मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे की २८८ उमेदवार पाडायचे याचा फैसला आता १३ जुलैलाच होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी १३ जुलै पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे असं शंभुराज देसाई म्हणाले होते. यावर मनोज जरांगे म्हणाले, ठरल्याप्रमाणे शंभूराज देसाई आम्हाला न्याय देतील. पुढील दिशा १३ तारखेला नंतर ठरवू. राजकारणात आम्हाला जायचं नाही , पण नाही दिले तर आम्ही न्याय कुठून घ्यायचा? म्हणून समाजाला विचारून ठरवू २८८ उभा करायचे की २८८ पडायचे?
मनोज जरांगेचे मराठा समाजाला आवाहन
उद्यापासून मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. हिंगोली शहरामध्ये मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता रॅली निघणार आहे. यावर मनोज जरांगे म्हणाले, शांतता रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सर्वांनी आपली कामं सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र या, बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही.
मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं : मनोज जरांगे
मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं मुलींचे अॅडमिशन सुरू झालेले आहेत. अॅडमिशन झालेल्या मुलींचे पैसे परत करायला लावा, अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
