अनिल ठाणेकर
ठाणे: महानगरपालिका प्रशासनाने भर पावसाळ्यात १ जुलै २०२४ पासून मलवाहिनी, चैम्बर्स आणि मलटाक्यांमधील चोकप काढण्याचे काम करणाऱ्या चार जेट्टींग गाड्या अचानक बंद केल्याने ठाणेकरांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी मत श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे महानगरपालिका मलनिस्सारण व यांत्रिक विभागामार्फत सदरील MH04-DS-8720, MH04-DS-8721, MH04-DS-9193 आणि MH04-DS-9194 या क्रमांकाच्या जेटिंग गाड्या २००९ पासून अनेक वर्षे सुरू असल्याने नागरिकांना तात्काळ सेवा मिळत होती.
या गाड्यांचे १५वर्षे आयुष्य झाल्याने आऊट डेटेड झाल्याची मनपा प्रशासन यांना कल्पना होती. परंतु महापालिकेच्या मलनिस्सारण आणि यांत्रिक विभागला याबाबत माहिती असतांनाही नवीन गाड्यांची व्यवस्था न करता अचानक या गाड्यांचे आयुष्य संपल्याचे कारण पुढे करून १ जुलै पासून अचानकपणे चार जेटिंग बंद करण्याचा घेतलेला हा निर्णय नागरी सुविधांचा बोजवारा करण्यासाठी कारणीभूत ठरल्यास त्याला जबाबदार कोण असणार आहे? ठाणेकर नागरिक असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना पावसाळ्यात गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश असताना ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या बाबतीत निष्काळजीपणा करणे ही आश्चर्याची बाब आहे. गाड्यांची मुदत संपत असल्याची माहिती असतांना किमान एक वर्ष आगोदर टेंडर प्रक्रिया सुरू केली असती तर आज ही अवस्था निर्माण झाली नसती. आम्हाला असे समजते की, महाराष्ट्र शासनाने सहा नवीन जेटिंग गाड्यां खरेदी करण्यासाठी महापालिकेला अनुदान दिले आहे. जर अनुदान दिले असेल तर ती रक्कम कुठे वापरली गेली या बाबतीत खुलासा झाला पाहिजे.ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याशी खेळतांनाच त्या गाड्यांवर कार्यरत सफाई कर्मचारी आणि वाहनचालक यांना पुरेसे वेळेस आगोदर नोटीस कंत्राटदार किंवा मनपा अधिकारी यांनी न दिल्याने अचानक या कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठाणेकरांसमोर येऊन ठेपलेल्या संकटातून सुटका करावी, असे आवाहन ही जागरूक ठाणेकरांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रमिक जनता संघ युनियन तर्फे मा.मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली.
00000
