मुंबई : विधान परिषद सभागृहात शीवीगाळ करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांचे निलंबन त्यांच्या माफीनंतर मागे घेण्यात आले. कॉग्रेसनेते राहुल गांधीं यांनी संसदेत हिंदूत्वावर केलेल्या वक्तव्यावरुन झालेल्या गदारोळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिविगाळ केली होती. विधिमंडळात शिवीगाळ करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ५ दिवसाकरीता निलंबन मंगळवारी करण्यात आले होते. आज त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याच्या त्यांच्या विनंतीवरून त्यांचे निलंबन मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तो बहुमताने संमत करण्यात आला.
गेल्या सोमवारी अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात होते त्यावेळी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती. मात्र त्यांच्या पक्षाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान आज दानवे यांनी झाल्या वक्तव्या बाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आज त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला तो सहमत करण्यात आला. उद्या शुक्रवार ५ जुलैपासून दानवे कामकाजात भाग घेतील.
