मुंबई : मुंबईत पावसाने जरी दडी मारली असली तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र लाडकी बहीण योजनेवर सवलतींचा वर्षाव सुरुच ठेवला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घो,णा केली आहे. काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. त्यामधील दोन नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता कऱण्यात आली आहे. वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.
