Month: June 2024

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी आणखी वर्षभर

महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण   ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. आता हा प्रकल्प आता मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रकल्पाचे काम लांबणीवर पडल्याने या मार्गावर आणखी वर्षभर कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकही या मार्गावरून होत असते. हा महामार्ग असूनही अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित आहे. प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. येथील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यावरून टिका होऊ लागल्याने राज्य रस्ते विकास मंडळाने माजिवडा ते वडपे या रस्त्याचे काम २०२१ पासून हाती घेतले. सुमारे २४ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. याच मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच येथील साकेत, खारेगाव या खाडी पूलांच्या प्रकल्पाचे महत्त्वाची कामे केली जात आहेत. तसेच भिवंडी येथील एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाची कामांचीही यात समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचे काम केवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित ४० टक्के पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प कामाला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेण्याचे ठरविले आहे. ठाणे शहर, घोडबंदर भागात पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका निर्माणाची कामे यामुळे अवजड वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतुक बदल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवडणूक प्रचाराच्या कालावधीतील वाहतूक तसेच निवडणूकीच्या कालावधीत मजूर गावी जाणे अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतरच ठाणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये एकूण १ हजार १८२ कोटी ८७ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च होत आहे. खारेगाव येथे ३८ मार्गिकांचा टोलनाका चार पदरी मुख्य मार्गिकांचे आठ पदरी मार्गामध्ये रुपांतर तसेच प्रत्येकी दोन-दोन पदरी सेवा रस्ते. महामार्गावरील महत्त्वाच्या पूलांपैकी खारेगाव पूलाचे ६२ टक्के, साकेत पूलाचे ६९ टक्के, रेल्वेपूलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपूलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. -0000

ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर

१५ दिवसात मलेरियाचे २५ रुग्ण तर, डेंग्यूचे ११ रुग्ण   ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मलेरियाचे २५ तर, डेंग्यू चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. साथ आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यासह पालिकांच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाल्या असून त्यांनी उपाययजोना आखण्यास सुरूवात केली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत विशेष करुन डेंग्यू आणि मलेरियाची साथ मोठ्याप्रमाणात पसरत असते. जिल्ह्यात सध्या तरी ऊन आणि पावसाचा खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. सलग पाऊस कोसळत नसल्यामुळे वातावरणात पुन्हा उकाडा वाढतो आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी या आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये तापाची साथ मोठ्याप्रमाणात असल्याची माहिती ठाण्यातील खासगी दवाखान्याचे डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ज्या रुग्णांना वारंवार ताप येतो आहे, त्यांनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, डेंग्यू किंवा मलेरियाची लागण झाली नाही ना हे पहावे, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात पसरु नये यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. यात, धुर फवारणी करणे, घरात साठविलेल्या पाण्यातील जंतू नष्ट करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, भितीपत्रकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यंदाही ठाणे महापालिकेकडून शहरातील मुख्य चौकात ‘शहर डेंग्यू मलेरिया मुक्त करुया ’ अशा मथळ्याचा फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे आजार रोखण्यासाठी कोणती कशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मलेरियाचे २५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ठाणे १२, कल्याण-डोंबिवली सहा, नवी मुंबई एक, मिराभाईंदर पाच आणि ठाणे ग्रमाणीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात डेंग्यूचे ठाणे शहरात चार, कल्याण-डोंबिवलीत दोन, नवी मुंबईत दोन आणि ठाणे ग्रामीण मध्ये तीन असे एकून ११ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 00000

 ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर बांबूचे छत

पावसापासून बचाव करण्यासाठी तात्पुरता आडोसा   ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्यानेच विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचवर प्रवाशांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात हिरव्या जाळीचे बांबूचे छत उभारले आहे. फलाट क्रमांक पाचचे अलीकडेच रूंदीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात या फलाटावर पावसाचे पाणी तुंबल्याने प्रवाशांना लोकलमध्ये चढ उतर करताना त्रास होत होता. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे विस्तारिकरण झाल्यानंतर समाधानाने प्रवास करता येईल, असे प्रवाशांना वाटले होते. विस्तारिकरण करण्यात आलेल्या फलाटाच्या भागावर पत्र्याचे छत नाही. त्यामुळे पहिल्याच मोसमी पावसाचे पाणी फलाटावर पडून साचले होते. फलाटावरील काँक्रीटचे बांधकाम नवीन असल्याने त्याच्यावर काँक्रीटच्या गारव्यासाठी घायपताच्या पाण्यात भिजवलेल्या गोण्या टाकण्यात आल्या होत्या. या गोण्यांमध्ये प्रवाशांचे पाय अडकून पडण्याचे प्रमाण वाढले होते. डोक्यावर छत नाही आणि पावसातून सुटका करून घेण्यासाठी घाईत फलाटावर उतरले तर गोण्यांमध्ये पाय अडकून प्रवासी पडत होते. या फलाटावर दोन्हीकडून प्रवाशांना त्रास होत होता. या त्रासाची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचवर विस्तारित फलाट क्रमांक पाचवर पत्र्याचा निवारा होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हिरवी जाळी असलेले बांबूचे छत विस्तारित भागात लावून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या बांबुच्या छतामुळे आता पावस किंवा उन्हापासून बचाव होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला तर मात्र बांबूच्या छतामधून पावसाच्या पाण्याची गळती होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली. बांबूचे छत लगतच्या लोखंडी सांगाड्यांना बांधून तयार करण्यात आले आहे. हे छत कोसळणार नाही याची दक्षता रेल्वेने घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत. ०००००

ठाण्यात मैदानावरील प्रदर्शनासाठी मुंबईच्या धर्तीवर नियमावली करणार

संजय वाघुलेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन   ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक मैदानांवरील व्यावसायिक प्रदर्शनाबाबत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. या नियमावलीनुसार वर्षातील ३६५ पैकी ४५ ते ५० दिवसांपर्यंत मैदानात प्रदर्शन भरविता येतील. तर उर्वरित काळ मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी काल मंगळवारी येथे दिली. त्याचबरोबरच वर्षातून दोन वेळा झाडांच्या फांद्या कापण्याचे, गावदेवी व ज्युपिटर हॉस्पिटलजवळील वाहनतळ लवकरच सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले आहे. ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक- नगरसेविकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नंदा पाटील, दीपा गावंड, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता. ठाण्यातील मुलांना जास्तीत जास्त दिवस खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध राहावीत, अशी भाजपाच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती. त्यावर आयुक्त राव यांनी मुंबई महापालिकेचे मैदाने भाड्याने देण्याचे धोरण मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महापालिकेच्या धोरणानुसार ठाण्यात धोरण तयार केले जाईल. त्यामुळे केवळ ४५ ते ५० दिवसांपर्यंत सार्वजनिक मैदानात प्रदर्शन भरविता येणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी सांगितले. वर्षातून दोनदा वृक्ष फांद्यांची छाटणी रस्त्यालगतची झाडे व झाडांच्या फांद्या कोसळून होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्याची विनंती भाजपाकडून करण्यात आली. त्यावेळी वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या फांद्या तोडण्याच्या निविदा जारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. शहरातील दोन वाहनतळ लवकरच खुला ज्युपिटर हॉस्पिटललगतच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूककोंडी व गावदेवी भाजी मार्केट येथील दुचाकींचा वाहनतळ खुला करण्याची मागणी करण्यात आली. ज्युपिटर वाहनतळात १४०० वाहने पार्क होणार असून, तो वाहनतळ महिनाभरात खुला होईल. तर गावदेवी पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांच्याकडून देण्यात आले. बेकायदा होर्डिंगची पाहणी शहरातील काही भागात महापालिकेकडून कमी क्षेत्रफळाची परवानगी घेऊन भव्य होर्डिंग उभारण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग थाटले आहेत. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणीही भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. त्यावरही कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ००००

महाराष्ट्र सदनात पाणीटंचाई पण केंद्रीय मंत्री करताहेत चक्क मिनरल वॉटरने आंघोळ !

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन कुलूपबंद करावे – नितीन देशपांडे   अनिल ठाणेकर   ठाणे : महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. दिल्लीतील पाणीटंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनालाही बसला असल्याचे दिसून आले असून, एका नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरुन पाण्याच्या (मिनरल वॉटर) बाटल्या आणून, त्यांत्या्या आंघोळीची व्यवस्था करण्याची वेळ व्यवस्थापनावर आल्याचे धक्कादायक आणि तितकेच संतापजनक वास्तव उघड झालेले आहे. दिल्लीत भीषण पाणीटंचाई असताना, महाराष्ट्रातील एका नवनियुक्त केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र सदनात वास्तव्यास असणे आणि त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध नसतानादेखील या केंद्रीय मंत्र्याने चक्क मिनरल वॉटरच्या फिल्टरच्या पाण्याने अंघोळ करणे, ही घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. हे सरकार जनतेचे की लोकप्रतिनिधींचे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, एकीकडे महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांत, पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्यामुळे, अबालवृद्धांना पाच-पाच किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, हे नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करतात, यालाच असंवेदनशीलता म्हणतात. याबाबत ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अतिशय तीव्र असून, जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करीत, आपली संवेदनशीलता प्रकट करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत असल्याचे नितिन देशपांडे यांनी सांगितले आहे. ००००

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

महाड येथील निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात  105 युनिट रक्तदान

रघुनाथ भागवत   महाड : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा-महाड व रावतळी आयोजित श्री विरेश्वर मंदिर सभागृह येथील रक्तदान शिबीरामध्ये तब्बल 105 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामध्ये 23 स्त्री रक्तदात्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय आहे, की निरंकारी भक्तांच्या सेवा भावनेने प्रेरित होवून इतर रक्त दात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. तर उदघाट्न प्रसंगी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांनी बोलताना रायगड जिल्ह्यात रक्तदानाच्या महान कार्यात संत निरंकारी मिशनचे प्रथम स्थानी नंबर आहे. सदर शिबिराला महाड विधानसभा आमदार भरतशेठ गोगावले, युवा नेते श्रीयश माणिकराव जगताप, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, पत्रकार चंद्रहास नगरकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद माने यांनी सदिच्छा भेट दिली. महाड नगरपरिषद माजी बांधकाम सभापती प्रमोद महाडिक यांनी संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून स्वच्छता अभियानामध्ये महाड नगर परिषदेला मिळालेल्या यशामध्ये संत निरंकारी मिशनचे मोठे योगदान असल्याचे सांगून पूरपरिस्थितीच्या दरम्यान स्वच्छता अभियानामध्ये संत निरंकारी मिशनचे योगदान आहे असे यावेळी अधोरेखित केले. तर राजिप माजी सदस्य जितेंद्र सावंत यांनी देखील मनोगतात संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. महाड युनिट सेवादल संचालक नथुराम निंबरे यांनी सांगितले कि, संत निरंकारी मिशन हे निराकार ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, फ्री मेडिकल कँप, वननेस वन सारखे सामाजिक उपक्रम राबवणे एवढीच संत निरंकारी मिशनची ओळख नाही. तर, समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्याकडून निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. मानवमात्राच्या सेवेसाठी रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्मिक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरतपणे करत आहे असे प्रास्ताविक मध्ये महाड सेवादल शिक्षक अनिल सकपाळ यांनी व्यक्त केले. रायगड 40-अ झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे, संयोजक दयाळ पारधी, रावतळी शाखा मुखी प्रविण करबेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरमध्ये सेवादल युनिट नं. 357 महाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी रक्तसंकलन जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी केले. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र व संत निरंकारी मिशनकडून निरंकारी साहित्य, पुष्प देऊन आभार मानण्यात आले.

जुनी पेन्शन योजनेला अधिवेशनात मंजूरी- निरंजन डावखरे

शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी अनिल ठाणेकर     ठाणे : १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती लावून महाराष्ट्रातील व कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारा, त्यासाठी आवाज उठविणारा व फाॅलोअप घेऊन प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून निरंजन डावखरे ओळखले जातात, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. तर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून ना. रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आ.निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, भरत चव्हाण, एकनाथ भोईर, राधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे, शिवाई विद्यालयाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण, आर जे ठाकूर काॅलेजचे विश्वस्त मंगेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला ठाणे परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. निरंजन डावखरे यांनी गेल्या १२ वर्षातील आमदारकीच्या कारकीर्दीत प्रत्येक अधिवेशनात हजेरी लावून वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती नोंदविलेली आहे. तसेच प्रत्येक अधिवेशनात महाराष्ट्रातील,  कोकणातील व ठाण्यातील जनतेचे प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आवाज उठविलेला आहे. हे प्रश्न नुसते मांडून ते थांबले नाहीत तर सतत संबंधित विभागातील अधिकारी व मंत्री यांच्याकडे सतत फाॅलोअप घेत प्रश्न सोडविण्यासाठी निरंजन डावखरे हे सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहिलेले आहेत.अशा कार्यशील उमेदवाराला निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बळावर नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकी २५ मतदारांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी, मतदान होईपर्यंत मतदारांशो सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे मतदानाच्या वेळेस त्यांना बुथपर्यंत नेण्याची व्यवस्था करणे, मतदान कसे करावे याची सततची माहिती देणे, मतदान बाद होणार नाही याची काळजी घेणे या पाच गोष्टीवर लक्ष दिल्यास निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्याने निश्चित निवडून येतील अशी आशा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर निरंजन डावखरे हे संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यार्थी यांचे प्रश्न सातत्यपूर्ण मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोकणाने महायुतीला विजयाचा मार्ग दाखविलेला आहे. यामुळेच कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार ठाणे लोकसभेतील खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. सागरी, नागरी व डोंगरी अशा कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदारसंघ पसरलेला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यारथी यांचे विविध प्रश्न गत दोन टर्म मध्ये मार्गी लावण्यात आले आहेत. व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी आवश्यक जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरें यांनी व्यक्त केला. ०००

डोंबिवली उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर 

कल्याण : महावितरणच्या डोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत करण्यात आले आहे. उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश आहे. गणेश मंदिरच्या मागे, पंडित दिनदयाल रोड, कैलास भुवन बिल्डींग जवळ, डोंबिवली (पश्चिम) ४२१२०२ या नवीन पत्त्यावर शुक्रवारपासून (२१ जून) ही चारही कार्यालये कार्यान्वित होत आहेत. सध्या ही कार्यालये नाखे एव्हरेस्ट हाऊस, हॉटेल द्वारकाच्या वर, तीसरा मजला, रेल्वेस्टेशन जवळ, डोंबिवली पश्चिम येथे भाडयाच्या जागेत कार्यरत आहेत. संबधित ग्राहकांनी या नवीन बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा

आंबेडकरवादी अध्ययन सवर्धन समितीचा इशारा   ठाणे : अनुसूचीत जाती जमतीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येयांर्‍य परदेशी शिक्षण शिष्यवृतीत राज्य शासनाने बादल करून जाचक अटींचा समावेश केला. यामुळे अनुसूचीत जातींच्या सवलती…