ठाणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान अभियान साजरे करण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने काल तिरंगा सन्मानाबाबत शपथेचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता पार पडला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या आनंद उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात साजरे करण्यात येत असून या अभियानांतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. ‘मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन’ अशी शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषद केंद्र शाळा वेहेळे येथील विद्यार्थीं यांनी “देश माझा मी देशाचा, सदैव ठेऊ भान” समुहगायन केले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, लघुपाठबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद केंद्र शाळा वेहेळे येथील शिक्षक व विद्यार्थींनी उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *