संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल
मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान देण्यात आले आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखर बँक घोटाळ्यात आधी क्लीनचीट मिळणं हाच मोठा घोटाळा असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तसेच खटला चालवताना जो खर्च झाला तो कोणाच्या खिशातून घेणार? असा सवाल देखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले, शिखर बँक संदर्भात क्लीन चीट मिळणं हाच एक सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अशापद्धतीने हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे, त्यासाठी लाखो कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे आणि मग त्या आरोपीने पक्षात आला की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे. खटला चालवताना जो काही खर्च होतो तो कोणाच्या खिशातून घेणार आहे. या खटल्यांचा खर्च नरेंद्र मोदी यांच्याकडून घेणार का?
विधान परिषदेतील काँग्रेसच्या क्रॉस वोटिंगवर संजय राऊत म्हणाले, क्रॉस व्होटिंग झालं आहे हे काँग्रेसने मान्य केले आहे. आम्हालाही तो अनुभव आला आहे. त्यांना फार मोठ्या रकमा आणि जमिनीचे तुकडे दिले. मतदानाला जाण्यापूर्वीच त्यांना हे देणार असल्याचे मंजूर केले होते , ही एक प्रकारची संविधान हत्या आहे.
अशा पद्धतीने आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का? सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र करू शकतात त्याच पद्धतीच्या आमदारांना अशा पद्धतीने फोडणे चुकीचे आहे. म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहे याच काँग्रेसचे आमदार आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडवून आणला. काँग्रेस पक्षाकडून नक्कीच आमदारांना कारवाई होईल कारण काँग्रेसचे काम करण्याची एक पद्धत आहे त्यानुसार ते कारवाई करतील.
