नवी मुंबई : घणसोली येथील एका ज्येष्ठ नागरिक महिला दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी रिक्षात विसरली. पोलिसांनी ही रिक्षा शोधण्यासाठी तब्बल ३५ सीसीटीव्हींचे चित्रण तपासले आणि रिक्षाचालकाचा माग काढला. दोन दिवसांत महिलेला सोनसाखळी परत मिळाली.
चंद्रिका शशिधरन यांनी वाशी रेल्वे स्थानकाजवळ एका सोन्याच्या पिढीतून २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी विकत घेतली. मात्र घरी येताना त्या ती रिक्षातच विसरल्या. त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी साखळीचा तपास सुरू केला. यासाठी शशिधरन या रिक्षात बसल्यापासून उतरेपर्यंतच्या मार्गावरील ३५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले, त्यात एक रिक्षा आढळून आली. क्रमांकावरून रिक्षा मालकाचा शोध घेतला मात्र रिक्षा मालक रिक्षा अन्य व्यक्तीला विकून उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समजले. त्यामुळे नवीन मालकाचा शोध घेतला. मात्र त्यानेही रिक्षा कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यक्तीला विकल्याचे समोर आले. त्यानंतर रिक्षाचालकाला कोपरखैरणे या ठिकाणी सापळा लावून ताब्यात घेतले. रिक्षाचालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोन्याची साखळी काढून दिली.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *