पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांचं काय बोलणं झालं हे मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की, आता विधानसभेची निवडणूक आली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक सभा घ्याव्यात. महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावं, म्हणजे आमचे मविआच तुम्हाला स्थिर सरकार देऊ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. लोकसभेला पंतप्रधानांनी १८ सभा घेतल्या होत्या. त्यातील १४ ठिकाणी आमचे उमेदवार निवडूण आल्याचे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली होती की, तुम्ही शरद पवार यांच्यावर टीका करु नका, याबाबत शरद पवार यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी
आहे. निर्यातीची धोरण चुकीची आहेत. शेती अर्थव्यवस्था संकटात आलं की देशाची अर्थव्यवस्था देखील संकटात येते.
राज ठाकरेंच्या टीकेवर काय म्हणाले पवार?
महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, शरद पवार यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रतिसवाल केला आहे. मणीपूरचा प्रश्न वेगळा आहे. हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? असा प्रतिसवाल पवारांनी केला आहे. मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा देखील गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला माहीत नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही, तसा माझा इतिहास नाही.
