नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्पावरू लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी सरकारवर भेदभावाचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. परिणामी विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले.
दोन्ही सभागृहातील खासदारांनी संसदेच्या बाहेर जाऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका बाजूला विरोधक आक्रमक झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सरकारच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली.
