अंबरनाथ : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील महिन्यांत तळ गाठलेले चिखलोली धरण मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. मागील आठवड्यात गुरुवारपासून जोर धरलेल्या पावसामुळे चिखलोली धरण शनिवारी रात्रीनंतर ओव्हरफ्लो झाले आहे.
चिखलोली धरणातून शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरातील अंदाजे ५० हजार लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय बदलापूरच्या बॅरेज, एमआयडीसीमार्फत प्रत्येकी २८ एमएलडी असे ३४ एमलडी पाणी पुरवले जाते. मागील महिन्यात जलसाठा कमी झाल्याने धरणाने तळ गाठला होता; मात्र त्यानंतर अंबरनाथ शहरासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने चिखलोली ओसंडून वाहू लागले आहे. चिखलोली धरणाची पाणी साठवण क्षमता २.२६ दलघमी इतकी आहे.
00000
