मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. अखेर आज मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यपणे 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, 6 जून रोजीच मान्सून कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे आज (9 जून) मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. आता हळूहळू मान्सून राज्याच्या इतर भागातही सक्रिय होईल. दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. पावसासाठी सर्वत्र पोषक वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच सिंदुधुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीव नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला होता. तर पुणे शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली होती. पुण्यात अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पहिल्याच मोठ्या पावसात पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागल्यानं नागरिकांनी संताप देखील व्यक्केला होता. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांमध्य आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *