रमेश औताडे
मुंबई : सेवेत असतानाही त्रास व सेवानिवृत्ती नंतर तर जास्त त्रास सरकारकडून होत आहे. वेळोवेळी सरकार आश्वासन देते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे आम्ही आता आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. असा इशारा सेवानिवृत्त पोलिसांच्या कुटुंबीयांनी आझाद मैदानात दिला आहे.
वरळी येथील पोलीस बी. डी. डी. चाळ क्रमांक ६४ ते ७४ व ७७ मधील सेवानिवृत व दिवंगत यांना सेवा ज्येष्ठते नुसार पहिल्या टप्प्यामध्ये घरे मिळावीत अशी मागणी करत करत सरकारच्या फसव्या घोषणा व आश्वासनांचा तीव्र प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकीत असे ठरले होते की, वरळी बी. डी. डी. चाळी मध्ये राहत असलेल्या पोलीस रहिवाशांना ज्येष्ठ सेवा निवृत्त व दिवंगत यांना सेवाज्येष्ठतेनुसार पहिल्या टप्यामध्ये घरे देऊ. म्हाडाला याबाबत सर्व माहिती व आदेश दिले असताना अद्यापही काहीच हालचाल झाली नाही. म्हणून नाईलाजास्तव आझाद मैदान येथे उपोषण व आंदोलन करण्यास बसावे लागत आहे असे आंदोलनकर्ते सांगत होते.
आता तरी सरकारने सहानभूतीपूर्वक विचार करून लॉटरी व करार त्वरित सुरू करावेत व उर्वरीत पोलीस रहिवाशांच्या दुसऱ्या टप्याकरिता लॉटरी काढून एकाच वेळी करारनामे करण्यास सुरूवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
