Month: July 2024

 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प

चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया     मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला.  यात देशातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत अभिनंदनीय आणि उल्लेखनीय बाब आहे. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामध्ये देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र  सरकारने  10 लाखांचे कर्ज जाहीर केले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाऊचरही दिले जाणार आहेत.या कर्जाच्या रकमेच्या ३ टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी हे ई-वाउचर दिले जाणार आहेत. या सोबतच मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाणार आहे. तसेच  नवोन्मेषाला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारणे अतिशय कौतुकास्पद आहे. आजचा अर्थसंकल्प शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा आणि  उच्च शिक्षणाला नवीन दिशा देणारा आहे असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 00000

भास्कर कॉलनी नवमतदार नोंदणी शिबिरास कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची सदिच्छा भेट

मुंबई : भास्कर कॉलनी येथील मा. नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या कार्यालयात ‘नवमतदार नोंदणी’ तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’  यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास सन्माननीय कृषिमंत्री दादा साहेब…

शिवस्मारकासाठी आझाद मैदानात जागरण गोंधळ

रमेश औताडे   मुंबई / अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या १० वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी बुधवारी आझाद मैदानात जागरण गोंधळ घालण्यात आला. यापुढेही सरकारने जर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर स्वाक्षरी मोहीम राबवत जनजागृती करणार व त्यानंतर तीव्र बेमुदत आंदोलन करणार असा इशारा जय शिव संग्राम चे मुंबई अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांनी आझाद मैदानात दिला. २०१३ मध्ये अरबी समुद्रात श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. त्या नंतर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात स्मारकाचे जलपूजन केले होते. आज १० वर्ष होऊन गेली. आतापर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. देशांमध्ये इतर करोडो रुपयांचे  प्रकल्प तयार झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय कोणीही घेत नाही असे सरचिटणीस मुख्य प्रवक्ते दिपक कदम यांनी सांगितले. ९० हजार कोटींचे रस्ते होत आहेत. अटल सेतू झाला. मुंबईच्या जमिनीखालून रेल्वे धावण्याच्या मुहूर्तावर आहे. लाडकी बहिण लाडका भाऊ आदी योजनांच्या घोषणा होत आहेत. मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाबाबत  विरोधक व सत्ताधारी शांत बसले आहेत. त्यामुळे आता स्वर्गीय विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची जय शिव संग्राम आझाद मैदानात जागरण गोंधळ घालत आहे असे शिरसेकर यांनी सांगितले. यावेळी अनिल परब, आकाश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 00000

‘देश अती तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे’

युनीसेफ चे महाराष्ट्र सल्लागार डॉ. खरात यांचे वक्तव्य  रमेश औताडे   मुंबई :कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षां खालील ४३ टक्के बालके खुजी होण्याचा आणि त्यांचा योग्य विकास न होण्याचा धोका असतो. भारतातही ५ वर्षाखालील ३८ टक्के बालके बुटकी आहेत, देश अती तीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहे. निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण ताणतणाव आणि वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन अपुरे पडल्याने लाखो बालके अपेक्षित यश संपादन करण्यात आणि मोठे झाल्यावर संपूर्ण सक्षम होण्यात अपयशी ठरतात. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत  युनीसेफ चे राज्य सल्लागार डॉ कारभारी खरात यांनी दिली. बाळ जन्माला आल्यापासून पहिली दोन वर्ष खूप महत्त्वाची असतात. कारण त्या दोन वर्षात बाळ खूप शिकत असतं. या काळात त्याच्या मेंदूची 75 टक्के वाढ पूर्ण होते, बाळाच्या वाढीसाठी हे ‘ पहिले हजार दिवस ‘ खूप कळीचे ठरतात. या काळात बाळाला योग्य संगोपन, माया आणि योग्य पोषण मिळाले तरच मेंदूची पूर्ण वाढ होण्याची शक्यता वाढते असे डॉ खरात यांनी सांगितले. ‘साऱ्याजणी महिला उत्कर्ष संस्था’  व ‘युनीसेफ’ या लसीकरण प्रकल्प मुख्य अधिकारी सुजाता शिर्के म्हणाल्या, महिला गरोदर असल्यापासून बाळ मोठे होईपर्यत नेमके काय करावे याची माहिती अपुरी असल्याने विविध आजार होतात. गर्भ अवस्थेत मेंदूतील अनेक केंद्र एकमेकांशी जोडली जातात. यामुळे आकलन शक्ती, सामाजिक कौशल्य तसेच संज्ञात्मक आणि भावनिक विकास होतो. हा विकासाचा अति आवश्यक टप्पा आहे. हा विकास होण्यासाठी बाळाला स्पर्ष, प्रेम, आणि पोषणाची जरूरी असते. आई सुदृढ, निरोगी आणि आनंदी असणे, व मुलाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळणे हा प्रत्येक बाळाचा मूलभूत अधिकार आहे. जन्मलेल्या प्रत्येक बाळाचे योग्य वयात लसीकरण पूर्ण झाले तर या अधिकाराचं संरक्षण अधिक सुलभ होते. पहिल्या पाच वर्षात सात लसी दिल्याने मुलांचे क्षय, पोलियो, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, मेंदूज्वर, रुबेला, कावीळ, अतिसार अशा दहा आजारांपासून संरक्षण होते. सरकारी आरोग्य केंद्रात या सर्व लसी मोफत मिळतात आणि त्यासंबंधी मार्गदर्शन आणि पाठपुरावा केला जातो असे सुजाता शिर्के यांनी सांगितले. देशाच्या लोकसंख्येत महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. नीती आयोगाने २०१९ मध्ये जाहीर केलेल्या आरोग्याच्या निर्देशांकानुसार राज्य आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पाच वर्षखालील मुलांचे मृत्यू दर कमी करण्याचे शाश्वत विकासाचे ध्येय महाराष्ट्राने गाठले असले तरी अद्याप राज्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. सर्वसाधारण एक तृतियांश बालके तीव्र कुपोषित म्हणजे अपेक्षित उंचीपेक्षा बुटकी आहेत आणि प्रत्येक चौथे बालक अपेक्षित वजनाहून कमी, सडपातळ आहे असे डॉ खरात यांनी सांगितले. वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांना योग्य प्रोत्साहन मिळाल्यास अनेक अल्प आणि दीर्घ मुदतीचे फायदे होतात हे पुराव्या निशी सिद्ध झालेले आहे. पण ज्या बालकांना त्यांच्या चांगले पोषण, प्रोत्साहन व प्रेम मिळत नाही, ते आजच्या स्पर्धेच्या युगात मागे पडतात. वंचित कुटुंबामध्ये सुद्धा जन्मलेल्या बालकांसाठी विकासाच्या संधी लवकर उपलब्ध करून दिल्या तर बालकाचे कमी नुकसान होईल व जास्तीत जास्त संभाव्य क्षमतेपर्यत पोहोचणे शक्य होते. बालविकासात गुंतवणूक हा गरीबी संपवण्याचा आणि असमानतेचे चक्र तोडण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आर्थिक वाढीला चालना देऊन समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी बालसंगोपनाच्या धोरणामध्ये सक्रिय प्रतिसाद, योग्य पोषण, विकासाच्या संधी, चांगले आरोग्य आणि सुरक्षित देखभाल, हे पाच महत्त्वपूर्ण घटक ओळखले जातात असे डॉ खरात यांनी सांगितले. ०००००

जोगेश्वरीमधील उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; चारजण जखमी

मुंबई : जोगेश्वरीमधील एस. व्ही. मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलनजीकच्या ‘ई – हाय’ या बहुमजली इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले असून…

 डोंबिवलीतील फडके रोडला झाडाच्या फांद्यांचा अडथळा

वाहतूक कोंडी, वीज पुरवठा खंडित     डोंबिवली: येथील फडके रोडवरील कुळकर्णी ब्रदर्स आणि अंबिका हॉटेल लगतच्या रेन ट्री या जुनाट झाडाच्या फांद्या मुसळधार पावसाने वाकून मोठ्या वाहनांना अडथळा ठरू लागल्या. या फांद्या या भागातील महावितरणच्या जिवंत वीज वाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन जवानांनी बुधवारी सकाळी या झाडाच्या वाहनांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या, वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडून टाकल्या. दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या सततच्या माऱ्याने डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील कुळकर्णी ब्रदर्स आणि अंबिका टेल व हॉटेल लगत असलेले एका रेन ट्रीच्या जुनाट झाडाच्या फांद्या रस्त्यावर वाकल्या होत्या. या फांद्या केडीएमटी बस, कंपन्यांच्या बसना अडथळा येत होत्या. या फांद्या अचानक रस्त्यावर पडल्यावर तर पादचाऱ्यांना धोका आणि रिक्षेवर पडल्यावर रिक्षेचे नुकसान होण्याची शक्यता होती. या भागातील व्यापाऱ्यांनी याबाबतची माहिती पालिकेच्या अग्निशमन जवानांना दिली. जवानांनी एक तासाच्या कालावधीत या झाडाच्या धोकादायक असलेल्या फांंद्या तोडून टाकल्या. तोपर्यंत फडके रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने खोळंबून राहिली होती. या रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. या कामासाठी या भागातील वीज पुरवठा काम पूर्ण होईपर्यंत खंडित करण्यात आला होता. फडके रस्त्यावर सकाळच्या वेळेत कोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी मदन ठाकरे चौक भागात उतरून पायी नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणे पसंंत केले. बुधवारी सकाळी वर्दळीच्या वेळेत हा प्रकार सुरू होता. डोंबिवली, कल्याण परिसरात अनेक जुनाट झाडे वर्दळीच्या रस्त्यांंवर आहेत. या झाडांबाबत पालिकेने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. 00000

मुसळधार पावसामुळे टिटवाळाजवळील रूंदे पूल पाण्याखाली

१२ गावांचा संपर्क तुटला   कल्याण : मुसळधार पावसामुळे टिटवाळ्या जवळील काळू नदीवरील रूंदे पूल बुधवारी दुपारी पाण्याखाली गेला. त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्याने परिसरातील १२ गावांचा कल्याण परिसराशी असलेला संपर्क तुटला आहे.टिटवाळा जवळील रूंदे गाव हद्दीतून काळू नदी वाहते. या नदीवरील पूल नदीच्या पाणलोट स्तरापासून कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात काळू नदी दुथडी भरून वाहू लागली की रूंदे पूल पाण्याखाली जातो. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने काळू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे रूंदे पूल पाण्याखाली गेला आहे. कल्याण, टिटवाळा भागात जाण्यासाठी फळेगाव, उशीद, हाल, मढ, पळसोली, काकडपाडा, दानबाव, नडगाव, वावेघर, राया, उतणे, ओझर्ली, चिंचवली, कुंभारपाडा गावांमधील रहिवासी रुंदे पुलाचा वापर करतात.सकाळी या गावांमधून दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते कल्याण, मुंबई परिसरात गेले होते. हे व्यावसायिक घरी परतताना रूंदे पुलावर पाणी असल्याने अडकून पडले. टिटवाळा, कल्याण भागात शाळांमध्ये येणारे विद्यार्थ्यांना या पुराचा फटका बसला. न्यायालय आवार पाण्यात कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या भागात या कामांमुळे काही ठिकाणी गटारे बांधण्यात आलेली नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठीच्या मार्गात अडथळे आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, कल्याण जिल्हा न्यायालय, तहसीलदार कार्यालय, दिलीप कपोते वाहनतळ भागात पाणी साचत आहे. न्यायालयात आवारात पाणी तुंंबत असल्याने वकिलांसह अशिलांना या पाण्यातून येजा करावी लागते. तहसीलदार कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांचीही तीच अवस्था आहे. आता रस्ता वरील भागात आणि न्यायालयाची इमारत खालच्या भागात गेल्याने न्यायालय आवारात पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे.या भागातील पाणी उपसा करण्यासाठी पालिकेने तीन उच्च दाबाचे पंप बसविले आहेत. 0000

गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा येथे युनियन पदाधिकाऱ्यांची सभा

ठाणे : गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा नूसी रिसॉर्ट येथे २० व २१ जुलैला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची सभा संपन्न झाली.  या मिटिंगमध्ये  बंदर व गोदी कामगारांच्या…

 केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने केले गाजर आंदोलन     ठाणे : ‘केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर… महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशावर खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाने आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि  कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते. ‘अर्थसंकल्पात एकच दोष… महाराष्ट्र रोष’ असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की, केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेष करणारे सरकार आहे. आधी महाराष्ट्रातील उद्योग पळविले अन् आता अर्थसंकल्पात तोंडाला पाने पुसली आहेत. वास्तविक पाहता, महायुतीच्या खासदारांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष करायला हवा होता. मात्र, हे खासदार गप्प बसले आहेत. जर आंध्र आणि बिहारवर खैरात केली जात असेल तर महाराष्ट्रावरील अन्यायाबाबत जाब विचारण्याची धमक भाजप , शिंदेगट आणि अजित पवार गटाने दाखवायला हवी होती. पण, ते तसे करू शकत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्देवं आहे, अशी टीका केली. या आंदोलनात  महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर,  विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे,  युवती निरीक्षक प्रियांका सोनार, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, हाॅकर्स सेलचे सचिन पंधेरे, असंघटीत कामगार सेलचे राजू चापले, महारष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना ताई वैद्य,दिपक क्षत्रिय, मिलिंद भाऊ बनकर, राजेश कदम, राजेश ज. साटम, ठाणे विधान सभा अध्यक्ष महेंद्र पवार, संदिप पवार, संजीव दत्ता, शुभम व्दिदवी, धर्मेंद्र अस्थाना, शिवा यादव, कुळविंदर सिंग सोखी, आशिष उमासरे, माधुरी सोनार, अरविंद मोरे, पटेल भाभी, ज्योती निंबाळकर, शुभांगी खेडकर, शशी पुजारी, आरती गायकवाड, राणी देसाई, नितीन आहेर, हिरु गंगावणे, मनिषा म्हात्रे, साहिल उदुगाडे, वैभव खोत,पुरषोत्तम पाटील ,कैलास सुरकर, राहु पाटील, विलास पाटील, शेखर भालेराव, रिंकू सिंह, समीर नेटके, आशिष खाडे, राजेश मिश्रा आदी सहभागी झाले होते. ००००

गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा येथे युनियन पदाधिकाऱ्यांची सभा

ठाणे : गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा नूसी रिसॉर्ट येथे २० व २१ जुलैला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची सभा संपन्न झाली.  या मिटिंगमध्ये  बंदर व गोदी कामगारांच्या…