जालना : मराठा आरक्षणासंदर्भात सुसुत्रता यावी यासाठी आता शाहगड येथे मुख्य कार्यालय सुरू करणार असून, कुठे असलो तरी आंदोलन सोडणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचे? कुणाला धक्का लागत नाही. मात्र, काही लोक सांगत नाहीत. जवळपास सगळे मराठे अरक्षणात गेले, राहिलेल्या लोकांना सोबत घेतले पाहिजे. नाही तरी आम्ही घेणार, असे सांगत माझा चित्रपटात जीव नाही तर आरक्षणात आहे. चित्रपट तयार करणाऱ्यांना शुभेच्छा. मला आता आठ दिवस उठता येणार नाही. चित्रपट नंतर पाहीन. चित्रपटात इंटरेस्ट नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची बैठक घेणार आहे. आता वेगाने कामाला लागणार आहोत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचा प्रयत्न केला तर मागे हटणार नाही. माझ्यामुळे जर कोण निवडूण आले, असे म्हणत असेल तर त्यांचा मोठेपणा आहे. मी समाजासाठी लढत आहे. शाहगड येथे कार्यालय सुरू करणार आहे. अंतरवाली सोडायचा विषय नाही. अंतरवाली गावाचे उपकार मी कधीच विसरणार नाही. लोकांना त्रास होऊ नये. वर्दळ होईल म्हणून शाहगड येथे कार्यालय सुरू करणार आहे. राज्याच्या पातळीवरचे काम आता सुरू करणार आहे. मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, सगेसोयरे अध्यादेश, गुन्हे मागे घेण्यासह मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. मनोज जरांगे यांनी एक महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित केले. त्यानंतर मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
