रमेश औताडे
मुंबई :बदलापूरची घटना सरकारने संवेदनशीलपणे हाताळली मात्र विरोधकांनी यावर राजकारण केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी महाराष्ट्राचा लवकरच मणिपूर होईल, असे भाकीत केले होते. मग बदलापूरमध्ये मणिपूरचा ट्रेलर होता का ? अशी सणसणीत टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी शरद पवारांवर केली.
राजकीय स्वार्थासाठी ऐन सणासुदीत महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या व्यवहारात विकृती असल्याचा घणाघात निरुपम यांनी केला. साधुसंताच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. शरद पवार आणि विरोधक राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या हिंसाचार घडवून आणू शकतात असा गंभीर आरोप निरुपम यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले की, बदलापूर घटनेनंतर सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती, विशाखा समिती आणि सीसीटीव्ही कार्यरत करण्याचे आदेश दिले. सरकारकडून हे प्रकरण प्राधान्याने हातळण्यात येत आहे, असे निरुपम म्हणाले. मात्र निवडणूक डोळ्यासमोर असल्याने या प्रकरणाचे विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप निरुपम यांनी केला.
