Month: June 2024

कळंबोली ठरणार सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे केंद्र

प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन संपन्न   पनवेल : कळंबोली मध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रॅंचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणाऱ्यांकरता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रेंचायसी पार्टनर आहेत. या शोरूमचे उद्घाटन काल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संचालकांना यशस्वी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापराच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. उद्घाटनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणातून ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून पुनर्वापर योग्य ऊर्जा आणि हरित ऊर्जा वापरण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या ऊर्जेच्या वापरामुळे ग्राहकांच्या खिशावरचा भार देखील हलका होणार आहे. सौर ऊर्जा व अन्य हरित ऊर्जा यांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करत आहेत. फार्म हाऊस, मोकळ्या जागा, इमारतीवरील जागा या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कार्यान्वित केल्यास घरोघरी वीज निर्मिती केंद्र उघडले जाऊ शकतील. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यामध्ये एक करोड पेक्षा जास्त नागरिक अशा स्वरूपाची घरोघरी ऊर्जा केंद्र निर्मिती करण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे वीज निर्मिती केल्यास सध्या वीज निर्मितीसाठी लागणारे कोळसा, इंधन यांची देखील बचत होण्यास फार मोठी मदत होईल.जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून वारी यांचे सौर ऊर्जा निर्मिती साहित्य पनवेल परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी कंपनीचे तसेच त्यांचे संस्थापक संचालक नागेंद्रसिंग आणि आशिष सिंग यांचे आभार मानतो. संचालक आशिष सिंग म्हणाले की सौर ऊर्जा वापर हा ऑन ग्रीड अँड ऑफ ग्रिड प्रकारचा असतो. आम्ही ऑन ग्रीड प्रकारची सौर ऊर्जा निर्माण करण्यावर भर देत आहोत. वास्तविक सौर ऊर्जा निर्मिती करणे सोपे आहे परंतु ही ऊर्जा साठवून ठेवणे अत्यंत कठीण असते. निर्माण केलेली अतिरिक्त सौर ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी केंद्र सरकार मदत करते. साधारण ऊर्जा वापराची मोजतात करण्याकरता वन-वे मीटर असतात. परंतु या सौर ऊर्जा प्रकारात दिल्या जाणाऱ्या आणि घेतल्या जाणाऱ्या विजेची मोजदाद करण्याचे प्रावधान असते. यामध्ये तुम्ही निर्माण केलेल्या विजेतील अतिरिक्त वीज सरकार कडे जमा होते.सरकारकडून तुमच्या गरजेच्या वेळी ही वीज तुम्हाला परत केली जाते.पुन्हा दिल्या जाणाऱ्या विजेची मोजदाद करण्यासाठी नेट मीटर असतात. त्यामुळे ही ऊर्जा पर्यावरण पूरक आहे आणि तुमच्या सध्याच्या विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करणारे देखील आहे. या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत जगतकर्ता इंडस्ट्रीज चे संस्थापक संचालक नागेंद्र सिंग, आशिष सिंग, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पम पाचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील,”वारी” चे फ्रॅंचाईजी मॅनेजर राजेश लाटे, ॲड. रमेश त्रिपाठी, अविनाश पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 00000

देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं-नरेश म्हस्के

ठाणे : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. यात महायुतीकडून कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरेंना उमेदवारी मिळाली आहे. परंतु तत्पूर्वी मनसेनं अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची द्विधा मनस्थिती झाली होती. निरंजन डावखरे यांच्या प्रचारावेळी म्हस्केंनी बैठकीत हा किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी या संकटातून वाचलो असंही म्हस्के यांनी सांगितले. खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, खासदारकीच्या निवडणुकीत अवघ्या १२ दिवसांत मला महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत करून निवडून आणलं. खासदारकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक लागली. निरंजन डावखरेंसोबत आमची चर्चा सुरू होती. कसं नियोजन करायचे, त्यात अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सगळ्यात पहिला माझ्या पोटात गोळा आला. अभिजीत पानसे, निरंजन डावखरे हे दोघेही माझे मित्र. दोघांनीही निवडणुकीत प्रचंड काम केले आहे. निकाल लागून ५-६ दिवस झालेले, त्यात सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्यामागे लागले होते. त्यावेळी मी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो. उत्तर काय देणार? असं त्यांनी सांगितले. तसेच निरंजन डावखरेला योग्य म्हटलं तर अभिजीतला राग येणार, अभिजीतला योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार, मी रवींद्र चव्हाणांना फोन केला, हे मिटवा लवकर…मी रोज निरंजनला फोन करायचो, हा विषय लवकर संपव, फडणवीस साहेबांना सांग..एकदा अभिजीतला फोन करून त्याचे मत परिवर्तन होतं का हे पाहिले. किती नोंदणी केली आहेस, निरंजनपेक्षा पुढचा आकडा अभिजीतनं सांगितला. मी म्हटलं आता वाटोळं झालं, करायचं काय..फडणवीस यांनी मला या सगळ्यात मोठ्या संकटातून वाचवलं असं खासदार म्हस्केंनी म्हटलं. त्याशिवाय महायुती म्हणून निरंजनचं काम करायचं आहे पण महायुतीत अभिजीत पानसेही आहेत. निरंजनचं काम केल्यानंतर अभिजीत पानसे मला गद्दार, ऐहसान फरामोश म्हणणार, अभिजीत लहानपणापासून मित्र आहे, या निवडणुकीत अभिजीतनं माझ्या प्रचाराचं डिझाईन करायचे काम केले. अविनाश जाधवचा चेहरा आठवला. आता करायचे काय, परंतु केवळ फडणवीसांनी भूमिका घेतली आणि अतिशय सलोख्याने आज आपण महायुतीत बसलो आहोत. निरंजन डावखरेंचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा उमेदवार कोण, तेदेखील कोणाला माहिती नाही असं नरेश म्हस्के म्हणाले. दरम्यान, बऱ्याच जणांना ही निवडणूक माहिती नाही. पक्षाच्या वतीने त्या त्या विभागातील पदवीधरांची यादी दिली जाईल. पदवीधरांशी संपर्क करा, वेळ पालून त्यांच्याशी संपर्क साधा. पक्षाचे पदाधिकारी, विभागप्रमुख, नगरसेवक यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. 00000

भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण

भिवंडी: जगभरातील मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा कुर्बानीचा सण सोमवारी शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली. भिवंडी शहरातील असलेल्या कोटरगेट, दिवानशहा दरगाह, आसबीबी, मामूभांजा, चांद तारासहित अनेक मशीदींमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या ईद सणानिमित्त पोलिसांच्यावतीने कोटरगेट मशीद येथे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भिवंडी महापालिकेच्यावतीने कुर्बानी सेंटर तयार करण्यात आलेल्या ठिकाणी बकरा आणि रेड्याची कुर्बानी देण्यात आली. तर दुसरीकडे अखंडता कायम टिकून राहावी यासाठी मुस्लिम बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. 00000

नाल्यावरील गाळ्याची भिंत पडली

सुदैवाने जीवितहानी नाही   ठाणे : लोकमान्य पाडा नं. ३ या भागातील लाकडीपुलाजवळील नाल्यावर असलेल्या गाळ्याची भिंत पडल्याची घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने गाळे बंद असल्याने कोणत्याही स्वरुपाची जिवीतहानी झाली नाही. मात्र या गाळ्याच्या बाजूला असलेले तीन गाळे देखील धोकादायक झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील चारही गाळे तोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री १.०२ वाजताच्या सुमारास लोकमान्य पाडा नं. ३ येथील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या अमित म्हात्रे यांच्या दुकानाच्या गाळ्याची भिंत नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने रात्रीच्या सुमारास गाळे बंद असल्याने जिवीतहानी टळली आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर यंत्रणांनी धाव घेत, परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु ज्या गाळ्याची भिंत पडली होती. त्या गाळ्याच्या बाजूला असलेल्या इतर गाळयांची स्थिती देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील चारही गाळे तोडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर नाल्यात पडलेले डेब्रीज आणि नाल्याच्या आजूबाजूला पडलेले डेब्रीज देखील काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यापूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून नाल्यावरील व नाल्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही नाल्यावरील रहिवासी स्थलांतरीत झालेले दिसून आलेले नाही. त्यामुळे आता प्रभाग समिती निहाय सर्वच ठिकाणांच्या नाल्याशेजारील व नाल्यावरील बांधकामांचा सर्व्हे केला जाणार असून जे अतिधोकादायक स्थितीत असतील त्यांना स्थलांतरीत करण्याच्या सुचना देण्यात येतील अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. तरी देखील रहिवासी स्थलांतरीत झाले नाही तर महापालिका त्यांनी तेथून स्थलांतरीत करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील तब्बल ३० ठिकाणी दरड कोसळण्याची भीती

 महापालिका बजावतेय केवळ नोटीस   ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २०२० मध्ये दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची यादी ही २६ च्या आसपास होती. त्यानंतर २०२१ पासून ही संख्या १४ वर आली होती. मात्र यंदा पावसाळा सुरु होत असतांना ही संख्या थेट ३० वर गेली आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांना संबधींत प्रभाग समिती मार्फत केवळ नोटीस बजावण्याची कारवाई केली जात आहे. मात्र याठिकाणी राहणाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असेही पालिकेने सांगितले आहे. दुसरीकडे येथील घरे देखील रिकामी करण्यास रहिवासी तयार होत नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना दरवर्षी पावसाळ्यात दोन ते तीन घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा देखील पालिकेने सुरवातीला यादी जाहीर केली होती. त्यात पूर्वीचीच म्हणजेच १४ ठिकाणेच होती. मात्र आता पालिकेने पुन्हा सर्व्हे करुन सुधारीत यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ही ठिकाणे आता तब्बल ३० एवढी झाली आहेत. याचाच अर्थ आधीच्या यादीत १६ ठिकाणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून कळवा प्रभाग समिती हद्दीत दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. तसेच मुंब्रा भागातही अशा प्रकारच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसीद्वारे सुरक्षितेची हमी मात्र पालिकेने दिलेली नाही. पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास महापालिका त्याला जबाबदार असणार नसल्याचे पालिकेने सांगत आपले हात यातून झटकल्याचे दिसत आहे.दरम्यान, येथील रहिवासी देखील ऐन पावसाळ्यात कुटुंब घेऊन कुठे जाणार असे सांगत घरे रिकामी करण्यास तयार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने जाहीर केलेली सुधारीत यादी महापालिकेने जाहीर केलेल्या सुधारीत यादीत वागळे प्रभाग समिती – ०४, वर्तकनगर – ०१, माजिवडा मानपाडा – ०३, कळवा – ०७, मुंब्रा – १५ आदी भागांचा यात समावेश आहे. याचाच अर्थ कळवा आणि मुंब्य्रातच दरड कोसळणाऱ्या ठिकाणांचा अधिक समावेश असल्याचे या यादीवरुन स्पष्ट होत आहे. ००००

मुंबईत आठवलेंचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे केंद्रात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आठवलेंचे जोरदार स्‍वागत केले. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपाइं कार्यकर्त्यांनी भव्य रथातून मिरवणूक काढून वाजत-गाजत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आठवले चैत्यभूमी येथे रवाना झाले. चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत जे आहे ते सर्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला लाभले असल्याची कृतज्ञ भावना आठवलेंनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रामदास आठवलेंवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव केला. यावेळी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित होते. ००००००

राज्यात माकप १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक?

 पवारांसोबत झाली सकारात्मक चर्चा!   मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  शरद पवार व  जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मा. आ.  नरसय्या आडम, मा. आ. जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशाबद्दल आणि त्यातील शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे शरद पवार व जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली.

काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’!

 मुख्यमंत्र्यांचा दावा   ठाणे : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरविले. त्यामुळे नक्षलवाद केवळ गडचिरोलीत नसून शहरी नक्षलवादी काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरले आहेत, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. ठाण्यात टीप टॉप प्लाझा येथे कोकण पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराकरिता आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात अनेक संस्था चांगले काम करत आहेत. पण, काही संस्था सरकारविरोधात आहेत. अशा संस्था आणि महाविकास आघाडी खोटे कथानक लोकांपर्यत पोहचवण्यात यशस्वी ठरली. यामुळे डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आता आली आहे. लोकसभा निवडणुकीत चारशेचा आकडा पार होणार म्हणून कार्यकर्ते आरामात राहिले आणि तेच निवडणुकीत आम्हाला भोवले, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांच कोकणवासीयांनी तडीपार केले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याना लगावला. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळाले. येथील सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या. भिवंडीची जागा मिळू शकली नसून इथे काय घडले हे सर्वांनाच माहीत आहे. मुंब्रा येथे जे झाले, तेच भिवंडीत झाले, असे फडणवीस म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अभिजीत पानसे यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे आभारही मानले. शहरी नक्षली असलेल्या संस्थांनी पंतप्रधानांना हटविण्याचा नारा दिला. मात्र विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. त्यामुळे या संस्थांची चिंता आता वाढली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 00000

डोंबिवलीतील पुष्कर ब्याडगीला एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के

डोंबिवली : डोंबिवलीतील रहिवासी असलेला पुष्कर विनय ब्याडगी या विद्यार्थ्याने तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या राज्यस्तरिय एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळविला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातून पुष्करने आपले शिक्षण घेतले आहे. डोंबिवली पश्चिमेतील माॅडेल इंग्लिश स्कूलमधून पुष्करने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राॅयल ज्युनिअर महाविद्यालयातून त्याने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकीतून पुढील शिक्षण घ्यायचे नक्की असल्याने त्या दिशेने अभ्यास केला. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंंडळाच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांचे वाचन केले. तसेच एमएच-सीईटीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. याशिवाय खासगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याने आपणास हे यश मिळाले आहे, असे पुष्करने सांगितले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या जेईई (मुख्य) परीक्षा आपण दिली होती. या परीक्षेत आपणास ९९.०७ टक्के श्रेयांक (पर्सेंटाईल) मिळाले आहेत. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर गुणवत्तेच्या यादीत आपण २०८ वे आहोत, असे पुष्करने सांगितले. या गुणांच्या आधारे आपण मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहोत. आपण नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन केले. खेळामध्ये आपणास बॅडमिंटन आवडते. त्यामुळे त्याचा सराव नियमित करतो. पुष्करचे वडील डोंबिवलीत नेत्ररुग्ण चिकित्सक आहेत. आई गृहिणी आहे.

 कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात शिवसैनिकांना प्रवेश बंदी

बकरी ईदच्या दिवशी कल्याण : बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली. यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केलं. तसंच आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. मात्र ९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं. आज पुन्हा एकदा या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येतं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे तसंच त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्या काळात हिंदू बांधवांना देवीचं दर्शन आणि पूजा ही काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. याचा निषेध आनंद दिघेंनी सुरु केला होता. त्यांनी या विरोधात घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी घंटानाद करताना दिसत आहेत. आम्हाला दुर्गाडी देवीचं दर्शन करायचं आहे त्यामुळे मंदिरात जाऊ दिलं पाहिजे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी मंदिरात जाण्यापासून रोखल्याने या ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसनैकि जमले होते. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या दोन्ही गटांनी दुर्गाडी किल्ला परिसरात काही काळ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकाचं म्हणणं काय? बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश बंदी आणि घंटानाद करु दिला जात नाही. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने सुरु झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचं दर्शन घेतलं होतं. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचं दर्शन घेणं हा हिंदूंचा हक्क आहे. असं आंदोलकांनी म्हटलं आहे.