अनिल ठाणेकर
ठाणे : मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात येथून ये-जा करताना जीवाला धोका असतो. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी ६० ला़ख रुपयांच्या निधीची मान्यता मिळवून देवून या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कायमची सुटका केली आहे.
मुरबाड फांगूळगव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी, नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले आहे. येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मुरबाड फांगूळगव्हाण ग्रामस्थांनी नाल्यावर लाकडी पूल जुगाड करून शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांसाठी पावसाळ्यात या नाल्यावरुन जाण्यायेण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली होती. याविषयीची वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले वृत्त वाचताच त्याची दखल जिल्हाधिकारी अ़शोक शिनगारे यांनी तत्परतेने घेतली. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविमर्श करून अवघ्या तीनच दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून त्यांनी येथील पूलासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच या पूलाचे काम सुरु होईल, पूल बांधला जाईल अन् येथील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सूचना दिल्या आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने काम केल्यानंतर त्याच्या हातून लोकसेवक म्हणून किती चांगले काम होवू शकते, याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *