साई फाऊंडेशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी सराव शिबिर रविवारी ठाण्यात

 

ठाणे : साई फाऊंडेशच्यावतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे 2 रे वर्ष आहे. तसेच उत्सवाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाऊंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक, साई फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मुंबई येथून गोविंदा पथके ठाणे शहरात येतात. ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून एक महिना आधिपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरु झाला आहे. या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रं १२० येथे १८ ऑगस्टला सायं ५ ते १० या वेळेत सराव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली. येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्राफी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच या वर्षी फाऊंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे. यासाठी फाउंडेशने रोख रक्कम 3 पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे.
साई फाऊंडेशन विद्यार्थी दत्तक योजेनेचा शुभारंभ यावेळी होणार आहे. ही योजना (शासकीय शाळा मान्यता प्राप्त संचालित) या शाळेमधील इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान ए आणि बी ग्रेड मिळविलेला असावा किंवा ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे पालक नसल्यास १०० टक्के फी या योजनेअंतर्गत संस्थेच्या वतीने भरली जाणार आहे. विद्यार्थ्याला पालक (आई) असल्यास ५० टक्के फी भरण्यात येणार आहे. पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांच्या आत असणे आवश्यक असल्याचे चेतन सुकाळे यांनी सांगितले.
वार्षिक शुल्काबरोबरच विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही दिल्या जाणार आहेत. शालेय गणवेश / दप्तर, वह्या-पुस्तके, शालेय वस्तूही मदत म्हणून देणार असल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *