कल्याण : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी जमीनी बळकावत बेकायदा चाळी उभारल्या आहेत. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत.
अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर खुताडे यांच्या आशीर्वादाने ही बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी करत आहेत. यासंबंधीच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाला बनेली भागातील २५ एकरचा मोकळा भूखंड भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून हडप करण्यास सुरुवात केली आहे. तरीही अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आणि तोडकाम पथक, बीट मुकादम हा सगळा प्रकार कारवाई न करता पाहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अनेक नागरिकांनी पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या आहेत.
या मोकळ्या भूखंडावर वीटा, वाळू, दगडी जोते सज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक माफियाने आपल्या भौगोलिक हद्दी निश्चित करून त्यामध्ये बेकायदा चाळी उभारण्याची कामे सुरू केली आहेत. टिटवाळा, बनेली, बल्याणी परिसरात मुंबईतील देवनार, तर्भे, माहिम भागातील चाळी, झोपडपट्टीतील नागरिक अधिक संख्येने या भागात कमी दराने घरे विकत मिळतात म्हणून येत आहेत. एक खोली चार ते पाच लाखांना विकून भूमाफिया मोकळे होतात. या बेकायदा चाळींमुळे परिसरातील नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. बांधकामांच्या भरावासाठी माती खोदून तेथे खोल खड्डे खोदले जात आहेत.
