Month: July 2024

 ‘मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची हकालपट्टी करा’

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी राजीव चंदने       मुरबाड : राज्यभरात गाजलेल्या “झोळी” प्रकरणाचे रोहित पवार यांनी ट्विट केले होते.त्या अनुषंगाने मुरबाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्यास सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. असा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची या तालुक्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. मागील तीन महिन्यांपुर्वी तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात कागदोपत्री श्रेणी अ वर्गाच्या निवासी डॉक्टर असूनही ते निवासी नसल्याने एका शिक्षकाचा उपचारा अभावी बळी गेला. म्हसा यात्रेदरम्यान म्हाडस या एकाच गावात डेंग्यूचे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. याच कालावधीत देवपे व सासणे येथे प्रत्येकी एक बालमृत्यू झाले होते.हे प्रकरण खुप गंभीर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. धसई जवळील ओजिवले कातकरी वाडीतील महिलेला दि.23 जून रोजी रात्रभर डॉक्टर निवासी नसल्याने प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या.डॉक्टर दुसऱ्या दिवशी आल्याने तिची 24 रोजी प्रसूती झाली. मुळात माहेरघर नावाची योजना सुरू असताना ऐन प्रसूतीवेळी गर्भवतींना रुग्णालयात दाखल होण्याची गरज का पडते? मुरबाड तालुक्यात आजमितीस माहेरघर योजनेचा एकही लाभार्थी नाही.या माहेरघर योजनेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.यास सर्वस्वी तालुका आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत. वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षाच्या बालकाला सर्पदंश झाला.त्या बालकाला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणले.मोरोशी येथील गट अ वर्गाच्या डॉक्टर तेथे निवासी नसतात हे परिसरात सर्वश्रुत आहे.त्यामुळे या बालकाला टोकावडे येथे नेले.आणि त्याचा जीव गेला. जांभूर्डे येथील गर्भवतीला म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्र असताना याठिकाणी डॉक्टर निवासी नसल्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणले.येथेही हे बाळ दगावले. सार्वजनिक आरोग्यसेवेची पुरती वाट तालुका आरोग्य अधिकारी यांनी लावल्याने तालुक्यात दररोज बळी जात आहेत.याचमुळे तालुक्यात दररोज नव्याने खासगी हॉस्पिटल निर्माण होत आहेत.हे सार्वजनिक शासकीय आरोग्य सेवेचे अपयश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कारभारावर तसेच याठिकाणी निवासी डॉक्टर नसल्या कारणाने तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत.असा आरोप त्यांनी बनसोडे यांच्यावर या निवेदनात करण्यात आला आहे.मुरबाडच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून या बाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.त्यामुळे या एकूण कारभाराची काय चौकशी होते,व कुणावर काय कारवाई होते याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.दरम्यान कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिपक वाघचौडे यांनी दिला आहे. ०००००

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघातर्फे विठ्ठल भक्तिपर गीतांचा सांगीतीक कार्यक्रम

मुंबई- मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ ही संस्था सातत्याने ११ वर्षे वाद्यवृंद निर्माते व कलावंताच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. सदर संस्थेच्या वतीने बुधवार  दि .१७ जुलैला सायंकाळी ५ वाजता  अण्णाभाऊ साठे…

महायुती सरकारकडून मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी १०५ कोटीचा निधी  – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर       ठाणे : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत. मह्मुंयुती सरकारकडून मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी १०५ कोटीचा निधी दिलाआहे.. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले, असा रोखठोक संवाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला. शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषद ११ जागांसाठी महायुतीचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी होतील आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी होतील. महविकास आघाडीच्या तीन पैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असून शिवसेना (उबाठा) चे मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने ते विजयी होऊ शकतात. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होईल आणि हा पराभब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचा असेल. महायुतीच्या आमदारांची एकजूट पक्की आहे त्यामुळे घोडे बाजार होणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. भाजपाचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. महायुतीचे उमेदवार अधिकची मते मिळवून विजयी होतील, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत.२०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून ? २०१९ साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचे का ? बेसलेस आरोपांना मी काही फारसे महत्त्व देत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे फार लक्ष देऊ नये. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. लोकसभेच्या यशानंतर  काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये स्वतःला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला २८८ उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा कळव्यातून तिकीट मागत नाही ना ? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे. काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने डॉ. जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. मी स्वतः पुढाकार घेऊन आव्हाड यांची भेट अजितदादा पवार यांच्याबरोबर करून द्यायला तयार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५५ कोटी रुपयांचा विकास निधी आला आहे. आव्हाड यांच्या सोबतच्या अनेक नगरसेवकांनी हा निधी घेतलेला आहे. आता पुन्हा ५० कोटीचा विकास निधी आलेला आहे. मी, नजीब मुल्ला आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार 50 कोटीचा विकास निधी आला आहे व तो खऱ्या विकासासाठी निधी वापरला जाईल. त्यामुळे निधी मिळाला नाही असं आव्हाड धादांत खोटे बोलत आहेत. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर  एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत १०५ कोटी रुपये मुंब्रा-कळव्या साठी निधी आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. अजितदादा यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धीविनायकाकडे साकडे घातले. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल याची खात्री आहे. महायुतीत कोणतेही मतभेद नाही. समन्वयाने सर्व निर्णय होतील. राजकीय प्रगल्भता असली पाहिजे. अनेक बहिणींना मदतीचा हात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळणार आहे. वैयक्तिक भाऊ बहीण या नात्याबद्दल बोलणे टाळले पाहिजे. महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले आहे, असेही प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात डेंग्यु, मलेरियाने डोके वर काढले;

रूग्ण संख्येत वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन         ठाणे : जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ३२ हून अधिक रूग्णांची शासनाच्या दफ्तरी नोंद झाली आहे. मात्र यात रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने चांगला जोर धरला. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये हळुहळू वाढ होते आहे. पावसामुळे मोकळ्या आणि सखल भागात पाणीही साचते आहे. नैसर्गिक नाले प्रवाही झाले आहेत. त्याचवेळी शहरात रहिवासी भागांमध्ये मोकळ्या, सखल भागात, निर्माणाधीन इमारती, मोडकळीस आलेल्या आणि बंद घरांमध्येही पाणी साचू लागले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३२ रूग्णांची नोंद झाली आहे. यातील डेंग्यु सदृश्य रूग्णांची संख्या मोठी आहे. अनेक जण लक्षणे दिसल्यास खासगी स्तरावर उपचार घेत असल्याने अशा अनेकांची नोंद स्थानिक पालिका प्रशासनाच्या लेखी नाही. गेल्या आठवडाभरात ठाणे जिल्ह्यात १० डेंग्यु रूग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र त्याचवेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकट्या बदलापूर शहरात १२ डेंग्यु रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यु रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यातही एकाच घरात एकापेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होते आहे. तर जिल्ह्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्याही २० वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ताप उद्रेकाच्या ठिकाणी जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. हिवताप बाधित रुग्ण आढळ्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील रक्त तपासणी साठी पाठवण्यात येत आहेत. तर भिवंडी मध्ये इतर शहरांतून कामासाठी येणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. या मजुरांचे देखील सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नाले, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. तर ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गप्पी माशांचे एक पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग तपासणी पुरताच मर्यादीत जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमधील आरोग्य विभाग हा डेंग्युचे रूग्ण आढळ्यानंतर तपासणी करत रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सल्ले देण्यापुरताच मर्यादीत असल्याचे दिसून येते आहे. रूग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पथक रूग्णाच्या घरी जाऊन साचलेल्या पाण्याचे साठे तपासते. एखादी कुंडी, पाण्याची भांडी आढळल्यास त्यावरून रूग्णाच्या कुटुंबियांना सुनावले जाते. मात्र त्याचवेळी इमारतींच्या शेजारी असलेली डबकी, निर्माणाधीन इमारतींचे मालक यांना मात्र समज दिली जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

05 ऑगस्टला नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

मुंबई –  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे ऑगस्ट 2024 महिन्याचा लोकशाही दिन दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 19 जुलै 2024 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे. सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 0000

सर्व प्रभागांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज नोंदणी कक्ष

तातडीने सुरु करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश     नवी मुंबई : “मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने”ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 8 विभाग कार्यालयांप्रमाणेच महानगरपालिका वा शासकीय इमारतींमध्ये सर्व प्रभागांत अर्ज नोंदणी कक्ष तात्काळ सुरु करावेत व त्याची यादी नागरिकांच्या माहितीसाठी सर्व प्रसारमाध्यमांतून व्यापक स्वरुपात प्रसिध्द करावी असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश योजनेच्या आढावा बैठकी प्रसंगी दिले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जाहीर करण्यात आली असून 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ 1 अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. 1500/- इतकी रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र महिला ह्या नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: ऑनलाईन अर्ज भरु शकतात, तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्या महिलांसाठी अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने स्थापित केलेल्या विभाग कार्यालयातील विशेष नोंदणी कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणी कक्षांची संख्या मोठया प्रमाणात वाढवून प्रत्येक प्रभागात किमान 1 असे 111 नोंदणी कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे योजनेसाठी पात्र महिलांच्या सुविधेच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कक्षांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशाप्रकारे 2 सत्रात असावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. योजनेकरिता भरण्यात येणारे अर्ज बिनचूक भरावेत व शासन निर्णयात नमूद केलेली पुराव्यांची आवश्यक ती योग्य कागदपत्रे तपासून अपलोड करावीत असेही निर्देश यावेळी देण्यात आले. एकही पात्र लाभार्थी महिला नोंदणी कक्षातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी व अर्ज भरण्याची संपूर्ण कार्यवाही विनामूल्य होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अर्जात भरली जाणारी माहिती आधारकार्ड पायाभूत मानून त्यानुसार भरावी व अर्ज भरतानाच तो पूर्णपणे योग्य प्रकारे भरला जाईल याची विशेष काळजी घेण्याची आयुक्तांनी नमूद केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने फलक लावण्यात यावेत, हस्तपत्रके वितरीत करावीत, सर्व सोशल माध्यमांचा वापर करावा, अर्ज भरणा सुविधा केंद्रांची यादी जास्तीत जास्त माध्यमांतून प्रसिध्द करावी तसेच शाळांमध्येही विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांच्‍यामार्फत त्यांच्‍या घरांपर्यंत योजनेची माहिती पोहचावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बालवाडी शिक्षिका/सेविका, आशा वर्कर तसेच समाजविकास विभागातील समुह संघटक यांच्यामार्फतही त्यांच्या कार्यक्षेत्रातील घराघरात या योजनेची प्रसिध्दी करावी अशा सूचना देण्यात आल्या. विभाग कार्यालयांप्रमाणेच शाळा, रुग्णालये याठिकाणीही होर्डिंग – बॅनर्सव्दारे योजनेची प्रसिध्दी करण्याचे सूचित करण्यात आले. लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे घ्यावेत व ऑफलाईन घेतलेल्या अर्जांची पोहोच लाभार्थ्यांना द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. बालविकास विभागाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 226 अंगणवाड्या सुरु असून त्याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविकांमार्फत सुरु आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रभागांमध्ये अर्ज भरण्यासाठी नोंदणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. “मुख्यमंत्री – लाडकी बहीण” योजनेची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी व प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशाप्रकारे कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिले.

 कृषी क्रांतीचा जनक

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार       नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. १५ व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे एग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – नरेंद्र पंडित

अनिल ठाणेकर     ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून, यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाव्यतिरिक्त, याच परिसरात असणाऱ्या शिधावाटप कार्यालयाच्या दारातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, याचा अभ्यांगतांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे, अशी तक्रार धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या कचऱ्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, साचलेल्या कचऱ्यावर डासांचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी, डेंग्यू आणि मलेरिया या आजारांची लागण होण्याचा धोका जास्त आहे. संतापजनक बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच महाराष्ट्र शासनाचे “राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध योजना, ठाणे जिल्हा” यांचे कार्यालय याच ठिकाणी असून, दुर्दैवाने या कार्यालयात कोणीही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याची बाब ‘धर्मराज्य पक्षा’च्या निदर्शनास आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात उद्भवत असतात. त्यातच ठाणे शहर आणि जिल्ह्यात, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांतून प्रकाशित झालेले असताना, या पार्श्वभूमीवर, खुद्द ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे, हे प्रशासनाला नक्कीच भूषणावह नाही. तरी, याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत, रोगराईला आमंत्रण देणारे, कचऱ्याचे ढिगारे त्वरित काढून टाकण्यात येऊन, स्वच्छता राखावी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. 00000

पातलीपाडा येथील महापालिका शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी सकाळी पाहणी केली. या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला…