अमोल मिटकरींचा घरचा आहेर
मुंबई : भाजपाचे आमदार टी. राजा यांनी भिवंडीत, ४०० पार झालो असतो, तर देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले असते, असे विधान केले आहे. या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
अमोल मिटकरी यांनी व्टिट करत टी. राजा यांच्या विधानाला उत्तर दिले. टी. राजाला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावे! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी. राजा विसरला असावा. पुढे एक व्हिडिओ शेअर करत अमोल मिटकरी म्हणाले की, टी. राजा या एका व्यक्तीने ४०० पार गेलो असतो तर हे हिंदूराष्ट्र झाले असते, असा अजब दावा केला आहे. कदाचित टी. राजाला हे माहिती नसावे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले. या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचे नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच नाव देण्यात आले आहे. ४०० पार नाही, तुम्ही ५०० पार जरी गेला असतात, तरी या देशाला हिंदूराष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.
दरम्यान, या धर्मसभेत बोलताना टी. राजा यांनी वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी केली. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत, असे आवाहन टी. राजा सिंह यांनी केले.
