उपमुख्यमंत्री फडणवीसांची राजीनाम्याची तयारी
“मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, पक्षाला विनंती आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळे करावे जेणेकरून विधानसभेसाठी पक्षात पुर्णवेळ काम करता येईल ”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागल्यानंतर आता एकामागोमाग एक राजकीय भूकंप होऊ लागले आहेत. निकालानंतर महाविकास आघाडीत भूकंप होईल असे भाकीत केले जात असतानाच या राजकीय भूकंपाचे केंद्र मात्र सरकले असून आता भाजपाप्रणित महायुतीत एकामागोमाग एक राजकीय भूकंप होऊ लागले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या राज्यातील दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तर दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार प्रविण पोटे यांनी अमरावातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर रामेटेकची भाजपा कार्यकारीणीही बरखास्त करण्यात आली.
गेल्या निवडणूकीत उद्धव ठाकरे सोबत असताना भाजपाने २३ आणि ठाकरे असलेल्या शिवसेनेने १८ असे राज्यात ४८ पैकी एकुण ४१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या या लोकसभा निवडणूकीत भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लडवली . त्यात भाजपाला फक्त ९ जागा जिंकता आल्या. एकुण १४ जागांचा फटका भाजपाला बसला. देशात भाजपालाही त्याची किंमत मोजावी लागली. भाजपाला देशात २४० जागा मिळाल्याने स्वबळावर सत्ता आणता आलेली नाही. महाराष्ट्रातील या गेल्यावेळीच्या ४१ जागा निर्णायक ठरल्या असत्या.
या पार्श्वभुमीवर मुंबईतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधला. मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आरक्षण दिल्यानंतरही एक नरेटिव्ह करण्यात आला. त्यावर आम्ही प्रभावी उत्तर देऊ शकलो नाही. अनेक ठिकाणी त्याचा परिणाम झाला. मराठवाड्यात विशेष फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याचा परिणाम झाला. उमेदवाराबाबतची नाराजी असेल, ती सुरुवातीला लक्षात आली नाही. मात्र, त्यानंतर ती हळूहळू लक्षात आली. त्यात आता पुढे सुधारणा करण्यात येईल. आम्ही जे प्रभावी काम केले आहे, ते पुढे नेण्याचे काम करू. प्रयत्न अधिक वाढवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ. समन्वयाचे काही विषय असतील, त्यावर चर्चा करू. एकूणच या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रचंड मेहनत केली. प्रचंड फिरले. तळागाळापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम, संघटित करण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी केले. मुंबई अध्यक्षांनीही पक्ष सक्रीय ठेवला. कितीही आकडेवारी मांडली तरी जागा कमी आल्या ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. या निवडणुकीचे नेतृत्व भाजपाकडून एकप्रकारे मी केले. त्यामुळे जो काही पराभव झाला असेल आणि जागा कमी झाल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी पक्षाला एक विनंती करणार आहे की, विधानसभेसाठी पूर्ण वेळ उतरायचे आहे. त्यामुळे भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारकडून मोकळे करावे आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्यासाठी संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिने मला काम करता येईल. अर्थात सरकारमधून बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचे आहे, ते ती आमची टीम करेल. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे. ते सांगतील, त्यानुसार कारवाई करेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
