मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. मात्र फडणवीस यांचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं सांगत त्यांनी सरकारमध्ये राहून पक्षसंघटनेला बळकटी द्यावी, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.
“देवेंद्रजींनी सरकारमधून बाहेर पडून पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. परंतु, आम्ही त्यांना विनंती केली आहे की, त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटना आणखी मजबूत करावी. आम्हाला खात्री आहे की ते त्यांचा मनोदय मागे घेतील. केंद्रीय नेतृत्व त्यांची ही विनंती मान्य करणार नाही,” अशी आशा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
