रमेश औताडे
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींबाबत सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असतानाच काही ठिकाणी इमारतींमधे छताचा भाग कोसळणे तर काही ठिकाणी ईमारत खाचने, पडणे अशा घटना घडत आहेत. मानखुर्द येथील पी एम जी पी कॉलनीत जीर्ण झालेल्या इमारतीचा छताचा भाग कोसळल्याने भयभीत झालेले रहिवाशी संतप्त झाले आहेत.
ईमारत क्रमांक २० मधील पहिल्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. पहाटे घटना घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यापूर्वीही अशा छोट्या घटना घडल्या असल्याने तात्पुरती मलमपट्टी करून प्लास्टर करण्यात येत होते. अशी तात्पुरती मलमपट्टी अजून किती दिवस करत राहायची ? असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत. आमचा जीव गेल्यावर सरकार लक्ष देणार आहे का ? निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतात व आश्वासन देऊन जातात.छताचा भाग पाडून आमचा जीव जाणार आहे. लोकप्रतिनिधींचा नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी देत आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारे नाले योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात छताचा भाग कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे. पुनर्विकास होण्यासाठी येथील काही रहिवाशी प्रयत्न करत आहेत मात्र काही रहिवाशी त्यांना सहकार्य करत नसल्याने नवीन टॉवर मध्ये राहण्याचे स्वप्न पाहून एक पिढी वयोवृध्द झाली आहे. त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्यासाठी व छताचा भाग कोसळून जीवित हानी होण्याअगोदर सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत.
०००००
