संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
मुंबई : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावलाय. ‘बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत’, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष केलय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, ‘लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात. महाराष्ट्राला बदल हवाय त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत.’ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात सावत्र कोणीही नाही. सावत्र आहेत ते दिल्लीत बसलेत. मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देतात. महाराष्ट्राचा सावत्र भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढे महाराष्ट्राचे नुकसान केलं तेवढं 100 वर्षात कुणी केलं नाही. मुख्यमंत्री काल एका सभेत ताई माई अक्का सावत्र भावांना मारा बुक्का असे म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर
‘उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ डबल आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला आहे.’
