळे तापत आहे. अशात वाढत्या तामपानामुळे शहरातील ६० रिक्षा रस्त्यावर असून ४० टक्के रिक्षाचालक गावी गेले आहेत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले. सध्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. तापमान असह्य झाल्यामुळे झाडाखाली रिक्षा, टॅक्सी उभी करून चालक विसावा घेत आहेत. तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, वाद होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक दारू, गांजा, गुटखा आदी साहित्य पुरवीत असल्याचे उघड झाले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण नातेवाईकांच्या अंगझडतीत दारू, गांजा, गुटका सापडल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे यांनी दिली आहे. उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची परिस्थिती मध्यवर्ती रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या भिंती व स्वच्छतागृह गुटक्याच्या फिचकाऱ्याने रंगल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची रुग्णालय प्रवेशद्वारवर अंगझडती घेण्याचे आदेश दिले. या अंगझडतीत रुग्णांच्या नातेवाईकडे दारू, गांजा, गुटखा, तंबाखू आदी पदार्थ सापडत असल्याचे उघड झाले. काही रुग्णाच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून आणलेल्या दारूच्या बॉटल रुग्णालय सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याने, एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र याला काही रुग्णांचे नातेवाईक छेद देत असल्याचे डॉ मनोहर बनसोडे म्हणाले. रविवारी रात्री असाच प्रकार उघड झाला असून रुग्णांच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून ठेवण्यात आलेल्या दारूच्या बॉटल सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. यापुढे रुग्णांच्या नातेवाईकसह संबंधितांवर कारवाईचे संकेत रुग्णालय प्रशासन यांनी दिले आहे. थेट रुग्णालयात नशेली प्रदार्थाची विक्री रुग्णांना होत असल्याने, मध्यवर्ती रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे.

विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

१० जूनला होणार मतदान अशोक गायकवाड मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

गारगाई प्रकल्पाला येणार वेग

मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबई : मुंबईची तहान भागविणा-ऱ्या गारगाई प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पाला आवश्यक असलेली परवानगी मिळाल्याने बहुतांशी पेच सुटणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला ४०० दशलक्ष लिटर जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या प्रकल्पाची मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते आहे. सध्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासते आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्यातील असलेली तूट भरून काढण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता सरकारची आवश्यक परवानगी तसेच बाधित होणारी शेतजमीन, येथील चार गावातील रहिवाशांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचा आता वेग येणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा वाढवण्यासाठी राज्य सरकारने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. मात्र मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला. मात्र पालिकेने आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोर्‍याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, यासाठी येथील झाडे हटवावी लागणार आहेत. प्रकल्पात पर्यावरणाच्या अडचणी दूर करण्यासाठीही अभ्यास केला जाणार आहे. यावर अभ्यास करून उपाययोजनाही सूचवणार असल्याचे सांगण्यात आले. पुनरावलोकन होणार मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याने होणारे फायदे, पर्यावरण रक्षणासाठी अतिरिक्त उपाय सुचवणे, प्रकल्पामुळे किती झाडे बाधित होतील, झाडे कापल्यास पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार, बुडित क्षेत्रावर होणारे परिणाम, उपाय य़ाबाबींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. अभ्यासानंतर अहवालातील शिफारशींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

उथळसर प्रभाग समिती कार्यालयात स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृती

ठाणे :  मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन स्वीप पथकाकडून उथळसर प्रभागसमिती कार्यालयात करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच उथळसर प्रभाग समिती कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला.  या  वेळी प्रभाग समिती कार्यालयात ५० हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले.

पथनाट्यांव्दारे निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गायकवाड नवी मुंबई : जनजागृतीच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हे अत्यंत प्रभावी माध्यम असून २० मे रोजी होणा-या २५ ठाणे लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमध्ये पथनाट्याचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. या पथनाट्यांतील कलावंत समुह महापालिका क्षेत्रात संध्याकाळच्या सत्रात गर्दीच्या ठिकाणी जाऊन चौकाचौकात लोकशाहीचा जागर करीत निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मनोरंजक पध्दतीने सादर होणारी ही पथनाट्ये मतदान करण्याचे महत्व हसतखेळत पटवून देत आहेत. हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी मिळून साजरा करावयाचा असून मतदान करून आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे हे लोकांना पथनाट्याव्दारे पटवून दिले जात आहे. वाशी विभागात रेल्वे स्टेशन परिसर, मिनी सी शोअर सेक्टर ९, सेक्टर ९ मार्केट, सेक्टर १५ मार्केट, सेक्टर १० चौक तसेच नेरूळ विभागात रेल्वे स्टेशन पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू, सेक्टर १० पूर्व, नेरूळ गाव, नेरूळ सेक्टर २० चौक अशा विविध ठिकाणी झालेली पथनाट्ये बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पथनाट्ये सादर केल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांची दाद देत कलावंतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित प्रेक्षक नागरिकांनी डाव्या हाताची तर्जनी उंचावत सामुहिक सेल्फी काढून आपण मतदान करणार असल्याचे दर्शविले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर करून मतदार जनजागृती केली जात असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक उपआयुक्त शरद पवार यांनी दिली आहे.

विविध चाळी व सोसायट्यांमध्ये गृहभेटीद्वारे मतदान जनजागृती

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24- कल्याण लोकसभा मतदारसंघातील स्वीप पथकाने 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध चाळी व सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती केली व नागरिकांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदारसंघात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही गृहभेटीद्वारे जनजागृती कार्यक्रम पार पाडला. यावेळी या पथकांनी  कैलास नगर, शंकर पावशे रोड, काटेमानेवाली  परिसरातील मॉर्डन गृहनिर्माण सोसायटी, ज्ञानदिप गृहनिर्माण सोसायटी, जय अंबे कॉलनी, जय माँ दुर्गा कॉलनी, जय महालक्ष्मी सोसायटी, एल.डी. गायकवाड चाळ, महालक्ष्मी सोसायटी, जय बजरंग चाळ, न्यू अनमोल सोसायटी, मयुर सोसायटी , न्यु शबरी सोसायटी, श्री निवास कॉलनी या ठिकाणी घरोघरी जाऊन मतदान जनजागृतीचा कार्यक्रम करुन मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. त्याचप्रमाणे या ठिकाणी निवडणुकीविषयी पत्रके वाटण्यात आली. तसेच सदर परिसरातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. या परिसरात लाऊड स्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून  त्यांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, भारती डगळे उपस्थित होते.

मतदात्यांसाठी मतदान केंद्रावर ‘थंडा थंडा कूल कूल’ची व्यवस्था!

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदात्यांसाठी यंदा मतदान केंद्रावर थंडा थंडा कूल कूल अशीच काहीशी व्यवस्था असणार आहे. तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर अक्षरश: घामाघूम होत असून त्याचा मतदानावर परिणाम…

२३ वर्षांच्या पाणी टंचाईच्या संघर्षाला ठाण्यातील गृहसंस्थेने दिली मात

पाण्याच्या साठवणूकीचे केले यशस्वी नियोजन ठाणे : गेली अनेक वर्ष लोकमान्य नगर येथील लक्ष्मी पार्क गृहसंकुलातील फेज एक मधील सप्रेम या इमारतीतील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. पाण्याच्या समस्येमुळे रहिवाशी हैराण झाले होते. अखेर गृहसंस्थेतील सभासद आणि सदस्यांनी एक बैठक घेतली आणि उपाययोजना करण्यासाठी विविध कल्पना सूचविल्या. पावसाच्या पाण्याची आणि वातानूकुलीत (एसी) यंत्रांतून निघणारे पाणी साठवून या रहिवाशांनी गृहसंस्थांना वेगळा आदर्श घालून दिला आहे. लोकमान्य नगर येथे लक्ष्मी पार्क गृहनिर्माण संस्था आहे. या गृहसंस्थेत फेज एक मध्ये सप्रेम को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी ही सात मजली इमारत आहे. इमारतीमध्ये ६४ सदनिका आहेत. १९९७ मध्ये या इमारतीची नोंदणी झाली आहे. ठाणे महापालिके मार्फत या इमारतीला पाणी पुरवठा होतो. परंतु पाण्याच्या वेळा ठराविक असल्याने रहिवाशी हैराण झाले होते. अनेकदा एक – दोन दिवस पाणी आले नाही, तर नागरिकांचे हाल होत असे. उन्हाळ्यात दररोज दोन टँकर मागविण्याची वेळ रहिवाशांवर येत होती. त्यामुळे पाण्याचे देयकही वाढत होते. २०१९ मध्ये गृहसंकुलातील सदस्यांनी येथील स्थानिक माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या मदतीने बोअरवेल खणली. येथे ३५० फूट खोलावर पाणी लागले. परंतु हे पाणी किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे इमारतीतील संस्थेचे पदाधिकारी अविनाश शालीग्राम, किशोर नायर, सुरेश कदम, अरुण देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत पावसाचे पाणी साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारतीच्या गच्चीवर शेड बांधण्यात आले होते. पावसाचे पाणी शेडमधून गटारात जात होते. त्यामुळे हे पाणी त्यांनी एका जल वाहिनीच्या मदतीने बोअरिंग टाकीमध्ये टाकले. त्यामुळे दोन वर्षांत पावसाच्या पाण्याची मोठ्याप्रमाणात साठवणूक झाली आहे. हे पाणी आता वापरासाठी २४ तास उपलब्ध होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सभासदांनी दोन महिन्यांपूर्वी आणखी एक प्रयोग केला. इमारतीतील अनेक रहिवाशांकडे वातानुकूलीत यंत्रणा आहे. वातानुकूलीत यंत्रामधून पाणी बाहेर फेकले जाते. त्यामुळे या यंत्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर व्हावा यासाठी सर्व वातानुकूलीत यंत्रांचे पाणी वाहून नेणारी एक वाहिनी जोडण्यात आली. या पाण्याचा वापर वाहने धुणे, रोपांना पाणी घालणे यासाठी केला जात आहे. पिण्याचा पाण्याचा सर्वाधिक वापर स्वच्छतागृहात होत होता. महापालिकेकडून येणारे पाणी ठराविक वेळेत येत होते. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. आम्ही सर्व सभासद आणि सदस्यांनी पाण्याची साठवणूक कशी करता येईल याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. आता २४ तास पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.